Author Archives: Kokanai Digital

Mumbai Local: फुकट्या प्रवाशांची कोणतीच सबब चालली नाही! मुंबईत ‘रॉकस्टार’ टीसीचा नवा विक्रम

   Follow us on        

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुख्य तिकीट तपासनीस (Chief Ticket Inspector) सुधा द्विवेदी यांनी एकाच दिवसात तब्बल २०२ विनातिकीट किंवा अनियमित प्रवाशांना पकडत ५५,२१० रुपयांचा दंड वसूल करून नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. ही उल्लेखनीय कामगिरी २८ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडली असून, मुंबई उपनगरीय रेल्वेच्या इतिहासातील एकल दिवसातील सर्वाधिक दंड वसुलीचा हा विक्रम ठरला आहे.

सुधा द्विवेदी यांनी सकाळी ६.४८ वाजता खारघर स्थानकापासून तिकीट तपासणीस सुरुवात केली आणि दुपारी ३.३० वाजेपर्यंत सुमारे नऊ तास सातत्याने तपासणी केली. या कालावधीत त्यांनी सरासरी दर अडीच मिनिटांनी एक प्रकरण हाताळले. काही ठिकाणी संपूर्ण गट एकत्र आढळल्याने कारवाईची संख्या अधिक वाढली.

यापूर्वीचा विक्रम मध्य रेल्वेच्या रुबिना अकिब इनामदार यांच्या नावावर होता. त्यांनी २४ फेब्रुवारी २०२५ रोजी १५० प्रकरणांतून ४५,७०५ रुपयांचा दंड वसूल केला होता. मात्र, सुधा द्विवेदी यांनी हा आकडा मागे टाकत नवा उच्चांक नोंदवला.

मध्य रेल्वे प्रशासनाने या उल्लेखनीय कामगिरीचे अधिकृतपणे कौतुक केले असून, त्यांना ‘रॉकस्टार’ अशी उपाधी देत गौरविण्यात आले आहे. यापूर्वीही त्यांना ‘अति विशिष्ट रेल सेवा पुरस्कार २०२४’ प्रदान करण्यात आला होता.

मुंबई लोकल ही शहराची जीवनरेषा मानली जाते. तरीही, UTS मोबाईल अॅप, UPI पेमेंट सुविधा आणि स्वयंचलित तिकीट विक्री यंत्रणा उपलब्ध असतानाही काही प्रवासी विनातिकीट प्रवास करतात. अशा परिस्थितीत सुधा द्विवेदी यांसारख्या अधिकाऱ्यांची कठोर आणि सातत्यपूर्ण तपासणी रेल्वेच्या महसुलात वाढ करण्यासोबतच प्रामाणिक प्रवाशांच्या हक्कांचे संरक्षण करण्यास महत्त्वाची ठरते.

‘शिवनेरी’ आता मुंबई–पुण्याबाहेरही धावणार; प्रस्तावित मार्गांची यादी जाहीर, ‘स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात होणार

   Follow us on        

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) ‘शिवनेरी’ बससेवा लवकरच मुंबई–पुणे मार्गाबाहेर राज्यातील इतर प्रमुख शहरांमध्ये सुरू होणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री तथा MSRTC चे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही घोषणा केली.

२००२ मध्ये सुरू झालेली शिवनेरी सेवा वेळेची काटेकोरता, आरामदायी आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवासासाठी ओळखली जाते. सामान्य बसांच्या तुलनेत भाडे थोडे अधिक असले तरी प्रवाशांचा या सेवेला नेहमीच चांगला प्रतिसाद मिळाला आहे.

२०० नवीन व्होल्वो बसांची भर

राज्यभर विस्तारासाठी MSRTC ने २०० अत्याधुनिक व्होल्वो बस खरेदीची निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. या बस पुढील प्रमुख मार्गांवर धावणार आहेत:

नाशिक–पुणे

नाशिक–छत्रपती संभाजीनगर

नाशिक–जळगाव–धुळे

पुणे–कोल्हापूर

पुणे–सांगली

पुणे –सोलापूर

नागपूर–चंद्रपूर

नागपूर–अमरावती–अकोला

ई-शिवनेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरिवली–स्वारगेट, ठाणे–शिवाजीनगर आदी मार्गांवर ई-शिवनेरी (इलेक्ट्रिक) बस धावत आहेत. पर्यावरणपूरक या बसांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

महिलांना व ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत दिली जाते, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा आहे.

