मुंबई, दि. २७ : शासनाच्या विविध योजनांची सर्वसामान्य नागरिकांना माहिती देण्यासाठी ‘मुख्यमंत्री योजनादूत’ उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता मुदतवाढ देण्यात आली असून आता इच्छुक उमेदवारांना ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत नोंदणी अर्ज करता येणार आहे. इच्छुक उमेदवारांनी www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर अर्ज करावा, असे आवाहन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री योजनादूत उपक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज, आधार कार्ड, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ., अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला), उमेदवाराकडे आधार जोडणी असलेल्या बँक खात्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो, हमीपत्र (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील) नियुक्तीवेळी सादर करणे आवश्यक आहे. दि. ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत इच्छुक उमेदवारांना www.mahayojanadoot.org या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. योजनादूत पोर्टलवर ज्या उमेदवारांनी नोंदणी केली आहे अशा उमेदवारांनी Apply बटन दाबून अर्ज Submit करायला विसरू नये. तरच नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
Konkan Expressway: विद्यमान सरकारने देशातील सर्व शहरे महामार्गाने जोडण्याचा सपाटा लावला आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता मुंबई आणि गोवा जोडणारा एक नवा महामार्ग म्हणून कोकण द्रुतगती महामार्ग Konkan Expressway बांधण्याचे काम युद्धपातळीवर चालू आहे. कोकण एक्सप्रेसवे (ME-6) हा पनवेल (नवी मुंबई) आणि सिंधुदुर्गला रायगड आणि रत्नागिरी मार्गे जोडणारा महाराष्ट्रातील मार्ग संरेखन असलेला प्रस्तावित 6 लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग आहे. या महामार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. एमएसआरडीसीने महामार्गासाठी पर्यावरण विभागाकडून मंजुरी मिळविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. महामार्गाचा प्रस्ताव मंजुरीसाठी पर्यावरण विभागाकडे पाठवण्यात आला आहे.
एमएसआरडीमार्फत कोकण द्रुतगती द्रुतगती महामार्ग बांधला जाणार आहे. हाती आलेल्या माहितीनुसार, हा द्रुतगती महामार्ग 375.94 किमी लांबीचा असून तो कोकणातून जाणार आहे. एकूण १७ तालुक्यामधून हा महामार्ग जाणार आहे. तर संपूर्ण मार्गावर १४ इंटरचेंज असणार आहेत. महामार्ग तयार करण्यासाठी एमएसआरडीसीला सुमारे ८७१ छोटे-मोठे पूल, बोगदे, एफओबी, व्हायाडक्ट, अंडरपास आणि इतर पायाभूत सुविधा तयार कराव्या लागणार आहेत. कोकण द्रुतगती महामार्ग चार पॅकेजमध्ये तयार करण्याच्या आराखड्यावर काम सुरू आहे.
कोकण एक्स्प्रेसवेसाठी 68 हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. मुंबई ते गोवा अंतर 523 किमी आहे. कोकण एक्स्प्रेसवे प्रकल्पासाठी सुमारे 3,792 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी सुमारे 146 हेक्टर जमीन वनविभागाची आहे.
मुंबई ते गोव्याला जोडणाऱ्या नवीन महामार्गामुळे मुंबई ते गोवा हा प्रवास अवघ्या सहा तासांत पूर्ण करणे शक्य होणार आहे. सध्या या प्रवासासाठी 12 ते 15 तास लागत आहेत.
Konkan Railway: प्रवाशांचा प्रतिसाद आणि गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एका गाडीच्या डब्यांत वाढ करण्याचा निर्णय रेल्वेतर्फे घेण्यात आला आहे.
गाडी क्र. २२४७५ / २२४७६ हिसार जं. – कोईम्बतूर जं. – हिसार जं. एसी एक्सप्रेस (साप्ताहिक) या गाडीच्या डब्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. टू टियर एसी श्रेणीचा एक कोच आणि थ्री टियर एसी श्रेणीचा एक कोच असे दोन कोच कायमस्वरूपासाठी या गाडीला जोडण्यात येणार आहेत. दिनांक ०२ ऑक्टोबर २०२४ पासून हा बदल करण्यात येणार आहे. या वाढीव डब्यांमुळे या गाडीच्या डब्यांची संख्या एकूण २२ झाली आहे.
