Category Archives: पर्यटन

​’एसटी’च्या तीर्थाटन योजनेत खाजगी भागीदारीला हिरवा कंदील

   Follow us on        

मुंबई, १ जुलै २०२६:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) महत्त्वाकांक्षी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे – एसटी संगे तीर्थाटन’ योजनेला अधिक व्यापक आणि व्यावसायिक स्वरूप देण्यासाठी खाजगी पर्यटन संस्थांच्या सहभागाला तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील हजारो भाविकांना सुरक्षित, सुसूत्र, किफायतशीर आणि सर्वसमावेशक तीर्थयात्रेची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच, यामुळे एसटी महामंडळाला अतिरिक्त महसुलाचा नवा स्रोत निर्माण होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

​या नव्या धोरणानुसार, तीर्थाटन व धार्मिक सहलींचे नियोजन, निवास, भोजन, स्थानिक पर्यटन, मार्गदर्शक (गाइड), टोल, पार्किंग आणि प्रवेश शुल्क यांसारख्या सर्व पूरक सुविधा खाजगी पर्यटन संस्थांमार्फत पुरविल्या जातील. मात्र, बस सेवा, प्रवासी वाहतूक आणि प्रवासभाड्याचे संपूर्ण उत्पन्न हे पूर्णपणे एसटी महामंडळाकडेच राहणार आहे. यामुळे भाविकांना सर्व आवश्यक सुविधा ‘वन-स्टॉप’ पद्धतीने एकाच ठिकाणी उपलब्ध होतील आणि एसटीच्या उत्पन्नालाही मोठी चालना मिळणार आहे.

​या योजनेअंतर्गत बस आरक्षणासाठी प्रत्येक बसमध्ये बसच्या आसनक्षमतेनुसार प्रवासी असणे बंधनकारक राहील. विशेष म्हणजे, शासनाच्या विविध सामाजिक घटकांना लागू असलेल्या सर्व प्रवास सवलती या योजनेतही कायम राहतील, ज्यामुळे खाजगी पर्यटन संस्थांच्या इतर पॅकेजेसच्या तुलनेत या योजनेतील प्रवास खर्च अत्यंत कमी आणि सर्वसामान्यांना परवडणारा असेल. निवास, भोजन, पिण्याचे पाणी, चहा-नाष्टा, पर्यटनस्थळांचे प्रवेश शुल्क, मार्गदर्शक, पार्किंग आणि टोल या सर्व सुविधा वाजवी दरात आणि दर्जेदार स्वरूपात उपलब्ध करून देण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित खाजगी संस्थांची असेल. तसेच, या सुविधांमधून मिळणाऱ्या एकूण उत्पन्नापैकी किमान १० टक्के हिस्सा एसटी महामंडळाला देणे या संस्थांना बंधनकारक राहील.

​योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी निविदा (RFP) प्रक्रियेद्वारे राज्यातील सहा प्रदेशांसाठी प्रत्येकी एका पर्यटन संस्थेची, अशी एकूण सहा नामांकित संस्थांची निवड केली जाणार आहे. संबंधित संस्थांना पर्यटन क्षेत्रातील अनुभव, शासनमान्य नोंदणी तसेच आवश्यक पात्रता असणे अनिवार्य असेल. सुरुवातीला हा प्रकल्प दोन वर्षांच्या प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार असून, त्यानंतर मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे पुढील विस्ताराचा निर्णय घेतला जाईल. याशिवाय, तीर्थाटन योजनेच्या व्यापक प्रसिद्धीसाठी खाजगी पर्यटन संस्थांना एसटीचा अधिकृत लोगो वापरण्याची परवानगी देखील दिली जाणार आहे.

