Category Archives: पर्यटन

Swadesh Darshan 2.0 योजनेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश. पर्यटन व्यावसायिकांना नोंदणी करण्याचे जिल्हाधीकाऱ्यांचे आवाहन; ‘या’ वेबसाईटवर करता येईल नोंदणी

सिंधुदुर्ग : पर्यटन मंत्रालयाच्या स्वदेश दर्शन २.० योजनेमध्ये ४८ अधिसूचित पर्यटनस्थळी राज्यातील सिंधुदुर्ग या एकमेव पर्यटनस्थळाचा समावेश झाला आहे. ही कोकणकरांसाठी एक गौरवाची गोष्ट आहे. केंद्राच्या या योजनेमुळे पर्यटनात वाढ होणार असून पायभुत सुविधांचा देखील विकास होणार आहे. जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी ही माहिती दिली.
जिल्ह्यातील सर्व निवास युनिट्स हॉटेल, ब्रेड आणि ब्रेकफास्ट रिसॉर्ट्, फार्मस्टे, होमस्टे, टूर ऑपरेटर, पर्यटक गाईड्स, ट्रॅव्हल एजंट आणि पर्यटन उद्योगातील इतर भागधारकांनी https://nidhi.tourism.gov.in या पोर्टलवर नोंदणी करून ‘ट्रॅव्हल फॉर लाइफ’ प्रमाणपत्र मिळवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तावडे यांनी केले आहे. नोंदणी केल्यावर युनिक NIDHI ID (NID) द्वारे विविध सेवा आणि फायदे यांच्या इलेक्ट्रॉनिक वितरणाचा लाभ या व्यावसायिकांना मिळणार आहेत. 
‘स्वदेश दर्शन २.०’ उपक्रमाअंतर्गत संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली पर्यटनस्थळ व्यवस्थापन समिती देखील स्थापन केली आहे. विविध पर्यटनस्थळांच्या व्यवस्थापन उपक्रमांमध्ये समन्वय साधण्यासाठी ही समिती जबाबदार आहे. पहिली डेस्टिनेशन मॅनेजमेंट समितीची बैठक जिल्हाधिकारी तावडे यांच्या अध्यक्षतेखाली डेस्टिनेशन प्लॅनिंग, डेव्हलपमेंट आणि मॅनेजमेंट ऍक्टिव्हिटीज या विषयांवर चर्चा करण्यासाठी आयोजित केली होती.  यावेळी त्यांनी हे आवाहन केले आहे.
स्वदेश दर्शन २.० योजनेमधील अधिसूचित पर्यटनस्थळांची यादी 

नवीन वर्षात गोव्यात पर्यटनासाठी जात असाल तर ही बातमी वाचाच; गोव्यातील मंदिर समित्यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

