Author Archives: Kokanai Digital

उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी; विजय वडेट्टीवार यांची मागणी

मुंबई : मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला असल्याने उद्या होणारी तलाठी परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्याचा मुख्य सचिवांकडे केली आहे. याबाबत माहिती त्यांनी समाज माध्यमातून जनतेला दिली आहे. 

काय म्हणालेत विजय वडेट्टीवार? 

राज्यात उद्या तलाठी परीक्षा आहे, ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा करून मागणी केली आहे.

मराठा आरक्षणाची मागणी करणार्‍या आंदोलकांवर झालेल्या अमानुष लाठीचार्ज निषेधार्थ उद्या बंद पुकारण्यात आला आहे.

उमेदवारांना परीक्षेसाठी दुसऱ्या जिल्ह्यात जावे लागणार आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस सरकारने बंद केल्या आहे त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर भार वाढून वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तलाठी भरती परीक्षेच्या परीक्षार्थींना फटका बसू नये ,म्हणून ही परीक्षा तातडीने पुढे ढकलण्याची घोषणा सरकारने करावी.

शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयासमोर शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा युवा सेनेचा इशारा

सावंतवाडी | जिल्ह्यातील शाळेत अजूनही शिक्षक न दिल्याने तसेच डी.एड., बी.एड. बेरोजगारांचे प्रश्न न सोडवल्याच्या निषेधार्थ शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यालयाकडे शिक्षकदिनी बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा कुडाळ युवासेनेचे तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी दिला आहे.
५ सप्टेंबरला सकाळी १०. ३० वाजता युवा सेनेचे कोकण सचिव तथा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी व्हावे असे आवाहन श्री योगेश धुरी यांनी केले आहे गेले काही महिने जिल्ह्यात शिक्षकांचा प्रश्न निर्माण झाला आहे तर दुसरीकडे डी.एड, बी.एड झालेल्या शिक्षकांना अद्याप पर्यंत नोकऱ्या मिळालेल्या नाहीत त्यामुळे त्यांना रोजगारापासून वंचित राहावे लागत आहे याच निषेधार्थ शिक्षण मंत्र्यांच्या विरोधात हे आंदोलन केले जाणार आहे असे योगेश धुरी यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकातून म्हटले आहे. 

सनातन धर्माची मच्छरांशी तुलना करणार्‍या उदयनिधीं विरोधात मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात प्रतिक्रिया

मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.

नेमके काय बोलले उदयनिधी? 

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

मराठा आंदोलन – ताज्या घडामोडी | जालना लाठीमारप्रकरणी अधीक्षकांवर कारवाई

०३/०९/२०२३ | १८:०० जालना लाठीमारप्रकरणी पोलीस अधीक्षक यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असून अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपपोलीस अधीक्षक यांना जिल्ह्याबाहेर पाठविण्यात आले आहे. उच्चस्तरीय चौकशीनंतर निलंबनाची कारवाई केली जाईल. या प्रकरणी प्रसंगी न्यायिक चौकशीही करू, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे केली.

काय म्हणाले मुख्यमंत्री 

जालना येथे मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. या घटनेनंतर जालना पोलीस अधीक्षकांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे निर्देश दिले आहेत. अपर पोलीस अधिक्षक व उपअधीक्षकांची जिल्ह्याबाहेर बदली करण्याच्या सूचना दिल्या आहेत 

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अपर पोलीस महासंचालक (कायदा-सुव्यवस्था) संजय सक्सेना यांच्यामार्फत  करण्यात येईल, चौकशी अहवालानंतर दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल. शासन कुणालाही पाठीशी घालणार नाही. आवश्यकता भासल्यास या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल.

मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण मिळावे यासाठी शासन पूर्णपणे प्रयत्नशील असून त्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. लवकरच त्याबद्दल सकारात्मक निर्णय होईल. 


 

जालना घटनेच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गात ऐन सणासुदीच्या काळात मनाईचे आदेश; ‘या’ गोष्टी केल्यास होऊ शकते अटक

सिंधुदुर्ग: जालना जिल्ह्यात मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या लाठीमारावरून वातावरण गंभीर झाले आहे. सदर घटनेचा निषेध राज्यातील इतर जिल्यात करण्यात येणार असल्याची शक्यता असून वातावरण अजून गंभीर होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या अधिकाराचा वापर करून दिनांक ०२ सप्टेंबर दुपारी २ वाजल्यापासून  ते १६ सप्टेंबर पर्यंत रात्री १२ वाजे पर्यंत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि कलम कलम 37(3) अंतर्गत जिल्ह्यात मनाईचे आदेश लागू केले आहेत.

या कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई असणार आहे.

कलम 37 (1)

  • शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे.
  • अंग भाजून टाकणार पदार्थ किंवा कोणताही स्फोटक पदार्थ घेवून फिरणे.
  •  दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे जमा करणे किंवा तयार करणे.
  •  व्यक्तींची किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे, (ज्या कारणामुळे समाजाच्या भावना दुखविली जाण्याची शक्यता असते.)
  • सार्वजनिक रितीने आक्षेपार्ह घोषणा करणे, गाणी म्हणणे किंवा वाद्य वाजवीणे.
  • सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे अगर सोंग आणणे अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे.

कलम 37(3)

  • सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच अगर पाचाहून जादा लोकांनी एकत्र जमा होणे, जमाव करणे मिरवणूका काढणे व सभा घेणे.
  • हा हुकूम ज्या सरकारी नोकरांना त्यांची कर्तव्ये व अधिकार बजावणीचे संदर्भात उपनिर्दीष्ट वस्तू हाताळाव्या लागतात आणि एकत्र जमावे लागते व ज्या व्यक्तींनी पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग अगर संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांना संबधित विभागाचे पोलीस निरीक्षक किंवा सक्षम पोलीस प्राधिकारी यांची परवानगी घेतलेली आहे. अशा व्यक्तींना आणि लग्न इत्यादी धार्मिक समारंभ, प्रेतयात्रा यांस लागू पडणार नाही .

वरील कालावधीतील मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तसेच ध्वनीक्षेपक वाजविण्यास परवानगी देण्याचे अधिकार पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग तसेच त्यांनी प्राधिकृत केलेल्या इतर पोलीस अधिकारी यांस व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांस राहील. या आदेशाचे जो कोणी उल्लंघन करील तो महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील.

दिनांक ०७ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमी तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी उत्सव आहे. या मनाईचे सावट या सणांवर पडणार आहे.

 

Mumbai Goa Highway: १ तासाचा प्रवास १० मिनिटांत; कशेडी टनेल गणेशोत्सवापूर्वी सुरु होणार – मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई : गणेशोत्सवास मुंबई गोवा महामार्गावरून कोकणात गावी जाणाऱ्या कोकणवासीयांची एक खुशखबर आहे  मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा बोगदा (Kashedi Tunnel) वाहतुकीसाठी सुरु होणार आहे. सध्या या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण झाले असून बोगद्याच्या आतील रस्त्याचे काँक्रेटीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे.
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाट हा महत्त्वाचा मानला जातो. गेल्या काही वर्षात नागमोडी वळणाच्या या घाटामध्ये अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. या घाटामध्ये काही ठिकाणी ब्लॅक स्पॉट म्हणून निश्चित झालेले आहेत. हा घाट पूर्ण करण्यासाठी जवळपास ४५ ते ६० मिनिटांचा कालावधी लागतो यासाठी नागमोडी वळणाच्या या मार्गाला पर्यायी म्हणून या घाटाचा सर्वे  करण्यात आला होता. सर्वे केल्यानंतर पर्यायी घाटमाथावरच्या सध्या स्थितीत असलेल्या चालू रस्त्याच्या खाली बोगदा तयार करण्याचे निश्चित करण्यात आले होते.  

 

सिंधुदुर्ग : गावठी बॉम्ब घेत आहेत पाळीव प्राण्यांचे बळी; मळेवाड येथे गावठी बॉम्बमुळे वासराचा मृत्यू

सिंधुदुर्ग: वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी पेरून ठेवलेले गावठी बॉम्ब पाळीव प्राण्यांच्या जीवाला धोकादायक ठरत आहेत. असाच एक गावठी बॉम्ब खाल्ल्यामुळे सावंतवाडी माळेवाड येथील प्रवीण दत्ताराम नाईक यांच्या म्हशीच्या वासराचा मृत्यू झाला. या प्रकारामुळे संबंधित शेतकऱ्यांसह स्थानिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून या प्रकाराची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.
मळेवाड परिसरात शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवण्यात येत आहे. त्यामुळे गुरांना तसेच पाळीव प्राण्यांना धोका निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर हा प्रकार घडला. प्रवीण नाईक यांनी गुरे चरावयास सोडली होती. याच भागात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी गावठी बॉम्ब ठेवले होते. ते बॉम्ब खाल्ल्याने वासराचा मृत्यू झाला. याबाबत वनखात्याने सखोल चौकशी करावी व संबंधितांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