​”भाविकांच्या श्रद्धेला सेवाभावाची जोड आणि एसटीच्या आर्थिक बळकटीला नवा आधार” या दुहेरी उद्देशाने राबविण्यात येणारी ही योजना राज्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा देण्याबरोबरच एसटी महामंडळाच्या उत्पन्नवाढीसाठी अत्यंत प्रभावी ठरेल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

‘सिंधुदुर्गचे ॲमेझॉन’ राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित होण्याचे संकेत

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि स्थानिक विकासाला कमालीची गती देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. ‘सिंधुदुर्गचे ॲमेझॉन’ म्हणून जगभरात ओळखल्या जाणाऱ्या दोडामार्ग तालुक्यातील तिलारी खोऱ्याला आता ‘राष्ट्रीय उद्यान’ (National Park) म्हणून घोषित केले जाण्याचे संकेत मिळाले आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

​शासनाची तातडीने दखल आणि मंजुरी

​विधानमंडळात या संदर्भातील मागणी उपस्थित होताच राज्य शासनाने त्याची तातडीने दखल घेतली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी या मागणीचे गांभीर्य ओळखून तिलारी परिसरात राष्ट्रीय उद्यान उभारण्यास तत्त्वतः मंजुरी दिली आहे. शासनाच्या या सकारात्मक प्रतिसादामुळे आता तिलारी खोऱ्याच्या वैभवात अधिकृतपणे भर पडणार असून, पुढील प्रशासकीय प्रक्रियेला वेग येण्याची चिन्हे आहेत.

​जैवविविधतेचे नंदनवन ‘तिलारी’

​सह्याद्रीच्या कुशीत वसलेले तिलारी खोरे हे आपल्या अथांग आणि समृद्ध जैवविविधतेसाठी ओळखले जाते. दाट सदाहरित जंगले, दुर्मीळ वनौषधी व वनस्पती, विविध प्रजातींचे रंगीबेरंगी पक्षी आणि जंगली हत्तींचे नैसर्गिक वास्तव्य ही या परिसराची मुख्य वैशिष्ट्ये आहेत. या भागाला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यास येथील वन्यजीव संवर्धनाला आणि पर्यावरणाच्या रक्षणाला कायद्याचे मोठे बळ मिळणार आहे.

​पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला मोठी उभारी

​या ऐतिहासिक निर्णयामुळे केवळ वन्यजीव संवर्धनालाच फायदा होणार नाही, तर स्थानिक विकासाचे नवे मार्ग खुले होणार आहेत. तिलारीला राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा मिळाल्यास या भागात पायाभूत सुविधांचा विकास होईल. तसेच, मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचा ओघ वाढल्यामुळे स्थानिक रोजगार, हॉटेल व्यवसाय, वाहतूक व्यवस्था आणि इतर छोट्या-मोठ्या स्थानिक व्यवसायांना कमालीची चालना मिळणार आहे.

​गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक मजबूत होणार

​विशेष बाब म्हणजे, गोव्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून तिलारी हे ठिकाण अतिशय जवळ आहे. यामुळे गोव्यात येणाऱ्या देशी-विदेशी पर्यटकांसाठी तिलारी हे एक प्रमुख आणि हक्काचे आकर्षण ठरेल. या भौगोलिक सुविधेमुळे गोवा-सिंधुदुर्ग पर्यटन साखळी अधिक बळकट होणार असून, आंतरराष्ट्रीय पर्यटन नकाशावर सिंधुदुर्गचे नाव आणखी ठळकपणे अधोरेखित होणार आहे.

पर्यटकांच्या हुल्लडबाजीला चाप! महाबळेश्वरचा ‘विल्सन पॉइंट’ या वेळेत राहणार बंद; ड्रोन उडवल्यास थेट जप्ती!

   Follow us on        

महाबळेश्वर:

महाबळेश्वरमधील निसर्गाचा अद्भूत चमत्कार आणि विहंगम सूर्योदय पाहण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘विल्सन पॉइंट’ (सनराईज पॉइंट) परिसरासाठी सातारा वन विभागाने अत्यंत कडक नियमावली जाहीर केली आहे. या राखीव वनक्षेत्रातील जैवविविधता, शांतता आणि वन्यजीवांचे नैसर्गिक वैभव टिकवून ठेवण्यासाठी वनपरिक्षेत्र महाबळेश्वर आणि संयुक्त वन व्यवस्थापन समिती (भेकवली) यांच्या वतीने संयुक्तपणे हा निर्णय घेण्यात आला असून, पर्यटकांना शिस्त पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

