Category Archives: क्राईम

तुतारी एक्सप्रेसमध्ये चोरीचा प्रयत्न फसला; सतर्क टीसीमुळे दोन चोरटे जेरबंद

   Follow us on        

पनवेल: कोकण रेल्वेच्या सतर्क कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ११०१४ तुतारी एक्सप्रेसमधील चोरीचा मोठा प्रयत्न हाणून पाडण्यात यश आले आहे. १६ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे ४:३० च्या सुमारास, तुतारी एक्सप्रेस रोहा स्थानक ओलांडल्यानंतर ही घटना घडली. रत्नागिरीचे तिकीट परीक्षक (TTE) श्री. सचिन सावेकर हे डबा क्रमांक S2, S3 आणि S4 मध्ये तिकीट तपासणी करत असताना त्यांना दोन व्यक्तींच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. सावेकर यांनी प्रसंगावधान राखून आणि इतर प्रवाशांच्या मदतीने या संशयितांना तात्काळ ताब्यात घेतले.

तपासणी दरम्यान असे निष्पन्न झाले की, या आरोपींनी एका महिला प्रवाशाची हॅन्डबॅग चोरली होती. त्यांच्याकडून चोरीला गेलेले साहित्य हस्तगत करण्यात आले असून, यामध्ये एक मंगलसूत्र, दोन जोड कानातले, ४,७५० रुपये रोख आणि एक मोबाईल फोन यांचा समावेश आहे. दरम्यान, प्रवाशाने तक्रार केलेली एक अंगठी मात्र सापडू शकली नाही. यानंतर आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी पनवेल येथील रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) स्वाधीन करण्यात आले आहे.

श्री. सचिन सावेकर यांनी दाखवलेली सतर्कता आणि कर्तव्यतत्परतेची दखल घेत कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी त्यांचे कौतुक केले आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दाखवलेल्या या विशेष कार्याबद्दल सावेकर यांना १०,००० रुपयांचे रोख बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. कोकण रेल्वेने यानिमित्ताने प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कटिबद्ध असल्याचे पुनरुच्चारले असून, प्रवाशांनी कोणत्याही संशयास्पद हालचालींची माहिती रेल्वे कर्मचारी किंवा आरपीएफला देण्याचे आवाहन केले आहे.

सावंतवाडी: अजब लाच, गजब अधिकारी! गरिबाकडून रेशनकार्डसाठी मागितले ‘चुलीवर भाजलेले काजू’ आणि ‘बकरीचे दुध’


   Follow us on        

सिंधुदुर्ग: प्रशासकीय कामात पारदर्शकता आणण्याचे दावे केले जात असतानाच, सावंतवाडी तहसील कार्यालयातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नवीन रेशनकार्ड बनवून देण्यासाठी एका महिला पुरवठा निरीक्षकाने चक्क चुलीवर भाजलेले काजू, साजूक तूप, गोड पपई आणि बकरीच्या दुधाची मागणी केल्याची तक्रार एका गरीब महिलेने केली आहे. या विचित्र मागणीमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​सावंतवाडी तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी असलेल्या शालू जानू कोकरे या महिलेने ही तक्रार केली आहे. शालू कोकरे या धनगर समाजातील असून बकरी पालन आणि मजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात. काही दिवसांपूर्वी त्या नवीन रेशनकार्ड काढण्यासाठी सावंतवाडी तहसील कार्यालयात गेल्या होत्या.

​तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, तेथील पुरवठा निरीक्षण अधिकारी श्रीमती दिपाली सचितानंद गोटे/वाघमारे यांनी रेशनकार्डसाठी त्यांच्याकडे १०,००० रुपयांची मागणी केली.

​लाचेत मागितले ‘खाद्यपदार्थ’

​जेव्हा शालू कोकरे यांनी आपली आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याचे सांगितले आणि आपण पैसे देऊ शकत नाही असे स्पष्ट केले, तेव्हा संबंधित महिला अधिकाऱ्याने पैशांऐवजी पदार्थांची यादीच समोर ठेवली. तक्रार अर्जात नमूद केल्यानुसार, अधिकाऱ्याने खालील वस्तूंची मागणी केली:

​पेजेचे तांदूळ, चुलीवर भाजलेले काजूगर, साजूक तूप​, मोठ्या आकाराची गोड पपई​, बकरीचे दूध

​इतकेच नाही तर, हे सामान कार्यालयात न आणता बाजूच्या कॅन्टीनमध्ये ठेवण्यास आणि दूध फ्रिजमध्ये ठेवण्यास बजावले. ‘हे सामान दिले तर कागदपत्रे नसली तरी एका तासात रेशनकार्ड बनवून देईन’ असे आश्वासनही संबंधित अधिकाऱ्याने दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

​अपमानास्पद वागणूक

​शालू कोकरे यांनी या वस्तू देण्यासही असमर्थता दर्शवली असता, संबंधित महिला अधिकाऱ्याने त्यांना “एकही वस्तू देता येत नसेल तर इथून चालती हो, माझा वेळ घालवू नको” अशा शब्दांत अपमानित करून कार्यालयातून हाकलून दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​कठोर कारवाईची मागणी

​याप्रकरणी पीडित महिलेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री मा. नितेश राणे, जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार केली आहे. एका गरीब आणि गरजू महिलेला अशा प्रकारे वेठीस धरणाऱ्या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्याची चौकशी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.

