Category Archives: क्राईम

पुण्यात गोवन दारूचा मोठा साठा जप्त; आरोपींमध्ये सिंधुदुर्गातील दोघेजण

पुणे: राज्य उत्पादन शुल्क पथक क्रमांक 1 ने आज पुण्यातील कात्रज परिसरात एका लक्झरी बसमधून गोव्याच्या  दारूचा मोठा साठा जप्त केला. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे. या कारवाईत अवैध धंद्यात गुंतलेल्या तीन जणांना अटक करण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला अवैध धंद्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार निरीक्षक एस.एल. पाटील यांच्या पथकाने जुना पुणे-सातारा रोडवरील कात्रज परिसरात गस्त घालत असताना भारत पेट्रोल पंपासमोर सहा चाकी लक्झरी बस अडवल्या.
तपासणी केल्यावर, त्यांना बॅगपायपर क्लासिक व्हिस्कीच्या 180 सील न केलेल्या बाटल्या (15 बॉक्स) सापडल्या, हा ब्रँड महाराष्ट्रात प्रतिबंधित आहे परंतु गोव्यात कायदेशीर आहे. जप्त केलेल्या दारूची अंदाजे किंमत 42,90,000 रुपये आहे.
गणेश बाळकृष्ण चव्हाण (वय 50, रा. सिंधुदुर्ग), अक्षय अनंत जाधव (वय 32, रा. नालासोपारा पश्चिम) आणि उमेश सीताराम चव्हाण (वय 37 रा . सिंधुदुर्ग) तिघांनाही ताब्यात घेण्यात आले

कोकणात दहशतवादविरोधी पथकाची मोठी कारवाई; तीन बांग्लादेशी घुसखोरांना अटक

चिपळूण : चिपळूण येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बांगलादेशातून भारतात घुसखोरी करून आलेल्या तिघांना चिपळूण शहरानजीकच्या खेर्डी येथून ताब्यात घेण्यात आले. गेले काही महिने ते तेथे वास्तव्यास होते. त्यांच्यावर रत्नागिरीतील दहशतवादविरोधी पथकाने (Anti Terrorism Squad Ratnagiri) कारवाई करून बुधवारी गुन्हा दाखल केला आहे.
या तिघांकडून काही कागदपत्रे हस्तगत केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता ६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला. गुल्लू हुसेन मुल्ला (५६), जिलानी गुल्लू मुल्ला (२६), जॉनी गुल्लू मुल्ला (२९, तिघेही बांगलादेश) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.
त्यांच्याकडून मोबाईल, आधारकार्ड, पॅनकार्ड व निवडणूक ओळखपत्र अशी कागदपत्रे पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. बांगलादेशहून भारतात अवैधरित्या प्रवेश करून मुलकी अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय खेर्डी मोहल्ला परिसरात ते काही महिन्यांपासून वास्तव्य करत होते.
याविषयीची रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकाला माहिती मिळताच त्यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने मंगळवारी (ता. ३) रात्री १०.३० वा. कारवाई करून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर बुधवारी त्यांची चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला. पारपत्र अधिनियम ३ (ए) ६, परकीय नागरिक आदेश कायदा ३ (१) (ए) व विदेशी व्यक्ती अधिनियम अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
रत्नागिरी दहशतवादविरोधी पथकातील सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल उदय चांदणे, आशिष शेलार यांनी ही कारवाई केली. या तिघांना चिपळूण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संजय पाटील हे करीत आहेत.
मुळचे बांगलादेशी असलेले गुल्लू मुल्ला व त्याच्या दोन्ही मुलांकडे भारतीय नागरिकांप्रमाणे आधारकार्ड, निवडणूक मतदार ओळखपत्र, पॅनकार्ड अशी कागदपत्रे आढळून आली आहेत. त्यामुळे नागरिकत्त्व नसताना देखील ही कागदपत्रे कोणत्या आधारे त्यांनी मिळवली, तसेच या कागदपत्रांच्या आधारे त्यांनी कोणकोणते व्यवहार केले, असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

आंबोली पर्यटनस्थळापेक्षा “मृतदेह विल्हेवाट स्थळ” म्हणुन प्रसिद्ध होत चालले आहे?

