Konkan Railway News: कोकण रेल्वेने मध्यरेल्वेच्या सहकार्याने उन्हाळी हंगामादरम्यान मुंबई पुण्यावरून अजून काही अतिरिक्त गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यआधी पण या मार्गावर काही विशेष गाड्या सोडल्या आहेत त्यात या अतिरिक्त गाड्यांमुळे भर पडणार आहे.
दिनांक १५/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकावरुन रात्री ०१:१० वाजता सुटेल आणि दुपारी १४:३५ वाजता करमाळी या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 01456 Karmali – Lokmanya Tilak (T)
दिनांक १५/०४/२०२३ ते ०३/०६/२०२३ दरम्यान दर शनिवारी ही गाडी वरुन संध्याकाळी करमाळी स्थानकावरून १६;२० वाजता सुटेल आणि पहाटे ०३:४५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस या स्थानकावर पोहोचेल.
2) Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Superfast & Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn. Special (Weekly):
Train No. 01049 Pune Jn. – Ernakulam Jn. Special (Weekly):
दिनांक १३/०४/२०२३ ते २५/०५/२०२३ दरम्यान दर गुरुवारी ही गाडी पुणे या स्थानकावरुन संध्याकाळी १८:४५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १८:५० वाजता एर्नाकुलम या स्थानकावर पोहोचेल.
Train No, 01050 Ernakulam Jn. – Pune Jn. Special (Weekly):
दिनांक १४/०४/२०२३ ते २६/०५/२०२३ दरम्यान दर शुक्रवारी ही गाडी एर्नाकुलम या स्थानकावरुन रात्री २३:२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रात्री ०२:४५ वाजता पुणे या स्थानकावर पोहोचेल.
एसएलआर – 02 + सेकंड सीटिंग – 06 + स्लीपर – 11 + थ्री टायर एसी – 02 + टू टायर एसी – 01 असे मिळून एकूण 22 LHB डबे
आरक्षण
गाडी क्र. ०१४५६ करमाळी – लोकमान्य टिळक टर्मिनस विशेष गाडीचे आरक्षण दिनांक १०/०४/२०२३ रेल्वेच्या सर्व टिकेट्स खिडक्यांवर आणि अधिकृत संकेतस्थळांवर खुले होणार असे रेल्वे प्रशासनाने जाहीर केले आहे.
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.
Konkan Railway News :प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन कोंकण रेल्वेमार्गावर पश्चिम रेल्वेच्या सहकार्याने उधना ते मंगुळुरु दरम्यान एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर खुले होणार आहेत.
Train no. 09057 / 09058 Udhana Jn – Mangaluru Jn – Udhana Jn Weekly Special on Special Fare
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn
ही गाडी दिनांक १२ एप्रिल ते ०७ जून पर्यंत दर बुधवारी उधाणा या स्थानकावरुन रात्री २०:०० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी संध्याकाळी १९:४० वाजता मंगळुरु या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09058 – Mangaluru Jn – Udhana Jn
ही गाडी दिनांक १३ एप्रिल ते ०८ जून पर्यंत दर गुरुवारी मंगळुरु या स्थानकावरुन रात्री २१:१० वाजता सुटेल व ती दुसऱ्या दिवशी रात्री २१:०५ वाजता उधाणा या स्थानकावर पोहोचेल.
Train no. 09057 Udhana Jn – Mangaluru Jn या गाडीचे आरक्षण आज दिनांक 10/04/2023 पासून सर्व तिकीट खिडक्यांवर आणि सर्व अधिकृत ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत.
Konkan Railway News | मंगळुरू ते मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस अशी वन-वे सुपरफास्ट विशेष गाडी शनिवार दि. ८ एप्रिल २०२३ रोजी सोडण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०६००७ मंगळुरु जं. – लोकमान्य टिळक (टी) वन वे सुपरफास्ट स्पेशल मंगळुरू जंक्शन येथून 08/04/2023, शनिवार रोजी 18:10 वाजता सुटणार असून ती ट लोकमान्य टिळक (टी) येथे दुसऱ्या दिवशी 13:15 वाजता पोहोचेल.
