Author Archives: Kokanai Digital

Mumbai Goa Highway | खुशखबर! कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग आजपासून सुरू

रत्नागिरी दि. २४: शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे.कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग आज शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणार्‍या वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एका मार्गिकेचा वापर सुरू करण्यात आला होता. गणेशोत्सवाआधीचे काही दिवस कोकणात येणाऱ्या गाड्या या बोगद्यातून आल्या. गणेश विसर्जनानंतर हा बोगदा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र काही दिवसाच्या वापरानंतर तो बंद करण्यात आला. आतील फिनिशिंगची काही कामे झालेली नव्हती.

आता एका मार्गिकेचे (एका बोगद्याचे) सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांसाठी हा बोगदा खुला झाला आहे. शनिवारपासून त्याचा वापरही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कार तसेच छोट्या गाड्यांना येथून जाण्याची मुभा आहे. मात्र मोठ्या गाड्याही लवकरच या बोगद्यातून सोडल्या जाणार आहेत. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून, या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे.

 

Loading

कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे एकूण २२ मागण्यांचे निवेदन रेल्वेकडे सुपूर्त; कोणत्या आहेत या मागण्या? इथे वाचा…

मुंबई दि. २४ फेब्रु. : कोकण रेल्वे मार्गावरील मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व प्रवासी संघटना व संस्था एकत्र येत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.सर्व सलग्न प्रवासी संघटनांच्या मागण्या एकत्र करून त्याच्या मागण्या कोकण रेल्वेकडे करण्यात आली. त्यात प्रामूख्याने

१) कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे.

२) सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे.

३) पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रोहा ते मडगाव दरम्यान दिवसाच्या वेळेत मेमू रेल्वे सुरू करावी.

४) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी.

५) कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे.

६) कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा.

७) दिघी – रोहा – चिंचवड, गुहागर – चिपळूण – कराड व विजयदुर्ग – वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत.

८) भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत.

९) कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी.

१०) रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठी, कोंकणी व कन्नड या स्थानिक भाषांतही उलपब्ध करून द्यावे.

११) मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना (Up & Down) दिवा जंक्शन येथे थांबे मिळावेत.

१२) ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ किंवा २२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आवश्यकत त्या पायाभूत सुविधा उभारून २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात. २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करावी.

१३) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पूर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा.

१४) वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा मिळावी.

१५) कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.

१६) कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station One Product योजना लागू करणे.

१७) सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे.

१८) Tourist / toy Train – कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन १) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड,मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर, पावस, जयगड, खेड,दापोली,गुहागर. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड.

१९) पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात.

२०) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माणगाव,विर,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथे वाढीव मिळावेत.

२१) सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन,गोवा संपर्कक्रांती,जामनगर तिरूनेवल्ली,गांधीधाम तिरुनेवल्ली, एटीटी कोचिवल्ली,केरळा संपर्कक्रांती,पोरबंदर कोचिवल्ली, एर्नाकुलम दुरांतो ह्या फक्त चिपळूण किंवा रत्नागिरी करून मडगावला जातात त्या मिरज मार्गे वळवाव्यात किंवा महाराष्ट्रात कोंकण रेल्वे मार्गावर जास्तीचे थांबे द्यावेत.

२२) रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर पिटलाईनचे काम पूर्ण करून रत्नागिरी येथून मुंबई व सावंतवाडी/मडगाव/कारवारच्या दिशेने वाढीव गाड्या सुरु कराव्यात.

अशा अनेक महत्वाच्या मागण्या समितीने रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागण्या केल्या असून त्याची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी असेही सुचवण्यात आले आहे.

Loading

कोकण रेल्वे मार्गावर आजपासून सहा दिवसांचा मेगाब्लॉक; ‘या’ गाड्या उशिराने धावणार

Konkan Railway News : कोकण रेल्वे मार्गावर दि. 24 ते 29 फेब्रुवारी 2024 असा तब्बल सहा दिवसांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. कर्नाटकमध्ये नंदिकुर रेल्वे स्टेशन येथे मार्गावरील पॉईंट बदलण्याच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात असल्याची माहिती कोकणरेल्वे प्रशासनाने दिली आहे.

