Author Archives: Kokanai Digital

सुरक्षित आणि वेगवान डिलिव्हरीसाठी पोस्टाची ‘२४ स्पीड पोस्ट’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ प्रीमियम सेवा सुरू

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय टपाल विभागाने खाजगी कुरियर कंपन्यांना तगडी स्पर्धा देण्यासाठी १७ मार्च २०२६ रोजी ‘२४ स्पीड पोस्ट’ ही आपली नवीन प्रीमियम सेवा अधिकृतपणे सुरू केली आहे. केंद्रीय संचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या हस्ते नवी दिल्लीत या सेवेचे औपचारिक उद्घाटन झाले. ही सेवा प्रामुख्याने मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू आणि हैदराबाद या सहा प्रमुख महानगरांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सेवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे दस्तऐवज आणि पार्सलची पुढील दिवशी (D+1) हमी दिलेली डिलिव्हरी मिळणार असून, ही सेवा तातडीच्या कामांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

​ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून यामध्ये ओटीपी (OTP) आधारित हस्तांतरणाची सोय करण्यात आली आहे, ज्यामुळे पार्सल केवळ अधिकृत व्यक्तीलाच प्राप्त होईल. याव्यतिरिक्त, ग्राहकांना रिअल-टाइम ट्रॅकिंग आणि एसएमएस अलर्टची सुविधा मिळेल. विशेष म्हणजे, जर डिलिव्हरीमध्ये विलंब झाला, तर ग्राहकांना पैसे परत मिळण्याची ‘मनी-बॅक गॅरंटी’ देखील भारत पोस्टने दिली आहे. ‘२४ स्पीड पोस्ट’ सोबतच टपाल विभागाने ‘२४ स्पीड पोस्ट पार्सल’ आणि ‘४८ स्पीड पोस्ट’ (दुसऱ्या दिवशी डिलिव्हरी) या सेवाही सुरू केल्या आहेत. ई-कॉमर्सच्या वाढत्या गरजा आणि ग्राहकांच्या त्वरित सेवेच्या अपेक्षा लक्षात घेऊन भारत पोस्टने आपले हे डिजिटल आणि वेगवान लॉजिस्टिक्सचे पाऊल उचलले आहे.

 

 

 

भांडुप स्थानकावर एसी लोकलचा थरार; अनियंत्रित वेगामुळे रेल्वे प्लॅटफॉर्म ओलांडून पुढे!

   Follow us on        

मुंबई: मुंबईच्या मध्य रेल्वे मार्गावर आज, १७ मार्च २०२६ रोजी सकाळी एक थरारक घटना घडली. CSMT हून कल्याणच्या दिशेने जाणारी ९५७११ क्रमांकाची जलद एसी लोकल भांडुप स्थानकात निर्धारित वेळेत पोहोचली खरी, मात्र प्लॅटफॉर्मवर थांबण्याऐवजी ती वेगाने पुढे निघून गेली. स्थानकात प्रवेश करताना गाडीचा वेग अधिक होता आणि मोटरमनने ब्रेक लावूनही गाडीचे अनेक डबे प्लॅटफॉर्मच्या पलीकडे ओव्हरशूट झाले. या अनपेक्षित प्रकारामुळे गाडीतील प्रवाशांमध्ये प्रचंड भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा जखमी झाल्याची नोंद झालेली नाही.

​रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या ओव्हरशूटच्या घटनेमुळे ट्रेनला सुमारे ६ मिनिटांचा उशीर झाला. दररोज ७५ लाखांहून अधिक प्रवाशांची ने-आण करणाऱ्या मुंबई लोकलच्या सुरक्षेबाबत, विशेषतः ब्रेकिंग आणि स्पीड कंट्रोलच्या तांत्रिक बाबींवर या घटनेमुळे पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली असून, भविष्यात अशा धोकादायक घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.

बंद दरवाजे असल्याने अनर्थ टळला. 

सुदैवाने ही एसी लोकल असल्याने तिचे दरवाजे बंद होते, ज्यामुळे मोठा अनर्थ टळला; अन्यथा वेगातील गाडीतून प्रवासी खाली पडण्याची भीती होती.

१ कोटींचा ‘सुपर’ टीटीई! मुंबईच्या तिकीट तपासनीसाने बनवला रेल्वेचा नवा रेकॉर्ड.

   Follow us on        

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने चालू आर्थिक वर्षात कर्तव्याचा एक नवा मापदंड प्रस्थापित केला आहे. विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक (CTI) मोहम्मद शम्स यांनी विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध कडक मोहीम राबवत १ कोटी रुपयांहून अधिक दंड वसूल करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये या विक्रमी टप्प्यापर्यंत पोहोचणारे ते मुंबई विभागातील पहिले तिकीट तपासनीस ठरले असून, त्यांच्या या कामगिरीची रेल्वे वर्तुळात मोठी चर्चा होत आहे.

​मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मोहम्मद शम्स यांनी १ एप्रिल २०२५ ते १४ मार्च २०२६ या कालावधीत आपल्या नियमित तिकीट तपासणी मोहिमेदरम्यान ही कारवाई केली. या सुमारे साडे अकरा महिन्यांच्या काळात त्यांनी अत्यंत चोखपणे आपली जबाबदारी पार पाडत विनातिकीट प्रवास करणाऱ्या एकूण ११,४८३ प्रवाशांना पकडले. या मोहिमेतून त्यांनी रेल्वेच्या तिजोरीत एकूण १.०३ कोटी रुपये दंड स्वरूपात जमा केले आहेत, जो एका वैयक्तिक कर्मचाऱ्यासाठी अत्यंत मोठा आकडा मानला जातो.

​मोहम्मद शम्स यांच्या या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट कामगिरीची दखल खुद्द ‘डीआरएम मुंबई सीआर’ (DRM Mumbai CR) यांनी घेतली आहे. रेल्वे प्रशासनाने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या या यशाचा गौरव केला असून, त्यांना मिळालेला हा ‘मैलाचा दगड’ इतर कर्मचाऱ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त केला आहे. रेल्वेचा महसूल वाढवण्यासाठी आणि विनातिकीट प्रवासाला आळा घालण्यासाठी शम्स यांनी दाखवलेली तत्परता कौतुकास्पद असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

​रेल्वे प्रशासनाने या निमित्ताने प्रवाशांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की, त्यांनी रेल्वेने प्रवास करताना नेहमी वैध तिकीट किंवा पास सोबत ठेवावा. विनातिकीट प्रवास करणे हा केवळ दंडनीय अपराध नसून, त्यामुळे रेल्वेच्या साधनसामग्रीवर विनाकारण ताण पडतो. सन्मानाने आणि कायदेशीर मार्गाने प्रवास करून रेल्वेला सहकार्य करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.

लोकसभेत खासदार अरविंद सावंत यांचा रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज; कोकण रेल्वे दुहेरीकरणाची मागणी

   Follow us on        

नवी दिल्ली: लोकसभेत रेल्वे मंत्रालयाच्या २०२६-२७ च्या अनुदान मागण्यांवरील चर्चेदरम्यान शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी मुंबईसह महाराष्ट्रातील प्रलंबित रेल्वे प्रश्नांवर जोरदार आवाज उठवला. सरकार एकीकडे बुलेट ट्रेन आणि हाय-स्पीड कॉरिडॉरच्या योजना जाहीर करत असताना सामान्य रेल्वे प्रवाशांना मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे रेल्वे मंत्रालयाने तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.

भाषणात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राजसिंहासनावर बसलेला पुतळा उभारण्यास प्रशासनाने नकार दिल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली. केवडिया रेल्वे स्थानकावर सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला जाऊ शकतो, तर सीएसएमटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यास ‘नीती’चे कारण देऊन नकार का दिला जातो, असा सवाल करत प्रशासनाच्या दुटप्पी भूमिकेवर त्यांनी टीका केली.

तसेच मुंबईतील काही रेल्वे स्थानकांची ब्रिटीशकालीन नावे बदलण्याचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. निवडणुकीच्या काळात सँडहर्स्ट रोड, मरीन लाईन्स आणि चर्नी रोड या स्थानकांची नावे बदलल्याचे बॅनर लावण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात आजही ही नावे बदललेली नाहीत. याबाबत सरकार प्रत्यक्ष कृती कधी करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

