Category Archives: सिंधुदुर्ग

तळकोकणातील ती २५ गावे “पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशीलच”….अधिसूचना काढण्यासाठी उच्च न्यायालयाचा सरकारला अल्टिमेटम

   Follow us on        
सावंतवाडी, दि. १४ एप्रिल : सावंतवाडी – दोडामार्ग तालुक्यातील २५ गावांच्या क्षेत्राला ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’  क्षेत्र Eco Sensitive Zone ESZ जाहीर करण्यात  यावे असेच आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार व केंद्र सरकारला दिले होते. त्यानुसार राज्य सरकार व केंद्र सरकारने २७ सप्टेंबर २०१३ मध्ये कॉरिडॉरचा हा भाग ‘पर्यावरणीयदृष्टीने संवेदनशील’ भाग म्हणून जाहीर करण्याचे आश्वासन न्यायालयाला दिले होते. मात्र गेल्या ११ वर्षात या आदेशांचे पालन झाले नसल्याने  केंद्र व राज्य सरकारने केवळ न्यायालयाच्या आदेशाचा भंग केला नाही तर कर्तव्य पार पाडण्यातही ते अपयशी ठरल्याचे म्हणत न्यायालयाने ताशेरे ओढले आहेत.
आता मात्र उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि राज्य सरकारला सहा महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे. राज्य सरकारने  चार महिन्यांत केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवावा. केंद्र सरकारने पुढील दोन महिन्यांत अंतिम अधिसूचना काढावी असा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे.
अधिसूचना काढण्यासाठी ११ वर्षांचा विलंब करण्यात आला, हे दुर्दैव असल्याची माहिती न्यायालयाने दिली. हा भाग पर्यावरणीयदृष्टीने अत्यंत संवेदनशील असूनही येथे दोन वर्षांत ६३९.६२ हेक्टर जमिनीवर जंगलतोड झाल्याने ही चिंतेची बाब आहे. भविष्यात हा प्रकार असाच सुरू राहिला तर माणसांचा वावर वाढून कॉरिडॉर नष्ट होईल, असे निरीक्षण न्या. नितीन जामदार व न्या. एम. एम. साठ्ये यांच्या खंडपीठाने नोंदविले.
या भागातील जंगलतोडीवर न्यायालयाने २०१३ मध्ये स्थगिती दिली होती. केंद्र सरकार अंतिम अधिसूचना काढेपर्यंत ही स्थगिती कायम राहील, असे न्यायालयाने स्पष्ट केले. झाडे तोडण्यास आळा बसावा यासाठी न्यायालयाने सावंतवाडी-दोडामार्ग टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश सावंतवाडीचे जिल्हाधिकारी, उपवनसंरक्षक सावंतवाडी आणि सिंधुदुर्गचे पोलिस अधीक्षकांना दिले आहेत.
उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने महत्वपूर्ण नोंदी दिल्या यामध्ये, सावंतवाडी-दोडामार्ग कॉरिडॉरदरम्यान २५ गावे आहेत. या मार्गात मोठ्या प्रमाणात जंगल भाग असल्याने वन्यप्राण्याचा नेहमी राबता असल्याचे वारंवार निदर्शनास आले आहे. या भागात दुर्मीळ वनस्पतींसह किटकांच्या विविध प्रजाती आहेत.
ती २५ गावे कोणती?
कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील एकूण ३३ गावांचा समावेश इको सेन्सेटिव्ह झोन ESZ मध्ये करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. सिंधदुर्गतील केसरी, फणसवडे , उडेली, दाभील- नेवली, सरंबळे, ओटावणे, घारपी, असनिये, फुकेरी, तांबोळी, कोनशी, भालावल, भेकुर्ली, कुंभवडे, खडपडे, तळकट, झोळंबे, कोलझर, शिरवळ, कुंब्रल, पांतुर्ली, भिके कोनाळ, कळणे, उगडे, पडवे माजगाव ही २५ गावे या कॉरिडॉर मध्ये मोडतात.

संपादकीय: सावंतवाडीचा विकास विरुद्ध दिशेने?

   Follow us on        

संपादकीय :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक जुने, इतिहासाचा वारसा असलेले, प्रसिद्ध पर्यटन स्थळ, सुंदर आणि तलावाचे शहर अशी अनेक विशेषणे असलेल्या सावंतवाडी या शहराचे वर्णन महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक शहर अशा शब्दात केल्यास ती अतिशयोक्ती निश्चीतच ठरणार नाही.

