Category Archives: सिंधुदुर्ग

“शिकारी खुद यहाँ शिकार हो गया.” आंबोलीतील प्रकार

सावंतवाडी, दि. १८फेब्रु.: कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली  येथे शिकार करण्यासाठी आलेल्या सहाजणांना काल आंबोली पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात उपोषण सुरू त्या स्थळापासून पोलिसांनी  १४९ नोटीस दिलेली असतानाही केवळ १०० मीटर वर शिकारीच्या उद्देशाने हा गोळीबार झाला. या ठिकाणी सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हे स्वतः बंदोबस्तासाठी होते. गोळीबार नंतर आंबोली हिरण्यकेशी पर्यटन टोल नाक्यावर ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि एकूण ६ जणांना पकडून त्यांना पोलीस व वन विभागाच्या ताब्यात दिले. यात सावंतवाडीतील एक वकील आणि अन्य पाच जणांचा समावेश  आहे. संबधितांच्या चारचाकी वाहनात बंदूक,काडतुसे,रक्त लागलेला सुरा सापडले असून ,सुरीला लागलेले ,रक्त व केसांचा पंचनामा पोलीस आणि वनविभाचे अधिकारी यांनी केला.या संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात आली. तपासाअंती त्यांनी साळींदर ची शिकार केल्याचे समोर आले.
मात्र उपोषण स्थळापासून केवळ शंभर मीटर वर गोळीबार झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. काल इथे उपोषण असल्याने हा प्रकार उघडकीस आला.  सावंतवाडी ते आंबोली या मार्गावर दाणोली या ठिकाणी पोलिसांचा तपासणी नाका आहे. या तपासणी नाक्यावर योग्य प्रकारे तपासणी होत नाही आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. अतिक्रमण आणि  शिकार यामुळे येथील अनेक प्राण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’; दीपक केसरकर यांच्या विरोधात लावलेले बॅनर चर्चेत

सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.

बॅनरमधील मजकूर काय आहे ?

“प्रिय दिपकभाई,

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”

आमदार वैभव नाईक शिवसेना (शिंदे) गटाच्या वाटेवर? रवींद्र चव्हाणांसोबत घेतलेल्या गुप्त भेटीनंतर चर्चांना उधाण

सिंधुदुर्ग :भाजपचे नेते तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांची गुप्त भेट झाली असल्याची माहिती समोर येत आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

शिवसेनेचे (उबाठा) आमदार वैभव नाईक यांनी  सार्वजनिक बांधकाम मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. कणकवली शासकीय विश्राम गृहावर एका खोलीत अचानक ही गुपचूप भेट घेतली. वैभवनाईक यांनी भेट घेतल्याचे मान्य केले आहे. या भेटीचे नेमके कारण समजले नाही. मात्र या भेटीबाबत अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.वैभव नाईक हे शिवसेना शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा याआधी येत होत्या. मात्र या भेटीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार असल्याची चर्चा चालू झाली आहे.

Konkan | स्वतंत्र आंबा बोर्डासाठी 200 कोटींची तरतूद

रत्नागिरी : कोकणातील आंबा व्यावसायिकांसाठी एक दिलासा देणारी  बातमी आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र आंबा बोर्डासाठी २०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे.
आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल.
आंब्यावर फळमाशी पडून मोठे नुकसान होते. त्याबाबत नुकसान भरपाई दिली जाईल. माकडापासून होणाऱ्‍या नुकसानीवरही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे. आंबाफळाच्या सुरुवातीपासून ते निर्यातीपर्यंत संरक्षण देण्याचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आंबा मंडळाच्या प्राथमिक प्रक्रियेत हे मुद्दे बोर्डाच्या अजेंड्यावर राहणार आहेत.