ही गाडी एकूण 19 कोचसह धावणार आहे. टू टियर एसी – 01 कोच, थ्री टायर एसी – 01 कोच, स्लीपर – 06 कोच, जनरल – 09 डबे, SLR – 02. अशा डब्यांच्या रचनेसह धावणार आहे.
रत्नागिरी –आता गोव्यातील समुद्र किनाऱ्याप्रमाणे कोकणातील समुद्रकिनाऱ्यांवर ‘बीच शॅक्स’ अर्थात चौपाटी कुटी दिसणार आहेत. पर्यटन वाढविण्यासाठी गोव्याच्या धर्तीवर ‘बीच शॅक्स’ उभारण्यासंदर्भातील धोरणास बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. तात्पुरत्या हंगामी स्वरुपाच्या असलेल्या या कुट्या पहिल्या टप्प्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, रायगड येथील समुद्र किनाऱ्यांवर उभारल्या जातील.
सध्या पायलट प्रोजेक्ट म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, आरेवारे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर, तारकर्ली, रायगड जिल्ह्यातील वर्सोली, दिवेआगार आणि पालघर जिल्ह्यातील केळवा व बोर्डी या आठ किनाऱ्यांवर बीच शॅक्स उभारण्यात येतील. पुढील वर्षीपासून इतर चौपाट्यांवर देखील या धोरणाची टप्प्याटप्प्याने अंमलबजावणी होईल. महाराष्ट्र किनारपट्टी क्षेत्र व्यवस्थापन प्राधीकरणाच्या सहमतीने पर्यटन संचालनालयाने निश्चित केलेल्या जागेवरच तात्पुरती चौपाटी कुटी उभी करण्यासाठी परवाना देण्यात येईल.
चौपाटी कुटी चालविण्यासंदर्भात पर्यटन विभागाचे पुढील नियम असतील
या चौपाटी कुटीस सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशा वेळेत सुरू ठेवता येईल.
तसेच संगीताचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल.
प्रत्येक कुटीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरादेखील असेल.
एका चौपाटीवर कमाल १० कुट्या उभारता येतील.
यातून निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये स्थानिक व्यक्तींसाठी ८० टक्के जागा राखीव असतील.
कालावधी – या कुट्यांचे तीन वर्षांकरिता वाटप करण्यात येईल.
आकार – त्यांचा आकार १५ फूट लांबी, १५ फूट रुंद आणि १२ फूट उंच असेल
बैठक – गाळ्याच्या समोर बैठक व्यवस्थेसाठी २० फूट लांब आणि १५ फूट रुंद छत टाकता येईल.
परवाना मूल्य – कुटी मिळणाऱ्या व्यक्तीला परवान्यासाठी १५ हजार रुपये अर्जाचे ना परतावा मूल्य असेल.
वार्षिक शुल्क – या कुटीसाठी पहिल्या वर्षी ४५ हजार, दुसऱ्या वर्षी ५० हजार, तिसऱ्या वर्षी ५५ हजार रुपये वार्षिक शुल्क राहील.
अनामत रक्कम – याशिवाय ३० हजार रुपये सुरक्षा अनामत जमा करावी लागेल, जी तीन वर्षांचा कालावधी संपल्यानंतर परत केली जाईल.
गोवा वार्ता – तळकोकणात अधून मधून काळे बिबटे दृष्टीस येत आहेत असे बोलले जात होते. तळकोकणत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेरी येथे रात्री एका नागरिकास काळा बिबटा दिसल्याची बातमी आली होती. परंतु या बातमीस काही जणांनी आक्षेप घेऊन ती बातमी खोटी असल्याचे दावे केले होते. मात्र जिल्ह्या लगतच्या गोवा राज्यातील केपे तालुक्यातील बाळ्ळी येथे लोकवस्तीत फिरणाऱ्या काळ्या बिबट्याला (ब्लॅक पॅंथर) वनविभागाने 1 एप्रिल रोजी पिंजऱ्यात पकडले आहे. त्यामुळे तळकोकणत आणि लगतच्या गोवा राज्यात ब्लॅक पॅन्थर चा वावर असल्याचे सिद्ध झाले आहे.
गोव्याच्या जंगलांमध्ये काळ्या बिबट्यांचा वावर होता, हे यापूर्वी वन विभागाने लावलेल्या कॅमेरा ट्रॅपिंगमध्ये सिद्ध झाले होते. आता बाळळी परिसरातील लावण्यात आलेल्या पिंजऱ्यामध्ये हा बिबट्या सापडला आहे.
