Author Archives: Kokanai Digital

कोकणातील गणेशभक्तांना उद्यापासून टोलमाफी; इथे मिळणार पास

मुंबई :गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना पथकर (टोल) माफी देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी उद्यापासून होणार आहे. मुंबई – बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 आणि सार्वजनिक बांधकाम विभागांच्या इतर रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत 01 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे

अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशभक्तांना टोलमाफी देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आज दिनांक 15 सप्टेंबरला सार्वजनिक बांधकाम विभागानं शासन निर्णय काढला आहे. त्यानुसार उद्या 16 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर या कालावधीत गणेशभक्तांना पथकरातून सूट मिळेल.

असे मिळतील पास

टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव 2023′ , ‘कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास दिले जाणार आहेत. त्यावर वाहन क्रमांक, चालकाचं नाव असेल. हे पास गणेशभक्तांना पोलीस ठाण्यात, वाहतूक पोलीस चौकी व आरटीओ कार्यालयात मिळतील. संबंधित ठिकाणी हे पास पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावेत याची काळजी परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभागानं घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परतीच्या प्रवासासाठी देखील हाच पास ग्राह्य धरण्यात येईल.

पोलीस व परिवहन विभागानं गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना द्यावी, अशा सूचना सरकारनं केल्या आहेत.

Rain Alert: कोकणात शनिवारी व रविवारी मुसळधार पाऊस

Rain Alert : भारतीय हवामान खात्याने आज राज्यात पुढील पाच दिवसांचा हवामान अंदाज जाहीर केला आहे. पुढील चार दिवस म्हणजे दिनांक 15 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर या कालावधीत कोकणातील जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या दिनांक 15 सप्टेंबर रोजी संपूर्ण कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. मात्र 16 आणि 17 या तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 18 तारखेस कोकणातील जिल्ह्यांना ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे.

आजपासून चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात गावाला जायला सुरू झाले आहेत. मुसळधार पाऊस लागल्यास चाकरमान्यांची प्रवास करताना गैरसोय होऊ शकते. खासकरून मुंबई गोवा महामार्गाने जाणार्‍या गाड्यांना रस्त्यांच्या अपूर्ण कामामुळे प्रवास करणे त्रासदायक ठरू शकते.

आता आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटीचे आरक्षण शक्य होणार

मुंबई :आता भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून एसटी बसचे आरक्षण करता येणे शक्य होणार आहे. एसटीची सेवा रेल्वेच्या प्रवाशांना देखील सोयीची होईल यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या उपस्थितीमध्ये आज सामंजस्य करार करण्यात आला.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी यांच्या दरम्यान आरक्षण व्यवस्थापन प्रणालीसंदर्भात हा सामंजस्य करार करण्यात आला. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि रेल्वेच्या आयआरसीटीसी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या सामजंस्य करारावर सह्या केल्या. या करारामुळे आयआरसीटीसी च्या bus.irctc.co.in संकेतस्थळावरुन प्रवाशांना एसटीचे तिकीटदेखील आरक्षित करता येणार आहे.

सध्या आयआरसीटीसी च्या संकेतस्थळावरून रेल्वेसेवा, विमानसेवा आणि खाजगी बससेवांची तिकीट आरक्षणाची तसेच हॉटेल बूकिंगची सुविधा उपलब्ध होती. आता या निर्णयामुळे एसटीचे तिकीट प्रवाशांना येथून आरक्षित करता येणार आहे.

दिवा-सावंतवाडी एक्सप्रेसचा प्रवास गारेगार होणार; तात्पुरत्या स्वरूपात जोडले जाणार दोन ‘थ्री टायर एसी’ चे डबे

Kokan Railway News : गणेशोत्सवासाठी दिवा सावंतवाडी एक्सप्रेसने प्रवास करणार असाल तर  ही बातमी तुमच्यासाठी आहे. रेल्वे प्रशासनाने या गाडीच्या डब्यांच्या संरचनेत महिन्याभरासाठी बदल केला आहे. या गाडीला दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायरचे दोन डबे जोडले जाणार आहेत. या बदलामुळे या गाडीच्या जनरल डब्यांची संख्या 14 वरुन 12 होणार आहे.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या माहितीनुसार

1)गाडी क्रमांक 50108 मडगाव – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 10106 सावंतवाडी – दिवा एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 15 सप्टेंबर 2023 ते 14 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.

