Author Archives: Kokanai Digital

आता वाळू ऑनलाईन मागविता येणार | प्रति ब्रास ६०० रुपये दर | सरकारचे नवीन वाळू धोरण उद्यापासून अंमलात येणार

मुंबई – उद्या दिनांक १ मेपासून महाराष्ट्र सरकार नवीन वाळू धोरण अंमलात आणणार आहे. नागरिकांना स्वस्त दरानं वाळू (रेती) मिळावी आणि अवैध वाळू उपशाला आळा बसावा, या उद्देशानं महाराष्ट्र सरकारनं नवीन वाळू धोरण जाहीर केलं आहे.
या नवीन धोरणानुसार बांधकामासाठी वाळू हवी असल्यास वाळूची मागणी ऑनलाईन नोंदवता येणार आहे. सर्वसामान्य नागरिकांना 600 रुपये प्रती ब्रास किंवा 133 रुपये प्रती मेट्रिक टन इतक्या दरानं वाळू मिळणार आहे. वाळू वाहतुकीचा खर्च मात्र नागरिकांना करावा लागणार आहे.
महाराष्ट्र सरकारच्या आधीच्या वाळू धोरणानुसार, राज्यात वाळू घाटाचे लिलाव होत असत. पण, हे लिलाव वेळेवर होत नसल्यानं राज्यात वाळूचा तुटवडा निर्माण व्हायचा. दुसरीकडे बांधकामं मात्र थांबलेली नसायची. यामुळे राज्यात वाळूची मागणी जास्त आणि पुरवठा कमी, अशी स्थिती निर्माण व्हायची. परिणामी नागरिकांना मोठ्या दरानं वाळू खरेदी करावी लागायची. आता मात्र नवीन वाळू धोरणानुसार, वाळू घाटाचे लिलाव बंद होणार आहेत.
नवीन धोरणानुसार, वाळूच्या उत्खननासाठी राज्य सरकारकडून आधी नदीपात्रातील वाळूचे गट निश्चित केले जातील.या वाळू गटातून वाळूचं उत्खनन केलं जाईल. मग ही उत्खनन केलेली वाळू शासनाच्याच तालुका स्तरावरील वाळू डेपोमध्ये साठवली जाईल आणि तिथूनच तिची विक्री करण्यात येईल. नदीपात्रातील वाळूचा गट निश्चित केल्यानंतर त्यातून वाळूचं उत्खनन आणि वाहतूक यासाठी संबंधित गावाच्या ग्रामसभेची शिफारस अनिवार्य राहिल. वाळूचं उत्खनन, उत्खनन केलेल्या वाळूची डेपोपर्यंत वाहतूक, वाळू डेपोची निर्मिती आणि व्यवस्थापन यासाठी राज्य सरकारकडून निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल.
नवीन धोरणानुसार वाळू मागणीची  प्रक्रिया 
ज्या ग्राहकांना वाळू हवीय, त्यांना महाखनिज https://mahakhanij.maharashtra.gov.in/ या पोर्टलवर वाळू खरेदीच्या मागणीची नोंद करणं आवश्यक राहिल. ज्यांना हे शक्य नाही, त्यांना सेतू केंद्रामार्फत ही मागणी नोंद करावी लागेल. यासाठी लागणारं शुल्क जिल्हाधिकारी ठरवतील.एका कुटुंबास एका वेळी जास्तीत जास्त 50 मेट्रिक टन वाळू मिळेल. अधिक वाळू हवी असल्यास वाळू मिळाल्याच्या दिनांकापासून 1 महिन्यानंतर वाळूची मागणी करता येईल.वाळूची मागणी नोंदवल्यानंतर 15 दिवसांच्या आत वाळू डेपोमधून वाळू घेऊन जाणे ग्राहकास बंधनकारक असेल. वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकास करावा लागेल. वाळू डेपोतून वाळू विक्रीसाठी ग्राहकाचा आधार क्रमांक अनिवार्य राहिल.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग | परशुराम घाटातील कठीण कातळ फोडण्याचे कंत्राटदारापुढे आव्हान

NH-66 Updates: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी दिवसातील पाच तास वाहतूक बंद ठेवली आहे. पण घाटाच्या मध्यभागी असलेल्या कठीण कातळांना फोडण्याचे मोठे आव्हान कंत्राटदारापुढे उभे राहिले आहे. 
कातळ फोडण्याचे काम २४ तास ब्रेकरच्या साहाय्याने सुरू आहे; परंतु अतिशय कठिण असलेले हे कातळ फुटता फुटत नाही  आहेत. या ठिकाणी २२ मिटरहून अधिक उंच दरडीचा भाग असल्याने व तेथे कठीण कातळ लागल्याने कामाचा वेग कमी झाला आहे. त्यामुळे  तेथे तात्पुरत्या स्थितीत बायपास तयार करण्याचे नियोजन ठेकेदार कंपनीकडून केले गेले.  
कातळ फोडण्यासाठी सुरूंग लावण्याची मागणी करण्यात आली होती; परंतु जवळच लोकवस्ती असल्याने परवानगी मिळालेली नाही. परिणामी, हे कातळ फोडण्यासाठी जास्त कालावधी लागणार आहे.

