मुंबई: मध्य रेल्वेवरुन प्रवास करणाऱ्यां प्रवाशां साठी एक महत्त्वाची बातमी आहे. दिनांक 5 ऑक्टोबरपासून मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे. नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी)वरून अप आणि डाऊन 20 जलद लोकल फेऱ्या दादरवरून धावणार आहेत. सीएसएमटी, दादर स्थानकातील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी सीएसएमटीवरील 20 अप आणि डाऊन लोकल दादरवरून धावतील.
मध्य रेल्वेवरील लोकलमध्ये प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे गर्दीचा भार सर्व लोकल फेऱ्यांवर पडत आहे. परिणामी दररोज अत्यंत गर्दीतून धक्के खात प्रवास करावा लागतो. लोकलमध्ये बसण्यास जागा मिळावी यासाठी दादर, भायखळ्यावरून सीएसएमटी गाठून प्रवासी पुन्हा कल्याण दिशेकडील प्रवास करतात. या प्रवाशांचा विचार करुन आता दादरवरुन जलद लोकल सोडण्यात येणार आहेत.
सीएसएमटीवरून 254 जलद लोकल धावतात. त्यातील अनेक लोकल पुरेसे फलाट नसल्याने उशीरा धावतात. तसेच सिग्नलमुळे सीएसएमटी-दादर दरम्यान अनेक लोकल बराचवेळ उभ्या असतात. या समस्येचे निराकरण करण्यासाठी 20 जलद लोकल सीएसएमटीऐवजी दादरवरून धावणार आहेत. त्यामुळे लोकलचा वक्तशीरपणा सुधारण्यास हातभार लागेल. तसेच दादर येथील गर्दी विभाजित करण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला.
पालघर दि. ३० सप्टें. २०२४: पालघर जिल्ह्यातील शिरगाव हा ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आला आहे. या किल्ल्याच्या जतन व संवर्धन कामाचे आज सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते व्हर्च्युअल पद्धतीने भूमिपूजन करण्यात आले.
यासाठी सरकारच्या वतीने सुमारे ७ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. तसेच जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून देखील निधी मंजूर करण्यात आला आहे. हे काम पूर्णतः सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे PWD करण्यात करण्यात येत आहे. याप्रसंगी पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, माजी खासदार राजेंद्र गावित, जिल्हाधिकारी गोविंद बोडके, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने, भानुदास पालवे, कुंदन संख्ये आदी मान्यवर उपस्थित होते.
शिरगाव किल्ला पालघर तालुक्यातील समुद्रकाठच्या बाजूला स्थित आहे.या किल्ल्याचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराज यांनी अरबी समुद्रातुन येणाऱ्या शत्रुवरती लक्ष ठेवण्यासाठी केला होता. या प्राचीन किल्ल्याचे आता अवशेष शिल्लक आहेत. मराठ्यांच्या आधी पोर्तुगीजांचे या किल्ल्यावरती वर्चस्व होते.१८१८ मध्ये ब्रिटिशांनी मराठ्यांकडून हा किल्ला मिळविला . हा किल्ला २०० फूट उंच आणि १५० फूट हून अधिक लांबीचा आहे. पोर्तुगीजांनी हा किल्ला नूतनीकरण करून आणि त्याच्या क्षेत्रात वाढ करत असतांना मूळ वीट आणि लाल दगड बांधकाम अखंड ठेवले आहे . या किल्ल्याच्या उत्तर पश्चिम भागात पाच पाय तोफ युद्ध इतिहास चिन्हांकित आहे .स्वच्छता आणि देखण्या भोवतालचा परिसरामुळे नियमित पर्यटक व्यतिरिक्त इतिहासकारांना हा किल्ला नेहमीच आकर्षित करत आला आहे.सर्वात रोमांचक म्हणजे पाम वृक्षाचे झाड आहे ज्याला सहा ते सात शाखा आहेत . एक दुर्मिळता अशी आहे कि शिरगाव किल्ला तटबंदीचा आहे आणि भिंती चांगल्या स्थितीत आहेत. आता हा किल्ला ऐतिहासिक किल्ला राज्य संरक्षक स्मारक म्हणून घोषित करण्यात आल्याने त्याचे जतन करण्यात येणार आहे.
