Category Archives: सिंधुदुर्ग

गणेशोत्सवासाठी कोकणात एसटीच्या ५,२२० जादा बसेस; गट आरक्षण या तारखेपासून सुरू

   Follow us on        

मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठी वाहतूक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान कोकणातील विविध मार्गांवर एसटीच्या तब्बल ५,२२० जादा बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.

गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच गर्दीच्या काळात पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने यंदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.

जादा बससेवेचे आरक्षण १० ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडेसवलत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.

प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करता येणार असून बसस्थानकांवरील गर्दी आणि तिकीट मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.

गेल्या वर्षीच्या अनुभवाचा विचार करून यंदा गणेशोत्सवासाठी अधिक प्रमाणात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या भाविक व चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.

भाजप पक्षातर्फे चाकरमान्यांसाठी ‘गणपती स्पेशल’ गाडीची घोषणा

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवाचा सण आनंदात जावा आणि मुंबईतील चाकरमान्यांचा कोकण प्रवास सुकर व्हावा, यासाठी भारतीय जनता पार्टी मुंबईच्या वतीने एक  पाऊल उचलण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार अमित साटम यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष उपक्रम राबवला जात असून, याद्वारे प्रवाशांना कोणत्याही शुल्काशिवाय प्रवास करण्याची पर्वणी मिळणार आहे.

​ही विशेष मोफत रेल्वे गाडी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) येथून कोकणातील प्रवाशांना घेऊन मार्गस्थ होईल. नियोजित वेळापत्रकानुसार ही ट्रेन शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री १०:०० वाजता आपल्या प्रवासाला सुरुवात करणार आहे.

​प्रवाशांच्या सुविधेचा सखोल विचार करून या गाडीचे  प्रमुख स्थानकांवर थांबण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ही रेल्वे खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.

​या मोफत रेल्वे सेवेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या इच्छुकांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया १० ते १६ ऑगस्ट २०२६ या कालावधीत पार पाडली जाईल. नागरिकांनी या मुदतीत दररोज दुपारी १ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत भाजप कोकण विकास आघाडीच्या मुंबई कार्यालयात जाऊन आपला आरक्षण फॉर्म जमा करणे अनिवार्य आहे.

​अर्ज करताना प्रशासनाकडून नियमांची पूर्तता स्पष्ट सांगण्यात आली असून, प्रत्येक अर्जदाराने आपल्या अर्जासोबत आधार कार्डची प्रत जोडणे बंधनकारक आहे.

शालेय वेळेत शिक्षकांच्या मोबाईल वापरावर बंदी घालण्याचे आदेश

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेची मासिक स्थायी समितीची बैठक नुकतीच आंबोली ग्रामपंचायत सभागृहात जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबदकर, विविध समित्यांचे सभापती तसेच सर्व संबंधित खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

​बैठकीच्या सुरुवातीलाच ज्येष्ठ सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी सरकारी मराठी शाळांमधील खालावत चाललेल्या पटसंख्येवर आणि शिक्षकांच्या बेजबाबदारपणावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अध्यापनाच्या वेळेस शिक्षक मुलांकडे लक्ष न देता सतत मोबाईलवर व्हॉट्सअॅपमध्ये मग्न राहत असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा कसा सुधारणार, अशी खंत त्यांनी मांडली.

​या गंभीर तक्रारीची तत्काळ दखल घेत अध्यक्ष प्रमोद कामत यांनी शालेय वेळेत शिक्षकांकडून होणाऱ्या मोबाईल वापरावर पूर्णपणे बंदी घालण्याचे कडक आदेश दिले व त्याबाबतचे परिपत्रक काढण्यास सांगितले. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबदकर यांनी विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या कोणत्याही प्रकारची कसूर किंवा दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही असा स्पष्ट इशारा दिला.

​याशिवाय, वर्गातील कौशल्य प्रकरणांवरून निर्माण झालेल्या विषयावरही सदस्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी व मुख्याध्यापकांची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. याप्रकरणी संबंधितांना तात्काळ कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश देऊन प्रशासकीय शिस्त अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले.