​या नव्या नियमांनुसार, विल्सन पॉइंटचे मुख्य प्रेक्षणीय स्थळ वगळता सभोवतालच्या मुख्य गाभा वनक्षेत्रात (Core Forest Area) पर्यटकांना प्रवेश करण्यास आता पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. सुरक्षेचा उपाय आणि वनसंपदेचे रक्षण म्हणून विल्सन पॉइंटचे मुख्य प्रवेशद्वार आता सूर्यास्तानंतर पूर्णपणे बंद केले जाणार असून, ते थेट दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या वेळीच उघडले जाईल. त्यामुळे संध्याकाळी मुख्य गेट बंद होण्यापूर्वीच पर्यटकांना आपली वाहने आवाराबाहेर काढून घ्यावी लागणार आहेत.

​वन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अनेकदा रात्रीच्या वेळी या शांत आणि संवेदनशील वनक्षेत्रात काही पर्यटकांकडून लपून-छपून दारू पिणे, हुल्लडबाजी करणे, रात्रीच्या पार्ट्या करणे किंवा मोठमोठ्याने गाणी वाजवून धिंगाणा घालण्याचे प्रकार समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, वनक्षेत्राच्या हद्दीत असे गैरप्रकार करताना कोणी आढळल्यास त्याची गय केली जाणार नाही आणि त्यांच्यावर थेट वन अधिनियमानुसार कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल.

​वन्यजीवांच्या सुरक्षेचा विचार करून पर्यटकांना या परिसरात आपल्यासोबत पाळीव प्राणी घेऊन येण्यासही सक्त मनाई करण्यात आली आहे. याशिवाय, अनेक पर्यटक हौस म्हणून येथील माकडे किंवा इतर वन्यप्राण्यांना चिप्स, बिस्किटे यांसारखे मानवी खाद्यपदार्थ टाकतात, ज्यामुळे प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे वन्यप्राण्यांना कोणतेही खाद्यपदार्थ न टाकण्याचे आणि संपूर्ण वनक्षेत्रात प्लॅस्टिकचा कचरा न करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.

​अलीकडच्या काळात विस्तीर्ण दऱ्या आणि जंगलांचे चित्रीकरण करण्यासाठी पर्यटकांमध्ये ड्रोन कॅमेऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. मात्र, ड्रोनच्या आवाजामुळे राखीव क्षेत्रातील वन्यप्राणी आणि दुर्मीळ पक्षी भयभीत होतात. हीच गंभीर बाब लक्षात घेऊन विल्सन पॉइंट परिसरात ड्रोन उडवण्यावर आता पूर्णपणे बंदी घालण्यात आली असून, नियम डावलून ड्रोन उडवताना आढळल्यास तो थेट जप्त केला जाईल, असा इशारा वन प्रशासनाने दिला आहे.

कोकणातील तीर्थक्षेत्रे जलमार्गानी जोडली जाणार; पर्यटनाला मिळणार नवी चालना

   Follow us on        

मुंबई (प्रतिनिधी) :

रस्ते, रेल्वे आणि मेट्रोच्या जाळ्यानंतर आता महाराष्ट्र राज्य जलवाहतूक क्षेत्रात जागतिक दर्जाची भारी झेप घेण्यासाठी सज्ज झाले आहे. कोकणातील धार्मिक पर्यटनाला चालना देण्यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमधील प्रमुख तीर्थस्थळे आता जलमार्गांनी जोडली जाणार आहेत. “आंगणेवाडी ते कुणकेश्वर, कुणकेश्वर ते गणपतीपुळे आणि गणपतीपुळे ते पाली अशा प्रसिद्ध श्रद्धास्थानांना ५० ते ३० प्रवासी क्षमतेच्या लहान व वेगवान बोटींच्या माध्यमातून जोडण्याची आमची योजना असून, यासाठी आवश्यक जेटी बांधण्याची तयारी वेगाने सुरू आहे,” अशी माहिती मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिली. एका विशेष मुलाखतीत बोलताना त्यांनी राज्याला जलवाहतुकीत अग्रेसर बनवण्याचा आपला महत्त्वाकांक्षी आराखडा मांडला.

