![]()
Author Archives: Kokanai Digital
मुंबई : मराठा आरक्षणासाठीच्या (Maratha Reservation) आंदोलनाला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागलं आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून अनेक जिल्ह्यातील एसटी बसच्या(ST Bus) फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.
सोलापूर विभागातील सर्व एसटी आगाराची वाहतूक पूर्ण बंद आहे. तर बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 हून अधिक बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. याशिवाय संभाजीनगरमध्ये सोमवारी दुपारपासून बस सेवा ठप्प आहे. खबरदारीचा उपाय म्हणून 1400 रोजच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 160 बसेस मध्यवर्ती बस स्थानकात उभ्या आहेत.
राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरु आहे. आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या या आंदोलनाची झळ एसटी बसेसला बसत आहे. पुणे, नागपूरसह राज्यातील अनेक भागांतून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. एसटी बसेसची जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये शंभरपेक्षा जास्त बसेसची तोडफोड करण्यात आली आहे. यामुळे लालपरीची सेवा ठप्प झाली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात आलेल्या नवीन स्लीपर बसेस परत बोलवण्यात आल्या आहेत. छत्रपती संभाजी नगरहून निघणाऱ्या आणि छत्रपती संभाजी नगरमध्ये येणाऱ्या सर्व बसेस बंद करण्यात आल्या आहेत.
-
- गेल्या 3-4 दिवसांपासून मराठवाड्यातील परभणी, धाराशीव, लातूर, जालना, नांदेड या जिल्ह्यातील सर्व एसटी वाहतूक बंद
- बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील एसटी वाहतूक अंशतः बंद आहे.
- तसेच बीड, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर जिल्ह्यातील 36 आगाराची वाहतूक पूर्णतः बंद आहे.
- गेल्या चार दिवसांत राज्यभरात 80 पेक्षा जास्त एसटी बसेसची मोडतोड तर दोन एसटी बसेसची जाळपोळ
- एसटी बसेसची मोडतोड, जाळपोळ झाल्याने अंदाजे एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.
- विभागातील वाहतूक पूर्णतः, अथवा अंशतः बंद असल्याने दररोज एसटीचा दोन ते अडीच कोटी रुपयांचा महसूल बुडत आहे.
बुलढाणा जिल्ह्यातून मराठवाड्यात जाणाऱ्या 70 बस फेऱ्या रद्द
बुलढाणा जिल्ह्यातील विविध आगारातून 70 पेक्षा जास्त बस फेऱ्या या मराठवाड्यात होत असतात. मात्र परिवहन महामंडळाने सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पुणे, छत्रपती संभाजीनगर, पंढरपूर, बीड, अंबड, लातूर, नांदेड याठिकाणी जाणाऱ्या सर्व बस फेऱ्या आजपासून रद्द केल्या आहेत. यामुळे एसटी महामंडळाला आर्थिक नुकसान सहन करावे लागणार असून प्रवाशांचे देखील हाल होणार आहेत.
बीडमध्ये 70 बस फोडल्या
आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला आग लावल्यानंतर हा जमाव बीडमध्ये बस स्थानकामध्ये पोहोचला. यावेळी बस स्टँडमध्ये 70 पेक्षा जास्त एसटी उभ्या होत्या. जमावाने या सगळ्या बस फोडल्या आहेत.
![]()
सावंतवाडी: मुंबई – गोवा महामार्गावर निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क तपासणी नाका इन्सुली येथे उत्पादन शुल्क पथकाने एक मोठी कारवाई केली आहे. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना दहाचाकी बंद बाँडीचे वाहनासह (सुमारे ऐक कोटी,दोन लाख आठ हजार) अं. 1,02,08,000/- रु. किमतीचा गोवा बनावटी दारूसह मुद्देमाल आज 30 ऑक्टोंबर 2023 रोजी सकाळी पहाटेच्या वेळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास जप्त केला आहे.यात पकडलेल्या दारू सुमारे ७२ लाख किमतीची असून त्यासाठी वापरलेला बंद कंटेनर हा जवळपास ३० लाख किमतीचा आहे.
