Category Archives: सिंधुदुर्ग

गणेशोत्सव विशेष गाडी मडुरे स्थानकावर थांबणार

Konkan Railway News :प्रवाशांची मागणी लक्षात घेऊन मडुरे स्थानकावर एका विशेष गाडीला थांबा देण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
01151 स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते मडगाव दरम्यान 13.09.2023 ते 02.10.2023 पर्यंत दररोज धावणारी हि गाडी मडुरे या स्थानकावर थांबणार असून तिची या स्थानकावरील वेळ रात्री १०:५२  आहे.
01152 स्पेशल मडगाव ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान 13.09.2023 ते 02.10.2023  दररोज धावणारी हि गाडी मडुरे या स्थानकावर थांबणार असून तिची या स्थानकावरील वेळ पहाटे ०४:२४ आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
स्थानिकांच्या प्रयत्नांना यश 
गेल्याच आठवड्यात गणपती स्पेशल गाडीस थांबा मिळावा यासाठी रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे आणि स्थानिक ग्रामस्थांनी उपोषण केले होते. मात्र कोरेचे रत्नागिरी विभागीय व्यवस्थापक रविंद्र कांबळे यांनी तसे  आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण मागे घेण्यात आले होते. कोरेच्या गणपती स्पेशल गाड्यांच्या वेळापत्रकात तसे प्रसिद्ध न झाल्यास ३० ऑगष्ट नंतर थेट रेल रोको आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला गेला होता.  या मागणीव्यतिरिक्त  मडुरे स्थानकावर कोकणकन्या एक्सप्रेसला थांबा मिळावा. तसेच तुतारी एक्सप्रेस मडुरा स्टेशनवरुन सोडावी अशी मागणी दशक्रोशीतील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

Loading

सावंतवाडी रेल्वे स्टेशन येथील प्रवाशांचा मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री तसेच पालकमंत्र्यांना प्रेरणा फाउंडेशन कडून निवेदन.

सावंतवाडी |सागर तळवडेकर : गेली अनेक वर्षे रेंगाळलेले सावंतवाडी टर्मिनस चे काम पूर्ण करून तेथे वंदे भारत, मत्स्यगंधा, मंगलोर एक्सप्रेस सारख्या रेल्वे गाड्यांना येथे थांबा द्यावा असे निवेदन प्रेरणा फाउंडेशन च्या संस्थापिका दीप्ती दत्ताराम गावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्ग चे पालक मंत्री रविन्द्र चव्हाण यांना पाठवले आहे.

कोकण रेल्वे मार्गावरील महत्वाचे स्थानक असणारे सावंतवाडी स्थानकात विविध समस्या अनेक दिवसांपासून आहेत, या समस्या लवकरात लवकर मार्गी लागाव्या तसेच टर्मिनस चे टप्पा २ चे काम पूर्ण व्हावे आणि येथे मंगलोर,वंदेभारत,नेत्रावती,मत्स्यगंधा,मंगला या दैनिक गाड्यांना व नागपूर मडगाव ह्या विदर्भ कोकण जोडणाऱ्या रेल्वेगाडीला या स्थानकात थांबा मिळावा म्हणून प्रवाशांनी तसेच विविध संघटनांनी रेल्वे प्रशासनाला वेळोवेळी विनंती केली आहे परंतु या समस्या अजूनही जैसे थे आहेत

कोकणातील गणेशोत्सव हा एका महिन्यावर आलाय, हा उत्सव राज्यात नाही तर संपूर्ण देशातील पारंपरिक पद्धतीने साजरा केला जाणारा मोठा उत्सव आहे, लाखो चाकरमानी या उत्सवासाठी लवकरच कोकणाकडे रवाना होणार आहेत ही बाब लक्षात घेऊन सावंतवाडी स्थानकातील वरील समस्या लवकरात लवकर सोडवून कोकणातील प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी केली आहे.

