Author Archives: Kokanai Digital

एक्सप्रेसची चाके रुळावरून घसरली; रेल्वेचा मोठा अपघात टळला!

   Follow us on        

नागपूर: केवळारी तालुक्यातील खैररांजी गावाजवळ शुक्रवारी दुपारी एक मोठी रेल्वे दुर्घटना थोडक्यात टळली. शहडोलहून नागपूरच्या दिशेने येणाऱ्या ‘शहडोल-नागपूर एक्सप्रेस’च्या काही डब्यांची चाके नैनपूर-खैररांजी दरम्यान अचानक रुळावरून घसरली.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. ट्रेन वेगात असताना अचानक डब्यांची चाके रुळावरून खाली उतरली. यामुळे ट्रेनला जोराचा धक्का बसला, ज्यामुळे डब्यातील प्रवाशांमध्ये मोठी घबराट पसरली. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि कोणताही प्रवासी गंभीर जखमी झाल्याचे वृत्त नाही.

रेल्वे प्रशासनाची धावपळ:

घटनेची माहिती मिळताच रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आणि तांत्रिक पथक तातडीने घटनास्थळी रवाना झाले. रेल्वे मार्ग पुन्हा सुरळीत करण्यासाठी आणि घसरलेले डबे पुन्हा रुळावर आणण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू करण्यात आले आहे. या घटनेमुळे या मार्गावरील रेल्वे वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.

​सुदैवाने चालकाने प्रसंगावधान राखल्याने आणि गाडीचा वेग मर्यादित असल्याने मोठा अनर्थ टळला असल्याचे बोलले जात आहे. रेल्वे प्रशासन आता या अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेत आहे.

कोकण रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणासाठी हालचाली सुरू; दोन टप्प्यांच्या व्यवहार्यता अभ्यासासाठी निविदा जाहीर

   Follow us on        

मंगळुरू: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) आपल्या रेल्वे मार्गाची क्षमता वाढवण्यासाठी आणि गाड्यांचा प्रवास अधिक वेगवान करण्यासाठी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कोकण रेल्वेने कर्नाटक आणि महाराष्ट्र-गोवा सीमेवरील महत्त्वाच्या पट्ट्यांमध्ये ‘पॅच डबलिंग’ (टप्प्याटप्प्याने दुहेरीकरण) करण्याच्या उद्देशाने व्यवहार्यता अभ्यास (Feasibility Study) करण्यासाठी निविदा जाहीर केल्या आहेत.

​या निविदेनुसार, प्रामुख्याने दोन महत्त्वाच्या विभागांचा अभ्यास केला जाणार आहे. यात मंगळुरूजवळील थोकूर ते मूकंबिका रोड बिंदूर या ११२ किलोमीटरच्या अंतराचा आणि गोव्यातील माजोर्डा ते महाराष्ट्रातील वैभववाडी रोड या १५१ किलोमीटरच्या अंतराचा समावेश आहे. एकूण २६३ किलोमीटर लांबीच्या या मार्गांच्या अभ्यासासाठी सुमारे 1.31 कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला असून, ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत निविदा प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

​प्रकल्पाच्या वेळापत्रकानुसार, निविदा सादर करण्याची अंतिम मुदत १४ ऑक्टोबर निश्चित करण्यात आली आहे. निवडलेल्या यशस्वी कंत्राटदाराला कामाचे आदेश मिळाल्यापासून पुढील तीन महिन्यांच्या आत हा व्यवहार्यता अभ्यास पूर्ण करून अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालात जमिनीची उपलब्धता, तांत्रिक अडचणी आणि बांधकामासाठी लागणारा अंदाजित खर्च यांसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश असेल, ज्यावर पुढील प्रत्यक्ष कामाची दिशा ठरेल.

