मुंबई:गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने मोठी वाहतूक व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदा ७ ते २५ सप्टेंबरदरम्यान कोकणातील विविध मार्गांवर एसटीच्या तब्बल ५,२२० जादा बसेस धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री सरनाईक यांनी दिली.
गणेशोत्सव हा कोकणवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण असून मुंबई, ठाणे, पालघर आणि परिसरातून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये तसेच गर्दीच्या काळात पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध व्हावी, यासाठी एसटी महामंडळाने यंदा मोठ्या प्रमाणात अतिरिक्त बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केले आहे.
जादा बससेवेचे आरक्षण १० ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. किमान ४० प्रवाशांच्या गटासाठी १० ऑगस्टपासून गट आरक्षणाची सुविधा उपलब्ध असेल. तसेच गट आरक्षणामध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के भाडेसवलत लागू राहणार असल्याचे सांगण्यात आले.
प्रवाशांना आगाऊ आरक्षणाची सुविधा एसटीच्या अधिकृत संकेतस्थळावर तसेच MSRTC Bus Reservation या अधिकृत मोबाइल ॲपद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन आधीच करता येणार असून बसस्थानकांवरील गर्दी आणि तिकीट मिळविण्यासाठी होणारी धावपळ कमी होण्यास मदत होणार आहे.
गेल्या वर्षीच्या अनुभवाचा विचार करून यंदा गणेशोत्सवासाठी अधिक प्रमाणात जादा बसेस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकणाकडे जाणाऱ्या भाविक व चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार असून, उत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरक्षित आणि सुलभ सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देण्याचा एसटी महामंडळाचा प्रयत्न आहे.


