Category Archives: पर्यटन

केरळच्या धर्तीवर कोकणात हाऊसबोटिंग प्रकल्प लवकरच; मगरसफर, डॉल्फिन दर्शनसह ‘या’ सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार….

रत्नागिरी –  केरळच्या धर्तीवर सिंधुरत्न योजनेतून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत. या सेवेचा लाभ पर्यटकांना लवकरच मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. 

जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.

यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्‍यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

दोन्ही खाडीत काय पाहता येईल?

वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) –

कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.

जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर) 

कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र

Loading

दसरा दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी नक्की वाचा; हॉटेल रूम्स टंचाईमुळे होऊ शकते गैरसोय

गोवा वार्ता: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 
या कारणाने आता जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकवेळ आपल्या बजेट चा विचार करून तसा प्लॅन करा. हॉटेल रूमच्या जास्त मागणीमुळे त्यांचे भाव वाढून तुमची ट्रिप महागडी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Loading

Konkan Tourism | राजापूर तालुक्यातील कातळशिल्पे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

रत्नागिरी : कोकणच्या पर्यटनासंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.  या शिवाय आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे. अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे.
यादीतून बारसूचे नाव वगळले? 
बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

Loading

सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा नाहीच; पालक मंत्र्यांचे घुमजाव

मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.

नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्‍हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्‍याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.

 

Loading

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी-फणसवडे येथे उभारण्यात आले देशातील पहिले फिश थीम पार्क

सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान  सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.

या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.

पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.

Loading

आंबोली पर्यटनस्थळापेक्षा “मृतदेह विल्हेवाट स्थळ” म्हणुन प्रसिद्ध होत चालले आहे?

सावंतवाडी:  दोन दिवसांपूर्वी म्हापसा येथील तरुणीची हत्या करुन तिचा मत्यूतदेह आंबोली घाटाच्या दरीत टाकण्याचा प्रकार घडला होता. या प्रकारावर सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सिंधुदुर्ग पोलिसांना खडे बोल सुनावले आहेत. 
खून करून आंबोलीत मृतदेह टाकण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहेत. सिंधुदुर्ग पोलिस नेमके काय करताहेत? चेकपोस्ट केवळ मलिदा खाण्यासाठीच आहेत का, असा प्रश्न त्यांनी केला आहे. गोव्यातील युवतीचा मृतदेह आंबोलीपर्यंत कसा नेला? त्यावेळी कोण पोलिस कर्मचारी कर्तव्य बजावत होते? याची पोलिस अधीक्षकांनी सखोल चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. आंबोली घाटात दिवसेंदिवस मृतदेह आणून टाकण्याचे प्रकार वाढत असल्यामुळे तेथील पर्यटनाची बदनामी होत आहे. याबाबत पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेण्याची गरज आहे. आंबोलीच्या प्रवेशद्वारावर तीन चेकपोस्ट उभारली आहेत, तरीही असे प्रकार नेमके का होतात? याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असे साळगावकर यांनी म्हटले आहे. याबाबत त्यांनी प्रसिद्धीपत्रक दिले असून, पोलिसांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे जगभरातील पर्यटकांना वर्षा पर्यटनासाठी भुरळ घालणारं ठिकाण आहे. मात्र, अलीकडे पर्यटनाच्या दृष्टीने कमी मात्र मृतदेह फेकण्याचं ठिकाण म्हणून आंबोलीची ओळख बनू लागली आहे. अशा घटना थांबवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ पावले उचलावीत अशी मागणी पर्यटक आणि स्थानिकांमधून जोर धरत आहे. 

Loading

Konkan Tourism: सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला

सिंधुदुर्ग : या महिन्यात मालवणला भेट देणार्‍या पर्यटकांसाठी एक खुशखबर आहे. जिल्हय़ातील पर्यटन स्थळांच्या अग्रस्थानी असलेला सिंधुदुर्ग किल्ला उद्यापासून पर्यटकांसाठी खुला होणार आहे. समुद्र किनारा ते किल्ला वाहतुक होडी सेवा उद्यापासून चालू होणार आहे. 

पावसाळी हंगामात सुरक्षेच्या दृष्टीने या किल्यापर्यंत होणारी प्रवासी होडी सेवा बंद ठेवण्यात येते. ही प्रवासी वाहतूक होडी सेवा आता १ सप्टेंबरपासून नव्या पर्यटन हंगामास सुरुवात होत आहे. ऐतिहासिक किल्ले सिंधुदुर्ग दर्शन प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार असल्यामुळे पर्यटकांची प्रतीक्षा संपणार आहे. 

दरम्यान सिंधुदुर्ग किल्याच्या डागडुजीचे काम पुरातत्त्व विभागाने हाती घेतले आहे. किल्याचा महादरवाजा, दिंडी दरवाजा, ढासळलेली तटबंदी आणि त्यावरील पायवाट, किल्ल्यावरील पायवाटा आदी कामांची प्रामुख्याने दुरुस्ती होणार आहे. तटबंदीवरील झाडी सफाईचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे. अशी माहिती पुरातत्व विभाग अधिकारी वैभव बेटकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग किल्याचा महा दरवाजा कालौघात जीर्ण झाला आहे. हा दरवाजा बदलून नवीन दरवाजा बसविण्याची प्रस्ताव पुरातत्त्व विभागा समोर आहे. यानुसार किल्याचा महादरवाजा, त्यामधील दिंडी दरवाजा पूर्णतः बदलून नवीन दरवाजा बसविण्यात येणार आहे. नवीन दरवाजा तयार करताना जुन्या दरवाजाची हुबेहूब प्रतिकृती असेल याची काळजी घेतली जाणार आहे. अशी माहिती देण्यात आली आहे.

