मुंबई, दि. २६ फेब्रु.: कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून शिमगा सण साजरा केला जातो. चाकरमानी हा चाकरीसाठी महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत जाऊन आपला उदरनिर्वाह करीत असतो. पण शिमगोत्सवानिमित्त चाकरमानी हा आपोआपच गावातील ओढीमुळे गावाकडे जाण्यास तयार होतो पण जाण्यासाठी गाडीचे काय? हे ओळखून पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांनी परेल एस.टी. आगारात जाऊन परळ डौली सुरु करण्याचे पञ परळ येथील वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांची प्रत्यक्षात कार्यालयात भेट घेऊन दिले.
यावेळी वरिष्ठ आगारप्रमुख नितीन चव्हाण म्हणाले गाडी सुरू होईल परंतु प्रवासी कमी मिळतात, पुरेसा भारमान नाही त्याचे काय? त्यावर सुभाष गुजर म्हणाले गाडी सुरू करा पुढच आम्ही बघु प्रवाशांची संख्या आम्ही वाढवण्यास समर्थ आहोत आणि ही गाडी आमच्यासाठी फायदेशिर आहे. सकाळी सहा वाजता गावी जाण्यासाठी गाडीत बसलो तर मुबंईला येण्यासाठी तर सोमवारी कामावर जाण्यासाठीही फायद्याची आहे. हे ऐकुन वरीष्ट आगार प्रमुख नितीन चव्हाण यांनी २२ मार्च पासुन सिमगा सुरू होण्यापुर्वी एस.टी. पुर्व नियोजित आरक्षणासहीत एस.टी. सुरू होणार आहे. याची खात्रीच दिली आहे. त्यामुळेच पालवणी एसटी प्रेमी सुभाष गुजर व सामाजिक कार्यकर्ता गणेश नवगरे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिंधुदुर्ग : बाजारात ओल्या काजूगरांची मागणी खूप आहे आणि चांगला दर सुद्धा आहे. सुरुवातीला तर चक्क 500 रुपये शेकडा एवढा दर ह्या ओल्या काजू गरांना मिळतो. मुंबई पुण्यात तर ओल्या काजूगरांची प्रचंड मागणी असते. पण काजूमधुन गर बाहेर काढण्याची प्रक्रिया खूप कंटाळवाणी आणि वेळखाऊ आहे. डिंक लागून शरीराला इजा पण होते. त्यामुळे चांगला दर मिळत असूनही कोकणातील काजू उत्पादक ओले काजूगर विकण्यास निरुत्साही दिसतो.
यावर उपाय म्हणुन युवा उद्योजक मिथिलेश देसाई आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लांजा येथे ओले काजू बी सोलायच्या मशिनची निर्मिती केली आहे. त्यांचा विश्वास आहे की हे उपकरण काजू उत्पादकांच्या उत्पादन हमखास वाढ घडवून आणेल. हे मशीन ग्राहकांसाठी कोकणातील उद्योजकांसाठी सदैव आघाडीवर असलेल्या अभिनव उद्योग प्रबोधिनी ने कुडाळ येथे उपलब्ध करून दिली आहे.

बुकिंग साठी किंवा अधिक माहितीसाठी 8767473919 या क्रमांकावर Cashew Machine असा व्हॉट्स ॲप मेसेज पाठवावा असे आवाहन अभिनव उद्योग प्रबोधिनी तर्फे करण्यात आले आहे.
रत्नागिरी दि. २४: शिमग्यासाठी कोकणात येणाऱ्यांना राष्ट्रीय महामार्ग विभागाने खुशखबर दिली आहे.कशेडी घाटातील बोगद्याचा एक मार्ग आज शनिवार २४ फेब्रुवारीपासून सुरू झाला असून, मुंबईहून कोकणात येणार्या वाहनांना या मार्गाचा वापर करता येणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी याबाबतची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे. गणेशोत्सव काळात महामार्गावर वाढणारी गर्दी लक्षात घेऊन एका मार्गिकेचा वापर सुरू करण्यात आला होता. गणेशोत्सवाआधीचे काही दिवस कोकणात येणाऱ्या गाड्या या बोगद्यातून आल्या. गणेश विसर्जनानंतर हा बोगदा मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांसाठी खुला करण्यात आला. मात्र काही दिवसाच्या वापरानंतर तो बंद करण्यात आला. आतील फिनिशिंगची काही कामे झालेली नव्हती.
