Category Archives: सिंधुदुर्ग

Sindhudurg: मोठी बातमी:प्रशासकीय राजवट संपणार! जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर

   Follow us on        

सावंतवाडी:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका अखेर जाहीर झाल्या आहेत. गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेली ही निवडणूक येत्या ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडणार आहे. २०१७ नंतर पहिल्यांदाच या निवडणुका होत असल्याने जिल्ह्याचे राजकीय वातावरण कमालीचे तापले असून इच्छुकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळत आहे.

​प्रशासकीय राजवट संपणार; ५.९९ लाख मतदार बजावणार हक्क

​मार्च २०२२ मध्ये जिल्हा परिषदेची मुदत संपल्यानंतर ओबीसी आरक्षणाच्या न्यायालयीन पेचामुळे या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. गेल्या चार वर्षांपासून जिल्हा परिषदेवर प्रशासकाची नियुक्ती होती. आता या निवडणुकांमुळे जिल्ह्याला पुन्हा एकदा लोकनियुक्त प्रतिनिधी मिळणार आहेत.

​एकूण मतदार: ५,९९,५६७

​मतदान केंद्रे: ८७०

​जिल्हा परिषद जागा: ५०

​पंचायत समिती जागा: १००

​अध्यक्षपद ‘खुले’; दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ‘खुले’ (General) प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. हे पद सर्वांसाठी खुले झाल्याने जिल्ह्यातील मातब्बर नेत्यांमध्ये चुरस निर्माण झाली आहे. आपल्या समर्थकांना उमेदवारी मिळवण्यासाठी आणि जिल्ह्यावर आपले वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

​पंचायत समित्यांचे आरक्षण: ४ तालुक्यांत ‘महिला राज’

​जिल्ह्यातील आठ पंचायत समित्यांच्या सभापतीपदांचे आरक्षणही प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये आठपैकी चार तालुक्यांचे नेतृत्व महिलांकडे जाणार असून, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

​तालुकानिहाय आरक्षण खालीलप्रमाणे:

सावंतवाडी – अनुसूचित जाती (महिला)

कणकवली – ओबीसी (महिला)

दोडामार्ग – सर्वसाधारण (महिला)

मालवण – सर्वसाधारण (महिला)

वेंगुर्ला – ओबीसी (सर्वसाधारण)

कुडाळ – सर्वसाधारण (खुले)

वैभववाडी – सर्वसाधारण (खुले)

देवगड – सर्वसाधारण (खुले)

निवडणुकीचे महत्त्व

​सिंधुदुर्ग जिल्हा परिषद हे जिल्ह्याचे ‘मिनी मंत्रालय’ मानले जाते. ९ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर निवडणूक होत असल्याने मतदारांमध्येही मोठा उत्साह आहे. प्रलंबित विकासकामे आणि स्थानिक प्रश्नांवरून या निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या या मतदानानंतर जिल्ह्याची सत्ता कोणाच्या हाती जाणार, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

विधवा प्रथा बंद करण्यासाठी कोकणातील ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम; राज्य महिला आयोगाकडून दखल

   Follow us on        

कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ ग्रामपंचायतीने आपल्या कार्यक्षेत्रात विधवा प्रथा पूर्णपणे बंद करण्याचा आणि विधवा महिलांना घरपट्टी व पाणीपट्टी करामध्ये सवलत देण्याचा अत्यंत पुरोगामी आणि धाडसी निर्णय घेतला आहे. याची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून दखल घेण्यात आली असून अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी ग्रा. पं.च्या अभिनंदनाचे पत्र सरपंच संदीप मेस्त्री व ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर यांना पाठविले आहे.

आजही समाजातील विधवा महिलांना सन्मानाने जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो. अशा परिस्थितीत, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यातील कलमठ ग्रामपंचायतीने केवळ सामाजिक अनिष्ट प्रथांवर घाला घातला नाही, तर त्या भगिनींना आर्थिक स्थैर्य देण्यासाठी घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये सवलत देऊन एक नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवला आहे. आपल्या निर्णयामुळे विधवा महिला स्वतःवर लादलेली बंधने झुगारून सन्मानाने मुख्य प्रवाहात येतील तसेच कर सवलतीमुळे एकल महिलांना कुटुंबाचा गाडा चालवण्यासाठी मोठी मदत लाभणार आहे. हा निर्णय संपूर्ण राज्यातील इतर हजारो ग्रामपंचायतींसाठी दीपस्तंभाचे कार्य करेल व आपल्याप्रमाणेच महाराष्ट्रातील इतर ग्रामपंचायतींनी अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य महिला आयोग प्रयत्न करेल.

