Category Archives: कोकण रेल्वे

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटणाऱ्या दोन प्रमुख विशेष गाड्यांचा समावेश आहे.

पहिली विशेष गाडी (ट्रेन क्र. ०११७१/०११७२) मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावेल. ही गाडी मुंबईहून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाव येथून ही गाडी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडीची रचना (Composition): एकूण २२ कोच – २ टियर एसी (१), ३ टियर एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२).

दुसरी विशेष गाडी (ट्रेन क्र. ०१११९/०११२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान १७ एप्रिल ते १२ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ही गाडी LTT वरून मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाववरून ही गाडी शुक्रवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता LTT ला पोहोचेल.

या गाडीला एकूण २१ आधुनिक LHB कोच जोडण्यात आले आहेत. गाडीची रचना (Composition): एकूण २१ एलएचबी कोच – फर्स्ट एसी (१), २ टियर एसी (३), ३ टियर एसी (७), स्लीपर (८) आणि जनरेटर कार (२).

दोन्ही गाड्यांचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

या विशेष गाड्या दादर (केवळ CSMT गाडीसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबतील.

विशेष म्हणजे, ट्रेन क्र. ०११७२ आणि ०११२० साठीचे बुकिंग उद्या, १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी हालचाली सुरू; दोन टप्प्यांच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी निविदा जाहीर

   Follow us on        

मंगळुरू: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वेने कर्नाटक आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये ‘पॅच डबलिंग’ (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) करण्याच्या उद्देशाने व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत.

​या निविदेनुसार, प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विभागांचा अभ्यास केला जाणार आहे. यात मंगळुरूजवळील थोकूर ते मूकंबिका रोड बिंदूर या ११२ किलोमीटरच्या अंतराचा आणि गोव्यातील माजोर्डा ते महाराष्ट्रातील वैभववाडी रोड या १५१ किलोमीटरच्या अंतराचा समावेश आहे. एकूण २६३ किलोमीटर लांबीच्या या मार्गांच्या अभ्यासासाठी सुमारे 1.31 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार, निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. निवडलेल्या यशस्वी कंत्राटदाराला कामाचे आदेश मिळाल्यापासून पुढील तीन महिन्यांच्या आत हा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात जमिनीची उपलब्धता, तांत्रिक अडचणी आणि बांधकामासाठी लागणारा अंदाजित खर्च यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, ज्यावर पुढील प्रत्यक्ष कामाची दिशा ठरेल.

​कोकण रेल्वे मार्ग हा सध्या प्रामुख्याने एकेरी स्वरूपाचा असल्याने गाड्यांना क्रॉसिंगसाठी अनेकदा थांबावे लागते. यापूर्वी रोहा ते वीर या ४७ किमी अंतराचे दुहेरीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आता प्रस्तावित असलेल्या या नवीन ‘पॅच डबलिंग’मुळे रेल्वे हाताळणी क्षमता वाढेल, विलंबाच्या समस्या कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतुकीचा ताण पाहता हे पाऊल कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

Konkan Railway: आता ‘फुकटेगिरी’ पडणार महाग; कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी अधिक तीव्र

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात आपल्या मार्गावर तिकीट तपासणीची जोरदार मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वेने एकूण ८७३ विशेष तपासण्या केल्या, ज्यामध्ये ४१,५२२ प्रवासी अनधिकृत किंवा विनातिकीट प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंड स्वरूपात २.४१ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत आतापर्यंत एकूण १०,३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. या ११ महिन्यांच्या कालावधीत एकूण ४,५४,८४९ विनातिकीट प्रवासी पकडले गेले असून, त्यांच्याकडून २५.२१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आगामी हंगामाचा काळ लक्षात घेता, कोकण रेल्वेने ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर कडक तपासणी केली जाणार आहे. “सर्व प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, जेणेकरून प्रवासात कोणतीही गैरसोय होणार नाही,” असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे – सावंतवाडी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

पुणे: पुणे आणि कोकण या दोन महत्त्वाच्या विभागांना रेल्वेने अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुण्याहून कोकणसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. या नवीन रेल्वे सुविधेमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

या भेटीदरम्यान डॉ. कुलकर्णी यांनी ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ अंतर्गत ‘सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पा’ला मंजुरी देण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण कोकणातील रेल्वे वाहतुकीचे जाळे अधिक भक्कम होईल आणि सावंतवाडी हे एक महत्त्वाचे रेल्वे हब म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, या निर्णयामुळे पुणे-कोकण प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे ते कोकण रेल्वे प्रवासाच्या सद्यस्थितीचा विचार करता, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे सेवा प्रवाशांच्या अफाट संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुऱ्या आहेत. सध्या पुण्याहून कोकणात जाण्यासाठी  ‘पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस’ या एकमेव गाडीचा पर्याय उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासन काही विशेष गाड्या सोडते, परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. पुण्यामध्ये कोकणातील चाकरमान्यांची संख्या लाखांच्या घरात असून, या मोजक्या गाड्यांमुळे प्रवाशांना वर्षभर आरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा प्रवाशांना लांबचा वळसा घालून पनवेलमार्गे प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात.