लक्ष ठेवण्याकरता ट्रॅकिंग डिव्हाईस
पकडण्यात आलेल्या बिबट्याला नेत्रावली च्या अभयारण्यात सोडण्यात येणार आहे. तो पुन्हा मानवी वस्तीत जाऊ नये याची दक्षता घेतली जाणार आहे, म्हणूनच त्याच्यावर लक्ष ठेवण्याकरता हे ट्रॅकिंग डिव्हाईस लावण्यात येत आहे. राज्यातला हा पहिलाच प्रयोग आहे, असे वनविभागाच्या वतीने सांगण्यात आले.
दोडामार्ग | सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींनी परत येवून धुडगूस घालणे चालू केल्याने येथील नागरिकांमध्ये चिंतेचे अणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील काही दिवस केर आणि मोर्ले या गावांतील बागायतींमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान करून त्यांनी आपला मोर्चा वायंगणतड या गावी वळवला आहे.
अचानक शेतात हत्तीं आल्याने वायंगणतड ग्रामस्थांनी शेतात घाव घेवून त्यांना हिसकावून लावण्याच्या प्रयत्न केला. मात्र हत्तींना त्यांच्या प्रयत्नांना दाद दिली नाही. त्यानंतर खबर मिळाल्यावर वन विभागाचे कर्मचारी हजर झाले. ग्रामस्थांनी आणि या कर्मचाऱ्यांनी कसेबसे त्यांना हिसकावून लावले. मात्र हत्तीं पुन्हा आल्याने ग्रामस्थांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींकडून शेताची, बागायतीची मोठ्या प्रमाणात नासधूस होत असल्याने हाता तोंडाशी आलेले शेती उत्पादन शेतकर्यांना गमावण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा या तिन्ही राज्यांच्या सीमेवर वसलेलं तळकोकणातील दोडामार्ग मधील तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्ष हत्तीचं वास्तव्य असून शेती आणि बागायतींचं नुकसान करत आहेत. पावसाळा सुरु झाला की हे हत्ती घाटमाथ्यावर जातात आणि पुन्हा पावसाळा संपल्यानंतर परत येतात. पाच ते सहा हत्तींचा कळप तिलारीच्या खोऱ्यात गेली वीस वर्षे वावरत आहे. त्यामुळे या ठिकाणचे ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची हत्तींचा बंदोबस्त करण्याची मागणी पुन्हा जोर धरु लागली आहे. उन्हाळी शेती, काजू, नारळ, सुपारी केळी या बागायतीचे हत्तीने मोठ्या प्रमाणात नुकसान केलं आहे.
सिंधुदुर्ग -ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याबद्दल एक भाकीत केले आहे. .दोन ते तीन महिन्यांमध्ये नारायण राणे यांचं मंत्रीपद जाणार असल्याचं भाकीतच नाईक यांनी वर्तवलं आहे. हे भाकीत नसून वस्तुस्थिती आहे. असं देखील वैभव नाईक म्हणाले आहेत. नारायण राणे यांचं शिवसेनेवर टीका करण्याचं काम होतं. ते काम आता संपलेलं आहे त्यामुळे त्यांचं मंत्रीपद पुढील काही महिन्यांमध्ये जाणार आहे. असा दावा त्यांनी केला.तर पुढं म्हणाले की, नारायण राणेंना माझ्या विरोधात माझ्या मतदारसंघातून त्यांच्या मुलाला उभं करायचं आहे. मात्र जनतेचा कौल हा उद्धव ठाकरेंसोबत आहे त्यामुळे माझ्याबद्दल संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