2)गाडी क्रमांक 10105 दिवा – सावंतवाडी आणि त्याच रेकसह पुढे जाणारी गाडी क्रमांक 50107 सावंतवाडी – मडगाव एक्सप्रेस या गाड्यांना दिनांक 16 सप्टेंबर 2023 ते 15 ऑक्टोबर 2023 अशा महिन्याभराच्या कालावधीसाठी तात्पुरत्या स्वरुपात दोन जनरल डब्यांच्या जागी इकॉनॉमी श्रेणीतील थ्री टायर एसीचे दोन डबे जोडले जाणार आहेत.

कोकण विकास समितीने कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या मडगाव -सावंतवाडी- दिवा एक्सप्रेसला किमान एक एसी डबा जोडण्यात यावा यासाठी कोकण रेल्वेकडे मागणी केली होती. या मागणीची रेल्वे प्रशासनाने दखल घेतली आहे.

 

Konkan Tourism | राजापूर तालुक्यातील कातळशिल्पे ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित

रत्नागिरी : कोकणच्या पर्यटनासंबंधी एक चांगली बातमी समोर आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात कशेळी गावच्या सडय़ावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.  या शिवाय आणखी ८ कातळशिल्पांना हा दर्जा देण्याची प्रक्रिया सुरु आहे.
रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार २०१८ साली रत्नागिरी जिल्हा पुरातत्व कार्यालयाने १८ कातळशिल्पांचे प्रस्ताव राज्य पुरातत्व विभागाला पाठवले होते. त्यातील १० कातळशिल्पांना संरक्षित स्मारक म्हणुन घोषित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. यापैकी कशेळीच्या कातळशिल्पाला संरक्षित स्मारकाचा मान सर्वप्रथम मिळाला आहे. अन्य ८ कातळशिल्पांबाबत अधिसूचना काढण्यात आल्या असून त्यावरील हरकती तपासल्यानंतर त्यांनाही लवकरच हा दर्जा मिळू शकेल. मार्च २०२२ मध्ये ‘युनेस्को’ने रत्नागिरीतील ७ व सिंधुदुर्गातील एका कातळशिल्पास जागतिक वारसा स्थळाच्या संभाव्य यादीत स्थान दिले आहे. उक्षी, जांभरुण, कशेळी, रूंढेतळी, देवीहसोळ, बारसू, देवाचे गोठणे आणि फणसमाळ येथील या कातळशिल्पांचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश होण्यासाठी संरक्षणाची जबाबदारी घेणे आवश्यक आहे. मात्र आता राज्य सरकारने यादीतून बारसूचे नाव वगळले आहे.
यादीतून बारसूचे नाव वगळले? 
बारसू गावच्या सडय़ावर अनेक कातळशिल्पे आहेत. मात्र येथे तेलशुद्धीकरण प्रकल्प प्रस्तावित आहे. संरक्षित स्मारक झाल्यास बांधकाम, खाणकाम करता येणार नाही. संरक्षक कठडे बांधावे लागेल व देखरेखीची जबाबदारी राज्य पुरातत्व विभागाकडे जाईल. बारसू तेल शुद्धीकरण प्रकल्पाचा विकास ‘एमआयडीसी’ करत आहे. भूसंपादनात कातळशिल्पे वगळय़ात येणार असून त्यांचे जतन सीएसआर फंडातून (सामाजिक उत्तरदारयीत्व निधी) करण्यात येईल, अशी माहिती उद्योग विभागातील सूत्रांनी दिली. त्यामुळेच पुरातत्व खात्याने प्रस्ताव पाठवूनही बारसूच्या कातळशिल्पांचे नाव मंत्रालय स्तरावर वगळण्यात आल्याची सांगितले जाते.