याशिवाय मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाला भारतीय रेल्वेचे जनक नाना शंकरशेठ यांचे नाव देण्याची मागणी त्यांनी पुन्हा केली. तसेच मुंबईत मध्य आणि पश्चिम रेल्वेचे मुख्यालय असतानाही मुंबईकरांना अपेक्षित सुविधा मिळत नसल्याचे सांगत लोकल रेल्वेची वाढती गर्दी कमी करण्यासाठी ४ मार्गिकांचे ६ मार्गिकांमध्ये रूपांतर आणि ‘एलिव्हेटेड ट्रेन’ प्रकल्पावर गांभीर्याने विचार करण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण रेल्वेबाबतही त्यांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले. कोकण रेल्वे मार्गावर गाड्यांचा वारंवार होणारा विलंब आणि सणासुदीच्या काळात प्रवाशांना होणारा त्रास लक्षात घेता कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करावे आणि संपूर्ण मार्गाचे दुहेरीकरण करावे, अशी ठाम मागणी त्यांनी केली. कोकणच्या विकासासाठी बुलेट ट्रेनपेक्षा रेल्वे दुहेरीकरण अधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे पालघर जिल्ह्यातील सपाडे परिसरातील घरांना तडे गेल्याचा मुद्दाही त्यांनी लोकसभेत मांडला. टनलसाठी होणाऱ्या स्फोटांमुळे १०० ते १५० घरांना मोठ्या भेगा पडल्या असून कंत्राटदारांकडून मिळणारी मदत अपुरी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पासाठी जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला आणि त्यांच्या कुटुंबीयांना रेल्वेत नोकरी देण्याची मागणीही त्यांनी केली.

याशिवाय रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडेही त्यांनी लक्ष वेधले. मुंबईतील मोटरमन मोठ्या मानसिक तणावाखाली काम करत असून अनेक जण राजीनामे देत असल्याचे सांगत त्यांच्या केबिनमधील आवाजाची समस्या, कामाचे तास आणि कामाचा ताण कमी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. तसेच रेल्वे ट्रॅकची सुरक्षा राखणाऱ्या गँगमन आणि खलाशी यांच्या समस्यांकडेही सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, असे त्यांनी नमूद केले.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाने बनावट रेशन कार्ड; अज्ञातावर गुन्हा दाखल

   Follow us on        

छत्रपती संभाजीनगर: राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या कुटुंबाच्या नावाने बनावट पिवळे रेशन कार्ड तयार करण्यात आल्याचा एक खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट रेशन कार्डवर चक्क उपमुख्यमंत्र्यांचा फोटो, बनावट स्वाक्षऱ्या आणि शिक्क्यांचा वापर करण्यात आला असून, कार्डचा क्रमांक YP 348261 असा आहे. विशेष म्हणजे, हे कार्ड रमाई आवास योजना आणि इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठी वापरण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकारामुळे राज्याच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील त्रुटी आणि सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

​या गंभीर प्रकरणाची माहिती माजी खासदार इम्तियाज जलील यांनी एका पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी पुराव्यादाखल हे बनावट रेशन कार्ड आणि त्यासोबत जोडलेली इतर कागदपत्रे प्रसारमाध्यमांना दाखवली. १२ मार्च रोजी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इतक्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे तयार करण्याचे धाडस कोणी केले, याबाबत आता चर्चा रंगू लागली आहे.

​या प्रकरणी तक्रार प्राप्त होताच सिटी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे. सरकारी कागदपत्रांचा गैरवापर आणि फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस आता अधिक तपास करत आहेत. हे बनावट कार्ड नेमके कोणी आणि कुठे तयार केले, तसेच यामागे कोणते मोठे रॅकेट सक्रिय आहे का, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.

Konkan Railway: उन्हाळी सुट्ट्यांसाठी मुंबई ते मडगाव दरम्यान विशेष गाड्यांची घोषणा

   Follow us on        

मुंबई: उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, मध्य रेल्वेच्या समन्वयाने मुंबई आणि मडगाव दरम्यान विशेष साप्ताहिक गाड्या चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) आणि लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) येथून सुटणाऱ्या दोन प्रमुख विशेष गाड्यांचा समावेश आहे.

पहिली विशेष गाडी (ट्रेन क्र. ०११७१/०११७२) मुंबई CSMT ते मडगाव दरम्यान १६ एप्रिल ते ११ जून २०२६ या कालावधीत दर गुरुवारी धावेल. ही गाडी मुंबईहून मध्यरात्री ००:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाव येथून ही गाडी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:४५ वाजता मुंबईला पोहोचेल.

गाडीची रचना (Composition): एकूण २२ कोच – २ टियर एसी (१), ३ टियर एसी (६), स्लीपर (९), जनरल (४) आणि एसएलआर (२).

दुसरी विशेष गाडी (ट्रेन क्र. ०१११९/०११२०) लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते मडगाव दरम्यान १७ एप्रिल ते १२ जून २०२६ या कालावधीत दर शुक्रवारी धावेल. ही गाडी LTT वरून मध्यरात्री ००:५५ वाजता सुटेल आणि दुपारी १५:१५ वाजता मडगावला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मडगाववरून ही गाडी शुक्रवारी सायंकाळी १६:०० वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ०३:३० वाजता LTT ला पोहोचेल.