तर शिंदेंच्या शिवसेनेतील आमदारांवर बोलताना म्हणाले, जे आमदार आमच्यातून शिंदे गटात गेले आहेत ते आमदार आमच्यात पुन्हा येण्याचा प्रयत्न करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी आदेश दिला तर अनेक आमदार परत येण्यास तयार आहेत. आमच्यातून गेलेल्या आमदारांना आता त्यांची खरी परिस्थिती कळालेली आहे. असा दावा देखील त्यांनी केला आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या हापा-मडगाव एक्सप्रेस तसेच पोरबंदर ते कोचुवेली दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला प्रत्येकी एका फेरीसाठी अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रेल्वेने या गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतला. या संदर्भात कोकण रेल्वे कडून प्राप्त माहितीनुसार हापा मडगाव या गाडीला हापा येथून सुटताना 05 एप्रिल रोजी तर मडगाव ते हापा दरम्यान धावताना 07 एप्रिल रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा वाढीव जोडला जाईल. याचबरोबर पोरबंदर ते कोचुवेलीदरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक एक्सप्रेसला पोरबंदर येथून सुटताना 06 एप्रिल रोजी तर कोचुवेली येथून सुटताना 09 रोजी स्लीपर श्रेणीचा एक जादा डबा जोडला जाणार आहे. उन्हाळी हंगामामुळे कोकण रेल्वे मार्गे धावणाऱ्या गाड्यांना गर्दी होऊ लागली आहे. यामुळे अनेक गाड्यांची प्रतीक्षा यादी वाढू लागली आहे. रेल्वेने काही गाड्यांना अतिरिक्त डबे जोडण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतीक्षा यादीवरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
Konkan Railway News | कोकण रेल्वेमार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. जवळपास या मार्गावरील सर्वच गाड्या आता विद्युत इंजिनसह धावत आहेत. विद्युत इंजिनामुळे इंधनावर होणार्या खर्चावर मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. त्यामुळे या वाचणार्या पैशांतून या मार्गावरील विकासाची कामे करणे रेल्वेला शक्य होणार आहे. त्याशिवाय डिझेल इंजिनामूळे मोठ्या प्रमाणावर होणारे प्रदूषण टाळता येणार आहे.
पण या विद्युतीकरणामुळे काही समस्या निर्माण झाल्या आहेत. या मार्गावरील अनेक गावे रेल्वेरूळा मुळे दोन भागात विभागली आहेत. घर रूळाच्या एका बाजूला तर शाळा आणि शेती एका बाजूला. त्यामुळे रूळ ओलांडल्या शिवाय गावकर्यांकडे पर्याय नाही आहे. कारण या मार्गावर पलीकडे जाण्यासाठी ब्रिज नाही आहेत. असले तरी ते खूप अंतरावर आहेत. याआधी गाड्या डिझेल इंजिनावर धावत होत्या त्यामुळे गाड्यांचा मोठा आवाज येत असे. या आवाजामुळे ग्रामस्थ किंवा वन्य प्राणी सावध होत असत. पण आता त्याप्रमाणात आवाज येत नाही त्यामुळे रूळांवर अपघात वाढत असल्याचे दिसत आहेत. वन्य आणि पाळीव प्राणी तसेच नागरिकांचा बळी जाण्याच्या बातम्या आजकाल मोठ्या प्रमाणावर ऐकण्यास मिळत आहेत.
वन्यप्राणी रूळांवर येवू नये यासाठी रेल्वेमार्गाच्या दोन्ही बाजूस कुंपण बांधणे गरजेचे आहे. व्यवहार्य दृष्टीने पाहता सर्वच ठिकाणी पादचारी पूल बांधणे शक्य नाही पण ज्याठिकाणी जास्त प्रमाणात रूळ ओलांडले जाते अशा ठिकाणी असे पूल किंवा भुयारी मार्ग बांधणे गरजेचे आहे.
उत्तरा जोशी, देवगड |चांगलं शिक्षण घेतल की शहराकडे निघायचं हा आजवरचा कोकणातल्या मुलांचा इतिहास. कोकणातल्या माणसाला मुळातच शहराची जबरदस्त ओढ आणि त्यातूनच शिक्षण चांगलं असेल तर मग गावाकडे परत येणं नाहीच. पण या सगळ्याला छेद देणारा एक मुलगा याच कोकणात आहे.“ प्रसाद गावडे”.
दोडामार्ग तालुक्यातील मांगेली या छोट्याशा गावातला हा मुलगा. याचं बालपण तळकोकणात गोवा-कर्नाटक-सिंधुदुर्ग च्या सीमेवरील मांगेली ह्या गावात गेले..!