या गाडीच्या डब्यांची सुधारित संरचना २
फर्स्ट एसी – ०१, टू टियर एसी – ०५, थ्री टियर एसी – १३, पँट्री कार – ०१, जनरेटर कार -०२ एकूण २२ LHB कोच
Shaktipeeth Expressway: हल्लीच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शेतीप्रश्न आणि पवनार ते पत्रादेवी अशा शक्तिपीठ महामार्गाच्या लादण्यावरून महायुतीच्या खासदारांना फटका बसला. त्यामुळे हा महामार्ग रद्द केला जाईल, असा कयास होता. तरीही वेगवेगळे मार्ग शोधून हा महामार्ग रेटण्याचा प्रयत्न केला जात आहे.
बहुचर्चित पवनार ते पत्रादेवी अशा शक्तिपीठ महामार्गासाठी काढण्यात आलेली भूसंपादन अधिसूचना रद्द करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडे रस्ते विकास महामंडळाने पाठविला आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. या महामार्गाची अधिसूचना रद्द करण्याऐवजी आरेखनात बदल करण्याच्या हालचाली सुरू असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच तसे सूतोवाच केले आहे.केवळ कोल्हापूर आणि नांदेड या जिल्ह्यांचाच विरोध असल्याचा शोध राज्य सरकारने लावला असून या जिल्ह्यांतील आरेखनात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
१२ जिल्ह्यांमधून जाणारा हा ८०५ किलोमीटर लांबीचा आणि १०० मीटर रुंदी असलेला हा महाकाय रस्ता केवळ सरकारच्या आग्रहामुळे रेटला जात आहे.या रस्त्याची कोणतीही मागणी नसताना लादला जात असल्याने याला प्रचंड विरोध होत आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना केवळ दोन जिल्ह्यांचा विरोध असल्याचे सांगितले. तसेच या जिल्ह्यांतील आरेखनात बदल करण्याच्या सूचना दिल्याचे सांगितले आहे.
या महामार्गाच्या भूसंपादनासाठी राज्य सरकारने फेब्रुवारी महिन्यांत अधिसूचना काढली होती. तसेच जूनपासून भूसंपादनाचा प्रयत्न केला होता. मात्र, तो यशस्वी झाला नाही. शेतकऱ्यांचा प्रचंड विरोध होत असल्याने ही अधिसूचना रद्द करावी, असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे दिला होता. मात्र, हा प्रस्ताव थंड बस्त्यात ठेवून नांदेड आणि कोल्हापूर वगळता अन्य जिल्ह्यांची मागणी असल्याने हा महामार्ग करण्याचे सूतोवाच मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्यांचा विरोध की समर्थन?
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्यातील गावांमध्ये देखील सरकारच्या शक्तिपीठ महामार्ग निर्णयाबद्दल नाराजी दिसून येऊ लागली आहे. अखिल भारतीय किसान सभेच्या गिरीश फोंडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने यावर्षी मार्च मध्ये आंबोली, गेळे, नेनेवाडी, पारपोली, तांबोळी, असनिये या सहित अन्य गावांना भेटी दिल्या होत्या. ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांचे पदाधिकारी यांच्याशी झालेल्या चर्चेमध्ये महामार्गामध्ये प्रस्तावित जमीनधारक व ग्रामपंचायत पदाधिकारी यांनी आम्हाला या संपूर्ण प्रक्रियेबद्दल महाराष्ट्र सरकारने अंधारात ठेवल्याचे ठासून सांगितले. काही गावांमध्ये शासनाच्या सूचनेनुसार 28 मार्चपूर्वी ग्रामस्थांनी हरकती दाखल केल्याचे दिसून आले. या आधी खनिज संपत्तीच्या खाणींकरिता खाजगी कंपन्यांकडून शासनाची हात मिळवणी करून गावकर यांच्या जमिनी बळकावण्याचे प्रयत्न झाले आहेत. शक्तिपीठ महामार्ग म्हणजे खनिज संपत्ती यांच्या खाणी तयार करून त्याची मालवाहतूक करण्यासाठीची कंत्राटदार व भांडवलदारांची सोय असल्याचे शेतकऱ्यांनी शिष्टमंडळाला सांगितले. पश्चिम घाटातून जाणाऱ्या रस्त्यामुळे पर्यावरण जैवविविधता धोक्यात येणार आहे अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली.कोल्हापूर सांगली लातूर येथील शेतकरी जर विरोध करत असतील तर त्याबरोबर सिंधुदुर्गचे शेतकरी देखील सोबत असतील असेही येथील शेतकऱ्यांनी सांगितले आहे.