गोवा वार्ता: कुरिअरद्वारे गोव्यातून विदेशी दारु मागवणाऱ्या दोन व्यावसायिकांना बिहार पोलिसांनी अटक केली आहे. मुझफ्फरपूर जिल्ह्यातील शेरपूर येथे हा प्रकार उघडकीस आला. कुरिअर करण्यात आलेली दारु स्कॉर्पिओमधून घेऊन जाण्यासाठी व्यावसायिक आले असता पोलिसांनी ही कारवाई ही केली.
एका प्रसिद्ध हिंदी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, शेरपूर येथील कुरिअर कंपनीच्या ऑपरेटरच्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. विजय कुमार आणि अरविंद कुमार (रा. महेशपूर) अशी अटक करण्यात आलेल्या व्यावसायिकांची नावे आहेत.पोलिसांनी व्यावसायिकांकडून पाटणा क्रमांकाची स्कॉर्पिओ जप्त केली आहे. चौकशीनंतर संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.इन्स्पेक्टर ब्यूटी कुमारी यांना एक्सप्रेस सीड कुरिअर कंपनीचा संचालक विशाल प्रताप यांनी याबाबत फोन करुन माहिती दिली. एका अज्ञात कुरिअर कंपनीने शेरपूर येथील कुरिअर कार्यालयात तीन मोठ्या कार्टनमध्ये पॅक केलेली वस्तू आल्याचे त्यांनी सांगितले..
पार्सल घेण्यासाठी दोनजण स्कॉर्पिओमध्ये आले आहेत. संशय आल्याने त्याने दोघांनाही कार्यालयात बसवल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल होत चौकशी केली असता त्यांना गोवा बनावटीची विदेशी दारू आढळून आली.पोलिसांनी एकूण 86 लिटर विदेशी दारू जप्त करत दोघांना अटक केली. चौकशीत दोघांनी कुरिअरद्वारे विदेशी दारू मागवल्याचे कबुल केले.
Konkan Railway: कोकण रेल्वेचे शिल्पकार प्राध्यापक मधु दंडवते यांची तैलचित्रे कोकण रेल्वेच्या महत्वाच्या स्थानकांवर लावण्यास सुरवात झाली आहेत. राजापूर, संगमेश्वर आणि चिपळूण रेल्वे स्थानकांवर तैलचित्रे लावण्यात आली आहेत. तसेच अजुन काही महत्वाच्या स्थानकांवरही तैलचित्रे लवकरच लागण्याची शक्यता आहे.
प्राध्यापक मधु दंडवते यांचे कोकण रेल्वे अस्तित्त्वात आणण्यासाठी दिलेले योगदान पाहता त्यांचा मरणोत्तर सन्मान होणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांची तैलचित्रे कोकण रेल्वेच्या काही महत्वाच्या स्थानकांवर लावण्यात यावीत अशी मागणी प्रवासी संघटनांनी केली होती. कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघ, ठाणे या संघटनेनेही त्यांची तैलचित्रे खेड, चिपळूण, संगमेश्वर, विलवडे, राजापूर आणि वैभववाडी या स्थानकांवर लावण्यात यावीत यासाठी निवेदन दिले होते. या मागण्यांना रेल्वे प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून ही तैलचित्रे कोकण रेल्वेच्या स्थानकांवर लावण्यास सुरवात केली आहे. रेल्वेच्या या उपक्रमाचे प्रवासी संघटनांनी कौतुक केले असून त्यांच्याकडून समाधान व्यक्त होत आहे.
तैलचित्रे लागलीत पण सावंतवाडी स्थानकाच्या नामकरणाचे काय?