Goa News:गोव्यात पर्यटनासाठी जगभरातून पर्यटक येतात. गोव्यातील समुद्रे किनारे जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढीच येथील मंदिरेही प्रसिद्ध आहेत. या मंदिरांना सुद्धा लाखो पर्यटक भेट देताना दिसतात. मात्र पर्यटकांच्या कपड्यांवरून मंदिर समित्या नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्याचाच परिणाम म्हणून येत्या 1 जानेवारीपासून गोव्यातील मंदिरांमध्ये कडेकोट ड्रेस कोड लागू होणार आहे. मात्र लहान मुलांना यातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिर हे फॅशन दाखवण्याचे ठिकाण नाही, असे व्यवस्थापनाचे मत आहे. अनेक पर्यटक येथे आधुनिक कपडे घालून येतात ज्यामुळे प्रतिष्ठा राखली जात नाही. त्यामुळे लहान कपड्यांमध्ये कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही.
गोव्यातील फोंडा येथील श्री रामनाथ देवस्थानने म्हटले आहे की, मंदिराचे पावित्र्य आणि आदर राखण्यासाठी 1 जानेवारीपासून सर्व पर्यटकांसाठी कठोर ड्रेस कोड लागू केला जाईल. शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, मिडी, स्लीव्हलेस टॉप, लो-राईज जीन्स आणि शॉर्ट टी-शर्ट परिधान केलेल्या लोकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. गोव्यातील सुप्रसिद्ध श्री मंगेश देवस्थाननेही नवीन वर्षापासून अतिशय कडक ड्रेस कोड लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे भाविकांनी योग्य कपडे घालूनच मंदिरात यावे.
मंदिर समिती देणार कपडे
अयोग्य कपडे घालून मंदिरात येणाऱ्यांना मंदिर समितीतर्फे छाती, पोट, पाय झाकण्यासाठी लुंगी किंवा कापड दिले जाईल. त्यामुळे आत्तापर्यंत दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही.
श्री रामनाथ देवस्थानचे अध्यक्ष फोंडा म्हणाले की, आम्ही 1 जानेवारीपासून ड्रेस कोड लागू करणार आहोत. यासाठी आम्ही एक सूचना जारी केली असून मंदिर परिसरात फलकही लावला आहे. पर्यटकांना जागरूक करण्यासाठी हे पाऊल उचलले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटक अनेकदा सभ्य कपडे घालून येतात. मंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी लहान कपडे घालून कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
मंदिरांनी म्हटले आहे की 10 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना या ड्रेस कोडमधून सूट दिली जाईल, परंतु 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांना आणि प्रौढांना ड्रेस कोडचे पालन करावे लागेल. जर कोणी लहान कपडे घालून आले तर त्याला स्मोक आणि लुंगी दिली जाईल. हे परिधान करून तुम्ही मंदिराला भेट देऊ शकाल. यापूर्वीही या सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र त्याचे काटेकोरपणे पालन करण्यात आले नव्हते. आता आम्ही ड्रेस कोडचे काटेकोरपणे पालन करू.

कोकण: पर्यटन क्षेत्रात महिला व्यावसायिकांना ‘आई’ चा मदतीचा हात …लाभ कसा घ्याल ?

रत्नागिरी : कोकणात पर्यटन क्षेत्रात महिलांचा सहभाग आता दिसायला लागला आहे. होम स्टे, हॉटेल रेस्टॉरंट आणि इतर व्यवसायात महिला महिला व्यावसायिक छाप पाडताना दिसत आहे.  अशा महिलांसाठी राज्यसरकारने यावर्षी  ‘आई’ महिला केंद्रित पर्यटन धोरण आखले आहे. महिला उद्योजकता विकास, महिलांकरिता पायाभूत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती, प्रवास आणि पर्यटन विकास ही या धोरणाची पंचसुत्री महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत तयार केली आहे.
या योजने अंतर्गत खालील फायदे मिळतील. 
प्रत्येक तालुक्यात पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या १० पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी प्रयत्न केले जातील. त्यासाठी मान्यताप्राप्त बँकांमार्फत घेतलेल्या १५ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची रक्कम १२ टक्केच्या मर्यादेत, त्यांच्या आधार लिंक बँकखात्यात पूर्ण कर्ज परतफेड होईपर्यंत किंवा ७ वर्षे कालावधीपर्यंत किंवा व्याजाची रक्कम ४ लाख ५० हजारांच्या मर्यादेपर्यंत या तीन पर्यायांपैकी जे आधी घडेल तोपर्यंत दरमहा पुढील अटींच्या अधीन राहून जमा करण्यात येईल.
या अटी असतील 
पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत असला पाहिजे. पर्यटन व्यवसाय महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालवलेल्या असल्या पाहिजेत. महिलांच्या मालकीच्या हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये ५० टक्के व्यवस्थापकीय व इतर कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. महिलांच्या मालकीच्या टूर आणि ट्रॅव्हल्स एजन्सीमध्ये ५० टक्के कर्मचारी महिला असणे आवश्यक राहील. पर्यटन व्यवसायाकरिता आवश्यक सर्व परवानग्या प्राप्त असाव्यात, कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या मालमत्तांच्या ठिकाणी, महिला बचतगटांना हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल, जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
रिसॉर्टसमध्ये महिला पर्यटकांसाठी विशेष सुविधा, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेस, महिला केंद्रित पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष स्थापन करण्यात येईल. महिलांना पर्यटन क्षेत्रामध्ये व्यवसाय व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी तयार करण्यात आलेल्या आई या महिला केंद्रित पर्यटन धोरणासाठी वार्षिक कृती आराखडा निश्चित केला आहे.
अर्ज आणि इतर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून PDF  डाउनलोड करावा. हि माहिती शक्य होईल तितकी समाज माध्यमांवर फॉरवर्ड करा जेणेकरून आपल्या कोकणातील भगिनी याचा लाभ घेऊन स्वावलंबी होतील