१ सप्टेंबर पासून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने तसेच सागरी हवामानाचा अंदाज घेऊन किल्ले प्रवासी होडी वाहतूक सुरू होणार आहे. प्रवासी होडी वाहतूक डागडुजी कामानाही वेग आला आहे. मालवणात पर्यटन सफरीवर येणाऱ्या पर्यटकांचे किल्ले सिंधुदुर्ग हे खास आकर्षण आहे. समुद्रातील होडी प्रवास स्मरणीय असतो. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक किल्ले सिंधुदुर्गला भेट देतात. त्यामुळे सागरी पर्यटनास अर्थात स्कुबा डायव्हीग, पॅरासेलिंग, वॉटर स्पोर्ट्स बोटिंग सफर आदी जल पर्यटनाला ही १ सप्टेंबर पासून परवानगी प्राप्त होते. परवानगी व सागरी हवामान याचा अंदाज घेत मालवणचे पर्यटन बहरणार आहे.

 

Loading

यावर्षीचा नौसेना दिवस सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा होणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

सिंधुदुर्ग : भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाला अभिवादन म्हणून यावर्षीचा नौसेना दिवस (४ डिसेंबर ) सिंधुदुर्ग किल्ला येथे  आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य अशा स्वरूपात व्हावा, असे निर्देश काल झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे यांनी  दिले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय नौदलाच्यावतीने या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात येत आहे.  प्रधानमंत्री तसेच विविध मान्यवर या नौसेना दिवस कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार असल्याने आवश्यक बाबींचे काटेकोरपणे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

बैठकीस सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून) तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण,  महाराष्ट्र नौसेना क्षेत्राचे ध्वज अधिकारी रियर ॲडमिरल ए.एन.प्रमोद, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव मनिषा म्हैसकर- पाटणकर आदी उपस्थित होते.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात

या वर्षीचा नौसेना दिन साजरा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 4 डिसेंबर रोजी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येणार आहेत. त्याचवेळी सिंधुदुर्ग किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ब्राँझ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिल्यांदाच सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत.

Loading

कुणकेश्वर मंदिर : उत्तेजक व तोकडे कपडे घालून येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश बंद

सिंधुदुर्ग : दक्षिण कोकणची काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र कुणकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवारचे औचित्य साधून येणाऱ्या भाविकांसाठी वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. याबाबतची माहिती देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी दिली.
कुणकेश्वर येथील देवस्थान ट्रस्ट कार्यालय मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना वस्त्र संहिता लागू करण्यात आली आहे. भारतीय हिंदू संस्कृतीचे नीट पालन होण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. येणारे भाविक अंग प्रदर्शन, उत्तेजक, असभ्य, अशोभनीय व तोकडे वस्त्र तसेच अवास्तविक वेशभूषा करून मंदिरात प्रवेश करत होते. परंतु आता अशा वस्त्र परिधान करणाऱ्या व्यक्तींना मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही. तसेच येणाऱ्या भाविकांसाठी पंचा-उपर्णे मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहे.यासाठी भाविकांनी नियमाचे पालन करून मंदिर प्रशासनात सहकार्य करावे आणि संस्कृतीचे पालन करावे असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे उपाध्यक्ष दिनेश धुवाळी यांनी केले आहे. यावेळी माजी सरपंच गोविंद घाडी, संजय आचरेकर, संतोष लाड गणेश वाळके, व्यवस्थापक रामदास तेजम अजय नाणेरकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Loading

आंबोली येथील अजून चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले

आंबोली बाहुबली धबधबा
आंबोली: आंबोली येथील वर्षा पर्यटन महोत्सवाचे उद्घाटन आज शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पाच दिवसांच्या या महोत्सवात विविध राज्यांसह विदेशातील पर्यटकही भेट देणार आहेत. विविध कार्यक्रमांची रेलचेल असलेल्या या महोत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दीपक केसरकर यांनी या निमित्ताने केले गेले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पर्यटनासाठी नैसर्गिक विविधता आहे. त्यामुळे आंबोलीसह संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटनाचा केंद्रबिंदू व्हावा यासाठी शासनाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
धबधब्यामुळे प्रसिद्ध असलेल्या या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत. या सर्व पर्यटन स्थळांना भेट देता यावी, पर्यटकांना निसर्गाच्या सानिध्यात राहता यावे यासाठी वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवास पर्यटकांनी दिलेला भरघोस प्रतिसाद प्रेरणादायी आहे. वर्षा महोत्सवाच्या माध्यमातून आंबोली जगाच्या नकाशावर झळकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे
यावेळी आंबोली येथे नव्याने विकसित करण्यात आलेल्या बाहुबली धबधब्याचे उदघाटन शालेय शिक्षणमंत्री दीपक यांच्या हस्ते करण्यात आले. आंबोलीतील पर्यटन वाढावे, यासाठी तब्बल पाच नव्या धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती आले असून त्यापैकी चार धबधबे लवकरच पर्यटनासाठी खुले करण्यात येणार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
या वेळी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, उपवनसंरक्षक नवलकिशोर रेड्डी, उपविभागीय अधिकारी सुशांत पानवेकर आदींसह शिवसेना व भाजपचे विविध पदाधिकारी, पर्यटक उपस्थित होते.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search