​कोकण रेल्वे मार्ग हा सध्या प्रामुख्याने एकेरी स्वरूपाचा असल्याने गाड्यांना क्रॉसिंगसाठी अनेकदा थांबावे लागते. यापूर्वी रोहा ते वीर या ४७ किमी अंतराचे दुहेरीकरण यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. आता प्रस्तावित असलेल्या या नवीन ‘पॅच डबलिंग’मुळे रेल्वे हाताळणी क्षमता वाढेल, विलंबाच्या समस्या कमी होतील आणि प्रवाशांचा वेळ वाचेल. वाढती प्रवासी संख्या आणि मालवाहतुकीचा ताण पाहता हे पाऊल कोकण रेल्वेच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत गरजेचे मानले जात आहे.

वाघ आणि बिबट्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर (एआय) आधारित यंत्रणा कार्यान्वित

   Follow us on        

नागपूर : रामटेक तालुक्यातील देवलापार हे आदिवासीबहुल क्षेत्र आणि विशेषतः पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या पंचक्रोशीत असलेले गाव. या शेजारी पिपरिया नावाचे छोटेसे गाव. वाघांच्या डरकाळ्या व संचार या गावात तसा नवा नाही. वेळोवेळी पाळीव प्राण्यांसह या गावात माणसांवरही जीवघेणे हल्ले झाले आहेत. यातून माणसांना वाचविण्यासाठी नागपूर ग्रामीण पोलीस व वन विभागाने अभिनव उपाययोजनांवर विचार सुरु केला. यातून एआय आधारित प्रकल्पाने आकार घेतला. याची फलश्रुती म्हणून तीन ठिकाणी ही यंत्रणा कार्यान्वित होऊन संवेदनशील ठिकाणांवर गावकऱ्यांना वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचे सतर्कतेचे इशारे मिळू लागले आहेत. गुरुवारी रात्री या यंत्रणेकडून देवलापारजवळील पिपरिया येथे वाघाचा वावर असल्याचा इशारा गावकऱ्यांना आणि वन विभागाला मिळाला आणि गावकरी सतर्क झाले.

विशेष म्हणजे येत्या १५ एप्रिलपर्यंत वनविभागाचे पेंच वन्यजीव क्षेत्र तसेच प्रादेशिक क्षेत्र मिळून संवेदनशील स्वरुपाच्या ४० गावांमध्ये ही यंत्रणा स्थापित होऊन कार्यान्वित होणार आहे.

नागपूर ग्रामीण भागात मागील अडीच ते तीन वर्षांच्या कालावधीत वाघ किंवा बिबट्याच्या हल्ल्यात गावकऱ्यांचा मृत्यू होण्याच्या १५ घटना घडल्या आहेत. यापैकी अनेक घटनांमध्ये गावकऱ्यांमध्ये रोष निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यावर उपाय म्हणून वन विभाग आणि नागपूर ग्रामीण पोलिसांनी ‘एआय’ आधारित (कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित) उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये एआय तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्यात योगदान देणाऱ्या मार्व्हल या संस्थेच्या वतीने ‘एआय’ आधारित यंत्रणा उभारण्यात येत आहे. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार हे मार्व्हल संस्थेचे सीईओ देखील आहेत. पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, मागील दोन ते तीन वर्षात घडलेल्या घटनांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचे पहायला मिळाले. त्यावर उपाय म्हणून आम्ही ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. गावाच्या परिसरात वाघ, बिबटे, अस्वलांसारख्या आक्रमक प्राण्यांचा परिसरात वावर असल्यास सतर्कतेचा इशारा देणाऱ्या ‘एआय’ तंत्रज्ञानावर मार्व्हलने काम केले. त्याअंतर्गत विशिष्ट ठिकाणांवर उच्च क्षमतेचे अत्याधुनिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. हे तंत्रज्ञान ‘बायो अॅक्यूस्टिक्स’ (ध्वनी आधारित) आणि ‘बायो व्हिज्युअल’ (प्रत्यक्ष दृष्य आधारित) अशा दोन प्रकारे काम करते. वाघ किंवा बिबटे परिसरात आल्यास चितळ, सांबर, माकड यासारखे तृणभक्षी प्राणी आणि मोर विशिष्ट प्रकारचे आवाज काढून संपूर्ण परिसराला सतर्क करतात. ते विशिष्ट आवाज टिपून हे ‘एआय’ तंत्रज्ञान डेटाचे विश्लेषण करुन त्यासंबंधीचे सतर्कतेचे इशारे संबंधितांना पाठविण्याचे कार्य करते. सतर्कतेचे इशारे वन विभागाचे अधिकारी व गावकऱ्यांना त्यांच्या मोबाईल फोनवर मिळू शकतात. याशिवाय ‘बायो व्हिज्युअल’ प्रकारच्या तंत्राच्या माध्यमातून कॅमेरात प्रत्यक्ष प्राण्याचे फोटो ‘कॅप्चर’ झाल्यास हे तंत्रज्ञान सतर्कतेचे इशारे पाठवते.