​मुंबई आणि लगतच्या महानगर प्रदेशातील (एमएमआर) वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ‘मुंबई वॉटर मेट्रो’ची संकल्पना राबवण्यात येत असून, २०२८ पर्यंत सुमारे ३ ते ४ जलमार्ग प्रत्यक्ष सुरू होतील, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला. मुंबई वॉटर मेट्रोसाठी एकूण २१ जलमार्ग अंतिम करण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने मुंबईतील रेडिओ क्लब ते नवी मुंबई विमानतळ या जलमार्गाचा समावेश आहे. सध्या या प्रवासासाठी सव्वा तास लागतो, मात्र वॉटर मेट्रोमुळे अवघ्या १६ मिनिटांत हे अंतर कापता येणार आहे. याशिवाय नरिमन पॉईंट ते जुहू आणि वांद्रे ते वर्सोवा अशा असंख्य मार्गांचा यात समावेश असेल.

​गेटवे ऑफ इंडिया ते अलिबाग या पारंपरिक जलमार्गाव्यतिरिक्त आता मुंबईच्या पश्चिम उपनगरातून अलिबाग गाठणे शक्य होणार आहे. यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना अलिबागला जाण्यासाठी एक सोयीस्कर पर्याय उपलब्ध होईल.

​स्वीडन, इटलीप्रमाणे महाराष्ट्रातही जलवाहतुकीचे जाळे:

युरोपियन देशांमधील प्रगत जलवाहतूक व्यवस्थेचा दाखला देत मंत्री नितेश राणे म्हणाले, “तुम्ही स्वीडन, रोम, इटली किंवा नॉर्वेला गेल्यास तिथे तुम्हाला जलवाहतुकीचे एक सुसज्ज जाळे दिसते. अगदी त्याच धर्तीवर आगामी ५ वर्षांच्या काळात महाराष्ट्र जलवाहतूक क्षेत्रात देशात अग्रेसर दिसेल. रस्ते, रेल्वे आणि मेट्रोप्रमाणेच जलवाहतूक हा महाराष्ट्रातील जनतेच्या दैनंदिन प्रवासाचा एक मुख्य आणि तितकाच वेगवान पर्याय बनेल.”

​जहाज बांधणीला (शिपयार्ड) मिळणार चालना:

मुंबई वॉटर मेट्रोसह राज्यातील विविध जलवाहतूक प्रकल्पांसाठी तब्बल २७० लहान-मोठ्या बोटींची आवश्यकता आहे. हे उद्दिष्ट लक्षात घेऊन राज्य सरकार आता ‘शिपयार्ड’ आणि जहाज बांधणी उद्योगाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे. यासाठी आवश्यक असणाऱ्या बोटींची ऑर्डर आधीच देण्यात आली आहे. आगामी काळात महाराष्ट्राच्या विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर बोटी बनवण्याचे अनेक मोठे कारखाने आणि फॅक्टऱ्या पाहायला मिळतील, ज्यामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होईल, असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला.

Medical Tourism: सिंधुदुर्ग जिल्ह्यात आरोग्य पर्यटनाला वाव! तीन पर्यटनस्थळे चर्चेत

   Follow us on        

सावंतवाडी:

राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत नाविन्यपूर्ण योजनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘आयुष वेलनेस क्लिनिक’ तसेच रेडी-वेंगुर्ला येथे ‘विशेष आयुष केंद्र’ स्थापन करण्याकरिता मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देण्याबाबत माजी मंत्री व आमदार दीपक केसरकर यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधले आहे. याशिवाय आपल्या मतदारसंघातील आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी व इतर रिक्त पदे तातडीने भरण्यासंदर्भातही त्यांनी आरोग्यमंत्र्यांकडे आग्रही मागणी केली आहे.

​राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाचा विचार करता आयुर्वेद, पंचकर्म, योग आणि नॅचरोपॅथी यांसारख्या भारतीय उपचार पद्धतींविषयी परदेशी पर्यटकांमध्ये मोठे आकर्षण निर्माण होत असून, याद्वारे पर्यटनाला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र रेडी हे महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवर वसलेले असून, येथे येणाऱ्या परदेशी पर्यटकांची संख्या मोठी आहे. तसेच आचरा हे समुद्रकिनाऱ्यावर वसलेले गाव आहे आणि आंबोली हे वर्षभर पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेले प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे.