IMD Alert: गेले दोन दिवस राज्यातील अनेक भागात पाऊस हजेरी लावत आहे. तर काही ठिकाणी धो-धो पावस पडत आहे. यामुळे अनेक भागात पावसाने पिकांचे नुकसानही केले आहे. हवामान विभागाने पुढील दोन ते तीन दिवस राज्यातील अनेक भागांत जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसेच आज दिनांक २५ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर सकाळी ८.३० वाजेपर्यंत मुंबई आणि कोकण पट्ट्यात हवामान खात्याने धोक्याचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मंगळवारी (24 सप्टें.) गुजरा, राजस्थानच्या आणखी काही भागांसह पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांतून बाहेर पडला आहे. परतीच्या मान्सूनची सीमा फिरोजपूर, सिरसा, चुरू, अजमेर, माउंट अबु, दिसा, सुरेंद्रनगर, जुनागढ येथून जात आहे. मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या क्षेत्राची निर्मीती झाली आहे. या क्षेत्राच्या प्रभावामुळे राज्यात 27 सप्टेंबरपर्यंत पावसाची शक्यता आहे.
दिवसेंदिवस मुंबई लोकलमधील गर्दी वाढत असल्याने प्रवासी संघटनेने रेल्वे प्रशासनाला काही पर्याय सुचवले आहेत यामध्ये मुंबई देशाची आर्थिक राजधानी असून देशाच्या एकूण करांपैकी २५% कर हा फक्त मुंबई शहर भरते तरीही दरदिवसाला मुंबई लोकल मधून पडून ५ ते ६ प्रवाशांचा बळी जातोय त्यामुळे सर्व लोकल सेफ्टी डोअरच्या चालवाव्यात,मुंबई लोकलच्या पश्चिम रेल्वे,मध्य रेल्वे व हार्बर लाईन वर प्रवाशांच्या तुलनेत लोकल चालवण्यासाठी भुयारी मार्गाचा पावर करावा. ( उदा. बुलेट ट्रेन ) किंवा रेल्वे ब्रिज डबलिंगचा ( उदा. मेट्रो ) सारखा वापर करावा म्हणजे खालून जलद लोकल, मेल,एक्सप्रेस तर ब्रिजवरून स्लो लोकल चालवल्या जातील.याच्याने भविष्यात प्रवाशांच्या तुलनेत मुंबई लोकल चालवता येतील.
मुंबई आणि उपनगरांच्या दक्षिणेकडे मोठया प्रमाणात इंडस्ट्रीज तर उत्तरेच्या बाजूला मोठी रेसिडेंसी असल्याने मुंबई लोकलचा समतोल बिघडतोय,म्हणून सकाळी मुंबईच्या दिशेने तर संध्याकाळी मुंबईच्या बाहेर जाताना मोठी गर्दी दिसतेय,यासाठी पालघर,बोईसर, वसई,वाडा,भिवंडी,कल्याण,कर्जत व नवी मुंबई ह्या परिसरात मोठया इंडस्ट्रिज आहेत म्हणून येथे ट्रान्सपोर्ट हब बनवून येथे लोकल व मेट्रोचे प्रमाण वाढवल्यास सकाळी व संध्याकाळी अप आणि डाऊन मार्गावरील मुंबई लोकलच्या गर्दीवर नियंत्रण मिळवता येईल,पश्चिम रेल्वे व मध्य रेल्वेच्या मुंबई लोकलचे स्वतंत्र्य झोन बनवावे,पश्चिम रेल्वे वरील गर्दी कमी करण्यासाठी सर्व लोकल १५ डब्यांच्या चालवाव्यात.
