खळबळजनक | दापोलीतून अजून एक महिला बेपत्ता

दापोली : दापोली तालुक्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण ताजे असताना अजून असेच एक प्रकरण समोर आले आहे.
आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास आकांक्षा आनंद बेनेरे( रा. राममंदिर, मुर्डी ) या मुलगी नेहा हिला आंगणवाडित सोडून आंजर्ले येथे कामावर जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान तिच्या घरच्यांनी तिच्या कामावर, गावात तसेच नातेवाइकाकडे शोध घेतला. ती मिळून न आल्याने पती आनंद यांनी रविवारी आकांक्षा हि बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल श्री. मोहिते करीत आहेत.

Loading

Facebook Comments Box

बेकायदा जमाव व महामार्ग रोखल्याप्रकरणी शिवसेनेच्या २७ कार्यकत्यांवर गुन्हे दाखल; विडिओ येथे पहा

चिपळूण : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणातील रखडल्या प्रकरणी  शिवसेना (ठाकरे गट) कार्यकर्त्यांनी कोंडमळा येथे महामार्ग रोखत शुकवारी आंदोलन केले होते. याप्रकरणी बेकायदा जमाव केला व महामार्ग रोखल्याचा ठपका ठेवत तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्यासह २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महामार्गावरील कोंडमळा येथे भुयारी मार्ग बंद असल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. शिवाय शेतकरी, जनावरे, विद्यार्थी, तसेच बाजारपेठ व रेशन दुकानावर ये-जा करताना महामार्गाचा अडथळा निर्माण होत आहे. येथे वारंवार अपघाताच्या घटना घडल्या आहेत; तसेच सावर्डे, असुर्डे, वहाळफाटा आदी ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि वाहनचालकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
या प्रश्नी राष्ट्रीय महामार्ग (Mumbai-Goa National Highway) विभागाकडे, तसेच ठेकेदार कंपनीकडे वारंवार तक्रारी केल्या, मात्र पाठपुरावा करूनही दाद घेतली गेली नाही. त्यामुळे याबाबात शिवसेना (ठाकरे गट) तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी कोंडमळा येथे महामार्ग रोखत ठेकेदार कंपनीविरोधात जोरदार घोषणा केली.
याप्रकरणी बेकायदेशीर जमाव करून महामार्ग अडवून येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण केल्याप्रकरणी तालुकाप्रमुख सावंत यांच्यासह अन्य २७ कार्यकर्त्यांवर सावर्डे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद विनोद सहदेव आंबेरकर यांनी पोलिस ठाण्यात दिली होती. संदीप शिवराम सावंत (वय ५१), प्रीतम नंदकुमार वंजारी (३२), सागर सुशील सावंत (५६), साहिल संजय शिर्के (२३), संदीप सीताराम राणे (४२), शैलेश पांडुरंग कांबळी (३८), प्रशांत संजय सावंत (२९) या सात जणांसह अन्य २० कार्यकर्त्यांचा समावेश आहे.

