Category Archives: क्राईम

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट रेशन कार्ड; अज्ञातावर गुन्हा दाखल

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट रेशन कार्डवर चक्क उपमुख्यमंत्र्यांचा फोटो, बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला असून, कार्डचा क्रमांक YP 348261 असा आहे. विशेष म्हणजे, हे कार्ड रमाई आवास योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​या गंभीर प्रकरणाची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी पुराव्यादाखल हे बनावट रेशन कार्ड आणि त्यासोबत जोडलेली इतर कागदपत्रे प्रसारमाध्यमांना दाखवली. १२ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्याचे धाडस कोणी केले, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

​या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सरकारी कागदपत्रांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. हे बनावट कार्ड नेमके कोणी आणि कुठे तयार केले, तसेच यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

दहावीचा गणिताचा पेपर टेलिग्रामवर लीक; ग्रुप ऍडमिनविरुद्ध गुन्हा दाखल

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेत एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. गणित भाग-१ आणि भाग-२ या दोन्ही विषयांच्या प्रश्नपत्रिका परीक्षेपूर्वीच ‘महाराष्ट्रलीकर्स’ (Maharashtra Leakers) नावाच्या टेलिग्राम चॅनेलवर लीक झाल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ५ मार्च रोजी होणारा गणित भाग-२ चा पेपर तब्बल तीन दिवस आधीच या ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता.

​या प्रकरणाची माहिती मिळताच बोर्डाच्या अधिकार्यांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या या प्रश्नपत्रिकांची अधिकृत प्रश्नपत्रिकांशी पडताळणी केली. तपासाअंती या दोन्ही प्रश्नपत्रिका तंतोतंत जुळत असल्याचे निष्पन्न झाले आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा भंग झाल्याने पुणे विभागीय मंडळाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल केली आहे.

​या तक्रारीनुसार, संबंधित टेलिग्राम ग्रुपचे ॲडमिन आणि सदस्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सायबर तज्ज्ञांच्या मदतीने पोलीस आता या रॅकेटचा मूळ स्रोत शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. दरम्यान, या पेपर लीकच्या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून, संबंधित विषयांची परीक्षा पुन्हा घेतली जाणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

कोकण रेल्वे प्रवासात साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला

   Follow us on        

कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे  साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; सतर्क टीसीमुळे दोन चोरटे जेरबंद

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ११०१४ तुतारी एक्सप्रेसमधील चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास, तुतारी एक्सप्रेस रोहा स्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली. रत्नागिरीचे तिकीट परीक्षक (TTE) श्री. सचिन सावेकर हे डबा क्रमांक S2, S3 आणि S4 मध्ये तिकीट तपासणी करत असताना त्यांना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सावेकर यांनी प्रसंगावधान राखून आणि इतर प्रवाशांच्या मदतीने या संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.

तपासणी दरम्यान असे निष्पन्न झाले की, या आरोपींनी एका महिला प्रवाशाची हॅन्डबॅग चोरली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले असून, यामध्ये एक मंगलसूत्र, दोन जोड कानातले, ४,७५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशाने तक्रार केलेली एक अंगठी मात्र सापडू शकली नाही. यानंतर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पनवेल येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) स्वाधीन करण्यात आले आहे.

श्री. सचिन सावेकर यांनी दाखवलेली सतर्कता आणि कर्तव्यतत्परतेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या या विशेष कार्याबद्दल सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने यानिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुनरुच्चारले असून, प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला देण्याचे आवाहन केले आहे.

सावंतवाडी: अजब लाच, गजब अधिकारी! गरिबाकडून रेशनकार्डसाठी मागितले ‘चुलीवर भाजलेले काजू’ आणि ‘बकरीचे दुध’


   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे दावे केले जात असतानाच, सावंतवाडी तहसील कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन रेशनकार्ड बनवून देण्यासाठी एका महिला पुरवठा निरीक्षकाने चक्क चुलीवर भाजलेले काजू, साजूक तूप, गोड पपई आणि बकरीच्या दुधाची मागणी केल्याची तक्रार एका गरीब महिलेने केली आहे. या विचित्र मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असलेल्या शालू जानू कोकरे या महिलेने ही तक्रार केली आहे. शालू कोकरे या धनगर समाजातील असून बकरी पालन आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात गेल्या होत्या.

​तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तेथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती दिपाली सचितानंद गोटे/वाघमारे यांनी रेशनकार्डसाठी त्यांच्याकडे १०,००० रुपयांची मागणी केली.

​लाचेत मागितले ‘खाद्यपदार्थ’

​जेव्हा शालू कोकरे यांनी आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले आणि आपण पैसे देऊ शकत नाही असे स्पष्ट केले, तेव्हा संबंधित महिला अधिकाऱ्याने पैशांऐवजी पदार्थांची यादीच समोर ठेवली. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, अधिकाऱ्याने खालील वस्तूंची मागणी केली:

​पेजेचे तांदूळ, चुलीवर भाजलेले काजूगर, साजूक तूप​, मोठ्या आकाराची गोड पपई​, बकरीचे दूध

​इतकेच नाही तर, हे सामान कार्यालयात न आणता बाजूच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यास आणि दूध फ्रिजमध्ये ठेवण्यास बजावले. ‘हे सामान दिले तर कागदपत्रे नसली तरी एका तासात रेशनकार्ड बनवून देईन’ असे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​अपमानास्पद वागणूक

​शालू कोकरे यांनी या वस्तू देण्यासही असमर्थता दर्शवली असता, संबंधित महिला अधिकाऱ्याने त्यांना “एकही वस्तू देता येत नसेल तर इथून चालती हो, माझा वेळ घालवू नको” अशा शब्दांत अपमानित करून कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​कठोर कारवाईची मागणी

​याप्रकरणी पीडित महिलेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. एका गरीब आणि गरजू महिलेला अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वेंगुर्ला हादरले! पोटच्या मुलानेच झाडली जन्मदात्या आईवर गोळी; आईचा जागीच मृत्यू…

   Follow us on        

वेंगुर्ला | प्रतिनिधी: तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक घरगुती भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​अणसुर पाल मडकीलवाडी येथील रहिवासी वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात गेल्या काही काळापासून सतत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसल्या होत्या.

​त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या उमेशने क्रूरतेची सीमा ओलांडली. तो घराच्या छपरावर चढला आणि तिथून त्याने आपल्या हातातील बंदुकीने आईच्या दिशेने थेट गोळी झाडली. ही गोळी वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीत घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०३ (३) (हत्या)

​शस्त्र अधिनियम १९५९: कलम ३, २५, २७, २९

​महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१: कलम ३७ (१), १३५

अरे बापरे! मुंबईतून हरवलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे १६५० मोबाईल उत्तर प्रदेशात सापडले

   Follow us on        

मुंबई: मुंबई पोलिसांनी हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबवलेल्या एका विशेष मोहिमेअंतर्गत मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतून गायब झालेले तब्बल १,६५० मोबाईल फोन पोलिसांनी उत्तर प्रदेशातील विविध भागांतून शोधून काढले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या फोनची बाजारपेठीय किंमत अंदाजे २ कोटी रुपये इतकी आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या फोनचा माग काढला आणि विशेष पथकाद्वारे हे फोन पुन्हा मुंबईत आणले.

​या मोहिमेमुळे आपले महागडे फोन परत मिळतील ही आशा सोडून दिलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३३,५१४ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. चोरीच्या मोबाइल टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी आणि नागरिकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवलेली दारू सापडली; इन्सुली येथे अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

   Follow us on        

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली आहे. या कारवाईत सुमारे ३.५० लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन, असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कारवाईचा तपशील

​राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरातील दत्त मंदिराजवळ वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका ‘महिंद्रा बोलेरो’ टेम्पोला पथकाने अडवले.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवली होती दारू

​संशयास्पद वाटणाऱ्या या वाहनाची कसून तपासणी केली असता, मागील हौद्यात भाजीपाल्याचे रिकामे क्रेट ठेवलेले आढळले. मात्र, हे क्रेट बाजूला केल्यावर त्याखाली अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स सापडले.

