राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षण सेवक व शिक्षक पदांसाठी पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पारदर्शक आणि गुणवत्ताधारित पद्धतीने भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. शालेय शिक्षण आयुक्त सच्चिंद्रप्रताप सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यभरात एकूण ३० हजार २०९ रिक्त पदांची भरती मागणी नोंदविण्यात आली आहे.
या भरती प्रक्रियेसाठी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टीएआयटी) -२०२५ ऑनलाईन पद्धतीने २७ मे ते ५ जून २०२५ या कालावधीत पार पडली होती. या परीक्षेसाठी २ लाख २८ हजार ८०८ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यापैकी २ लाख ११ हजार ३०८ उमेदवार प्रविष्ट झाले असून १ लाख ७० हजार १०८ उमेदवारांनी आपली स्वप्रमाणपत्र प्रक्रिया पूर्ण केली आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या रिक्त पदांच्या तपशिलानुसार, जिल्हा परिषदांच्या १३,३५१, महानगरपालिकांच्या १,९५४, नगर पालिका/परिषदांच्या २८०, खाजगी संस्थांच्या १२,१४८, आदिवासी विकास विभागाच्या शाळांमधील २,४२१ आणि शासकीय विद्यानिकेतनांच्या ५६ पदांचा यामध्ये समावेश आहे. यातील १९,८८१ पदे मुलाखतीशिवाय तर १०,३२८ पदे मुलाखतीसह भरली जाणार आहेत.
वर्गनिवार विचार केल्यास, इयत्ता पहिली ते पाचवीसाठी १४,३२०, सहावी ते आठवीसाठी १०,०१२, नववी व दहावीसाठी ५,५१३ आणि अकरावी व बारावीसाठी ३६४ पदांची भरती केली जाणार आहे. उमेदवारांना पदभरतीसाठी ठरवून दिलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ६ ऑगस्ट २०२६ पासून प्राधान्यक्रम निश्चित करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
सर्व पात्र उमेदवारांनी पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत अनिवार्यपणे लॉक करणे आवश्यक आहे, त्यानंतर मुलाखतीशिवायच्या पदांची गुणवत्तायादी प्रसिद्ध केली जाईल. या संपूर्ण प्रक्रियेशी संबंधित काही सूचना किंवा तक्रार असल्यास उमेदवारांनी ठरवून दिलेल्या ई-मेल पत्त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन शालेय शिक्षण विभागाने केले आहे.