या गाडीला एकूण २१ आधुनिक LHB कोच जोडण्यात आले आहेत. गाडीची रचना (Composition): एकूण २१ एलएचबी कोच – फर्स्ट एसी (१), २ टियर एसी (३), ३ टियर एसी (७), स्लीपर (८) आणि जनरेटर कार (२).

दोन्ही गाड्यांचे सर्व थांबे खालीलप्रमाणे आहेत:

या विशेष गाड्या दादर (केवळ CSMT गाडीसाठी), ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमळी या स्थानकांवर थांबतील.

विशेष म्हणजे, ट्रेन क्र. ०११७२ आणि ०११२० साठीचे बुकिंग उद्या, १७ मार्च २०२६ पासून सर्व आरक्षण केंद्रांवर आणि IRCTC च्या संकेतस्थळावर सुरू होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी भाजपचे प्रमोद कामत; उपाध्यक्षपदी शिंदे सेनेचे दादा साईल यांची वर्णी

   Follow us on        

सिंधुदुर्गनगरी: गेल्या अनेक दिवसांपासून जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात उत्सुकता लागून राहिलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीचा तिढा अखेर सुटला आहे. अध्यक्षपदासाठी भाजपचे बांदा जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य प्रमोद कामत यांची, तर उपाध्यक्षपदासाठी शिंदे सेनेचे पावशी जिल्हा परिषद मतदार संघाचे सदस्य दादा साईल यांची निवड निश्चित झाली आहे. या दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी आज नामनिर्देशनपत्रे दाखल करण्यात आली असून, महायुतीच्या या दोन्ही उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

​निवडणूक प्रक्रियेनुसार, आज दुपारी ३.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून या निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे. या निवडीमुळे जिल्हा परिषदेवर भाजप आणि शिंदे सेनेच्या युतीचे वर्चस्व अधिक घट्ट झाले असून कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. जिल्ह्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी ही नवी कार्यकारिणी सज्ज झाली आहे.

Railway Updates: आता बूकिंग होणार सेकंदात! ४० वर्षांनंतर रेल्वे तिकीट बुकिंगसाठी येणार नवीन ‘सुपरफास्ट’ तंत्रज्ञान

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय रेल्वे आपल्या प्रवाशांना मोठा दिलासा देण्यासाठी तिकीट बुकिंगच्या ४० वर्षे जुन्या प्रणालीमध्ये आमूलाग्र बदल करत आहे. साधारण १,००० कोटी रुपये खर्चून तयार करण्यात आलेली ही नवीन रिझर्व्हेशन सिस्टीम (PRS) येत्या एप्रिल ते जून २०२६ दरम्यान कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. १९८५ पासून सुरू असलेले जुने सॉफ्टवेअर आता पूर्णपणे बदलले जाणार असून, त्या जागी आधुनिक ‘ओपन सोर्स’ तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. यामुळे तिकीट बुकिंगची क्षमता पाच पटीने वाढणार असून, सध्याच्या २५,००० प्रति मिनिटाऐवजी आता एका मिनिटात १.२५ लाख तिकिटे बुक करता येतील.

​या नवीन प्रणालीचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तत्काळ बुकिंगच्या वेळी येणाऱ्या तांत्रिक अडचणी आणि हँग होणारी वेबसाईट यापासून प्रवाशांची सुटका होईल. रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ‘गदर’ किंवा ‘स्पेसएक्स’ सारख्या बेकायदेशीर सॉफ्टवेअर आणि बॉट्सच्या माध्यमातून होणारी तिकीट चोरी रोखण्यासाठी या सिस्टीममध्ये कडक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत. याशिवाय, रेल्वेने ‘आधार’ आधारित प्रमाणीकरण अनिवार्य करण्याच्या दिशेने पावले उचलली असून, यामुळे बनावट युजर आयडी आणि दलालांच्या मक्तेदारीला लगाम बसेल.

​केवळ तिकीट बुकिंगचा वेगच नाही, तर रेल्वेने डिजिटल सुरक्षेसाठी ६०० कोटी रुपयांचे ‘इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑपरेशन्स सेंटर’ (IR-SOC) देखील उभारले आहे. हे केंद्र सायबर हल्ल्यांपासून रेल्वेच्या डेटाचे संरक्षण करेल. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेला हा बदल भारतीय रेल्वेला अधिक पारदर्शक आणि हायटेक बनवणारा ठरेल. वेटिंग लिस्टची समस्या कायमस्वरूपी संपवण्याच्या दृष्टीने हे पहिले महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

राहुरी व बारामती विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक जाहीर

   Follow us on        

मुंबई, दि. १५ : भारत निवडणूक आयोगाने देशातील सहा राज्यांतील आठ विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील राहुरी (जि. अहिल्यानगर) आणि बारामती (जि. पुणे) या दोन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी भानुदास कर्डिले आणि बारामती मतदारसंघाचे आमदार अजित अनंतराव पवार यांच्या निधनामुळे या जागा रिक्त झाल्या असून त्यासाठी ही पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.

