Category Archives: महाराष्ट्र

Nagpur-Goa Expressway Updates: नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती महामार्ग आणि ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाचे कोकणात ‘या’ ठिकाणी होणार मिलन

मुंबई :नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या संरेखनास महाराष्ट्र राज्य सरकारने मान्यता दिली आहे. एकूण ६ लेन असलेला ८०६ किलोमीटर लांबीचा हा महामार्ग राज्यातील सर्वात लांबीचा महामार्ग म्हणून ओळखला जाणार आहे. लवकरच या मार्गासाठी भूसंपादन प्रकियेस सुरवात होणार आहे अशी माहिती समोर आली आहे.

ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्गाशी जोडणी
हा महामार्ग कोल्हापूर येथून आंबोलीमार्गे तळकोकणात येणार आहे. या महामार्गाची समाप्ती बांदा येथील आरटीओ च्या जवळ होणार आहे. येथेच प्रस्तावित ग्रीनफील्ड कोकण एक्सप्रेस महामार्ग या महामार्गाशी जोडण्यात येणार आहे.

नागपूर येथून सुरु होणार हा महामार्ग एकूण ११ जिल्ह्यातून जाणार आहे. यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, उस्मानाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि पत्रादेवी (उत्तर गोवा) अशी या जिल्ह्यांची नवे आहेत. प्रकल्पाचा अंदाजित एकूण खर्च ८३ हजार ६०० कोटी एवढा आहे. प्रकल्प पूर्ण करण्याची अंतिम तारीख जाहीर केली नसली तरी २०२८-२९ पर्यंत हा महामार्ग पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

 

खुशखबर! लवकरच बेस्ट बसेस अटल सेतूवरून धावणार

MTHL News: नुकत्याच सुरू करण्यात आलेल्या आणि देशातील सर्वात लांब सागरी सेतू म्हणुन ओळखल्या जाणार्‍या मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवर MHTL (अटल सेतू) वर बेस्ट BEST आता प्रीमियम बस सेवा  सुरु करणार आहे. 

ही प्रीमियम बस कोकण भवन, बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर दरम्यान चालविण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बसला S-145 असा नंबर देण्यात आला असून तिचे साई संगम, तारघर, उल्वे नोड, आई तरुमाता, कामधेनु ओकलैंड्स, एमटीएचएल, ईस्टर्न मोटरवे, सीएसएमटी, चर्चगेट स्टेशन और कफ परेड हे स्टॉप असतिल.चलो अॅपद्वारे (Chalo App) या बसमध्ये आसन आरक्षित केल्या जाऊ शकतील. 

सकाळी बेलापूर ते वर्ल्ड ट्रेड सेंटर आणि दुपारी दोन वाजता वर्ल्ड ट्रेड सेंटर ते बेलापूर अशा दोन सेवा सुरुवातीला चालविण्यात येतील. ही बस सेवा प्रीमियम बस सेवा असणार आहे. या बसचे तिकीट दर जाहीर केले नाही आहेत.

या प्रीमियम बससेवे नंतर लवकरच सामान्य बस सुद्धा या मार्गावर चालविण्यात येणार आहेत. सार्वजनिक वाहनांचा टोल भार सरकार सहन करत असल्याने त्याचा परिणाम तिकिट दरात होणार नसल्याने या सामान्य बस चा तिकीटदर ईतर बस प्रमाणे असतिल असे बेस्ट च्या अधिकार्‍यांनी सांगितले आहे.