“सावधान! येथे अपघाताची शक्यता” | सावंतवाडी रेल्वे स्थानकासमोरील रस्त्यावर गतिरोधकांची नितांत गरज

सावंतवाडी, दि. १२ फेब्रु.: कोणताही अपघात झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग येते. त्यानंतर  त्या रस्त्यांवर गतिरोधक बसविले जातात. मात्र अपघात होऊ नये यासाठी आधीच काळजी घेतली तर जीव वाचू शकतात. सुसाट वाहनांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी बाजारपेठेत, गाव वस्तीत, शाळेच्या परिसरातून जाणाऱ्या रस्त्यांवर गतिरोधक बसवून वाहनांच्या वेगावर मर्यादा घालून अपघात टाळले जातात. अशाच तजवीजची गरज  सावंतवाडी स्थानकाच्या प्रवेशद्वारासमोर असेलेला रस्त्यावर करण्याची आवश्यक्यता निर्माण झाली आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानकाच्या प्रवेशदारासमोर हा रस्ता असून सावंतवाडी या रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनचालक वाहने सुसाट चालवीत असतात. या रस्त्याच्या पलीकडे उपहारगृहे, एटीएम आणि इतर दुकाने आहेत. त्याचप्रमाणे स्थानकावरून बाहेर पडून सावंतवाडी साठी एसटी बस पकडायची असेल तर हा रस्ता ओलांडावा लागतो. कित्येकवेळा बस उभी असताना प्रवासी बस चुकू नये म्हणून घाईघाईने रास्ता ओलांडताना दिसतात. अशा वेळी अपघात होण्याची मोठी शक्यता निर्माण झाली आहे. कित्येकवेळा अपघात होता होता वाचला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे दोन ठिकाणी झेब्रा क्रोसिंग मार्किंग पट्टे आखले असले तरीही अपघात टाळण्यासाठी ते अपुरे आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाने येथे मोठा अपघात होण्याआधीच दोन्ही बाजूने गतिरोधक बसवावे अशी मागणी होत आहे. 
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत
गतिरोधक उंच असल्यास त्याठिकाणी दुचाकी वाहनचालक घसरुन पडण्याची शक्यता असते.  तेंव्हा हे गतिरोधक शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे.

बहुचर्चित संकेश्वर-बांदा महामार्ग नक्की कुठून जाणार? शासकीय पत्रात भेटले उत्तर…

सावंतवाडी : बहुचर्चित संकेश्वर-बांदा  महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात जाणार याबद्दल शासनाने काही निश्चित माहिती दिली नसल्याने येथील नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र शासनाच्या कार्यालयां दरम्यान होणार्‍या पत्र व्यवहारांत हा मार्गच्या नावात माडखोल-सावंतवाडी-इन्सुली असे नमूद केल्याने हा मार्ग सावंतवाडीहून बांदा शहरात जाणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 

कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाला एक पत्र पाठवले आहे. संकेश्वर ते आंबोली फाट्या पर्यंत रस्त्याच्या रुंदीरकण व मजबूती करणाचे काम सुरू आहे. तो भाग आपल्या विभागाकडे वर्ग करण्यात यावा, अशी मागणी या पत्राद्वारे कोल्हापुर राष्ट्रीय महामार्ग विभागाने सावंतवाडी बांधकाम विभागाकडे केली आहे.

नियोजित संकेश्वर-बांदा क्रमांक ५४८ हा महामार्ग नेमका दाणेली-बावळाट मार्गे बांद्यात जाणार की सावंतवाडी शहरातून जाणार? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याबाबत अधिकृत रेकॉर्ड कोणाचकडे नाही. अद्याप पर्यत आंबोलीच्या पुढे या रस्त्याचे सर्व्हे केला गेला नाही आहे. मात्र आज बांधकाम विभागाला रस्ता व त्या संबंधी असलेले रेकॉर्ड वर्ग करण्याबाबत पत्र झाले आहे. त्यात हा महामार्ग माडखोल, सावंतवाडी, इन्सुली येथून जाणार असल्याचे घोषित केल्याचा उल्लेख आहे. मात्र पत्रव्यवहारात असा उल्लेख केला असला तरी शासनाकडून या महामार्गाचा अंतिम आराखडा जाहीर केल्याशिवाय हा महामार्ग नक्की कुठून जाणार हे १००% खात्रीने सांगणे चुकीचे ठरेल. 

सावंतवाडीकरांची मागणी..