या मेगाब्लॉकमुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या खालील सहा गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

१) Train no. 12978 Ajmer – Ernakulam Jn. Express
दिनांक 23 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी उडुपी स्थानकावर वीस मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

२) Train no. 16337 Okha – Ernakulam Jn. Express
दिनांक 24 फेब्रुवारीला प्रवास सुरू करणार्‍या या गाडीला मडगाव ते उडपी दरम्यान 45 मिनिटे थांबवून ठेवले जाणार आहे.

३) Train no. 22114 Kochuveli – Lokmanya Tilak (T) Express
दिनांक 26 फेब्रुवारी रोजी प्रवास सुरू करणारी ही गाडी मंगळुरू ते मुलकी या विभागात 100 मिनिटे रोखून ठेवली जाणार आहे.

वरील तीन गाड्या व्यतिरिक्त मडगावच्या पुढे धावणाऱ्या इतर तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर देखील या मेगाब्लॉकचा परिणाम होणार आहे.

Loading

भाविकांसाठी खुशखबर! आंगणेवाडीच्या जत्रेसाठी रेल्वेकडून विशेष गाडीची घोषणा

Konkan Railway News:आंगणेवाडीच्या जत्रेसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी एक खुशखबर आहे. मध्य रेल्वेने या जत्रेसाठी एक विशेष गाडी ट्रेन व डिमांड (TOD ) तत्वावर चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीची सरीवस्तार माहिती खालीलप्रमाणे
गाडी क्रमांक 01043/01044  एलटीटी – करमाळी- एलटीटी  विशेष (TOD)
ही गाडी मुंबईच्या लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दिनांक शुक्रवारी दिनांक ०१ मार्च रोजी रात्री १० वाजून १५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
परतीच्या प्रवासात ही गाडी रविवार दिनांक ३ मार्च रोजी करमाळी या स्थानकावरून दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ३ वाजून ४५ मिनिटांनी लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
थांबे
ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवीम  स्थानकांवर थांबेल .
रचना : एकूण 22 एलएचबी कोच :  टू टायर एसी – 02 कोच + थ्री टायर एसी – 06 कोच + स्लीपर – 08 कोच, जनरल – 03 कोच, एसएलआर – 01 + जेनेरेटर व्हॅन – 01
आरक्षण
सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी या दिवशी या गाड्यांचे आरक्षण सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

 

Loading

Diva Accident : कोकण रेल्वे मार्गावर चालणार्‍या गाड्यांना दिवा येथे थांबा देण्याची गरज..

दिवा दि.२२ फेब्रु | काल बुधवारी दिवा स्थानकावर झालेल्या एका अपघातात कणकवली तालुक्यातील भिरवंडे येथील सचिन बाळकृष्ण सावंत ( वय ४५ रा. भिरवंडे मुरडयेवाडी ) यांचे मुंबईकडे जाताना रेल्वे प्रवासादरम्यान अपघाती निधन झाले.

या अपघाताची सविस्तर माहिती अशी की कणकवली येथे स्थायिक असलेले सचिन हे काही कामानिमित्त मुंबई येथे मंगळवारी कोकण कन्या एक्सप्रेसने जाण्यास निघाले. दिवा स्टेशन येथे पोहोचल्यावर कोकण कन्या एक्सप्रेसचा वेग कमी झाला.याचा अंदाज घेऊन सचिन यांनी दिवा स्टेशन येथे उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र हा प्रयत्न त्यांच्या जीवावर बेतला. रेल्वेतून उतरताना सचिन हे बाहेर फेकले गेले. त्यांना गंभीर स्वरूपाची इजा झाली. रेल्वे पोलिसांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देखील मिळाली. मात्र अतिरक्तस्त्राव झाल्याने सचिन यांची उपचारांना साथ मिळत नव्हती. अशातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

घडलेली घटना हा निव्वळ अपघात असला तरी घटनेमुळे कोकणच्या प्रवाशांची एक जुनी मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे. ती मागणी म्हणजे कोकणात जाणाऱ्या गाड्यांना दिवा स्थानकावर थांबा मिळावा ही होय.