​आयुष मंत्रालयाने सादर केलेल्या वार्षिक अर्थसंकल्पात वैद्यकीय पर्यटनामध्ये (Medical Tourism) आयुष सेवांचा समावेश करण्याबाबत विशेष भर देण्यात आला आहे. याच अनुषंगाने प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा व आंबोली येथे ‘स्वास्थ्य केंद्र’ सुरू केल्यास वैद्यकीय पर्यटनाविषयी जनजागृती होईल, तसेच भारतीय व परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होईल. त्यामुळे या महत्त्वपूर्ण कामास त्वरित मंजुरी देऊन आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात मान्सूनपूर्व ‘जंगल सफारी’चे आयोजन; निसर्गप्रेमींसाठी सुवर्णसंधी!

   Follow us on        

मुंबई: मुंबईकर सध्या मान्सूनची आतुरतेने वाट पाहत असताना, बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाने (SGNP) निसर्गप्रेमींसाठी खास मान्सूनपूर्व जंगल सफारीचे (निसर्गभ्रमंती) आयोजन केले आहे. उद्यानातील निसर्ग व्याख्या केंद्राने जून २०२६ या महिन्यात विविध विशेष निसर्गभ्रमंती मोहिमा आखल्या असून, वन्यजीवप्रेमी, छायाचित्रकार, ट्रॅकर्स आणि कुटुंबांना यात सहभागी होण्याचे आमंत्रण दिले आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवनातून काही काळ दूर राहून निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

​हजारो हेक्टर परिसरात पसरलेल्या या उद्यानात समृद्ध वनस्पती, प्राणीसंपदा, दाट जंगले, प्राचीन लेणी आणि विविध पक्षी-फुलपाखरांचा वास्तव्य आहे. पावसाळ्यापूर्वी जंगल हिरवाईने बहरत असतानाचा हा काळ निसर्गभ्रमंतीसाठी सर्वोत्तम मानला जातो.

​निसर्गभ्रमंतीचे प्रमुख मार्ग (Trails)

​या उपक्रमांतर्गत उद्यानात खालील ६ वेगवेगळ्या मार्गांवरून सफारी आयोजित केली जाईल:

​कान्हेरी लेणी ते गायमुख: इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम असणारा हा मार्ग आहे. प्राचीन कान्हेरी लेणी आणि निसर्गरम्य गायमुख परिसराला जोडणाऱ्या वनमार्गातून ही भ्रमंती होते.

​बांबू हट ते गायमुख: शांत आणि निवांत जंगलभ्रमंतीचा आनंद घेणाऱ्यांसाठी हा मार्ग योग्य असून, दाट बांबूच्या जंगलातून जाणारा हा ट्रेल निसर्गाचा एक वेगळाच अनुभव देतो.

​ठाकूरपाडा: हा तुलनेने कमी परिचित मार्ग असून, याद्वारे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील विविध परिसंस्था आणि नैसर्गिक भूभागांची जवळून ओळख होते.

​शिलॉन्डा: उद्यानातील सर्वाधिक लोकप्रिय ट्रेल्सपैकी हा एक असून, दाट हिरवळ, समृद्ध जैवविविधता आणि अत्यंत शांत वातावरणासाठी तो ओळखला जातो.

​मालाड ट्रेल: पक्षीनिरीक्षक आणि निसर्गप्रेमींसाठी हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे. राष्ट्रीय उद्यानाच्या पश्चिम भागातील पर्यावरणीय समृद्धी या मार्गावर अनुभवता येते.

​काशीमिरा: या मार्गावर जंगलातील नैसर्गिक अधिवासात विविध वनस्पती आणि प्राण्यांचे जवळून निरीक्षण करण्याची संधी मिळते.

दिनांक आणि वेळ

​कालावधी: जून २०२६ महिन्यातील प्रत्येक शनिवार आणि रविवार.

