Konkan Railway: उद्या दिनांक २४/०१/२०२५ (शुक्रवार) रोजी चिपळूण स्थानकावर तिसर्या पॅसेंजर लूप लाईन च्या कामासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने नॉन-इंटरलॉकिंग (NI) ब्लॉक चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ब्लॉकचे रेल्वे सेवांवर होणारे परिणाम खालीलप्रमाणे आहेत:
दिनांक २४/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. ५०१०४ रत्नागिरी – दिवा पॅसेंजर ही गाडी रत्नागिरी स्थानकावरून पुनर्नियोजित वेळेनुसार ०१:२५ तास उशिराने म्हणजे सकाळी ७.०० वाजता रत्नागिरीहून निघणार आहे.
दिनांक २३/०१/२०२५ रोजी प्रवास सुरू करणारी गाडी क्र. १२२०२ कोचुवेली – लोकमान्य टिळक रत्नागिरी – चिपळूण विभागादरम्यान मर्यादित वेगाने म्हणजेच उशिराने चालविण्यात येणार आहे.
चिपळूण:- चिपळूण तालुक्यातील दसपटी विभागातील टेरव गावातील दत्तवाडीचे सुपुत्र, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश सुरेशराव कदम, विलेपार्ले पोलीस ठाणे, मुंबई यांनी अथक परिश्रम, कौशल्य, सातत्य व चिकाटीने सिने अभिनेते सैफ अली खान यांच्यावर खुनी हल्ला करणाऱ्या बांगला देशी नागरिकत्व असलेल्या आरोपीला अटक करणाऱ्या पथकामध्ये सहभागी होऊन ३५० सरकारी व खाजगी सीसीटिव्ही फुटेजची तपासणी करून, तांत्रिक कौशल्याचा वापर व दिवस रात्र तपास करून आरोपीस शिताफीने अटक केले.
सदर उल्लेखनीय कामगिरीबद्दल सन्माननीय सत्यनारायण चौधरी पोलिस सह. आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) बृहन्मुंबई यांनी प्रशंसापत्र देवून महेश कदम यांचं गौरव केला आहे. तसेच जय भवानी ग्रामोन्नती मंडळ मुंबई, सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामपंचायत टेरव, मंदिर व्यवस्थापन समिती टेरव, सरस्वती एज्युकेशन ट्रस्ट मुंबई, दसपटी क्रीडा मंडळ मुंबई, रामवरदायिनी मंदिर देवस्थान ट्रस्ट मजरे दादर, समस्त ग्रामस्थ टेरव यांनी व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
कुलस्वामीनी श्री भवानी व ग्रामदैवत श्री वाघजाई मातेच्या कृपाशीर्वादाने उत्तरोत्तर महेशराव यांची अशीच प्रगती होत राहो अशी सदीच्छा टेरव ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.
Konkan Railway : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सुपरफास्ट तेजस एक्सप्रेसचे इंजिन रत्नागिरी करबुडे दरम्यान बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतुक विस्कळीत झाली होती. या एक्सप्रेसला नवीन इंजिन जोडण्यात आल्याने एका तासाने या रेल्वे मार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात कोकण रेल्वे प्रशासनाला यश आले आहे. मात्र या मार्गावरील काही गाड्या दोन ते तीन तास उशिराने धावत आहेत. तर आज प्रस्थान करणारी गाडी क्रमांक २२१२० मडगाव मुंबई तेजस एक्सप्रेस आज संध्याकाळी १८.०५ वाजता पुनर्नियोजित Rescheduled करण्यांत आली आहे.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सुपरफास्ट तेजस एक्सप्रेस ही रेल्वे गाडी रत्नागिरी करबुडे दरम्याने आली असता या गादीचे इंजिन अचानक बंद पडले. हा प्रकार मंगळवार २१ जानेवारी रोजी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडला. इंजिन बंद पडल्याने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या काही गाड्या ठीक ठिकाणी थांबवण्यात आल्या. इंजिन नादुरुस्त झाल्याने कोकण रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा एका तास खोळंबा झाला.
