Category Archives: देश

वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून दोन विशेष वंदे भारत ट्रेन

मुंबई : वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामन्यासाठी मुंबईहून गुजरातमध्ये जाणाऱ्या क्रिकेटप्रेमी प्रवाशांसाठी पश्चिम रेल्वेने ‘मुंबई ते अहमदाबाद’ दोन विशेष वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन केले आहे. क्रिकेट सामन्यांसाठी विशेष एक्स्प्रेस चालवण्याची भारतीय रेल्वे इतिहासातील ही पहिलीच घटना आहे.

यंदाच्या वर्ल्डकपमधील भारत-पाकिस्तान सामना शनिवारी, १४ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरू होणार आहे. स्टेडियमची आसनक्षमता एक लाख ३२ हजार असून सामन्यांची सर्व तिकिटे विकली गेली आहेत. यामुळे मुंबई ते अहमदाबाददरम्यान सामन्याच्या आदल्या दिवशी रात्री उशिरा आणि सामन्याच्या दिवशी पहाटे अशा दोन वंदे भारत एक्स्प्रेस चालवण्याचे नियोजन आहे.

तात्पुत्या वेळापत्रकानुसार १३ ऑक्टोबरला रात्री दहा वाजता मुंबईहून अहमदाबादसाठी वंदे भारत एक्स्प्रेस रवाना होईल आणि १४ ऑक्टोबरला पहाटे सहा वाजता अहमदाबादमध्ये पोहोचेल. दुसरी विशेष एक्स्प्रेस मुंबईहून सामन्याच्या दिवशी म्हणजे १४ ऑक्टोबरला पहाटे पाच वाजता सुटेल आणि १२ वाजेपर्यंत अहमदाबादला पोहोचेल. तूर्त गाड्यांचे थांबे निश्चित करण्यात आले नसले, तरी महत्त्वाच्या स्थानकांवर गाड्यांना थांबा देण्यात येणार आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Loading

‘वंदे भारत’चा नवा स्लिपर व्हर्जन लवकरच; फोटो येथे पहा

Sleeper Version Of Vande Bharat : आरामदायी, वेग आणि अत्याधुनिक अशी ओळख असलेल्या वंदे भारतचा प्रवास आणखी आरामदायी होणार आहे. ट्रेनमध्ये नवा स्लिपर व्हर्जन येणार आहे.
केंदीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नव्या स्वरुपातील स्लिपर व्हर्जनचे फोटो शेअर केले आहेत. ट्रेनमधील स्लिपर कोच अतिशय आरामदायी असून, यामुळे प्रवाशांना सुखद अनुभव मिळणार आहे.
नव्याने प्रस्तावित स्लिपर कोच पुढील वर्षाच्या (२०२४) सुरवातीला येणार असल्याचे रेल्वेमंत्र्यांनी म्हटले आहे.

Loading

सनातन धर्माची मच्छरांशी तुलना करणार्‍या उदयनिधीं विरोधात मुख्यमंत्र्यांची कडक शब्दात प्रतिक्रिया

मुंबई :तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन याने सनातन धर्मा विषयी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर विविध स्तरावरून याचा निषेध केला जात आहे. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उदयनिधीचा कठोर शब्दात समाचार घेतला आहे. 

काय म्हणाले मुख्यमंत्री? 

तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या ‘दिवट्या’ मुलाने, उदयनिधीने सनातन धर्म संपविण्याची भाषा आज केली. असे अनेक स्टॅलिन येतील आणि जातील, पण सनातन धर्म या पृथ्वीच्या अंतापर्यंत कायम असेल. स्टॅलिन पाठोपाठ काँग्रेसचाही बुरखा फाटला. सनातन धर्म म्हणजे जातींमध्ये विभागलेला समाज आहे, बाकी काही नाही अशी भाषा कार्ती चिदंबरमने केली आहे.