आपण अशा संवेदनशील निर्णयाला दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ कौतुकास्पद आहे. महिलांच्या हक्कासाठी आणि सन्मानासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था म्हणून महाराष्ट्र राज्य महिला आयोग आपल्या या निर्णयाचे स्वागत करतो. याबद्दल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या वतीने आपले मनःपूर्वक अभिनंदन! भविष्यातही सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सबलीकरणाचे असेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जातील, अशी आम्हाला खात्री असल्याचे पत्रात नमुद केले आहे.

 

परप्रांतियांना जमीनी विकणार नाही; ग्राम देवतेसमोर नारळ ठेवत गावकऱ्यांनी घेतली शपथ

   Follow us on        

दोडामार्ग | १२ जानेवारी (प्रतिनिधी):

पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील (इकोसेन्सिटिव्ह झोन) असलेल्या कोलझर गावामध्ये सध्या परप्रांतीय लोकांचा वावर वाढल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. याच पार्श्वभूमीवर, आपल्या जमिनी आणि निसर्गाचे रक्षण करण्यासाठी कोलझरमधील ग्रामस्थ एकवटले असून, त्यांनी ग्रामदेवतेसमोर नारळ ठेवून सामूहिक शपथ घेतली आहे.

नेमके प्रकरण काय?

​गेल्या काही दिवसांपासून या भागात अनधिकृत उत्खनन झाल्याचे स्पष्ट झाले आहे. जमिनींच्या विक्रीचे व्यवहार अद्याप अधिकृतरीत्या समोर आले नसले तरी, भविष्यात गावातील जमिनी परप्रांतीयांच्या हाती जाऊ नयेत यासाठी ग्रामस्थ सावध झाले आहेत.

ग्रामसभेत महत्त्वाचे निर्णय:

  • जमीन विक्रीवर बंदी: गावातील कोणत्याही नागरिकाने आपल्या रक्ताच्या नात्याबाहेरील व्यक्तीला जमीन विकू नये, याबाबत ग्रामस्थांचे एकमत झाले आहे.
  • व्यावसायिकांना विनंती: ज्यांनी जमिनी विकण्याचे ठरवले आहे किंवा ज्यांच्या चर्चा सुरू आहेत, त्यांना विनंती करून हे व्यवहार थांबवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • आंदोलनाचा इशारा: इथून पुढे कुणालाही न विचारता अनधिकृत उत्खनन किंवा जमिनींचे व्यवहार झाल्यास कायदेशीर मार्गाने तीव्र आंदोलनात्मक लढा उभारला जाईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.

​निसर्गसंपन्न असलेल्या कोलझर गावाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आणि बाहेरच्या लोकांचा हस्तक्षेप रोखण्यासाठी ग्रामस्थांनी हा निर्णय घेऊन नवीन आदर्श घालून दिला आहे.

कासार्डे (सिंधुदुर्ग) येथील कवी ओंकार धुरी यांना राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार 2026 जाहीर

   Follow us on        

सिंधुदुर्ग: महाराष्ट्रातील अग्रगण्य दर्पण वृत्तपत्र (ISO 9001:2015 मानांकन प्राप्त) व हिंदी मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येणाऱ्या पत्रकार दिननिमित्त दर्पण रत्न पुरस्कार २०२६ अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावचे कवी ओंकार धुरी यांना काव्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल दर्पण रत्न पुरस्कार २०२६ जाहीर करण्यात आला आहे.

अवघ्या २२ व्या वर्षी कवी ओंकार धुरी यांनी काव्य क्षेत्रात उल्लेखनीय ठसा उमटवला असून, लहानपणापासून कविता लेखनाची आवड जोपासत ते सातत्याने लेखन करत आहेत.

