मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात हॉटेल व्यावसायिक आणि ‘होम स्टे’ धारक यांची संख्या लक्षणीय आहे. सरकारच्या पर्यटन विभागामार्फत या उद्योगाला चालना देण्यासाठी अशा हॉटेल आणि ‘होम स्टे’ला उद्योगाचा दर्जा देण्यात आला आहे. उद्योगाला ला महावितरण मार्फत होणारा वीजपुरवठा विशिष्ठ सवलतीच्या दराने केला जातो. परंतु, अजूनही पर्यटन उद्योजकांना – हॉटेल/होम स्टे चालकांना मात्र व्यावसायिक दराने वीजपुरवठा केला जातो. या दोन वीजदरातील फरकमोठा असल्याने, पर्यटन व्यवसायिकांना नाहक प्रचंड मोठा भुर्दंड पडतो आहे. ही बाब सरकार दरबारी पोचविण्यासाठी आमदार ऊमा खापरे आणि दापोलीतील मिहीर महाजन यांनी सुरुवातीला पर्यटन मंत्री मंगलप्रभात लोढा यांची भेट घेतली. तसेच हा विषय महावितरणकडून मार्गी लागण्याचे आवश्यक असल्याने राज्याचे ऊर्जा मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेतली.
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी चालू केलेली ‘रत्नागिरी दर्शन’ ही विशेष सेवा आठवड्यातून दोन दिवस म्हणजे दर शनिवारी व रविवारी चालू ठेवण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.
वर्षाअखेरीस सोडलेल्या ह्या पर्यटक बससेवेस पर्यटक आणि स्थानिक नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसेच ही सेवा कायमस्वरूपी चालू ठेवण्याची मागणी होत होती.
या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
1.आडिवरे
2. कशेळी कनकादित्य मंदिर,
3. गणेशगुळे,
4. पावस,
5. कोळंबे कातळशिल्प
6. थिबा राजवाडा,
7. भगवती किल्ला,
8. लोकमान्य टिळक जन्मस्थान,
9. गणपतीपुळे
10. आरेवारे समुद्रकिनारा
टीप: प्रवास येथे अल्पोहार म्हणून खिचडी प्रसाद देण्यात येईल.
रत्नागिरी: रत्नागिरीकरांसाठी एक चांगली बातमी आहे. अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या रत्नागिरी विमानतळाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी ह्यासाठी पुढाकार घेतला आहे. रत्नागिरी विमानतळासाठी प्रस्तावित २८ हेक्टर जमिनीपैकी २० हेक्टर भूसंपादन झाले आहे. उर्वरित भूसंपादन जानेवारीअखेरीस होण्याची शक्यता आहे. त्यासाठी लागणारा आवश्यक ७७.७० कोटींचा निधीही शासनाकडून मिळाला आहे. भूसंपादन झाल्यानंतर विमानतळासाठी आवश्यक जमिनीचा ताबा प्रशासनाकडे येणार आहे. जमिनिचा ताबा मिळाल्यानंतर लगेचच भारतीय विमानतळ प्राधिकरण यांच्याकडून काम सुरू करण्यात येणार आहे.
विमानतळासाठी होणाऱ्या भूसंपादनामध्ये तुवंडेवाडी येथील २० हेक्टर आणि मिरजोळे येथील ८.६ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन प्रस्तावित आहे. यापैकी तुवंडेवाडी येथील जागेचे निवाडे प्रांताधिकाऱ्यांकडून करण्यात आले आहेत तर मिरजोळेतील संबंधित जमीनमालकांना नोटिसा काढण्यात आल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात त्यापैकी चार खातेदारांना भूसंपादनाचे पैसे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. भूसंपादनाला लागणारा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे. आता लवकरच संबंधित जमीनमालकांना उर्वरित जमिनीसंदर्भातील निधी वितरित करण्याचे काम निवाडे घेऊन पूर्ण करण्यात येणार आहे.