आता एका मार्गिकेचे (एका बोगद्याचे) सर्व काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या गाड्यांसाठी हा बोगदा खुला झाला आहे. शनिवारपासून त्याचा वापरही सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात कार तसेच छोट्या गाड्यांना येथून जाण्याची मुभा आहे. मात्र मोठ्या गाड्याही लवकरच या बोगद्यातून सोडल्या जाणार आहेत. कशेडी बोगदा हा २ किलोमीटर लांबीचा असून, या ठिकाणी ४० किलोमीटर प्रति तास एवढी वेग मर्यादा वाहनांनी पाळणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत मुंबईकडे जाण्यासाठी कशेडी घाटाचाच वापर करावा लागत असला तरी दुसऱ्या बोगद्यातील कामही अंतिम टप्प्यात आले असल्याने मार्चपर्यंत तो बोगदाही सुरू केला जाणार आहे.
मुंबई दि. २४ फेब्रु. : कोकण रेल्वे मार्गावरील मागील अनेक वर्षापासून काम करणाऱ्या सर्व प्रवासी संघटना व संस्था एकत्र येत अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीची स्थापना करण्यात आली.सर्व सलग्न प्रवासी संघटनांच्या मागण्या एकत्र करून त्याच्या मागण्या कोकण रेल्वेकडे करण्यात आली. त्यात प्रामूख्याने
१) कोकण रेल्वेचे खाजगीकरण न करता त्याचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण करून दुहेरीकरण करण करावे.
२) सावंतवाडी स्टेशनला सुसज्ज टर्मिनस बनवून त्याला कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा.मधू दंडवते साहेब यांचे नाव देण्यात यावे.
३) पश्चिम रेल्वेवरुन कोकण रेल्वेमार्गावर नेहमीसाठी वसई सावंतवाडी पॅसेंजर किंवा मधू दंडवते एक्सप्रेस व मध्य रेल्वेवरून कल्याण सावंतवाडी पॅसेंजर तसेच दादर-चिपळूण मेमू व मुंबई-रत्नागिरी इंटरसिटी एक्सप्रेस तर रोहा ते मडगाव दरम्यान दिवसाच्या वेळेत मेमू रेल्वे सुरू करावी.
४) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेस व ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजर दादर किंवा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातून सुरू करून सकाळी ६.३० ते ७ च्या दरम्यान पुर्वीची १०१०१ / १०१०२ रत्नागिरी मडगाव एक्सप्रेस सुरू करावी.
५) कोकण रेल्वेचे बेलापूर येथील भाडयाच्या जागेत असलेले मुख्यालय कोकण रेल्वेच्या हद्दीत स्वतःच्या जागेत स्थलांतरित करावे.
६) कोकणातील प्रत्येक रेल्वे स्टेशनचा आरक्षण कोटा वाढवावा.
७) दिघी – रोहा – चिंचवड, गुहागर – चिपळूण – कराड व विजयदुर्ग – वैभववाडी – कोल्हापूर रेल्वे मार्ग लवकरात लवकर पूर्ण करावेत.
८) भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देऊन स्टेशनवरील सर्व स्टॉल व कॅटरिंग त्यांनाच मिळावेत.
९) कोकण रेल्वेच्या प्रत्येक स्टेशनवर पूर्ण उंचीचा फलाट, संपूर्ण शेड, पिण्याचे पाणी व चांगले शौचालय याची व्यवस्था करावी.
१०) रेल्वेने पुर्वीच्या ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या सर्व सवलती व सेवासुविधा पूर्ववत कराव्यात. कोकण रेल्वेचे संकेतस्थळ मराठी, कोंकणी व कन्नड या स्थानिक भाषांतही उलपब्ध करून द्यावे.
११) मध्य रेल्वेवरून कोकण रेल्वेमार्गावर जाणाऱ्या सर्व एक्सप्रेसना (Up & Down) दिवा जंक्शन येथे थांबे मिळावेत.
