सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पावशी-घावनळे फाटा येथे मुंबई-गोवा महामार्गावर टायर जाळून वाहतूक रोखण्याची घटना घडली आहे. आज (सोमवारी) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी महामार्गावर टायर ठेवून त्यांना आग लावली. यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या लेनवर मोठ्या प्रमाणात धूर आणि आग पसरली, वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि वाहनांची रीघ लागली.
कुडाळ पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली आणि आग विझवली. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
ही घटना नांदगाव आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या ‘रास्ता रोको’ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर घडली असून, याचा त्यांच्याशी संबंध असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र अद्याप याबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत राहिली. प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांनी या प्रकाराबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.