मागील वर्षी युवा कला मंच, रायगड आयोजित राज्यस्तरीय काव्य लेखन स्पर्धेत त्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून प्रथम क्रमांक पटकावत आपल्या कासार्डे गावाचे नाव राज्यभर उज्वल केले होते.

त्यांच्या या साहित्यिक कार्याची दखल घेत हा राज्यस्तरीय दर्पण रत्न पुरस्कार २०२६ दि. ६ जानेवारी रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत बुलढाणा येथे प्रदान करण्यात येणार आहे.

या सन्मानाबद्दल साहित्य व काव्य क्षेत्रातून तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सिंधुदुर्ग : फोंडाघाट घोणसरी परिसरात बिबट्याच्या बछड्याला वनविभागाच्या पिंजऱ्यात जेरबंद; ग्रामस्थांना मोठा दिलासा

   Follow us on        

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) – कणकवली तालुक्यातील फोंडाघाटजवळील घोणसरी-बोंडगवाडी परिसरात गेल्या आठ दिवसांपासून दहशत माजवणाऱ्या बिबट्यांच्या कुटुंबातील एका बछड्याला वनविभागाने यशस्वीपणे जेरबंद केले आहे. ही कारवाई यशस्वी झाल्याने परिसरातील ग्रामस्थांना मोठा दिलासा मिळाला असून, भीतीचे वातावरण काहीसे निवळले आहे.

घोणसरी गावातील बोंडगवाडी आणि पिंपळवाडी भागात गेल्या आठवड्यापासून बिबट्याची नर, मादी आणि दोन बछडे वावरत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आले होते. विशेषतः सतीचे मंदिर ते बोंडगवाडी हा जंगलमय आणि निर्मनुष्य मार्गावर या बिबट्यांचे वारंवार दर्शन होत होते. यामुळे ग्रामस्थांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली होती. कामानिमित्त बाहेर पडताना लोकांना एकटे जाणे धोकादायक वाटत असल्याने घोळक्याने प्रवास करावा लागत होता.

ग्रामस्थांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने घोणसरीचे सरपंच प्रसाद राणे आणि पोलीस पाटील भालचंद्र राणे यांनी फोंडाघाट वनविभागाकडे बिबट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत वनविभागाने परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवले आणि बिबट्यांच्या हालचालींवर बारीक नजर ठेवली. बिबट्याच्या शिकारी आणि वावराच्या आधारे गुरुवारी रात्री पिंजरा लावण्यात आला होता.

वनाधिकाऱ्यांच्या या प्रयत्नांना यश आले आणि पिंजऱ्यात बिबट्याचा एक बछडा अलगद अडकला. या बछड्याला सुरक्षितपणे ताब्यात घेऊन कोल्हापूर वनक्षेत्रात हलवण्यात आले आहे. ही यशस्वी मोहीम फोंडाघाटचे नूतन वनपाल सारीक फकीर आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पार पाडली.

तथापि, एक बछडा जेरबंद झाला असला तरी नर-मादी बिबट्या आणि दुसरा बछडा परिसरात असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी विशेषतः रात्रीच्या वेळी सतर्क राहावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवलेली दारू सापडली; इन्सुली येथे अवैध दारू वाहतुकीवर मोठी कारवाई

   Follow us on        

सावंतवाडी:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इन्सुली परिसरात राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत गोव्याहून होणारी बेकायदा दारू वाहतूक रोखली आहे. या कारवाईत सुमारे ३.५० लाख रुपयांची गोवा बनावटीची दारू आणि ५ लाख रुपये किमतीचे बोलेरो वाहन, असा एकूण ८ लाख ४९ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

​कारवाईचा तपशील

​राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, इन्सुली परिसरातील दत्त मंदिराजवळ वाहन तपासणी मोहीम राबवण्यात येत होती. गुरुवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास गोव्याहून सावंतवाडीच्या दिशेने येणाऱ्या एका ‘महिंद्रा बोलेरो’ टेम्पोला पथकाने अडवले.