सावंतवाडी:  दोन दिवसांपूर्वी म्हापसा येथील तरुणीची हत्या करुन तिचा मत्यूतदेह आंबोली घाटाच्या दरीत टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. 
खून करून आंबोलीत मृतदेह टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस नेमके काय करताहेत? चेकपोस्ट केवळ मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोलीपर्यंत कसा नेला? त्यावेळी कोण पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते? याची पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंबोली घाटात दिवसेंदिवस मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे तेथील पर्यटनाची बदनामी होत आहे. याबाबत पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. आंबोलीच्या प्रवेशद्वारावर तीन चेकपोस्ट उभारली आहेत, तरीही असे प्रकार नेमके का होतात? याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे साळगावकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 

रेल्वे तिकीट काळाबाजार प्रकरणी सावंतवाडी येथील एक युवक रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Railway Reservation Fraud : कोकण रेल्वे तिकीट आरक्षणामध्ये काळाबाजार होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असून त्याचा सोक्षमोक्ष लावण्यासाठी रेल्वे पोलिसांनी कंबर कसली आहे. या काळाबाजार प्रकरणी रेल्वे पोलीसांनी बुधवारी सावंतवाडी येथील एका युवकाला ताब्यात घेतले होते. त्या युवकाला ताब्यात घेत त्याच्यावर रेल्वे ऍक्ट नुसार १४३ नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती रेल्वे पोलीस निरीक्षकांनी दिली. अक्षय देशपांडे ( वय – ३० ) असे त्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि मडगाव रेल्वे पोलीसच्या पथकास सावंतवाडी येथील एका ऑफिसमध्ये तिकिटांचा काळाबाजार चालत असल्याची खबर मिळाली. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी या ऑफिसवर धाड टाकली. या धाडीत मिळालेल्या माहितीनुसार येथे तिकिटांचा काळाबाजार होत असल्याच्या संशयावर हे ऑफिस चालवीत असलेल्या या युवकास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचे रेल्वे तिकीट बुकिंग आयडी देखील ब्लॉक केले गेले आहे . रेल्वे ऍक्ट १४३ नुसार दाखल गुन्ह्यामध्ये ३ वर्षांची शिक्षा देखील होऊ शकते. तसेच हा गुन्हा अजामीनपात्र असल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दरम्यान संशयित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान या प्रकरणाबाबत अधिक तपास सुरू आहे.

चिपळुणात ‘तुईया’ या दुर्मिळ प्रजातीच्या पोपटाच्या तस्करी विरोधात कारवाई

चिपळूण :चिपळूण तालुक्यातील मौजे कोंढेमाळ येथे दुर्मिळ पोपट प्रजातीच्या पक्षांची तस्करी केली जात होती. याबाबत वन विभागाला माहिती मिळताच तातडीने कारवाई करत मंगळवारी एकास ताब्यात घेतले आहे.तसेच त्याच्याकडून ‘तुईया’ Plum Headed Parakeet या प्रजातीच्या पोपटाची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ असे एकूण १२ पक्षी आढळून आले आहेत.

या प्रकरणी जितेंद्र धोंडू होळकर, (रा.कोंढेमाळ, चिपळूण) याला ताब्यात घेतले आहे. तो विशिष्ट प्रजातीचे पोपट पकडून विक्री करत असलेबाबतची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानुसार विभागीय वन अधिकारी दिपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक वैभव बोराटे, वनपरिक्षेत्र अधिकारी राजेश्री कीर, वनपरिमंडळ अधिकारी दौलत भोसले, उमेश आखाडे, सुरेश उपरे व वनरक्षक राजाराम शिंदे, अश्विनी जाधव इत्यादी वनविभागाचे अधिकारी / कर्मचाऱ्यांनी जितेंद्र होळकर याच्या कोंढेमाळ येथील राहत्या घरी व गुरांच्या गोठ्यामध्ये अचानक धाड टाकली.

त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये पहाणी केली असता घराशेजारील प्रभाकर जिवा करंजकर यांच्या लाकडाच्या खोपटीत दोन पिंजऱ्यामध्ये पोपट प्रजातीमधील ‘तुईया’ (प्लम हेडेड पॅराकीट) या प्रजातीची साधारण ६ महिने वयाची १० पिल्ले व एक वर्ष वयाचे २ पक्षी आढळून आले. या पक्षांबाबत जितेंद्र होळकर याच्याकडे विचारणा केली असता हस्तगत करण्यात आलेल्या दोन पिंजऱ्यातील एकूण १२ पोपट हे माझेच आहेत. मी गुरे चारण्यासाठी गावाजवळील डोंगरावर गेलो असताना लाकडाच्या डोलीतून सुमारे ४-५ महिने व १ वर्षापूर्वी ताब्यात घेतले आहेत. तसेच यापुर्वी मी १० ते १२ जणांना पोपट विकले असल्याचे सांगितले. जितेंद्र धोंडू होळकर यांचेवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