स्लीपर शिवनेरी’चीही सुरूवात

नवीन २०० बसांपैकी ३० बस स्लीपर कोच असणार आहेत. या ‘स्लीपर शिवनेरी’ बस काही लांब पल्ल्याच्या मार्गांवरील नॉन-एसी स्लीपर बसांची जागा घेणार आहेत. आधुनिक तंत्रज्ञान, अधिक सुरक्षितता आणि आरामदायी बेड-कोच सुविधेमुळे रात्रीच्या प्रवासासाठी ही सेवा अधिक सोयीस्कर ठरणार आहे.

शिवनेरी सेवेचा हा विस्तार म्हणजे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतुकीच्या नव्या पर्वाची सुरूवात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले.

Fact check: होळीसाठी ४ मार्च सुट्टी असल्याची बातमी खोटी

   Follow us on        

मुंबई: महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने (DGIPR) स्पष्ट केले आहे की, होळीनिमित्त फक्त मंगळवार, ३ मार्च २०२६ रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. सोशल मीडियावर बुधवार, ४ मार्च २०२६ रोजीही सुट्टी असल्याचा खोटा दावा आणि फेक नोटिफिकेशन व्हायरल झाले होते. मात्र, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत सुट्ट्यांच्या यादीत (२०२६) ४ मार्चला कोणतीही अतिरिक्त सार्वजनिक सुट्टी जाहीर केलेली नाही.

यंदा चंद्रग्रहणामुळे (३ मार्चला) आणि धार्मिक परंपरेनुसार काही ठिकाणी लोकांनी रंग खेळणे ४ मार्चला पुढे ढकलले असले तरी, शासकीय/शाळा/बँक/कार्यालयांसाठी सुट्टी फक्त ३ मार्चलाच आहे. ४ मार्च हा सामान्य कार्यदिवस राहील.महाराष्ट्रातील २०२६ सार्वजनिक सुट्ट्यांची यादी (मार्च महिन्यातील महत्त्वाच्या) ३ मार्च २०२६ (मंगळवार) – होळी (धुलिवंदन/दुसरा दिवस)

अधिकृत माहितीसाठी DGIPR च्या पोस्ट किंवा शासनाच्या वेबसाइटला (https://dgipr.maharashtra.gov.in) भेट द्या. फेक न्यूज पसरवू नका, फक्त विश्वसनीय स्रोतांवर विश्वास ठेवा!

 

 

 

सर्व बाबी अनुकूल, तरीही विलंब का? २० डब्यांच्या मुंबई–गोवा वंदेभारत एक्सप्रेसची प्रतीक्षा कायम

   Follow us on        

मुंबई: मुंबई–मडगाव वंदे भारत एक्सप्रेस (गाडी क्र. २२२२९/२२२३०) या अत्यंत लोकप्रिय गाडीची क्षमता तातडीने वाढवून ती २० डब्यांची करण्याची मागणी पुन्हा एकदा पुढे आली आहे. मध्य रेल्वेअंतर्गत सर्वाधिक प्रवासी प्रतिसाद मिळणारी ही वंदे भारत सेवा सध्या केवळ ८ डब्यांसह चालवली जात असून, सुरुवातीपासूनच सातत्याने उच्च प्रवासी गर्दी असूनही क्षमतेत वाढ न होणे आश्चर्यकारक आणि अन्यायकारक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

भारतीय रेल्वेतील अनेक वंदे भारत गाड्या ९० टक्क्यांहून अधिक प्रवासी भराव नोंदवताच १६ किंवा २० डब्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत, त्यामुळे मुंबई–मडगाव मार्गालाही त्याच धर्तीवर वाढ मिळावी, अशी मागणी होत आहे.

