Category Archives: सिंधुदुर्ग
सावंतवाडी : कोकण रेल्वे मार्गावरील सावंतवाडी रोड हे महत्वाचे रेल्वे स्थानक आहे. बांदा, वेंगुर्ला, शिरोडा, रेडी पासून आंबोली चौकुळ अशा विस्तारित क्षेत्रातील प्रवाशांसाठी हे सोयीचे स्थानक आहे. उत्पन्नाच्या बाबतीतही हे कोकण रेल्वे च्या पूर्ण मार्गातील पाहिल्या दहा स्थानकांत मोडते. असे असूनही येथे खूप कमी गाड्यांना थांबे दिले आहेत. प्रवासी संघटनांनी वेळोवेळी मागणी करूनही अजूनही काही मुख्य गाड्यांना थांबे मिळाले नाही आहेत. त्यात भर म्हणजे आता विशेष गाड्यांच्या थांब्यांसाठी सावंतवाडी स्थानकाला वगळण्यात येत आहे. उदाहरण द्यायचे झाले तर आताच जाहीर करण्यात आलेल्या अयोध्ये यात्री साठी चालविण्यात येणार्या ‘आस्था स्पेशल एक्स्प्रेस’ ला सावंतवाडी स्थानकावर थांबा देण्यात आला नाही आहे. त्यामुळे सावंतवाडीत रामभक्त नाहीत का? असा सवाल प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाला विचाराला जात आहे. रेल्वे अभ्यासक आणि कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे श्र. सागर तळवडेकर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाचे लक्ष वेधले असून या गाडीला सावंतवाडी रोड स्थानकावर थांबा देण्यात यावा अशी मागणी केली आहे.
विविध मागण्यांसाठी सावंतवाडी येथे आज लाक्षणिक उपोषण.
सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस जलदगतीने पुर्ण व्हावं, त्याला निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांचे नाव टर्मिनसला द्यावे आणि काढून घेतलेल्या रेल्वे गाड्यांना पुन्हा थांबा मिळावा म्हणून आज २६ जानेवारी रोजी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती मुंबई व कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडीसह सहयोगी २३ संस्थांच्या वतीने लाक्षणिक उपोषण छेडण्यात येत आहे.

सिंधुदुर्ग : हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग. भारतात बीच वेडिंगसाठी गोवा हे सगळ्यांचे आवडते डेस्टिनेशन आहे. मात्र आता कोकणातील समुद्र किनाऱ्यावर लग्न करण्याचं स्वप्न बघणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्वच्छ सुंदर आणि जगभरात ब्लु फ्लॅक नामांकन असलेल्या भोगवे समुद्र किनाऱ्यावर असे लग्न करू शकता.
सध्या प्री विडिंग फोटोशूट समुद्र किनाऱ्यावर होतात. मात्र आता लग्न सोहळे देखील कोकणातील समुद्र किनाऱ्यावर होत आहेत. लग्नाच्या आठवणी जपून राहाव्यात यासाठी प्रत्येक जण आपलं लग्न खास व्हावे यासाठी धडपडत असतो. हल्ली वेगवेगळ्या लग्नाचे वेगवेगळे ट्रेंड पहायला मिळतात. त्यातीलच एक ट्रेन्ड म्हणजे बीच वेडिंग मुंबई, पुणे सारख्या शहरातील युवा पिढी कोकणातील निसर्गरम्य समुद्र किनाऱ्यावर लग्न करत आहेत. हल्लीच सोलापूर येथील डॉ. चिराग होरा आणि स्नेहल शिंपी ठाणे यांनी आपलं लग्न अविस्मरणीय व्हावा यासाठी भोगवे समुद्र किनारी लग्न केलं.
नवा ट्रेंड नेमका काय?
सध्या लग्नसोहळे हे ट्रेंडनुसार केले जातात. काही जणं मोकळ्या मैदानात, काही जणं आलिशान जागेत लग्न सोहळा आयोजित करतात. त्यातच आता समुद्र किनारी लग्न सोहळे आयोजित करणं हा एक नवा ट्रेंड सुरु झालाय. यामुळे बऱ्याचदा अस्ताला जाणाऱ्या सुर्याचा मुहूर्त निवडला जातो. निळाशार समुद्र हा नव्या नात्यांचा साक्षीदार देखील होतोय. यामुळे तो लग्नसोहळा हा फक्त लग्न करणाऱ्या दोन व्यक्तींच्याच नाही तर कुटुंबाताली प्रत्येक जणाच्या लक्षात राहण्यासारखा केला जातोय.