​एकाला अटक

​या प्रकरणी पोलिसांनी तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत.

​जप्त केलेला मुद्देमाल:

​विदेशी दारू (३५ बॉक्स): ३,४९,३२० रुपये

​महिंद्रा बोलेरो वाहन: ५,००,००० रुपये

​एकूण किंमत: ८,४९,३२० रुपये

Kokanai Exclusive: मुंबई पोलिसांकडून बेपत्ता मुलांविषयीच्या अफवांवर स्पष्टीकरण

९८% अल्पवयीन मुलांचे यशस्वी पुनर्मिलन

   Follow us on        

मुंबई: सोशल मीडियावर मुंबईतून मुले बेपत्ता होत असल्याच्या कथित घटनांविषयी दिशाभूल करणारे संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असताना, मुंबई पोलिसांनी आज एक निवेदन जारी करून या संदेशांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बेपत्ता मुलांच्या प्रकरणांवर पोलीस किती गांभीर्याने आणि सहानुभूतीने कारवाई करतात, यावरही त्यांनी भर दिला आहे.

​अफवांवर विश्वास ठेवू नका!

​मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता मुलांविषयी सोशल मीडियावर फिरणारे संदेश खऱ्या तथ्यांवर आधारित नाहीत. मुंबई पोलीस प्रत्येक बेपत्ता मुलाच्या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने हाताळते.

​अपहरण म्हणून नोंदणी बंधनकारक

​सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बचपन बचाओ आंदोलन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या महत्त्वपूर्ण निकालानुसार, १८ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता प्रकरणांची नोंद थेट ‘अपहरण’ (Kidnapping) म्हणून केली जाते. यामुळे या प्रकरणांची तत्काळ दखल घेतली जाते.

​९८% अल्पवयीन मुलांचे पुनर्मिलन

​पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या ९८% अल्पवयीन मुलांना यशस्वीरित्या त्यांच्या कुटुंबाशी एकत्र आणले गेले आहे. ही आकडेवारी पोलिसांच्या अथक प्रयत्नांची साक्ष देते.

​उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण:

सहा महिन्यांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेल्या एका चार वर्षांच्या मुलीला एमआरए मार्ग पोलीस स्टेशनच्या पथकाने नुकतेच वाराणसीतून सुखरूप शोधून तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द केले आहे. पोलिसांचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शोध लागेपर्यंत तपास थांबत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

​विशेष पथके कार्यरत

​बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्वरित कारवाई सुनिश्चित करण्यासाठी गुन्हे शाखा (Crime Branch), स्थानिक युनिट्स (Local Units) आणि विशेष कक्ष (Special Cells) यासह अनेक विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

​नागरिकांना विनंती

​पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पसरवू नये. नागरिकांनी केवळ अधिकृत पोलीस स्रोतांवर विश्वास ठेवून पोलिसांच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.

१९ जणांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू

मुंबई – पवईतील आर.ए. स्टुडिओजवळ गुरुवारी रात्री एका तरुणाने १७ अल्पवयीन मुले व दोन प्रौढ असे १९ जणांना ओलीस ठेवले. रोहित आर्या (वय अंदाजे ३०) असे या तरुणाचे नाव असून, “माझी शाळा सुंदर शाळा” योजनेअंतर्गत थकलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही, या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.


पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर रोहितने पोलिसांवर हल्ला केला. प्रतिहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सर्व १९ ओलीस सुखरूप सोडले गेले.


रोहितने यापूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केले होते. केसरकर यांनी “रोहितची थकबाकी पूर्ण दिली होती; तो मानसिक तणावात होता,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र कुटुंबीयांचा दावा आहे की रक्कम अद्याप बाकी आहे.


पोलिसांनी ओलीस ठेवणे व हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, थकबाकीच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search