सावंतवाडी हे शहर माहीत नसलेला व्यक्ती क्वचितच सापडेल. कधी काळी मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहरातूनच जात असे. मुंबई गोवा प्रवासात अनेक शहरे लागत असली तरी प्रवाशांच्या स्मृतीत राहणारे हे एकमेव शहर. पर्यटकांना आकर्षित करणारा येथील स्वच्छ आणि सुंदर तलाव म्हणा, महामार्गाला अगदी लागून असलेला राजवाडा म्हणा किंवा स्थानिक कलाकारांनी हस्तकौशल्यांने साकारलेली येथील लाकडी खेळणी म्हणा, या सर्व गोष्टी पर्यटकांना नेहेमीच आकर्षित करत आले आहेत.

दुसरे म्हणजे पाश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडणारा निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी महामार्ग सुद्धा सावंतवाडी शहरातून जातो,त्यामुळे मुंबई म्हणा किंवा पाश्चिम महाराष्ट्र म्हणा गोव्याला जाणारा पर्यटक सावंतवाडी शहरातून जाणार हे नक्की. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यातील ईतर शहरांशी तुलना करता सावंतवाडी शहराचा विकास चांगला होत होता.

मात्र मागील काही वर्षांपासून चित्र बदलायला लागले. सर्व काही सुरळीत चालू असताना या शहराला कोणाची नजर लागावी तशा या शहराच्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी घडायला सुरवात झाली.

कोकणात 1998 साली कोकणरेल्वे आली. सावंतवाडी शहर हे मध्यवर्ती आणि तालुक्याचा प्रशासकीय भाग असल्याने या शहरातून किंवा शहराजवळून रेल्वे मार्ग जाणे अपेक्षित होते. मात्र तसे न होता तो शहराच्या बाहेरून नेवून शहरापासून जवळपास आठ किलोमीटर दूर रेल्वे स्थानक बनविण्यात आले. वाहतुकींच्या अपुऱ्या सोयींमुळे तालुक्यातील नागरिकांसाठी हे रेल्वेस्थानक गैरसोयीचे बनले. जर स्थानक शहराच्या जवळपास असते तर येथील प्रवासी संख्याही जास्त असली असती आणि रेल्वेला मिळणार्‍या महसुलाच्या बाबतीतही कोकण रेल्वेच्या पाहिल्या पाच स्थानकांच्या यादीतही सावंतवाडीचा समावेश नक्किच झाला असता.

दुसरी नकारात्मक गोष्ट घडली ती म्हणजे या शहरातून जाणारा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग शहराच्या दूर जवळपास 5 ते 6 किलोमीटर अंतरावरून बाहेरूनच वळविण्यात आला. शहराच्या विकासावर त्यामुळे नकारात्मक परिणाम झालाच मात्र सर्वात मोठा परीणाम येथील पर्यटनावर झाला. पर्यटनावर अवलंबून असलेल्या हॉटेल व्यावसायिक, कोकणी मेवा विक्रेते, लाकडी खेळणी दुकानदार आणि ईतर व्यावसायिकांचा रोजगार हिरावला गेला. गोवा मुंबई दरम्यान चालविण्यात येणार्‍या खाजगी बसेस आता शहराच्या बाहेरून जावू लागल्याने चाकरमान्यांच्या त्रासातही वाढ झाली आहे.

या गोष्टी कमी होत्या म्हणुन की काय आता सावंतवाडी शहराच्या बाबतीत अजून एक नकारात्मक गोष्ट घडत आहे. विद्यमान सरकारचा प्रस्तावित महत्त्वाकांक्षी नागपूर गोवा महामार्गही आता सावंतवाडी शहराबाहेरून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे. या महामार्गाचा आराखडा बनवताना कोकणचा विकास किंवा कोकणच्या पर्यटनाचा विकास या दोन्ही गोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत. या महामार्गामुळे पाश्चिम महाराष्ट्रातून येणारा पर्यटक सरळ बाहेरच्या बाहेर गोव्यात जाणार आहे. गोव्याला जायला शक्तीपीठ महामार्गाचा पर्याय मिळाल्याने सावंतवाडी शहरातून जाणार्‍या सध्याच्या निपाणी-आजरा-आंबोली सावंतवाडी  महामार्गाचे महत्व कमी होणार आहे. सहाजिकच त्याचा फटका सावंतवाडी शहराच्या विकासाला बसणार आहे.