शिवसेनेला एक कोटी दिल्याचा मंत्री दीपक केसरकर यांचा खळबळजनक दावा

सावंतवाडी : धनादेशाद्वारे मी शिवसेनेला (ठाकरे गट) एक कोटी रुपये दिले होते आणि ते दिल्याचा माझ्याकडे पुरावा असल्याचा खळबळजनक दावाही दीपक केसरकर यांनी केला. शिवसेना (Shiv Sena) ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दोन दिवसांपूर्वीच सिंधुदुर्ग जिल्ह्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सावंतवाडीतील जनसंवाद यात्रेतून मंत्री केसरकर यांच्यावर टीका केली होती. त्याला मंत्री केसरकर यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.
केसरकर म्हणाले, ‘माझ्या श्रद्धेवर ठाकरे यांनी संशय घेतला. मात्र, मी शिर्डीहून आणलेली साईबाबांची शाल ठाकरे यांना घातल्यानंतर ते मुख्यमंत्री झाले, याची कबुली रश्मी ठाकरे यांनी दिली होती. मग आता सावंतवाडीत येऊन खोटे कशाला बोलायचे? मला गद्दार म्हणण्याचा ठाकरे यांना अधिकार नाही. त्यांचे कर्तृत्व काय?
माझ्यात कर्तृत्व असूनही मला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी २०१४ मध्ये राज्यमंत्री केले; पण नंतरच्या काळात सत्ता आल्यानंतर माझ्याकडून कमिटमेंट पूर्ण न झाल्यानेच मला मंत्री करण्यात आले नाही. याची खुद्द आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनीच कबुली दिल्याचा दावा राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. मुख्यमंत्री असताना लोकांना सोडा, आमदारांनाही ते भेटत नव्हते. मी तब्बल दोन महिने मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानाच्या बाहेर वाट बघत होतो; पण मला कधी भेटही मिळत नव्हती. मग त्यांच्याकडे लोक थांबणार कसे? मी स्वतःहून नाही, तर मला भाजपकडून निमंत्रण असतानाही ठाकरे यांनी सतत निमंत्रण दिले, म्हणून मी शिवसेनेत गेलो.’ असे ते पुढे म्हणालेत 
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आलेल्या उद्धव ठाकरे यांनी आपण पाणबुडी प्रकल्प मंजूर केल्याचा व तो गुजरातला नेण्यात आल्याचे सांगितले; पण वस्तुस्थिती सर्वांनी जाणून घ्यावी. पाणबुडी प्रकल्प मी स्वतः मंजूर केला होता; पण नंतरच्या पर्यटनमंत्र्यांनी तो प्रकल्प पुढे सरकवला नाही. त्यामुळेच तो रद्द झाला; मात्र आताच्या पर्यटनमंत्र्यांनी तो मंजूर केला असल्याचे मंत्री केसरकरांनी यावेळी सांगितले.
मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेनेची मते लाखांच्या आतमध्ये होती; पण मी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर हीच मते लाखांच्या बाहेर गेली. त्यामुळेच वैभव नाईक तसेच विनायक राऊत हे निवडून आल्याचा दावाही मंत्री केसरकर यांनी यावेळी केला.

कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेलची सुविधा उपलब्ध होणार

Konkan Railway News: या वर्षापासून कोकण रेल्वेच्या मडगाव रेल्वे स्टेशनवर पॉड हॉटेल ही सुविधा उपलब्ध करण्यात येत असल्याचे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे. कोकण रेल्वेने प्रवाशांसाठी हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
पॉड हॉटेलला कॅप्सूल हॉटेल म्हणूनही ओळखले जाते आणि एक अद्वितीय प्रकारची मूलभूत, परवडणारी निवास व्यवस्था याद्वारे प्रवाशांना दिली जाते. मडगाव रेल्वे स्टेशनच्या इमारतीतच ही सेवा दिली जाणार आहे. प्रत्येक अतिथीसाठी एक कॅप्सूल दिली जाते. मूलत: बेडच्या आकाराचे हे पॉड जे दरवाजा किंवा पडद्याने बंद करता येतात.
याचा फायदा ज्येष्ठ नागरिकांसह ज्यांच्या रेल्वेगाडीला बराच विलंब असणार आहे, त्यांना होऊ शकतो. कमी वेळेत हॉटेल रूम शोधणे बऱ्याचदा प्रवाशांसाठी जिकिरीचे असते. अशावेळी प्रवाशांना या पॉड हॉटेलचा फायदा होऊ शकतो.
या सेवेसाठी तासाला नाममात्र शुल्क आकारले जाणार आहे. प्रवाशांना साह्य करणे हाच यापाठीमागचा हेतू आहे. तथापि, त्यातून कोकण रेल्वेला महसूलही मिळणार आहे.

”…. म्हणुन गाड्यांचे हे डबे कमी केले जात आहेत.” गाड्यांचे स्लीपर कोचेस कमी केल्यावर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांचे स्पष्टीकरण

नागपूर: रेल्वेत प्रवाशांकडून वातानुकूलित (एसी) कोचला जास्त मागणी असल्याने ‘स्लिपर कोच’ कमी करून ‘एसी कोच’ वाढवले गेले, असा दावा मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव यांनी केला.

मध्य रेल्वे नागपूर मंडळाच्या रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी पत्रकारांनी मध्य रेल्वेसह देशभरात प्रवासी गाड्यांमधील सातत्याने स्लिपर कोच कमी होऊन वातानुकूलित ‘थ्री टायर एसी कोच’ वाढत असल्याकडे लक्ष वेधले होते. त्यावर राम करण यादव पुढे म्हणाले, रेल्वेत सातत्याने प्रवाशांकडून ‘स्लिपर’च्या तुलनेत ‘थ्री टायर एसी’ची मागणी जास्त वाढल्याचे दिसत आहे. त्यामुळे वातानुकूलित कोच वाढवले गेले.