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/letter-for-chief-minister.pdf” title=”letter for chief minister”]

👆झूम करण्यासाठी / पान परतण्यासाठी कृपया फोटो वर क्लिक करावे

 

Loading

रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी सावंतवाडी येथील एक युवक रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Railway Reservation Fraud : कोकण रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. या काळाबाजार प्रकरणी रेल्वे पोलीसांनी बुधवारी सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले होते. त्या युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर रेल्वे ऍक्ट नुसार १४३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिली. अक्षय देशपांडे ( वय – ३० ) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि मडगाव रेल्वे पोलीसच्या पथकास सावंतवाडी येथील एका ऑफिसमध्ये तिकिटांचा काळाबाजार चालत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी या ऑफिसवर धाड टाकली. या धाडीत मिळालेल्या माहितीनुसार येथे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावर हे ऑफिस चालवीत असलेल्या या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे रेल्वे तिकीट बुकिंग आयडी देखील ब्लॉक केले गेले आहे . रेल्वे ऍक्ट १४३ नुसार दाखल गुन्ह्यामध्ये ३ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दरम्यान संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

Loading

Sawantwadi | अर्धा तास प्रवासी जखमी अवस्थेत; रेल्वे स्थानकावरच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित

सावंतवाडी: सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकावर सोमवारी रात्री गाडी पकडत असताना एका प्रवाशाचा अपघात झाला. संदीप रामचंद्र वरक असे त्या प्रवाशाचे नाव असून तो ओवाळिये या गावाचा आहे. या अपघातात त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून उपचारासाठी त्याला बांबुळी येथे दाखल करण्यात आले आहे.
स्थानकावरच्या  प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल प्रश्न उपस्थित
अपघात नक्की कसा झाला त्याची पूर्ण माहिती आजून आली नाही. मात्र एक गंभीर बाब सावंतवाडी स्थानकावरच्या  प्रवाशांच्या सुविधे आणि सुरक्षिततेबद्दल पुढे आली आहे. हा अपघात झाल्यानंतर जखमी प्रवासी प्लॅटफॉर्म वर अर्धातास तसाच मदतीशिवाय पडून होता. गाडी पास झाल्यावर प्लॅटफॉर्म वरच्या लाईट्स बंद झाल्या होत्या. त्यामुळे हा अपघात झाला हे तेथील रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले नाही. जखमी प्रवाशाने आपल्या मोबाईल फोन वरून स्थानका जवळच्या नातेवाईकांना संपर्क साधून मदत मिळवली.
त्यांनी जखमी युवकाला ताबडतोब उपजिल्हा रुग्णायालयात दाखल केले.
याप्रकरणी नातेवाईकांनी स्टेशन मास्तरांना जाब विचारला असता स्थानकावर फक्त स्टेशन मास्टर आणि गार्ड असे दोनच कर्मचारी रात्रीच्या वेळी होते, वरिष्ठांच्या आदेशामुळेच सर्व लाईट्स गाडी गेल्यावर बंद केल्या होत्या त्यामुळे या अपघाताची कोणतीही कल्पना नसल्याचे त्यांनी सांगितले.
सावंतवाडी एक महत्वाचे स्थानक असून त्याला टर्मिनसचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र या स्थानकावर त्या दर्जाच्या सुविधा का नाही  देण्यात येत आहे असा प्रश्न प्रवाशांकडून विचारण्यात येत आहे.

Loading

बांदा दाणोली मार्गावर कारला अपघात

सावंतवाडी: बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला अचानक डुलकी लागल्याने कारला अपघात झाला, सुदैवाने या अपघातात जीवित हानी झाली नाही आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि पुण्यातून गोव्याला गेलेले पर्यटक परत पुण्यासाठी जाण्यासाठी निघाले असताना  बांदा दाणोली मार्गावर वाफोली येथील अवघड वळणावर चालकाला डुलकी लागल्याने कार (MH 14 KS7291) रस्त्याच्या बाजूला जावून झाडीत कलंडली. आज सकाळी 11.30वाजताच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळी पोलिस दाखल झाले असून क्रेनच्या साहाय्याने ही गाडी काढण्यात आली आहे.

Loading

”मडुरा स्थानकाचे रुपांतर ‘हॉल्ट स्टेशन’ मध्ये करावे अन्यथा”…मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा इशारा

सिंधुदुर्ग : मडुरे स्थानकावर काही गाड्यांना थांबा द्यावा तसेच मडुरा स्थानकाचे रुपांतर “हॉल्ट स्टेशन” मध्ये करावे आदी मागण्यांच्या पूर्ततेसाठी 15 ऑगस्ट रोजी सावंतवाडी तहसीलदार कार्यालयासमोर मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थ,सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व सहकाऱ्यांसह बेमुदत उपोषण छेडणार असल्याचा लेखी इशारा रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांना दिला आहे.