सदरील मिशन हे फत्ते करण्यासाठी श्री. विजय सूर्यवंशी साहेब, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मा. श्री. सुनिल चव्हाण साहेब संचालक ( अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्री. विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, राज्य उत्पादन शुल्क. कोल्हापूर विभाग कोल्हापूर, मा. श्री. वैभव वैद्य, साहेब, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 29/10/2023 रोजी रात्री 09 च्या सुमारास मिळालेल्या गुप्त बातमीनुसार राष्ट्रीय महामार्ग क्र.66 वर निरीक्षक,राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली कार्यालयासमोर संशयित वाहनांची तपासणी करीत असताना आज दिनांक 30/10/2023 रोजी पहाटे 5 च्या सुमारास गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारे दहाचाकी बंद बाँडीचे वाहन क्र. NL- 01/AG-9252 या वाहनाची तपासणी केली असता सदर दहाचाकी बंदबॉडीचे वाहनास पाठीमागील दोन्ही बंद दरवाज्यांना बॉटल सील लावलेले दिसून आले.
वाहन चालकाने त्या वाहनामध्ये मशिनरी स्क्रॅप भरलेले असल्याचे सांगितले. वाहनचालकाने दिलेल्या ट्रान्सपोर्ट बिल्टी नुसार संशय आल्याने त्याच्याजवळ अधिक विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिलेली नाहीत. त्यामुळे वाहन क्र. NL-01/AG-9252 या वाहनाच्या मागील दरवाज्यावर लावलेले बॉटल सील तोडून दरवाजा उघडून पाहिले असता सदर वाहनामध्ये ड्रीम्स डिस्टीलरीज गोवा निर्मित गोवा बनावटीच विदेशी मद्याचे रॉयल ग्रेन्ड माल्ट व्हिस्कीच्या 180 मि.ली एकुण 1000 कागदी पुठ्ठ्याचे बॉक्स (48000 बाटल्या मिळून आले. सदर प्रकरणी जगदीश देवाराम बिश्नोई, रा. भाटीप, पोस्ट पमाना, ता. रानिवाडा, जि. जालोर, राजस्थान पिन-343040 सध्या रा. 22/5, हेमकुंज सोसायटी, मातावाडी. एलएच रोड, सुरत गुजरात – 395006 यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्ह्यामध्ये अं. रु. 72,00,000/- किंमतीचे मद्य तसेच रु.30,00,000/- किमतीचे चारचाकी वाहन, एक मोबाईल रु. 8000/- किंमतीचा असा एकुण अं. रु.1.02.08,000/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 अंतर्गत विविध कलमानुसार गुन्हा नोंदविण्यात आला.
सदर कारवाई मा. श्री. वैभव वैद्य, प्र. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, सिंधुदुर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. संजय मोहिते, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, श्री. तानाजी पाटील दुय्यम निरीक्षक श्री. प्रदीप रास्कर दुय्यम निरीक्षक, श्री. गोपाळ राणे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक, श्री. दिपक वायदंडे, श्री. प्रसाद माळी जवान व श्री. रणजीत शिंदे, जवान नि. वाहन चालक यांनी केली.सदर प्रकरणी पुढील तपास दुय्यम निरीक्षक, तपासणी नाका इन्सुली श्री. प्रदीप रास्कर हे करीत आहेत.
![]()
रत्नागिरी – केरळच्या धर्तीवर सिंधुरत्न योजनेतून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत. या सेवेचा लाभ पर्यटकांना लवकरच मिळण्याचे संकेत मिळाले आहेत.
जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.
यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
दोन्ही खाडीत काय पाहता येईल?
वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) –
कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.
जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर)
कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र
![]()
![]()
मालवण : कर्जबाजारीपणाला कंटाळून सचिन सहदेव डिकवलकर (वय ३८, रा. डिकवल-बौद्धवाडी) यांनी ठासणीच्या बंदुकीने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. हा प्रकार शुक्रवारी (ता. २७) रात्री आठच्यासुमारास घडला.त्याने गावात खळबळ उडाली. याबाबतची वर्दी त्यांच्या भावाने पोलिस (Police) ठाण्यात दिली. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, डिकवलकर मुंबई येथे पत्नी व मोठ्या मुलासह राहात होते. त्यांचा लहान मुलगा डिकवल येथे मूळ घरी राहात होता.
मुंबईहून आपल्या लहान मुलाला नेण्यासाठी काही दिवसांपूर्वी डिकवल येथे आले होते. कर्जबाजारी झाल्याने त्यांच्यात नैराश्य आले होते. त्यामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं बोललं जात आहे.
![]()
![]()
सिंधुदुर्ग : वंचितांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी “उमेद फौंडेशन,सिंधुदुर्ग” कडून “एक पणती वंचितांच्या दारी “या सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंबे आणि वृद्धाश्रम, अनाथ आश्रम मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी तेजोमय गोड व्हावी यासाठी उमेद फाउंडेशनने विशेष उपक्रमाचे आयोजन केले आहे.
त्यासाठी उमेद फाउंडेशनच्या वतीने या वंचित घटकांना पणत्या,आकाश कंदील, दिवाळी फराळ, देऊन त्यांची दिवाळी आनंदमय करण्यात येणार आहे. यासाठी समाजातील सर्व घटकांना आवाहन करण्यात येते की आपणही या उपक्रमात सहभागी होऊन मोलाचा हातभार लावावा.
या उपक्रमात सहभागी होण्यासाठी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ/ पणत्या/ आकाशकंदील असे दिवाळी उपयुक्त साहित्य द्यावयाचे असल्यास आपण उमेद फाउंडेशनकडे दि. 30 ऑक्टोबर 2023 पर्यंत पोहोच करावे.तसेच फराळासाठी आर्थिक मदत द्यावयाची असल्यास ऑनलाईन स्वरूपात/ रोख स्वरूपात उमेद फाउंडेशनकडे खालील अकाउंटवरती जमा करता येईल.यासाठी आर्थिक मदत पाठवण्याकरिता बँक अकाउंट माहिती
A/C name =UMED FOUNDATION,
A/C Number- 636701000890 ,बँकेचे नाव -ICICI BANK
IFSC Code =ICIC0006367
Google pay/Phone pay – 7972395675
तसेच वस्तू स्वरूपात मदत देणाऱ्यांनी स्वतः कडील तयार केलेला दिवाळी फराळ देणार असल्यास देतांना त्याचे व्यवस्थित पॅकेट करून द्यावेत.तसेच आर्थिक मदत एका कुटुंबासाठी फराळ – 300 रू. , दोन कुटुंबासाठी फराळ – 600 रू.या टप्प्यात रक्कम स्वीकारली येईल. आपण दिलेल्या 300 रु. मदतीतून खालील प्रकारे एका गरजू कुटूंबासाठी दिवाळी किट बनविण्यात येईल. अंघोळीचा मोती साबण, सुगंधी तेल, उटणे, आकाश कंदील, पणत्या, लाडू (250 ग्रॅम), चिवडा (500 ग्रॅम) चकली (250 ग्रॅम), शंकरपाळी ( 250 ग्रॅम ) इ.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरीब, वंचित कुटुंबे तसेच जिल्ह्यातील वृद्धाश्रम आणि आश्रम व गरजू कुटुंबे यांचा समावेश असेल.वंचितांच्या जीवनात थोडासा प्रकाश आणून त्यांची दिवाळी तेजोमय करण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी योगदान द्यावे असे मत राजेंद्र एस.पाटील- प्रमुख, सामाजिक दिवाळी मोहिम,सिंधुदुर्ग 8888650077 यांनी व्यक्त केले आहे.
![]()
![]()
![]()