०९ डिसेंबर देवगड दुर्घटना: जबाबदार कोण? बेलगाम तरुणाई, निष्काळजीपणा की अपुरी सुरक्षा व्यवस्था ?

देवगड :काल दिनांक ०९ डिसेंबर रोजी देवगड पर्यटनासाठी पुणे येथील संकल्प सैनिक अकॅडमीची सहल आली असताना या समुद्रात गेलेल्या चार विद्यार्थिनींचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची आणि एकजण बेपत्ता झाल्याची  दुर्घटना घडली.
अशा घटना घडल्या कि पहिला प्रश्न निर्माण होतो तो म्हणजे त्या जागेवरील सुरक्षाव्यवस्था. साहजिकच सर्व स्तरावरून अशा येथील प्रशासनास जबाबदार धरले जाते आणि येथून प्रशासन सुरक्षा देण्यास कुठे कुठे कमी पडले त्यावर सर्वच माध्यमावर चर्चा सुरु होते. येथेही काही त्रुटी आढळून आल्यात.
देवगड नगरपंचायतीतर्फे जीव रक्षकांना पगार दिला जातो एवढा खर्च करू नाही आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सक्षम नाही आहे. देवगड किनारपट्टीवर एक जीव रक्षक यापूर्वीच नोकरी सोडून गेला त्या ठिकाणी दुसऱ्याची नेमणूक अद्यापही करण्यात आलेली नाही. या ठिकाणी नगरपंचायतीचा एक सफाई कर्मचारीही उपस्थित असतो मात्र तोही या दुर्घटनेच्या वेळी नव्हता तो कोठे होता? असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. हजारो लाखो रुपये खर्च करून आपत्ती व्यवस्थापनाच्या रंगीत तालीम करण्यात येतात मात्र आपत्ती आल्यावर ही रंगीत तालीम काहीच उपयोगाची नसते याचा प्रत्यय आजच्या घटनेवरून आला व्यक्ती बुडाल्यावर पोलीस हजर झाले व देवगड ग्रामीण रुग्णालयाच्या अपुऱ्या कर्मचारी वर्गाने बुडालेल्या  व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले सागरी पोलिसांची एकच नौका देवगड समुद्रात बेपत्ता व्यक्तींचा शोध घेत होती देवगड मधील मच्छिमार, ग्रामस्थ यांनीच आपत्ती व्यवस्थापन राबवले. पोलीस व देवगड ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी वगळून कुठल्याही खात्याचे लोक आपत्ती व्यवस्थापनासाठी फिरकले नाहीत
सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आहेत, त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे. जेणेकरून अशा घटना घडल्यास हानी होता नये.  पण पूर्णपणे अशा घटनेस प्रशासनास जबाबदार धरणे योग्य ठरेल का? मुले जवळपास असली कि पालकवर्ग मुलांकडे लक्ष ठेवून असतो.  तेच पालक मुलांना सहलीसाठी किंवा एका अभ्यास दौऱ्यासाठी शाळेतर्फे किंवा एखाद्या अकॅडेमी तर्फे पाठवत असतात आणि तीच जबाबदारी त्या संस्थेला वर्ग pass करतो. त्यांच्यावर विश्वास ठेवतो.
मात्र कालच्या घटनेत संस्थेतर्फे निष्काळजीपणाचे दर्शन झाल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे ही सैनिक अकॅडमी आहे, जेथे शिस्तीला मोठे स्थान आहे. संस्थेच्या शिक्षकांनी सहलीसाठी मार्गदर्शक सूचना दिल्या नाही होत्या का? विध्यार्थ्यांच्या संख्येप्रमाणे शिक्षकांची संख्या कमी होती का? त्यांचा विद्यार्थ्यांवर आणि त्यांच्या कृतींवर पुरेसा लक्ष नाही होता का?  या घटनेवरून विद्यार्थी बेलगाम असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे या अकॅडमीच्या प्रशासनावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