रेल्वेची ही अपुरी सोय असल्यामुळे बहुतांश प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. मात्र, पावसाळ्यात घाटांमधील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रस्ते वाहतूक अनेकदा विस्कळीत होते, अशा वेळी रेल्वे हाच सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय ठरतो. म्हणूनच, खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ची मागणी अत्यंत रास्त आणि काळाची गरज आहे. ही गाडी सुरू झाल्यास सामान्य प्रवाशांना कमी खर्चात, जलद आणि आधुनिक सोयींसह थेट कोकणात पोहोचणे शक्य होईल, ज्यामुळे सध्याच्या यंत्रणेवरचा ताण मोठ्या प्रमाणात हलका होईल.

प्रस्तावित ‘मंगळुरू सेंट्रल – भावनगर टर्मिनस एक्सप्रेस व्हाया कोकण रेल्वे’ सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

मंगळुरू: कोस्टल कर्नाटक विभागाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना तेथील स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, रेल्वे प्रशासनाकडे ‘मंगळुरू-भावनगर एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण रेल्वे सध्या मंगळुरू सेंट्रल आणि चर्लापल्ली (हैदराबाद जवळ) दरम्यान एक नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही रेल्वे मंगळुरू-रामेश्वरम एक्सप्रेसच्या उपलब्ध डब्यांचा (Rake) वापर करून चालवली जाणार आहे. मात्र, या रेल्वेचा नियोजित मार्ग केरळ आणि तामिळनाडू मार्गे जात असल्याने तटीय कर्नाटकातील प्रवाशांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हा मार्ग स्थानिक प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरा असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर विनाकारण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

​वास्तविक, आयआरटीटीसी (IRTTC) च्या बैठकीत मंगळुरू ते भावनगर दरम्यान कोकण रेल्वे मार्गे थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. तटीय कर्नाटकातील हजारो लोक व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात स्थायिक आहेत. मात्र, मंगळुरूहून गुजरातसाठी अद्याप एकही समर्पित आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, मंजूर झालेला भावनगरचा प्रस्ताव बाजूला सारून पुन्हा केरळ-तामिळनाडू मार्गे जाणारी रेल्वे लादली जात असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंगळुरू रेल्वे स्थानक हे केवळ शेजारील राज्यांच्या रेल्वे गाड्यांसाठीचे ‘टर्मिनल’ बनत चालले असून, कर्नाटकच्या स्वतःच्या कनेक्टिव्हिटी गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ‘दक्षिण कन्नड रेल्वे यात्री संघ’ आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या संदर्भात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना समाजमाध्यमांद्वारे साकडे घालण्यात आले आहे. प्रवाशांच्या मते, जर प्रस्तावित रेल्वे हसन किंवा मडगाव-हुबळी कॉरिडॉरऐवजी कोकण रेल्वे मार्गे चालवली, तर त्याचा फायदा पश्चिम भारताला जोडण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल. दक्षिण रेल्वेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि तटीय कर्नाटकच्या दीर्घकालीन मागणीचा मान राखून तात्काळ मंगळुरू सेंट्रल – भावनगर टर्मिनस एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आता केली जात आहे. यामुळे केवळ प्रवाशांची सोयच होणार नाही, तर या भागातील औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे असा विश्वास दक्षिण कन्नड रेल्वे यात्री संघाने व्यक्त केला आहे.

कोकण रेल्वेचे दुहेरीकरण आणि ‘कवच’ प्रणालीसाठी लोकसभेत आवाज

   Follow us on        

नवी दिल्ली: कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाचा आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रलंबित मुद्दा आज लोकसभेत गाजला. शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांनी शून्य प्रहरात हा विषय मांडत रेल्वे मंत्रालयाचे लक्ष वेधले.

कोकण रेल्वे हा देशातील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा मार्ग असूनही तो आजही ‘सिंगल ट्रॅक’वरच (एकेरी मार्ग) मर्यादित आहे. यामुळे पावसाळ्यात दरडी कोसळणे, गाड्यांना होणारा तासनतास विलंब आणि अपघातांचा धोका वाढला असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचे वायकर यांनी सभागृहात सांगितले.