MOPA Airport news :उत्तर गोव्यातील बहुप्रतिक्षित मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ गुरुवारपासून सुरु झाले आहे. गुरुवारी हैद्राबाद-गोवा ही पहिली व्यावसायिक फ्लाईट विमानतळावर उतरली. हैद्राबादवरून 7.40 वाजता निघालेले इंडिगो कंपनीचे 6E6145 हे विमान मोपा येथील मनोहर विमानतळावर 8.40 वाजता पोहोचले. या विमानाने हैद्राबाद ते गोवा अंतर 1 तासांत पूर्ण केले. विमानातील प्रवाशांचे वाजत गाजत मोपा विमानतळावर स्वागत करण्यात आले
उत्तर गोव्यातील मोपा येथे असलेले हे विमानतळ सुरू झाल्याने केवळ गोवाच नव्हे तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील काही जिल्ह्यांनाही यामुळे चांगली कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या विमानतळावरून विमान कंपनी इंडिगोने देशातील 8 शहरांसाठी उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये देशाची राजधानी दिल्लीचाही समावेश आहे. त्याबरोबरच गो फर्स्ट आणि अकसा एअर ह्या कंपन्यांनी ह्या विमानतळावरून सेवा चालू करण्याचे जाहीर केले आहे. .
इंडिगोने मोपा विमानतळावरून 168 साप्ताहिक उड्डाणे सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही उड्डाणे हैदराबाद, दिल्ली, मुंबई, बंगळुरू, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबादसाठी असणार आहेत. गुरूवारपासून ही उड्डाणे सुरू झाली.
मुंबई ते गोवा अकसा एअर विमानाचे इकॉनॉमी क्लासचे प्रवासभाडे २३९३ रुपयांपासून सुरू होत आहे. विमान कंपन्या, प्रवासाची तारखेनुसार हे भाडे कमी जास्त आहे. हे विमानतळ सिंधुदुर्ग जिल्हयाच्या जवळ असल्याने जलद आणि आणीबाणीच्या Emergency वेळेस तळकोकणात जाण्यासाठी एक सोयीचा पर्याय ह्या विमानतळाच्या रूपाने निर्माण झाला आहे.
सध्या मुंबई ते गोवा आणि परतीसाठी इंडिगो आणि गो फर्स्ट कंपनीचे प्रत्येकी एक उड्डाण ह्या विमानतळावरून होत आहे. पुढच्या आठवड्यात अकसा एअर कंपनीपण ह्या मार्गावर येथून आपली सेवा चालू करणार आहे.
सिंधुदुर्ग:आचरा येथील श्री निलेश नंदकुमार सरजोशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आचरा देवराई परिसरात बुधवार दि. ४ जानेवारी रोजी श्री मारुती च्या भव्य दिव्य मूर्तीची विधिवत स्थापना करण्यात आली आहे. ही भव्य मूर्ती पर्यटकांचे आकर्षण ठरेल अशी येथील ग्रामस्थांची आशा आहे.
या स्थापना सोहळ्याला आचरा गावचे प्रमुख मानकरी श्री विनीत मिराशी, श्री कपिल गुरव, श्री मुकुंद घाडी , श्री दशरथ घाडी , श्री रमेश पुजारे , श्री गावकर , श्री अरविंद सावंत , श्री आशिष सावंत यांसह श्री जगदीश तावडे, श्री पवन पराडकर आदी उपस्थित होते. सर्व मानकरी यांचा पद्धतीप्रमाणे श्रीफळ दक्षिणा देऊन सन्मान करण्यात आला.
सावंतवाडी येथील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विलास मांजरेकर व श्री ओमकार मांजरेकर या पिता पुत्रांनी ही मूर्ती तयार केली. त्यांचा श्री निलेश सरजोशी आणि कुटुंबीय यांच्या हस्ते शाल , श्रीफळ, पुष्पगुच्छ , भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. . सिंधुदुर्गात प्रथमच एवढी महाकाय मूर्ती स्थापन होत असल्याचे श्री मांजरेकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.. उपस्थित सर्वांना तीर्थ, प्रसाद वाटप करण्यात आला. . देवराई परिसरात येत्या काही काळातच श्री नवग्रह मंदिर बांधून पूर्ण होणार आहे. . देवराईतील औषधी वनस्पती , देव वृक्ष ,नवग्रह मंदिर आणि साथीला आजची श्रीं ची भव्य आणि दिव्य मूर्ती भविष्यात पर्यटकांना नक्कीच आकर्षण ठरेल असे उद्गार यावेळी प्रत्येकाच्या मुखातून निघत होते.
रत्नागिरी : रत्नागिरी एसटी विभागातर्फे वर्षअखेर साजरे करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘रत्नागिरी दर्शन‘ हि बस फेरी चालविण्यात येणार आहे. दिनांक २८ डिसेंबर ते ०१ जानेवारी दरम्यान दररोज हि सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.या फेरीत पर्यटकांना रत्नागिरी,राजापूर आणि आजूबाजूच्या परिसरातील पर्यटन स्थळे पाहता येतील. दररोज सकाळी ८ वाजता रत्नागिरी स्थानकातून हि बस सोडण्यात येणार आहे.
