Category Archives: कोकण रेल्वे

Sawantwadi Terminus: भूमीपूजन दगडाचा प्रतिकात्मक केक कापून अपूर्ण कामाचा वाढदिवस साजरा..

   Follow us on        

Sawantwadi: सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला आज २७ जून रोजी १० वर्षे पूर्ण होऊन देखील ते अदृश्य असल्याने कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने रेल्वे स्थानकावर वाढदिवस साजरा केला. सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेकडून हाताला काळ्या फिती बांधून साखर वाटत, भुमिपुजन दगडाचा केक कापून गांधीगिरीने याचा निषेध नोंदविण्यात आला.

सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे. रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. याच पार्श्वभूमीवर १० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल साखर वाटून, केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. रेल्वे प्रशासन, प्रवाशी यांना साखर वाटून गांधीगिरी मार्गान प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले.

यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड. संदीप निंबाळकर म्हणाले, १० वर्ष प्रकल्प रखडलेला आहे. तिन्ही सार्वत्रिक निवडणूक एकाच पक्षाची सत्ता राज्यात आलेली आहेत. त्याच सरकारने भूमिपूजन केल्यानंतर प्रकल्प पूर्ण होत नसेल तरी ती क्षरमेची बाब आहे. सरकारला जाग आणण्यासाठी व अर्धवट कामाची जाणीव करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले आहे‌. केवळ रेल्वे मंत्री बदलले म्हणून प्रकल्प अर्धवट ठेवणं योग्य नाही. प्रकल्प पूर्ण करायचा नसेल तर जनतेची फसवणूक केल्याच जाहीर करा असं आवाहन त्यांनी केलं‌. तर ज्या दगडावर नारळ फोडून भुमिपूजन केलं तो दगड केक स्वरूपात आम्ही कापून अर्धवट कामाचा निषेध केला. जन आंदोलन करून देखील सरकार दखल घेत नसल्याने दगडी सरकारला हा दगड होता. त्यामुळे निदान आता तरी सरकारनं कोकणवासीयांना न्याय द्यावा. प्रवाशांची होणारी गैरसोय रोखावी असं मत सचिव मिहिर मठकर यांनी व्यक्त केले. तसेच गणेशोत्सवापूर्वी रेल्वे टर्मिनस पूर्णत्वास आणून चाकरमान्यांचे होणारे हाल, अपेष्टा रोखाव्यात असे मत उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी व्यक्त केले. उपस्थित पोलिस, रेल्वे कर्मचारी, प्रवासी, रिक्षा चालक यांना साखर वाटून अनोख्या पद्धतीने हे आंदोलन करण्यात आले.

यावेळी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अँड.संदीप निंबाळकर, सचिव मिहिर मठकर, सल्लागार सुभाष शिरसाट, सल्लागार अँड सायली दुभाषी ,भूषण बांदिवडेकर,पांडुरंग राऊळ, सागर तळवडेकर,तेजस पोयेकर,पुंडलिक दळवी, अभिमन्यू लोंढे, हरिश्चंद्र पवार, विनायक गांवस , नितिन गावडे, सिद्धार्थ निंबाळकर, मंगेश सावंत, चंद्रकांत राघो कोरगावकर, रवी सातवळेकर, पांडुरंग परब, नारायण मसुरकर, प्रमोद खानोलकर,विनायक राऊळ, लवू नाईक, एकनाथ नाटेकर, राजेंद्र वरडे , प्रकाश महादेव भाईंडकर , दिलीप कुलकर्णी, काका पांढरे, रिक्षा व्यावसायिक तसेचं रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Konkan Railway: गणेश चतुर्थी रेल्वे आरक्षणासाठी कोकण रेल्वेचे ‘रिग्रेट’ गाणे

   Follow us on        

 

Konkan Railway: यंदाच्या गणेश चतुर्थीसाठी नियमित गाड्यांसाठी रेल्वे आरक्षण सुरु झाले असून या गाड्यांचे आरक्षण अवघ्या काही सेकंदात फुल्ल होत आहे. बहुतेक सर्वच गाड्या आता रिग्रेट हे स्टेटस दाखवत असल्याने ज्या गणेश भक्तांना आरक्षण भेटले नाही ते नाराज झाले आहेत.