​वेळ: सर्व सहभागींनी सकाळी ६:४५ वाजता संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बोरीवली येथील मुख्य प्रवेशद्वारावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

​नोंदणी शुल्क आणि सुविधा

​या निसर्गभ्रमंतीसाठी प्रति व्यक्ती सहभाग शुल्क १,००० रुपये आहे. या शुल्कामध्ये खालील गोष्टींचा समावेश असेल:

​SGNP प्रवेश तिकीट

​निसर्गभ्रमंतीसाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या

​उद्यानातील अंतर्गत वाहतूक व्यवस्था

​सकाळचा नाश्ता

​एक आठवण म्हणून स्मृतिचिन्ह

​तज्ज्ञ निसर्गतज्ज्ञ मार्गदर्शकाची सेवा

​रजिस्ट्रेशन कसे कराल?

​व्हॉट्सॲप नोंदणी: इच्छुकांनी +91 ८६५५२ ०२९०३ या क्रमांकावर मेसेज पाठवून आपली नोंदणी पूर्ण करावी.

​ई-मेल संपर्क: अधिक माहितीसाठी तुम्ही [email protected] या ई-मेलवर संपर्क साधू शकता.

​मदत वेळ: नोंदणी संदर्भातील माहिती किंवा मदतीसाठी सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० या वेळेत संपर्क साधावा.

कुणकेश्वर -कोल्हापूर एसटी बससेवा सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

देवगड: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध ‘दक्षिण काशी’ म्हणून ओळखले जाणारे धार्मिक व पर्यटन स्थळ कुणकेश्वर ते कोल्हापूर अशी थेट एसटी बसफेरी तात्काळ सुरू करण्यात यावी, अशी मागणी कुणकेश्वर ग्रामपंचायतीचे प्रशासक महेश ताम्हणकर यांनी महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे केली आहे. कुणकेश्वर (ता. देवगड) येथे दर्शनासाठी आणि पर्यटनासाठी महाराष्ट्रभरातून, विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातून वर्षभर मोठ्या संख्येने भाविक येत असतात. त्याचप्रमाणे देवगड आणि कुणकेश्वर परिसरातील नागरिक, व्यापारी आणि रुग्ण हे वैद्यकीय उपचार, व्यापार आणि करवीर निवासिनी श्री अंबाबाई (महालक्ष्मी) च्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने कोल्हापूरला जात असतात.

​सध्या कोल्हापूर ते कुणकेश्वर दरम्यान कोणतीही थेट एसटी बस सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंना, पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना गाड्या बदलत (कनेक्टिंग प्रवास) करावा लागतो. थेट बस नसल्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि पैसा दोन्ही वाया जात असून त्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातील प्रमुख व्यापारी, वैद्यकीय आणि शैक्षणिक केंद्र असल्याने या मार्गावर प्रवाशांची संख्या मोठी आहे, मात्र थेट बसअभावी प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

​जर एसटी महामंडळाने कोल्हापूर-कुणकेश्वर अशी थेट बसफेरी सुरू केली, तर प्रवाशांची मोठी सोय होईलच, शिवाय महामंडळाच्या उत्पन्नातही भरघोस वाढ होईल, असा विश्वास या पत्रात व्यक्त करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा सकारात्मक विचार करून परिवहन मंत्र्यांनी एसटी महामंडळाला लवकरात लवकर ही थेट सेवा सुरू करण्याचे आदेश द्यावेत, अशी नम्र विनंती कुणकेश्वर ग्रामपंचायत प्रशासक महेश ताम्हणकर यांनी केली आहे. या मागणीमुळे आता दोन्ही जिल्ह्यांतील प्रवाशांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिक मासात तीर्थाटन झाले सोपे! ४० जणांचा ग्रुप बनवा आणि बुक करा स्वतःची स्वतंत्र एसटी!

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी, मुंबई: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक मासाचे औचित्य साधून तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी महामंडळातर्फे आता थेट स्वतंत्र एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘एसटी संगे तीर्थयात्रा आता अधिक सुखकर’ या ब्रीदवाक्यासह सुरू असलेल्या या योजनेमुळे भाविकांना त्यांच्या पसंतीच्या तीर्थक्षेत्रांना भेट देणे अत्यंत सोपे होणार आहे.