देशातील काही ठिकाणी मागणीनुसार ‘स्लिपर कोच’च्याही गाड्या चालवल्या जात आहेत. त्यातच सध्या ‘एसी थ्री टायर’ आणि ‘स्लिपर कोच’मधील सीटच्या प्रवासी भाड्यात खूप जास्त फरक नाही. रेल्वेकडून सातत्याने पायाभूत सुविधा बळकट केली जात असून थ्री लाईन, फोर लाईनसह इतरही कामांना गती दिली गेली आहे. हे काम पूर्ण झाल्यावर मग कमी झालेल्या पॅसेंजर रेल्वे पुन्हा चालवण्याबाबत प्रक्रिया होण्याची आशा आहे. मध्य रेल्वेत अमृत भारत योजनेअंतर्गत १५ रेल्वे स्थानकांचा विकास होत असल्याचेही यादव म्हणाले.

 

महाव्यवस्थापकांचा दावा कितपत योग्य? 

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या आणि मांडवी या दोन गाड्यांचे दोन स्लीपर डबे कमी करून त्या जागी दोन ‘ईकाॅनाॅमी थ्री टायर एसी’ चे डबे जोडले गेले आहेत. या दोन्ही गाड्या मध्य रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर चालवते. या गाड्यांना स्लीपर कोचपेक्षा एसी कोचला जास्त मागणी होती हे म्हणणे पूर्णपणे चुकीचे ठरेल. कारण या गाड्यांच्या स्लीपर कोच च्या तिकीट चार महिने आगावू बूक करताना भेटणे मुश्किल होत असे. मग मागणी कमी कशी असा प्रश्न प्रवाशांकडून विचाराला जात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्लीपर श्रेणी आणि थ्री टायर एसी यांच्या तिकीट दरांमध्ये जास्त फरक नाही असे महाव्यवस्थापक बोलत आहेत. पण खरे पाहता थ्री टायर एसी चे प्रवासभाडे स्लीपर श्रेणीपेक्षा जवळपास तिप्पट आहे. त्यामुळे त्यांचा हा दावा पण चुकीचा आहे असे प्रवाशांकडून बोलले जात आहे.

पुण्यात नाटकामध्ये हिंदू देवतांचा अपमान; सीतामाईचे पात्र करणार्‍या कलाकाराचे आक्षेपार्ह वर्तन..

पुणे: अयोध्येत नुकतेच प्रभू रामलल्लांच्या मूर्तीचा राममंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. संपूर्ण देश राममय झाले असताना विद्येचे माहेरघर म्हणुन ओळखल्या जाणार्‍या पुण्यात एक संतापजनक प्रकार घडला आहे. कलेच्या गोंडस नावाखाली एका नाटकात रामायणाची पात्रे अगदी घाणेरड्या पद्धतीने दाखविण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.

पुणे विद्यापीठातील ललित कला मंचाने आयोजित केलेल्या या नाटकात रामायणाची पात्रे खूप चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आली आहेत. या नाटकात सीता माताची भूमिका करणारा कलाकार या नाटकात शिव्या देताना आणि सिगारेट पिताना दाखवला आहे. 

नाटक चालू असताना आपल्या देवी देवतांचा अपमान सहन न झाल्याने अभाविप पुणे महानगरच्या कार्यकर्त्यांनी हे आक्षेपार्ह नाटक बंद केले. हिंदू देवी देवतांबद्दल अशा प्रकारची भाषा मुळीच खपवून घेतली जाणार नाही व संबंधित दोषी विरूध्द कारवाई करण्यात यावी अशी भूमिका अभाविप पुणे तर्फे घेण्यात आली आहे.

 

मोठी बातमी: अशोक सराफ यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

मुंबई: ज्येष्ठ मराठी चित्रपट आणि नाट्य अभिनेते अशोक सराफ यांना कला क्षेत्रातील भरीव योगदानासाठी २०२३ वर्षाचा मानाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. मुख्यमंत्र्यांनी अशोक सराफ यांच्याशी बोलून त्यांचे अभिनंदनही केले. अशोक सराफ यांनी केवळ विनोदीच नव्हे तर गंभीर स्वरूपापासून ते खलनायकी प्रवृत्तीपर्यंत विविध छ्टांचे दर्शन आपल्या अभिनयातून घडविले आणि रसिकांवर अधिराज्य गाजवले असे मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन करतांना म्हटले आहे. अशोक सराफ यांनी आत्तापर्यंत विविध सिनेमांमध्ये आणि नाटकांमध्ये अभिनय केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली माहिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या एक्स हँडलवरुन ही माहिती दिली आहे. अशोक सराफ यांनी विनोदी, गंभीर आणि खलनायकी भूमिकाही साकारल्या आहेत. तसंच आपल्या अभिनयातून रसिकांच्या मनावर राज्य गाजवलं आहे. अशोक सराफ हे एक लोकप्रिय अभिनेते आहेत. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये त्यांनी त्यांची कारकीर्द गाजवली आहे. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ यांची जोडी खूप गाजली होती.

