मुंबई : बळवली – पत्रादेवी ग्रीनफिल्ड सहापदरी द्रुतगती महामार्गासंबधी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या मार्गासाठी भूसंपादनाच्या प्रक्रियेस सुरवात झाली असून भूधारकांना तशा नोटिसा पाठवण्यात आलेल्या आहेत.
सुमारे ३८८ किलोमीटरच्या या महामार्गासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) प्रकल्प अंमलबजावणी संस्था म्हणून काम करणार आहे.
हा कोकण द्रुतगती महामार्ग झाल्यानंतर मुंबईसाठी सर्वात गतिमान महामार्ग तयार होईल. हा महामार्ग नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल. त्यामुळे कोकणातून आंतरराष्ट्रीय प्रवास करणे सोयीचे होईल. कोकण द्रुतगती महामार्ग हा रायगड जिह्यातील पेण, अलिबाग, रोहा, तळा, माणगाव, म्हसळा तसेच रत्नागिरी जिह्यातील मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, रत्नागिरी, लांजा, राजापूर आणि सिंधुदुर्ग जिह्यातील देवगड, मालवण, कुडाळ, वेंगुर्ला, सावंतवाडी असा जाणार आहे. महामार्ग पेण जिह्यातल्या बलवली गावातून सुरू होईल आणि एकूण ४ टप्प्यात या महामार्गाचे बांधकाम करण्यात येईल.
या महामार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ते कोकण अगदी कमी वेळामध्ये पार करता येणार आहे. त्याच बरोबर मुंबई गोवा महामार्गावरील ताण कमी होईल.
Big update on 389 Km 6 Lane Access Controlled Greenfield Balavli-Patradevi Konkan #Expressway.
Land acquisition notices have been finally issued by the #Maharashtra Government.
रायगड: माणगाव वासियांना कोकण रेल्वे कडून एक चांगली बातमी येत आहे. रेल्वे प्रशासनाने माणगाव स्थानकावर लांब पल्ल्याच्या तीन गाडयांना थांबे देण्याचा निर्णय घेतला आहे. सुरवातीस हे थांबे प्रायोगिक तत्वावर असून प्रवाशांचा प्रतिसाद पाहून त्यांना कायम करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक 16333 वेरावल- तिरुवानंतपुरम सेंट्रल ही गाडी दिनांक 19 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16334 तिरुवानंतपुरम – वेरावल सेंट्रल ही गाडी दिनांक 23 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी 07:00 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 19259 कोचुवेली – भावनगर वीकली एक्सप्रेस ही गाडी दिनांक 19 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी 07:00 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 19260 भावनगर – कोचुवेली वीकली एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16335 गांधीधाम – नागरकोईल एक्सप्रेस ही गाडी दिनांक 20 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:40 तर बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार रात्री 01:50 अशी असणार आहे.
गाडी क्रमांक 16336 नागरकोईल – गांधीधाम एक्सप्रेस ही गाडी दिनांक 24 ऑक्टोबर च्या फेरीपासून या स्थानकावर थांबविण्यात येणार आहे. या गाडीची माणगाव स्थानकावरील वेळ पावसाळी व बिगर पावसाळी वेळापत्रकानुसार संध्याकाळी 07:00 अशी असणार आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथील पुलावर कंटेनर आणि आयशर टेम्पोची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना संध्याकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घडली.
राजन बाबल्या डांगे (40, रा. हातखंबा, रत्नागिरी ) हा लाद्याची वाहतूक करणाऱ्या आयशर टेम्पोच्या हौद्यात बसलेला होता. या अपघातामुळे त्याच्या अंगावर लाद्या पडून त्याचा मृत्यू झाला.अपघाताची माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती.या अपघातामुळे वाहतूक खोळंबली असून अपघातग्रस्त वाहनांमध्ये अडकलेल्याना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरु होते.
Konkan Railway News: कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. पावसाळी हंगामात काही गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये कपात केली गेली होती. या गाड्यांच्या फेऱ्या दिनांक ०१ नोव्हेंबर पासून पूर्ववत करण्यात येणार आहेत. कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या एका प्रसिद्धी पत्रकानुसार खालील गाड्यांच्या फेऱ्या पूर्ववत करण्यात येणार आहेत.
या दोन्ही गाड्या दिनांक ०३ नोव्हेंबर पासून आठवड्यातून ४ दिवस म्हणजे मंगळवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार या दिवशी धावणार आहे. पावसाळी हंगामात मान्सून वेळापत्रकानुसार या गाड्या आठवड्यातून फक्त दोन दिवस चालविण्यात येत होत्या.
या गाड्या दिनांक ०१ नोव्हेंबर पासून सोमवार आणि गुरुवार वगळता आठवड्यातून ५ दिवस चालविण्यात येणार आहेत. पावसाळी हंगामात या गाड्या मान्सून वेळापत्रकानुसार आठवड्यातून फक्त तीनच दिवस धावत होत्या.