हा केवळ हिंदू धर्मावर हल्ला नाही तर हिंदू संस्कृती, संस्कार आणि उज्ज्वल परंपरेचा त्यांनी अपमान केला आहे. कोट्यवधी हिंदूंच्या भावना दुखावण्याचं पाप त्यांनी केलंय. त्यांच्या विधानामुळे ‘इंडी’आघाडीचा खरा, हिंदूविरोधी चेहरा आज पुन्हा जगासमोर आला आहे. कॉंग्रेसने तर कायमच हिंदूविरोधी भूमिका घेतलेल्या आहेत. काँग्रेसचा राम मंदिराला विरोध होता. हिंदू दहशत वाद हा शब्दप्रयोग त्यांनीच शोधून काढला. चिदंबरम पुत्राने मांडलेली भूमिका काँग्रेसच्या विचारसरणीला धरूनच आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली एक भारत, श्रेष्ठ भारत उभारणीचं काम सुरू आहे. परदेशात भारताचा जयजयकार होतोय. पण देशाचा विकास, प्रगती विरोधकांच्या डोळ्यात खुपतंय. त्यामुळे अशा पद्धतीने विष कालवण्याचं काम ते करत आहेत.

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे आज हयात असते तर ‘इंडी’ आघाडीचे गोडवे गाणाऱ्या उद्धव ठाकरेचे ‘उद्योग’ बघून त्यांना प्रचंड वेदना झाल्या असत्या. खरं तर उद्धव ठाकरे यांनी उदयनिधी आणि चिदंबरम यांच्या वक्तव्यांचा जाहीर निषेध करायला हवा. त्यांना तसं करायचं नसेल तर आता उदयनिधी स्टॅलिन यांच्याही गळ्यात गळे घालून पुन्हा फोटो काढायलाही हरकत नाही. कारण त्यांनीसुध्दा बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा गळा घोटून हिंदू विरोधकांच्या गळ्यात गळा घातलेला आहे.

आज इंडिया आघाडीचा बुरखा फाटला असून हिंदूविरोधी विचार रुजविण्याचे आणि धर्म संपवण्याचे त्यांचे मनसुबे उघड झाले आहेत. मात्र अशा शेकडो आघाड्या एकत्र आल्या तरी ना तर धर्म संपवू शकणार ना हिंदू संस्कृती. ती भारतीयांच्या रक्तात आहे, डीएनएमध्ये आहे, हे समजण्याची कुवत असायला हवी.

नेमके काय बोलले उदयनिधी? 

तमिळनाडूचे क्रीडा आणि युवक व्यवहार मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा तसेच अभिनेते उदयनिधी स्टॅलिन यांना द्रमुक (DMK) पक्षाचे भवितव्य समजले जाते. उदयनिधी यांनी पत्रकार परिषदेत सनातन धर्मावर केलेल्या एका विधानामुळे ते सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. सनातन धर्म आणि हिंदुत्वाची शिकवण हे डेंग्यू, मलेरिया आणि करोना रोगासमान आहेत, असे विधान उदयनिधी यांनी चेन्नई येथे शनिवारी (दि. २ सप्टेंबर) घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले. भाजपाकडून आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून या विधानावर जोरदार टीकास्र सोडण्यात आले. त्यानंतर उदयनिधी यांनी काहीशी सावध भूमिका घेत भाजपाच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांचे आरोप फेटाळून लावले. “सनातन धर्मामुळे जाती आणि धर्माच्या नावावर लोकांमध्ये फूट पाडली जाते, त्यामुळे अशा धर्माचे उच्चाटन करायला हवे” या आपल्या वक्तव्यावर ते ठाम असल्याचे म्हणाले. मात्र अमित मालवीय यांनी नरसंहाराचा दिलेला संदर्भ चुकीचा असून आपण नरसंहाराबाबत काही बोललो नाही, असे ते म्हणाले.

“मी माझ्या वक्तव्याचा महत्त्वाचा भाग पुन्हा उद्धृत करतो. ज्याप्रमाणे कोविड १९ चा प्रादुर्भाव होतो किंवा डासांमुळे डेंग्यू आणि मलेरिया सारखे रोग पसरतात, त्याप्रमाणे सनातन धर्मदेखील अनेक सामाजिक समस्या निर्माण करण्यास जबाबदार आहे”, असे स्पष्टीकरण उदयनिधी यांनी ट्विटरवर दिले आहे.