पोलीस अधीक्षक पोद्दार यांनी सांगितले की, वन विभागाच्या मदतीने आम्ही वन्यप्राण्याच्या हल्ल्यांच्या दृष्टीने संवेदनशील अशा ४० ठिकाणांची निवड केली असून तेथे प्राधान्याने कॅमेरे लावण्यात आले आहेत. याच आठवड्यात तब्बल तीन ठिकाणी ही यंत्रणा प्रत्यक्षात कार्यान्वितही झाली असून मागील चार दिवसात दोनदा वाघ आणि बिबट्यांचा वावर असल्याचा सतर्कतेचा इशारा वन विभाग आणि ग्रामस्थांना देण्यात आला आहे. वन विभागाच्या पेंच व्याघ्र प्रकल्पाचा समावेश असलेल्या वन्यजीव क्षेत्रासह प्रादेशिक विभागातही खापा व पारशिवनी परिसरात ही यंत्रणा कार्यान्वित होत आहे.

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आणि चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातही ही यंत्रणा उभारण्याचा प्रस्ताव असून यासंदर्भात वन विभागाचा मार्व्हल संस्थेशी सामंजस्य करार झाला असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सांगितले.

आखाती युद्धाच्या झळा कोकणच्या हापूसला; ५०% आंबा निर्यात धोक्यात! स्थानिक बाजारपेठेत दर पडण्याची शक्यता

   Follow us on        

मुंबई: आखाती देशांमध्ये सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे कोकणातील हापूस आंबा बागायतदारांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. भारताच्या एकूण आंबा निर्यातीपैकी तब्बल ३० ते ५० टक्के आंबा हा दुबई, सौदी अरेबिया आणि कुवेत यांसारख्या आखाती देशांमध्ये जातो. मात्र, या भागातील वाढत्या तणावामुळे आंतरराष्ट्रीय समुद्री मार्ग, विशेषतः ‘हॉर्मुझची सामुद्रधुनी’, धोक्याच्या छायेत आहे. यामुळे अनेक मालवाहू जहाजांची ये-जा थांबली असून, जेथे वाहतूक सुरू आहे तिथे विम्याचे हप्ते आणि मालवाहतुकीचे दर दुपटीने वाढले आहेत. नाशवंत माल असल्याने आंबा वेळेत पोहोचणे गरजेचे असते, परंतु कंटेनरची कमतरता आणि वाहतुकीतील अडथळ्यांमुळे निर्यातीचा वेग कमालीचा मंदावला आहे.

निर्यातीत येणाऱ्या या अडथळ्यांचा थेट परिणाम स्थानिक बाजारपेठेवर होण्याची दाट शक्यता आहे. जर परदेशात जाणारा आंबा देशांतर्गत बाजारपेठेत वळवला गेला, तर वाशी, पुणे आणि कोल्हापूर सारख्या मार्केटमध्ये आंब्याची मोठी आवक होईल. पुरवठा वाढल्याने साहजिकच हापूसच्या दरात मोठी घसरण होऊ शकते, ज्याचा फटका थेट बागायतदारांच्या खिशाला बसणार आहे. यंदा हवामानातील लहरीपणामुळे उत्पादन खर्च आधीच वाढलेला असताना, आता निर्यातीचे मार्ग बंद झाल्यास बागायतदारांचे कंबरडे मोडण्याची भीती वर्तवली जात आहे. अशा स्थितीत शासन आणि निर्यातदार संस्थांनी पर्यायी बाजारपेठा शोधणे किंवा प्रक्रिया उद्योगाला चालना देणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