​खासदार वायकर यांनी माहिती दिली की, २०२३ च्या सर्वेक्षणानुसार कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणासाठी सुमारे २५,००० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा प्रकल्प मार्गी लागण्यास होत असलेल्या विलंबाबाबत त्यांनी रेल्वे मंत्र्यांना जाब विचारला. जोपर्यंत या मार्गाचे पूर्णतः दुहेरीकरण होत नाही, तोपर्यंत प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘कवच’ (Kavach) ही स्वदेशी सुरक्षा प्रणाली तातडीने कार्यान्वित करावी, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.

कोकणवासीयांचा प्रवास अधिक वेगवान, सुरक्षित आणि सुखकर होण्यासाठी केंद्र सरकारने या पायाभूत सुविधांकडे प्राधान्याने लक्ष द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

 

Konkan Railway: प्रवाशांसाठी खुशखबर: कोकण रेल्वे मार्गावर धावणार्‍या विशेष गाडीला मुदतवाढ

   Follow us on        

​Konkan Railway: रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन तिरुवनंतपुरम सेंट्रल आणि मदार जंक्शन दरम्यान धावणाऱ्या साप्ताहिक विशेष रेल्वे गाडीच्या (Train no. 06013 / 06014) कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे दक्षिण आणि उत्तर भारताला जोडणाऱ्या या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

​विस्तारित फेऱ्यांचे वेळापत्रक:

रेल्वेने जाहीर केलेल्या नवीन अधिसूचनेनुसार, दोन्ही दिशेकडील फेऱ्या खालीलप्रमाणे वाढवण्यात आल्या आहेत:

​गाडी क्रमांक 06013 (तिरुवनंतपुरम सेंट्रल ते मदार जंक्शन): ही गाडी दर बुधवारी धावते. यापूर्वी ही गाडी ११ मार्च २०२६ पर्यंत अधिसूचित होती, मात्र आता ती १८ मार्च २०२६ ते २५ मार्च २०२६ या कालावधीतही उपलब्ध असेल.

​गाडी क्रमांक 06014 (मदार जंक्शन ते तिरुवनंतपुरम सेंट्रल): ही गाडी दर शनिवारी धावते. या गाडीची मुदत १४ मार्च २०२६ वरून वाढवून आता २१ मार्च २०२६ ते २८ मार्च २०२६ पर्यंत करण्यात आली आहे.

​प्रवाशांना या गाड्यांचे सविस्तर थांबे आणि वेळापत्रक जाणून घेण्यासाठी भारतीय रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळाला (www.enquiry.indianrail.gov.in) भेट देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ऐन प्रवासाच्या काळात या फेऱ्या वाढल्याने प्रवाशांची सोय होणार आहे.

कोकण रेल्वेमध्ये ‘परवानाधारक पोर्टर’ पदांसाठी भरती; ४९ जागांसाठी अर्ज सुरू

   Follow us on        

रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने रत्नागिरी क्षेत्रातील विविध रेल्वे स्थानकांसाठी ‘परवानाधारक पोर्टर’ (Licensed Porter) पदांची भरती प्रक्रिया जाहीर केली आहे. ७ मार्च २०२६ रोजी प्रसिद्ध झालेल्या अधिकृत पत्रकानुसार, प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी पात्र व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

​विविध स्थानकांसाठी रिक्त जागा

​या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ४९ जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक ८ जागा रत्नागिरी स्थानकासाठी, तर कणकवलीसाठी ७, कुडाळसाठी ६ आणि चिपळूणसाठी ५ जागा रिक्त आहेत. याशिवाय खेड आणि सावंतवाडी रोड येथे प्रत्येकी ४, तर माणगाव आणि संगमेश्वर रोड येथे प्रत्येकी ३ जागांसाठी भरती केली जाणार आहे. सिंधुदुर्ग स्थानकासाठी २ जागा असून वीर, सावर्डा, आरवली रोड, आडवली रोड, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड आणि कणकवलीच्या लगतच्या स्थानकांसाठी प्रत्येकी १ जागेची आवश्यकता आहे.

​जातीनिहाय आरक्षण

​एकूण ४९ जागांचे वर्गीकरण आरक्षणाच्या नियमांनुसार करण्यात आले आहे. यामध्ये सामान्य प्रवर्गासाठी २१, ओबीसीसाठी १३, अनुसूचित जातीसाठी (SC) ७, अनुसूचित जमातीसाठी (ST) ४ आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी (EWS) ४ जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

​या नियुक्तीबाबत रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाची सूचना दिली आहे. परवानाधारक पोर्टर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तींना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरीचा कोणताही हक्क सांगता येणार नाही. तसेच, परिस्थितीनुसार रेल्वे प्रशासन हा परवाना कधीही रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवत आहे.