रोजगाराच्या संधी उपलब्ध
कोकणात जर ट्रेंडमुळे रोजगाराच्या संधी कोकण वासीयांना उपलब्ध होणार आहेत. या नव्या ट्रेंड मूळे हॉटेल आणि कॅटरिंग व्यवसायाला चांगले दिवस येणार येवू शकतील. तसेच लग्नसोहळा संबधित व्यावसायिकांना त्याचा फायदा होऊ शकतो.
सिधुदुर्ग: केंद्राने प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महा अभियान तथा पीएम जनमन अभियान सुरू केले असून त्यामध्ये जिल्ह्याचा सर्व्हे केला आहे. या सर्व्हेत १६२६ आदिम समाजाचे नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. २० वाड्यांमध्ये या समाजाचे वास्तव्य असल्याचेही पुढे आले आहे. आता या समाजाला रस्ते, पाणी, वीज, प्राथमिक शाळा, अंगणवाडी केंद्र, नळपाणी पुरवठा योजना आदी महत्त्वाच्या सुविधा या अभियान अंतर्गत देण्यात येणार आहेत.
देवगड, कणकवली, कुडाळ, मालवण आणि वेंगुर्ले या पाच तालुक्यांत ही वस्ती आहे. यातील १६ वाड्यांतील आदिम समाजाजवळ कच्चे घर सुद्धा राहण्यासाठी आढळलेले नाही. केवळ एकच वाडी जवळ जाण्यासाठी कच्चा रस्ता आहे. सहा वाड्यांत प्राथमिक शाळा नाहीत. चार वाड्यांना अंगणवाडी केंद्र नाही. तीन वाड्यांना आरोग्य केंद्र नाही. १९ वाड्यांत कौशल्य विकास केंद्र नाही. १३ वाड्यांत स्वच्छ पाणी नाही. सात वाड्यांत नळपाणी पुरवठा करणारी योजना नाही. १३ वाड्यांत वीज पुरवठा नाही. १५ घरांत सार्वजनिक शौचालय नाही, असे या सर्व्हेक्षणात पुढे आले आहे.
जिल्ह्यात आदिम समाजाचे वास्तव्य आढळलेल्या २० वाड्यांमध्ये केंद्राच्या प्रत्येक योजना अभियानाच्या माध्यमातून राबविल्या जाणार आहेत. ज्या योजना अद्याप पोहोचलेल्या नाहीत, त्याला प्राधान्य दिले जाणार आहे. व्यक्तिगत लाभ मिळालेला नसल्यास तोही दिला जाणार आहे.
सिंधुदुर्ग: वेंगुर्ले नगरपरिषदेला स्वच्छ सर्वेक्षण २०२३ मध्ये १५ हजार पेक्षा कमी लोकसंख्या गटातील कामगिरी नुसार कोकण विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. देशामध्ये १ लाख लोकसंख्येपेक्षा कमी लोकसंख्या असणाऱ्या शहरातून पश्चिम विभाग ३७ वा, महाराष्ट्रामध्ये ३९ वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच वेंगुर्ले शहरास जीएफसी १ स्टार व ODF ++ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे वेंगुर्ले नगरपरिषदेचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
नगरपरिषद मार्फत वर्षभरात विविध ठिकाणी आयोजित करण्यात येणाऱ्या स्वच्छता मोहीम, स्वच्छता जनजागृतीपर विविध कार्यक्रम व यामध्ये स्वच्छताप्रेमी वेंगुर्लेवासियांचा मिळणारा उत्स्फूर्त सहभाग या सर्वामुळे वेंगुर्ले नगर परिषदेला स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये घवघवीत यश प्राप्त झाले आहे. आतापर्यंत वेंगुर्ले नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण मध्ये विविध पुरस्कार प्राप्त झाले असून मुख्याधिकारी, माजी लोकप्रतिनिधी, नगरपरिषद अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी, स्वच्छता दूत, सामाजिक संस्था व नागरिक यांच्या सहकार्यातून हे यश प्राप्त झाले आहे, असे मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी सांगितले.