१२) ११००३ / ११००४ तुतारी एक्सप्रेस, १२१३३ / १२१३४ मुंबई मंगळुरु सुपरफास्ट एक्सप्रेस, १२६१९ / १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेस २४ आयसीएफ किंवा २२ एलएचबी डब्यांनी तर १२०५१ / १२०५२ जनशताब्दी एक्सप्रेस, २२११९ / २२१२० तेजस एक्सप्रेस, १०१०५ / १०१०६ सिंधुदुर्ग एक्सप्रेस, ५०१०४ / ५०१०३ रत्नागिरी फास्ट पॅसेंजर आवश्यकत त्या पायाभूत सुविधा उभारून २२ एलएचबी डब्यांनी चालवाव्यात. २२२२९ / २२२३० वंदे भारत एक्सप्रेस १६ डब्यांची करावी.
१३) १०१०५ / १०१०६ सावंतवाडी दिवा एक्सप्रेसला पेण, नागोठणे व पुढे रोहा ते रत्नागिरी दरम्यान सर्व ठिकाणी कोरोनापूर्वी असणारे थांबे पूर्ववत करावेत.अंजनी रेल्वे स्टेशन येथे ओव्हर ब्रीज किंवा भूयारी मार्ग बनवावा.
१४) वीर, संगमेश्वर रोड, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, सिंधुदुर्ग, सावंतवाडी रोड आणि पेडणे येथे पूर्णवेळ PRS सुविधा मिळावी.
१५) कोरोना काळात ZBTT अंतर्गत काढलेले थांबे पूर्ववत करणे.
१६) कोकण रेल्वे मार्गावर अमृत भारत स्थानक योजना आणि One Station One Product योजना लागू करणे.
१७) सागरमाला अंतर्गत सावंतवाडी ते रेडी बंदर रेल्वे मार्ग मंजूर, तसेच २०१८ साली सावंतवाडी ते बेळगाव रेल्वे मार्गाचा फिसिबीलिटी रिपोर्ट तयार त्याला चालना देणे.
१८) Tourist / toy Train – कोकणातील पर्यटनासाठी टॉय ट्रेन १) सिंधुदुर्ग जिल्हा : कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड,मालवण व वेंगुर्ला. २) रत्नागिरी जिल्हा : राजापूर जैतापूर, पावस, जयगड, खेड,दापोली,गुहागर. ३) रायगड जिल्हा: पेण, अलिबाग, मुरुड, दिघी, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, महाड, रायगड.
१९) पुणे कर्जत करून पनवेलला जाणाऱ्या सर्व रेल्वे कल्याण पनवेल मार्गे कोकण रेल्वे मार्गावर चालवाव्यात.
२०) रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत माणगाव,विर,खेड,चिपळूण,संगमेश्वर रोड,विलवडे,राजापूर रोड,वैभववाडी रोड,कणकवली,कुडाळ व सावंतवाडी येथे वाढीव मिळावेत.
२१) सर्व सुपरफास्ट एक्सप्रेस हजरत निजामुद्दीन,गोवा संपर्कक्रांती,जामनगर तिरूनेवल्ली,गांधीधाम तिरुनेवल्ली, एटीटी कोचिवल्ली,केरळा संपर्कक्रांती,पोरबंदर कोचिवल्ली, एर्नाकुलम दुरांतो ह्या फक्त चिपळूण किंवा रत्नागिरी करून मडगावला जातात त्या मिरज मार्गे वळवाव्यात किंवा महाराष्ट्रात कोंकण रेल्वे मार्गावर जास्तीचे थांबे द्यावेत.
२२) रत्नागिरी येथील पिट लाईन जुनी झाल्यामुळे नव्याने बांधण्यासाठी तात्पुरती बंद करण्यात आली होती. परंतु अद्याप त्याचे काम सुरु करण्यात आलेले नाही. लवकरात लवकर पिटलाईनचे काम पूर्ण करून रत्नागिरी येथून मुंबई व सावंतवाडी/मडगाव/कारवारच्या दिशेने वाढीव गाड्या सुरु कराव्यात.
अशा अनेक महत्वाच्या मागण्या समितीने रेल्वेराज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे मागण्या केल्या असून त्याची अमंलबजावणी लवकरात लवकर करावी असेही सुचवण्यात आले आहे.











