Mumbai Locals: मुंब्रा आणि दिवा दरम्यान आज मोठी दुर्घटना घडली आहे. मध्य रेल्वेची लोकल आणि पुष्पक एक्सप्रेस एकमेकांना जोरदार घासल्यामुळे लोकलच्या दारात उभं असणारे ८ ते १० प्रवासी धावत्या ट्रेनमधून पटरीवर पडल्याचे समोर आले आहे.या अपघातामध्ये ५ जणांचा मृत्यू झाल्याचे समजतेय. ही दुर्घटना सकाळच्या गर्दीच्या वेळेस घडली असून जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आठवड्याच्या पहिल्याच दिवशी कामावर जाण्यासाठी मुंबईकर लोकलने प्रवास निघाले. पण गर्दी प्रचंड असल्याने अनेकजन दरात लटकत उभे होते. पण मुंब्रा-दिवा या स्थानकादरम्यान लोकल आणि ट्रेन एकमेकांना घासल्या गेल्या. दोन्ही गाड्याचा स्पीड अतिशय जास्त होता, त्यामुळे जोरात धडक झाली अन् एकच आवाज झाला. त्यामुळे लोकलमधून ८ ते १०प्रवासी पटरीवर खाली पडले. त्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाल्याचे समजतेय. दोन्ही ट्रेन एकमेंकाना घासल्यामुळे मोठा आवाज झाला अन् लोकलमधील प्रवाशांमध्ये भीतीचे वातवरण निर्माण झाले. सध्या रेल्वेकडून या घटनेची माहिती घेतली जात आहे. जखमी प्रवाशांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रेल्वेकडून या घटनेची गंभीर दखल घेतली असून पूर्णपणे चौकशी करण्यात येणार आहे.
सावंतवाडी : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे आज पहाटे पाच च्या सुमारास भीषण अपघात झाला. गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह एक प्रवासी गंभीर तर अनेक जण जखमी झाले.
मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव जोशी मांजरेकरवाडी येथे हा अपघात झाला. अपघातानंतर स्थानिक रहिवासी संजय जोशी, विद्याधर मांजरेकर दीपक जोशी व अन्य ग्रामस्थांनी टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह अन्य जखमींना सुरक्षितपणे बाहेर काढत त्यांना उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील टेम्पो ट्रॅव्हलर चालक व अनेक प्रवासी गंभीर जखमी असून इतर प्रवासी देखील किरकोळ जखमी झाले आहेत. तर या अपघातात डंपरच्या मागील बाजूची दोन्ही चाके तुटून बाहेर गेली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला.
DigiPIN : सध्याच्या पिनकोड प्रणालीला एक उत्तम आणि अचूक पर्याय म्हणून भारतीय पोस्ट विभागाने ‘डिजीपिन’ (DigiPIN) नावाचा डिजिटल पत्ता सादर केला आहे. डिजीपिन ही आता देशातील नवी पत्ता प्रणाली (Address System) ठरणार आहे. 10 अंकी डिजीपिन प्रणाली तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान दर्शविणार आहे.
.
पिन कोड आणि डिजीपिनमधील फरक…
भारतीय पोस्ट विभागाने अचूक स्थान समजून घेण्यासाठी डिजीपिन (DigiPIN) प्रणाली सादर केली आहे. डिजीपिन हा 10 अंकी डिजिटल कोड आहे. पारंपरिक पिन कोड ज्या प्रकारे विस्तृत क्षेत्राचा समावेश करत होता, त्याऐवजी डिजीपिनमुळे अचूक स्थानाची माहिती मिळणार आहे. म्हणजेच, तुमच्या घराचे किंवा व्यवसायाचे अचूक स्थान डिजीपिनद्वारे शोधता येईल.
डिजीपिन तयार करण्यासाठी आणि कोड मिळवण्यासाठी सरकारी संकेतस्थळाला भेट देऊन तुम्ही तुमचा डिजीपिन मिळवू शकतात. डिजीपिनचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, तो पत्रव्यवहार योग्य पत्त्यावर पोहोचवण्यात मदत करेल आणि रुग्णवाहिका, अग्निशमन दल यांसारख्या आपत्कालीन सेवांना अचूक ठिकाणी पोहोचण्यात मदत करेल. ग्रामीण भागांसह दुर्गम भागात डिजीपिन फायदेशीर ठरेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. डिजीपिन केवळ पत्रव्यवहारासाठीच नव्हे, तर ई-कॉमर्स वेबसाइट्सवरील पार्सलसुद्धा अचूक ठिकाणी पोहोचवण्यात सक्षम ठरेल, असं सांगितलं जात आहे.