गोव्यात भारतीय बनावटीचे मद्य आणि बिअरचे दर वाढणार

गोवा वार्ता : अबकारी खात्याने भारतीय बनावटीचे मद्य आणि बियरवरील उत्पादन शुल्क, इतर फी आणि लेबल रेकॉर्डिंग फीमधील बदल अधिसूचित केले आहेत. त्यात भारतीय बनावटीचे मद्य, विदेशी मद्य आणि बियरच्या कमाल किरकोळ किमती निश्चित केल्या आहेत. त्यामुळे 750 मिलीपेक्षा कमी क्षमतेच्या बॉटलवरील शुल्क वाढण्याची शक्यता आहे.

कमाल किरकोळ किंमत व्हॅल्यूमची गणना करण्याच्या हेतूने भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी दारू, वाईन आणि इतर देशी दारू उत्पादन शुल्क आणि लेबल रेकॉर्डिंग 60 मिली, 90 मिली, 180 मिली, 375 मिली यांचे शुल्क 750 मिलीप्रमाणे समतुल्य असेल.

भारतीय बनावटीचे विदेशी मद्य, विदेशी मद्य, 200 मिली, 250 मिली, आणि 275 मिली यांचे 275 मिलीच्या सममूल्य असेल. 325 मिली, 330 मिली, 500 मिली आणि 650 मिलीपेक्षा जास्त बियरचे मूल्य शुल्क 650 मिलीप्रमाणे आकारले जाईल.

 

एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल त्याला विरोध करायलाच हवा- अजित पवार, विरोधी पक्षनेते

मुंबई – बारसू रिफायनरी प्रकल्पाला स्थानिकांचा होणारा विरोध हा तीव्र वळण घेत आहे. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. विकासाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विरोध असण्याचे कारण नाही मात्र विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही याची खबरदारी आपण घ्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.

बारसू रिफायनरी प्रकल्पाला होणाऱ्या विरोधाविषयी मंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. एखाद्या प्रकल्पातून परिसरात कायमचे नुकसान होणार असेल किंवा भावी पिढी बरबाद होणार असेल तर जरूर त्या गोष्टीला विरोध करायला हवा परंतु त्यातून फायदा होणार असेल तर त्या दृष्टीकोनातूनही विचार केला पाहिजे, असे अजितदादा म्हणाले.

प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहराबाहेरून?