​या विशेष योजनेच्या नियमांनुसार, जर भाविकांचा किंवा प्रवाशांचा किमान ४० जणांचा गट एकत्र आला, तर त्यांना महामंडळाकडून पूर्णपणे स्वतंत्र बसची सुविधा दिली जाईल. यामध्ये महिला मंडळे, भजनी मंडळे, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट किंवा कोणत्याही ४० नागरिकांचा समूह एकत्र येऊन या योजनेअंतर्गत थेट एसटी बस बुक करू शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भाविकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या तीर्थक्षेत्रासाठी ही स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय एकत्र आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल.

​या योजनेमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. महिलांसाठी सुरक्षित प्रवास आणि आध्यात्मिक अनुभवासोबतच नियमांनुसार तिकिटात विशेष सवलत दिली जाणार आहे. ‘अर्ध्या तिकिटात सोयीस्कर तीर्थयात्रा’ आणि ‘सुरक्षित व आरामदायी प्रवास’ या वैशिष्ट्यांमुळे या योजनेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या योजनेची माहिती प्रसिद्ध केली असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आणि बस बुकिंगसाठी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी (डेपो) संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

Sawantwadi: ऐतिहासिक मोती तलावाचा होणार कायापालट; पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी फूड प्लाझा, बोटिंगसह ईतर प्रकल्पांचा आराखडा तयार

   Follow us on        

सावंतवाडी:सुमारे १५० वर्षांचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या आणि सावंतवाडीची शान असलेल्या ‘मोती तलावाचा’ आता पूर्णपणे कायापालट होणार असून या ऐतिहासिक तलावाला नवसंजीवनी मिळणार आहे. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी तलावाचा ऐतिहासिक लुक कायम ठेवून परिसराचा विकास केला जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी विकास आराखड्याचे (प्रोजेक्ट) सादरीकरण महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे आणि माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत करण्यात आले. त्यानंतर नगराध्यक्षा युवराज्ञी श्रद्धा राजे भोसले व युवराज लखमराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत या संदर्भातील माहिती दिली. हा दूरदृष्टी आराखडा ‘रतन जे. बटलीबोई कन्सल्टंट्स प्रा. लि.’ आणि ‘ईडन एलएलपी’ यांच्या सहकार्याने तयार करण्यात आला आहे.

​तलावाच्या सौंदर्यीकरणासोबतच त्याच्या संवर्धनासाठी विशेष काळजी घेतली जाणार आहे. तलाव परिसरातील भिंतींचे संरक्षण करण्यासोबतच, तलावातील पाणी गढूळ होऊ नये म्हणून ‘फिल्टर प्लांट’ बसवण्यात येणार आहे, ज्यामुळे केवळ स्वच्छ पाणीच तलावात जाईल आणि माती आत जाणार नाही. पर्यटनाला चालना देण्यासाठी तलावाच्या खाऊ गल्लीसाठीच्या आरक्षित भागात वाढ करून तिथे भव्य ‘फूड प्लाझा’ आणि ‘बोटिंग प्रोजेक्ट’ उभारला जाणार आहे. याशिवाय, फेस्टिव्हल मार्केटसाठी स्वतंत्र जागा, हँड क्राफ्टसह कलावंतांसाठी राखीव जागा आणि स्थानिक कलाप्रकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी राजवाड्यासमोर ‘ओपन एम्फीथिएटर’ उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली आहे.

​या प्रकल्पात लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पर्यटकांसाठी विशेष बैठक व्यवस्था केली जाणार आहे. ऐतिहासिक टच असलेल्या बैठकांसह तलावाच्या काठावर बसून निसर्गरम्य दृश्य पाहता येईल अशी व्यवस्था केली जाईल. गणेश विसर्जनाचा भाग देखील ‘व्ह्यू पॉईंट’ म्हणून विकसित केला जाणार आहे. सुमारे ३१ एकर क्षेत्रात पसरलेल्या या ऐतिहासिक मोती तलावाला ग्लोबल स्तरावर ओळख मिळवून देणे आणि शहराबाहेरून जाणारा पर्यटक सावंतवाडीकडे कसा वळेल यासाठी आमचा प्रयत्न राहील, अशी ग्वाही युवराज लखमराजे भोसले यांनी दिली. तसेच, आपल्या कारकिर्दीत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस नगराध्यक्षा श्रद्धा राजे भोसले यांनी व्यक्त केला असून, या प्रकल्पासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘आयएनएस गुलदार’ अरबी समुद्रात विसावली; सिंधुदुर्गात साकारणार देशातील पहिले पाण्याखालील संग्रहालय आणि पर्यटन केंद्र