Mumbai Water Metro: मुंबईच्या वाहतूक कोंडीवर ‘जल मेट्रो’चा उतारा; खासदारांच्या प्रस्तावाची सरकारकडून सकारात्मक दखल

   Follow us on        

मुंबई: मुंबई शहराला भेडसावणाऱ्या वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी आणि पर्यावरणपूरक उपाय शोधण्यासाठी खासदार रवींद्र वायकर यांनी मांडलेल्या ‘मुंबई जल मेट्रो’ (Mumbai Water Metro) प्रकल्पाच्या प्रस्तावाची राज्य सरकारने दखल घेतली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी या प्रस्तावावर त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले असून, सदर विषय पुढील तपासणीसाठी संबंधित विभागाकडे वर्ग केला आहे.

मुंबईतील वाढती लोकसंख्या, धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि इतर गृहनिर्माण प्रकल्पांमुळे भविष्यात रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण प्रचंड वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर, खासदार वायकर यांनी कोची वॉटर मेट्रोच्या धर्तीवर मुंबईतही जलवाहतूक सुरू करण्याची मागणी केली होती. कोचीमध्ये हा प्रकल्प अत्यंत यशस्वी ठरला असून, तेथील सुरक्षितता आणि कार्यक्षमता पाहता मुंबईच्या विस्तीर्ण किनारपट्टीचा वापर करून जलद सार्वजनिक वाहतूक उपलब्ध करून देणे शक्य असल्याचे वायकरांनी पत्रात नमूद केले होते.

मुंबई महानगर क्षेत्राची (MMR) लोकसंख्या २०३० पर्यंत सुमारे २.९ कोटी आणि २०३७ पर्यंत ३.८ कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतक्या मोठ्या लोकसंख्येसाठी केवळ रस्ते वाहतूक पुरेशी ठरणार नाही. त्यामुळे जल मेट्रोसारखा आधुनिक, इलेक्ट्रिक आणि पर्यावरणपूरक पर्याय मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल खासदार वायकर यांनी मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले असून, हा प्रकल्प मार्गी लागल्यास मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Konkan Railway: आता ‘फुकटेगिरी’ पडणार महाग; कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी अधिक तीव्र

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर तिकीट तपासणी मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे.कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने (KRCL) फेब्रुवारी २०२६ या एकाच महिन्यात आपल्या मार्गावर तिकीट तपासणीची जोरदार मोहीम राबवली आहे. या मोहिमेअंतर्गत रेल्वेने एकूण ८७३ विशेष तपासण्या केल्या, ज्यामध्ये ४१,५२२ प्रवासी अनधिकृत किंवा विनातिकीट प्रवास करताना आढळले. या प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंड स्वरूपात २.४१ कोटी रुपयांचा महसूल गोळा करण्यात आला आहे.

चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या आकडेवारीवर नजर टाकल्यास, एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत आतापर्यंत एकूण १०,३६८ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवण्यात आल्या आहेत. या ११ महिन्यांच्या कालावधीत एकूण ४,५४,८४९ विनातिकीट प्रवासी पकडले गेले असून, त्यांच्याकडून २५.२१ कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

आगामी हंगामाचा काळ लक्षात घेता, कोकण रेल्वेने ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुखकर व्हावा, यासाठी रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि रेल्वे अधिकाऱ्यांच्या समन्वयाने संपूर्ण मार्गावर कडक तपासणी केली जाणार आहे. “सर्व प्रवाशांनी वैध तिकीट काढूनच प्रवास करावा, जेणेकरून प्रवासात कोणतीही गैरसोय होणार नाही,” असे आवाहन कोकण रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुणे – सावंतवाडी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

पुणे: पुणे आणि कोकण या दोन महत्त्वाच्या विभागांना रेल्वेने अधिक सक्षमपणे जोडण्यासाठी भाजपच्या राज्यसभा खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी नुकतीच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन पुण्याहून कोकणसाठी ‘अमृत भारत एक्सप्रेस’ सेवा उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी केली. या नवीन रेल्वे सुविधेमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांचा आणि पर्यटकांचा प्रवास अधिक वेगवान आणि सुखकर होणार आहे.