वरील गोष्टींमुळे सावंतवाडी शहराच्या तसेच संपूर्ण तालुक्याच्या विकासाला खीळ बसली आहे. तालुक्यातील साधनसामुग्री जमिनींच्या स्वरुपात महामार्गासाठी, रेल्वेरूळांसाठी वापरल्या गेल्या आहेत. मात्र त्याचा फायदा पाहिजे तसा तालुक्याला झाला नाही. चुका झाल्यात, मात्र त्या कोणाकडून, का आणि कशा झाल्यात यावर पण विचार करणे गरजेचे आहे. काही प्रमाणात येथील स्थानिक नागरिकही याला जबाबदार असतिल आणि येथील राजकारणीही. मात्र आता चुका सुधारल्या गेल्या पाहिजेत नाहीतर सावंतवाडी शहर किंबहुना संपूर्ण तालुका विकासाच्या युगात खूप मागे पडेल.

अभिमानास्पद! सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला ‘जी आय’ मानांकन प्राप्त

   Follow us on        

सावंतवाडी, दि. १० एप्रिल : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. जगप्रसिद्ध असलेल्या सावंतवाडीच्या लाकडी खेळण्यांना आणि गंजिफा कलेला केंद्राच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जीआय मानांकन  Geographical Indication (GI)  दिले आहे. त्यामुळे सावंतवाडीच्या लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला संरक्षण प्राप्त झाले असून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत लाकडी खेळणी आणि गंजिफा कलेला महत्व येणार आहे.

सावंतवाडीच्या राजघराण्याने हे मानांकन मिळविण्यासाठी विशेष प्रयत्न केले होते. लाकडी खेळणी आणि सावंतवाडी लॅकर्स वेअर संस्थेच्या गंजिफा कलेला सावंतवाडीच्या राजघराण्याने नेहमीच संरक्षण दिले आहे. जीआय मानांकन मिळाल्यामुळे सिंधुदुर्गच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या संदर्भात संस्थानचे बाळराजे आणि युवराज लखमराजे भोसले आज बुधवारी पत्रकार परिषद घेऊन सविस्तर माहिती देणार आहेत.

जी. आय. मानांकन म्हणजे काय?

हे एक मानांकन आहे. हे मानांकन त्या विशिष्ट परिसरातील मूळ कृषीविषयक, नैसर्गिक किंवा उत्पादित माल ओळखण्यासाठी वापरतात. या मालाचा उगम त्या विशिष्ट प्रदेशातीलच असतो.

जी. आय. मानांकन हे एखादी वस्तू/पदार्थ/उत्पादन हे खास दर्जाचे किंवा एकमेवा व्दितीय असल्याची पावती आहे.थोडक्यात कुठल्याही वस्तूला जीआय मानांकन मिळण्यासाठी दोन महत्त्वाचे निकष असतात. एक म्हणजे ती वस्तू एका विशिष्ट भौगोलिक भागात एका विशिष्ट पद्धतीने बनविली गेली असली पाहिजे आणि दुसरे म्हणजे त्या वस्तूचा विशिष्ट दर्जा किंवा गुण हा ती त्या भागात बनल्यामुळे असला पाहिजे. तर आणि तरच त्या वस्तूला जी आय मानांकन दिला जातो. आणि जीआय हीसुद्धा एक बौद्धिक संपदा आहे. विशेषत: शेतीमाल असेल तर (आंबे, द्राक्षे, चिकू, तांदूळ इ.) किंवा हाताने बनविली जाणारी वस्तू किंवा पदार्थ असेल तर (हातमागावर विणली जाणारी वस्त्रे, हाताने बनविली जाणारी खेळणी किंवा इतर वस्तू). कारण शेतात उगवणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात त्या त्या भागातली माती, हवामान, पर्जन्यमान यांसारख्या गोष्टींमुळे. तर हाताने बनविल्या जाणाऱ्या वस्तूंचे गुण बदलतात तिथल्या कारागिरांचा अनुभव, परंपरागत कौशल्ये, पिढीजात कला यांसारख्या गोष्टींमुळे. आणि म्हणूनच अशा काही गोष्टींबाबत त्या कुठे बनल्या हे फार महत्त्वाचे असते. आणि आपण कित्येकदा पाहतो की त्या जागेनुसार त्या वस्तूचा भाव आणि दर्जा ठरत असतो.