Loading

Facebook Comments Box

Amrit Bharat Station Scheme | महाराष्ट्र राज्याच्या ‘या’ ४४ स्थानकांचा समावेश

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एकाच वेळी देशातील 508 रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकास प्रकल्पांचे  भूमीपूजन करणार आहे. दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. पुनर्विकास करण्यात येणाऱ्या देशभरातील 508 स्थानकांमध्ये महाराष्ट्रातील 44 स्थानकांचा समावेश आहे. त्यात मुंबईतील 15 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. रेल्वे स्थानक पुनर्विकासात महाराष्ट्रातील एकूण 123 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. त्यापैकी 44 स्थानकांच्या प्रकल्पाची पायाभरणी आज होणार आहे.
देशभरातील 1309 स्थानकांच्या पुनर्विकासाकरता अमृत भारत स्थानक योजना (Amrit Bharat Station Scheme) ही पंतप्रधानांच्या दृष्टीकोनावर आधारित असलेली योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचा भाग म्हणून पंतप्रधान 508 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास प्रकल्पांची पायाभरणी करणार आहेत. 24,470 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाने या रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे.  शहराच्या दोन्ही बाजूंपासून योग्य अंतरावरील ‘सिटी सेंटर्स’ म्हणून या स्थानकांचा विकास करण्यासाठी एक बृहद आराखडा तयार करण्यात येत आहे. शहराच्या एकंदर नागरी विकासाच्या समग्र दृष्टीकोनाच्या आधारे या रेल्वे स्थानकांच्या विकासाबाबत एकात्मिकतेवर भर दिला जात आहे.
रेल्वे स्थानक पुनर्विकासात काय होणार?
रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्टेशन योजनेतून देशातील 508 रेल्वेस्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेअंतर्गत विविध अद्ययावत सोयी सुविधा प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत. स्थानक प्रबंधक ऑफिस, पार्सल ऑफिस, हेल्थ ऑफिस, टीसी ऑफिस, एमसीओ ऑफिस यांचे पूर्णपणे नूतनीकरण केले जाणार आहे. नवीन कोच डिस्प्ले बोर्ड बसवण्यात येणार आहे. विकास कामांमध्ये स्थानकाच्या दर्शनी भागाचा विकास, लँडस्केपिंग, मॉडल टॉयलेट, प्लॅटफॉर्म सरफेस केबल ट्रेज, अत्याधुनिक फर्निचर भरपूर प्रकाश योजनेसाठी एलईडी, नाम फलक, पार्किंग व्यवस्था, प्रतिक्षागृह, स्वच्छतागृह, नवीन फूटओवर ब्रीज, दोन्ही प्लॅटफॉर्मवर लिफ्ट व्यवस्था, नवीन कोच डिस्प्ले, सीसीटीव्ही कॅमेरे आदींचा समावेश असणार आहे.

Loading

Facebook Comments Box

रेल्वेने आणि राजकारण्यांनी ‘वाऱ्यावर’ सोडलेले सावंतवाडी (टर्मिनस?)

सावंतवाडी | सागर तळवडेकर : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची गेल्याच आठवडय़ात दिल्लीत भेट घेत कोकण रेल्वे संदर्भातील मागण्यांबाबत चर्चा केल्यानंतर नांदगाव रेल्वे स्थानकावर तुतारी एक्सप्रेसला थांबा देण्यात आला आहे. अवघ्या 24 तासांत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंजुरी दिली आहे. दरम्यान, गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्नासह स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळावा म्हणून आवाज उठवणाऱ्या सावंतवाडीकरांच्या मागण्यांच काय झालं ? हा प्रश्न तसाच आहे. की सावंतवाडीकरांना कुणी वाली उरलं नाही ? असा सवाल उपस्थित होत आहे.

पर्यटन जिल्हा सिंधुदुर्गसह महाराष्ट्राच शेवटच रेल्वे स्थानक हे सावंतवाडी आहे. परंतु सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचं रखडलेलं काम पूर्णत्वास यावं तसंच मोजक्याच गाड्यांना थांबा असल्यानं अधिकच्या रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा‌. या प्रवासी संघटनांच्या मागण्यांना रेल्वे प्रशासनकडून आजवर केवळ केराची टोपलीच दाखवली गेली आहे. सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असूनही उत्पन्नाच्या बाबतीत अग्र क्रमांकावर आहे. मात्र, तरीही केवळ ९ रेल्वे गाड्यांना इथे थांबा दिला गेलाय. तर सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच फेज-वन च काम होऊन फेज-टू चं काम अद्याप पूर्ण झालेल नाही आहे. ते कधी पूर्णत्वास येईल याबाबत अवाक्षरही कुणी काढत नाही. टर्मिनस तर लांबची गोष्ट रेल्वे गाड्यांना थांबे सुद्धा मिळत नाहीत. रेल्वेनं ये-जा करायला सावंतवाडीकरांना कुडाळवारी करावी लागत आहे. शहरातील नागरिकांना नाहक अर्धा तास यासाठी बायरोड प्रवासात घालवावा लागत आहे. तालुक्यातील इतर गावांतील प्रवाशांबद्दल न बोलेल चांगलं. जर स्वतःची चारचाकी किंवा दुचाकी असेल तर ठीक अन्यथा सरकारी वाहनांचा विचार केला तर प्रवाशांचे होणारे हाल ? ‘अतिथी देवो भव’ म्हणून पाहुण्या चाकरमान्यांना स्थानकापर्यंत सोडायला जाणाऱ्या तासनतास स्थानकावर बसून राहणाऱ्या कोकणीमाणसाचा विचार आमचे लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार दीपक केसरकर, खासदार विनायक राऊत, पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रीय मंत्री नारायण राणे कधी करणार ? हा एक यक्षप्रश्न बनून राहिला आहे.