​भाजीपाल्याच्या क्रेटखाली लपवली होती दारू

​संशयास्पद वाटणाऱ्या या वाहनाची कसून तपासणी केली असता, मागील हौद्यात भाजीपाल्याचे रिकामे क्रेट ठेवलेले आढळले. मात्र, हे क्रेट बाजूला केल्यावर त्याखाली अत्यंत शिताफीने लपवून ठेवलेले गोवा बनावटीच्या विदेशी दारूचे ३५ बॉक्स सापडले.

​एकाला अटक

​या प्रकरणी पोलिसांनी तन्झिल सईद शेख (वय २७, रा. सावंतवाडी) याला ताब्यात घेतले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ही धडक कारवाई केली असून, जिल्ह्यात बेकायदा दारू विक्री आणि वाहतुकीविरोधात कडक पाऊले उचलली जात आहेत.

​जप्त केलेला मुद्देमाल:

​विदेशी दारू (३५ बॉक्स): ३,४९,३२० रुपये

​महिंद्रा बोलेरो वाहन: ५,००,००० रुपये

​एकूण किंमत: ८,४९,३२० रुपये

आरोंदा भटपावणी येथे दोन बच्छड्यांसह पट्टेरी वाघाचे दर्शन

   Follow us on        

सावंतवाडी: आरोंदा भटपावणी येथे शनिवारी रात्री १०.३० वाजता दुचाकीने घरी जाताना येथील युवकाला अगदी जवळून दोन बच्छड्यांसह वाघाचे दर्शन झाले. आरोंदा रेडी मुख्य रस्त्या जवळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळे नजीक सदर वाघ रस्ता ओलांडत असल्याचे निदर्शनास आले.

भटपावणी येथील साईल विद्याधर नाईक व तुषार नाईक दुचाकीने रात्री साडेदहा वाजता घरी जात असताना दोन बच्चड्यांसोबत वाघ रस्ता पार करत असताना समोर आला.

दुचाकी गाडीची लाईट तोंडावर पडताक्षणी वाघाने डरकाळी फोडून दुचाकीच्या दिशेन धावत आला व मोठी डरकाळी फोडली.

सदर दुचाकीस्वार भयभीत होऊन त्यांनी गाडी जोरात चालवून तिथून पळ काढला.सदर वाघ भटपावणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दिशेन डोंगरात गेल्याचे साईल नाईक यांनी सांगितले.

अंगावर आल्याने छायाचित्र काढण्याचा प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी सांगितले.या घटनेबाबत आरोंदा उपसरपंच गोविंद केरकर यांनी दुजोरा दिला.

दरम्यान, सदर डोंगर परिसरात प्राथमिक शाळा आहे. याठिकाणी वाघाचाnसंचार असल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या भागातील पाळीव प्राणी ,कुत्र्यांनाही वाघाने लक्ष केल्याचं स्थानिक नागरिकांनी सांगितले.त्यामुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.तरी वन विभागाने याची दखल घेऊन बंदोबस्त करण्याची नागरिकांतून मागणी केली जात आहे.

सावंतवाडी टर्मिनससाठीच्या तक्रार मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

   Follow us on        सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पाला गती देण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे ऑनलाईन तक्रार मागणी नोंदवण्याबद्दल आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेकडून करण्यात आले आहे.

या मोहिमेला कोकणवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कालच्या एका दिवसात टर्मिनस साठीच्या तब्बल 264 तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती संघटनेचे संपर्कप्रमुख तसेच उपाध्यक्ष सागर तळवडेकर यांनी दिली.

सावंतवाडी रेल्वे टर्मिनस व्हावे यासाठी डिजिटल पद्धतीने लढाई करताना सुरवातीला इमेल मोहीम, त्यानंतर तक्रार मोहीम, त्यात महामहीम राष्ट्रपती यांच्याकडे तक्रार, माननीय प्रधानमंत्री यांच्याकडे तक्रार, मुख्यमंत्री श्रीमान देवाभाऊ, रेल्वे मंत्रालय (रेल मदद) आणि कोकण रेल्वे कडे हजारो तक्रारी दाखल केल्या, त्यानंतर असणारे मंत्री महोदयांचे जनता दरबारात देखील तक्रारींचा पाऊस पाडला होता. आणि आज देखील त्याचा प्रत्यय आला.