कोकणच्या मातीचा गंध असलेली, सावंतवाडीच्या सुपुत्राने बनवलेली वेबसीरीज ‘संभ्रम’ बुधवारी ओटीटी प्लॅटफॉर्मवर; ट्रेलर येथे पहा

S. R. Y. Production प्रस्तुत, निर्माता आनंद मिस्त्री, लेखक रमेश भेकट आणि दिग्दर्शक कारिवडे गावच्या सागर गोसावी यांच्या संकल्पनेतून 'संभ्रम' ही रहस्यमय कथा साकारली आहे. ही कथा कोकणातील एका सर्वसामान्य तरुणाच्या आयुष्यात अचानक घडणाऱ्या रहस्यमयी आणि असामान्य गोष्टींमुळे प्रेम, नाती, मैत्री या सर्वांमध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करते. प्रेक्षकांच्या मनातही भ्रम निर्माण होतो.

   Follow us on        
सावंतवाडी, ता. ८ : तालुक्यातील कारिवडे-गोसावीवाडी येथील सागर गोसावी या युवकाने दिग्दर्शित केलेल्या सात भागांची ‘संभ्रम’ ही मराठी वेबसीरीज बुधवारी (ता.१०) ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारीत होणार आहे. आज  त्याच्या पोस्टरचे अनावरण आज माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
गरीब आणि ग्रामीण तरुणाच्या जीवनावर आधारित बनवलेल्या या वेबसीरीजमध्ये प्रेम प्रकरणातून मित्रांमध्ये कशी संभ्रमावस्था निर्माण होते, हे दाखविल्याचे निर्माता आनंद मेस्त्री आणि दिग्दर्शक सागर गोसावी यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
सावंतवाडी आणि परिसरात सिरीजचे शूटिंग झाले. चार साडेचार लाख रुपये खर्च करुन हा प्रयत्न केला आहे. यात स्थानिक कलाकारांनी काम केले आहे. वेब सिरीजमध्ये सुरुवातीच्या भागापासून निर्माण झालेला गुंता, संभ्रम शेवटच्या भागांमध्ये उघड होतो. त्यामुळे सर्वच्या सर्व भाग निश्चितच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतील. आम्ही या क्षेत्रात नवीन आहोत. परंतु, नव्याने काहीतरी करण्याच्या उमेदीने आणि या भागातील निसर्ग आणि कलाकार जगासमोर यावेत यादृष्टीने काम करत आहोत. आम्हाला अजून मोठा टप्पा गाठायचा आहे. ही प्राथमिक सुरुवात आहे. भविष्यात यापेक्षा अधिक चांगले करू. असे यावेळी चित्रपट निर्माते सागर गोसावी यावेळी म्हणालेत.
 यावेळी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी नगरसेविका अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, रवी जाधव, कलाकार गायत्री रामशिंदे, राम निपाणीकर, सुहास रुके आदी उपस्थित होते.
Watch Trailer Here 👇🏻

सावंतवाडी टर्मिनसला उघड पाठिंबा देणार तोच आमचा उमेदवार- सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटना

लोकसभा निवडणुकीचा जो उमेदवार प्रवासी संघटनेच्या मागण्यांना आपल्या जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल असे सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

   Follow us on        
सावंतवाडी दि. ०७ एप्रिल: कोकण रेल्वे प्रवाशांची गैरसोय दूर व्हावी, रेल्वे गाड्यांना थांबे मिळावेत, टर्मिनस व्हावे, टर्मिनस ला प्रा मधू दंडवते यांचे नाव द्यावे अशा प्रवासी संघटनेच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजेत त्यासाठी लोकसभा निवडणुकीतील जो उमेदवार जाहिरनाम्यात स्थान देईल तोच प्रवासी वर्गाचा उमेदवार असेल. आतापर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींनी दुतोंडी भुमिका मांडली आहे यापुढे तशी भूमिका चालणार नाही असा इशारा सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड संदीप निंबाळकर व सचिव मिहीर मठकर यांनी दिला आहे.
आता लोकसभा निवडणुकीत सावंतवाडी टर्मिनस ला उघड पाठिंबा देणार्‍या उमेदवाराला पाठिंबा देणार आहोत त्यामुळे राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी सावंतवाडी टर्मिनस बाबतीत जाहीर बोलावं, जाहीरनाम्यात रेल्वे स्थानक टर्मिनस विषय घ्यावा. टर्मिनस साठी आंदोलन छेडले गेले, टर्मिनस भूमिपूजन झाले आणि नऊ वर्ष रखडले आहे. टर्मिनस ला विरोध आणि बाजू घेणारे आज एकत्र आहेत. रेल्वेमंत्री यांना भेटल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आश्वासन दिले होते. मात्र प्रवाशांची गैरसोय होत आहे याकडे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे..
कोणतीही निवडणूक असली तर कोकणातून राजकारणी लोकांना चाकरमान्यांची आठवण येते. मग काय गावातून फोनवर फोन जातात कि तुझे नाव येथील वोटिंग लिस्ट वर आहे, मतदानाला येऊन आम्हाला सहकार्य कर. मात्र त्याच चाकरमान्यांच्या कोकणात आपल्या गावी जाण्यासाठी होणाऱ्या खडतर प्रवासाशी राजकारणी लोकांना देणे घेणे नाही. अशा वेळी निवडणुकीतच आपल्या मागण्या पूर्ण करण्याची संधी चाकरमान्यांनी सोडू नये,