सावंतवाडी स्थानका नंतर मडुरा हे स्थानक लागते. मात्र या स्थानकाकडे प्रशासनाने अनेक वर्ष दुर्लक्ष केले आहे. या स्थानकावर फक्त दिवा पॅसेंजर ही गाडी थांबत असून बाकी हे स्थानक फक्त नावालाच आहे. कोकण कन्या एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस,तुतारी एक्सप्रेस त्याचप्रमाणे सणासुदीच्या आणि उन्हाळी सुट्टीच्या कालखंडामध्ये ज्या जादा गाड्या सोडल्या जातात त्यांना मडुरा स्थानकात थांबा मिळणेसाठी गेली अनेक वर्ष आम्ही सर्व स्थानिक निवेदनाद्वारे आणि प्रत्यक्ष भेटुन कोकण रेल्वे प्रशासनाकडे थांबा देणेसाठी वारंवार मागणी करीत आहोत मात्र आपल्या मागण्यांना नेहमी प्रशासनाकडून केराची टोपली दाखविली जात आहे, त्यामुळे आता उपोषण हाच पर्याय उपलब्ध असल्याने हे उपोषण करण्यात येत असल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले.

Loading

आंबोली | मंत्री येण्याअगोदरच ग्रामस्थांनी केले धबधब्याचे उदघाटन; नेमका प्रकार काय?

आंबोली |काल आंबोली येथील ‘बाहुबली’ या धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मंत्री दीपक केसरकर आणि इतर पाहुणे मंडळी  येण्याच्या अगोदरच पारपोली येथील ग्रामस्थांनी या धबधब्याचे उदघाटन करून आपली नाराजी व्यक्त केली आहे. यावेळी पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक,इतर सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत पारपोली गावचे सरपंच कृष्णा नाईक यांच्याशी संवाद साधला आता त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. हा धबधबा आंबोली गावच्या हद्दीत न येत पारपोली या गावच्या हद्दीत येत असून सुद्धा उदघाटनपत्रिकेवर पारपोली गावचे किंवा या गावच्या सरपंचाचे नाव कुठेही नमूद केले नाही आहे किंवा उदघाटनाचे आमंत्रण दिले नाही. दुसरी गोष्ट म्हणजे पारपोली ग्रामपंचायतीने उदघाटनाला शुभेच्छा देणारा बॅनर आंबोलीकरांनी फाडून टाकण्याचा निंदनीय प्रकार पण घडला आहे. जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी या विषयात आंबोली ग्रामपंचायच्या बाजूने असून हा पारपोली ग्रामस्थांवर अन्याय करताना दिसत आहेत. मतांच्या राजकारणामुळे परपोली गावावर अन्याय होत आहे हा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही आहे. धबधबा आमच्या गावाच्या हद्दीत येत असून त्याची संगोपनाची जबाबदारी आणि इतर हक्क आमच्या गावचे असायला पाहिजेत. अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

Loading

आंबोली येथील अजून चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले

आंबोली बाहुबली धबधबा
आंबोली: आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध राज्यांसह विदेशातील पर्यटकही भेट देणार आहेत. विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी या निमित्ताने केले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता यावी, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे यासाठी वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पर्यटकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद प्रेरणादायी आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे
यावेळी आंबोली येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बाहुबली धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोलीतील पर्यटन वाढावे, यासाठी तब्बल पाच नव्या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती आले असून त्यापैकी चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर आदींसह शिवसेना व भाजपचे विविध पदाधिकारी, पर्यटक उपस्थित होते.