तिन्ही बाजूने सह्याद्री च्या डोंगर रांगा ,मांगेलीच्याडोंगरात उगम पावून गोव्याच्या दिशेने वाहणारी थोरली न्हय अर्थातच आताची तिलारी नदी ,प्रचंड जैवविविधता ,प्राणी पक्षी आणि वनराईने नटलेला असा हा तिलारी खोऱ्याचा प्रदेश..प्रसादने मनुष्य आणि निसर्ग ह्यातील नातं जवळून अनुभवलं ते ह्याच दिवसात..संपूर्णपणे निसर्गधारीत जीवनशैली जगणारे अत्यंत आनंदी आणि समाधानी माणसं त्याने इथे पाहिलीत.
दहावी होईपर्यंत सावंतवाडी हेच मोठं शहर समजणाऱ्या प्रसादला बारावी नंतर त्याच्या चांगल्या गुणांमुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली. चार वर्ष दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात त्याने अभियांत्रिकी चे शिक्षण पूर्ण केल. या चार वर्षात त्याने औरंगाबाद मधील दुष्काळ अगदी जवळून अनुभवला. लोकांचे पाण्यासाठी होणारी वणवण,भकास उजाड माळरान हे सगळं पाहून त्याला वेळोवेळी कोकणातल्या सुबत्तेची अधिकच जाणीव होत गेली.
प्रसाद म्हणतो की,“ह्या चार वर्षात सगळ्यात जास्त आठवलं ते माझं कोकणचं जीवन,इथला निसर्ग, इथला पाऊस,समुद्र,प्राणी,पक्षी,जैवविविधता ,हिरवेगार डोंगर,सडे,काजू आंबे फणस सगळंच..त्यामूळे डिग्री घेतल्यावर पहिल्यांदा मनात ठाम केलं की या पुढे काहीही झालं तरी कोकण सोडायच नाही..जे काही करणार इथे राहूनच..इथल्या लालमातीत सोनं आहे, जगात कुठेच सापडणार नाही असा स्वर्गीय निसर्ग असलेला प्रदेश सोडून भकास ,प्रदूषित,so called विकास करू पाहणाऱ्या शहरांकडे करिअर घडवायला जाणाऱ्यांमधला मी कधीच होणार नव्हतो..”
शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रसाद कोकणात परत आला.सर्वसाधारण कुटुंबातून आल्यामुळे उत्पन्न मिळवणे भागच होत. मांगेली पासून गोवा जवळ असल्यामुळे वर्षभर त्याने गोव्यातच GIDC मधील एका कंपनीत जॉब केला पण इथेही त्याची निसर्गाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना . साधारण वर्षभर या कंपनीत नोकरी केल्यानंतर प्रसादला जाणीव झाली की आपल मन काही या नोकरीत राहणार नाही. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना. पाट्या टाकल्या सारख्या यांत्रिक नोकरीत त्यांचे मन काही रमेना. यातूनच त्याने घेतला एक धाडसी निर्णय नोकरी सोडण्याचा. एके दिवशी अचानक एक महिन्याचा पगार व्हायचा बाकी असताना नोकरीचा राजीनामा देऊन प्रसाद आपल्या गावी मांगेली ला परत आला.पुढे काय करायचं वगैरे काही ठरलं नव्हतं फक्त गावी जायचं आणि काहीतरी करायचं एवढंच डोक्यात घेऊन प्रसाद परतला होता. सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे प्रसादच्या घरच्यांनाही याच आता कसं होणार ही काळजी वाटायला पण प्रसाद मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता.