​तसेच ग्रामीण भागातील अपुऱ्या एसटी फेऱ्यांमुळे विद्यार्थ्यांची होणारी गैरसोय आणि गोव्याच्या बांबोळी रुग्णालयात उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांच्या मदतीसाठी ‘सिंधुदुर्ग कक्ष’ व अतिरिक्त अधिकारी नेमण्याची मागणी सदस्यांनी केली. या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार करून तातडीने योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाकडून संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

नोकरीसाठी मुंबई पुण्याला जायची गरज नाही! देशातील सर्वात मोठे ‘आयटी हब’ कोकणात प्रस्तावित

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

कोकणामध्ये १.४३ लाख कोटी रुपयांची महाकाय गुंतवणूक करून देशातील सर्वात मोठे डेटा सेंटर उभारले जाणार असून, यामुळे स्थानिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन या भागाचा कायापालट होणार आहे.

​महाराष्ट्रातील निसर्गरम्य कोकण किनारपट्टी आता तंत्रज्ञानाच्या जागतिक नकाशावर एका नवीन ओळखीसह झळकण्यासाठी सज्ज झाली आहे. देशातील सर्वात मोठ्या डेटा सेंटर प्रकल्पासाठी कोकणची निवड करण्यात आली असून, या प्रकल्पात तब्बल १.४३ लाख कोटी रुपयांची भव्य गुंतवणूक प्रस्तावित आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणचा औद्योगिक आणि आर्थिक चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार असून, या क्षेत्राला एक नवी दिशा मिळणार आहे.

​महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे (MIDC) अनेक नामवंत देशी आणि जागतिक कंपन्यांनी या डेटा सेंटर प्रकल्पासाठी प्रस्ताव सादर केले आहेत. सध्याच्या नियोजनानुसार, सावंतवाडीजवळील दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी परिसरात हा प्रकल्प उभारण्यासाठी प्राथमिक हालचाली सुरू झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि भौगोलिक परिस्थितीचा विचार करून इतर योग्य जागांचा शोधही प्रशासनाकडून युद्धपातळीवर घेतला जात आहे.

​आजच्या वेगाने वाढणाऱ्या डिजिटल युगात क्लाउड कॉम्प्युटिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या तंत्रज्ञानासाठी डेटा सेंटर्सची गरज प्रचंड वाढली आहे. कोकणची भौगोलिक रचना या प्रकल्पासाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. मुंबई शहराच्या जवळ असणे, उत्तम दळणवळण व्यवस्था, विकसित बंदरांची उपलब्धता आणि आंतरराष्ट्रीय सबमरीन डेटा केबल्सशी थेट जोडणी करण्याची सोय यामुळे उद्योजकांनी या भागाला गुंतवणुकीसाठी पसंती दिली आहे.

​या महाकाय प्रकल्पामुळे केवळ पायाभूत सुविधांचा विकास होणार नाही, तर स्थानिकांसाठी रोजगाराचे मोठे दालन खुले होणार आहे. डेटा सेंटर उभारणीपासून ते आयटी सेवा, तांत्रिक देखरेख, सुरक्षा व्यवस्था आणि लॉजिस्टिक्स अशा विविध क्षेत्रांमध्ये हजारो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष नोकऱ्या उपलब्ध होतील. यामुळे स्थानिक तरुणांना रोजगारासाठी होणारे शहरांकडे होणारे स्थलांतर रोखण्यास मोठी मदत होणार आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्था सक्षम होईल.

​सध्या मुंबई, पुणे आणि ठाणे ही शहरे डेटा सेंटर हब म्हणून ओळखली जातात, पण आता कोकणच्या या प्रकल्पामुळे महाराष्ट्राचे डिजिटल अर्थव्यवस्थेतील अग्रस्थान अधिक भक्कम होईल. पर्यटनासाठी जगप्रसिद्ध असलेला कोकण प्रदेश भविष्यात ‘हाय-टेक डिजिटल हब’ म्हणून नावारूपाला येईल. हा प्रकल्प केवळ कोकणच्याच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या आर्थिक प्रगतीसाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.

एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना: १६ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी पूर्ण करणे अनिवार्य

   Follow us on        

सिंधुदुर्ग:

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व घरगुती एलपीजी गॅस ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना जिल्हा प्रशासनाने जारी केली आहे. जिल्ह्यातील सर्व गॅस ग्राहकांना आपली ई-केवायसी प्रक्रिया १६ ऑगस्ट या मुदतीपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रक्रियेकडे दुर्लक्ष टाळून वेळेत अंमलबजावणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

​ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या संबंधित गॅस वितरकांशी संपर्क साधण्याचा सल्ला देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त, संबंधित तेल विपणन कंपन्यांच्या अधिकृत मोबाईल ॲप्सचा वापर करूनही ग्राहक सहजपणे आपली ई-केवायसी पूर्ण करू शकतात. ग्राहकांच्या सोयीसाठी हे डिजिटल पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

​विभिन्न कंपन्यांच्या ग्राहकांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध आहेत. एचपीसीएल (HPCL) ग्राहकांनी ‘HP Pay’, बीपीसीएल (BPCL) ग्राहकांनी ‘Hello BPCL’ आणि इंडियन ऑईल (IOCL) ग्राहकांनी ‘IndianOil ONE’ या अधिकृत मोबाईल ॲप्सचा वापर करणे अपेक्षित आहे, जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाहीत.

​जिल्हा पुरवठा अधिकारी विजय सहारे यांनी यासंदर्भात स्पष्ट इशारा दिला आहे. जर ग्राहकांनी विहित मुदतीत म्हणजे १६ ऑगस्टपूर्वी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर तेल विपणन कंपन्यांच्या नियमांनुसार त्यांना घरपोच एलपीजी सिलेंडर मिळवताना विविध अडचणींचा सामना करावा लागू शकतो.

​त्यामुळे जिल्ह्यातील सर्व एलपीजी ग्राहकांनी या प्रक्रियेला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नियमांचे पालन करून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, जेणेकरून भविष्यात कोणतीही गैरसोय टाळता येईल आणि गॅस पुरवठा विनासायास सुरू राहील, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

कोकण आयुक्तांचे न्यायालय रत्नागिरी किंवा सिंधुदुर्गात व्हावे!

   Follow us on        

सिंधुदुर्ग: देवगड येथे अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हतर्फे कोकण आयुक्तांकडे प्रलंबित असलेल्या महसूल न्यायप्रकरणांच्या सुनावणीसाठी रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्यात यावे, अशी मागणी करणारे निवेदन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करण्यात आले.

​या प्रसंगी ज्येष्ठ अधिवक्ता व माजी आमदार अजित गोगटे, अधिवक्ता परिषद प्रांत उपाध्यक्ष अभिषेक गोगटे, अधिवक्ता राहुल तांबोलकर, अधिवक्ता स्वप्नील सावंत, अधिवक्ता अग्निवेश तावडे, अधिवक्ता प्रतिमा सातवसे आदी मान्यवर उपस्थित होते.

​या निवेदनातून मागणी करताना, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महसूल न्याय प्रकरणांच्या सुनावणीसाठी पक्षकार, वकील आणि संबंधित नागरिकांना प्रत्येकवेळी मुंबईला जावे लागत असल्याने त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणावर अपव्यय होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

​रत्नागिरी किंवा सिंधुदुर्ग येथे कोकण आयुक्तांचे न्यायालय नियमितपणे भरविल्यास दोन्ही जिल्ह्यातील प्रलंबित महसूल प्रकरणांचा जलद निपटारा होण्यास मदत होईल आणि पक्षकार, वकील तसेच नागरिकांच्या प्रवासाचा खर्च, वेळ व श्रम यांची मोठी बचत होऊन न्यायप्रवेश सुलभ होईल.

