सिंधुदुर्ग:आचरा येथील श्री निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आचरा देवराई परिसरात बुधवार दि. ४ जानेवारी रोजी श्री मारुती च्या भव्य दिव्य मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल अशी येथील ग्रामस्थांची आशा आहे.
या स्थापना सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी श्री विनीत मिराशी, श्री कपिल गुरव, श्री मुकुंद घाडी , श्री दशरथ घाडी , श्री रमेश पुजारे , श्री गावकर , श्री अरविंद सावंत , श्री आशिष सावंत यांसह श्री जगदीश तावडे, श्री पवन पराडकर आदी उपस्थित होते. सर्व मानकरी यांचा पद्धतीप्रमाणे श्रीफळ दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विलास मांजरेकर व श्री ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा श्री निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. . सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे श्री मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.. उपस्थित सर्वांना तीर्थ, प्रसाद वाटप करण्यात आला. . देवराई परिसरात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. . देवराईतील औषधी वनस्पती , देव वृक्ष ,नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येकाच्या मुखातून निघत होते.
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘रत्नागिरी दर्शन‘ हि बस फेरी चालविण्यात येणार आहे. दिनांक २८ डिसेंबर ते ०१ जानेवारी दरम्यान दररोज हि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
आडिवरे,कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा आणि गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरी स्थानकावर हा प्रवास संपवला जाणार आहे.
मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या, शुक्रवार दिनांक 23/12/2022 पासून सुरू होत आहे.
या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
अशी आहे सेवा…
मुंबई सेंट्रल ह्या स्थानकावरून सुटून पनवेल पर्यंत मार्गात येणारी महत्त्वाची स्थानके घेऊन ही गाडी चिपळूण, लांजा, राजापूर, खारेपाटण, तारला, कणकवली, कसाल, आरोस, कुडाळ,सावंतवाडी, इन्सुलि, बांदा, पत्रादेवी, म्हापसा आणि पणजी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.
सुटणार : मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : पणजीमध्ये सकाळी ७ वाजता
परतीचा प्रवास
सुटणार : पणजीहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : मुंबईसेंट्रल येथे सकाळी ७ वाजता
मुंबई सेंट्रल ते काही महत्त्वाच्या स्थानकापर्यंत प्रवासी भाडे
मुंबई सेंट्रल – चिपळूण > ५९५ रुपये
मुंबई सेंट्रल – राजापूर > ८८० रुपये
मुंबई सेंट्रल – कणकवली > १००५ रुपये
मुंबई सेंट्रल – कुडाळ > १०८५ रुपये
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी > ११२५ रुपये
मुंबई सेंट्रल – बांदा > ११५० रुपये
मुंबई सेंट्रल – पत्रादेवी > ११६० रुपये
मुंबई सेंट्रल – पणजी > १२५५ रुपये
वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी कोकण तसेच गोवा ह्या ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत त्यांना ही सेवा फायदेशीर ठरेल अशी आशा एसटी महामंडळाने केली आहे.
ह्या गाडीचे आरक्षण MSRTC च्या पोर्टल वर आणि मोबाईल अॅ प वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.
ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.
Follow us on
सहलीची रूपरेषा
दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.
कातळशिल्पे म्हणजे काय?
नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.
सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2023 या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या वार्षिकोत्समध्ये दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार 4 फेब्रुवारी हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.
दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते. आता सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ देखील प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुलभ झाला आहे.
आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते.
konkan Tourism News :पर्यटन संचालनालयामार्फत “टूरसर्किट द्वारे” दि.3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एकदिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील.
या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य” या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार आहे.
दि.3 व 4 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.1 डिसेंबर,22 पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.5 डिसेंबर,22 पर्यंत करणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षण आणि अधिक माहितीसाठी 9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
रायगड :नेरळ माथेरान ला भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. येथील प्रसिद्ध असलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु होणार आहे. उद्या दिनांक २२ ओक्टोम्बर रोजी हि सेवा पुन्हा चालू होणार आहे असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
येथे पडणाऱ्या मुसळधार पाऊस आणि त्यामुळे होणारे भुरस्सलन ह्यामुळे ह्या मार्गावरील रेल्वे रुळे खराब झाल्याकारणाने हि सेवा बंद करावी लागली होती. मागील ३ वर्षे हि सेवा बंद होती. आता ह्या रेल्वे मार्गात काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.
उद्यापासून खालील सेवा चालू होतील
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन
नेरळ-माथेरान-नेरळ ह्या मार्गावर मिनी ट्रेन स्वरूपात 4 गाड्या चालवनिण्यात येणार आहेत. त्यापैकी २ नेरळ ते माथेरान आणि २ माथेरान ते नेरळ अशा चालणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत.
माथेरान ते अमन लॉज (शटल सेवा)
ह्या मार्गावर टॉय ट्रेन स्वरूपात ६ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ह्या सर्व गाड्या ६ कोच सहित धावणार आहेत.
देवगड – मालवण – वेंगुर्ला रेल्वेमार्ग लवकरात लवकर अस्तित्वात यावा ह्यासाठी केंदीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांनी ह्या प्रकल्पाबाबत चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे.