तुमचा डिजीपिन कसा शोधाल?
तुमचा डिजीपिन शोधण्यासाठी भारत सरकारने https://dac.indiapost.gov.in/mydigipin/home ही वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटला भेट दिल्यावर आणि तुमचे लोकेशन निवडल्यावर तुम्हाला तुमचा 10 अंकी डिजीपिन कोड मिळू शकतो. डिजीपिन इतर पत्त्यांच्या प्रणालींपेक्षा वेगळी ठरण्याचे कारण म्हणजे, यात तुम्ही फक्त चार मीटरच्या त्रिज्येत तुमचे अचूक स्थान ओळखू शकता. इंडिया पोस्टने IIT हैदराबाद, NRSC आणि ISRO यांच्या सहकार्याने डिजीपिन ही जिओकोड केलेली डिजिटल अॅड्रेस प्रणाली विकसित केली आहे. विशेष म्हणजे, डिजीपिनचा ऑफलाइन देखील वापरता येऊ शकतो.
दोडामार्गः तालुक्यातील तळकट भटवाडी परिसरात शुक्रवारी (६ जून) दुपारच्या सुमारास १४ फूट लांबीचा भला मोठा किंग कोब्रा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. भरवस्तीत आढळलेल्या या विषारी सापामुळे गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
गावातील रहिवासी अभिजीत देसाई यांना हा किंग कोब्रा त्यांच्या घरासमोरच्या परिसरात दिसला. त्यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ गावातील नागरिकांना आणि वनविभागाला याबाबत माहिती दिली. झोळंबे येथील अनुभवी सर्पमित्र विठ्ठल गवस यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं.
चिपळूण : कोकण आणि घाटमाथ्याला जोडणाऱ्या गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंभार्ली घाटात शनिवारी पहाटे संरक्षक भिंत कोसळली असून या भागातील लोखंडी रेलिंगही निखळले आहे. घाटात खोल दरीच्या बाजूने असलेली ही भिंत कोसळल्याने रस्ता खचण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत पोलिसांकडून खचलेल्या ठिकाणी दगड, पिंप उभे करून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.
या घाटात गेल्या 2 वर्षात कोट्यावधीचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये संरक्षक भिंतीसह रस्ता दुरुस्तीचा समावेश आहे. मात्र कितीही कोटी या घाटातील दुरुस्तीवर, सुरक्षेच्या उपाययोजनांवर खर्च केले तरीही पावसाळ्यात दरवर्षी हा घाट धोकादायक बनत आला आहे. दरड कोसळणे, केलेली बांधकामे ढासळणे हे नित्याचेच झाले आहे.
शनिवारी कोसळलेल्या संरक्षक भिंतीमुळे यावर्षीचा पावसाळा कसा जाणार, याचीच चिंता वाहनचालकांना लागून राहिली आहे. या घाटातून दररोज शेकडो वाहने जात-येत असतात. सध्या घाटात तीन ठिकाणी रस्ता खचण्याचे व संरक्षक भिंत कोसळण्याचे प्रकार घडले आहेत. सद्यस्थितीत खचलेल्या रस्ता ठिकाणी वाहने जाऊ नयेत म्हणून तेथे फक्त दगड आणि काही ठिकाणी पिंप उभी करून तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.
पावसाळ्यात हा रस्ता खचल्यास घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यातच पावसाळ्यात अवजड वाहतूक असणाऱ्या घाट परिसरात आधीच दृश्यमानता कमी झाल्याने अवजड वाहनांसह मोठी वाहतूक कोंडी होते. त्यात आता रस्त्याच्या बाजूने असणाऱ्या संरक्षक भिंतीसह रेलींगही निखळल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, प्रशासनाने अद्याप कोणतीही मोठी यंत्रसामुग्री पाठवली नसल्याने स्थानिकांनी उच्च आणि जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
करण-बालव – 07:20:43 पर्यंत, कौलव – 20:31:45 पर्यंत
पक्ष- शुक्ल
योग-परिघ – 12:17:20 पर्यंत
वार- रविवार
सूर्योदय- 06:03
सूर्यास्त- 19:13
चन्द्र-राशि-तुळ
चंद्रोदय- 16:48:59
चंद्रास्त- 28:07:00
ऋतु- ग्रीष्म
जागतिक दिन :
जागतिक महासागर दिवस
जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस
महत्त्वाच्या घटना :
1670 : पुरंदरच्या तहात गमावलेला रोहिडा किल्ला शिवाजी महाराजांनी परत मिळवला.