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांच्या सोयीसाठी दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारले जाणार

Mumbai Goa Highway :दिनांक १५ सप्टेंबर पूर्वी मुंबई गोवा महामार्गाच्या सिंगल लेनवरून वाहतूक खुली करण्यात येईल असे आज मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी कशेडी बोगदा उद्घाटन आणि वृक्षारोपण प्रसंगी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र

मुंबई-गोवा महामार्गाच्या सिंगल लेनचे ९०% काम पूर्ण झाले आहे. सध्या काँक्रिटीकरणाच्या या कामातील महत्त्वाचा क्युरिंग पिरियड सुरु आहे.तो येत्या दोन दिवसांत पूर्ण करून वाहतुक सुरू करून देण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या आणि विशेषतः वाहन चालकांच्या सोयीसाठी महामार्गावर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून दर १५ किमी अंतरावर नागरी सुविधा केंद्र उभारण्यात आले आहेत. याठिकाणी चहा-पाण्याची व्यवस्था, शौचालय सुविधा, पोलीस मदत कक्ष, वाहनचालकांसाठी आराम कक्ष अशा अत्यावश्यक सोयी-सुविधा पुरवण्यात येत आहेत असे ते म्हणालेत.

कशेडी बोगद्यामुळे वेळेची बचत होणार.

कशेडी बोगदा वाहतुकीसाठी खुला झाला आहे. हा बोगदा एकूण दोन किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग नऊ किलोमीटरचा आहे. अशा या बोगद्यामुळे पोलादपूर ते कशेडी हे अंतर अवघ्या १० ते १५ मिनिटांत कापता येणार आहे. त्यामुळे वाहनाने जाणाऱ्या प्रवाशांचा जवळपास ४५ मिनिटांचा वेळ वाचणार आहे. यामुळे गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या कोकणवासीयांचा प्रवास सुखाचा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

 

मालवण: माकडामुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालक ठार

मालवण : चालत्या रिक्षात माकडाने उडी घेतल्याने चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटून झालेल्या अपघातात रिक्षाचालक जागीच ठार झाल्याची घटना मालवण येथे घडली आहे. या जयराम ऊर्फ बाबजी दिगंबर मसूरकर (वय ५५, रा. खैदा कोळंब) असे त्या रिक्षाचालकाचे नाव आहे.

ही काल सकाळी साडेअकराच्या सुमारास मसूरकर रिक्षा (एमएच ०७ एएच १८६०) घेऊन मालवणहून आडारी मार्गे खैदाच्या दिशेने जात होते. चढावाच्या रस्त्यावर मसूरकर यांची रिक्षा पोहोचली. यावेळी बाजूच्या झाडीतून आलेल्या माकडांच्या कळपातील एकाने मसूरकर यांच्या रिक्षामध्ये उडी घेतली.यामुळे मसूरकर यांचे नियंत्रण सुटून रिक्षा उलटली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने मसूरकर जागीच ठार झाले.

पोलिस उपनिरीक्षक शिवराज झांजुर्णे, हवालदार हेमंत पेडणेकर यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. घटना समजताच येथील रिक्षा चालकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली. मसूरकर यांच्या मागे पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