या भेटीदरम्यान डॉ. कुलकर्णी यांनी ‘प्रधानमंत्री गतिशक्ती नॅशनल मास्टर प्लॅन’ अंतर्गत ‘सावंतवाडी टर्मिनस प्रकल्पा’ला मंजुरी देण्याबाबतही सविस्तर चर्चा केली. हा प्रकल्प पूर्ण झाल्यास दक्षिण कोकणातील रेल्वे वाहतुकीचे जाळे अधिक भक्कम होईल आणि सावंतवाडी हे एक महत्त्वाचे रेल्वे हब म्हणून विकसित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या मागण्यांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले असून, या निर्णयामुळे पुणे-कोकण प्रवाशांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

पुणे ते कोकण रेल्वे प्रवासाच्या सद्यस्थितीचा विचार करता, सध्या उपलब्ध असलेल्या रेल्वे सेवा प्रवाशांच्या अफाट संख्येच्या तुलनेत अत्यंत अपुऱ्या आहेत. सध्या पुण्याहून कोकणात जाण्यासाठी  ‘पुणे-एर्नाकुलम एक्सप्रेस’ या एकमेव गाडीचा पर्याय उपलब्ध आहे. सणासुदीच्या काळात रेल्वे प्रशासन काही विशेष गाड्या सोडते, परंतु त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. पुण्यामध्ये कोकणातील चाकरमान्यांची संख्या लाखांच्या घरात असून, या मोजक्या गाड्यांमुळे प्रवाशांना वर्षभर आरक्षणासाठी मोठी कसरत करावी लागते. अनेकदा प्रवाशांना लांबचा वळसा घालून पनवेलमार्गे प्रवास करावा लागतो, ज्यामुळे वेळ आणि श्रम दोन्ही वाया जातात.

रेल्वेची ही अपुरी सोय असल्यामुळे बहुतांश प्रवाशांना खासगी ट्रॅव्हल्स किंवा एसटी बसवर अवलंबून राहावे लागते. मात्र, पावसाळ्यात घाटांमधील दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे रस्ते वाहतूक अनेकदा विस्कळीत होते, अशा वेळी रेल्वे हाच सर्वात सुरक्षित आणि खात्रीशीर पर्याय ठरतो. म्हणूनच, खासदार मेधा कुलकर्णी यांनी केलेली ‘अमृत भारत एक्सप्रेस’ ची मागणी अत्यंत रास्त आणि काळाची गरज आहे. ही गाडी सुरू झाल्यास सामान्य प्रवाशांना कमी खर्चात, जलद आणि आधुनिक सोयींसह थेट कोकणात पोहोचणे शक्य होईल, ज्यामुळे सध्याच्या यंत्रणेवरचा ताण मोठ्या प्रमाणात हलका होईल.

प्रस्तावित ‘मंगळुरू सेंट्रल – भावनगर टर्मिनस एक्सप्रेस व्हाया कोकण रेल्वे’ सुरू करण्याची मागणी

   Follow us on        

मंगळुरू: कोस्टल कर्नाटक विभागाला रेल्वे कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत सापत्न वागणूक मिळत असल्याची भावना तेथील स्थानिक नागरिकांमध्ये निर्माण झाली असून, रेल्वे प्रशासनाकडे ‘मंगळुरू-भावनगर एक्सप्रेस’ सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण रेल्वे सध्या मंगळुरू सेंट्रल आणि चर्लापल्ली (हैदराबाद जवळ) दरम्यान एक नवीन रेल्वे सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. ही रेल्वे मंगळुरू-रामेश्वरम एक्सप्रेसच्या उपलब्ध डब्यांचा (Rake) वापर करून चालवली जाणार आहे. मात्र, या रेल्वेचा नियोजित मार्ग केरळ आणि तामिळनाडू मार्गे जात असल्याने तटीय कर्नाटकातील प्रवाशांनी यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. हा मार्ग स्थानिक प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अपुरा असून, यामुळे प्रवासाचा वेळ आणि अंतर विनाकारण वाढत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