एसी लोकलसंदर्भात पश्चिम रेल्वेच्या नेहमीच्या लोकल रद्द करून त्या ठिकाणी एसी लोकल सुरू करू नयेत त्यासाठी नवीन वेळापत्रक बनवावे सर्वसामान्यांना एसी लोकल परवडत नसल्याने फक्त ३०% प्रवासीच त्यातून प्रवास करतात परिणामी त्याचा मागील लोकल वर भार येऊन प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो लटकून प्रवास केल्याने लोकल अपघातांचे प्रमाणही वाढलेले आहे.
मुंबईच्या तिन्ही मार्गावरील एसी लोकलचा तिकीट दर कमी करावा विरार ते चर्चगेट दरम्यान एसी लोकलचा मासिक पास २२०० रू.आहे १२ ते १५ हजारावर काम करणाऱ्या मुंबईकरानी हे पैसे आणायचे कोठून? यासाठी १) सामान्य लोकल वाढवा किंवा ते शक्य नसल्यास २) त्या सर्व स्क्रॅप करून त्याबदल्यात सेफ्टी डोअरच्या एसी किंवा नॉनएसी लोकल सरसकट सेकंड क्लासच्या तिकीट दरांमध्ये चालवाव्यात किंवा ३) एसी चे तीन कोच सामान्य लोकलला जोडावेत, त्याच्याने जनरल,फर्स्ट क्लास व एसी एकत्रच धावतील.
विरार नालासोपारा प्रवाशांच्या समस्या यामध्ये नालासोपारा हे पश्चिम रेल्वेवरील सर्वात जास्त लोकवस्तीचे स्टेशन आहे सकाळी कामाच्या वेळी विरारला रिटर्न जाऊन वेळ फुकट जात असल्याने ७ ते १० या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी यशवंतनगर यार्ड मधून फ्रेश लोकल प्लॅटफॉर्म नंबर २ वरून नालासोपारा ते चर्चगेट /दादर /अंधेरी अशा लोकल सुरू कराव्यात.
पश्चिम रेल्वेच्या विरार चर्चगेट लोकलमध्ये नालासोपारावाले रिटर्न येऊन प्रवास करत असल्याने सकाळी ६.३० ते १० या वेळेत विरारला येणाऱ्या फास्ट ट्रॅक वरील सर्व लोकल नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर ३ वर न थांबवता त्या थेट वसई वरून विरारला आणाव्यात व नालासोपारा प्लॅटफॉर्म नंबर १ वरील सर्व लोकल नेहमीप्रमाणे थांबवाव्यात,विरार लोकल असूनही विरारकरांना अंधेरी बांद्रापर्यंत बसायलाच मिळत नाही ( उदा. संध्याकाळी सर्व फास्ट लोकल मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्याने थांबत नाहीत त्याप्रमाणे सकाळी नालासोपाऱ्याला करावे )
सकाळी ७ ते १० या गर्दीच्या वेळेत प्रत्येक २० मिनिटांनी विरारच्या नारंगी रोड व यशवंत नगर यार्ड येथील यार्ड मधून प्लॅटफॉर्म ६ व १ वरून विरार ते चर्चगेट /दादर / अंधेरी अशा फास्ट लोकल सुरू कराव्यात.
विरार अंधेरी लोकल संदर्भात सकाळी गर्दीच्या वेळी विरार चर्चगेट लोकल ह्या अंधेरीला ३०% खाली होतात त्यामुळे सकाळी ७ ते १० व सायं. ६ ते १० या वेळेत विरार अंधेरी दरम्यान प्रत्येक २० मिनिटांनी जलद लोकल चालवाव्या,संध्याकाळी गर्दीच्या वेळी ७.२५ ते ८.१३ दरम्यान २ अंधेरी विरार लोकल सुरू कराव्यात मधील ५० मिनिट अंधेरी विरार लोकलच नाही आहेत.