गणेशोत्सवासाठी ‘टोल माफी’ आहे कि नाही? शासन निर्णय जाहीर न झाल्याने संभ्रम

मुंबई : गणेश चतुर्थी सण अगदी काही दिवसांवर आला आहे. पुढील एक दोन दिवसांनंतर चाकरमानी गावी जायला लागतील. मात्र अजूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणेशोत्सवासाठी केलेल्या टोल माफीच्या घोषणेबाबत  अधिकृत शासन निर्णय (जी.आर)  जाहीर करण्यात आला नसल्याने ही टोल माफी नक्की देण्यात येणार कि नाही याबाबत प्रवाशांत संभ्रम निर्माण झाला आहे.
मुंबई गोवा महामार्गाचे काम अजून पूर्ण नाही झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवा दरम्यान मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे कोल्हापूर मार्गे कोकणात जाण्यासाठी टोल माफीची घोषणा अलीकडेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र या घोषणेचा अधिकृत शासन निर्णय (जी.आर) अजूनही प्रसिद्ध झाला नसल्याने ही टोलमाफी आहे की नाही याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. पुढील एक दोन दिवसांत चाकरमानी गावी जाण्यास सुरवात करतील. जर टोल माफ होणार असेल तर तसे स्टिकर आणि पास मिळवण्यात त्याची यामुळे मोठी दगदग होणार असल्याने शासनाने याबाबत लवकर निर्णय जाहीर करावा अशी मागणी होत आहे.

कशेडी बोगद्यातील एक मार्गिका आजपासून हलक्या वाहनांसाठी सुरु

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एक चांगली  बातमी आहे.   मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटात तयार करण्यात आलेल्या बोगद्यातील एक मार्गिका आज सोमवार पासून हलक्या वाहनांसाठी सुरू करण्यात आली आहे. 
कशेडी घाटातील अवघड वळणाचा त्रास कमी करण्यासाठी बोगदा तयार करण्यात आला आहे. या बोगद्याची लांबी १.७१ किलोमीटर इतकी आहे. गेली तीन वर्षे या बोगद्याचे काम सुरू आहे. गणेशोत्सवापूर्वी या बोगद्यातील एक मार्गिका सुरू करण्याचे आश्वासन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला होते. त्यानुसार सोमवारपासून एक मार्गिका हलक्या वाहनांसाठी खुली करण्यात आली आहे. या मार्गिकेमुळे वेळेतही  बचत होणार आहे.    

Konkan Railway: चाकरमान्यांसाठी खुशखबर; ‘या’ गणपती विशेष गाड्यांना अतिरिक्त डबे जोडले जाणार

Konkan Railway News :गणेश चतुर्थी सण जवळ येत आहे; चाकरमान्यांची गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मध्य रेल्वे आणि पाश्चिम रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावर अतिरिक्त गाड्या सोडून प्रवाशांची सोय केली आहे. तरीही या फेर्‍या अपुऱ्या पडताना दिसत आहेत. या कारणास्तव या मार्गावर गणेशोत्सवासाठी चालविण्यात येणार्‍या काही विशेष गाड्यांच्या डब्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे. 

खालील गाड्या अतिरिक्त डब्यांसहित चालविण्यात येणार आहेत. 

1)01155/01156 दिवा-चिपळूण मेमू विशेष गाडी – एकूण 36 फेऱ्या  (अप आणि डाऊन) 

ही गाडी एकूण 8 डब्यांसह चालविण्यात येणार होती तिचे 4 डबे वाढविले असून ही गाडी आता 12 डब्यांसहित चालविण्यात येणार आहे. 

2) 01165/01166 मुंबई आणि मंगळुरू जंक्शन विशेष सेवा – एकूण 16 फेर्‍या  (अप आणि डाऊन) 

ही गाडी एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहेत. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे. 

3) 01167/01168 एलटीटी – कुडाळ विशेष सेवा – एकूण 24 फेर्‍या  (अप आणि डाऊन) 

ही गाडी सुद्धा एकूण 20 डब्यांसहित चालविण्यात येणार होती. मात्र या गाडीला दोन अतिरिक्त स्लीपर कोच जोडण्यात येणार आहे. त्यामुळे या गाडीच्या डब्यांची संख्या 22 होणार आहे.

या अतिरिक्त डब्यांमुळे प्रतीक्षा यादीत आरक्षण असणार्‍या प्रवाशांचा फायदा होणार आहे. प्रवाशांनी याची नोंद घेऊन या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे 

कोकण विकास समितीच्या मागणीला यश

दिवा-चिपळूण, दिवा-रत्नागिरी या मेमू गाड्यांच्या डब्यांची संख्या 16 करावी अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वेकडे केली होती. त्यांची मागणी अंशतः का होईना, ती मान्य करून रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिलासा दिला आहे.

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search