सोबतच सुरू असलेल्या डिजिटल सह्यांची मोहिमेला कोकणवासीयांनी भरभरून प्रतिसाद दिला आणि आता देखील देत आहात याचा अर्थ कोकणवासी आपल्या हक्काच्या लढाईसाठी नक्कीच जागा झालाय. कोकणवासी आपल्या हक्कासाठी डिजिटली साक्षर होतोय यात मी समाधानी आहे. अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

सावंतवाडी टर्मिनसचे काम त्वरित सुरु करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मागणी नोंदवावी यात वेबसाईट www.pratapsamaik.com Grievances ( तक्रार) सेक्शन Public Transport ( सार्वजनिक वाहतूक) निवडा Describe your issue मध्ये पेस्ट करावे असे आवाहन करण्यात आले आहे.गेल्या १० वर्षांपासून रखडलेल्या सावंतवाडी टर्मिनसमुळे कोकणी प्रवाशांचे हाल होत आहेत.निधी परत जाणे आणि प्रशासकीय समन्वयाच्या अभावामुळे हा प्रकल्प ठप्प आहे.हा प्रकल्प गतिमान करण्यासाठी व प्रवाशांना सुविधा देण्यासाठी तो तातडीने राज्य शासनाच्या मित्रा ( MlTRA ) संस्थेकडे वर्ग करावा.मागणी नोंदवल्यानंतर येणाऱ्या पोचपावतीला स्क्रीनशॉट संबधित ग्रुपवर अपलोड करा.या संदेशात सांगितल्याप्रमाणे आपण सावंतवाडी टर्मिनसच्या कामाला गती देण्यासाठी आपली मागणी नोंदवू शकता आणि हा संदेश इतर कोकणवासीयांपर्यत पोहोचवावा असे आवाहन कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने केले आहे.

 

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात भरती; जाहिरात प्रसिद्ध

   Follow us on    

 

 

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलात पोलीस शिपाई आणि चालक पोलीस शिपाई या पदांसाठी रिक्त जागा भरावयाच्या आहेत. पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांच्या अधिपत्याखाली २०२४–२०२५ या वर्षाकरिता खालीलप्रमाणे भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

पोलीस शिपाई – ७६ पदे

चालक पोलीस शिपाई – ९ पदे

उमेदवारांना अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येईल. अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २१ ऑक्टोबर २०२५ ते ३० नोव्हेंबर २०२५ अशी आहे.

भरतीसंदर्भातील सविस्तर माहिती आणि अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांनी खालील संकेतस्थळांना भेट द्यावी:

http://policerecruitment2025.mahait.org

http://www.sindhudurgpolice.co.in

http://www.mahapolice.gov.in

ही माहिती प्रभारी पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांनी प्रसिद्ध केली आहे.

 

‘ओंकार’ ने रोखला मुंबई गोवा महामार्ग; दीड तास वाहतूक ठप्प

   Follow us on    

 

 
बांदा: मागील काही दिवसांपासून बांदा, माडुरा आणि आसपासच्या गावांमध्ये हैदोस माजवणारा ओंकार हत्ती शनिवारी सकाळी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर उतरला. इन्सुली डोबवाडी येथे हत्तीने थेट रस्त्यावर ठिय्या मारल्याने महामार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास ठप्प झाली. त्यानंतर हत्तीने इन्सुलीच्या भरवस्तीतील कुडवडेव व सावंतटेंब परिसरात आश्रय घेतला.

शनिवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास ओंकार महामार्गावर आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हत्ती काही काळ रस्त्यावर फिरत राहिला. वाहनांच्या हॉर्नकडे दुर्लक्ष करत तो शांतपणे रस्त्याच्या मध्यभागी उभा राहिला. त्यामुळे दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. बांदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक नियंत्रित केली.

वनविभागाचे अधिकारी आणि जलद कृती पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले. हत्तीला परत जंगलाकडे वळवण्यासाठी फटाके वाजविण्यात आले; मात्र हत्तीने महामार्ग ओलांडत इन्सुलि गावात प्रवेश केला. गेल्या पंधरा दिवसांपासून ओंकार हत्तीने मडुरा, कास परिसरात धैमान घातले आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून लोकांमध्ये भीतीची सावट पसरले आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search