गावातल्या निसर्गधारीत जीवन जगणाऱ्या आपल्या गावठी कोकणी लोकांचं जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन आहे ह्याची त्याला जाणीव होती. यातूनच त्याने सुरू केलं इको टुरिझम. आजवर आपल्याकडे येणारे पर्यटक हे काही ठराविक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतात मजा करतात आणि परत जातात पण कोकणातलं खरं जीवन त्यांना कुठे दिसतच नाही किंवा ते जगता येत कोकणातला माणूस जे खर आयुष्य जगतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आसुसलेल्या लोकांना आपण या कोकणी माणसाच्या जीवनाचा अनुभव द्यायचा जे जीवन ते जगतात त्या जीवनाचच ब्रँडिंग करायचं आणि कोकणात आलेल्या पर्यटकांना त्यांच्यासारखं जीवन जगायला लावायचं आणि त्याचे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांना त्यातूनच उत्पन्न मिळेल अशी प्रसाद ची कल्पना. यातूनच त्याने स्वतःकडे काहीही सोय नसताना गावच्या लोकांची मदत घेऊन अशा टूर्स अरेंज करायला सुरुवात केली. सुरुवातीच्या काही टूर्स ला प्रसाद कडे ना धड चांगला कॅमेरा होता ना स्वतःची गाडी. खरंतर चार चाकी गाडी सुद्धा व्यवस्थित चालवता येत नव्हती. पण तरीही प्रसादने या पर्यटकांना गावातल्याच एका भाड्याच्या गाडीतून फिरवलं.ओळखीच्यांच्या घरी त्यांच्या जेवणाची सोय केली आणि हे पर्यटक अतिशय आनंदाने परतले. यातूनच त्याला गवसला पर्यटनाचा आणि एक मार्ग.
पुढच्या महिन्यात त्यानेसावंतवाडी,कुडाळ,मालवण आणि वेंगुर्ले हे चारही तालुके अगदी पिंजून काढले.प्रत्येक तालुक्यात असलेली अगदी बारीकसारीक निसर्गरम्य ठिकाणं, डोंगरात लपलेले धबधबे,नद्या, जंगलातली काही सुंदर ठिकाणं, तसेच असेच काही दुर्लक्षित परंतु स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे त्याने शोधून काढले.कोकण म्हणून आजवर प्रसिद्ध झालेल्या ठिकाणांव्यतिरिक्त ज्यांना खरच निसर्गाची ओढ आहे अशा लोकांना भेट देऊन इथल्या निसर्गाचा इथल्या जीवनाचा आनंद घेता यावा म्हणून ही प्रसादची धडपड.
सोशल मीडियाचा उपयोग करून घेत सुरुवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून प्रसाद ने आपल्या या उपक्रमाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यातून कोकणातल्या अंतर्गत भागात फिरायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली. या पर्यटकांमध्ये परदेशी पाहुण्यांचादेखील समावेश होऊ लागला.गावागावात लपलेल्या प्रेक्षणीय गोष्टी पाहून येणारे पर्यटक खुश होऊन जाऊ लागले आणि नवीन लोकांना याबद्दल माहिती देऊन प्रसादकडे पाठवू लागले.प्रसादच्या या टूर्स मुळे मुख्यतः फायदा होऊ लागलाय तो गावागावातल्या अगदी सामान्य माणसाला.घरगुती जेवणाची सोय केल्यामुळे गावागावातल्या कुटुंबांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे.सध्या याचं प्रमाण कमी असेल तरी भविष्यात मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाच्या संधी लोकांना उपलब्ध होतील आणि गावात राहणाऱ्या लोकांना आपल्या जीवनाबद्दल वाटणारी लाज कमी होईल अशी प्रसादची पक्की खात्री आहे. याबद्दल प्रसाद उदाहरण दाखल सांगतो, ”मागच्या मे महिन्यात फॉरेनर चा १६-१७जणांचा एक ग्रुप दोडामार्ग मध्ये मी घेऊन गेलो तिथल्या एका आमच्या कोकणी माणसाने त्यांना त्यांच्याच बागेत झाडावर चढुन फणस ,आंबे,काजू,कोकम काढून दिले आणि ते ह्या पर्यटकांनी चांगले पैसे देऊन विकत घेतले,आजोबांचे खूप कौतुक केले..त्यांच्या बायकोने शेतातल्या मांगरात(शेतघर) उकडा भात,तांदळाची भाकरी,फणसाची भाजी आणि सोलकढी असं जेवण करून घातले ते जेवण इतकं आवडलं की त्यांनी आजीला जाताना मिठीच मारली ..रानातील करवंद ,जांभूळ,चाफर ,तोरण सगळं काही जाताना त्यांना अगदी कोकणी रानमेवा म्हणून भेट दिली..!