प्राध्यापक मधु दंडवते यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी सावंतवाडी रेल्वे स्थानकाचे नामकरण ‘लोकनेते मधु दंडवते टर्मिनस’ LMDTअसे करण्यात यावे यासाठी प्रवासी संघटनांनी निवेदने दिली होती. मात्र एखाद्या रेल्वे स्थानकाचे नामांतर करावयाचे झाल्यास त्या राज्यातील शासनाने रेल्वे विभागाला तशी शिफारस करणे आवश्यक असल्याचे रेल्वेकडून उत्तर आले होते. त्यानुसार कोकण विकास समितीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिनांक ०३ जून २०२४ रोजी निवेदन सादर करून शासनातर्फे तशी शिफारस करण्याची विनंती केली होती. सरकारतर्फे या निवेदनाची दखल घेतली गेली आहे. दिनांक २७ जून रोजी राज्य गृह (परिवहन) विभागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना या नामकरणाबाबत लिखित स्वरूपात त्यांचे अभिप्राय सादर करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र या मागणीचे पुढे काय झाले ते गुलदस्त्यातच आहे.
रत्नागिरी, दि. २९ सप्टें: गणपतीपुळे येथे समुद्रात आज रविवारी (दि.29) सायंकाळी 5.15 च्या सुमारास जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टवरील तीन कर्मचार्यांपैकी दोघांचा बुडून मृत्यू झाला. तर एकाला वाचवण्यात जीव रक्षकांना यश आले. प्रदीप कुमार (30,मुळ रा.ओडीसा) आणि महंमद युसूफ (29,मुळ रा.उत्तराखंड) अशी बुडून मृत्यू झालेल्या तरूणांची नावे आहेत. तर डाकुआ टुकुना (30,रा.वेस्ट बंगाल) याला वाचवण्यात यश आले.
याबाबात सविस्तर वृत्त असे कि जेएसडब्ल्यू कंपनीच्या पोर्टचे तीन कर्मचारी रविवारी गणपतीपुळे येथे फिरायला आले होेते. ते समुद्रात आंघोळ करण्यासाठी गेले असताना हे तिघेही लाटेबरोबर पाण्यात ओढले गेले. त्यांनी आरडोओरडा करण्यास सुरुवात केली. त्यांचा आवाज ऐकून समुद्रकिनारी असलेले जीवरक्षक अनिकेत राजवाडकर आणि सुलभ चालक निखिल सुर्वे यांनी समुद्रात उड्या घेत तिघांनाही समुद्रकिनारी आणले परंतु, यातील दोघांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच जयगड पोलिसानी घटनास्थळी धाव घेत तिघांनाही मालगुंड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले मात्र या तिघांपैकी दोघांचा या दरम्यान मृत्यू झाला.
Wild Dog in Konkan: लांजा आणि संगमेश्वर तालुक्यात काही गावांमध्ये कोळसुद्यांचे अस्तित्व दिसू लागले आहे. कोळसुंदे म्हणजे रानकुत्रा, कोळशिंदे, कोळसुंदे, कोळीसनं, कोळसून, सोनकुत्रा, देवाचा कुत्रा आणि अशा बर्याचशा स्थानिक नावांनी ओळखला जाणारा, कळपाने राहणारा हा मांसभक्षी जंगली कुत्रा.
कोळसुंद्यांचे अस्तित्व दिसू लागल्याने रानडुक्करांपासून भातशेतीचे होणारे नुकसानीचे प्रमाण कमी झाले आहे. तळवडे,येरवंडे, आसगे आदी गावात रानकुत्रे दिसत आहेत. यामुळे शेतीचे नुकसानकरणारे माकड, रानडुक्करांचे प्रमाण कमी झाले असल्याचे येथील शेतकऱ्यांचे म्हणजे आहे. सह्याद्रीच्या घनदाट अरण्यामध्ये वावरणार्या रानकुत्र्यांचे आता कोकणातील गावागावांमध्ये होणारे दर्शन आता चर्चेचा विषय बनत
आहे.