इतर महत्वाच्या मागण्या पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल टर्मिनस येथील लीज संपल्याच्या कारणांनी विरारच्या यशवंतनगर यार्डची निर्मिती करण्यात आली. रेल्वेने त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधीही खर्च केला मात्र हे यार्ड नेहमी रात्रीच्या वेळी खाली असल्याचे निदर्शनास येत आहे,येथे स्टेला लोकलच नसतात,असे का? असा सवाल प्रवासी संघटनेने केला आहे.
विरार चर्चगेट विरार सकाळी व संध्याकाळी गर्दीच्या वेळी लेडीज स्पेशल लोकलच्या फेऱ्या वाढवाव्यात,गर्दीच्या वेळी मुंबई लोकलमध्ये जेष्ठ नागरिकांना त्यांच्या सीट पर्यंत पोहोचताच येत नाही त्यासाठी त्यांना स्वतंत्र बोगी मिळावी.
काही मुंबई लोकलमध्ये सेकंड क्लासच्या डब्यातील बसण्याच्या सिटस अत्यंत वाईट आहे त्यावर प्रवाशांना १० मिनिटे बसताच येत नाही.
पश्चिम रेल्वेवरील लोकलच्या वेळापत्रकात काही बदल करावेत यामध्ये सकाळी ७ ते ९ व संध्याकाळी ६ ते १० यावेळी डहाणू रोड ते वसई रोड अशा प्रत्येक २० मिनिटांनी लोकल सुरू कराव्यात.रात्री ११ नंतरच्या बऱ्याच लोकल भाईंदरच्या यार्डमध्ये येत असल्याचे निदर्शनास येत आहे, त्यातील काही लोकल विरारच्या यार्ड मध्ये आणाव्यात. व विरारला सर्व एसी लोकल प्लॅटफॉर्म नंबर १ वरूनच चालवाव्यात.
पहाटे ३ वाजून ३० मि.पासून चर्चगेट विरार लोकल सुरू कराव्यात.दिवसभरात चर्चगेट बोरीवली फास्ट लोकलच्या काही फेऱ्या रद्द करून त्या ठिकाणी डहाणू रोडच्या लोकल फेऱ्या वाढवाव्यात.पहाटे ५.८ मिनिटांची नालासोपारा बांद्रे लोकल विरार वरून सुरू करावी.
रात्री ११.१२ मिनिटांची अंधेरी नालासोपारा लोकल अंधेरी विरार करावी.डहाणू रोड / बोईसर ते विरार लोकल सायंकाळी ७ च्या दरम्यान सुरू करावी.सकाळी ७.१८ मि.विरार दादर फास्ट लोकलला नालासोपाऱ्याला थांबा देऊन ती विरार चर्चगेट अशी चालवावी.
चर्चगेट विरार सायंकाळी ६.२२ मिनिटांची एसी फास्ट लोकल सामान्य लोकल म्हणून चालवावी.सकाळच्या ७.१९ आणि ८.२४ मिनिटांची विरार बोरीवली १५ डब्यांच्या स्लो लोकल अंधेरी पर्यंत चालवाव्यात. तर पुढे सकाळी ८ ते ९ दरम्याने ४ अंधेरी चर्चगेट स्लो लोकल आहेत त्यातील काही कमी कराव्यात.सायं. ६.५१ ते ८.४४ यांच्यामध्ये १ तास ५३ मिनिटात चर्चगेट विरार स्लो लोकल नाही आहेत तर दरम्यानच्या काळात ४ चर्चगेट ते विरार / भाईंदर स्लो लोकल चालवाव्यात.
सायंकाळी ६ नंतर प्रत्येक अर्ध्या तासाने दादर ते विरार लोकल चालवाव्यात.सकाळी ७ ते १० व सायंकाळी ६ ते १० दरम्यान विरार चर्चगेट विरार काही लोकल डबल फास्ट कराव्यात तर काहीना अल्टरनेट थांबे द्यावेत.डहाणू दिवा ते पनवेल मेमू प्रत्येक तासाला सोडावी किंवा त्या मार्गावर लोकल सुरू कराव्यात.