आयुष्यात पहिल्यांदा कोकणातल्या एका गावठी माणसाला त्याच्या गावठी जीवनाचा अभिमान वाटला..हे मी माझं यश समजतो आणि इथेच मला माझा पहिला रानमाणूस भेटला..!! वालावल च्या खाडीत मयु तारी गेली कित्येक वर्ष लोकांना पैलतीरावर नेऊन सोडतो पण त्याच खाडीत बॅकवॉटर सफरी साठी मी आणि मयु पर्यटकांना फिरवून त्याच्या रोजच्या उत्पन्ना पेक्षा अधिक पैसे मिळवून देतो…किनाऱ्याला लागून असणाऱ्या माडबागायतीत छोट्याशा घरात राहणारा एखादा स्थानिक इथे काही उत्पन्न नाही म्हणून पैशाच्या लोभापायी आपली सोन्यासारखी जमीन एखाद्या बाहेरच्या माणसाला विकून टाकून कोकणातून बाहेर जाईल आणि आपलं कोकण हळूहळू बाहेरच्यांच्या हातात जाईल याची भीती कायम मनात असते आणि म्हणूनच प्रसादच लक्ष या लोकांना कमीतकमी खर्चात रोजचं उत्पन्न कस निर्माण करता येईल यात लागलेल असतं.
आजवर अनेक सोलो ट्रॅव्हलर्स ,अनेक गृप टूर्सना प्रसादने स्थानिकांच्या मदतीने उत्तम सुविधा दिली आहे. नुकतीच एक कॉर्पोरेट टूर यायची ठरलेली असताना अचानक ट्रेनची तिकीट कन्फर्म न झाल्याने आणि खाजगी वाहनांसाठी ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळे मुंबई ते सावंतवाडी प्रवासाचा पर्यटकांचा प्रश्न प्रसादने रातोरात मुंबईला जाऊन दुसऱ्या दिवशी स्वतः पूर्ण ड्रायव्हिंग करून त्यांना सावंतवाडीला आणून सहज सोडवला.त्याच्या या सहकार्यामुळे तसेच इथल्या वास्तव्यात आलेल्या अनुभवाने अतिशय खुश होऊन पुन्हा जाताना पर्यटकांनी त्याला त्याच्या पुढच्या प्रवासात मदत करण्याची देखील तयारी दाखवली आहे.
स्वतःकडील मोबाईलवर फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणारा प्रसाद या दीड वर्षाच्या प्रवासात स्वतःचा प्रोफेशनल कॅमेरा, ड्रोन तसेच स्वतःच्या उपजीविकेपुरते पैसे कमावण्याच्या टप्प्यावर पोचलाय. सुरुवातीला कशीबशी चारचाकी चालवणारा प्रसाद आता सगळ्या प्रकारच्या चारचाकी सहज चालवू लागलाय. घरातल्यांचा सुरुवातीला काळजीपोटी असणारा विरोध आता हळूहळू मावळतोय.एकेक शिलेदार प्रसादच्या सोबत काम करायला येऊन मिळत आहेत. या सोबतच इथल्या पडीक जमिनीतून उत्पादन सुरू करण्यासाठी प्रसादचा प्रयत्न सुरू आहे.त्याची स्वतःची फारशी जमीन नाही परंतु त्याच्या या प्रयत्नांना हातभार म्हणून एका ओळखीच्या कुटुंबाने आपली पडीक असलेली शेतजमीन त्याला शेतीसाठी देऊ केली आहे.त्या जमिनीतून यावर्षीपासून उत्पादन घेण्यास सुरुवात होईल.
यासोबतच आता स्वतःच्या कल्पना जगापर्यंत पोचवण्यासाठी लवकरच “कोकणी रानमाणुस” ची स्वतःची वेबसाईट पूर्णत्वाला येईल. कोकण म्हणजे फक्त गणपतीपुळे,मालवण तारकर्ली आणि वेंगुर्ला इथले समुद्र किनारे आणि देवळे नव्हे तर कोकण म्हणजे अश्याच गावठी कोकणी रानमाणसांसोबत निसर्गजीवन जगायला शिकवणारे स्वर्गीय डेस्टिनेशन आहे..म्हणून प्रसाद आपल्या जाहिरातीत नेहमी कॅपशन ला टाकत असतो.