   Follow us on        

सिंधुदुर्ग:भारतीय नौदला सेवेतून निवृत्त झालेली ‘आयएनएस गुलदार’ (INS Guldar) ही युद्धनौका महाराष्ट्र सरकारच्या पर्यटन विकास महामंडळाने (MTDC) सिंधुदुर्ग किनारपट्टीवरील निवती रॉक जवळ यशस्वीरित्या समुद्रात बुडवली आहे. सुमारे २० ते २२ मीटर खोल समुद्राच्या तळाशी ही नौका आता विसावली असून, याद्वारे भारतात पहिल्यांदाच पाण्याखालील युद्धनौका संग्रहालय, कृत्रिम प्रवाळ (Artificial Coral Reef) आणि पाणबुडी (Submarine) पर्यटनाचा अनोखा प्रकल्प साकारला जात आहे. १९ मे रोजी विजयदुर्गजवळ अत्यंत काळजीपूर्वक आणि तज्ज्ञांच्या देखरेखीखाली तब्बल ३६ तासांच्या अथक परिश्रमानंतर ही मोहीम फत्ते करण्यात आली. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे नौदल वारशाचे जतन करत सागरी पर्यटनाला चालना देणारा हा केवळ भारतातीलच नव्हे, तर संपूर्ण आशियातील पहिलाच अभिनव उपक्रम ठरला आहे.

​जवळपास चार दशके भारतीय नौदलात शौर्य गाजवणारी कुंभीर-श्रेणीतील ही लँडिंग शिप १२ जानेवारी २०२४ रोजी सेवेतून निवृत्त झाली होती. त्यानंतर फेब्रुवारी २०२५ मध्ये नौदलाने ही नौका महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडे विनामूल्य सुपूर्द केली. नौका समुद्रात विलीन करण्यापूर्वी तिची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली आणि सागरी पर्यावरणाला तसेच जलचरांना कोणताही धोका पोहोचू नये म्हणून त्यातील सर्व घातक व रासायनिक पदार्थ काढून टाकण्यात आले. मुख्यमंत्री आणि पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या सहकार्याने MTDC चे व्यवस्थापकीय संचालक निलेश गथाणे आणि त्यांची टीम या प्रकल्पावर काम करत आहे.

​हा प्रकल्प पुढील दीड वर्षात पर्यटकांसाठी पूर्णपणे खुला होण्याची शक्यता आहे. एकदा हा प्रकल्प सुरू झाला की, पर्यटकांना ‘पॅडी’ (PADI) प्रमाणित डायव्हर्सच्या मार्गदर्शनाखाली समुद्रात स्कुबा डायव्हिंग करून या खऱ्याखुऱ्या युद्धनौकेचा थरार जवळून अनुभवता येईल. तसेच ज्यांना पाण्यात उतरणे शक्य नाही, त्यांच्यासाठी विशेष पाणबुडी (Submarine) पर्यटनाची सोय केली जाणार आहे, जेणेकरून सुरक्षितपणे या ऐतिहासिक नौकेचे दर्शन घेता येईल. या जहाजाच्या अवशेषांवर हळूहळू वनस्पती, मासे आणि प्रवाळांची वाढ होऊन त्याचे रूपांतर एका मोठ्या कृत्रिम बेटासारख्या परिसंस्थेत होईल, ज्यामुळे सागरी जीवनाला मोठा फायदा होईल. या ऐतिहासिक आणि साहसी प्रकल्पामुळे कोकण किनारपट्टीवरील पर्यटनाला मोठी गती मिळणार असून, स्थानिक कोळी बांधव आणि तरुणांसाठी रोजगाराच्या अनेक नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.

🌏 आपली जाहिरात लाखो वाचकापर्यंत पोहोचवा. जाहिरातीचा स्लॉट बूक करण्यासाठी संपर्क – 9356968462

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search