दरम्यान, नांदेड–मुंबई आणि सोलापूर–मुंबई वंदे भारत गाड्यांची मालकी व देखभाल जबाबदारी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाकडे वर्ग झाल्याने मुंबईतील देखभाल सुविधा व पिट लाईनची क्षमता मोठ्या प्रमाणात मोकळी झाली आहे. त्यामुळे मुंबई–मडगाव वंदे भारतला कायमस्वरूपी २० डब्यांची रचना देण्यासाठी सध्या अनुकूल परिस्थिती निर्माण झाली असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

उच्च मागणी असलेल्या या महत्त्वाच्या मार्गावर अजूनही कमी क्षमतेची गाडी चालवली जाणे योग्य नसल्याचे सांगत रेल्वे बोर्ड तसेच संबंधित विभागांनी तातडीने निर्णय घेऊन ही वाढ प्राधान्याने लागू करावी, अशी मागणी कोकण विकास समितीचे जयवंत शंकर दरेकर यांनी संबधित आस्थापना आणि लोकप्रतिनिधींना ईमेल द्वारे केली आहे. कोकणातील प्रवासी या दीर्घकालीन आणि रास्त मागणीच्या निर्णयाची प्रतीक्षा करत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सावंतवाडी येथे थांबा देणे गरजेचे

या गाडीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात फक्त एका स्थानकावर, म्हणजे कणकवली येथेच थांबा आहे. राज्यातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आलेल्या या जिल्ह्यात अशा प्रीमियम गाड्यांना पुरेसे थांबे न देणे हा मोठा विरोधाभास म्हणावा लागेल. तळकोकणातील सावंतवाडी येथे या गाडीला थांबा मिळावा, अशी मागणी गाडी सुरू झाल्यापासून सातत्याने होत आहे. तत्कालीन शालेय शिक्षणमंत्री आणि विद्यमान आमदार दीपक केसरकर यांनी वंदे भारत एक्स्प्रेससाठी सावंतवाडी थांब्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, आजतागायत हा थांबा मिळालेला नाही. ही गाडी २० डब्यांची करून तिला सावंतवाडी येथे थांबा मिळावा, यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) प्रयत्नशील आहे.

मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा: सामान्यांसाठी “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला”!

   Follow us on        

मुंबई: कोकणच्या विकासाच्या गप्पा मारणाऱ्या राज्यकर्त्यांनी मुंबई ते विजयदुर्ग अशी ‘M2M’ रो-रो सेवा नुकतीच थाटामाटात सुरू केली. मात्र, या सेवेचे भाडेपत्रक पाहिल्यावर सामान्य कोकणी माणसाच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. “चाराण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला” अशी या प्रवासाची अवस्था झाली असून, या भाडेवाढीमुळे कोकणचा सामान्य चाकरमानी पुन्हा एकदा वाऱ्यावर सोडला गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

गणिताचा ‘झोल’: रस्ते प्रवास स्वस्त, जलप्रवास महाग!

कोकण रेल्वेचे संस्थापक सदस्य सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर यांनी या भाडेवाढीचे वाभाडे काढताना एक बोलके गणित मांडले आहे. जर एखादा मध्यमवर्गीय माणूस स्वतःच्या कारने (४ प्रवाशांसह) मुंबईहून कोकणात गेला, तर त्याचे गणित खालीलप्रमाणे बसते:

प्रवास साधन इंधन (Fuel) टोल (Toll) एकूण खर्च
खाजगी कार (रस्त्याने) ₹ ४,५०० (10kmpl) ₹ १,००० ₹ ५,५००/-

म्हणजेच, रस्त्याने जाण्यापेक्षा जलमार्गाने जाण्यासाठी कोकणी माणसाला तब्बल १०,५०० रुपये अतिरिक्त मोजावे लागणार आहेत. हा कुठल्या प्रकारचा विकास आहे? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.

“सामान्य माणूस केंद्रस्थानी की फक्त श्रीमंत पर्यटक?”

विजयदुर्गला पोहोचल्यानंतर तिथून आपल्या मूळ गावी जाण्यासाठी पुन्हा खाजगी वाहन किंवा एसटीचा खर्च वेगळाच. तसेच मुंबईत घरून भाऊच्या धक्क्यापर्यंत पोहोचण्याचा खर्च धरला, तर हे बजेट सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाते. मंत्र्यांनी हे दर ठरवताना नेमका कोणाचा विचार केला? केवळ आलिशान गाड्यांमधून फिरणाऱ्या पर्यटकांचा की घाम गाळून कोकण जिवंत ठेवणाऱ्या चाकरमान्यांचा?