वेंगुर्ला हादरले! पोटच्या मुलानेच झाडली जन्मदात्या आईवर गोळी; आईचा जागीच मृत्यू…

   Follow us on        

वेंगुर्ला | प्रतिनिधी: तालुक्यातील अणसुर पाल मडकीलवाडी येथे माणुसकीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शुल्लक घरगुती भांडणाचे रूपांतर टोकाच्या वादात होऊन एका मुलाने आपल्या जन्मदात्या आईवर बंदुकीतून गोळी झाडून तिची निर्घृण हत्या केली. या घटनेमुळे संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

​नेमकी घटना काय?

​अणसुर पाल मडकीलवाडी येथील रहिवासी वासंती वासुदेव सरमळकर (वय ६५) आणि त्यांचा मुलगा उमेश वासुदेव सरमळकर यांच्यात गेल्या काही काळापासून सतत घरगुती कारणावरून वाद होत होते. मंगळवारी, १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास वासंती सरमळकर या आपल्या घराच्या अंगणात नेहमीप्रमाणे खुर्चीवर बसल्या होत्या.

​त्यावेळी रागाच्या भरात असलेल्या उमेशने क्रूरतेची सीमा ओलांडली. तो घराच्या छपरावर चढला आणि तिथून त्याने आपल्या हातातील बंदुकीने आईच्या दिशेने थेट गोळी झाडली. ही गोळी वासंती यांच्या डाव्या बाजूच्या छातीत घुसल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

​पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल

​या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी सौ. जागृती जयेश सरमळकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी उमेश वासुदेव सरमळकर याच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत:

​भारतीय न्याय संहिता (BNS): कलम १०३ (३) (हत्या)

​शस्त्र अधिनियम १९५९: कलम ३, २५, २७, २९

​महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१: कलम ३७ (१), १३५

अरे बापरे! मुंबईतून हरवलेले तब्बल दोन कोटी रुपयांचे १६५० मोबाईल उत्तर प्रदेशात सापडले

   Follow us on        

मुंबई: मुंबई पोलिसांनी हरवलेल्या आणि चोरीला गेलेल्या मोबाईल फोनचा शोध घेण्यासाठी राबवलेल्या एका विशेष मोहिमेअंतर्गत मोठे यश संपादन केले आहे. मुंबईतून गायब झालेले तब्बल १,६५० मोबाईल फोन पोलिसांनी उत्तर प्रदेशातील विविध भागांतून शोधून काढले आहेत. या जप्त करण्यात आलेल्या फोनची बाजारपेठीय किंमत अंदाजे २ कोटी रुपये इतकी आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी या फोनचा माग काढला आणि विशेष पथकाद्वारे हे फोन पुन्हा मुंबईत आणले.

​या मोहिमेमुळे आपले महागडे फोन परत मिळतील ही आशा सोडून दिलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ३३,५१४ मोबाईल फोन त्यांच्या मूळ मालकांना सुरक्षितपणे परत करण्यात आले आहेत. चोरीच्या मोबाइल टोळ्यांवर वचक बसवण्यासाठी आणि नागरिकांचा कष्टाचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी ही मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

 

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवलेली दारू सापडली; इन्सुली येथे अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

   Follow us on        

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली आहे. या कारवाईत सुमारे ३.५० लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन, असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कारवाईचा तपशील

​राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरातील दत्त मंदिराजवळ वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका ‘महिंद्रा बोलेरो’ टेम्पोला पथकाने अडवले.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवली होती दारू

​संशयास्पद वाटणाऱ्या या वाहनाची कसून तपासणी केली असता, मागील हौद्यात भाजीपाल्याचे रिकामे क्रेट ठेवलेले आढळले. मात्र, हे क्रेट बाजूला केल्यावर त्याखाली अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स सापडले.

​एकाला अटक

​या प्रकरणी पोलिसांनी तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत.