यंदा २७ ऑगस्टपासून गणेशोत्सवाची धामधूम सुरू होणार आहे. गणेशोत्सवात कोकण मार्गावर धावणाऱ्या नियमित गाड्यांचे आरक्षण खुले होताच मिनिटभरातच सर्वच नियमित गाड्या हाऊसफुल्ल झाल्या. सर्वच नियमित गाड्यांची आसन क्षमता संपल्याने ‘रिग्रेट’चा शेरा मिळत आहे. यामुळे आरक्षित तिकिटांसाठी तासन्तास रांगेत उभ्या राहिलेल्या गणेशभक्त तिकीटे न भेटल्याने नाराज झाले आहेत.

 

गणेशोत्सवासाठी लाखोंच्या संख्येने चाकरमानी गावी दाखल होतात. रेल्वे प्रशासनाने यंदा ६० दिवस अगोदरच म्हणजेच २३ जूनपासून आरक्षणाची दालने खुली केली. त्यानुसार चाकरमान्यांची गणेशोत्सवात गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे पदरात पाडण्यासाठी सकाळपासूनच तिकिट खिडक्यांवर झुंबड उडाली. मात्र अवघ्या दीड मिनिटातच नियमित रेल्वेगाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले. यामुळे असंख्य चाकरमानी प्रतीक्षा यादीवर राहिले. यानंतर ‘रिग्रेट’चाच शेरा मिळत असल्याने चाकरमानी कोंडीत अडकले आहेत. कोकण मार्गावरून धावणाऱ्या तुतारी एक्प्रेस, सुपरफास्ट कोकणकन्या, मांडवी, मत्स्यगंधा, एलटीटी-मडगाव, मुंबई-मंगळूर या एक्स्प्रेस गाड्यांची गणेशोत्सवातील आसन क्षमता संपली आहे. यामुळे या सर्व गाड्यांचे शेकडो गणेशभक्त प्रतीक्षा यादीवर आहेत. रेल्वे प्रशासनाने अजूनही गणपती स्पेशल गाड्यांची घोषणा केलेली नाही. यामुळे गणेशभक्तांची सारी मदार आता गणपती स्पेशल गाड्यांवर अवलंबून आहे. कोकण विकास समितीसह अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, जल फाऊंडेशनसह अन्य प्रवासी संघटनांनी गणेशोत्सवात कोकण मार्गावर विशेष गाड्या चालवण्यासाठी आग्रह धरला आहे. मुंबई-चिपळूणसह मुंबई-सावंतवाडी स्वतंत्र विशेष गाडी चालवण्याची मागणीही केली जात आहे. तशी निवेदनेही केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसह रेल्वे बोर्डाला देण्यात आली आहेत. केवळ निवेदने देवून न थांबता सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. रेल्वे बोर्ड सकारात्मक निर्णय घेवून गणेशभक्तांना दिलासा देईल, अशी गणेशभक्त बाळगून आहेत. कोकण रेल्वे प्रशासनाने यंदाही दिवा-चिपळूण व दिवा-रत्नागिरी मेमू स्पेशल चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी गणेशभक्तांकडून करण्यात येत आहे.

Sawantwadi: सावंतवाडीकरांची ‘गांधीगिरी’, साजरा केला जाणार ‘अपूर्ण टर्मिनसचा वाढदिवस’

   Follow us on        

Sawantwadi:सावंतवाडी रेल्वे टर्मिनसच्या भूमिपूजनाला उद्या 27 जून रोजी 10 वर्षे पूर्ण होत आहेत. भूमिपूजन झाले तरी अद्याप टर्मिनस पूर्णत्वास आले नसल्याने याची जाग प्रशासनाला आणून देण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून 27 जून 2025 रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर सकाळी 11 वाजता टर्मिनसचा वाढदिवस साजरा करीत साखर वाटून गांधीगिरी आंदोलन छेडण्यात येणार आहे. अशी माहिती सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष ॲड .संदीप निंबाळकर यांनी येथे दिली आहे.


सावंतवाडी टर्मिनसचे भूमिपूजन २७ जून २०१५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू, तत्कालीन पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, तत्कालीन खासदार विनायक राऊत आणि इतर लोकप्रतिनिधी व रेल्वे अधिकारी यांच्या उपस्थितीत होते. यानंतर पहिल्या टप्प्याचे काम झाले, मात्र दुसऱ्या टप्प्याचे काम अजूनही झालेले नाही. परिणामी, हे महत्त्वाकांक्षी टर्मिनस आजही धूळ खात पडले आहे.रेल्वे प्रवासी संघटनेने या टर्मिनसच्या पूर्णत्वासाठी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. मात्र, प्रवाशांची गैरसोय होत असूनही लोकप्रतिनिधी यावर गप्प बसल्याची खंत बैठकीत व्यक्त करण्यात आली. लवकरच सावंतवाडी शहर आणि परिसरातील व्यापारी व व्यावसायिकांची पुन्हा बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यावर चर्चा झाली. भूमिपूजनाला १० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, २७ जून रोजी सकाळी ११ वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एकत्र येऊन ‘टर्मिनस भूमिपूजन कोनशिलेचा वाढदिवस’ साजरा करण्यात येणार आहे.