कोंकण रेल्वे प्रशासनाला इथल्या स्थानिक जनतेबद्दल, चाकरमानी, तसेच प्रवाशांबद्दल आस्था आहे का ? सावंतवाडी स्थानक हे शहराबाहेर असून ही या स्थानकाचे उत्पन्न हे १३.४ करोड व प्रवासी संख्या ही ३.५ लाख एवढी आहे. उत्पन्नाच्या बाबतीत १० व्या क्रमांकावर असताना येथे ५ दैनिक व ४ साप्ताहिक अशा एकूण ९ रेल्वे गाड्या थांबतात. सावंतवाडी स्थानकावर असा अन्याय का ? उत्पन्न , प्रवासी संख्या असून ही कमी थांबे का ? वारंवार सावंतवाडीवर हा अन्याय कशासाठी? की सावंतवाडीकरांना कुणी वाली राहीलेला नाही ?

Loading

Facebook Comments Box

मंगळवारी कोकण रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; ‘या’ गाड्यांवर परिणाम

संगमेश्वर : कोकण रेल्वे मार्गावर संगमेश्वर ते रत्नागिरी सेक्शन(रत्नागिरी स्थानक वगळून) दरम्यान मार्गाच्या देखभाल दुरुस्तीसाठी मंगळवार दि. ८ ऑगस्ट २०२३ रोजी सकाळी ७.३० ते १०.३० असा तीन तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ‘मेगा ब्लॉकच्या कालावधीत या मार्गावरुन धावणाऱ्या दोन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

1) तिरुनेलवेली- जामनगर (१९५७७) या दि. ७ ऑगस्ट रोजी प्रवास सुरु होणाऱ्या एक्स्प्रेसला ठोकूर ते रत्नागिरी दरम्यान सुमारे अडीच तास रोखून ठेवले जाणार आहे.

2) तिरुअनंतपुरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस दरम्यान धावणारी नेत्रावती एक्स्प्रेस (१६३४६) ही ठोकूर ते रत्नागिरी स्थानकादरम्यान १ तास थांबवून ठेवली जाणार आहे.

Loading

Facebook Comments Box

देवा! चाकरमान्यांच्या मार्गातील ‘विघ्ने’ संपणार तरी कधी?

संपादकीय : एकीकडे फुल्ल झालेले रेल्वे आरक्षण तर दुसरीकडे मुंबई गोवा महामार्गाची झालेली दयनीय स्थिती यामुळे यंदा गणेशचतुर्थी सणाला गावी जाणाऱ्या चाकरमान्यांची चिंता वाढली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्याला मोठी कसरत करून गाव गाठावे लागणार हे उघड झाले आहे. हंगामात कोकणात गावी जाणे हे एक त्याच्यासाठी प्रकारचे दिव्यच झाले आहे.

कोकणात जाण्यासाठी दोन महत्त्वाचे पर्याय उपलब्ध आहेत. एक म्हणजे रेल्वे आणि दुसरा म्हणजे मुंबई गोवा महामार्ग. रेल्वेच्या बाबतीत बोलायचे झाले तर मध्य आणि पश्चिम रेल्वे मिळून कोकण रेल्वे मार्गावर सुमारे 300 विशेष फेर्‍या चालविणार आहे. अगदी शेवटी घोषित झालेल्या गाड्यांचे आरक्षण पाहिल्या 1/2 मिनिटांत फुल्ल झाले असल्याने आजून किती प्रवाशांना तिकीटे भेटली नसतील याचा अंदाज येतो. रेल्वे या मार्गावर अजून अतिरिक्त गाड्या चालवू शकणार नाही. कारण कोकण रेल्वे अजून ‘डबल ट्रॅक’ वर आणली गेली नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे या मार्गावर सोडण्यात आलेल्या 300 गाड्यांमुळे येथील यंत्रणेवर मोठा ताण येणार आहे. सर्व गाड्यांचे वेळापत्रक बिघडून उशिरा धावणार आहेत. याचा मोठा त्रास प्रवाशांना होणार आहे.