​वास्तविक, आयआरटीटीसी (IRTTC) च्या बैठकीत मंगळुरू ते भावनगर दरम्यान कोकण रेल्वे मार्गे थेट रेल्वे सेवा सुरू करण्याचा प्रस्ताव यापूर्वीच मंजूर करण्यात आला होता. तटीय कर्नाटकातील हजारो लोक व्यापार, शिक्षण आणि रोजगारासाठी गुजरात आणि महाराष्ट्रात स्थायिक आहेत. मात्र, मंगळुरूहून गुजरातसाठी अद्याप एकही समर्पित आणि नियमित रेल्वे सेवा उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत, मंजूर झालेला भावनगरचा प्रस्ताव बाजूला सारून पुन्हा केरळ-तामिळनाडू मार्गे जाणारी रेल्वे लादली जात असल्याने स्थानिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. मंगळुरू रेल्वे स्थानक हे केवळ शेजारील राज्यांच्या रेल्वे गाड्यांसाठीचे ‘टर्मिनल’ बनत चालले असून, कर्नाटकच्या स्वतःच्या कनेक्टिव्हिटी गरजांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप ‘दक्षिण कन्नड रेल्वे यात्री संघ’ आणि स्थानिक नागरिकांनी केला आहे.

​या संदर्भात रेल्वे मंत्रालय आणि रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना समाजमाध्यमांद्वारे साकडे घालण्यात आले आहे. प्रवाशांच्या मते, जर प्रस्तावित रेल्वे हसन किंवा मडगाव-हुबळी कॉरिडॉरऐवजी कोकण रेल्वे मार्गे चालवली, तर त्याचा फायदा पश्चिम भारताला जोडण्यासाठी अधिक प्रभावी ठरेल. दक्षिण रेल्वेने आपल्या निर्णयाचा पुनर्विचार करावा आणि तटीय कर्नाटकच्या दीर्घकालीन मागणीचा मान राखून तात्काळ मंगळुरू सेंट्रल – भावनगर टर्मिनस एक्सप्रेस सुरू करावी, अशी आग्रही मागणी आता केली जात आहे. यामुळे केवळ प्रवाशांची सोयच होणार नाही, तर या भागातील औद्योगिक आणि आर्थिक विकासालाही मोठी चालना मिळणार आहे असा विश्वास दक्षिण कन्नड रेल्वे यात्री संघाने व्यक्त केला आहे.

मुंबईकरांचा प्रवास हायटेक बनविणाऱ्या ‘वंदे मेट्रो’ एसी लोकलबद्दल नवी अपडेट

   Follow us on        

मुंबई: मुंबईतील उपनगरीय रेल्वे प्रवास अधिक सुखकर आणि आधुनिक करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कंबर कसली आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (MRVC) प्रस्तावित केलेल्या ‘वंदे मेट्रो’ धर्तीवरील एसी लोकलच्या २,८५६ डब्यांच्या खरेदी प्रक्रियेला आता वेग आला असून, याची निविदा १५ मे २०२६ रोजी उघडली जाणार आहे.

​निविदा प्रक्रियेत बदल का?

​यापूर्वी ही निविदा एप्रिल महिन्यात उघडण्याचे नियोजन होते. मात्र, इच्छुक बोलीदारांनी (Bidders) उपस्थित केलेल्या तांत्रिक शंकांचे निरसन करण्यासाठी एमआरव्हीसीने मुदतवाढ दिली आहे. या बदलामुळे प्रकल्पाच्या मूळ वेळापत्रकावर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला आहे.

​नव्या ‘वंदे मेट्रो’ एसी लोकलची वैशिष्ट्ये

​सध्या धावत असलेल्या एसी लोकलच्या तुलनेत या गाड्या अधिक प्रगत असतील:

​क्षमता: १२ आणि १५ डब्यांव्यतिरिक्त, गर्दीच्या नियोजनासाठी १८ डब्यांची एसी लोकलही तयार केली जाणार आहे.