Konkan Tourism | येथे समुद्र अंधारात चमकतो, कोकणातील ‘या’ बीचला भेट देऊन अनुभवा निसर्गाचा अविष्कार

   Follow us on        

Konkan Tourism:भारतामध्ये असे अनेक समुद्रकिनारे आहेत जिथे तुम्ही बायोल्युमिनेसेन्सच्या विस्मयकारक घटनेचे साक्षीदार होऊ शकता, जिथे बायोल्युमिनेसेंट फायटोप्लँक्टनच्या उपस्थितीमुळे समुद्र अंधारात चमकताना दिसतो. भारतामध्ये असे चमकणारे एकूण पाच समुद्र किनारे आहेत. कोकण पर्यटनासाठी गौरवाची बाब म्हणजे सिंधुदुर्गातील मालवणचा समुद्र किनारा या चमकणाऱ्या समुद्र किनाऱ्यामध्ये येतो.

Continue reading

सावंतवाडी | सरसकट बंदुका जमा करण्याच्या आदेशावर शेतकरी नाराज

   Follow us on        
सावंतवाडी :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेती संरक्षण बंदूक जमा करण्यासाठी आदेश काढल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी नेमळे येथील शेतकऱ्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या मते,  सध्या उष्णतेतही वाढ झाली आहे. जंगलात पाणीसाठा नसल्याने वन्य प्राणी लोकवस्तीमध्ये घुसत आहेत. त्यांच्याकडून नागरिकांवर हल्ले होत असल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे शेती संरक्षण बंदूक गरजेची आहे. मात्र, निवडणूक विभागाने शेतकऱ्यांच्या बंदुका जमा करून करून घेण्याचे आदेश पारित केले आहेत, हे शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात माणूस जखमी किंवा मृत्यू झाला तर त्याबाबतची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला आहे.
वन्य प्राणी त्रास देत असतील तर हवेत गोळीबार करून शेतकरी आत्मसंरक्षण करतात आणि प्राण्यांना पळवून लावतात हे परंपरेप्रमाणे अनेक वर्ष होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या बंदुकांच्या बाबत पोलिस स्थानकामध्ये गुन्हे दाखल असतील किंवा तक्रारी असतील त्या बंदुका पोलिसांनी जप्त कराव्यात. मात्र, कायद्याचे पालन करणाऱ्या प्रामाणिक शेतकऱ्यांच्या बंदुका सरसकट जमा करण्याबाबतचे आदेश शिथिल करण्याची मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात शेती संरक्षक परवानधारक शेतकरी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन लक्ष वेधणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