 

Konkan Railway: महत्वाची बातमी! गणेशचतुर्थीसाठीचे रेल्वे आरक्षण उद्यापासून सुरु

   Follow us on    

 

 

Konkan Railway: पावसाळा सुरू होताच कोकणवासीयांना गणेशोत्सवाचे वेध सुरू होतात. यासाठी चाकरमानी गणेशोत्सवास गावी जाण्याचे नियोजन करण्यास सुरूवात करतात. यामध्ये महत्वाचे नियोजन असते ते गावी जाण्यासाठी रेल्वे किंवा एसटी बसचे आरक्षण करणे. यासाठी रेल्वे प्रशासन दोन महिने आगाऊ आरक्षण सुविधा उपलब्ध करते.

गणेशोत्सवाला चाकरमानी किमान आठ दिवस अगोदर गावी जातात. या वर्षी श्री गणेश चतुर्थी बुधवार 27 ऑगस्ट रोजी आहे. यावर्षी गणपतीसाठी गावी जाणारे चाकरमानी 19 ऑगस्ट पासून सुरूवात करतील. म्हणजेच 19 ऑगस्ट रोजी प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनी दोन महिने अगोदर म्हणजेच 20 जून रोजी आपल्या इच्छीत गाडीचे आरक्षण घेणे आवश्यक आहे.

खरेतर गणेशोत्सवासाठी रेल्वे प्रशासन नियमीत गाड्यांबरोबरच शेकडो विशेष गाडया कोकण रेल्वे मार्गावर सोडते. मात्र, या गाड्यांचे आरक्षण सुरू होताच पहिल्या एक-दोन मिनिटातचं संपूर्ण गाडीचे आरक्षण फूल्ल होते. कधीकधी तर तिकीट खिडकीवर पहिल्या क्रमांकावर असलेल्या प्रवाशालाही संबधित गाडीचे कर्फम तिकीट मिळत नाही. कोकण रेल्वे सुरू झाल्यापासूनची ही समस्या आहे.दुसरीकडे खासगी तिकीट एजंटकडे याच गाड्यांची तिकीटे सहज उपलब्ध होतात. मात्र, त्यासाठी मूळ तिकीटाच्या दामदुप्पट दर आकारला जातो. तासनतास् रांगेत राहूनही जे तिकीट प्रवाश्याला मिळत नाही ते एजंटला सहज कसे मिळते? यामागचे गौडबंगाल काय? प्रवाशांची खुलेआम लूट करणारा हा गोरख धंदा कुणाचा? रेल्वे प्रशासनाचे यावर काहीच नियंत्रण नाही कसे? अवघ्या एका मिनिटात संपूर्ण रेल्वेची हजारो तिकीट कशी आरक्षित होतात? लोकप्रतिनिधी याबाबत आवाज का उठवत नाहीत? याबाबत रेल्वे प्रशासन कधी खुलासा का करत नाही? असे एक ना अनेक प्रश्न कोकणवासींय रेल्वे प्रवाशांना गेल्या अनेक वर्षांपासून पडलेले आहेत. मात्र याचे योग्य उत्तर कुणीच देत नसल्याने कोकणवासींय प्रवाशांच्या नशिबी गुराढोरा प्रमाणे रेल्वे डब्यात कोंबून घेत प्रवास करण्याची परवड कायम आहे.

 

Konkan Railway: “….तर मुंबई-मडगाव वंदे भारत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य”

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मुंबई गोवा वंदे भारत एक्सप्रेसला प्रवाशांचा खूप चांगला प्रतिसाद लाभत आहे. सद्यस्थितीत सुपरफास्ट एक्सप्रेस ८ डब्यांची धावत आहे. मात्र हे डबे अपुरे पडत आहेत. त्यात पावसाळ्यात या गाडीच्या फेऱ्यांत कपात केली जात असल्याने प्रचंड मागणी असूनही या गाडीची सेवा अपुरी पडत आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेत एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवावी अशा मागणीचे निवेदन कोकण विकास समितीच्या वतीने समितीचे अध्यक्ष जयवंत दरेकर यांनी रेल्वे बोर्डाला दिले आहे.

जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेस नांदेडपर्यंत वाढवण्याचा निर्णय मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसशी तिचे एकीकरण करण्याचा निर्णय अलिकडेच रेल्वे बोर्डाने घेतला आहे. या डब्यांची प्राथमिक देखभाल आता नांदेडला हलवण्यात आली आहे. यामुळे मुंबईत पिट लाईन आणि देखभाल स्लॉट उपलब्ध झाला आहे. या पिट लाईन आणि देखभाल स्लॉटचा वापर मुंबई -मडगाव वंदे भारत एक्सप्रेस साठी वापरल्यास ती १६ किंवा २० डब्यांची चालविणे शक्य होणार आहे. कोकण मार्गावरून धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसने ९५ टक्के आसन क्षमतेची प्रभावी अंमलबजावणी राखली आहे. यामुळे सध्या धावणारी ८ डब्यांची वंदे भारत एक्सप्रेस प्रवाशांसाठी आसनांअभावी गैरसोयीची ठरत आहे. यामुळे एक्सप्रेस १६ किंवा २० डब्यांची चालवण्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचे आर्जवही करण्यात आले आहे.

 

Panvel Express: पनवेल एक्सप्रेसचा सावंतवाडीपर्यंत विस्तार करावा

   Follow us on    

 

 

मुंबई: पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल (पनवेल एक्सप्रेस) या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी रेल्वे प्रवाशी संघटनांनी केली आहे.

कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी यांचे केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री यांना साकडे.

सध्या २२१४९/५० पुणे – एर्नाकुलम एक्सप्रेस ही एकमेव गाडी पुण्याहून कोकणमार्गे चालवली जाते. मात्र ही गाडी आठवड्यातून फक्त दोन दिवसच धावत असून कोकणात काही मोजक्याच स्थानकावर थांबा घेत असल्याने या गाडीची सेवा अपुरी पडते. त्यामुळे पुणे आणि कोकण जोडणारी विशेष गाडी सुरु करण्यात यावी किंवा गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा या मागणीसाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटना (सावंतवाडी) वतीने संघटनेचे सचिव मिहीर मठकर यांनी केंद्रीय विमान वाहतूक तसेच सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांना निवेदन दिले आहे.

“आपण पुणे – जोधपूर ही नवीन रेल्वे पुण्यातून सुरू केलीत, आणि आता आपण पुणे – रीवा वाया जबलपूर ही रेल्वे गाडीची घोषणा केलीत, फक्त एका वर्षात आपण रेल्वे संदर्भात जे कार्य केले आहे त्याला प्रेरित होऊन आम्ही कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, आपल्याला विनंती करत आहोत की पुण्याहून सावंतवाडीसाठी देखील नवीन रेल्वे किंवा सध्या सुरू असलेली १७६१३/१४ नांदेड – पुणे – पनवेल या दैनिक गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करावा, जेणेकरून पुण्यात राहणाऱ्या लाखो कोकणी जनतेला याचा फायदा होईल.” अशी विनंती करणारे निवेदन त्यांना देण्यात आले आहे. या बरोबरच सावंतवाडी टर्मिनस स्थानकावरील विविध समस्या सोडवण्यासाठी तसेच स्थानकाचा विकास करण्यासाठी या स्थानकाचा समावेश ‘अमृत भारत स्थानक योजने’त समावेश करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी विनंती केली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल या गाडीचा सावंतवाडी पर्यंत विस्तार करण्यात यावा अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती तर्फे करण्यात आलेली आहे. या समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी अशी मागणी करणारे निवेदन समितीच्या वतीने संबंधित रेल्वे आस्थापना आणि अधिकाऱ्यांना दिले आहे.

या गाडीसाठी एका अतिरिक्त रेकची सोया करून तिचा विस्तार केला गेल्यास मराठवाडा-पुणे-कोकण अशी कनेक्टिव्हिटी मिळेल. या गाडीचा विस्तार करताना तिला पेण, नागोठणे, रोहा, माणगाव, वीर, सापे वामणे, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, आणि सावंतवाडी रोड या स्थानकांवर थांबे देण्यात यावेत अशी मागणी या निवेदनात केली आहे.

