सिंधुदुर्ग: मालवणात सध्या नौसेना दिनाची धामधूम सुरू आहे. नौदलाच्या कवायती पाहण्यासाठी तारकर्ली समुद्रकिनारी लोकांची मोठी गर्दी होते आहे. गुरूवारी रात्री ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर लेझर शोला प्रारंभ झाला. लेझर शोमुळे किल्ल्यासमोरील परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला होता.
रत्नागिरी : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रसिद्ध बेव्हरेज कंपनी ‘कोका कोला’ चे उद्घाटन रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे- परशूराम औद्योगिक वसाहतीमध्ये पार पडलं. या प्रकल्पातील सर्व अडचणी दूर झाल्या असून चांगली सुरुवात कोकणच्या भूमीत होत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
हिंदुस्तान कोको कोला ब्रेव्हरेज कंपनीनं सुरुवातीला २५०० कोटी रुपयांची गुंतवणूक करत आहोत. विविध प्रकारची ६० उत्पादनं या कंपनीची देशभरात आहेत. या कंपनीनं हजारो कर्मचारी काम करतात. या कंपनीनं २०२३ मध्ये भारतात एकूण १२८४० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. अशी एक मोठी कंपनी इथं उभी राहत आहे त्यामुळं लोकांना चांगला रोजगार उभा राहिलं. व्यवस्थापनानं स्थानिक लोकांना प्राधान्य कारखान्यात दिलं पाहिजे, असा आग्रह यावेळी मुख्यंमत्र्यांनी धरला.
फडणवीस मुख्यमंत्री असताना २०१५ अमेरिका दौऱ्यातच याबाबत बोलणी झाली होती. पण नंतर सरकार बदलल्यानंतर ते काम थांबलं. कोकणानं नेहमीच बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे. त्यामुळं कोकणी माणला वापरुन घ्यायचं काम आमचं सरकार कधी करणार नाही. इथल्या भूमिपुत्रांना मोठी स्वप्न दाखवायची आणि एखादा चांगला प्रकल्प आला की त्याला विरोध करायचं हे आम्हाला कधी शिकवलं नाही. त्यामुळेच आता हा प्रकल्प इथं सुरु होत आहे.
प्रतिनिधी: रेल्वे सुरक्षा दलाच्या RPF ‘जिवन रक्षक अभियानांतर्गत’ रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी एप्रिल ते ऑक्टोबर या काळादरम्यान विविध विभागांमध्ये साहस आणि प्रसंगावधान दाखवून चुकीच्या पद्धतीने गाडी पडणाऱ्या ६६ प्रवाशांचे प्राण वाचविले आहेत.
यात मुंबई विभागातील १९, भुसावळ विभागातील १३, नागपूर विभागातील १४,पुणे विभागातील १५ तर सोलापूर विभागातील ५ प्रवाशांचा समावेश आहे.
रेल्वे मालमत्तेचे रक्षण करण्याच्या मुख्य कर्तव्याव्यतिरिक्त, “अमानत” या ऑपरेशन अंतर्गत आरपीएफने त्यांच्या कर्तव्याच्या पलीकडे जाऊन गरजू प्रवाशांना मदत केली आहे. त्यांचे हरवलेले किंवा मागे राहिलेले सामान, रोख, दागिने, मोबाईल फोन, लॅपटॉप, यासारख्या मौल्यवान वस्तू परत मिळवून दिल्या आहेत.
यंदा एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ दरम्यान, ऑपरेशन ‘अमानत’ अंतर्गत, आरपीएफने ८५७ प्रवाशांचे सामान परत मिळवले आहे. त्याची किंमत २.७७ कोटी रुपये आहे. इतर विभागांवर परत मिळवलेल्या प्रवाशांच्या सामानाचे मूल्य आहे. भुसावळ विभाग १८२ प्रवाशांचे ५०.४५ लाख किमतीचे सामान नागपूर विभाग १६८ प्रवाशांचे ३६.९७ लाख किमतीचे सामान, पुणे विभाग ५८ प्रवाशांचे १३.९४ लाख किमतीचे सामान तर सोलापूर विभागात ७२ प्रवाशांचे १३.९९ लाख किमतीच्या सामानाचा सामावेश आहे.
मध्य रेल्वेचे आवाहन
रेल्वे संरक्षण दलाच्या जवानांना प्रवासी आणि रेल्वे मालमत्तेवरील गुन्हे, ट्रेनच्या वाहतुकीत अडथळा इत्यादी सुरक्षा आव्हानांचा सामना करावा लागतो. प्रवाशांनी त्यांना सहकार्य करावे तसेच प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून चढू किंवा उतरू नये असे आवाहन केले आहे.