“ती बंदूक माझ्याकडे….” दीपक केसरकरांनी दिले ‘त्या’ बंदुकीबद्दल स्पष्टीकरण

   Follow us on        
सावंतवाडी: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  शस्त्रधारकांना शस्त्र जमा करण्यासंबंधी  काढलेल्या नोटिसीत  शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे नाव असल्याने खळबळ माजली आहे. मात्र या बाबत दीपक केसकर यांनी आता साष्टीकरण दिले आहे.
मंत्री केसरकर यांनी याबाबत प्रसिध्दी पत्र देऊन बाजू स्पष्ट केली आहे. त्यात म्हटले आहे की, माझ्याकडे कुठल्याही प्रकारची बंदुक नाही, वडिलांच्या कालावधीत त्यांच्याकडे दोन बंदुकांचा परवाना होता. त्यातील एक बंदूक ही वारसाने प्राप्त झाली व एक बंदूक माझ्या वडील बंधूंना प्राप्त झाली. वडिलांची आठवण म्हणून ही शस्त्रात्रे आजही पुजण्यासाठी आम्ही वापरतो. गेल्या पन्नास वर्षांत त्या शस्त्रांचा वापर झाला नाही. निवडणूक काळात शस्त्रे जमा करण्याचे आदेश पारित होतात. वेळोवेळी आम्हीही ती जमा केली आहेत. परंतु, ‘मंत्री केसरकर यांच्यासह १३ जणांना शस्त्र जमा करण्याचे आदेश’ अशी बातमी चुकीची असून जनतेची दिशाभूल करणारी आहे. नव्याने झालेल्या कोर्टाच्या निर्णयानुसार सर्वांची शस्त्रे सरसकट जमा करणे योग्य नसल्याने, योग्य कारण असल्यास ती हत्यारे जमा न करण्याबाबत बंधन प्रशासनावर घालण्यात आले आहे. परंतु, जिल्हा प्रशासनाने सर्व शस्त्रधारकांना नोटीसा दिल्या आहेत. केवळ शस्त्राचा परवाना असल्याने अशाप्रकारची बदनामी होणे गैर आहे, असे मंत्री केसरकर यांनी पत्रात म्हटले आहे.
तालुक्यातील १३ जणांची यादीमध्ये नावे असून सर्वांत शेवटचे नाव दीपक केसरकर यांचे आहे. त्यामुळे आता नेमक्या कोणत्या कारणासाठी त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे, अशी शंका उपस्थित झाली आहे. एखाद्या दंगलीत समावेश होता, की गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, की एखाद्या प्रकरणात जामीनावर मुक्तता झाल्यामुळे त्यांचे नाव यादीत आहे, असे अनेक प्रश्न विचारले जात होते त्यावर दीपक केसकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे. .

शक्तिपीठ महामार्ग | आता सावंतवाडीतील शेतकर्‍यांचाही विरोध

सावंतवाडी :गोवा ते नागपूर असा 805 किलोमीटर लांबीचा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्ग याला कोल्हापूर सांगली लातूर येथून प्रचंड विरोध होत आहे. आता त्याच बरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने आज आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या सर्व गावांमध्ये लवकरच ग्रामसभा घेण्यात येणार आहेत. त्यानंतर सर्व गावांचा मिळून सावंतवाडी तालुक्याचा तालुका मेळावा घेण्याचे नियोजन आहे. या अगोदर खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

या शिष्टमंडळामध्ये अखिल भारतीय किसान सभेचे राज्य कौशल सदस्य गिरीश फोंडे, पर्यावरण तज्ञ काका भिसे,सामाजिक कार्यकर्ते सतीश लळीत, कोल्हापूरचे शेतकरी सुधाकर पाटील, के डी पाटील, तात्यासो पाटील, बाळासाहेब पाटील, प्रवीण नार्वेकर जयसिंग पाटील हे सहभागी झाले होते.

लवकरच या गावांच्या स्वतंत्र सभा व तालुका मेळावा घेण्याचे नियोजन सुरू आहे.

Sindhudurg | ‘डोंगराळ’ च्या सवलतींमुळे जिल्ह्यातील शाळा वाचतील

   Follow us on        
सावंतवाडी: सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भागात येतो. शाळांच्या सुधारित संचमान्यतेत हा उल्लेख चुकून राहिला होता. या संदर्भात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे सुधारित संच मान्यतेत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाची सवलत मिळेल, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे स्पष्ट केले.
सध्या शाळांच्या सुधारित सुधारित संच मान्यतेमुळे सिंधुदुर्गातील शाळा अडचणीत येणार असल्याची भीती शिक्षणतज्ञ व्यक्त करत आहेत. या संदर्भात केसरकर यांना विचारले असता, सिंधुदुर्ग जिल्हा डोंगराळ भाग आहे. दुर्गम भागातील शाळांना वीसच काय, त्याखालील पटसंख्या भरणे मुश्कील आहे. मान्यतेत या जिल्ह्याला पूर्वी सवलत देण्यात आली होती. डोंगराळ भागाचा उल्लेख सुधारित संचमान्यतेत करण्यात आला नव्हता. ती सुधारणा आता करण्यात येईल. अल्पसंख्याक शाळांबाबतही अशी सुधारणा करण्यात येणार आहे. या शाळांनाही पटसंख्येचा प्रश्न भेडसावत असतो. त्यांनाही पूर्वीची सवलत राहणार आहे. सध्याच्या शाळांचे मुख्याध्यापकपद सुधारित संचमान्यतेमुळे निष्कासित होणार नाही, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search