रत्नागिरी रेल्वे स्थानकातून नवीन इंजिन मागवण्यात येऊन तेजस एक्सप्रेस ही गाडी एका तासानंतर मार्गस्थ करण्यात आली. तेजस या गाडीला दुसरे इंजिन जोडल्यानंतर कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुर्ववत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र या मार्गावरील दिवा – सावंतवाडी, सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस, मडगाव – सीएसएमटी मांडवी, सीएसएमटी – मडगाव मांडवी एक्सप्रेस या गाड्या २ ते ३ तास उशिराने धावत आहेत.
रत्नागिरी:महर्षी हर्षी सांदिपनी राष्ट्रीय वेदविद्या प्रतिष्ठान उज्जैन आणि कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ रामटेक यांचे भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षेत्रीय वैदिक संमेलनाचे आयोजन दिनांक ७,८,९ फेब्रुवारी रोजी केले जाणार आहे.
महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, कर्नाटक या ४ राज्यांतून प्रमुख मंदिरांचे पुजारी आणि विविध वेद पाठशाळांमध्ये अध्यापक म्हणून कार्यरत असणारे शिवाय वेदातील क्रमांत, घनांत असे अध्ययन पूर्ण केलेले वैदिक मान्यवर येणार आहेत. या ३ दिवसांच्या संमेलनात ऋग्वेद यजुर्वेद सामवेद अथर्ववेद या ४ वेदांच्या विशिष्ट शाखांचे सामूहिक पठण होणार आहे.
हे संमेलन रत्नागिरी शहरातील माधवराव मुळ्ये भवन येथे संपन्न होणार असून संमेलनात वेद, वेदविज्ञान या संबंधी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.
वेदाचा प्रचार व प्रसार व्हावा आणि त्यांचे महत्व जनमानसापर्यंत पोहचावे हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे हा संमेलनाला वेदप्रेमी रत्नागिरीकरांनी उपस्थित राहावे असे आवाहन रत्नागिरी संस्कृत उपकेंद्राच्या वतीने करण्यात आलेले आहे
मुंबई: रायगड रत्नागिरी लोकसभा क्षेत्रातील रेल्वे समस्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी लोकसभा खासदार सुनील तटकरे अध्यक्षतेखाली सोमवार दि. २० जानेवारी, २०२५ सकाळी १०:३० ते १२:३९ या वेळेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार व कॅबिनेट मंत्री आदिती तटकरे व आमदार अनिकेत तटकरे उपस्थित होते. यावेळी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना, कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संतोष कुमार झा व इतर अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीत आपापल्या समस्या मांडण्यासाठी संबंधित ठिकाणच्या प्रवासी संघटना व प्रतिनिधींना बोलावण्यात आले होते. आपना सहकारी बँकेचे संचालक तथा रत्नागिरी जिल्हा नियोजन चे सदस्य श्री. अजयशेठ बिरवटकर यांनी जल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष नितिन सखाराम जाधव व अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे सचिव अक्षय मधुकर महापदी यांना निमंत्रित केले होते.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण, रत्नागिरी दिवा गाडी दादरपर्यंत पूर्ववत करणे, मुंबई चिपळूण नवीन गाडी सुरू करणे, पुणे एर्नाकुलम एक्सप्रेस कल्याणमार्गे वळवणे, जबलपूर कोईंबतूर एक्सप्रेसला कल्याण येथे थांबा देणे, खेड येथे विविध गाड्यांना थांबा देणे, गोव्यातून मुंबईकडे येणाऱ्या गाड्यांमध्ये कोकण रेल्वेने रत्नागिरीच्या उत्तरेकडील स्थानकांना दिलेला अपुरा कोटा वाढवणे किंवा सर्व स्थानकांना समान कोटा देणे आदी महत्त्वाचे विषय मांडण्यात आले.
त्याचबरोबर पेण, नागोठणे, रोहा, माणगाव आणि वीर येथीलही समस्यांवर चर्चा करण्यात आली. रेल्वे अधिकाऱ्यांनी ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या पुढे रेल्वे बोर्ड व मंत्रालयाकडे मांडण्याचे आश्वस्त केले. तसेच खासदार सुनील तटकरे यांनी रेल्वे मंत्रालयात पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.
ही बैठक आयोजित करून सर्वांना आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल खासदार श्री. सुनिल तटकरे व बैठकीला आमंत्रित केल्याबद्दल श्री. अजयशेठ बिरवटकर यांचे जल फाऊंडेशन कोकण विभाग रजिस्टर या संस्थेच्या वतीने आभार.