दिवा स्थानकांत सध्या आठ प्लॅटफॉर्म असून, या स्थानकात दिवा-सावंतवाडी, दादर-रत्नागिरी या पॅसेंजर गाड्या, दिवा-रोहा मेमू, दिवा-वसई अशा गाड्या चालविण्यात येतात. दिवा स्थानकात जर कोकण रेल्वेच्या सर्वच गाड्यांना थांबा दिला तर दिवा, डोंबिवली व कल्याण, अंबरनाथ, बदलापूर, टीटवाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातील चाकरमान्यांचा ठाणे, कुर्ला, दादर, सीएसएमटी टर्मिनसवर जाण्यासाठी लागणारा वेळ वाचला जाईल. परतीच्या प्रवासातही ठाण्याला उतरल्यानंतर पुन्हा सामानासह लोकल पकडणे अडचणीचे ठरत असल्याचे प्रवाशांचे म्हणने आहे.

तर हे अपघात टाळता येणे शक्य

वा येथे गाडी आल्यावर ठाण्याच्या दिशेने जाताना रूळ बदलताना गाडीचा वेग कमी होतो. त्याचा फायदा घेऊन अनेक प्रवासी चालत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. त्यामुळे कित्येकदा अपघातही होतात. येथे थांबे दिल्याने असे अपघात टाळता येतील.

 

पहाटे सुटणार्‍या आणि उशिरा परतणाऱ्या गाड्यांना थांबा मिळावा

जनशताब्दी एक्सप्रेस सारख्या गाड्या मुंबईहुन पहाटे सुटतात आणि परतीच्या प्रवासात उशिराने ठाण्या- मुंबईत येतात. या गाडीला दिवा येथे थांबा दिल्यास या परिसरातील कोकणातील प्रवाशांची खूप मोठी सोय होईल. त्याचप्रमाणे कोकण-कन्या, तुतारी एक्सप्रेस, मांडवी एक्सप्रेस या नियमित आणि ईतर काही गाड्यांना येथे थांबा देण्यात यावा अशी मागणी होत आहे.

Loading

नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला कागल येथील शेतकऱ्यांचा विरोध; कारण काय?

कोल्हापूर,दि. २१ फेब्रु. : राज्य सरकारचा महत्वाकांक्षी नागपूर गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग पूर्ण करणे हे सरकारच्या दृष्टीने मोठे आव्हान असणार आहे. कारण या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध करण्यास सुरवात केल्याची बातमी समोर येत आहे.
नागपूर गोवा महामार्गाचे सर्वेक्षण कोल्हापूर जल्ह्यातील कागल तालुक्यात सुरु झाले आहे. या महामार्ग एकोंडी आणि बामणी या दोन गावातून जाणार असून या गावातील शेतकऱ्यांनी याविषयी एक बैठक घेऊन या महामार्गास विरोध करण्याचा पावित्रा घेतला आहे.
हा महामार्ग झाल्यास येथील अनेक शेतकरी भूमिहीन होतील, त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत या महामार्गास विरोध करावा असे या बैठकीत ठरले आहे. सरकारने या महामार्गाकरिता पर्यायी जागेचा विचार करावा अशी  मागणी या सभेत करण्यात आली आहे. तसे न झाल्यास आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे यावेळी एकमताने ठरविण्यात आले आहे.