 

अभिमानास्पद! युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळासाठी केंद्राकडून मराठ्यांच्या १२ किल्यांना मिळाले नामांकन; कोकणातील ‘या’ किल्ल्यांचा समावेश

जाने. ३० : युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या २०२४-२५ साठीच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सोमवारी (दि. २९ जानेवारी) ही माहिती दिली. मराठा राजवटीत शत्रूशी झुंज देण्यासाठी ज्या १२ किल्ल्यांचा लष्करी तळासाठी वापर केला, त्या किल्ल्यांना आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळामध्ये स्थान मिळण्यासाठी भारताकडून नामांकन मिळाले आहे. यामध्ये शिवनेरी, लोहगड, रायगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग, साल्हेर, राजगड, खंडेरी, प्रतापगड आणि तमिळनाडूमधील जिंजी किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे.
Suvarnadurg-Fort.jpg
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी अतुलनीय पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.
Sindhudurg Fort
छत्रपती शिवाजी महाराज यांनी १७ व्या शतकात किल्ल्यांचा आधार घेत शत्रूला नामोहरण केले, त्यानंतर १८१८ पर्यंत पेशव्यांनी लष्करी कारवाया करण्यासाठी किल्ल्यांचा आधार घेतला.
Panhala Fort
युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे. यापैकी सहा ठिकाणे एकट्या महाराष्ट्रातील आहेत.
Lohagadh fort
Vijaydurg Fort
Raigad Fort

“तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला..” – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आवाहन

नवी मुंबई :तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला. अशी विनंती आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्व मराठी जनतेला केले. आज नवी मुंबईत भरलेल्या विश्व मराठी संमेलनात ते बोलत होते. 

काय म्हणालेत राज ठाकरे? 

मराठी भाषा आणि मराठी माणूस ह्यासाठी मी आणि माझ्या पक्षाने अनेक आंदोलनं केली, मी जेलमध्ये गेलो, अंगावर केसेस घेतल्या. मी अत्यंत कडवट मराठी आहे आणि माझ्यावरचे संस्कार पण तसेच आहेत. महाराष्ट्र ही काय ताकद आहे हे जसं जसं मला समजत गेलं तसं तसं मी महाराष्ट्राच्या प्रेमात अधिक पडत गेलो. 

ह्या जूनमध्ये मला अमेरिकेतील बृहन्महाराष्ट्र मंडळाने त्यांच्या संमेलनाला आमंत्रित केलं आहे. ह्या संमेलनाचे अध्यक्ष मला भेटले. ते मला म्हणाले की अमेरिकेत आम्ही शंभरहून अधिक मराठी शाळा काढल्या आहेत. महाराष्ट्रातल्या मराठी शाळा बंद होत असताना, अमेरिकेत मराठी शाळा सुरु होणं हे काय कमी आहे का? 

पण सध्या आपण महाराष्ट्राकडे जास्त लक्ष देणं आवश्यक आहे. महाराष्ट्राबाहेर आणि देशाबाहेर असलेल्या मराठी लोकांनी मराठीची, महाराष्ट्राची श्रीमंती जरूर इतर लोकांपर्यंत पोहचवली पाहिजे. पण आपल्याच महाराष्ट्रातल्या शहरांमध्ये जेंव्हा मराठीची उपेक्षा होते, जेंव्हा तिकडे सर्रास हिंदी कानावर पडते तेंव्हा मात्र त्रास होतो. माझा भाषेला विरोध नाही. पण हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. हिंदी ही देशातल्या इतर भाषांसारखीच एक भाषा आहे. ह्या देशात राष्ट्रभाषेचा निवाडा कधीच झाला नाही. केंद्र आणि राज्य सरकार ह्यांच्यातील व्यवहारासाठी हिंदी आणि इंग्रजी ह्या भाषा वापरल्या जातात इतकंच. बाकी हिंदी आपली राष्ट्रभाषा नाही. पण जेंव्हा मी हे १५,२० वर्षांपूर्वी बोललो तेंव्हा माझ्या अंगावर सगळे धावून गेले. जेंव्हा ते अंगावर आले तेंव्हा त्यांना मी गुजरात हायकोर्टाचा निर्णय दाखवला. 