Ratnagiri bus accident: रत्नागिरीच्या शेनाळे घाटात एका एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही एसटी बस रविवारी रात्री दाभोळवरुन मुंबईच्या दिशेने येत होती. त्यावेळी शेनाळे घाटातील एका तीव्र उतारावर चालकाचे एसटी बसवरील नियंत्रण सुटले आणि ही बस दरीत घरंगळत गेली. मात्र, त्याठिकाणी असणाऱ्या एका झाडाला धडकून बस तिथेच थांबली. ही बस आणखी पुढे घरंगळत गेली असती तर ती धरणात कोसळून मोठा अनर्थ घडला असता. मात्र, सुदैवाने आणि प्रवाशांचे दैव बलवत्तर असल्याने प्रवाशांचे जीव वाचले.
प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात झाला त्यावेळी एसटी बस रविवारी रात्री मंडणगड शेनाळे घाटातून जात होती. या घाटात अतितीव्र उताराचा रस्ता आहे. यापैकी एका उतारावर एसटी बसवरील नियंत्रण सुटून ती दरीत कोसळली. दरीतील झाडाझुडपांमधून ही एसटी बस खाली घरंगळत जात होती. बस दरीत कोसळताना प्रवाशांना जाग आली तेव्हा त्यांना मोठा धक्का बसला. या दरीच्या खालच्या बाजला धरण होते. ही एसटी बस आणखी खाली घरंगळत गेली असती तर थेट धरणात कोसळली असती आणि अनेक प्रवाशांचा जीव जाण्याची शक्यता होती. मात्र, दरीतील एका झाडला धडकून एसटी बस तिथेच अडकून पडली. यानंतर बचावपथकांनी घटनास्थळी धाव घेऊन एसटी बसमधील प्रवाशांना सुखरुप बाहेर काढले. रात्रीची वेळ असल्यामुळे बसपर्यंत मदत पोहोचण्यास विलंब झाला. तोपर्यंत अनेक प्रवाशी बसमध्ये जीव मुठीत धरुन बसले होते.
नवीन वर्ष सुरू होतंय..प्रत्येकजण मनाशी एक नवीन निश्चय करत असतो. तर मग विचार कसला करताय रत्नागिरीकरांनो ..कारण नवीन वर्षाची सुरुवात आरोग्यदायी करण्याची एक नामी संधी उपलब्ध होणार आहे.
कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय रामटेक यांच्या भारतरत्न डॉ पांडुरंग वामन काणे संस्कृत अध्ययन केंद्र रत्नागिरी उपकेंद्रात खास रत्नागिरी शहरातील नागरिकांसाठी मोफत योग शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे.
हे शिबिर रत्नागिरी संस्कृत उपकेंद्रातील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक योगभवनात संपन्न होणार आहे. शिबिराचा कालावधी एकूण २१ दिवसांचा असून हे शिबिर १ जानेवारी २०२५ ते २१ जानेवारी २०२५ दरम्यान दररोज सायं ०५ वाजता होणार आहे.मोफत शिबिर असल्यामुळे आरोग्याची गुरुकिल्ली एक प्रकारे या शिबिरातून रत्नागिरी करांना प्राप्त होणार आहे. तरी इच्छुक नागरिकांनी दिलेल्या लिंक वर https://forms.gle/asQ7baBQMbUtju9t9
क्लिक करून आपली नोंदणी निश्चित करावी तसेच ७७९८४९०६१५ या क्रमांकावर संपर्क साधावा
चिपळूण: श्री क्षेत्र टेरव, कुलस्वामिनी श्री भवानी वाघजाई देवस्थान २०२५ दिनदर्शिकेचा प्रकाशन व लोकार्पण सोहळा, कोकणचे लाडके सुपुत्र, ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांच्या शुभहस्ते नुकताच दिमाखात संपन्न झाला. गेली १५ वर्षे भाविक व ग्रामस्थांना आकर्षक, दर्जेदार व परिपूर्ण दिनदर्शिका भेट देण्यात येत आहे.
सालाबादप्रमाणे या वर्षीही दिनदर्शिकेला वाढती मागणी आहे. टेरव गावातील सर्व ग्रामस्थांना तसेच मुंबई, पुणे, ठाणे, सुरत इ. शहरात वास्तव्यास असलेल्या टेरव वासियांना सदर दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येणार आहे.