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरा बाहेरून नेण्यात आला आहे. पूर्वीचा जुना मुंबई गोवा महामार्ग सावंतवाडी शहरातून जात होता. मात्र वेगवान प्रवासाच्या नावाखाली तो बाहेरून नेण्यात आला. त्याचा शहराच्या विकासावर तसेच पर्यटनावर खूप मोठा परिणाम झाला. त्यात संकेश्वर-बांदा महामार्ग सातोळी बावळाट मार्गे बांदा शहरात नेणार असल्याची चर्चा चालू झाली. मात्र या गोष्टीला सावंतवाडीस्थित नागरिकांकडून विरोध होत आहे. निदान हा महामार्ग तरी सावंतवाडी शहरातूनच नेण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

शक्तिपीठ महामार्गाचे काय? 

समृद्धी महामार्गा पेक्षाही लांबीला मोठा असलेला नागपूर – गोवा महामार्ग तळकोकणातून जाणार आहे. या महामार्गाच्या आरंभीक तथा कच्च्या आराखड्यानुसार हा महामार्गसुद्धा आंबोली मार्गे गोव्याला जाणार आहे. मात्र हा मार्ग आंबोली ते गोवा कोणत्या गावातून /शहरातून जाणार याबाबत सुद्धा प्रश्नचिन्ह आहे. 

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ कार्यालय स्थापन होणार 

मुंबई, दि.०६: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ कार्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नवीन मंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी रत्नागिरी येथे एकच सार्वजनिक बांधकाम मंडळ असून, स्वतंत्र मंडळ स्थापन झाल्यामुळे प्रशासकीय दृष्ट्या गतीमान कामकाज होणार आहे. या नवीन मंडळ कार्यालयासाठी १७ पदे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली असून यातील १० नियमित पदे आणि ७ बाह्य यंत्रणेद्वारे घेण्यात येणार आहेत. त्यामुळे बऱ्याच वर्षाची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे.

सद्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी मिळून एकच मंडळ कार्यालय रत्नागिरी येथे कार्यरत आहे. अधीक्षक अभियंता, रत्नागिरी यांच्या कार्यक्षेत्रात दापोली पासून दोडामार्ग पर्यंत सुमारे ४०० किलोमीटरचे कार्यक्षेत्र आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा कार्यभार करताना अनेक अडचणी निर्माण होत होत्या. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र अधीक्षक अभियंता कार्यालय मंजुरी मिळाल्याने बांधकाम विभागाचे कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी निश्चित मदत होणार आहे. तसेच जिल्ह्यासाठी विकास निधी अधिक प्राप्त होऊन विविध प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पद्धतीने होईल.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी या विभागाकडे मिळून सुमारे २ हजार किलोमीटर लांबीचे राज्य मार्ग व प्रमुख जिल्हा मार्गाची लांबी सुस्थीतीत आणण्यासाठी मोठा हातभार लागणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्वतंत्र मंडळ स्थापन करण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. 

 

रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील रामभक्‍तांना भाजपतर्फे अयोध्यावारी; पनवेल येथून सोडण्यात येणार विशेष ट्रेन

मुंबई: रत्‍नागिरी-सिंधुदुर्गमधील सहा विधानसभा मतदारांतून प्रत्‍येकी अडीचशे या प्रमाणे दीड हजार रामभक्‍तांना आम्‍ही अयोध्यावारी घडविणार आहोत. त्‍यासाठी ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार असल्‍याची माहिती भाजपचे प्रदेश चिटणीस प्रमोद जठार यांनी दिली.
श्री. जठार म्हणालेत  ८ फेब्रुवारीला पनवेल येथून विशेष ट्रेन सुटेल आणि १० फेब्रुवारीला अयोध्यानगरीत श्रीराम दर्शन घेता येईल. तसेच सकाळच्या महाआरतीमध्येही सहभागी होता येणार आहे 
 या ट्रेनचा प्रमुख आपण आणि स्थानिक नेते असणार आहेत. विधानसभा प्रमुख सावंतवाडी राजन तेली, कणकवली आ. नितेश राणे, कुडाळ येथून निलेश राणे, रत्नागिरी बाळ माने या नेत्यांकडे त्या त्या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर या इच्छुक राम भक्तांनी या ट्रेनमधून अयोध्या वारी करण्यासाठी भाजपच्या तालुकानिहाय मंडल अधिकारी तथा तालुकाध्यक्षांकडे संपर्क साधावयाचा आहे असे ते पुढे म्हणालेत.
                                       