कोकण किनारपट्टीवर अवतरले ‘पाहुणे’; दोन-तीन महिने असणार मुक्काम

दापोली :कोकण किनारपट्टीवर सीगल पक्षी Seagull Birdअवतरले असून, त्यांच्या येण्याने दापोली तालुक्यातील सर्वच समुद्रकिनारे गजबजले आहेत. हर्णैच्या किनाऱ्यावर रपेट मारताना सीगल पक्ष्यांचे थवे दिसू लागल्याने पर्यटकांना ते आकर्षण ठरत असून या थव्यांचे छायाचित्र आपल्या कॅमेऱ्यात टिपण्याचा आनंद पर्यटक घेत आहेत.
किनाऱ्याला थवेच्या थवे येऊन बसतात आणि येणाऱ्या लाटांमध्ये मज्जा करत असतात. विशेषतः सकाळी या पक्ष्यांची गजबज पाहताना एक वेगळीच गंमत वाटते. सीगल पक्ष्यांच्या लयबद्ध हालचाली, भक्ष्य म्हणून छोटे मासे व खेकडे पकडण्यासाठीची शिताफी, आकाशात विहारण्याची शैली पाहता प्रत्यक्षदर्शीची करमणूक होत आहे.
या पक्ष्यांच्या हवेतील सहजसुंदर कसरती देखील पाहण्याजोगा असून या कसरती पाहण्यासाठी अनेकांची पावले समुद्र किनाऱ्यावर वळतात. यावर्षीही या पक्ष्यांचे आगमन झाल्याने किनारा पक्ष्यांच्या सफेद रंगाने न्हाऊन निघाला आहे. पुढील दोन-तीन महिने किनारे या पक्ष्यांनी फुलून जाणार आहेत.
थंडीच्या कालावधीमध्ये पुरेसे खाद्य आणि राहण्यासाठी अनुकूल असलेल्या परिसरात सीगल पक्षी स्थलांतर करून येथे दाखल होतात. दिवाळी सुटीमुळे किनाऱ्यावर मोठ्या संख्येने पर्यटक दापोलीत दाखल झाले आहेत. या पर्यटकांसाठी सीगल पक्षी म्हणजे पर्वणी ठरत आहे.

केरळच्या धर्तीवर कोकणात हाऊसबोटिंग प्रकल्प लवकरच; मगरसफर, डॉल्फिन दर्शनसह ‘या’ सुविधा पर्यटकांसाठी उपलब्ध होणार….

रत्नागिरी –  केरळच्या धर्तीवर सिंधुरत्न योजनेतून जयगड (ता. रत्नागिरी) आणि दाभोळ (ता. दापोली) खाडीत हाऊसबोटिंग प्रकल्प सुरू करण्याचा प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून (डीआरडीए) सादर केला गेला आहे. विशेष म्हणजे या बोटी महिला बचतगट चालवणार आहेत. या सेवेचा लाभ पर्यटकांना लवकरच मिळण्याचे संकेत मिळाले आहेत. 

जलपर्यटनाला वाढती पसंती लक्षात घेऊन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तीकिरण पुजार यांनी हाऊसबोटींगची संकल्पना पुढे आणली. जिल्ह्याला लाभलेल्या खाड्यांमधील जैवविविधता परजिल्ह्यातील पर्यटकांना पाहण्यासाठी खुली केली तर त्याला चांगला प्रतिसाद मिळू शकतो, हे लक्षात घेऊनच हा प्रकल्प अंमलात आणला जात आहे. महिला बचतगटांना ही हाऊसबोट चालवण्यास दिली तर महिलांना रोजगाराचा पर्याय मिळणार आहे.