निवडणूक आयोगाने या निवडणुकांसाठी आवश्यक कार्यक्रम जाहीर केला असून मतदानासाठी सर्व मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन (EVM) आणि व्हीव्हीपॅट (VVPAT) यांचा वापर करण्यात येणार आहे.

मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार फोटो ओळखपत्र (EPIC) हा मुख्य पुरावा असेल. याशिवाय आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट, बँक किंवा पोस्ट ऑफिस पासबुक, मनरेगा जॉब कार्ड, आरोग्य विमा स्मार्ट कार्ड आदी कागदपत्रेही ग्राह्य धरली जाणार आहेत.

दरम्यान, निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच राहुरी आणि बारामती मतदारसंघात आचारसंहिता तत्काळ लागू झाली आहे. तसेच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी प्रचार काळात तीन वेळा प्रसिद्ध करणे बंधनकारक असल्याचेही आयोगाने स्पष्ट केले आहे.

भारत निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार मतदान 23 एप्रिल 2026 रोजी होणार असून मतमोजणी 4 मे 2026 रोजी केली जाणार आहे.

जाहीर कार्यक्रमानुसार 30 मार्च 2026 (सोमवार) रोजी निवडणुकीसाठी राजपत्र अधिसूचना जारी केली जाईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल 2026 (सोमवार) निश्चित करण्यात आली आहे. दाखल झालेल्या अर्जांची छाननी 7 एप्रिल 2026 (मंगळवार) रोजी होणार आहे.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 9 एप्रिल 2026 (गुरुवार) आहे. त्यानंतर संबंधित मतदारसंघांमध्ये 23 एप्रिल 2026 (गुरुवार) रोजी मतदान पार पडेल.

मतदानानंतर 4 मे 2026 (सोमवार) रोजी मतमोजणी होऊन निकाल जाहीर केला जाईल. तर संपूर्ण निवडणूक प्रक्रिया 6 मे 2026 (बुधवार) पर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

या पोटनिवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने सर्व यंत्रणांना आवश्यक तयारी करण्याच्या सूचना दिल्या असून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

PNG गॅस ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय

   Follow us on        

नवी दिल्ली: केंद्र सरकारने देशातील इंधन पुरवठा साखळी अधिक मजबूत करण्यासाठी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या माध्यमातून LPG नियमावलीत महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. नव्या नियमांनुसार, ज्या ग्राहकांच्या घरात पाईप्ड नॅचरल गॅस (PNG) कनेक्शन कार्यान्वित आहे, त्यांना आता घरगुती LPG सिलिंडर वापरण्याची परवानगी नसेल. इंधनाचा तुटवडा रोखण्यासाठी आणि संसाधनांचे योग्य वाटप करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

ज्या ग्राहकांकडे सध्या PNG आणि LPG अशी दोन्ही कनेक्शन आहेत, त्यांना त्यांचे LPG कनेक्शन तात्काळ सरेंडर (परत) करावे लागेल. यापुढे अशा दुहेरी कनेक्शन असलेल्या ग्राहकांना गॅस कंपन्यांकडून LPG सिलिंडरचे रिफिल घेता येणार नाही. सरकारने स्पष्ट केले आहे की, एकदा अधिकृत गॅझेटमध्ये या नियमाची प्रसिद्धी झाली की, तेल कंपन्यांना अशा ग्राहकांचा सिलिंडर पुरवठा त्वरित बंद करावा लागेल.

हा बदल प्रामुख्याने ‘अत्यावश्यक वस्तू कायद्यांतर्गत’ (Essential Commodities Act) करण्यात आला आहे. सध्या पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यात येणारे अडथळे पाहता, सरकारने हा निर्णय घेतला आहे. ज्या भागात अजूनही पाईपलाईन पोहोचलेली नाही, अशा ग्रामीण आणि गरजू भागातील नागरिकांना LPG सिलिंडरचा सुरळीत पुरवठा व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.

सरकारने या नियमाची अंमलबजावणी कडक करण्याचे निर्देश दिले असून, वितरकांनाही अशा ग्राहकांची ओळख पटवून नवीन कनेक्शन न देण्याच्या सूचना दिल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता सरकारला सहकार्य करावे आणि इंधनाची बचत करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पेट्रोलियम मंत्रालयाकडून करण्यात आले आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search