​या मागणीची शासनाने सकारात्मक दखल घेऊन रत्नागिरी अथवा सिंधुदुर्ग येथे ठराविक कालावधीनंतर नियमितपणे कोकण आयुक्तांचे न्यायालय भरविण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी अधिवक्ता परिषद, कोकण प्रांत, सिंधुदुर्ग जिल्हा यांच्यातर्फे करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांना अभ्यास दौऱ्यासाठी विदेशात जाण्याची संधी

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग नगरी येथील कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ ची राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्ह्यातील पात्र व प्रगतशील शेतकऱ्यांनी २० ऑगस्टपर्यंत आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे.

​या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विदेशातील आधुनिक कृषी तंत्रज्ञान, उत्पादन पद्धती, बाजार व्यवस्थापन, निर्यात प्रक्रिया तसेच सेंद्रिय शेतीविषयक कार्य प्रत्यक्ष पाहण्याची आणि ज्ञान आत्मसात करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. यामध्ये युरोप येथे फलोत्पादन, सेंद्रिय शेती व दूधोत्पादन तर चीन येथे विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढ आणि कृषी एक्स्पो यांचा अभ्यास दौरा प्रस्तावित आहे.

​निवड झालेल्या शेतकऱ्यांना परदेश दौऱ्याच्या एकूण खर्चाच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल, तेवढे शासकीय अनुदान दिले जाईल. उरलेला ५० टक्के खर्च शेतकऱ्यांनी स्वतःच्या बँक खात्यातून कॅशलेस पद्धतीने (NEFT/RTGS/Cheque) संबंधित ट्रॅव्हल कंपनीकडे जमा करणे आवश्यक राहणार आहे.

​या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराचे वय २५ वर्षे पूर्ण असावे, तो मुख्य व्यवसाय शेती करणारा असावा आणि त्याच्याकडे ॲग्रीस्टॅक अंतर्गत फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदार सरकारी किंवा निमशासकीय कर्मचारी, डॉक्टर, वकील, सीए, अभियंता किंवा कॉन्ट्रॅक्टर नसावा आणि कुटुंबातील केवळ एकाच व्यक्तीस याचा लाभ दिला जाईल.

​जिल्हास्तरावर पात्र अर्जदारांची निवड पारदर्शक पद्धतीने वीडिओग्राफूसह सोडत काढून केली जाणार असून, यात किमान एक महिला शेतकरी आणि कृषी पुरस्कार प्राप्त किंवा पीक स्पर्धेतील विजेता शेतकरी यांचा समावेश अनिवार्य आहे. इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी विहित नमुन्यातील अर्जासह सर्व आवश्यक कागदपत्रे व वैद्यकीय प्रमाणपत्रासह तालुका कृषी अधिकारी कार्यालयात २० ऑगस्टपर्यंत अर्ज सादर करावेत.

आंबोली घाटात ४०० फूट दरीत पडलेल्या त्या तरुणाचा मृत्यू

   Follow us on        

आंबोली: निसर्गरम्य आंबोली परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या एका पर्यटकाचा सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या दुर्दैवी पर्यटकाचे नाव असून, ते आपल्या नऊ मित्रांसह आंबोलीत पर्यटनासाठी आले होते.

​मंगळवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा मित्रपरिवार महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, डॉ. आयुब हे लघुशंकेसाठी सुरक्षिततेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. यादरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळले. तिथे मका विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना खाली पडताना पाहताच सहकाऱ्यांना तातडीने याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदून आपल्या पथкаसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीच्या ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ला पाचारण करून शोधमोहीम सुरू केली. परंतु, परिसरात सुरू असलेला मुसळधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी संध्याकाळी ७ वाजता ही बचाव मोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती.