Loading

सर्वसामान्यांना दिलासा; घरगुती गॅस सिलेंडर उद्यापासून २०० रुपयांनी स्वस्त होण्याची शक्यता

नवी दिल्ली : सर्वसामान्यांसाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आहे. घरगुती गॅस सिलेंडर २०० रुपयांनी स्वस्त होण्याती शक्यता आहे. उद्यापासूनच हे नवे दर लागू होऊ शकतात, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. 
आंतरराष्ट्रीय बाजारात नैसर्गिक वायूच्या किमती कमी झाल्या आहेत त्यामुळे हे दर कमी  होण्याची शक्यता आहे. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे आगामी निवडणुका. डिसेंबरमध्ये ५ राज्यांमध्ये निवडणुका आहेत, तसंस एप्रिलमध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मोदींची यंदा तिसरी लोकसभा निवडणूक असणार आहे. त्यामुळे मोदी सरकार महागाईबाबत कुठलाच धोका पत्करण्याच्या तयारीत नसल्याचं सूत्रांकडून कळतंय. 
LPG गॅस सिलेंडरचे सध्याचे दर
ऑगस्ट महिन्यात राजधानी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरचे दर ११०३ रुपये इतके होते. तर मुंबईत सिलेंडरचे दर ११०२ रुपये, कोलकातामध्ये ११२९ रुपये, चेन्नईमध्ये १११८.५० रुपये होते. पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला एलपीजीच्या दरात बदल करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, उज्ज्वला योजनेतंर्गत घरगुती गॅस सिलेंडरचे दर २०० रुपयांनी स्वस्त होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

Loading

तामिळनाडूत एक्स्प्रेसच्या कोचला भीषण आग; ९ प्रवाशांचा मृत्यू , २५ प्रवासी जखमी

मदुराई : तामिळनाडूच्या (Tamilnadu) मदुराईमध्ये पुनालूर-मदुराई एक्स्प्रेस या रेल्वे गाडीला भीषण आग (Train Fire) लागल्याची घटना घडली आहे. यामध्ये नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर २५ प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

दक्षिण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी मदुराई यार्ड जंक्शनवर गाडी थांबवली तेव्हा आग लागल्याचे निदर्शनास आले. ट्रेनला लागलेल्या आगीचा एक व्हिडिओही समोर आला आहे. ज्यामध्ये डब्यात भीषण आग दिसत आहे. त्याचवेळी आजूबाजूला काही लोक ओरडत आहेत. आग लागल्यानंतर मोठा आवाज देखील येत आहे. अग्निशामनक दलाने घटनास्थळी धाव घेत अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली.

रेल्वे अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसच्या एका खासगी डब्यात आज पहाटे सव्वा पाच वाजता मदुराई यार्डमध्ये आग लागल्याची घटना घडली.

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही.

Loading

यावर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे  आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी  दिले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.  प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,  महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात

या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.

Loading

यापुढे बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा; ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल

नवी दिल्ली:देशभरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने शालेय शिक्षणाबाबत मोठे बदल जाहीर केले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदींची अंमलबजावणी करताना केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने शालेय शिक्षण-परीक्षेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केल्या आहेत.शिक्षण मंत्रालयाने बुधवार ही महत्वाची माहिती दिली.
शिक्षण मंत्रालयाने जारी केलेल्या माहितीनुसार , बोर्डाच्या परीक्षा आता वर्षातून दोनदा घेतल्या जातील. त्याचसोबत ११वी आणि १२वीच्या अभ्यासक्रमातही बदल करण्यात आले आहेत. तसंच, विद्यार्थ्यांना दोन्ही सेमिस्टरचे सर्वोत्तम गुण निवडण्याची परवानगी दिली जाईल.
पीटीआय या वृत्तसंस्थाने दिलेल्या माहितीनुसार, शिक्षण मंत्रालयाच्या नवीन परीक्षा पॅटर्नवर आधारित बोर्ड परीक्षा विद्यार्थ्यांच्या विषयांचे आकलन आणि त्यांच्या स्पर्धात्मक कामगिरीचे (अचिव्हमेंट ऑफ कॉम्पिटेंसीज) मूल्यांकन करेल. मंत्रालयाने हे मान्य केले आहे की, सध्या बोर्डाच्या परीक्षा या केवळ महिन्यांपर्यंत कोचिंगद्वारे केलेली तयारी आणि विद्यार्थ्यांची लक्षात ठेवण्याची क्षमता यावरच आधारित असते.
शिक्षण मंत्रालयाने केलेल्या महत्त्वाच्या बदलांनुसार आता इयत्ता 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांना स्ट्रीम निवडण्याची सक्ती आता काढून टाकण्यात आली आहे. अशा स्थितीत या वर्गांमध्ये विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीचे विषय निवडण्यास मोकळेपणा मिळेल. सध्या सर्वच मंडळांच्या अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना विज्ञान, वाणिज्य, कला, व्यावसायिक इत्यादींपैकी एकाची निवड करावी लागते.
तसंच, २०२४ च्या शैक्षणिक अभ्यासक्रामासाठी त्याप्रमाणेच पाठ्यपुस्तके विकसित केली जातील असे देखील शिक्षण मंत्रालयाने सांगितले आहे. ११वी आणि १२वीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषांचा अभ्यास करणं आवश्यक आहे. त्यापैकी किमान एक भाषा भारतीय असणं आवश्यक असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