1624 : पेरूमध्ये भूकंप.
1707 : औरंगजेबाच्या मृत्यूनंतर, त्याचे दोन पुत्र, मुअज्जम आणि आझमशाह, दिल्लीच्या तख्तासाठी लढले. यात मुअज्जमने आझमशहाला ठार मारून दिल्लीचे तख्त बळकावले.
1713 : 1689 मध्ये मुघलांनी जिंकलेला रायगड किल्ला पंतप्रतिनिधीने सिद्दीकींच्या राजकारणातून जिंकला.
1783 : आइसलँडमधील लाकी ज्वालामुखीचा उद्रेक होऊन अनेकांचा मृत्यू झाला.
1912 : कार्ल लेमले यांनी युनिव्हर्सल पिक्चर्सची स्थापना केली.
1915 : मंडाले येथील तुरुंगात असताना लिहिलेले लोकमान्य टिळकांचे ‘गीतारहस्य’ हे पुस्तक प्रकाशित झाले.
1918 : सर्वात तेजस्वी तेजोमेघाचा शोध, नोव्हा अक्विला.
1936 : इंडियन स्टेट ब्रोडकास्टिंग सेवेचे नाव ऑल इंडिया रेडिओ करण्यात आले.
1941 : दुसरे महायुद्ध – मित्र राष्ट्रांनी सीरिया आणि लेबनॉनवर कब्जा केला.
1948 : एअर इंडियाने मुंबई-लंडन सेवा सुरू केली.
1948 : जॉर्ज ऑर्वेलची 1984 ही कादंबरी प्रकाशित झाली.
1953 : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने हॉटेलमध्ये कृष्णवर्णीयांना सेवा नाकारण्यावर बंदी घातली.
1968 : बर्मोडा देशाने संविधान अंगिकारले.
1969 : लष्करप्रमुख म्हणून सॅम माणेकशा यांची नियुक्ती.
1992 : जागतिक महासागर दिवस प्रथमच साजरा करण्यात आला.
2004 : आधुनिक काळातील शुक्राचे (सूर्यावरुन) पहिले अधिक्रमण झाले. याआधीचे अधिक्रमण 1882 या वर्षी झाले होते.
जन्मदिवस / जयंती / वाढदिवस:
1906 : ‘सैयद नझीर अली’ – भारतीय क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
1910 : ‘दिनकर केशव’ तथा ‘दि. के. बेडेकर’ – लेखक, तत्त्वचिंतक व समीक्षक यांचा जन्म. (मृत्यू: 2 मे 1973)
1915 : ‘काययार सिंहनाथ राय’ – भारतीय पत्रकार, लेखक, आणि कवी यांचा जन्म. (मृत्यू: 9 ऑगस्ट 2015)
1917 : ‘गजाननराव वाटवे’ – भावगीत गायक यांचा जन्म. (मृत्यू: 2 एप्रिल 2009)
1921 : ‘सुहार्तो’ – इंडोनेशियाचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: 27 जानेवारी 2008)
1925 : ‘बार्बरा बुश’ – अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांची पत्नी व जॉर्ज डब्ल्यु. बुश यांची आई यांचा जन्म.
1932 : ‘रे इलिंगवर्थ’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म.
1936 : ‘केनिथ गेडीज विल्सन’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन भैतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म.
1955 : ‘टिम बर्नर्स-ली’ – वर्ल्ड वाईड वेब चे जनक यांचा जन्म.
1957 : ‘डिंपल कपाडिया’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
1975 : ‘शिल्पा शेट्टी’ – भारतीय अभिनेत्री आणि निर्माता यांचा जन्म.
मृत्यू / पुण्यतिथी / स्मृतिदिन:
632 : 632 ई.पुर्व : ‘मोहंमद पैगंबर’ – इस्लाम धर्माचे संस्थापक यांचे निधन.