127 किलोमीटर च्या ह्या रेल्वे मार्गासाठी नारायण यांनी पुढाकार घेतला होता. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व महत्त्वाचे किनारे ह्या मार्गा मुळे जोडले जाणार आहेत. कणकवली ते सावंतवाडी व्हाया देवगड मालवण वेंगुर्ला असा हा रेल्वे मार्ग असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोकण किनार पट्टीत सध्या रेल्वे मार्ग अस्तित्वात नाही आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी हा रेल्वे मार्ग महत्वाचा वाटा उचलेल हे नक्की. ह्या मार्गावर टुरिस्ट ट्रेन किंवा माथेरान, सिमला येथे चालविण्यात येणाऱ्या ट्रेन सारख्या गाड्या चालू करण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे. त्यासंदर्भात त्यांनी केंदीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना 2021 साली एक पत्र लिहिले होते. ह्या प्रस्तावित ‘टॉय ट्रेन’ च्या मार्गाचा एक प्राथमिक सर्वे पण करण्यात आला होता.
अंबरनाथ : अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भूत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते. शिलाहार राज घराण्यातील माम्वाणी राजाच्या काळात इ. स. १०६० मध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिरावरील शिलालेखावर आढळतो. सांस्कृतिक वारसा म्हणून जगभरातील ज्या २१८ कलासंपन्न वास्तू युनेस्कोने जाहीर केल्या, त्यांमध्ये महाराष्ट्रातील अंबरनाथच्या या प्राचीन शिवमंदिराचा समावेश आहे. उत्तर कोकणावर राज्य करणाऱ्या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने १०२२ ते ३५ या काळात हे शिवालय उभारण्यास प्रारंभ केला आणि इ. स. १०६०- ६१मध्ये छित्तराजाच्या धाकट्या भावाच्या माम्वाणी राजाच्या काळात या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाले.
देशातील बारा ज्योतिर्लिंगांइतकेच हे मंदिर जुने आहे. हे एक भूमिज मंदिर आहे, ज्याचे द्राविडीकरण केले गेले आहे, असे म्हटले जाते. सभामंडप सर्व बाजूंनी बंद आहे. मंडपाच्या मध्यभागी चार खांबांवर आधारलेले एक घुमटाकृती छत आहे. या छताच्या मध्यभागी झुंबर आहे. या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावीत, अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरली आहेत.या मंदिराभोवतालची भिंत आणि समोरचा नंदीमंडप कालौघात नष्ट झाले असले तरी मूळ मंदिर मात्र अजून टिकून आहे. सध्या असलेले मंदिर दोनच भागात आहे. गाभारा आणि सभामंडप. गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागी आहे. गाभार्याच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव, सिंह आणि हत्ती यांच्या सुरेख आकृती कोरलेल्या आहेत. या मंदिरावर गरुडासन विष्णू, मंदिराची निर्मिती करणारा स्थापती, कपालधारी शिव, विवाह पूर्वीची पार्वती, शिव पार्वती विवाह सोहळा, चंडिका, पार्वती चामुंडा, नटराज, कालीमाता, महिषासुर मर्दिनी, गणेश नृत्य मूर्ती, नृसिंह अवताराची मूर्ती आणि गजासुर वधाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर शिल्पजडित आहे.अंतराल, सभामंडप, मंडपातील स्तंभ यांवर विविध देवदेवतांची शिल्पे साकारलेली आहेत. याच मंदिराच्या अगदी शेजारी पाण्याचा ओढा आहे. या ओढ्याला वालधुनी नदीचा ओढा असे म्हटले जाते.
अंबरनाथ शिवालय’ पुस्तकानुसार, या मंदिराच्या उत्तरेकडील दाराच्या आतल्या बाजूस एका अंधाऱ्या तुळईवर एक सहा ओळींचा शिलालेख आहे. हे मंदिर कुणी आणि केव्हा बांधलं, हे या शिलालेखावर कोरलेलं आहे.
1868 मध्ये एका ब्रिटिश सर्वेक्षण अधिकाऱ्यास हा शिलालेख दृष्टीस पडला. त्यानंतर लगेचच त्या शिलालेखाचा ठसा घेऊन विविध शास्त्रज्ञांनी त्याचं वाचन केलं आणि ‘Bombay branch of the Royal Asiatic Society’च्या जर्नलमध्ये त्यातील मजकूर प्रसिध्द झाला.
त्या शिलालेखानुसार, उत्तर कोकण शिलाहार वंशातील राजा छित्तराज यांच्या काळात या मंदिराची बांधणी सुरू झाली. तर त्यांचा धाकटा भाऊ मुम्मुणी यांच्या कारकिर्दीत, म्हणजे 1060मध्ये “…हे आम्रनाथाचे देऊळ पूर्ण झाले”, असा उल्लेख आहे. म्हणजे या ठिकाणाचं मूळ नाव ‘आम्रनाथ’ असं होतं, ज्याचा अपभ्रंश होऊन आज अंबरनाथ झालेलं आहे.
पर्यटकांसाठी पर्वणी केवळ मुंबई, महाराष्ट्रातील नाही, तर देश आणि परदेशातील पर्यटकांमध्ये हे शिवमंदिर लोकप्रिय आहे. युनेस्कोने दखल घेतलेले हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते. अज्ञातवासात असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते. याच भागात त्यांनी शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले. मात्र, कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले. त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते. मात्र, याला आधार असल्याचे दिसून येत नाही. महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येत असतात.
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अंबरनाथ स्टेशन आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून 60 किलोमीटरवर असलेल्या अंबरनाथला स्लो आणि फास्ट अशा अनेक लोकल दिवसभरात जातात. तसेच कर्जत, खोपोली आणि बदलापूर या लोकलनेही तुम्ही अंबरनाथला जाऊ शकता.
तिथून एक रिक्षा केली की सुमारे अडीच किलोमीटरवर असलेल्या या मंदिरात सहज पोहोचता येतं. आणि अवघ्या दीड-दोन तासात आपण भारतीय इतिहासाच्या एका वेगळ्याच जगात पोहोचतो.