आंबोली: परप्रांतीयांना जमिनी न विकण्याचा ग्रामस्थांचा ठराव

आंबोली: परप्रांतीय मोठ्याप्रमाणात कोकणात जमिनी विकत घेत आहेत. एक चांगली गुतंवणूक म्हणून जमिनी खरेदी करण्यात येत आहेत. तर काही बांधकाम व्यावसायिक जमिनी विकत घेऊन तेथे इमारतीची बांधकामे करत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत असून कोकणच्या निसर्गाला हानी पोहचत आहे. प्रसिद्ध पर्यटनस्थळ आंबोली येथेही असेच प्रकार चालू असल्याने येथील ग्रामस्थ जागरूक झाले आहेत. काल दिनांक ३१ जानेवारीला आ बोली ग्रामपंचायत कार्यालय येथे आंबोलीतील गावठण फौजदारवाडी ग्रामस्थांची बैठक झाली. यावेळी बाहेरच्या तसेच परप्रांतीय लोकांना जमिनी विकण्यास मज्जाव करण्याबाबत ठराव घेण्यात आला. जिल्हाधिकाऱ्यांना स्वाक्षरींचे निवेदन दिले. जमीन ही गावची असल्याने विकण्याचा कोणाला अधिकार नाही, असा ठराव घेण्यात आला. आंबोलीतील बाकी वाडीतील ग्रामस्थांनाही गावातील जमीन विक्रीला पायबंद घालण्याची मागणी केली आहे.
गावातील १५ एकर जागा परस्पर विकल्याचा आरोप  
आंबोली असलेला कबुलायतदार गावकर जमिन प्रश्न शासन दरबारी सुटण्याच्या मार्गावर असल्याचे लोकप्रतिनिधी सांगत आहेत. या पार्श्वभूमीवर हिरण्यकेशी रस्त्यालगत १५ एकर जागा गावाबाहेरील व्यक्तींना काही स्थानिकांनी परस्पर विकल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. संबंधित जागेत जेसेबीने सपाटीकरण सुरू आहे. याविरोधात गावठण ग्रामस्थांनी एल्गार केला असून ते अतिक्रमविरोधात एकवटले. प्रशासनाला स्वाक्षरींचे निवेदन देऊन जिल्ह्याधिकाऱ्यांनी तत्काळ पंचनामे करावे; अन्यथा आंबोली ग्रामस्थांतर्फे आंदोलन करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
गावातील १९९९ नंतर विकलेल्या सर्व जागेचा सर्व्हे व्हावा तसेच तलाठी कार्यालयात भ्रष्टाचार करून घातलेल्या नोंदी काढून टाकाव्यात आणि जिल्हाधिकाऱ्यांनी तत्काळ यावर आदेश काढून पंचनामे करावेत आणि गाव वाचवावे, अशी मागणी गावठणवाडी ग्रामस्थांनी केली. दरम्यान, सरपंच सावित्री पालेकर, सदस्य काशीराम राऊत, ग्रामसेवक संदीप गोसावी, तंटामुक्ती अध्यक्ष उल्हास गावडे, प्रकाश गुरव, बबन गावडे, बाळकृष्ण गावडे, अंकुश राऊत, कांता गुरव, प्रथमेश गावडे, मोतीराम सावंत, रंजना गावडे, काशीबाई गावडे, सुनील राऊत, दीपक मेस्त्री, शंकर गावडे, अमित गुरव, राकेश अमृस्कर, झिला गावडे आदी उपस्थित होते.

“…अन्यथा पुढील महिन्यात…” सावंतवाडीत उपोषणकर्त्यांचा प्रशासनाला इशारा..