Loading

“शिकारी खुद यहाँ शिकार हो गया.” आंबोलीतील प्रकार

सावंतवाडी, दि. १८फेब्रु.: कोकणातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोली  येथे शिकार करण्यासाठी आलेल्या सहाजणांना काल आंबोली पोलिसांनी अटक केली. आश्चर्याची बाब म्हणजे ज्या ठिकाणी ग्रामस्थांचे बेकायदेशीर अतिक्रमण विरोधात उपोषण सुरू त्या स्थळापासून पोलिसांनी  १४९ नोटीस दिलेली असतानाही केवळ १०० मीटर वर शिकारीच्या उद्देशाने हा गोळीबार झाला. या ठिकाणी सहाय्यक उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर हे स्वतः बंदोबस्तासाठी होते. गोळीबार नंतर आंबोली हिरण्यकेशी पर्यटन टोल नाक्यावर ग्रामस्थांनी गाडी अडवली आणि एकूण ६ जणांना पकडून त्यांना पोलीस व वन विभागाच्या ताब्यात दिले. यात सावंतवाडीतील एक वकील आणि अन्य पाच जणांचा समावेश  आहे. संबधितांच्या चारचाकी वाहनात बंदूक,काडतुसे,रक्त लागलेला सुरा सापडले असून ,सुरीला लागलेले ,रक्त व केसांचा पंचनामा पोलीस आणि वनविभाचे अधिकारी यांनी केला.या संशयितांना ताब्यात घेत पुढील कारवाई करण्यात आली. तपासाअंती त्यांनी साळींदर ची शिकार केल्याचे समोर आले.
मात्र उपोषण स्थळापासून केवळ शंभर मीटर वर गोळीबार झाल्याने ग्रामस्थ भयभीत झाले. काल इथे उपोषण असल्याने हा प्रकार उघडकीस आला.  सावंतवाडी ते आंबोली या मार्गावर दाणोली या ठिकाणी पोलिसांचा तपासणी नाका आहे. या तपासणी नाक्यावर योग्य प्रकारे तपासणी होत नाही आहे का? असा प्रश्न ग्रामस्थांकडून विचारण्यात येत आहे. अतिक्रमण आणि  शिकार यामुळे येथील अनेक प्राण्यांच्या जाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे असे प्रकार थांबविण्यासाठी कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Loading

प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत-शौकतभाई मुकादम

चिपळूण, दि. १९ फेब्रु.:चिपळूण रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना खाद्यपदार्थ विक्रेत्यांसंबंधीत जे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, ही गोष्ट लांछनास्पद आहे. मला अनेक प्रवाशांचे फोन आले तेव्हा मी खात्री केल्यानंतर वस्तुस्थिती खरी आहे हे समजले. प्रवाशांच्या जीवाशी खेळणार्‍या परप्रांतीय फेरीवाल्यांचे परवाने त्वरित रद्द करावेत, अशी मागणी कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.
प्रवाशांच्या जीवाशी खेळण्याचा अधिकार या फेरीवाल्यांना कुणी दिला. या पूर्वी एक फेरीवाला पावाच्या लादीवर पाय ठेवून झोपला होता. तर दुसर्‍या फेरीवाला फलाटावरील बाकडयावर झोपला असून त्याच्याकडील भजी ट्रेसहीत पडलेली दिसत आहेत. व ती भजी प्रवाशांनी जाब विचारताच पुन्हा ट्रेमध्ये गोळा करून घेताना दिसत आहे. प्रवाशांनी व आरपीएफच्या जवानाने हटकताच ती कचर्‍याच्या डब्यात टाकली. हा प्रकार करणार्‍या खाद्यपदार्थ विक्रेत्यांची चौकशी व्हावी अशी मागणी मुकादम यांनी केली आहे. ते पुढे म्हणाले की अन्य भेसळ अधिकारी तसेच पोलीस झोपा काढत आहेत का? फेरीवाल्यांची सहा महिन्याची मेडिकल टेस्ट करावी लागते, ती झालेली आहे की नाही. ज्या स्टॉलधारकांचे फेरीवाले आहेत त्यांच्या स्टॉलचा परवाना रद्द करण्यात यावा व प्रवाशांच्या जीवाशी खेळून खाद्यपदार्थ विकणार्‍या परप्रांतीयांचे परवाने रद्द करण्यात यावेत, अशीही मागणी अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी केली आहे.

Loading

‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’; दीपक केसरकर यांच्या विरोधात लावलेले बॅनर चर्चेत

सिंधुदुर्ग, दि. १८ फेब्रु.:शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात वेंगुर्लेमधील पाट परुळे भागात लावण्यात आलेले बॅनर जिल्ह्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. ‘भाई आता खरंच पुरे झालं, थांबा आता’, अशा आशयाचे बॅनर दिपक केसरकर यांच्या विरोधात गावकऱ्यांनी लावले आहेत.दीपक केसरकर यांच्याबद्दल गावकऱ्यांनी न केलेल्या कामांचा या बॅनरवर पाढाच वाचला आहे. सध्या हे बॅनर सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे.

