नवी दिल्ली: होळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी संख्येने होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी देशभरात १,४१० हून अधिक होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून ही संख्या वाढवून तब्बल १,५०० पर्यंत नेण्यात येणार आहे. या सर्व विशेष गाड्या मार्च महिन्यात धावणार आहेत.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात प्रमुख मार्गांवरील प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी होळी २०२५ दरम्यान एकूण १,१४४ विशेष गाड्यांचे संचालन करण्यात आले होते. यंदा त्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आली आहे.
विभागनिहाय गाड्यांचे नियोजन
मध्य रेल्वे (CR) कडून २०९ होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून पश्चिम रेल्वे (WR) २३१ विशेष गाड्या चालवणार आहे. सर्वाधिक २८५ विशेष गाड्या पूर्व मध्य रेल्वे (ECR) कडून धावणार आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य रेल्वे (SCR) १६०, उत्तर रेल्वे (NR) १०८ तर उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ७१ विशेष गाड्या चालवणार आहे.
याशिवाय उत्तर मध्य रेल्वे (NCR) ६६, उत्तर पूर्व रेल्वे (NER) आणि पूर्व किनारा रेल्वे (ECOR) प्रत्येकी ६२ गाड्या चालवणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ४७, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ४३, दक्षिण रेल्वे (SR) ३९ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) १५ विशेष गाड्या चालवणार आहे. कोकण रेल्वेकडून ९ तर ईशान्य सीमांत रेल्वे (NFR) कडून २ विशेष गाड्यांचे संचालन होणार आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षितता आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.