यासाठी डीआरडीएमार्फत बचतगटातील १२ महिलांना हाऊसबोट प्रकल्प पाहण्यासाठी केरळमध्ये पाठवण्यात आले होते. त्यानंतर हाऊसबोटींगसाठी सुरक्षित आणि परिपूर्ण असलेल्या जयगड आणि दाभोळ खाड्यांची निवड केली. दोन्ही खाड्यांचा परिसर निसर्गरम्य आहे. येथील किनाऱ्‍यावर विविध प्रकारचे पक्षी, प्राणी पाहायला मिळतात. दाट जंगल, मासे पकडण्याचा अनुभव येथे मिळू शकतो.पर्यटकांना एक रात्र बोटीमध्येच राहण्यासाठी सुरक्षित जेटीही उभारणे शक्य आहे. दोन्ही खाड्यांमध्ये प्रवासी बोटींसाठी शासकीय जेटी येथे आहेत. त्याचा वापर हाऊसबोटींसाठी होईल. एका बोटीमध्ये दोन कुटुंबे म्हणजेच आठ व्यक्ती राहतील, अशी व्यवस्था असेल. एका बोटीची किंमत ८० लाख ते १ कोटी रुपये आहे. सिंधु-रत्न योजनेतून निधी मिळणार असून, परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

दोन्ही खाडीत काय पाहता येईल?

वेलदूर ते चिपळूण (३० ते ४० किलोमीटर) –

कांदळवन दर्शन, मगरसफर, उन्हवरेचे गरम पाण्याचे कुंड, पन्हाळे काझीची लेणी, ऐतिहासिक पुरातन मंदिरे, डॉल्फिन दर्शन.

जयगड ते तवसाळ-भातगाव पूल (२२ किलोमीटर) 

कांदळवनातील जैवविविधतेचे दर्शन, मासे पकडण्याचे प्रात्यक्षिक, खाडीकिनारी असलेली पुरातन मंदिरे, फिश मसाज, कोकणकलांचे दर्शन, बचतगटांच्या उत्पादनाचे विक्री केंद्र

दसरा दिवाळीच्या सुट्टीत गोव्याला जाण्याचा प्लॅन आखत असाल तर ही बातमी नक्की वाचा; हॉटेल रूम्स टंचाईमुळे होऊ शकते गैरसोय

गोवा वार्ता: 37 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेला गोव्यात प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने जवळपास 17000 लोक गोव्यात येणार आहेत. यात सुमारे 12000 खेळाडूंचांच समावेश आहे. याशिवाय प्रशिक्षक, टेक्निकल स्टाफ, सपोर्ट स्टाफ, इंडियन ऑलिंपिक असोसिएशनचे सदस्य आणि व्हीआयपींचाही समावेश असणार आहे.त्यासाठी राज्यातील 100 हून अधिक हॉटेल्स स्पोर्ट्स ऑथोरिटी ऑफ इंडिया (SAI) तर्फे बूक करण्यात आली आहेत. त्यामुळे गोव्यात रूम्सची टंचाई निर्माण होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचे वृत्त दिले आहे.
एकीकडे नॅशनल स्पर्धा सुरू झालेली असताना गोव्यात पर्यटन हंगामालाही प्रारंभ झाला आहे. त्यामुळे नेहमीप्रमाणे पर्यटकांचा ओघ देखील गोव्याकडे सुरू आहे. तसेच ही स्पर्धा 9 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. 
या कारणाने आता जर गोव्याला जाण्याचा प्लॅन करत असाल तर एकवेळ आपल्या बजेट चा विचार करून तसा प्लॅन करा. हॉटेल रूमच्या जास्त मागणीमुळे त्यांचे भाव वाढून तुमची ट्रिप महागडी ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

Konkan Tourism | राजापूर तालुक्यातील कातळशिल्पे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

रत्नागिरी : कोकणच्या पर्यटनासंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.  या शिवाय आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे. अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे.
यादीतून बारसूचे नाव वगळले? 
बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा नाहीच; पालक मंत्र्यांचे घुमजाव

मुबई– दिनांक ०१ सप्टेंबर पासून सिंधुदुर्ग विमानतळावर नियमित सेवा देण्याचे विधान सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी केले होते. मात्र आता त्यांनी घुमजाव केले असल्याचे दिसत आहे. नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली असल्याने नियमित सेवा देता येत नसल्याने ही सेवा शक्य नाही असे ते आता म्हणाले आहेत.