खळबळजनक | दापोलीतून अजून एक महिला बेपत्ता

दापोली : दापोली तालुक्यातील निलिमा चव्हाण मृत्यू प्रकरण ताजे असताना अजून असेच एक प्रकरण समोर आले आहे.
आंजर्ले जवळील मुर्डी येथून एक ३३ वर्षीय महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे .याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी ८.३० च्या सुमारास आकांक्षा आनंद बेनेरे( रा. राममंदिर, मुर्डी ) या मुलगी नेहा हिला आंगणवाडित सोडून आंजर्ले येथे कामावर जात असल्याचे घरच्यांना सांगून घराबाहेर पडली. मात्र, सायंकाळपर्यंत घरी न परतल्यान तिच्या घरच्यांनी तिच्या कामावर, गावात तसेच नातेवाइकाकडे शोध घेतला. ती मिळून न आल्याने पती आनंद यांनी रविवारी आकांक्षा हि बेपत्ता झाल्याची तक्रार दापोली पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यात महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली असून अधिक तपास हेडकॉन्स्टेबल श्री. मोहिते करीत आहेत.

सावध रहा | IRCTC च्या बनावट मोबाइल अॅपद्वारे होत आहेत फसवणुकीचे प्रकार

IRCTC Fake App : भारतीय रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ने आपल्या सर्व वापरकर्त्यांना बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइटबद्दल चेतावणी दिली आहे. बनावट मोबाइल अॅप आणि वेबसाइट मूळ आयआरसीटीसी अॅप आणि वेबसाइटशी जवळून साम्य दाखवतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना या दोघांमधील फरक ओळखणे कठीण होते. प्रवाशांकडून संवेदनशील माहिती चोरून त्याचा दुरुपयोग करायचा स्कॅमर्सचा हेतू असून प्रवाशांनी हे अॅप आणि वेबसाईट वापरू नये असे आवाहन रेल्वेतर्फे करण्यात आले आहे.
बनावट IRCTC अॅप ‘irctcconnect.apk’ नावाचे आहे आणि ते WhatsApp आणि Telegram सारख्या मेसेजिंग प्लॅटफॉर्मद्वारे प्रसारित केले जात आहे. स्कॅमर बनावट वेबसाइट किंवा बनावट अँप्लिकेशन च्या एपीके फाइलच्या लिंकसह संदेश पाठवत आहेत की IRCTC वरून रेल्वे तिकीट बुक करण्यासाठी हीच खरी वेबसाइट किंवा अॅप आहे.
फसवणूक करणारे खोटे अँप्लिकेशन आणि वेबसाइट वापरून संवेदनशील नेट बँकिंग माहिती मिळवत आहेत, ज्यात UPI तपशील आणि संशयास्पद पीडितांकडून क्रेडिट/डेबिट कार्ड माहिती समाविष्ट आहे. IRCTC ने आपल्या वापरकर्त्यांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि कोणतेही संशयास्पद अॅप डाउनलोड करू नका किंवा कोणत्याही संशयास्पद वेबसाइटला भेट देऊ नका. प्रवाशांनी Google Play Store किंवा Apple App Store वरील IRCTC चे अधिकृत Rail Connect Mobile Apps वापरावेत आणि IRCTC च्या अधिकृत वेबसाइट https://irctc.co.in या वेबसाईटवरच आपले तिकीट आरक्षण करावे असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

धक्कादायक | दापोली पालगडमध्ये 20 गावठी बॉम्ब सापडले..

रत्नागिरी :दापोली पालगडमध्ये एका व्यक्तीकडे  20 गावठी बॉम्ब पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीला ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ माजली आहे. 

याप्रकरणी मिळालेल्या अतिरिक्त माहितीनुसार, पोलीस उपविभागीय अधिकारी खेड राजेंद्र मुणगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केतकर, पोलीस कॉन्स्टेबल पाटील, घाडगे, बांगर, एएसआय मिलिंद चव्हाण, विकास पवार यांचा समावेश असलेल्या पथकाने सापळा रचून गावठी बॉम्ब घेऊन निघण्याच्या प्रयत्नात असलेल्या संशयित आरोपीला ताब्यात घेतले. या आरोपीचे नाव रमेश पवार असून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी बॉम्ब शोध पथकाला पाचारण केले आहे.

बॉम्ब बनविण्याचे रॅकेट सक्रिय? 

या आधी दापोली तालुक्यातील विसापूर येथील सोवेली दरम्यानच्या रस्त्यालगत पाच जिवंत बॉम्ब सापडले होते त्यामुळे तालुक्यात गावठी बॉम्ब बनवणारे रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी केलेल्या आजच्या कारवाईमुळे हे बॉम्ब तयार करणारे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याशी याचे काही धागेदोरे असल्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. 