लोकांमध्ये या प्राण्याविषयी बरेच समज आहेत. हे प्राणी आपले मूत्र शेपटीच्या साहाय्याने भक्ष्याच्या डोळ्यात उडवून त्यांना आंधळ करतात, असा गैरसमज कोकणातील काही गावांमधील शिकार्यांमध्ये आजही रूढ आहे. अर्थात असेच गैरसमज आणि भीतीमुळे शिकारी आणि स्थानिकांच्या मनात रानकुत्र्यांबद्दल भीतीयुक्त आदराची भावना असल्याचे दिसून येते. मात्र कोकणात शेतीला नुकसानदायी ठरणार्या तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढत असताना त्यांच्या वाढत्या संख्येवर नैसर्गिकरित्या नियंत्रण ठेवण्यासाठी रानकुत्र्यांची संख्यादेखील वाढणे आवश्यक असल्याचे मत वन्यजीव संशोधक मंडळी मांडत आहेत.
सह्याद्रीमध्ये रानकुत्र्यांचे प्रमुख अन्न सांबर, भेकर यांसारखे हरीण कुळातील प्राणी आहेत. याशिवाय ससे आणि रानडुक्करांसारख्या प्राण्यांचीदेखील ते शिकार करतात. तसेच गायी, म्हशींचीदेखील शिकार करत असल्याच्या नोंदी काही गावांमधूनआहेत. सद्यःपरिस्थितीत रानडुक्कर आणि सांबर या प्राण्यांमुळे कोकणातील शेतकरी आणि बागायतदार हवालदिल झाले आहेत. रानडुकरांकडून शेतीचे आणि सांबराकडून आंबा-काजूसारख्या बागायती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर होत आहे. गाव आणि शेतीनजीक या तृणभक्षी प्राण्यांची संख्यादेखील वाढलेली आहे, अशा परिस्थितीत या वाढत्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याचे महत्त्वपूर्ण काम हे रानकुत्रे करत आहेत. त्यामुळे शेती आणि पिकांची नासाडी टाळायची असेल, तर संरक्षित वनक्षेत्राबाहेर फिरणार्या रानकुत्र्यांच्या कळपांचे संवर्धन करणे काळाची गरज आहे.
राज्यात महिला आत्याचाराच्या धक्कादायक घटना समोर येत असताताना देवगडात संताप आणि चीड निर्माण करणारी घटना देवगड तालुक्यात घडली आहे. ज्या पोलिसांना आपण रक्षणाची जबाबदारी दिली आहे तेच भक्षक बनल्याचा प्रकार घडला आहे. नांदेडवरून देवगडमध्ये फिरायला आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी येथील एका युवतीला छेडल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र देवगडातील जागरूक नागरिकांडी या प्रकारानंतर नागरिकांनी त्यांना चांगलाच चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केलं आहे. सध्या त्यांच्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे
देवगड एसटी स्टॅण्डमार्गे आपल्या घरी परतणाऱ्या एका युवतीची छेडछाड, विनयभंग करून तिला पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी हरिराम मारुती गिते (३३, रा. शेलाळी, ता. कंदार, जि. नांदेड) याच्यासह माधव सुगराव केंद्रे,सटवा केशव केंद्रे,श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते,प्रवीण विलास रानडे यांच्याविरुद्ध देवगड पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. या संशयितांमध्ये चारजण पोलीस सेवेत आहेत. ही घटना 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.30 वाजण्याच्या सुमारास घडली होती. पोलिसांनी संशयित आरोपींना देवगड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना शनिवारपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
नेमके काय घडले?