​जप्त केलेला मुद्देमाल:

​विदेशी दारू (३५ बॉक्स): ३,४९,३२० रुपये

​महिंद्रा बोलेरो वाहन: ५,००,००० रुपये

​एकूण किंमत: ८,४९,३२० रुपये

Kokanai Exclusive: मुंबई पोलिसांकडून बेपत्ता मुलांविषयीच्या अफवांवर स्पष्टीकरण

९८% अल्पवयीन मुलांचे यशस्वी पुनर्मिलन

   Follow us on        

मुंबई: सोशल मीडियावर मुंबईतून मुले बेपत्ता होत असल्याच्या कथित घटनांविषयी दिशाभूल करणारे संदेश मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असताना, मुंबई पोलिसांनी आज एक निवेदन जारी करून या संदेशांमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर, बेपत्ता मुलांच्या प्रकरणांवर पोलीस किती गांभीर्याने आणि सहानुभूतीने कारवाई करतात, यावरही त्यांनी भर दिला आहे.

​अफवांवर विश्वास ठेवू नका!

​मुंबई पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, बेपत्ता मुलांविषयी सोशल मीडियावर फिरणारे संदेश खऱ्या तथ्यांवर आधारित नाहीत. मुंबई पोलीस प्रत्येक बेपत्ता मुलाच्या प्रकरणाला अत्यंत गांभीर्याने हाताळते.

​अपहरण म्हणून नोंदणी बंधनकारक

​सर्वोच्च न्यायालयाच्या ‘बचपन बचाओ आंदोलन विरुद्ध युनियन ऑफ इंडिया’ या महत्त्वपूर्ण निकालानुसार, १८ वर्षांपर्यंतच्या अल्पवयीन मुलांच्या बेपत्ता प्रकरणांची नोंद थेट ‘अपहरण’ (Kidnapping) म्हणून केली जाते. यामुळे या प्रकरणांची तत्काळ दखल घेतली जाते.

​९८% अल्पवयीन मुलांचे पुनर्मिलन

​पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत बेपत्ता झालेल्या ९८% अल्पवयीन मुलांना यशस्वीरित्या त्यांच्या कुटुंबाशी एकत्र आणले गेले आहे. ही आकडेवारी पोलिसांच्या अथक प्रयत्नांची साक्ष देते.

​उत्कृष्ट कामगिरीचे उदाहरण:

सहा महिन्यांपूर्वी मुंबईतून बेपत्ता झालेल्या एका चार वर्षांच्या मुलीला एमआरए मार्ग पोलीस स्टेशनच्या पथकाने नुकतेच वाराणसीतून सुखरूप शोधून तिच्या कुटुंबीयांना सुपूर्द केले आहे. पोलिसांचे प्रयत्न अखंडपणे सुरू असून, शोध लागेपर्यंत तपास थांबत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

​विशेष पथके कार्यरत

​बेपत्ता मुलांचा शोध घेण्यासाठी आणि त्वरित कारवाई सुनिश्चित करण्यासाठी गुन्हे शाखा (Crime Branch), स्थानिक युनिट्स (Local Units) आणि विशेष कक्ष (Special Cells) यासह अनेक विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.

​नागरिकांना विनंती

​पोलीस आयुक्त कार्यालयाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी अपुष्ट माहितीवर विश्वास ठेवू नये किंवा ती पुढे पसरवू नये. नागरिकांनी केवळ अधिकृत पोलीस स्रोतांवर विश्वास ठेवून पोलिसांच्या प्रयत्नांना सहकार्य करावे.

१९ जणांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा पोलिस एन्काउंटरमध्ये मृत्यू

मुंबई – पवईतील आर.ए. स्टुडिओजवळ गुरुवारी रात्री एका तरुणाने १७ अल्पवयीन मुले व दोन प्रौढ असे १९ जणांना ओलीस ठेवले. रोहित आर्या (वय अंदाजे ३०) असे या तरुणाचे नाव असून, “माझी शाळा सुंदर शाळा” योजनेअंतर्गत थकलेली दोन कोटी रुपयांची रक्कम मिळाली नाही, या रागातून त्याने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते.


पोलिसांना माहिती मिळताच सहाय्यक निरीक्षक अमोल वाघमारे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. सुमारे तीन तास चर्चा केल्यानंतर रोहितने पोलिसांवर हल्ला केला. प्रतिहल्ल्यात तो गंभीर जखमी झाला व रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याचा मृत्यू झाला. सर्व १९ ओलीस सुखरूप सोडले गेले.


रोहितने यापूर्वी माजी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या घरासमोर उपोषण केले होते. केसरकर यांनी “रोहितची थकबाकी पूर्ण दिली होती; तो मानसिक तणावात होता,” अशी प्रतिक्रिया दिली. मात्र कुटुंबीयांचा दावा आहे की रक्कम अद्याप बाकी आहे.


पोलिसांनी ओलीस ठेवणे व हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, थकबाकीच्या दाव्यांची चौकशी सुरू आहे.