कोकणात जाण्याचा दुसरा पर्याय आहे मुंबई गोवा महामार्ग. गेली 14 वर्षे रखडलेला मुंबई गोवा महामार्गा अजूनही पूर्णत्वाच्या प्रतिक्षेत आहे. अनेक ठिकाणी जीवघेणे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा खोळंबा Traffic तर होणारच पण अपघात होण्याच्या शक्यता आहेत. अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याचा धोका आहे. सर्व परिस्थिती वरून यंदाही चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार यात काही शंका नाही.

कोकण रेल्वे मार्ग फक्त कोकणासाठी मर्यादीत नाही आहे तर दक्षिणेकडील राज्यांतील गाड्या पण याच मार्गावरून जातात. पावसाळ्यातील एक दोन महिने सोडले तर या मार्गावरील गाड्यांचे आरक्षण मिळवणे तर एक प्रकारचे दिव्यच झाले आहे. जनरल आणि स्लीपर डब्यांची स्थिती मुंबईच्या लोकल डब्यांच्या गर्दी सारखी होत आहे.एवढी बिकट परिस्थिती असताना येथे गेली कोकण रेल्वे चालू झाल्यानंतर गेली 25 वर्षे डबल ट्रॅक साठी का प्रयत्न केले जात नाही आहेत हा एक मोठा प्रश्न आहे.

राजकिय इच्छाशक्तीचा अभाव 

कोकणरेल्वेचे शिल्पकार मा. मधु दंडवते आणि मा. जॉर्ज फर्नाडिस यांनी कोकण रेल्वे साकारताना दाखवलेल्या इच्छाशक्तिचा अभाव आज प्रकर्षाने जाणवत असल्याचे दिसत आहे. मुंबई गोवा महामार्ग चौदा वर्षातही पूर्ण होत नाही, कोकण रेल्वे २५ वर्षानंतरही सिंगल ट्रॅक वर आहे हे कोकणातील नेत्यांचे खूप मोठे अपयश आहे. मोठे प्रकल्प नको तर आधी आम्हाला या मूलभूत सुविधा उपलब्ध तरी करून द्या असे आकांताने कोकणवासी सांगत आहे. पण त्याची हाक ऐकणारा कोणी दिसत नाही आहे.

 

 

 

 

Loading

Facebook Comments Box

सावध रहा | IRCTC च्या बनावट मोबाइल अॅपद्वारे होत आहेत फसवणुकीचे प्रकार

IRCTC Fake App : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आपल्या सर्व वापरकर्त्यांना बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइटबद्दल चेतावणी दिली आहे. बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइट मूळ आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटशी जवळून साम्य दाखवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना या दोघांमधील फरक ओळखणे कठीण होते. प्रवाशांकडून संवेदनशील माहिती चोरून त्याचा दुरुपयोग करायचा स्कॅमर्सचा हेतू असून प्रवाशांनी हे अॅप आणि वेबसाईट वापरू नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
बनावट IRCTC अॅप ‘irctcconnect.apk’ नावाचे आहे आणि ते WhatsApp आणि Telegram सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित केले जात आहे. स्कॅमर बनावट वेबसाइट किंवा बनावट अँप्लिकेशन च्या एपीके फाइलच्या लिंकसह संदेश पाठवत आहेत की IRCTC वरून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी हीच खरी वेबसाइट किंवा अॅप आहे.
फसवणूक करणारे खोटे अँप्लिकेशन आणि वेबसाइट वापरून संवेदनशील नेट बँकिंग माहिती मिळवत आहेत, ज्यात UPI तपशील आणि संशयास्पद पीडितांकडून क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती समाविष्ट आहे. IRCTC ने आपल्या वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट देऊ नका. प्रवाशांनी Google Play Store किंवा Apple App Store वरील IRCTC चे अधिकृत Rail Connect Mobile Apps वापरावेत आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://irctc.co.in या वेबसाईटवरच आपले तिकीट आरक्षण करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

Loading

Facebook Comments Box

हातखंबा येथे डंपर आणि ट्रक मध्ये अपघात; १ जण जखमी

रत्नागिरी: हातखंबा येथे डंपरने ट्रकला धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे .हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने (क्रमांक-MH10CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला. डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading

Facebook Comments Box

मुंबई गोवा महामार्ग दुरुस्तीकरिता सिमेंट बेस ट्रीटमेंट पद्धतीचा वापर – सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

Mumbai Goa Highway :सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज सकाळी महामार्गाच्या परिस्थितीची पहाणी केली आहे. या पाहणी दरम्यान त्यांनी  दुरुस्ती आणि काँक्रिटीकरणाचाही आढावा घेतला.
मुंबई गोवा महामार्गाचे काम गेल्या १३ वर्षांपासून रखडले आहे. अनेक प्रयत्न करूनही रस्त्याचे काम मार्गी लागताना दिसत नाही. अशातच गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. रस्त्याला ठिकठिकाणी भरमसाठ खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालक आणि कोकणातील प्रवाशांचे हाल होत आहेत. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी महामार्गाची पाहणी केली. रस्ते दुरस्तीसाठी सिमेंट बेस ट्रीटमेंट पद्धतीचा वापर केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी इंदोर येथून यंत्र सामुग्री आणण्यात आली असून आणखीन काही यंत्र दोन दिवसांत दाखल होणार आहेत. या पद्धतीमुळे पावसातही रस्ता दुरुती करणे शक्य होणार आहे. कुठल्याही परिस्थितीत गणेशोत्सवापूर्वी रस्त्याच्या एका मार्गिकेचे काम पूर्ण केले जाईल आणि डिसेंबर अखेरपर्यंत दोन्ही मर्गिककेचे काम पूर्ण होईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

Loading

Facebook Comments Box

“बारसू रिफायनरी विरोधी आंदोलनासाठी बेंगळुरूतून फंडिंग…..” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Mumbai : रत्नागिरीतील बारसू येथील रिफायनरी प्रकल्पावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर एक गंभीर आरोप केला आहे. बारसू आंदोलनासाठी बेंगळुरूतून फंडिग झाल्याचा आरोप फडणवीसांनी केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शुक्रवारी पावसाळी अधिवेशनात बारसू आंदोलनाविषयी निवेदन सादर केले. यादरम्यान, त्यांनी बारसू प्रकल्प विरोधी आंदोलनासाठी बेंगळुरूतून पैसा मिळाला आहे असा गंभीर आरोप फडणवीस यांनी विधानभवनात केला आहे. बारसू आंदोलनात तेच तेच लोक प्रत्येक आंदोलनात कसे दिसतात? असा सवाल देखील फडणवीस यांनी उपस्थित केला.
” ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं…”
बारसू (Barsu)रिफानरीला विरोध म्हणून विरोधकांनी केलेल्या आंदोलनावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “काही लोक ज्यांना या देशाचा विकास नको आहे, तिचं माणसं आपल्याला आरेच्या आंदोलनात, बुलेट ट्रेनच्या आंदोलनात, तीच माणसं बारसूच्या आंदोलनात आणि यातील काही माणसं नर्मदेच्या आंदोलनात देखील होती असेही फडणवीस म्हणाले.
“माझा सवाल आहे की, आपण जर यांचा रेकॉर्ड ट्रेस केला तर वारंवार ही माणसं बंगळुरुला जातात. यांच्या अकाऊंटमध्ये तिथून पैसे येतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे ग्रीनपीस ज्या संघटना आहे त्यावर आपल्याकडं बंदी घातलेली आहे. त्याचे जे माजी सदस्य आहेत. त्यांच्या संपर्कात हे लोक असतात. त्यामुळं हे फक्त गावकऱ्यांपुरतं मर्यादित नाही असा गंभीर आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
बारसू आंदोलकांवरील लाठीचार्जचा आरोप फेटाळला…
पोलिसांनी बारसू आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. यावर बोलताना फडणवीस म्हणाले, “बारसू आंदोलनात ताब्यात घेतलेल्या नागरिकांना पोलिसांच्याच गाडीत बसवून त्यांच्या घरी सोडण्यात आलं. कोर्टात गेल्यानंतर कुठल्याही तक्रारदारानं मारहाण केल्याची आणि चुकीची वागणूक दिल्याची तक्रार केलेली नाही. त्यामुळं यावर होणारे आरोप योग्य नाहीत” असेही फडणवीस यांनी सांगितले.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search