Sindhudurg :सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळचे सुपुत्र चंद्रकांत काजरेकर गिनीज बुक रेकॉर्ड होल्ड ठरले आहेत.शेती आणि बागायतदार चंद्रकांत काजरेकर कुडाळ यांच्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाचे पान म्हणून रेकॉर्ड झाले आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात प्रथम प्रशासन अधिकारी आणि नंतर अकाउंटंट व्यवस्थापक म्हणून सुमारे ३२ वर्षे सेवा करून निवृत्त झालेले चंद्रकांत काजरेकर आंबा आणि काजू बागायतीची आवड जोपासत असताना त्यांना आपल्या हापूस आंब्याच्या झाडावर आलेले पान खूपच लांब व रुंद असल्याचे आढळले. त्या पानाची लांबी व रुंदी त्यांनी मोजली. गुगलच्या सहाय्याने जगातील रेकॉर्ड पडताळून पाहिले. निरीक्षणानंतर त्यांना आढळले की हे जगातील रेकॉर्ड होऊ शकते. या वैशिष्ट्यपूर्ण पानाला जागतिक रेकॉर्डच्या प्लॅटफॉर्मपर्यंत नेण्यासाठी त्यांनी आपली मुली डॉ. नालंदा आणि डॉ. नुपूर आणि जावई धीरज व डॉ. देवेन यांच्या मदतीने व चिकाटीने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड या दोन ठिकाणी रिपोर्ट पाठविला.
त्यानंतर पूर्णतपासनीचे रेकॉर्ड तयार करताना संत राहुल महाराज महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य डॉ. विलास झोडगे यांच्या सहकार्यामुळे महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाच्या टीमची मदत मिळाली. महाविद्यालयाच्या वनस्पतीशास्त्र विभागाचे प्रमुख प्राध्यापक डॉ. रवींद्र यशवंत ठाकुर, प्राध्यापक उमेश मिलिंद कामत आणि प्राध्यापक दयानंद विश्वनाथ ठाकूर यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक व चिकाटीने काम केले. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आणि वल्डे वाईड बुक ऑफ रेकॉर्डच्या नियमानुसार वैशिष्ट्यपूर्ण पानाची मोजणी करणे, फोटोग्राफी, व्हिडिओ शूटिंग वर रेकॉर्डिंग तसेच रिपोर्टिंग या सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सहकार्य केले. त्या कामात डॉ. दिपाली काजरेकर, डॉ. नालंदा, डॉ. नुपुर, जावई धीरज, डॉ. देवेंद्र तसेच आशीर्वाद फोटो स्टुडिओचे टीम यांचे सहकार्य लाभले.
जगातील सर्वात मोठे हापूस आंब्याच्या झाडाच्या पानाचे जागतिक वर्ल्ड रेकॉर्ड आणि वर्ल्ड वाईड बुक ऑफ रेकॉर्ड अशा दोन जागतिक रेकॉर्डची नोंद चंद्रकांत काजरेकर यांच्या नावे झाली. कुडाळ तालुका सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र राज्य आणि इंडिया या सर्वांचे नाव जगाच्या नकाशावर नोंदवले गेले आहे. या पानाची लांबी ५५.६ सेमी रुंदी १५.६ से.मी. आहे त्यापूर्वी त्यांनी प्रयोगशील शेतकरी म्हणून आपल्या शेती बागायतीत प्रयोग केले आहेत. कुडाळ येथील आपल्या राहत्या घराच्या टेरेसवर सुपारी व काजूची रोपे तयार करून नर्सरीचा यशस्वी प्रयोग केला आहे. तसेच तळवडे, सावंतवाडी येथील शेतात आपले बंधू विनोद काजरेकर यांच्या मदतीने भाताची एक काडी लागवड, लावणी, कापणी, मळणी इत्यादी यंत्राच्या साह्याने शेती करणे. दुर्मिळ वनौषधी लागवडी व संवर्धन यांचे यशस्वी प्रयोग केले आहेत.