कुडाळ: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात आंजिवडे येथे प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांचा साडेआठ हजार कोटी रुपये गुंतवणुकीच्या हायड्रो इलेक्ट्रिक वीजनिर्मिती प्रकल्प आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या भागात काही प्रमाणात यंत्रसामग्री आणण्याचीही तयारी सुरू असल्याचे स्थानिकांनी सांगितले. मात्र, जिल्हा प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांकडून या संदर्भात कमालीची गुप्तता पाळली जात असल्याने येथील स्थानिक ग्रामस्थांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
आंजिवडे गावाचाच भाग असलेल्या वाशी येथे हा प्रकल्प होणार असून यासाठी १४० हेक्टर जमीन संपादित करणार असल्याची प्राथमिक माहिती उपलब्ध झाली आहे. पाटगाव (जि. कोल्हापूर) येथील धरणाचे पाणी खाली आंजिवडे येथे आणून यातून २१०० मेगावॅट क्षमतेची वीजनिर्मिती होणार आहे. १४० हेक्टर क्षेत्रांपैकी ७० हेक्टर क्षेत्रात जलसाठा केला जाणार आहे.येत्या पाच वर्षांत या प्रकल्पाचे काम पूर्ण होणार असून, त्यानंतर प्रत्यक्ष वीजनिर्मितीस सुरुवात होणार आहे. सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठीही या ठिकाणी प्रयत्न होणार असल्याचे समजते. त्यामुळे प्रकल्पाला कोणतीही आडकाठी आलेली नाही. अदानी समूहाने दिल्लीत आपली ताकद वापरून वनखात्याकडून ७०४ हेक्टर जमीनदेखील मिळवली असून, या प्रकल्पाला लागणारी १४० हेक्टर जमीन पूर्णतः संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. महाराष्ट्राच्या एका अग्रगण्य वर्तमान पत्राने सुद्धा याबाबत बातमी प्रसिद्ध केली आहे. मात्र इतकी गोपनियता का पाळली जात आहे? याचे कोडे मात्र कायम आहे.
आंजिवडे येथून पाटगावमार्गे कोल्हापूरला जोडणाऱ्या घाटरस्त्याची अनेक वर्षे मागणी होत आहे. हा रस्ता झाल्यास कोल्हापूर-सिंधुदुर्ग अंतर कमी होणार आहे. फार कमी घाट फोडून हा मार्ग होऊ शकतो; मात्र वनजमिनीच्या प्रश्नामुळे हा घाट रस्ता लोकांची मागणी होऊनही प्रत्यक्षात आला नव्हता; मात्र अदानींच्या या नियोजित प्रकल्पासाठी शेकडो एकर वनजमीन संपादित करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे.
Konkan Railway News: केरळ राज्यातील प्रसिद्ध सबरीमाला उत्सवासाठी येणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या हेतूने कोकण रेल्वे मार्गावर पनवेल ते नागरकोईल दरम्यान एक साप्ताहिक विशेष गाडी चालविण्याचा निर्णय कोकण रेल्वे आणि दक्षिण रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
Train No. 06075 Nagarcoil – Panvel Special (weekly) :
ही गाडी दिनांक २८/११/२०२३ ते १६/०१/२०२३ पर्यंत दर मंगळवारी नागरकोईल या स्थानकावरुन सकाळी ११:४० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २२:२० वाजता पनवेल या स्थानकावर पोहोचेल.
Train No. 06076 Panvel – Nagarcoil Special (weekly) :
ही गाडी दिनांक २९/११/२०२३ ते १७/०१/२०२३ पर्यंत दर बुधवारी पनवेल या स्थानकावरुन रात्री २३:५० वाजता सुटेल व ती तिसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता नागरकोईल या स्थानकावर पोहोचेल.
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपास वर एक अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवरून कणकवलीच्या दिशेने वेगात जाणारी कार ब्रिजवरून थेट महामार्गा वरून खाली कोसळली. या अपघातात रुपेश पांडुरंग तांबे ( ३५, रा. जिल्हा कारवार, कर्नाटक ) हा जखमी झाला असून त्याला उपचारार्थ येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारवार येथून तो कणकवली येथे जात असताना मळगांव हायवे ब्रीज वर हा अपघात घडला.