रत्नागिरी : कोकण रेल्वे महामंडळाच्या वतीने ३३ वा स्थापना दिवस वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटर सभागृहात साजरा करण्यात आला. स्थापना दिवसासह राष्ट्राला समर्पित असलेल्या अविरत सेवेची २५ वर्षे देखील कोकण रेल्वेने पूर्ण करून एक महत्वाचा टप्पा गाठला आहे. यानिमित्ताने कोकण रेल्वे व्यवस्थापनाच्या २५ वर्षांच्या अखंडीत सेवापूर्ती निमित्त महामंडळातील अधिकारी- कर्मचारी यांचा विशेष सत्कार कोकण रेल्वेचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी कोकण रेल्वेचे संचालक राजेश भडंग (फायनान्स), संतोष कुमार झा (ऑपरेशन्स, कमर्शिअल ), आर. के.हेगडे (वे-वर्कस्) व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी कोकण रेल्वेचे उपमहाव्यवस्थापक (जनसंपर्क) गिरीश करंदीकर, कार्यकारी संचालक (प्रकल्प) एल. प्रकाश, डेप्युटी लेखा अधिकारी अरूप बागुई यांच्यासह विविधविभागातउल्लेखनीय काम केलेल्या विभागांना तसेच वैयक्तिक कामगिरी केलेल्या अधिकारी-कर्मचारी यांचा स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात उल्लेखनीय कामासाठी कोकण रेल्वे जनसंपर्क विभागाला देखील पुरस्कार देऊन सन्मानित भ करण्यात आले. सदर सोहळ्यास कोकण रेल्वेच्या सर्व विभागातील विभागप्रमुख, अधिकारी-कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.
संजय गुप्ता यांनी कोकण रेल्वेने गेल्या १२-१८ महिन्यांत मिळवलेल्या कामगिरीची माहिती खालीलप्रमाणे दिली
माननीय पंतप्रधानांनी 27 जून 2023 रोजी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे गोवा – मुंबई CSMT वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
26 मार्च 2023 रोजी माननीय रेल्वेमंत्र्यांनी नव्याने पूर्ण झालेल्या प्रतिष्ठित चिनाब पुलाची पाहणी केली.
जुलै 2023 मध्ये रेल्वे मंत्रालयाच्या अमृत भारत योजनेत मडगाव रेल्वे स्थानकाच्या विकासाचा समावेश करण्यात आला आहे.
कोकण रेल्वेने आपल्या मार्गाचे 100% विद्युतीकरण पूर्ण केले आहे.
कोकण रेल्वेने खालील क्षेत्रात आतापर्यंतची सर्वोच्च कामगिरी केली आहे.
आतापर्यंतचा सर्वाधिक प्रवासी महसूल – ₹962.43 कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक मालवाहतूक महसूल – ₹736.47 कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक प्रकल्प महसूल – ₹3274. 70 कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक एकूण महसूल – ₹५१५२.२३ कोटी
आतापर्यंतचा सर्वाधिक निव्वळ नफा – ₹२७८.९३ कोटी
रत्नागिरी येथे कोल्ड स्टोरेज आणि एकात्मिक पॅक हाऊसचे बांधकाम करण्यासाठी महाप्रीटसोबत करार करण्यात आला.
मे 2023 मध्ये, BSNL सोबत एक करार करण्यात आला, ज्या अंतर्गत BSNL ने 31 कोटी रुपयांची आर्थिक तरतूद केली जी फायबर ऑप्टिक लाईनच्या नूतनीकरणासाठी राखून ठेवली जात आहे.
चिपळूण : सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज पहाटे चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. यामध्ये कोणतीही हानी झाली नाही, हे फार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या श्री. गुप्ता, श्री. सिन्हा व श्री. मिश्रा या तिघाजणांच्या तज्ज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण यांनी आज पहाटे केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे, माजी आमदार सदानंद चव्हाण, राजेश सावंत आदी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. चव्हाण प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, काल झालेली घटना ही दुर्देवी आहे. दोन किलोमीटरचा हा पूल आहे. ही घटना कशामुळे झाली, हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे. राष्ट्रीय महामार्गाची असणारी तिघा तज्ज्ञ लोकांची समिती याची तपासणी करुन, अहवाल देईल.
रत्नागिरी : एप्रिल महिन्यात गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या व उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या वारसांना वीस लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश शासनाच्या वतीने देण्यात आला आहे. चिपळूण विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखर निकम यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर ही मदत शासनाकडून देण्यात आले आहे.