खालील पर्यटन स्थळे दाखविण्यात येतील.
आडिवरे,कशेळी कनकादित्य मंदिर, कशेळी देवघळी, गणेशगुळे, पावस, थिबा राजवाडा, भगवती किल्ला, लोकमान्य टिळक जन्मस्थान, आरेवारे समुद्रकिनारा आणि गणपतीपुळे ह्या पर्यटन स्थळांना भेटी देण्यात येणार आहेत. संध्याकाळी ७ वाजता रत्नागिरी स्थानकावर हा प्रवास संपवला जाणार आहे.
मुंबई :महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) मुंबई-पणजी मार्गावर वातानुकूलित (एसी) शिवशाही सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही सेवा उद्या, शुक्रवार दिनांक 23/12/2022 पासून सुरू होत आहे.
या मार्गावर धावणाऱ्या खासगी बसचे भाडे साधारण दीड हजार आहे. पुढील आठवड्यात खासगीचे भाडे दोन ते अडीच हजारांवर जाण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत प्रवाशांना एसटीच्या शिवशाहीचा आरामदायी पर्याय उपलब्ध होत आहे. याचे आरक्षण एसटीच्या आरक्षण कार्यालयांसह एमएसआरटीसी मोबाइल अॅपवरूनही करता येईल, अशी माहिती एसटी महामंडळाने दिली.
अशी आहे सेवा…
मुंबई सेंट्रल ह्या स्थानकावरून सुटून पनवेल पर्यंत मार्गात येणारी महत्त्वाची स्थानके घेऊन ही गाडी चिपळूण, लांजा, राजापूर, खारेपाटण, तारला, कणकवली, कसाल, आरोस, कुडाळ,सावंतवाडी, इन्सुलि, बांदा, पत्रादेवी, म्हापसा आणि पणजी ह्या स्थानकांवर थांबणार आहे.
सुटणार : मुंबई सेंट्रलहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : पणजीमध्ये सकाळी ७ वाजता
परतीचा प्रवास
सुटणार : पणजीहून दुपारी ४.३० वाजता
पोहोचणार : मुंबईसेंट्रल येथे सकाळी ७ वाजता
मुंबई सेंट्रल ते काही महत्त्वाच्या स्थानकापर्यंत प्रवासी भाडे
मुंबई सेंट्रल – चिपळूण > ५९५ रुपये
मुंबई सेंट्रल – राजापूर > ८८० रुपये
मुंबई सेंट्रल – कणकवली > १००५ रुपये
मुंबई सेंट्रल – कुडाळ > १०८५ रुपये
मुंबई सेंट्रल – सावंतवाडी > ११२५ रुपये
मुंबई सेंट्रल – बांदा > ११५० रुपये
मुंबई सेंट्रल – पत्रादेवी > ११६० रुपये
मुंबई सेंट्रल – पणजी > १२५५ रुपये
वर्षाखेरीस शनिवार-रविवार आल्याने अनेकांनी कोकण तसेच गोवा ह्या ठिकाणी नववर्ष साजरे करण्याचे बेत आखले आहेत त्यांना ही सेवा फायदेशीर ठरेल अशी आशा एसटी महामंडळाने केली आहे.
ह्या गाडीचे आरक्षण MSRTC च्या पोर्टल वर आणि मोबाईल अॅ प वर उपलब्ध करून देण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग: देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीने देवगड येथे कातळशिल्प सहलीचे आयोजन केले आहे. दिनांक ८ जानेवारी २०२३ ला हि सहल आयोजित केली गेली आहे. ह्या सहलीत देवगड विविध ठिकाणाची १८ कातळशिल्प दाखवली जातील.
ह्या सहलीसाठी ४५० रुपये आकारण्यात येणार आहेत त्यामध्ये प्रवास भाडे, सकाळचा चहा, नाश्ता आणि दुपारी शाकाहारी जेवण समाविष्ट असेल. पर्यटक स्वतःची गाडी पण या सहलीसाठी आणू शकतात. अशा पर्यटकांना सवलत दिली जाईल.