याशिवाय ही गाडी पुणे-कर्जत-कल्याण- पनवेल या मार्गाने चालविण्यात यावी. जेणेकरून ‘लोको रिव्हर्सल’ साठी लागणार वेळही वाचेल आणि कल्याण-डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, टिटवाळा या परिसरात मोठ्या प्रमाणात राहणाऱ्या प्रवाशांचीही सोय होईल. त्याच प्रमाणे या गाडीला आधुनिक एलएचबी कोच जोडण्यात यावेत अशी मागणी करण्यात या निवेदनांत करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक १७६१३/१४ नांदेड-पुणे-पनवेल ही नांदेड (NED) ते पनवेल (PNVL) दरम्यान चालणारी एक्सप्रेस गाडी आहे. गाडी क्रमांक १७६१४ नांदेड-पनवेल ही नांदेड येथून संध्याकाळी ६:२० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३५ वाजता पनवेलला पोहोचते. परतीच्या प्रवासासाठी, गाडीक्रमांक १७६१३ पनवेल येथून दुपारी ४:०० वाजता सुटते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ८:४५ वाजता नांदेडला पोहोचते.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या एक्सप्रेसचे डबे वाढले

   Follow us on    

 

 

Konkan Raiwlay:कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या एका लांब पल्ल्याच्या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक १२२२३ /१२२२४ लोकमान्य टिळक (टी) – एर्नाकुलम जं. – लोकमान्य टिळक (टी) दुरांतो” एक्सप्रेस (द्वि-साप्ताहिक) या गाडीच्या डब्यांत वाढ करण्यात येणार आहे.

या गाडीच्या डब्यांची सध्याची संरचना अशी आहे: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०२, थ्री टायर एसी – ०६, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २० एलएचबी डबे

सुधारित संरचना: फर्स्ट एसी – ०१, टू टायर एसी – ०३, थ्री टायर एसी – ०७, स्लीपर – ०८,पॅन्ट्री कार – ०१, जनरेटर कार – ०२ असे मिळून एकूण २२ एलएचबी डबे

थ्री टायर एसी आणि स्लीपर स्लीपर श्रेणीचा प्रत्येकी एक डबा वाढवून या गाडीच्या डब्यांची संख्या २० वरून २२ करण्यात आली आहे. मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस येथून प्रवास चालू करताना गाडी क्रमांक १२२२३ तर एर्नाकुलम येथून प्रवास सुरु करताना गाडी क्रमांक १२२२४ या सुधारित संरचनेनुसार चालविण्यात येणार आहे.

 

Konkan Railway: आषाढी वारीसाठी सावंतवाडी-पंढरपुर विशेष गाडी चालविण्यात यावी

   Follow us on    

 

 

Konkan Railway: अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरीच्या विठूरायाची भेट घेण्यासाठी वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूरला जातात. मध्य रेल्वेने नागपूर, अमरावती, कोल्हापूर, भुसावळ, लातूर, मिरज अशा महाराष्ट्रातील सर्वच विभागांतून पंढपूरला जाण्यासाठी विशेष गाड्यांची घोषणा केली आहे.

रेल्वेने आजपर्यंत एकदाही सावंतवाडीतून पंढरपूरला जाणारी गाडी सोडलेली नाही.

कोकणातूनही बरेच भाविक आषाढी एकादशीच्या निमित्ताने पंढरीला जातात. या भाविकांमध्ये वयस्कर नागरिक मोठ्या प्रमाणात असतात. कोकणातून पंढरपूर रस्तेमार्गे जवळ असले तरी घाटमार्गावरील प्रवासामुळे वेळ अधिक लागतो त्यांचा प्रवास त्रासदायक होतो. रेल्वेने गेल्यास आरामदायक प्रवास होऊ शकतो.

रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देवून दिनांक १ जुलै, २०२५ ते १० जुलै, २०२५ पर्यंत सावंतवाडी – पंढरपूर मार्गावर विशेष गाड्या सोडाव्यात अशी मागणी अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती, महाराष्ट्र च्या वतीने समितीचे सचिव अक्षय महापदी यांनी केली आहे. ही मागणी करणारे निवेदन ईमेल द्वारे संबधित अधिकारी आणि प्रशासकीय कार्यालयांना पाठविण्यात आले आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण करण्यासाठी हालचाली सुरु; तीन टप्प्यांत होणार दुहेरीकरणाचे काम

   Follow us on    

 

 

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गाच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या दुहेरीकरणाच्या कामाला आता गती मिळत असून, भविष्यात या मार्गावर धावणाऱ्या रेल्वेगाड्यांची संख्या दुप्पट होणार आहे. नैसर्गिक अडचणींवर मात करत कोकण रेल्वेने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरणाचा निर्णय घेतला आहे.

