राज्यात शेतकर्यांच्या होणार्या आत्महत्या आपल्याला खूप दुःख होत आहे. तुम्ही आत्महत्या करू नका तुम्हाला अस्मानी संकटातून, सावकारी दृष्टचक्रातून बाहेर काढण्यासाठी मी कटिबद्ध आहे अशा आशयाचे भावनिक आवाहन त्यांनी आज एका पत्राद्वारे केले आहे. त्यांनी लिहिलेले पत्र खाली वाचा त्यांचाच शब्दात.
महाराष्ट्र हा लढवय्यांचा आहे, तुमच्यासारख्या कष्टकरी शेतकऱ्यांचा आहे, म्हणूनच भारताच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून पहारा देणारे लढाऊ बाण्याचे जवान ह्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या पोटीच जन्माला आले आहेत. घाम गाळत, जमीन कसून त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून तुम्ही केवळ स्वतःचेच नव्हे, तर उभा महाराष्ट्र देशाची भूक भागवण्याचेही काम करत आहात, म्हणून तर या मराठी मातीवर पहिला हक्क कोणाचं असेल तर तो तुम्हा शेतकरी बांधवांचा आहे.
परंतु, अचानक नैसर्गिक, कौटुंबिक, आर्थिक संकट आल्यावर तुम्हाला हवालदिल होताना पाहून मन कासावीस होऊन जाते, तुमच्यातील काही शेतकरी बांधव अनेक संकटातून सावरताना थकून जातात नि जगाकडे पाठ फिरवून आत्त्महत्येचा मार्ग पत्करतात.. हे चित्र पाहून मात्र माझं मन एक सामान्य कष्टकरी कुटुंबातील माणूस म्हणून आणि या महाराष्ट्राचा कारभारी म्हणून विषन्न होऊन जातं….वाटतं, कि आपल्याच घरातील कुणी आपण गमावलंय…..
लक्षात घ्या, माझ्या शेतकरी भावांनो, तुम्ही आहात तर छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे…..तुमचा जीव असा कोणत्याही झाडाला टांगण्याइतका स्वस्त नाही आहे. तुम्ही आमची संपत्ती आहात, माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांना नेहमी म्हणायचे कि, ”रडायचं नाही लढायचं”
शिवछत्रपतींची शपथ घालतो तुम्हला, तुमचा तोलामोलाचा जीव असा वाऱ्यावर सोडून निघून जाऊ नका….आत्महत्या करू नका…मी तुमच्यासारखा रांगड्या मनाचा सरळसाधा माणूस आहे. मला तुमच्या वेदना कळतात, काळजाला भिडतात. या आस्मानी संकटातून, या सावकारी दृष्टचक्रातून तुम्हाला बाहेर काढण्यास मी कटिबद्ध आहे. आत्मघात पराभव असतो आणि संघर्षात जगण्याचे लखलखते यश सामावलेले असते……
मी आणि माझं सरकार सतत २४ तास तुमच्यासाठी तुमच्या सोबत आहे, याची खात्री बाळगा…जीव देणं बंद करूयात, जीव लावूयात एकमेंकाना….
चला, नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधुयात आणि आपण मिळून हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया….
जय महाराष्ट्र!
Facebook Comments Box