पनवेल: पनवेल तालुक्यासह कामोठे शहरात आज सकाळी 9 वाजून 50 मिनिटांच्या आसपास सौम्य हादरे होऊन कंप झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी अनेक इमारती हालल्याचं बोललं जात आहे. तसंच घरातील समानदेखील काहीसं हलताना दिसून आल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितलं आहे. भूकंपाच्या 2.9 रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता.
हादरे येण्यापूर्वी एक मोठा आवाज झाला आणि आणि काही सेकंदासाठी कंप झाल्याचं जाणवलं. मात्र हा धक्का सौम्य असल्याने कोणतंही नुकसान झालेलं नाही. अरबी समुद्रात भूकंपाचं केंद्र होतं. दुपारी वेधशाळेने माहिती दिल्यानंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.
मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला होता. काही सेकंदासाठी भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिक घाबरले होते. काहींना हा नक्की भूकंप होता का अशी शंका आल्याने त्यांनी खिडक्याही उघडून पाहिल्या. दरम्यान प्रशासनालाही नेमकं काय झालं होतं याची माहिती मिळवण्यासाठी वेळ लागला. अखेर वेधशाळेने खात्रीशीर माहिती दिल्यानंतर पालिकेने अधिकृतपणे भूकंप आल्याचं जाहीर केलं.
Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर येत्या शुक्रवारी रत्नागिरी ते वैभववाडी रोड या विभागां दरम्यान रेल्वेच्या मालमत्तेच्या देखभालीसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी ०८:३० ते ११:०० या वेळेत हा ब्लॉक असणार आहे. या मेगाब्लॉक मुळे कोंकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या ३ गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
सावंतवाडी :सावंतवाडी रोड स्थानकाला टर्मिनसचा दर्जा देण्यासाठी व नवीन रेल्वे गाड्यांना सावंतवाडी स्थानकात थांबा मिळण्यासाठी पुरेसे माध्यम असताना तसेच या स्थानकावरील अवलंबून प्रवासी वर्गाला, सावंतवाडीतील नागरिकांना, वेंगुर्ले व दोडामार्ग मधील नागरिकांना आणि कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विश्वासात न घेता कोकण रेल्वे प्रशासनाने वारंवार सावंतवाडी टर्मिनस (?) वर जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याने सावंतवाडीवासियांनी एकदिलाने व एकजुटीने वेळीच एकत्र येऊन कोकण रेल्वे प्रशासनाविरोधात लढ्यासाठी चर्चा आणि विचार विनिमय करून कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, व सावंतवाडी रेल्वे टर्मिनस बचाव समिती 2.0 स्थापन करण्यासाठी सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांची सभा रविवार दिनांक २६/११/२०१३ रोजी सकाळी ११.०० वाजता श्री राम वाचन मंदिर सावंतवाडी येथे आयोजित केली असल्याचे सावंतवाडी टर्मिनस प्रेमी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जाहीर केले असून या सभेस सावंतवाडी टर्मिनस प्रेमी व समर्थकांनी उपस्थित राहण्याचे आवाहनही केले आहे.
अलीकडेच कोकण रेल्वेच्या एका बड्या अधिकाऱ्याने सावंतवाडीकरांना रेल्वेच तिकीट परवडत नाही म्हणून खिल्ली उडवली होती तोच प्रत्यय पुन्हा देखील घडला, ही अपमानास्पद वागणूक न कळतपणे सावंतवाडीकरांची आहे.या साठी सनदशीर तसेच कायदेशीर मार्गाने जाण्याची तयारी केली पाहिजे, या संदर्भात तरी या सभेला आपली उपस्थिती प्रार्थनीय असून या सभेस आपली उपस्थिती नोंदवावी असे आवाहन ॲड, श्री संदीप निंबाळकर, श्री अभिमन्यू लोंढे, श्री मिहिर मठकर आणि भूषण बांदिवडेकर यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
Rain Alert : भारतीय हवामान खात्याने येत्या ५ दिवसांचा राज्यातील पावसाचा अंदाज जाहीर केला असून काही विभागांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.
आज दिनांक २४ नोव्हेंबर रोजी कोकणातील सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना तसेच कोल्हापूर,सातारा ,पुणे आणि अहमदनगर या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २५ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कोकणातील सर्व जिल्ह्यासोबत राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मात्र नाशिक विभागातील जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दिनांक २७ आणि २८ नोव्हेंबर रोजी कोकणातील कोणत्याही जिल्ह्याला सावधानतेचा इशारा देण्यात आला नाही आहे. मात्र राज्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.