​बुधवारी सकाळी पहाटेपासून सावंतवाडी पोलीस, स्थानिक प्रशासन आणि रेस्क्यू टीमने पुन्हा एकदा वेगाने शोधमोहीम हाती घेतली. सकाळी दहाच्या सुमारास खोल दरीत डॉ. आयुब सय्यद यांचा मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले. सध्या रेस्क्यू टीमच्या साह्याने मृतदेह दरीतून बाहेर काढण्याचे काम सुरू असून, या अचानक घडलेल्या दुर्घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

वेंगुर्ला-चिपी पाणीपुरवठा योजनेचा अहवाल महिनाभरात

   Follow us on        

सिंधुदुर्ग: ​सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असणारी तिलारी प्रकल्पावर आधारित ‘वेंगुर्ला ते चिपी विमानतळ पाणीपुरवठा योजना (टप्पा-२)’ आणि सौर ऊर्जा प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. मंत्रालयात झालेल्या या बैठकीत मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकल्पाच्या प्रस्तावाचा आढावा घेण्यात आला. या बैठकीस आमदार दीपक केसरकर, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव ए. नायक, वित्त विभागाचे सहसचिव डॉ. माधव वीर, पाणीपुरवठा विभागाच्या सहसचिव गीता कुलकर्णी, कोकण विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत भामरे, नाबार्डचे वरिष्ठ महाव्यवस्थापक अविनाश सेवलकर यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

​या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यासह पाणीपंप, बीज खर्च कमी करण्यासाठी १५०० केव्हीए क्षमतेच्या प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पाची प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून, तांत्रिक, आर्थिक आणि प्रशासकीय बाबींसह सविस्तर अहवाल एका महिन्यात सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच नाबार्डच्या माध्यमातून निधी उभारणे अत्यावश्यक असल्याने या योजनेचा प्रस्ताव वित्तपुरवठ्यासाठी शासनाकडे त्वरीत सादर करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

​सागरी किनारपट्टीवरील वेंगुर्ला-चिपी परिसरात गोड्या पाण्याची उपलब्धता अत्यंत मर्यादित असल्यामुळे या भागातील अनेक ग्रामपंचायतींनी तिलारी प्रकल्पातून पाणीपुरवठा मिळण्याबाबत ठराव मंजूर करून शासनाकडे प्रस्ताव पाठवले आहेत. भविष्यात चिपी विमानतळाचा विस्तार, पर्यटन उद्योगाची वाढ आणि नवीन व्यावसायिक प्रकल्पामुळे पाण्याची मागणी अधिक वाढणार असल्याने ही योजना अतिशय दूरदृष्टीची ठरणार असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नमूद केले.

आंबोली घाटात अपघात! तरुण ४०० फूट दरीत पडला; शोधमोहीम सुरू

   Follow us on        

​आंबोली:

वर्षा पर्यटनाचा मनसोक्त आनंद घेण्यासाठी आलेले बेळगाव जिल्ह्यातील निपाणी येथील डॉ. आयूब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) हे मंगळवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आंबोलीतील महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळल्याची दुर्देवी घटना घडली आहे. डॉ. सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोलीत आले होते. सायंकाळी महादेवगड पॉईंट परिसरात फिरत असताना, लघुशंकेसाठी ते दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले आणि अचानक त्यांचा तोल गेल्याने ते थेट दरीत कोसळले. पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने हा अपघात पाहताच त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ याची माहिती दिली.

​घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथкаसह आणि आंबोलीतील ‘सह्याद्री एडव्हेंचर रेस्क्यू टीम’ने तातडीने घटनास्थळी धाव घेत शोधमोहीम हाती घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेला संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधार यामुळे मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली.

​रेस्क्यू टीमच्या माहितीनुसार, संबंधित पर्यटक पारपोली येथील सिद्धेश्वर मंदिरापासून सुमारे दोनशे फूट पुढे असलेल्या जंगल भागात कोसळला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अपघाताच्या ठिकाणीच संबंधित व्यक्तीचा मोबाईल राहिल्यामुळे मोबाईल लोकेशनच्या आधारे शोध घेणे अशक्य झाले आहे. या प्रतिकूल हवामानामुळे थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी लवकर पुन्हा सुरू करण्यात येणार असून, त्यानंतरच नेमकी परिस्थिती स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search