Konkan Railway : जबलपूर कोईमतूर गाडीला कल्याण येथे थांबा देण्याची मागणी

Konkan Railway News : गाडी क्रमांक ०२१९७/०२१९८ जबलपूर कोईमतूर या कोकण मार्गे धावणाऱ्या गाडीला कल्याण येथे थांबा देण्यात यावा या मागणीसाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी मध्य रेल्वे प्रशासनाला निवेदन सादर केले आहे. 
कल्याण,अंबरनाथ,बदलापूर येथे मोठ्या प्रमाणात कोकणातील चाकरमानी स्थित आहेत. त्यांना कोकणात जाण्यासाठी ठाणे किंवा दादर या ठिकाणी जावे लागते. सध्या गणेशचतुर्थीचा हंगाम असल्याने या स्थानकावरून जाणाऱ्या गाडयांना मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. जबलपूर कोईमतूर ही गाडी  कल्याण स्थानकावरून जाते; मात्र या स्थानकावर या गाडीला थांबा नाही आहे. या गाडीला कोकणातील रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी,  कणकवली आणि कुडाळ या स्थानकावर थांबा आहे. या गाडीला कल्याण स्थानकावर कायम स्वरूपी थांबा मिळाल्यास येथील कोकणवासीयांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.  
[pdf-embedder url=”https://kokanai.in/wp-content/uploads/2023/09/JBP-CBE-1.pdf” title=”JBP CBE (1)”]

आंबोली पर्यटनस्थळापेक्षा “मृतदेह विल्हेवाट स्थळ” म्हणुन प्रसिद्ध होत चालले आहे?

सावंतवाडी:  दोन दिवसांपूर्वी म्हापसा येथील तरुणीची हत्या करुन तिचा मत्यूतदेह आंबोली घाटाच्या दरीत टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. 
खून करून आंबोलीत मृतदेह टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस नेमके काय करताहेत? चेकपोस्ट केवळ मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोलीपर्यंत कसा नेला? त्यावेळी कोण पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते? याची पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंबोली घाटात दिवसेंदिवस मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे तेथील पर्यटनाची बदनामी होत आहे. याबाबत पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. आंबोलीच्या प्रवेशद्वारावर तीन चेकपोस्ट उभारली आहेत, तरीही असे प्रकार नेमके का होतात? याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे साळगावकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 

कोकण रेल्वे मार्गावर पुढच्या आठवड्यात दोन ठिकाणी मेगाब्लॉक; ५ गाड्या उशिराने धावणार

रत्नागिरी :  कोकण रेल्वे मार्गावर मंगळवार दिनांक ०५ सप्टेंबर आणि गुरुवार दिनांक ०७ सप्टेंबर रोजी दोन वेगवेगळ्या ठिकाणी रेल्वेच्या मालमत्ता देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेतले जाणार आहेत. या मेगाब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या ५ गाड्यांच्या वेळापत्रकांवर परिणाम होणार आहे.
दिनांक ०५  सप्टेंबर चिपळूण ते करंजाडी दरम्यान रोजी दुपारी १२ वाजून २० मिनिटे ते ३ वाजून २० मिनिटे असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 
१)Train no. 02197 Coimbatore Jn. – Jabalpur Express
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मडगाव ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
२) Train no. 10106 Sawantwadi Road – Diva Jn. Express 
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी सावंतवाडी रोड ते चिपळूण दरम्यान सुमारे दीड तास उशिराने धावणार आहे.
३)Train no. 16345 Lokmanya Tilak (T) – Thiruvananthapuram Central Netravati Express 
दिनांक ०५ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही  गाडी कोलाड ते वीर दरम्यान सुमारे अर्धा तास उशिराने धावणार आहे.
दिनांक ०७ सप्टेंबर गुरुवारी सेनापुरा ते ठोकूर दरम्यान रोजी दुपारी ३ संध्याकाळी ६ असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.. या  मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे. 
१)Train no. 10108 Mangaluru Central – Madgaon Jn. MEMU Express 
 दिनांक ०७ सप्टेंबर प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास १५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. 
२)Train no. 12134 Mangaluru Jn. – Mumbai CSMT Express journey commences 
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी ही गाडी मंगुळुरु सेंट्रल या सुरवातीच्या स्थानकावरून १ तास उशिराने सुटणार आहे. 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search