आरपीएफची अवैध तिकीट आरक्षणाविरोधात मोठी कारवाई | ७१ तिकीट दलालांवर गुन्हे दाखल; २६ लाख रुपयांची तिकिटे जप्त

मुंबई : पश्चिम रेल्वेच्यारेल्वे सुरक्षा दलाने मे महिन्यात ७१ तिकीट दलालांना पकडले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त केली आहेत. अनधिकृत दलालांकडून लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मोठ्या प्रमाणात आरक्षण केले जाते. त्यामुळे सामान्य प्रवाशांना तिकीट उपलब्ध होत नाही.

ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकिटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती आरपीएफला मिळाली. १५ मे रोजी आरपीएफ आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार केले. या पथकाने अलीम खान याच्याकडून १ लाख ३ हजार ९८५ किमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेऊन अंधेरी आरपीएफ ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खान खास २२ मे रोजी आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.

६३ गुन्हे दाखल

दलालांमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होते. हीच बाब निदर्शनास आल्याने १ ते २७ मेदरम्यान आरपीएफने ७१ तिकीट दलालांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त केली.

“एकाचे काम करायचे आहे; झोप नाही लागणार त्याशिवाय”… पत्रकार वारिसे हत्या प्रकरणी आरोपीची कॉल रेकॉर्डिंग पोलिसांच्या हाती.

Warishe Murder Case | पत्रकार शशिकांत वारीशे  यांच्या हत्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी 11सदस्यीय एसआयटी लावण्यात आली आहे. या प्रकरणासाठी चार्जशीट दाखल करण्यात आली असून त्यात अनेक खुलाशे करण्यात आले आहेत. 
या प्रकरणाची चौकशी करताना पोलिसांच्या हाती एक कॉल रेकॉर्डिंग लागली आहे. या कॉल रेकॉर्डिंग मध्ये आपण वारीशे याला संपवणार आहे असे आरोपी पंढरीनाथ आंबेरकर समोरच्याला म्हणाला आहे. ही कॉल रेकॉर्डिंग आरोपीच्या जप्त केलेल्या मोबाईल फोन मध्ये पोलिसांना मिळाली आहे. 
कॉल रेकॉर्डिंग अशी होती 
“एकाच काम करायच आहे ….आज करणार त्याचं…..झोप नाही लागणार त्याशिवाय….बातमी वाचली?……वाचली बातमी?…….थांब पाठवतो…. “
या रेकॉर्डिंगतील मजकुरामुळे वारीशे यांची हत्या पूर्वनियोजित असल्याचे चार्जेशीट मध्ये नमूद केले गेले आहे.  या चार्जशीट नुसार आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने या आधीही अनेकदा पत्रकार वारीशे यांना त्यांच्या रिफायनरी विरोधी आणि आपल्या विरोधी लिखाणावरून धमक्या दिल्या होत्या. आंबेरकर याने याआधीही रिफायनरीला विरोध करणाऱ्या एका सरपंचाच्या २१ वर्षीय मुलाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याने आरोपीची गुन्हेगारी प्रवृत्ती दिसून येत आहे असेही चार्जशीटमध्ये नमूद केले गेले आहे. एका अग्रगण्य इंग्रजी वृत्तपत्राने ही चार्जशीट मिळवली आहे.
 नक्की काय घडले होते? 
सोमवारी सकाळी म्हणजे 6 फेब्रुवारीला सकाळी 8 वाजून 3 मिनिटांनी पत्रकार शशिकांत वारिसे यांनी वॉट्सअपवरील रिफायनरी ग्रुपवर एका बातमीची पोस्ट पाठवली होती.
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असलेल्या बॅनरवर त्यांच्यासोबत गंभीर गुन्ह्यातील आरोपींचे फोटो’ अशा आशयाच्या बातमीचे कात्रण शशिकांत वारिसे यांनी त्या वॉट्सअप ग्रुपवर पाठवले होते.
कोकणातील रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांच्या जाहिरातींसंदर्भात ही बातमी होती. यानंतर दुपारी 1 वाजून 15 मिनिटांच्या आसपास शशिकांत वारिसे राजापूर-कोदवली या परिसरातून आपल्या दुचाकी वाहनावरून जात होते. त्याचवेळी तिथे असलेल्या पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगाने समोरून ‘थार’ गाडी आली. या गाडीने शशिकांत वारिसे यांच्या दुचाकीला धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कोल्हापूरला हलवण्यात आलं. परंतु दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी 7 फेब्रुवारीला सकाळी त्यांचं निधन झालं. चौकशीअंती ती गाडी रिफायनरीचे समर्थक पंढरीनाथ आंबेरकर यांची असल्याचे आणि ते चालवत असल्याचे समोर आले होते. या प्रकरणाची सीआयटी चौकशी लावावी अशी मागणी करण्यात आली होती.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search