“कोकणवासीयांची परवड कधी थांबणार? विजयदुर्गला उतरल्यावर पुढे घरापर्यंतचा प्रवास खर्च जोडला तर हे आर्थिक गणित कोलमडते. ही सेवा सामान्यांसाठी नसून केवळ श्रीमंतांच्या चोचल्यांसाठी आहे असे वाटते.”सुरेंद्र हरिश्चंद्र नेमळेकर, संस्थापक सदस्य, कोकण रेल्वे.

त्यापेक्षा ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करा

कोकणच्या विकासासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून सामान्यांना न परवडणारी ‘रो-रो’ सेवा सुरू करण्यापेक्षा, रेल्वे प्रशासनाने ‘वसई ते सावंतवाडी पॅसेंजर’ सुरू करणे हाच खरा आणि व्यवहार्य तोडगा ठरेल, असे प्रतिपादन सुरेंद्र नेमळेकर यांनी केले आहे. या प्रस्तावानुसार, ही गाडी रात्री १० वाजता वसईवरून सुटावी, ज्यामुळे नोकरी-धंद्यावरून सुटलेला चाकरमानी सुखाने प्रवास करू शकेल. भिवंडी आणि कोपर रोडसह कोकणातील सर्व प्रमुख स्थानकांवर या गाडीला थांबा दिल्यास ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगरातील प्रवाशांची मोठी सोय होईल. महत्त्वाचे म्हणजे, अवघ्या २२५ रुपयांत प्रवासी सकाळी सावंतवाडीपर्यंत पोहोचू शकतील आणि तिथून एसटीने आपापल्या घरी जाणे त्यांना अत्यंत स्वस्त पडेल. सकाळी तिथूनच ही गाडी परतीच्या प्रवासाला निघून रात्री १० वाजेपर्यंत पुन्हा वसईला पोहोचू शकते. ही साधी पण प्रभावी योजना राबवल्यास कोकणवासीयांची वर्षानुवर्षांची आर्थिक परवड खऱ्या अर्थाने थांबेल.

मुंबई विमानतळांना थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी! मेट्रो-८ साठी ₹२२ हजार कोटींची गुंतवणूक

   Follow us on        

मुंबई : Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) ते Navi Mumbai International Airport (NMIA) दरम्यान प्रस्तावित मेट्रो मार्ग-८ प्रकल्पाचा सविस्तर आर्थिक आराखडा जाहीर झाला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत ₹२२,६६२ कोटी इतकी असून मुख्य बांधकामासाठी ₹१९,२७८ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प सार्वजनिक-खाजगी भागीदारी (PPP) तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.

निधी उभारणीची रचना

प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकारकडून व्यवहार्यता अंतर निधी (VGF) स्वरूपात प्रत्येकी ₹३,४५६ कोटी (२०%) देण्यात येणार आहेत. नव्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाकडून ₹५६४ कोटी (सुमारे ३%) तर खासगी विकसकाकडून ₹७,८०३ कोटी (सुमारे ४५%) गुंतवणूक केली जाणार आहे. त्यामुळे सुमारे ४० टक्के हिस्सा हा सार्वजनिक अनुदानाचा असून उर्वरित मोठा वाटा खासगी क्षेत्राकडून उचलला जाणार आहे.

अतिरिक्त खर्चाचाही समावेश

मुख्य प्रकल्प खर्चाव्यतिरिक्त जमीन संपादन व पुनर्वसनासाठी ₹२,३२३ कोटी, विविध कर व शुल्कासाठी ₹१,१३० कोटी तसेच बांधकाम कालावधीतील व्याज (IDC) म्हणून ₹२,९९९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व खर्चांसह प्रकल्पाची एकूण किंमत ₹२२,६६२ कोटींवर पोहोचते.

विमानतळांना थेट मेट्रो जोडणी

हा मेट्रो मार्ग मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळांना थेट जोडणार असल्याने प्रवाशांसाठी मोठी सोय निर्माण होणार आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक कोंडी कमी करण्यास आणि सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यास या प्रकल्पाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे.