नियमित चिपी विमानसेवा पाहणार्‍या एअरलाईन्सची परिस्थिती नाजुक बनली आहे. सद्यस्थितीत केवळ 7 विमाने सुरू होती. त्यापैकी आता केवळ 4 विमानेच सुरू आहेत. अजुनही त्या एअर लाईन्सची परिस्थिती नाजुक बनत चालली आहे. चिपी विमानतळावरील सेवा सुरू राहण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रमाणे शिवसेना ठाकरे गटाचे खा. विनायक राऊत यांच्यासह आम्ही सर्व मंडळी प्रयत्न करत आहोत असे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले.

कुडाळ एमआयडीसी येथे शनिवारी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा बॅकेंचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, महिला जिल्हाध्यक्षा सौ. संध्या तेरसे, भाई सावंत, राजु राऊळ, दिपक नारकर, श्रीपाद तवटे, चेतन धुरी आदि उपस्थित होते.

यावेळी बोलताना चव्हाण म्‍हणाले की, दि. 1 सप्टेंबर पासून मुंबई ते चिपी सिंधुदुर्ग विमानसेवा सुरळीत होणे गरजेचे होते. यासाठी चिपी विमानतळा प्रश्नी बर्‍याच बैठका झाल्या. पूर्वी उडाण योजनेअंतर्गत एअरलायन्सची सेवा सुरू झाली होती. ज्या कंपनीला हा ठेका दिला होता. त्या एअरलायन्स कंपनीचा ठेका ऑक्टोबर पर्यंत आहे. मुंबई येथे चिपीसाठी एकच स्लॉट उपलब्ध आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी-फणसवडे येथे उभारण्यात आले देशातील पहिले फिश थीम पार्क

सावंतवाडी :भारतातील पहिलंवहिलं फिश थीम पार्क उभारण्याचा मान  सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला आहे. या फिश थीम पार्कमध्ये नागरिकांना देशाविदेशातील विविध प्रकारचे मासे आणि पक्षी पाहायला मिळणार आहेत. सावंतवाडी तालुक्यातील दाणोली गावाजवळ असणाऱ्या केसरी-फणसवडे येथे हे केएसआर ॲक्वेरिअम उभारण्यात आले असून येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक ११ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात येत असल्याची माहिती मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी काल पत्रकार परिषदेत दिली आहे.

या फिश थीम पार्कमध्ये माशांना फीडिंग करण्याची व्यवस्था तसेच छोटेखानी तळेही निर्माण करण्यात आले आहे. या तळ्यामध्ये मत्स्यप्रेमींना फिशिंगचा अनुभव मिळणार आहे. या फिश थीम पार्कमध्ये सुमारे तीन हजार पाचशे विविध जातीचे मासे आपल्याला पाहायला मिळणार आहेत. गोड्या आणि खाऱ्या पाण्यातील मासे तसेच खाडीच्या पाण्यातील मासे पाहायला मिळणार आहेत.

पावसाळी पर्यटनस्थळ आणि थंड हवेचे ठिकाण असलेल्या आंबोलीच्या तळाशी असलेल्या केसरी-फणसवडे येथे हे फिश थीम पार्क उभारले आहे. येथील जंगल भागात असलेले करलाई स्वयंभू मंदिर प्रसिद्ध आहे. हा संपूर्ण परिसर निसर्ग सौंदर्याने नटलेला आहे. जवळच दाणोली येथे अनेक भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सदगुरु साटम महाराज यांचा मठ आहे. या फिश थीम पार्कमुळे या भागातील पर्यटनाला चांगले दिवस येणार आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search