रेल्वे प्रशासनाने टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण करण्याचा मार्ग स्वीकारला आहे. सपाट मार्गांवर दर किलोमीटर १५ ते २० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे, तर बोगद्यांच्या भागात हा खर्च ८० ते १०० कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकतो. यापूर्वी रोहा ते वीर दरम्यानच्या दुहेरीकरणासाठी ५३० कोटी रुपये खर्च झाले होते.

यापुढील टप्पे कोणते?

कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार खालील तीन टप्प्यांत कोकण रेल्वे मार्गाचे दुपारदरीकरण करण्यात येणार आहे.
१)खेड–रत्नागिरी,
२) कणकवली–सावंतवाडी
३) मडगाव–ठोकुर

या तीन प्रमुख टप्प्यांमध्ये दुहेरीकरणाची योजना आहे. या टप्प्यांचा सविस्तर अहवाल लवकरच रेल्वे मंडळाकडे सादर करण्यात येणार आहे. या योजनेला मंजुरी मिळाल्यानंतर राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवण्यात येईल आणि निधी मंजूर होताच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.

दुहेरीकरणासोबतच कोकण रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कामांसाठी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सुमारे ९९ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना अधिक सुविधा आणि सोयी-सवलती मिळण्याची शक्यता आहे.

संगमेश्वर रोड रेल्वे स्थानक फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींना रामराम! पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण कामाला लवकरच होणार सुरूवात

   Follow us on        

संगमेश्वर: गेल्या अनेक दिवसांपासून निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुपच्या वतीने संगमेश्वर स्थानकात फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा मुद्दा उचलून धरण्यात आला होता. सतत पाठपुरावा आणि वेळोवेळी अधिकारी वर्गाशी केलेल्या चर्चेतून हे सकारात्मक चित्र साकार होत आहे.

फलाट क्रमांक २ वरील गैरसोयींचा पाढा निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप सतत वाचून दाखवतात. फलाटावरील पेव्हर ब्लॉक, पादचारी पूल, आसनव्यवस्था, स्वच्छ पाणी, पंखे, दिवे , सांडपाण्याची व्यवस्था, तिकीट आरक्षणाची सुविधा, प्रवाशांच्या सोयीसाठी नव्याने तीन एक्स्प्रेसला संगमेश्वर स्थानकात थांबा मिळावा म्हणून निवेदन,आंदोलन असे अनेक विषय हाताशी घेऊन ते सफल करण्यात आले.

हे भगिरथ प्रयत्न करण्यासाठी या संघटनेचे प्रमुख संदेश जिमन आणि त्यांचे सर्व सहकारी आवर्जून झटताना दिसतात.

लोक प्रतिनिधींच्या गाठीभेटी, त्यांच्या शिफारशी यांच्या जोरावर कित्येक किचकट विषय मार्गी लावण्यात संघटनेला यश आले आहे. फलाट क्रमांक २ वरील पेव्हर ब्लॉक, सुशोभीकरण या कामात आमदार शेखर निकम यांनी मौलिक सहकार्य केले आहे. जातीने या गंभीर विषयावर लक्ष केंद्रित करुन सर्वतोपरी सहाय्य केले. या कामासाठी २३ लाख ३६ हजार ५५४ रुपये इतका भरघोस निधी उपलब्ध याबद्दल निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप आणि तमाम संगमेश्वर तालुक्यातील रेल्वे प्रवाशी, सामान्य जनता यांच्यावतीने आमदार महोदयांना धन्यवाद देण्यात येत आहेत.

संगमेश्वर तालुक्याचे ऐतिहासिक महत्त्व अधोरेखित करीत इथे पर्यटनाची संधी निर्माण व्हावी. केरळ गोवा यांच्या धर्तीवर कोकणातील गाव खेड्यातील लोकांना रोजगार उपलब्ध व्हावा.
इथल्या कोकणी माणसाचे जीवन समृद्ध व्हावे यासाठी कायमच निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर (रेल्वे) फेसबुक ग्रुप प्रयत्नशील असतों.

रुपेश मनोहर कदम/ सायले

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search