चिपळूण तालुक्यातील तळसरगावातील तुकाराम बडदे यांच्यावर २३ एप्रिल २०२३ रोजी गवा रेड्याने प्राणघातक हल्ला केला होता. या हल्यात ते गंभीर प्रमाणात जखमी झाले होते. त्यांच्यावर अपरांत हॉस्पिटल, चिपळूण येथे सात ते आठ दिवस उपचार सुरु होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, नातवंडे असा परिवार आहे. मृत व्यक्तीच्या वारसांना शासनाच्यावतीने दिली जाणारी मदत तातडीने मिळावी यासाठी आमदार शेखर निकम व वन विभागाचे अधिकारी यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर २० लाख रुपयांची मदत शासनाकडून प्राप्त झाली. प्राप्त झालेली मदत मृताच्या वारसांना आमदार शेखर निकम यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आली. यावेळी वन विभागीय अधिकारी दिपक खाडे, वनपाल चिपळूण राजेश्री किर, सहाय्यक वनरक्षक वैभव बोराटे, वनपाल चिपळूण दौलत भोसले, वनक्षेत्रपाल रामपूर राजाराम शिंदे, वनरक्षक कोळकेवाडी राहुल गुंठे, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष शौकत मुकादम, प्रदेश सचिव जयंत खताते, तालुकाध्यक्ष अबु ठसाळे, मिडीयाध्यक्ष सचिन साडविलकर उपस्थित होते.
मुंबई : मुंबई गोवा महामार्गावरच्या उड्डाण पुलाचा भाग आज सकाळी तुटला आहे. या अपघातावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. मुंबई – गोवा महामार्गाच्या कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा अशी मागणी त्यांनी केली आहे. यासंदर्भात जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देखील लिहिलं आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई – गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. परंतु, काम जरी वेगात सुरू असलं तरी ते अत्यंत निकृष्ट पद्धतीने होत असल्याचा अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. कामाचा वेग वाढवताना गुणवत्तेशी शासनाने तडजोड केली आहे का? असा प्रश्न सर्वसामान्याच्या मनात निर्माण होत आहे, असं जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
सदर उड्डाणपुलाच काम निकृष्ट असल्याचा आरोप अनेक वेळा येथील स्थानिक नागरिकांनी केला होता. परंतु प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे निदर्शनास येत आहे. वरील घटना नागरिकांच्या दाव्यात तथ्य असल्याचे दाखवून देत आहे.तरी सदरील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेवून महामार्गाच्या कामाच्या दर्जाचे त्रयस्थ यंत्रणेमार्फत परीक्षण करण्यात यावे. तसेच, या घटनेची चौकशी करण्यात येऊन कंत्राटदार व अन्य दोषीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे.
या घटनेबाबत त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वर एक ट्विट पोस्ट सुद्धा केली. या पोस्ट मध्ये ते म्हणाले
“मुंबई गोवा महामार्गावर बांधकाम सुरु असलेल्या पुलाचा भाग कोसळल्याची घटना आज सकाळी घडली आहे. त्यामुळे बहुप्रतिक्षित असा या महामार्गाच्या गुणवत्तेबाबत देखील प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचं काम अत्यंत वेगाने सुरू असल्याचा दावा सरकारकडून केला जात आहे. वेग वाढवून कामाचा दर्जा घसरवला आहे का? सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र कामाच्या गुणवत्तेबाबत सरकारने खुलासा करावा. कोकणवासियांच्या डोळ्यात सरकारकडून केली जाणारी धूळफेक थांबवा.”
चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावर सुरू असेलेल्या उड्डाणपुलाच्या कामादरम्यान मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील उड्डाणपुलाचा गर्डर तुटण्याचा प्रकार घडला आहे. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेला नाही. मात्र, महाकाय लाँचरचे काही भाग तुटल्यानं मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण झाला आहे.या दुर्घटनेचा थरारक व्हीडिओ देखील समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. यादरम्यान बांधकाम सुरू असताना अचानक मोठा आवाज होऊन पुलाचा काही भाग तुटल्याचा प्रकार घडला आहे. यादरम्यान पुलाच्या खाली नागरिकांची एकच पळापळ झाल्याचे पाहायला मिळाले. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारस ही घटाना घडली. गेल्या अनेक महिन्यांपासून या फ्लायओव्हरचे काम सुरु आहे.
पुलाचा काही भाग कोसळतानाची घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पूल कोसळला तेव्हा स्फोट झाल्यासारखा मोठा आवाज झाला अशी माहिती घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी दिली. घटनेनंतर स्थानीक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली.
राजापूर : राजापूर पोस्ट ऑफिस येथे ग्राहकांसाठी रेल्वे आरक्षण सेवा सुरू करण्यात आली आहे. या सेवेचा लाभ रेल्वे प्रवाशांनी घ्यावा, असे आवाहन डाकघर अधीक्षक एन. टी. कुरळपकर यांनी केले आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे औचित्य साधून रेल्वे तिकीट आरक्षण सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. राजापूर तालुक्यातील व इतर जवळच्या भागातील रेल्वे प्रवाशांसाठी आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिस येथे सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात रत्नागिरी हेड ऑफिस, लांजा, संगमेश्वर या पोस्ट ऑफिसमध्ये भारतीय रेल्वे व भारतीय डाक विभाग यांच्या संयुक्त सहकार्याने ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. रेल्वे तिकीट आरक्षण सुविधा राजापूर पोस्ट ऑफिसमार्फत मिळावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी, विद्यार्थी, नोकरदार व लोकप्रतिनिधी यांच्याकडून होत होती. ही सेवा पोस्ट विभागाच्या पुढाकाराने सुरू झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.