Loading

अभिमानास्पद | इस्रोच्या चांद्रयान-3 चे चंद्रावर यशस्वी लँडिंग

 

चांद्रयान ३: भारताच्या इतिहासातली सर्वात मोठी, सर्वात अभिमानाची आणि सर्वात मोठ्या गौरवाची बातमी आहे. इस्रोच्या (ISRO) चांद्रयान-3 (Chandrayaan-3 Mission) चं चंद्रावर यशस्वी लँडिंग झालं आहे. इस्रोचं चांद्रयान-3 आज 23 ऑगस्ट रोजी 06 वाजून 04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या उतरलं आहे. भारतातील 140 कोटी जनतेची मान आज अभिमानाने वर गेली आहे.

भारत चंद्रावर पोहोचला भारताच्या यशाचा सूर्य थेट चंद्रावर उगवला आहे. भारतासह जगातील प्रत्येकाच्या नजरा या ऐतिहासिक घटनेकडे लागल्या होत्या. जसजसा लँडिंगचा क्षण जवळ येत होता, तसतशी धाकधूक वाढत गेली, श्वास रोखले गेले, हात जोडले गेले आणि डोळे मिटले गेले आणि बातमी आली. चांद्रयान-3 मोहीम फत्ते झाली. प्रत्येक भारतीयाच्या डोळ्यांत आनंदाश्रू तराळले आणि मनात आनंदाचे धबधधबे फुलून गेले. आपल्याच घरातलं कुणीतरी परीक्षेत फर्स्ट क्लासने उत्तीर्ण झाल्याची भावना निर्माण झाली. भारताच्याच नाही तर संपूर्ण जगाच्या इतिहासात, जिथं जगातलं कुणीच गेलेलं नाही, अशा दक्षिण ध्रुवाच्या उंबरठ्याला भारताने गवसणी घातली आहे.

Loading

शेवटची काही मिनिटेच शिल्लक; चांद्रयान-3 ची चंद्रावर लँडिंगचे थेट प्रक्षेपण येथे पहा…

शेवटची काही मिनिटेच शिल्लक; चांद्रयान-3 ची चंद्रावर लँडिंगचे थेट प्रक्षेपण येथे पहा…

Loading

वंदे भारत एक्सप्रेसला अफाट प्रतिसाद; मुंबई ते ‘या’ शहरा दरम्यान आता धावणार दोन वंदेभारत एक्सप्रेस

Vande Bharat Express : देशात वंदे भारत एक्सप्रेस ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. प्रवासी संख्या वाढल्याने आता तिकिटे मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे आता काही मार्गावर दुसरी वंदे भारत एक्सप्रेस सुरु करण्याचा विचार केला जात आहे.
प्रमुख भारतीय शहरांमधील कनेक्टिव्हिटी मजबूत करण्याच्या उद्देशाने, पश्चिम रेल्वेने गजबजलेल्या मुंबई-अहमदाबाद मार्गावर दुसरी सेमी हाय-स्पीड ट्रेन सुरू करण्याची तयारी केली आहे. मुंबई-गांधीनगर वंदे भारत एक्सप्रेसच्या उल्लेखनीय यशानंतर, आता मुंबई-अहमदाबाद अशी नवी वंदे भारत एक्सप्रेस पुढील महिन्यापासून चालू करण्यात येणार असल्याची माहिती पाश्चिम रेल्वेने दिली आहे.
दररोज 30,000 पेक्षा जास्त प्रवासी मुंबई-अहमदाबाद रेल्वेमार्गावर अवलंबून आहेत,  सध्या या मार्गावर सुमारे 24 गाड्या चालतात, ज्यात नियमित आणि साप्ताहिक सेवा समाविष्ट आहेत. दुसरी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे उद्दिष्ट ही गर्दीची अडचण दूर करणे आणि आरामदायक प्रवास पर्यायांची वाढती मागणी पूर्ण करणे हा आहे.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search