“Explore Heavenly Konkan with Konkani Ranmanus”
जितका सुंदर इथला निसर्ग आहे तितकीच गोड इथली माणसं ही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून मिळणारी प्रतिक्रिया असते ..!!कोकणचा विकास हा रासायनिक प्रकल्प,मोठे रस्ते,इमारती,industries ह्यात नाहीये तो आहे निसर्गपूरक शाश्वत पर्यटनात,शेतीत,फळप्रक्रियेत,मत्स्योत्पादन ह्यात..
येत्या काळात दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला हा गोवा सीमेलगतच्या तालुक्यांना ecotourism साठी भारतात ओळख मिळवून द्यायचं प्रसादचं स्वप्न आहे..याबद्दल बोलताना प्रसाद म्हणतो“गाडगीळ समितीच्या शिफारसी नुसार हा संपूर्ण भाग इकोसेन्सिटिव्ह आहे तरीही मायनिंग ,क्रशर,केरळ वाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे..जोपर्यंत लोकांना शाश्वत विकासाचे महत्व आपण पटवून देत नाही तोवर कोकण चा विनाश थांबवणे अशक्य आहे..
कोकणात राहून कोकण आहे तसंच निसर्गरम्य ठेवणारे रानमाणूस जरी निर्माण करू शकलो तर देवाने मला कोकणात जन्म दिल्याचे उपकार फेडल्याचे समाधान मिळेल ..बाकी करिअर वगैरे सगळ्या सांगायच्या गोष्टी असतात हो..”
या महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रसाद आणि त्याच्या काही मित्रांनी जवळपासच्या नदी-नाल्यांमधून उन्हाळ्यात साठलेला कचरा साफ करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला आहे.याबद्दल सांगताना प्रसाद आणि त्याचे सहकारी म्हणतात की,“ उन्हाळ्यात हे गावातून वाहणारे नदी-नाले कोरडे होतात आणि याच काळात आजूबाजूची लोक सहज वाटेल तो कचरा या नदीपात्रात आणून टाकतात.पाऊस सुरू झाला की हा सगळा कचरा वाहून जवळच असलेल्या समुद्राला मिळतो आणि पर्यायाने यातले घातक घटक समुद्रातल्या प्राण्यांच्या पोटात जातात.तेच दूषित अन्न जेव्हा मासे किंवा समुद्रातले प्राणी अन्न म्हणून आपण खातो तेव्हा आपल्या पोटात जातात. शिवाय या विघटन न होणाऱ्या कचऱ्यामुळे समुद्राचं प्रदूषण होतंच आणि पुन्हा हा सगळा कचरा किनाऱ्यावर येऊन साठतो आणि स्वच्छ सुंदर किनारे विद्रुप होऊन जातात.म्हणूनच काळजी म्हणून आम्ही यावर्षी पाऊस सुरू होईपर्यंत जवळपासच्या जेवढ्या जमेल तेवढ्या नदी नाल्यांच्या कोरड्या पात्रांना स्वच्छ करायचं ठरवलं आहे.यासाठी गावागावातल्या लोकांना सोबत यायचं देखील हे तरुण आवाहन करत आहेत.येतील त्यांना सोबत घेऊन आणि कोणी नसेल तरी आपल्याला जमेल झेपेल तेवढं हे काम आपण करायचंच या ठाम निश्चयाने या कामाला सुरुवात झाली आहे.”
खरतर रोजच्या आयुष्यात अस वागणाऱ्या माणसाला सगळे वेडाच समजतात.पण वेडेच इतिहास घडवतात हेही तेवढंच खरं. प्रसाद सारखे कोकणाची ओढ असलेले तरुण सगळ्या कोकणात निर्माण झाले तर दिवसेंदिवस रिकाम्या होत जाणाऱ्या कोकणाला उज्वल भविष्य आहे एवढं नक्की. उरीपोटी कोकणच प्रेम घेऊन जगणाऱ्या या धडपड्या प्रसादला शुभेच्छांसोबत आपण आपला मदतीचा हातदेखील नक्किच देऊया..
लेखिका = उत्तरा जोशी, देवगड
Vision Abroad
मराठी तरुण-तरुणींना परदेशांत शिक्षण आणि नोकरीसाठी सर्वतोपरी मदत करणारी मराठी माणसांनी चालवलेली संस्था.