Loading

‘हत्ती हटाओ, दोडामार्ग बचाव’ घोषणा देत ग्रामस्थांचा वनविभागाच्या कार्यालयावर मोर्चा

दोडामार्ग  : ‘हत्ती हटाओ, दोडामार्ग बचाव’ अशा आक्रमक घोषणा देत दोडामार्ग तालुक्यातील हत्ती (Elephant) बाधित गावातील संतप्त ग्रामस्थांनी येथील वनविभागाच्या (Forest Department) कार्यालयावर मोर्चा काढला. जोपर्यंत हत्ती हटाओबाबत लेखी आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत माघार घेणार नाही, अशीच भूमिका ग्रामस्थांनी घेत तब्बल सहा तास कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. अखेर येत्या पंधरा दिवसांत मंत्रालयात हत्ती हटाव संदर्भात वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिले.
हत्तींनी केलेल्या नूकसानीने त्रस्त झालेल्या केर, मोर्ले, घोटगेवाडी, कोनाळ, पाळये, सोनावल, हेवाळे, मुळस, बाबरवाडी या ग्रामस्थांनी आज थेट सावंतवाडी गाठत उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांच्या कार्यालयावर धडक दिली. यावेळी त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरत आम्हाला भरपाई नको; मात्र हत्तींना आवरा, अशी एकच मागणी लावून धरली. आंदोलकांनी आम्हाला हत्ती हटाव संदर्भात लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली.
शेवटी श्री. राजन तेली  यांनी दूरध्वनीवरून थेट वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याशी चर्चा केली तर दीपक केसरकर यांनी वनमंत्र्यांसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत निर्णय घेऊन जीआरबरोबरच हत्ती हटाव मोहीम संदर्भात पंधरा दिवसात वनमंत्र्यांसोबत बैठक घेण्याचे आश्वासन दिले. तसे लेखी आश्वासनही वन विभागाकडून दिले. त्यामुळे आक्रमक आंदोलकांनी हे आंदोलन मागे घेतले.

Loading

१२ ते १६ ऑगस्ट दरम्यान रंगणार ‘आंबोली वर्षा महोत्सव’; पर्यटकांना आकर्षित करणार्‍या उपक्रमांचे आयोजन..

आंबोली | पर्यटन संचालनालयाच्या माध्यमातून स्थानिक ग्रामपंचायत, जिल्हा प्रशासनातर्फे १२ ते १६ ऑगस्ट या कालावधीत ‘आंबोली वर्षा महोत्सव’ आयोजित केला आहे.

या महोत्सवाचे उदघाटन राज्याचे पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते होणार असून, केंद्रीय मंत्री नारायण राणे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, विधानसभा आमदार वैभव नाईक, विधानसभा आमदार नितेश राणे, विधान परिषद सदस्य ज्ञानेश्वर म्हात्रे, निरंजन डावखरे आणि अनिकेत तटकरे तसेच आंबोली गावचे सरपंच सौ. सावित्री संतोष पालकर या सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत. या महोत्सवास उपस्थित राहण्याचे आवाहन राज्य पर्यटन प्रधान सचिव श्रीमती राधिका रस्तोगी, राज्याचे पर्यटन संचालनालय संचालक डॉ. बी. एन. पाटील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी श्रीमती के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.

पाच दिवसांच्या या वर्षा महोत्सवाची सुरुवात आंबोली येथे १२ ऑगस्टला सकाळी ११ वाजता स्थानिक ढोलताशा, गणेशवंदनाच्या माध्यमातून होईल. साहसी क्रीडा प्रकार, झिप लाईन सफर, दशावतार, नाईट सफर, १३ ऑगस्टला जलक्रीडा प्रकार, जेटस्की, स्पीड बोट, बनाना बम्पर राईड, हिरण्यकेशी ट्रेकिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, फुगडी, जंगल सफर, १४ ला रॅपलींग जैवविविधता माहिती, सांस्कृतिक कार्यक्रम ”चांगभलं”, जंगल सफर, १५ ला सैनिक स्कूल मुलांच्या कवायती, शहीद हवालदार पांडुरंग गावडे स्मारक येथे माजी सैनिकांचे संचलन, सांस्कृतिक कार्यक्रम चित्रकथी, जंगल सफर, १६ ला महादेव गड ट्रेकिंग, आंबोली सफर आदी विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील पावसाळी पर्यटन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत. राज्याने जिल्ह्यातील बारमाही पर्यटनासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे पर्यटन महासंघाने स्वागत केले असून, अशा महोत्सवांमुळे जिल्ह्यातील पर्यटन वाढीसाठी मदत होईल, असा विश्वास मोंडकर यांनी व्यक्त केला आहे.

Press on pdf to enlarge/turn page. 👇🏻

[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/08/Festival-Amboli.pdf” title=”Festival Amboli”]

Download file 👇🏻

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search