सावंतवाडी : तालुक्यातील ओवळीये गावातील मधलीवाडी येथे रविवारी सायंकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या जमिनीच्या वादातून कोयत्याने करण्यात आलेल्या हल्ल्यात ६५ वर्षीय सरस्वती सावंत यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या प्रकरणी पोलिसांनी संशयित विजय कृष्णा सावंत (वय ६१) आणि त्यांचा मुलगा रघुनाथ विजय सावंत (वय ३७) या पिता–पुत्रांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. ही घटना सायंकाळी सुमारे ५ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, सरस्वती सावंत या आपल्या मुलगा एकनाथ सावंत याच्यासोबत शेतात कामासाठी गेल्या असताना संशयितांनी तेथे येत जमिनीच्या वादातून वाद घातला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली; मात्र काही क्षणांतच हा वाद हिंसक वळणावर गेला. संतापाच्या भरात आरोपींनी कोयत्याने सरस्वती सावंत यांच्या डोक्यावर वार केले. यात त्या गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.
घटनेनंतर तातडीने त्यांना सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे, मृत महिलेने दोन दिवसांपूर्वीच आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. तरीही ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
त्यांच्या अनपेक्षित जाण्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. ही घटना डोळ्यासमोर घडल्याने त्यांचा मुलगा अजूनही या धक्क्यातून सावरला नाही आहे. अंत्यसंस्कारावेळी कुटुंबीयांचा आक्रोश मन हेलावून टाकणारा होता. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून हल्ल्यात वापरण्यात आलेला कोयता जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा देण्याची जोरदार मागणी केली जात आहे.