Konkan Railway: कोकण रेल्वे मार्गावर धावणार एर्नाकुलम–अंबाला होळी विशेष एक्सप्रेस

   Follow us on        

Konkan Railway: होळी सणाच्या पार्श्वभूमीवर वाढत्या प्रवासी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी दक्षिण रेल्वेने एर्नाकुलम जंक्शन–अंबाला कॅन्टोनमेंट दरम्यान एकमार्गी विशेष एक्सप्रेस गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

गाडी क्रमांक ०६०७४ एर्नाकुलम जंक्शन – अंबाला कॅन्टोनमेंट वन-वे एक्सप्रेस स्पेशल ही गाडी ११ मार्च २०२६ (बुधवार) रोजी एर्नाकुलम जंक्शन येथून सकाळी ०९.५० वाजता सुटणार असून तिसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता अंबाला कॅन्टोनमेंट येथे पोहोचणार आहे. ही सेवा एकदाच चालवण्यात येणार आहे.

या गाडीची रचना पुढीलप्रमाणे असेल:

१ एसी थ्री टियर डबा

१३ स्लीपर वर्ग डबे

३ जनरल सेकंड क्लास डबे

२ दिव्यांग प्रवाशांसाठी अनुकूल जनरल सेकंड क्लास डबे

 

स्थानके, वेळ व तारीख:

एर्नाकुलम जंक्शन – ०९:५० (११ मार्च)

अलुवा – १०:१२ / १०:१४ (११ मार्च)

त्रिशूर – ११:०७ / ११:१० (११ मार्च)

शोरनूर – १२:०० / १२:०५ (११ मार्च)

तिरूर – १२:४३ / १२:४५ (११ मार्च)

कोझिकोड – १३:२२ / १३:२५ (११ मार्च)

कन्नूर – १४:४२ / १४:४५ (११ मार्च)

कासरगोड – १५:४८ / १५:५० (११ मार्च)

मंगळुरू जंक्शन – १७:०० / १७:१० (११ मार्च)

उडुपी – १९:३० / १९:३२ (११ मार्च)

कुंदापूर – २०:१० / २०:१२ (११ मार्च)

मूकांबिका रोड – बिंदूर – २०:४२ / २०:४४ (११ मार्च)

मुरुडेश्वर – २१:३० / २१:३२ (११ मार्च)

कुमटा – २२:१० / २२:१२ (११ मार्च)

कारवार – २३:१० / २३:१२ (११ मार्च)

१२ मार्च २०२६ (गुरुवार)

मडगाव – ००:१० / ००:२०

थिवीम – ०१:०० / ०१:०२

सावंतवाडी रोड – ०१:४० / ०१:४२

कणकवली – ०२:२० / ०२:२२

राजापूर रोड – ०३:१८ / ०३:२०

रत्नागिरी – ०४:३५ / ०४:४०

संगमेश्वर रोड – ०५:२५ / ०५:२७

चिपळूण – ०६:१० / ०६:१५

खेड – ०६:४० / ०६:४२

माणगाव – ०८:१२ / ०८:१४

रोहा – ०९:०० / ०९:०५

पनवेल – १०:२५ / १०:३५

वसई रोड – १२:३५ / १२:४५

सूरत – १५:२६ / १५:२८

वडोदरा – १७:०४ / १७:१२

कोटा – २३:५१ / २३:५६

१३ मार्च २०२६ (शुक्रवार)

मथुरा – ०४:१५ / ०४:२०

नवी दिल्ली – ०७:३५ / ०७:४५

अंबाला कॅन्टोनमेंट – ११:२५ (पोहोच)

कोकण रेल्वे प्रवासात साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला

   Follow us on        

कणकवली : मुंबईहून कोकण रेल्वेने प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचे  साडेचार तोळ्यांचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी राकेश सदानंद मिठबावकर (वय ३५, रा. कुर्ला-मुंबई, मूळ रा. पडेल-देवगड) यांनी कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिठबावकर हे पत्नी आणि मेहुण्यासोबत ८ मार्च रोजी पहाटे सुमारे २.३० वाजता एलटीटी–मडगाव एक्सप्रेसने मुंबईहून देवगडकडे निघाले होते. दुपारी सुमारे १.३० वाजता गाडी कणकवली रेल्वे स्थानकावर पोहोचली. गाडीतून उतरण्यासाठी सामान आवरत असताना दागिन्यांची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण डब्यात बॅगचा शोध घेतला; मात्र ती मिळून आली नाही.

दरम्यान गाडी सावंतवाडी स्थानकावर पोहोचल्यावर त्यांनी तात्काळ तेथील रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला. मात्र ही घटना कणकवली स्थानकाच्या दरम्यान उघडकीस आल्याने त्यांना कणकवली येथे तक्रार नोंदवण्यास सांगण्यात आले. त्यानुसार मिठबावकर यांनी कणकवली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये ३२ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, १० ग्रॅम वजनाची सोन्याची चैन, ३ ग्रॅम वजनाचे छोटे मंगळसूत्र असा ऐवज आहे. या घटनेमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणाचा पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search