Follow us on
सहलीची रूपरेषा
दिनांक – रविवार दिनांक ८ जानेवारी २०२३ रोजी सकाळी 8:00 वाजता देवगड स्टॅन्ड वरून प्रवासाला सुरवात होणार आहे. वाघोटन येथील कातळशिल्प व ऐतिहासिक वास्तू पाहून त्यानंतर बापर्डे,वानिवडे,तळेबाजार, दाभोळे येथील पोखरबावं येथील कातळशिल्पे पाहून माघारी फिरुन देवगडला सहल समाप्त होईल. या पूर्ण सहलीत 15 ते 18 सुबक कातळ शिल्पे पाहायला मिळतील.
कातळशिल्पे म्हणजे काय?
नवाश्मयुगीन माणसाने जांभा खडकावर म्हणजेच कातळावर जी चित्रे कोरली त्यालाच आपण कातळशिल्प असे म्हणतो. कातळशिल्प जगात काही मोजक्या ठिकाणीच आढळतात ब्राझील, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका या ठिकाणी आढळून आली आहेत. पण भारतातील कोकणात फार मोठ्या प्रमाणात ती आढळतात आणि याचंच भान राखून देवगड इतिहास संशोधन मंडळाने कातळशिल्प शोध मोहीम व ती सुरक्षित करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना साथ म्हणून ह्या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
ह्या सहलीबद्दल अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी श्री अजित टाककर ,मोबाईल नंबर -9689163017 यांच्याशी संपर्क साधावा.
सिंधुदुर्ग-मालवण: दक्षिण कोकणची काशी अशी ओळख असलेल्या आंगणेवाडीची जत्रा यंदा शनिवारी दिनांक 4 फेब्रुवारी 2023 या दिवशी संपन्न होणार आहे. नुकतीच या यात्रेच्या तारखेची घोषणा करण्यात आली आहे. दरवर्षी कोकणवासियांना या यात्रेच्या तारखेबद्दल उत्सुकता असते. आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला या वार्षिकोत्समध्ये दर्शनाला भाविक देशा-परदेशातून येतात.
आंगणेवाडीच्या यात्रेसाठी देवीला कौल लावून तारीख निश्चित करण्याची पद्धत आहे. आजही लावलेल्या कौलानुसार 4 फेब्रुवारी हा दिवस यात्रेसाठी ठरवण्यात आला आहे.
दरवर्षी आंगणेवाडीच्या जत्रोत्सवासाठी रेल्वे प्रशासनाकडूनही विशेष रेल्वे फेर्या चालवल्या जातात. एसटी कडूनही भाविकांना खास बससेवा असते. आता सिंधुदुर्गामध्ये चिपी विमानतळ देखील प्रवासी सेवेसाठी खुले करण्यात आले आहे त्यामुळे भाविकांसाठी प्रवास वेगवान आणि सुलभ झाला आहे.
आंगणेवाडीच्या देवीच्या दर्शनाला या जत्रोत्सवामध्ये अनेक सेलिब्रिटी, राजकीय मंडळी आवर्जुन हजेरी लावतात. लाखो भक्त दिवसभरात देवीचं दर्शन घेतात. यासाठी विशेष सोय केली जाते.
konkan Tourism News :पर्यटन संचालनालयामार्फत “टूरसर्किट द्वारे” दि.3 व 4 तसेच 7 व 8 डिसेंबर, 2022 या कालावधीत कोकणातल्या महाड येथील चवदार तळे आणि गांधारपाले बौध्द लेणी या पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी नि:शुल्क एकदिवशीय सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या सहलींसाठीच्या बसेस सीबीडी, बेलापूर/कोकण भवन, नवी मुंबई या बसस्थानकांवरून नियोजित वेळेवर वर नमूद तारखांना सोडण्यात येतील.
या सहलीमध्ये पर्यटकांसाठी बससेवा, गाईड, अल्पोपहार, दुपारचे जेवण व पिण्याचे पाणी या सर्व सुविधा नि:शुल्क पुरविण्यात येणार आहेत. “प्रथम येणाऱ्यास प्रथम सेवा प्राधान्य” या शर्तीवर सहलीचे आरक्षण स्विकारण्यात येणार आहे.
दि.3 व 4 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.1 डिसेंबर,22 पर्यंत व दि.7 व 8 डिसेंबर,22 साठी आगाऊ आरक्षण दि.5 डिसेंबर,22 पर्यंत करणे अनिवार्य आहे. आगाऊ आरक्षण आणि अधिक माहितीसाठी 9930359384/9421051708 या क्रमांकांवर तसेच [email protected] या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधावा.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.