​सुरक्षा: संपूर्ण गाडीत आग आणि धूर शोधणारी अलार्म प्रणाली, सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘इमर्जन्सी टॉक बॅक’ सुविधा.

​आरामदायी प्रवास: गादीयुक्त आसने, दिव्यांगांसाठी स्वतंत्र जागा आणि स्वयंचलित हवा नियंत्रण (Automatic Climate Control) यंत्रणा.

​तंत्रज्ञान: डब्याबाहेर हाय-डेफिनिशन एलईडी बोर्ड, ऊर्जा बचत तंत्रज्ञान आणि डब्यांच्या जोडणीमुळे (Vestibules) गर्दीचे समान विभाजन शक्य.

​कसे असेल अंमलबजावणीचे वेळापत्रक?

​१५ मे रोजी निविदा उघडल्यानंतर पुढील प्रक्रिया अशी असेल:

​४ ते ६ महिने: निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कार्यादेश (Work Order) दिले जातील.

​अडीच वर्षे: करार झाल्यानंतर साधारण ३० महिन्यांत पहिली नमुना (Prototype) एसी लोकल मुंबईत दाखल होईल.

​४ ते ६ वर्षे: यशस्वी चाचण्यांनंतर पुढील काही वर्षांत सर्व २,८५६ डब्यांचा ताफा टप्प्याटप्प्याने सेवेत येईल.

​ या प्रकल्पामुळे मुंबईच्या उपनगरीय रेल्वे सेवेचा चेहरामोहरा बदलणार असून, मुंबईकरांना जागतिक दर्जाचा प्रवासाचा अनुभव मिळणार आहे.

मुंबई लोकलचा प्रवास सुसह्य करण्यासाठी ‘ऍक्शन प्लॅन’ तयार; रेल्वे मंत्र्यांनी दिली महत्वाची माहिती

   Follow us on        

Mumbai Local: मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने ३३ हजार कोटी रुपयांचे विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील २३८ लोकल गाड्यांना स्वयंचलित दरवाजे (Automatic Doors) लावण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. गेल्या दहा वर्षांत (२०१५ ते २०२५) मुंबईत रेल्वे अपघातात सुमारे २६,५४७ प्रवाशांना आपला जीव गमावावा लागला असून, दररोज सरासरी ६ लोकांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. हे अपघात रोखण्यासाठी स्वयंचलित दरवाजे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

या प्रकल्पांतर्गत केवळ दरवाजेच नव्हे, तर इतर पायाभूत सुविधांचाही विस्तार केला जात आहे. मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी वांद्रे, मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, दादर, पनवेल आणि कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर रेल्वे मार्गांची संख्या वाढवण्यात येत आहे. तसेच, १५ डब्यांच्या लोकल गाड्या चालवण्यासाठी ३४ रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. शिवसेना खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना रेल्वेमंत्र्यांनी ही माहिती दिली. मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत (MUTP) होणाऱ्या या बदलांमुळे भविष्यात मुंबईकरांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी वांद्रे, मुंबई सेंट्रल, जोगेश्वरी, दादर, कुर्ला, पनवेल आणि कल्याण यांसारख्या महत्त्वाच्या स्थानकांवर नवीन रेल्वे मार्गिका (Lines) टाकण्याचे काम सुरू आहे. यामध्ये पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामांचा समावेश असून, यामुळे लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांचे मार्ग स्वतंत्र होऊन वाहतुकीचा खोळंबा कमी होईल. तसेच, सिग्नल यंत्रणेचे आधुनिकीकरण आणि स्थानकांचा पुनर्विकास करून प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यावर या ३३ हजार कोटींच्या आराखड्यात भर देण्यात आला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केल्यानुसार, या सर्व प्रकल्पांचा मुख्य उद्देश मुंबईतील वाढती गर्दी कमी करणे आणि रेल्वे अपघातांचे प्रमाण शून्यावर आणणे हा आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search