मागणी पूर्ण! सावंतवाडी–रेल्वे स्थानक–बांदा बससेवा सुरू; बस फेऱ्यांचे वेळापत्रक असे असेल

   Follow us on        

बांदा :सावंतवाडी रेल्वे स्टेशन–निगुडे–सोनूर्ली–बांदा या मार्गावर नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. या मार्गावर नियमित बसफेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती. अखेर प्रशासनाने याची दखल घेत बससेवा सुरू केल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

निगुडे येथे झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी स्थानिक लोकप्रतिनिधी, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या नव्या सेवेचा लाभ विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी तसेच व्यापाऱ्यांना होणार असून रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचणे आता अधिक सोयीचे होणार आहे.

नवीन बससेवेअंतर्गत दिवसातून एकूण ११ फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. सकाळपासून सायंकाळपर्यंत नियमित वेळापत्रकानुसार बस धावणार असून सावंतवाडी रेल्वे स्टेशन, निगुडे, सोनूर्ली आणि बांदा या प्रमुख ठिकाणी थांबे असणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांना शहराशी थेट जोडणी मिळाली आहे.

ग्रामस्थांनी या निर्णयाचे स्वागत करत प्रशासनाचे आभार मानले असून भविष्यात फेऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. नवीन बससेवा सुरू झाल्याने या भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

नवीन बस फेरीचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे:

१) बांदा – सकाळी ७:१५ (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी ८:००

२) सावंतवाडी – सकाळी ९:०० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सकाळी ९:४५

३) बांदा – सकाळी ९:५० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सकाळी १०:३५

४) सावंतवाडी – सकाळी ११:३० (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १२:१५

५) बांदा – सकाळी ११:३० (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १२:१५

६) सावंतवाडी – दुपारी १२:२५ (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १३:१० (१:१०)

७) बांदा – दुपारी १३:२० (१:२०) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १३:४५ (१:४५)

८) सावंतवाडी – दुपारी १४:०० (२:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – दुपारी १४:४५ (२:४५)

९) बांदा – दुपारी १४:५५ (२:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – दुपारी १५:४० (३:४०)

१०) सावंतवाडी – सायं. १७:०० (५:००) (मार्गे: रेल्वे स्टेशन, सोनूर्ली, निगुडे) ➡️ बांदा – सायं. १७:४५ (५:४५)

११) बांदा – सायं. १७:५५ (५:५५) (मार्गे: निगुडे, सोनूर्ली, रेल्वे स्टेशन) ➡️ सावंतवाडी – सायं. १८:४० (६:४०)

 

 

 

विजयदुर्ग–मुंबई M2M रो-रो परतीचा प्रवास यशस्वीरित्या पूर्ण!

   Follow us on        

मुंबई: मुंबई आणि कोकणाला समुद्रमार्गे जोडणाऱ्या ऐतिहासिक M2M Princess रो-रो फेरीचा परतीचा प्रवास आज (२ मार्च २०२६) यशस्वीरित्या पूर्ण झाला. १ मार्च रोजी मुंबईच्या भाऊचा धक्का येथून रवाना झालेली ही आशियातील सर्वात जलद रो-पॅक्स सेवा, विजयदुर्गहून परत येताना संध्याकाळी भाऊचा धक्का येथे सुखरूप पोहोचली.

या सेवेमुळे मुंबई ते विजयदुर्ग (सिंधुदुर्ग) दरम्यानचा प्रवास आता फक्त ६-७ तासांत होऊ शकतो, जे रस्त्याने १०-१२ तासांपेक्षा खूप कमी आहे. फेरीमध्ये ६२६ प्रवासी आणि कार, दुचाकी यांसारखी वाहने नेण्याची क्षमता आहे. या प्रकल्पामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार आणि सांस्कृतिक संबंधांना नवे बळ मिळणार आहे.महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री आदरणीय नितेश राणे यांनी या यशस्वी परतीच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. त्यांनी म्हटले आहे की, हा केवळ प्रवास नव्हता तर मुंबई-कोकण नात्याला लाटांवरून नव्याने जोडणारा भावनिक सेतू होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र मरीटाइम बोर्ड आणि M2M Ferries यांनी हे स्वप्न साकार केले.

रात्रीच्या वेळी भाऊचा धक्का येथे उतरलेले प्रवासी, त्यांच्या सूटकेसेस आणि वाहनांसह दिसलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हा प्रकल्प महाराष्ट्राच्या ब्लू इकॉनॉमीला चालना देणारा ठरणार असून, होळी आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांसाठी हा उत्तम पर्याय ठरला आहे.