1795 : ‘लुई 17 वा’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म: 27 मार्च 1785)
1809 : ‘थॉमस पेन’ – अमेरिकन विचारवंत राजकारणी यांचे निधन. (जन्म: 29 जानेवारी 1737)
1845 : ‘अन्ड्रयू जॅक्सन’ – अमेरिकेचे 7वे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म: 15 मार्च 1767)
मुंबई: तत्कालीन रेल्वेमंत्री श्री. नितीश कुमार यांनी रेल्वे अर्थसंकल्पात सांगितल्यानुसार १ जुलै, १९९९ पासून मुंबई आणि मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस सुरु झाली. मुंबई गोवा मार्गावर दिवसाची सेवा देणारी ही पहिलीच एक्सप्रेस होती. तत्पूर्वी सुरु असणारी कोकणकन्या एक्सप्रेस रात्रीची सेवा देत होती तर दिवा सावंतवाडी पॅसेंजर संथ गतीने जात असल्यामुळे लांबच्या प्रवाशांना अडचणी येत होत्या. कोकणवासीयांना दिवसाच्या जलद प्रवासाची सवय याच इंटरसिटी एक्सप्रेसने लावली.
गेज बदलण्यापूर्वी मिरज वास्को दरम्यान मांडवी एक्सप्रेस धावत असे. परंतु ब्रॉडगेज मार्ग झाल्यावर ती बंद करण्यात आली व मुंबई मडगाव दरम्यानच्या इंटरसिटी एक्सप्रेसचे नामकरण मांडवी एक्सप्रेस म्हणून करण्यात आले. तसेच पूर्वी केवळ आसनी डबे असणाऱ्या गाडीचे रेक नंतर कोकणकन्या एक्सप्रेस सोबत एकत्रित करण्यात आल्यामुळे मांडवी एक्सप्रेसला स्लीपर डबे मिळाले. पुढे १० जून, २०१९ पासून या दोन्ही गाड्यांना आधुनिक एलएचबी डबे देण्यात आले. १ फेब्रुवारी,२०२४ पासून मांडवी एक्सप्रेसला दोन अद्ययावत एसी थ्री टायर इकॉनॉमी डबे जोडण्यात आले. अशाप्रकारे वेगवेगळी स्थित्यंतरं पाहत मांडवी एक्सप्रेस गेली २६ वर्षे कोकणवासीयांची अविरत सेवा करत आहे.
रेल्वेप्रेमी व नियमित प्रवाशांमध्ये खाद्य राणी (फूड क्वीन) म्हणून प्रसिद्ध असलेल्या मुंबई मडगाव मांडवी एक्सप्रेसच्या २६ व्या वर्षपूर्तीचा सोहळा मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे शनिवार दि. ७ जून, २०२५ सकाळी ६ पासून रेल्वेप्रेमींनी मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरा केला.
सर्वप्रथम रेल्वेप्रेमींनी रात्रभर जागून गाडीचे इंजिन सजवले. त्यानंतर पहाटे ५:४५ ला मडगावहून कोकणकन्या एक्सप्रेस मुंबईत दाखल झाल्यानंतर गाडीचे काही डबेही सजवण्यात आले. चिन्मय कोले यांनी नारळ वाढवून पुढील कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर पारंपरिक मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशा व तुतारीच्या गजरात गाडीचे इंजिन जोडण्यात आले. गाडीचे चालक (लोको पायलट व सहाय्यक लोको पायलट), तिकीट तपासनीस, पॅन्ट्री कार कर्मचारी यांचा सत्कार करून त्यांच्याच हस्ते केक कापून हा कार्यक्रम साजरा झाला.
यासाठी चिन्मय कोले, साहिल कोसिरेड्डी, अमित फाटक, राहुल नायर, जिनेश सावंत, शुभम नागपुरे, अभय आभाळे, अनुष जाधव, यश राणे, ओमकार फाटक, आदित्य कांबळी आणि अक्षय महापदी यांनी विशेष मेहनत घेतली. यातील काही रेल्वेप्रेमी केवळ या कामासाठी रात्री पुण्याहून मुंबईला येऊन सकाळी पुन्हा पुण्याला गेले.याचसोबत श्रेयश हुले, मंदार सहस्त्रबुद्धे, पौरव शहा, दीपक नागमोती, सुमन घोष, जोशुआ मेंडोसा, प्रथमेश प्रभू, सुनीत चव्हाण, निलेश परुळेकर, परम, इंद्रजित रावराणे, रोहित नायर, अभिषेक असोलकर, तमिळ सेल्व्हन, पवन, प्रणित शिवलकर, निलय काटदरे, जयशंकर, कमल, जेसन कोएल्हो, मिहीर मठकर, सौरभ सावंत, धनुष चंदन, कुणाल जाधव, तेजस भिवंडे, हिमांशू शर्मा, टायरोन डिसूझा, चिंतन नाईक यांनीही सहकार्य केले.