देवस्थानात तसेच टेरव गावात साजरे होणारे सार्वजनिक सण, उत्सव व इतर सर्व धार्मिक कार्यक्रमांची माहिती दिनदर्शिकेत समाविष्ट करण्यात आली आहे.
देवरुख: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि कोकण विकास संघर्ष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आज आरोग्य शिबीर आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे नेतृत्व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे आदरणीय रोहित तांबे यांनी केले आहे.
कार्यक्रमाचे आयोजन 6 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याच्या शेजारील सभापती निवास मध्ये, देवरुख पोलीस स्टेशनसमोर करण्यात आले असून दुपारी 3 वाजेपर्यंत चालणार आहे. या शिबिरामध्ये नागरिकांना मोफत आरोग्य तपासणीसह विविध वैद्यकीय सेवांचा लाभ घेता येणार आहे. जिल्ह्या रुग्णालयात रुग्णांना रक्ताचा तुटवता भासत असून रक्तदान शिबिराद्वारे समाजहितासाठी रक्तदानाची चळवळ पुढे नेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, अनेकांनी आरोग्य तपासणीसाठी आणि रक्तदानासाठी नोंदणी केली आहे. “समाजासाठी ही एक छोटी सेवा आहे जी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करणारी आहे,” असे रोहित तांबे यांनी सांगितले.
शिबिरात सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहिती घेण्यासाठी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. अशा उपक्रमांमुळे समाजातील आरोग्यविषयक जागरूकता आणि सामाजिक बांधिलकी वाढण्यास हातभार लागतो.
दापोली: दि.बुध्दिस्ट सोसायटी ऑफ् इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा रत्नागिरी व तालुका शाखा दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाई राष्ट्रीय स्मारक वणंद दापोली येथे रविवार दि.२७.१०.२०२४ ते मंगळवार दि.०५.११.२०२४ पर्यंत बौद्धाचार्य,श्रामणेर शिबीर आयु.विजय जाधव जिल्हा उपाध्यक्ष संस्कार विभाग यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले आहे.या शिबिरात ४० प्रशिक्षणार्थी यांनी सहभाग नोंदविला आहे.
भिक्षू संघाचे संघनायक पुज्य भन्ते बोधी रत्न यांच्या मार्गदर्शनाखाली शिबीर संपन्न होईल.शिबीराचे उद्घाटन आद.अनंत सावंत जिल्हा अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा रत्नागिरी यांच्या हस्ते होईल.प्रमुख मार्गदर्शक आयु.एन.बी.कदम जिल्हा महासचिव,आयु.प्रदिप जाधव जिल्हा कोषाध्यक्ष हे असतील.
शिबिरासाठी प्रशिक्षक म्हणून आद.अनंत सावंत वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आद.एन.बी.कदम केंद्रीय शिक्षक आदी.विजय जाधव केंद्रीय शिक्षक आद.विकास पवार केंद्रीय शिक्षक आद.अल्पेश सकपाळ केंद्रीय शिक्षक आद.संजय कांबळे केंद्रीय शिक्षक हे मार्गदर्शन करतील.या
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती जिल्हा पदाधिकारी आयु.आयु.विजय कांबळे, आयु.जनार्दन मोहिते,आयु.शरणपाल कदम,आयु.सुनिल पवार,आयु.सुनिल धोत्रे, आयु.संदिप धोत्रे,आयु.महेंद्र झकदम.आयु.तानाजी कांबळे, तालुका पदाधिकारी आयु.अनिल घाडगे अध्यक्ष दापोली,आयु.राहूल मोहिते अध्यक्ष संगमेश्वर, आयु.विजय मोहिते अध्यक्ष रत्नागिरी, आयु.आर.बी.कांबळे अध्यक्ष लांजा, आयु.सत्यवान जाधव अध्यक्ष राजापूर,आयु.जयरत्न कदम अध्यक्ष चिपळूण,आयु.विद्याधर कदम अध्यक्ष गुहागर, आयु.अ.के मोरे अध्यक्ष खेड, आयु.हर्षद जाधव अध्यक्ष मंडणगड आयु.दिपक धोत्रे अध्यक्ष वणंद ग्राम शाखा हे उपस्थित राहणार आहेत.