 

 

 

Konkan Railway: तिरुवनंतपुरम – मदार होळी विशेष गाडीची घोषणा

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष गाडी (क्र. 06013 / 06014) अशी ही सेवा राहणार आहे.

गाडी क्र. 06013 तिरुवनंतपुरम सेंट्रल – मदार जंक्शन साप्ताहिक विशेष ४ मार्च २०२६ आणि ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी सकाळी ७:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथून सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी ११:०० वाजता मदार जंक्शन येथे पोहोचेल.

गाडी क्र. 06014 मदार जंक्शन – तिरुवनंतपुरम सेंट्रल साप्ताहिक विशेष ७ मार्च २०२६ आणि १४ मार्च २०२६ (शनिवार) रोजी रात्री ९:४० वाजता मदार जंक्शन येथून सुटेल आणि चौथ्या दिवशी रात्री १२:४५ वाजता तिरुवनंतपुरम सेंट्रल येथे पोहोचेल.

ही विशेष गाडी कोल्लम, कायमकुलम, मावेलिकरा, चेंगन्नूर, तिरुवल्ला, कोट्टायम, एर्नाकुलम टाउन, अलुवा, त्रिशूर, शोरनूर, कोझिकोड, कन्नूर, कासरगोड, मंगळुरू, उडुपी, मुरुडेश्वर, कुमटा, करवार, मडगाव, सावंतवाडी रोड, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, पनवेल, वसई रोड, सूरत, वडोदरा, रतलाम, चित्तौडगड, भिलवाडा, बिजैनगर आणि अजमेर या स्थानकांवर थांबा घेणार आहे.

या गाडीमध्ये एकूण २२ डबे असतील. त्यात २० स्लीपर कोच आणि २ एसएलआर/डी डबे समाविष्ट आहेत.

महाराष्ट्रातील दोन ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर्स’ ना केंद्र सरकारची मंजुरी.

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने महाराष्ट्रातील राष्ट्रीय महामार्ग ४८ (NH-48) वर सातारा आणि कोल्हापूर भागात दोन उन्नत मार्ग (एलिव्हेटेड कॉरिडॉर) बांधण्यास मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांसाठी एकूण २५८.९९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही माहिती दिली असून, त्यांनी या निर्णयाचे स्वागत करत मोदी सरकारच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक केले आहे.

या मंजुरीमुळे सातारा जिल्ह्यातील उंब्रज परिसरात सहा-लेनचा उन्नत मार्ग आणि कोल्हापूर भागात आठ-लेनचा उन्नत मार्ग बांधला जाणार आहे. या प्रकल्पांमुळे प्रवास अधिक सुलभ, सुरक्षित आणि वेगवान होईल. विशेषतः पावसाळ्यात पंचगंगा नदी परिसरात येणाऱ्या पूरामुळे होणारी वाहतूक अडचण कायमची दूर होईल. स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील आणि राज्याच्या एकूण पायाभूत सुविधा विकासाला नवीन गती मिळेल.

हे प्रकल्प NH-48 या दिल्ली-चेन्नईला जोडणाऱ्या महत्त्वाच्या महामार्गाचा भाग आहेत, ज्यामुळे मुंबई, पुणे, बेंगळुरू यांसारख्या प्रमुख शहरांमधील कनेक्टिव्हिटी सुधारेल. यापूर्वी फेब्रुवारी २०२६ मध्ये कोल्हापूरजवळील पंचगंगा नदीवरील ३.५७८ किलोमीटर लांबीच्या सहा-लेन उन्नत फ्लायओवरसाठी ९१३.७० कोटी रुपयांची स्वतंत्र मंजुरी देण्यात आली होती. सदर २५८.९९ कोटींची तरतूद ही अतिरिक्त किंवा पूरक असण्याची शक्यता आहे, ज्यात स्थानिक उन्नत भाग आणि संबंधित सुविधांचा समावेश असू शकतो.

रवींद्र चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, मोदी सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकासमार्ग वेगाने पुढे सरकत आहे. पायाभूत सुविधांच्या या निर्णयांमुळे राज्याच्या समग्र प्रगतीला चालना मिळेल. NHAI मार्फत लवकरच या प्रकल्पांची निविदा प्रक्रिया आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होण्याची अपेक्षा आहे.

 

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search