निवेदनावर अध्यक्ष श्री.अनिल मोरे व सेक्रेटरी श्री.यशवंत जडयार यांनी सहया केल्या असून त्याच्या प्रति रेल्वेमंत्री,राज्याचे मुंख्यमंत्री,जनरल मॅनेजर पश्चिम रेल्वे,मुंबईचे खासदार श्री.पियुष गोयल,श्री.हेमंत सावरा,श्री.अरविंद सावंत,सौ.वर्षा गायकवाड व स्टेशन मास्तर विरार,नालासोपारा व वसई रोड यांना देण्यात आल्या आहेत.
मुंबई: मालवण राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा नव्याने उभारला जाणार आहे. या निविदेचा तपशील जाहीर झाला आहे. नवा पुतळा हा ६० फुटांचा असणार आहे. हा पुतळा पुतळा नव्याने उभारण्यासाठी निविदा काढण्यात आली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची पायाच्या अंगठ्यापासून ते डोक्यापर्यंत उंची ६० फूट असेल असे निविदेच्या तपशीलात म्हटले आहे. या पुतळ्याच्या उभारणीसाठी २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.
स्टॅच्यू ऑफ युनिटीच्या धर्तीवर उभारणार पुतळा
निविदेच्या अटी,शर्तींमध्ये या पुतळ्याची उभारणी स्टॅच्यू ऑफ युनिटी्च्या धर्तीवर करण्यात येणार असल्याचे म्हटले असून पुतळ्याची उभारणीवर ही IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी लक्ष ठेवणार आहेत. या पुतळ्याच्या उभारणीसाठी 6 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. पुतळ्यासाठी एक समिती तयार करण्यात आली असून या समितीच्या प्रमुख सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनीषा म्हैसकर असणार आहेत. त्यांच्याशिवाय IIT मुंबईची तज्ज्ञ मंडळी या समितीत असणार आहेत.
निविदेत काय म्हटले आहे?
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी शासनाने पुतळ्यासाठीची निविदा प्रसिद्ध केली आहे. शिवरायांच्या पुतळ्याची रचना, अभियांत्रिकी, बांधकाम, उभारणी, संचलन आणि देखभाल-दुरुस्ती यासाठी ही निविदा आहे.हा पुतळा 60 फुटी असणार असून तो उभारण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आलेली आहे.
सिंधुदुर्ग: सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत भात पिकासाठी प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेसाठी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी २७ सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री नाईकनवरे यांनी केले आहे.
जिल्ह्यात साधारणत: ३५०० मि.मी. पाऊस पडतो. या पावसामुळे काढणीच्या वेळेस साधारणत: १५ ते २० टक्के नुकसान होते. भात पिकाचे काढणीच्या वेळेत होणारे नुकसान टाळण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना २०२४-२५ अंतर्गत प्लास्टिक ताडपत्री खरेदी योजनेकरिता ७५ टक्के अनुदान तत्त्वावर मंजुरी दिली आहे. या योजनेस पात्र शेतकऱ्याकडे ०.१० हेक्टर क्षेत्र भात पिकाखालील असावे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती, महिला तसेच अल्प व अत्यल्प शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल. जिल्हा परिषद कृषी विभाग यांची जिल्हास्तरीय खरेदी समितीने निश्चित केलेला दर २ हजार प्रति प्लास्टिक ताडपत्री आहे. त्यानुसार ७५ टक्के अनुदानाप्रमाणे प्लास्टिक ताडपत्रीसाठी जास्तीत जास्त १ हजार ५०० रुपये प्रति ताडपत्री अनुदान देय राहील. एका शेतकऱ्यास जास्तीत जास्त एक ताडपत्री खरेदी करता येईल. सिंधुरत्न समृद्ध योजनेंतर्गत आंबा पिकासाठी प्लास्टिक क्रेट्स आणि प्लास्टिक ताडपत्री योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यास या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील दिलेल्या नमुन्यात अर्ज भरून तो तालुका कृषी कार्यालय अथवा संबंधित क्षेत्रीय कृषी सहायक यांच्याकडे जमा करणे आवश्यक आहे. योजनेसाठी सातबारा, ८ अ उतारा , बँक पासबुक, आधार कार्ड व रेशन कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक आहेत.