मालवणी बोलीभाषेतून या बॅनरवरील सर्व मजकूर लिहिण्यात आला आहे. लावण्यात आलेले हे बॅनर सध्या चर्चेचा विषय बनले आहे. मात्र हे बॅनर खरंच गावकऱ्यांनी लावले की विरोधकांनी असा प्रश्नही निर्माण झाला आहे. कारण बॅनवर फक्त केसरकरांनी न केलेल्या कामांचाच पाढा वाचण्यात आला आहे.

बॅनरमधील मजकूर काय आहे ?

“प्रिय दिपकभाई,

म्हापण, पाट-परुळे, भोगवे, चिपी ही गावांची नावा आठवतत काय ओ? कशी आठावतीत? 5 वर्षा सरली तुमका हय येवन. इसारल्या असताल्यात. आमीय इसारललो तुमी आमचे 15 वर्षा आमदार आसास ते.

मागच्या निवडणुकीत इल्लास तेव्हा आमच्या दोन एक हजार बेरोजगार पोरा-पोरींचे बायोडाटा घेवचो मोठो कार्यक्रम केल्लास. तेंका चिपीच्या ईमानतळार नोकरे लायतलास म्हणुन सांगलास. 5 वर्षात एकाकय नोकरी काय गावाक नाय पण असले येकयेक गजाली सांगुन आमची मता मात्र घेतलास.

तेच्या आधी पर्यटनमंत्री म्हणान हाऊसबोटी, वॉटरस्पोर्टसब, स्थानिकांका हॉटेला घालुक अनुदान, पर्यटनांतसुन रोजगार असले गजाल्यो मारल्यात. आम्ही खुष झाल्लो, मता घातली. पण तुमचे हाऊसबोटी काय आमच्या दर्यात पोचाक नाय.

आमच्या शेजारचा मालवण मात्र ह्याच गोष्टीनी विकसित झाला, पर्यटनात जगाच्या नकाशार लागला. आमी मात्र सगळा आसान थयच रवलो. तुमचे गजाली आयकत. आणि आजुनय तुमका संधी व्हयी म्हणतास??

भाई, 5 वर्षात जसा आमका तोंड दाखयक येवक नाय तशे हेच्या पुढेय येव नकात. आता कोपरापासुन हात जोडुन सांगतव तुमका… भाई, आता खराच पुरे झाला,थांबा आता, असा मजकूर मालवणी भाषेतून यावर लिहिण्यात आला आहे.”

Loading

या वीकएंडला अटल सेतूने प्रवास करण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी वाचाच

नवी मुंबई : रविवारी होणाऱ्या मुंबई मॅरेथॉनसाठी शनिवारी रात्री ११ ते रविवारी दुपारी १ वाजेपर्यंत अशा एकूण दहा तासांसाठी न्हावा – शिवडी सागरी अटल सेतूवरून अत्यावश्यक वाहने वगळता सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली असल्याची माहिती नवी मुंबई वाहतूक विभागाने अधिसूचना काढून दिली आहे.
त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामध्ये पुण्यातून द्रुतगती आणि जुन्या महामार्गावरून मुंबईकडे येणारी वाहने गव्हाण फाटा मार्गे बेलापूर- वाशी मुंबई अशी तर जेएनपीटी आणि उरणहून मुंबईत जाणारी वाहनेही गव्हाण फाटामार्गे वाशी या मार्गाने वळविण्यात आली आहेत.
या वर्षीची मॅरेथॉन ही पहिल्यांदाच नागरिकांचे आकर्षण ठरलेल्या अटल सेतूवर आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई ते चिर्लेदरम्यान मॅरेथॉन होणार आहे. यासाठी ‘एमएमआरडीए’कडून वाहतूक विभागाकडे हा मार्ग बंद करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ही प्रवेशबंदी जाहीर करणारी सूचना नवी मुंबई वाहतूक पोलीस आयुक्त तिरुपती काकडे यांनी काढली असल्याची माहिती न्हावाशेवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी. बी. मुजावर यांनी दिली आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search