देवगड येथे इनोव्हा कार घेऊन पर्यटनासाठी आलेले संशयित हरिनाम गिते, हे मंगळवारी सायंकाळी एसटी स्टॅण्डमार्गे देवगड बाजारपेठेच्या दिशेने जात होते. याचमार्गे पीडित युवती ही आपल्या घरी परतत होती. या रस्त्यावरील आनंदवाडी येथे जाणाऱ्या मार्गावरील वळणाच्या ठिकाणी संशयित आरोपींनी युवतीला पाहून कार थांबवली.कारमधील संशयित हरिनाम गिते याने पीडित युवतीला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तिचा हात पकडून ‘माझ्यासोबत येतेस का?’तुला वसई फिरवतो’,असे विचारले. त्यानंतर त्याच्या पाठोपाठ येणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या इनोव्हा कारमधून संशयित माधव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम गिते, शंकर गिते,प्रवीण रानडे या संशयितांनी पीडित युवतीकडे पाहून टिंगलटवाळी केली. ‘तिला गाडीत घे,नंतर काय ते बघू’असे बोलून पीडित युवतीला गाडी मधून घेऊन जाण्याच्या इराद्याने व बेकायदेशीर कोंडून ठेवण्याची व गंभीर इजा पोहोविण्याच्या उद्देशाने पळवून नेण्याचा प्रयत्न केला.
याबाबतची फिर्याद पीडित युवतीने देवगड पोतीस स्थानकात दिली असून संशयित हरिनाम गिते,माधव सुगराव केंद्रे, सटवा केशव केंद्रे, श्याम बालाजी गिते,शंकर संभाजी गिते, प्रवीण विलास रानडे या संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम ७४, ७५ (२), १४० (१), १४० (३), १४० (४), ६२, ३ (५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व संशयितांना देवगड पोलिसांनी देवगड न्यायालयासमोर हजर केले.न्यायालयाने सर्व संशयित आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. संशयित आरोपींच्यावतीने अॅड. श्यामसुंदर जोशी यांनी काम पाहिले. या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक अरुण देवकर करीत आहेत. दरम्यान यातील चार जण हे पोलीस कर्मचारी होते त्यामुळे पोलीस खात्याला ही काळीमा फासणारी ही घटना असल्याचे बोलून नागरिक आपला संताप व्यक्त करत आहेत.
मुंबई: कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे या महत्वाच्या मागणीला वाचा फोडण्यासाठी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती – महाराष्ट्र तर्फे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे संबधित प्रश्नांसाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. कोकण रेल्वेवरील स्थानकांचा संथगतीने होणारा विकास,
कोकण रेल्वेचे दुहेरीकरण, कोकण रेल्वेला थेट अर्थसंकल्पीय निधी मिळण्यात येणार्या अडचणी, कर्जात बुडत चाललेली कोकण रेल्वे आणि कोकण रेल्वेचे विलिनीकरण किती महत्वाचे या विषयांसाठी ही पत्रकार परिषद घेण्यात येणार असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.
ही पत्रकार परिषद मुंबई प्रेस क्लब, ग्लास हाऊस, आझाद मैदान, महापालिका मार्ग, मुंबई – ४०० ००१ येथे मंगळवार दिनांक १ ऑक्टोबर दुपारी ३ ते संध्याकाळी ५ दरम्यान पार पाडण्यात येणार आहे. या पत्रकार परिषदेस सर्व कोकण प्रेमी प्रवासी आणि पत्रकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.
मुंबई, दि. २७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
Konkan Expressway: विद्यमान सरकारने देशातील सर्व शहरे महामार्गाने जोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई आणि गोवा जोडणारा एक नवा महामार्ग म्हणून कोकण द्रुतगती महामार्ग Konkan Expressway बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कोकण एक्सप्रेसवे (ME-6) हा पनवेल (नवी मुंबई) आणि सिंधुदुर्गला रायगड आणि रत्नागिरी मार्गे जोडणारा महाराष्ट्रातील मार्ग संरेखन असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएसआरडीसीने महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
एमएसआरडीमार्फत कोकण द्रुतगती द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा द्रुतगती महामार्ग 375.94 किमी लांबीचा असून तो कोकणातून जाणार आहे. एकूण १७ तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. तर संपूर्ण मार्गावर १४ इंटरचेंज असणार आहेत. महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीला सुमारे ८७१ छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग चार पॅकेजमध्ये तयार करण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
कोकण एक्स्प्रेसवेसाठी 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे. कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे.
मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागत आहेत.