मुंबई: राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकार काही मोठे आणि महत्वाचे निर्णय घेऊन सर्व स्तरातील मतदारांना खुश करण्याचे प्रयत्न करत आहे. त्यानुसार आजच मंत्रिमंडळाने सरपंच आणि उपसरपंचांच्या मानधनात दुप्पटीने वाढ करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ग्रामविकास विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या निर्णयामुळे सरपंच आणि उपसरपंचांचे मानधन लोकसंख्येच्या वर्गीकरणानुसार वाढवले जाणार आहे, ज्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रोत्साहन मिळेल.
मानधनात किती वाढ होणार ?
राज्यातील ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचांचं सध्याचं मानधन त्या-त्या ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आहे. त्यानुसार, ज्या ग्रामपंचायतीची लोकसंख्या २००० पर्यंत आहे, त्या सरपंचाचं मानधन ३ हजार रुपयांवरून ६ हजार रुपये होणार आहे. तर, या ग्रामपंचायतींच्या उपसरंपचांचं मानधन १ हजार रुपयांवरून २ हजार रुपये होणार आहे.
दोन हजार ते आठ हजारपर्यंत लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचं मानधन ४ हजार रुपयावरून ८ हजार रुपये होणार आहे. तर, उपसरपंचांचं मानधन दीड हजार रुपयांवरून ३ हजार रुपये होईल.
ज्या ग्रामपंचायतींची लोकसंख्या ८ हजारपेक्षा जास्त आहे, तेथील सरपंचांचं मानधन ५ हजार रुपयांवरून १० हजार रुपये तर, उपसरपंचांचं मानधन २ हजार रुपयांवरून ४ हजार रुपये होणार आहे.
या निर्णयामुळे राज्यावर वर्षभरात 116 कोटी रुपयांचा आर्थिक भार पडणार आहे
Konkan Railway News: या वर्षी कोकण रेल्वेमार्गावर चालविण्यात आलेल्या विशेष गाड्यांपैकी एका गाडीची सेवा जानेवारी २०२५ अखेरपर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. १५ स्लीपर कोच असलेल्या या गाडीला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणात आलेला प्रतिसाद पाहून हा निर्णय घेण्यात आला आहे.
पश्चिम रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०९०५७/०९०५८ उधना जंक्शन. – मंगळुरू जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक विशेष गाडीला दिनांक ०९ जानेवारी २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या
गाडी क्र. ०९०५७ उधना जं. – मंगळुरू जं. ही द्वि-साप्ताहिक स्पेशल उधना जंक्शन येथून दिनांक दर बुधवार आणि रविवारी रात्री ८ वाजता निघेल ती मंगळुरू जंक्शनला दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४५ वाजता पोहोचेल.
गाडी क्र. ०९०५८ मंगळुरु जं. – उधना जं. द्वि-साप्ताहिक स्पेशल ही गाडी मंगळुरु जंक्शन येथून गुरुवार आणि सोमवारी रात्री १० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २१:०५ वाजता पोहोचेल.गुरुवार आणि सोमवारी रात्री २२:१० वाजता वाजता निघून ती उधना जंक्शनला दुसऱ्या दिवशी २३ :०५ वाजता पोहोचेल.
ही गाडी वलसाड, वापी, पालघर, वसई रोड, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमाळी, मडगाव जं., कानाकोना, कारवार, अंकोला, गोकर्ण रोड, कुमता, मुर्डेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड बयंदूर, कुंदापुरा, उडुपी, मुल्की आणि सुरतकल स्टेशन येथे थांबेल.
रचना : एकूण 23 कोच = 2 टियर एसी – 01 कोच, 3 टियर एसी – 03 कोच, स्लीपर – 15 कोच, जनरल – 02 डबे, SLR – 02.
प्रवाशांनी कृपया सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.