कोल्हापूर : छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथून सुटणाऱ्या कोयना व महाराष्ट्र एक्स्प्रेस रेल्वेला गांधीनगर, रुकडी व ताकारी येथे थांबे देण्याचा मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्यांच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.मध्य रेल्वेची १२६ वी क्षेत्रीय सल्लागार समितीची बैठक मुंबई येथे मध्य रेल्वे महाप्रबंधक धर्मवीर मीना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीत सांगली, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यांतील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यावेळी ही निर्णय घेण्यात आला. सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी यांनी ही माहिती दिली.कोल्हापूर-अहमदाबाद एक्स्प्रेस व हुबळी-पुणे वंदे भारतला कराड येथे थांबा देण्याचे प्रस्तावित करण्यात आले. त्याच वेळी येणाऱ्या आषाढी एकादशीसाठी कोल्हापूरहून पंढरपूरला विशेष गाड्या सोडणार असल्याचे सांगण्यात आले. कोल्हापूर-पुणे सह्याद्री एक्स्प्रेसचा विशेष दर्जा काढून सर्वसाधारण आकारणी करण्याचे ठरले.सकाळच्या सत्रामध्ये कोल्हापूर-कलबुर्गी एक्स्प्रेस गाडी सुरू करण्यासंबंधी प्रस्ताव असल्याचे सांगण्यात आले. त्याचबरोबर कोल्हापूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेस सकाळी लवकर सोडण्यात येणार असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.सांगली-परळी एक्स्प्रेस सध्या डेमू धावतो, त्याऐवजी आयसीएफ कोचने सोडण्याचा मागणीचा प्रस्ताव मान्य करण्यात आला. यावेळी मध्य रेल्वे क्षेत्रीय सल्लागार समिती सदस्य शिवनाथ बियाणी, किशोर भोरावत, गोपाळ तिवारी व गजाधर मानधना उपस्थित होते
Thane: गणेशोत्सवानिमित्त ठाणे रेल्वे स्थानकात कोकण रेल्वेच्या तिकीटासाठी दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू होणार आहे. या खिडक्यांची संख्या वाढल्याने गणेशभक्तांची वेळ आणि रांगेत उभे राहण्याची दमछाक कमी होणार आहे.
कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने ठाणे रेल्वे स्थानकात आरक्षण तिकीट खिडक्या वाढवण्याची मागणी गेले 4 वर्ष लावून धरली होती. खासदार म्हणून निवडून आल्यानंतर संघटनेने ही मागणी नरेश म्हस्के यांच्याकडे करताच अवघ्या काही दिवसांतच हा प्रश्न मार्गी लागला आहे.
खासदार नरेश म्हस्के यांनी मध्य रेल्वेकडे 7 मे रोजी या संदर्भात पत्रव्यवहार केला. या पत्राची तातडीने दखल घेत 2 जून रोजी मध्य रेल्वेचे अप्पर मंडल रेल प्रबंधक तरुण कुमार यांनी पत्राद्वारे 2 अतिरिक्त आरक्षण तिकीट खिडक्या ठाणे रेल्वे स्थानकात सुरू करत असल्याची माहिती दिली आहे. 20 जून ते 5 जुलै 2025 या दरम्यान या दोन अतिरिक्त आरक्षण खिडक्या सुरू राहणार आहेत.
सध्या 4 आरक्षण खिडक्या कार्यरत असून 2 अतिरिक्त खिडक्या सुरू होणार आहेत. 6 आरक्षण खिडक्यांमुळे आता कोकणवासियांची वेळ वाचणार असून रांगेत जास्त वेळ ताटकळत रहावे लागणार नसल्याने प्रवासी संघटनेने आनंद व्यक्त केला आहे. आपल्या खासदारकीच्या पाहिल्याच टर्ममध्ये खासदार नरेश म्हस्के यांनी अनेक रेल्वे विषयक प्रश्न मार्गी लावले असल्याबद्दल प्रवासी संघटनेने समाधान व्यक्त केले आहे.