Video: अरे बापरे! रेल्वेच्या एसी डक्टमध्ये सापडल्या तब्बल ३०० दारूच्या बाटल्या; रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण

   Follow us on    

 

 

Liquor Smuggling: रेल्वेच्या एसी कोचमध्ये एसी डक्टमध्ये दारूची तस्करी होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. लखनौ – लखनौ–बरौनी एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या ”एसी व्यवस्थित थंडावा देत नाही” तक्रारीनंतर रेल्वे तंत्रज्ञांनी तपासणी केली असता गाडीच्या एसी कोचमध्ये अवैध दारूच्या तस्करीचा मोठा प्रकार उघड झाला आहे. एसी डक्टमध्ये तब्बल ३०० हून अधिक दारूच्या बाटल्या लपवून ठेवण्यात आल्या होत्या.

गाडीतील काही प्रवाशांनी “एसी व्यवस्थित थंडावा देत नाही” अशी तक्रार कर्मचाऱ्यांकडे केली होती. त्यानंतर तंत्रज्ञांनी एसीची तपासणी केली असता डक्टच्या आत प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये गुंडाळलेल्या दारूच्या बाटल्या आढळल्या.

संपूर्ण साठा जप्त करण्यात आला असून या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलाने (RPF) तपास सुरू केला आहे. प्राथमिक चौकशीत हा साठा अवैध दारू तस्करीसाठी वापरण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराला गांभीर्याने घेतले असून जबाबदारांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. या घटनेमुळे रेल्वे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून प्रवासी वर्गातही चिंता व्यक्त होत आहे. रेल्वे मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जर दारूचा साठा लपविला जातो तर स्फोटके सुद्धा लपवली जाऊ शकतात अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.

Mumbai Goa Highway: चिपळुणात १७ लाखांचा गुटखा जप्त; सावंतवाडीच्या तरुणाला अटक

   Follow us on    

 

 

चिपळूण: मुंबई गोवा महामार्गावर कापसाळ येथे अवैध गुटखा वाहतूक आणि विक्री विरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथे तब्बल 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या गुटख्याची वाहतूक करणारा बोलेरो टेम्पो चिपळूण पोलिसांनी सापळा रचत पकडल्याची घटना गुरुवारी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास घडली हा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणी टेम्पोचालकाला पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सदर टेम्पोचालक सावंतवाडी येथे राहणारा आहे.. गुरुवारी परजिह्यातून बोलेरो टेम्पो भरुन तब्बल 16 लाख 94 हजार किंमतीचा गुटखा चिपळूण येथे आणला जात असल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना मिळाली. त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्रकुमार राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे, पोलीस उपनिरीक्षक हर्षद हिंग, पोलीस हेडकॉन्स्टेबल वृषाल शेटकर, संदीप माणके, रोशन पवार, प्रमोद कदम, कृष्णा दराडे आदींच्या पथकाने मुंबई-गोवा महामार्गावर कापसाळ येथे सापळा रचला. यावेळी महामार्गावरुन आलेला बोलेरो टेम्पो थांबवून त्याची तपासणी केली असता त्यामध्ये गुटख्याने भरलेली मोठ-मोठी पोती असल्याचे आढळले. त्यात 16 लाख 94 हजार रुपये किंमतीच्या विविध प्रकारच्या गुटख्याचा समावेश आहे. या प्रकरणी सज्जन निवेगी याला पोलिसांनी अटक केली तसेच गुटख्यासह लाखाचा टेम्पो असा 23 लाख 94 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सज्जन निवेगी पाला शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता रविवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या कारवाईमुळे पानटपरीवर बिनधास्तपणे गुटखा विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. परजिह्यातून आणलेला हा गुटखा चिपळुणात नेमका कोणाला दिला जाणार होता, शिवाय यामागे अन्य कोणाचा समावेश आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.

कोल्हापुरात गोवा बनावटीची ५ लाख किमतीची दारू जप्त; सावंतवाडीतील युवकाला अटक

कोल्हापूरः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने गोवा बनावटीचा मोठा मद्यसाठ जप्त केला आहे. चारचाकीत लपवून मद्याची तस्करीचा प्रयत्न उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. याप्रकरणी सावंतवाडी येथील २१ वर्षीय युवकाला अटक करण्यात आली आहे. हॉकी मैदान ते सायबर चौक रोडवर शनिवारी (०१ फेब्रुवारी) पहाटे ५.३० वाजता ही कारवाई करण्यात आली.

सदर युकारचे वय २१ असून तो आजगाव, शिरोडा, सावंतवाडी, सिंधुदुर्ग येथील राहणारा आहे. . त्याच्या कारमधून विविध बँडच्या ७५० मिलीचे ४० बॉक्स, १८० मिलीचे ३५ बॉक्स आणि बलेनो कार असा एकूण १० लाख ०६ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यापैकी केवळ मद्याची किंमत ०५ लाख ०६ हजार ४०० रुपये एवढी आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search