सावंतवाडी दि. २७: विविध मागण्यांसाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने काल झालेलया लाक्षणिक उपोषणाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला. स्थानिक तसेच मुंबईहून चाकरमानी पण मोठ्या संख्येत आले होते. हजारो नागरिकांनी उपोषणास उपस्थिती दर्शविली. 
कोकण रेल्वे कडून समाधानकारक उत्तरे नाहीत 
दरम्यान, कोंकण रेलवे कॉपर्पोरेशन लि. रत्नागिरीचे क्षेत्रीय रेल्वे प्रबंधक रविंद्र कांबळे यांच पत्र घेऊन कोकण रेल्वेचे कणकवली येथील अधिकारी घनश्याम उपोषणकर्त्यांची भेट घेण्यासाठी आले. यावेळी रेल्वे प्रशासनान दिलेलं हे पत्र म्हणजे प्रवाशांची केवळ फसवणूक करण्याचा प्रकार आहे. आमच्या मागण्यांबाबत यात कोणतीही स्पष्टता नाही. यात सूरु असणाऱ्या रेल्वे गाड्यांचीच माहिती आहे. आमच्या इतर मागण्या तुमच्या अधिकारात नाही तर हे पत्र घेऊन तरी का आलात ? रेल्वे प्रशासन आम्हाला मुर्ख समजत का ? असा सवाल उपोषणकर्त्यांनी केला. 
केंदीय मंत्री नारायण राणे यांचे आश्वासन 
माजी आमदार राजन तेली यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांनी भ्रमणध्वनीवरून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी संवाद साधून दिला. नारायण राणे यांनी फेब्रुवारीच्या पाहिल्या आठवड्यात संघटनेच्या प्रतिनिधींची भेट घालून देवून काही प्रमुख मागण्या पूर्ण करण्याचे प्रयत्न करू असे आश्वासन दिल्यानंतर संघटनेने उपोषण स्थगित केले.
लाक्षणिक उपोषण की ‘रेल रोको’? 
रेल्वे प्रशासनाने या उपोषणाला ‘रेल रोको’ असे नाव देण्याचा कुटील खेळ खेळल्याचा प्रकार घडला. आंदोलनास ‘लाक्षणिक उपोषण’ च्या जागी ‘रेल रोको’ आंदोलन असे नाव दिल्यास नागरिक घाबरून या आंदोलनास उपस्थिती दाखवणार नाही असा या मागे हेतू होता. मात्र रेल्वे प्रशासनाचा हा हेतू साध्य झाला नाही. उलट या उपोषणास अपेक्षेपेक्षा मोठी गर्दी जमली होती. 
मुळात उपोषणाची माहिती अगोदर एक महिना आगाऊ सूचना देऊन पोलीस खात्याला फक्त उपोषण आहे असे सांगितले होते मात्र कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांना सुद्धा रेल रोको आणि रस्ता रोको आंदोलन होणार आहे अशी दिशाभूल करणारी माहिती दिली तसेच एवढ्यावरती न थांबता तेच पत्र उपोषण करताना मंडपात आणून दिले आमच्या मागण्या काय होत्या कशा होत्या त्या विकृतपणे कोकण रेल्वे अधिकाऱ्यांनी आपल्या मनाने लिहिल्या असा आरोप कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य श्री. सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी केला आहे.
आमरण उपोषणचा इशारा 
उपोषण स्थगित केले असले तरीही मागण्या मान्य न झाल्यास २३ फेब्रुवारी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा कोकण रेल्वे प्रवासी समितीचे अध्यक्ष  अॅड संदीप निंबाळकर यांनी दिला.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले म्हणाले, सावंतवाडीकरांच्या हक्काची रेल्वे आहे‌. यासाठी माजी आमदार जयानंद मठकर, डी.के.सावंत यांसह सावंतवाडीकरांनी योगदान दिलं आहे‌. आपल्या जमिनी यासाठी दिल्यात. त्यामुळे कोकण रेल्वे व सरकारनं आमच्या मागण्या मान्य कराव्यात. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर म्हणाले, सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस उभारणी एका टप्प्याच काम पूर्ण झालेले असताना दुसऱ्या टप्प्याच काम निधी अभावी रखडलं आहे‌‌. लोकांची फसवणूक करण्याच काम स्थानिक आमदारांकडून केलं जातं आहे अशी टीका त्यांनी केली. तर रेल्वे रोको पेक्षा जिल्ह्यातील मंत्र्यांची गाड्या रोखा असं विधान माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर यांनी केल. याप्रसंगी युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, अखंड कोकण रेल्वे प्रवासी समितीचे शांताराम नाईक, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा केसरकर, प्रवासी संघटनेचे राजू कांबळे, सुनील उतेकर,कमलताई परूळेकर, युसुफ आर्ते, अँड देवदत्त परूळेकर, रमेश बोंद्रे, अभिमन्यू लोंढे, अँड नकुल पार्सेकर सागर तळवडेकर,सागर नाणोसकर,सिमा मठकर,आदींसह विविध संघटनांचे पदाधिकारी, पंचक्रोशीतील गावांचे सरपंच यांसह उपस्थितांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी रेल्वे आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची. रेल्वे टर्मिनस पूर्ण झालच पाहिजे अशी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याप्रसंगी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर, सचिव मिहीर मठकर, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबईचे अध्यक्ष शांताराम नाईक, प्रमुख राजू कांबळे, संजय सावंत, रुपेश दर्गे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर, राष्ट्रवादी कोकण विभाग महिला अध्यक्षा अर्चना घारे-परब, माजी नगराध्यक्ष अँड. दिलीप नार्वेकर, श्वेता शिरोडकर, अण्णा केसरकर, यशवंत जडयार, प्रमोद गावडे,अभिमन्यू लोंढे, शेखर पाडगांवकर, भाई देऊलकर, महेश परूळेकर, बाळासाहेब बोर्डेकर, रमेश बोंद्रे, रूपेश राऊळ, पुंडलिक दळवी, महेंद्र सांगेलकर, अँड. नकुल पार्सेकर, सागर नाणोसकर, सागर तळवडेकर, भुषण बांदिवडेकर, रविंद्र ओगले, प्रमोद गावडे,विहंग गोठोस्कर, देव्या सुर्याजी, वजराठ ग्राम पंचायत सरपंच अन्यण्या पुराणिक, मातोंड सरपंच मयुरी वडाचेपाटकर, दीपेश परब,वेत्ये सरपंच गुणाजी गावडे, नेमळे सरपंच.सौ भैरे,,निरवडे सरपंच.सुहानी गावडे आरोंदा उपसरपंच ,मळगाव उपसरपंच हनुमंत पेडणेकर, गुरू गावकर, श्री तानावडे,किरण मातोंडकर, समीर मातोंडकर, राधा तळवडेकर, सुधीर राऊळ, हिदायतुल्ला खान, निलेश कुडव, स्नेहल जामदार, सुधीर पराडकर, सीमा मठकर, कल्पना बांदेकर, सायली दुभाषी, माजी नगरसेवक सुरेश भोगटे, विलास जाधव, बाळा गावडे, सिद्धेश सावंत, विनायक गांवस, राज पवार, सुभाष शिरसाट, तेजस पोयेकर, सुरेश गावडे, गुणाजी गावडे, गुरुप्रसाद गवंडे, समीर वंजारी, रफिक मेमन,मुंबईतून अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे शेखर बागवे,बाळ वेळकर,दिपक चव्हाण,सुभाष लाड,श्रीकांत सावंत,अभिषेक अनंत शिंदे,राजाराम कुंडेकर,सुरेंद्र पवार,प्रशिल लाड,अतुल चव्हाण,अशोक देवरूखकर,संदेश लाड,पराग लाड,संजना पालव,मनोज पिंपळकर,रंजन पाळेकर, शेखर पाडगावकर, प्रमोद गावडे, चंद्रकांत कासार,बाळा गावडे,वसंत धुरी, जगन्नाथ पंडित, उदय पारीपत्ते, शांताराम (बाबू) पंडित, शिवराम पंडित आदी उपस्थित होते. हजारोंच्या संख्येने नागरिक यावेळी पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहिले होते.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search