मराठी लोकंच एकमेकांशी बोलताना हिंदी का वापरतात हे मला कळत नाहीये. आणि आपलीच मराठी भाषा जेंव्हा राजकीय दृष्ट्या दुय्यम लेखण्याचा प्रयत्न जेंव्हा होतो तेंव्हा माझ्या तळपायाची आग मस्तकात जाते. 

माझी श्री. दीपक केसरकारांना विनंती आहे की ह्या राज्यातील सगळ्या शाळांमध्ये मग त्या कुठल्याही असोत तिकडे पहिली ते दहावी मराठी भाषा सक्तीची करा. सध्या सीबीएएससी, आयसीएस्सी शाळांमध्ये ज्या राज्यात राहताय तिथली भाषा शिकवायची आणि शिकायची सोडून परदेशी भाषा का शिकवताय? परदेशी भाषा हव्या तितक्या शिका पण त्याच वेळेस मराठी पण शिकलीच पाहिजे, बोलता आलीच पाहिजे. 

ह्या देशाच्या पंतप्रधानांना जर त्यांच्या राज्याबद्दल, त्यांच्या भाषेबद्दल प्रेम वाटतं. गिफ्ट सिटी असो की हिऱ्यांचा व्यापार जर गुजरातमध्ये न्यावीशी वाटते किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी पेक्षा मोठा पुतळा गुजरातमध्ये उभारावासा वाटतो, थोडक्यात काय जर त्यांना त्यांच्या राज्याबद्दलचं आणि भाषेबद्दलचं प्रेम लपवता येत नसेल तर आपण का लवपतोय, का मागे राहतोय ?

जेंव्हा महाराष्ट्रात मराठी माणसाला जैन माणूस घर नाकारतो तेंव्हा काय करायचं? हे गुजरात, तामिळनाडू, आसाम, केरळ ह्या राज्यात करून दाखवा. पैसे असून सुद्धा मराठी माणसाला घर नाकारायची हिंमत होते कारण आमच्या सरकारांचं बोटचेपं धोरण. 

मराठी माणसाकडे पैसे असताना त्याला घर नाकारलं जात असेल तर ते हे खपवून घेतलं जाणार नाही. आणि मराठी माणसाकडे कुठे आहे पैसा असं म्हणणारे गल्लीच्या बाहेर पण गेलेले नाहीत. त्यांना काय माहिती की महाराष्ट्रभर मराठी लोकांनी किती अफाट कर्तृत्व दाखवून पैसा उभा केलाय. 

भाषा मेली तर सगळंच संपलं हे विसरू नका. तुमची ओळखच तुम्ही कोणते भाषिक आहात ह्यातून होते. मराठी बोलणाऱ्यांची संख्या जर बघितली तर आपण जगात दहाव्या क्रमांकावर आहोत. थोडक्यात जगातील मोठी लोकसंख्या मराठी बोलणारी आहे. पण आम्ही आमच्याच राज्यात दुसऱ्या भाषेमध्ये गोट्यांसारखे घरंगळत का जातो. माझी आज तुम्हाला एकच विनंती आहे की तुमच्या समोर कोणीही येऊ दे त्याच्याशी मराठीतच बोला.

मोठी बातमी : मराठा आंदोलनाचा विजय, सर्व मागण्या मान्य, पहाटे अध्यादेश निघाला

नवी मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा आंदोलनाचा मोठा विजय झाला आहे. राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. आज पहाटे त्याचे सर्व अध्यादेश काढण्यात आले आहेत. मराठा आंदोलनाच्या लढ्याला मोठं यश मिळालं आहे. यामुळे शनिवारी दि 27 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटलांच्या उपस्थित आपली विजयी सभा पार पडणार आहे.
सर्व मागण्या मान्य, अध्यादेश मिळाला
मागण्या मान्य झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी रात्री दोन वाजता पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सर्व मागण्या मान्य झाल्या असून त्याचे अध्यादेश निघाल्याचे सांगितले. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाण पत्र द्यावे तसेच त्यांच्या कुटुंबाना सुद्धा प्रमाणपत्र द्यावे ही मागणी मान्य झाली आहे. तसेच सरकारने सगा सोयराबद्दल अध्यादेश काढले आहे. तो मला देण्यात आल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
गुन्हे मागे घेतले जाणार
राज्यातील मराठी बांधव यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले.
एकनाथ शिंदे यांच्याशी विरोध संपला
समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. उद्या सकाळी 8 वाजता वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत. मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. उद्या आम्ही येथे सभा घेणार आहे मुंबईत जाणार नाही.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search