सावंतवाडी – प्रस्तावित संकेश्वर-बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार कि नाही याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे झाले आहे. माजी आमदार शिवराम दळवी यांनी लिहिलेल्या एका पत्राला सावंतवाडी नगरपरिषदेने दिलेल्या उत्तरामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
दोन वर्षांपूर्वी सावंतवाडी मतदार संघाचे माजी आमदार शिवराम दळवी यांनी सावंतवाडी नगरपरिषदेला एक पत्र लिहिले होते. या पत्रात संकेश्वर बांदा राष्ट्रीय महामार्ग सावंतवाडी शहरातील ज्या रिंग रोड मधून जाणार होता त्या रिंग रोड बाबत काय ठराव झाला याबाबत प्रश्न विचारला होता. मात्र नगरपरिषद मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांनी याबाबत कोणताही ठराव झाला नाही असे उत्तर दिले आहे. त्यामुळे हा महामार्ग सावंतवाडी शहरातून जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह उभे झाले आहे.
संकेश्‍वर ते बांदा हा नवा महामार्ग होऊ घातला आहे. हा महामार्ग चौपदरी असुन जवळपास दोन हजार कोटी रुपये यावर खर्च करण्यात येणार आहे. या महामार्गाचा सर्व्हे पूर्ण झाला असून जवळ जवळ 45 ते 60 मिटर रुंदीचा व 108 मीटर लांबीचा हा मार्ग असणार आहे. केंद्र शासनाच्या भारतमाला आणि सागरामाला या दोन्ही योजनेमध्ये या महामार्गाला स्थान मिळाल्याने याचे काम तातडीने सुरू होणार आहे. मात्र हा मार्ग सावंतवाडी शहरातून जाणार, की बावळाटमार्गे बांद्याला जोडणार? हा नवा पेच निर्माण झाला होता .  बावळाटमार्गे बांदा, असा मार्ग झाल्यास 10 किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. शिवाय तांत्रिक अडचणीही कमी होतील. त्यामुळे बावळाटमार्गेच हा मार्ग नेण्याच्या हालचाली चालू होत्या. मात्र विरोध झाल्याने केंद्राने हा मार्ग आंबोली – माडखोल – सावंतवाडी – इन्सुलि मार्गे जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. हा मार्ग सावंतवाडी शहरात रिंग रोड मार्गे जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र दोन ते तीन वर्षे उलटली तरी सावंतवाडी नगरपरिषदेत याबाबत साधा ठराव पास झाला नसल्याने पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग या शहराच्या बाहेरून जातो. रेल्वेमार्ग सुमारे आठ किलोमीटर दूर अंतरावरून नेण्यात आला आहे. येथे विकासासाठी पूर्ण वाव असुनही सावंतवाडी शहर विकासाच्या दृष्टीने मागे पडत आहे. त्यामुळे निदान प्रस्तावित संकेश्वर-बांदा मार्ग सावंतवाडी शहरातूनच जावा अशी मोठ्या प्रमाणावर मागणी करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेमार्गावर ”मधु दंडवते” प्रवासी गाडी सुरु करावी; प्रवासी संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सावंतवाडी : कोकण रेल्वेमार्गावर वसई-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करून त्याचे नामकरण ”मधु दंडवते” करण्यात यावे अशी मागणी वसई सावंतवाडी कोकण रेल्वे प्रवासी संघटना-मुंबई यांनी महाराष्ट्रा चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
वसई नायगाव नालासोपारा विरार ते डहाणू रोड या भागात  कोकणातील चाकरमानी मोठ्या प्रमाणात आहेत. या विभागातील लोकांना कोकण रेल्वेसाठी दादर किंवा सीएसएमटी स्टेशनला जावे लागते व खूप त्रासही सहन करावा लागतो. कोकण रेल्वे मार्गावर उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या जलदगतीच्या रेल्वेगाड्या बऱ्याच आहेत. पण या गाड्या कोकणातील काही मोजक्याच स्थानकावर थांबतात. तसेच आरक्षण कोटाही कमी असल्याने त्याचा फायदा येथील कोकणवासीयांना होत नाही.. म्हणून फक्त कोकणवासीयांसाठी वसई ते सावंतवाडी पर्यंत कोकण रेल्वेचे शिल्पकार प्रा. मधु दंडवते यांच्या नावाने ही स्लो पॅसेंजर रेल्वे सुरू करावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या या मागणीची रेल्वे बोर्डाकडे शिफारस करावी अशी विनंती एकनाथ शिंदे यांना करण्यात आली आहे.
ही मागणी पश्चिम रेल्वे व कोकण रेल्वेकडे मागील काही वर्षापासून केली जात आहे. वसई हे टर्मिनल नसल्याने ह्या रेल्वेची पुर्तता पश्चिम रेल्वेच्या बांद्रा, मुंबई सेंट्रल किंवा अहमदाबाद टर्मिनल वरून करावी. वसईरोड स्टेशनला काही बोगी आरक्षित असाव्यात,तसेच ही रेल्वे नेहमीसाठी व पनवेल ते सावंतवाडी दरम्याने सर्व स्थानकांवर थांबणारी स्लो रेल्वे असावी जेणेकरून कोकणातील सर्व प्रवाशांना याचा फायदा होईल. मागील ५ वर्षे वसई वलसाड किंवा अहमदाबाद वरून सावंतवाडीपर्यंत पॅसेंजर मागत आहोत ती मिळत नाही,
ही अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे अशी खंत संघटनेनं व्यक्त केली आहे. तरी कोकण रेल्वे, पश्चिम रेल्वे, मध्य रेल्वे व लोकप्रतिनिधी यांनी या मागणीचा सहानुभूतीपुर्वक विचार करावा व ह्या रेल्वेची पुर्तता करण्यासाठी लवकरात लवकर रेल्वे बोर्डाकडे याची मागणी करावी अशी विनंती अध्यक्ष शांताराम नाईक, सेक्रेटरी यशवंत जडयार यांनी मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
गाडीला मधु दंडवते यांचे नाव 
 कोकण रेल्वे प्रत्यक्षात आणण्याचे श्रेय मधु दंडवते यांच्याकडे जाते. त्यामुळेच त्यांच्या नावाने एखादी रेल्वे एक्सप्रेस चालू करावी असा पाठपुरावा चालू आहे. ही नवीन गाडी चालू करून त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा गौरव होईल यासाठी प्रयत्न चालू आहेत. 

श्रीलंकेच्या पिन्नावाला अभयारण्यासारखे कोकणात उभारले जाणार हत्तींसाठी अभयारण्य; शिंदे सरकारचे एका दगडात दोन पक्षी….

दोडामार्ग – कोकणात हत्तींच्या उपद्रवापासून शेतकऱ्यांना होणारा त्रास टाळण्यासाठी सरकारने एक नवीन कल्पना अमलात आणण्याचे ठरवले आहे. सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर आणि सांगली जिल्हा सीमेवर हत्तींचे अभयारण्य उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे. ही कल्पना वास्तवात आणल्यास हे अभयारण्य देशातील केरळ मधील कुट्टूर आणि उत्तरप्रदेश येथील हत्ती संवर्धन केंद्रानंतर हत्तीं साठी तिसरा उपक्रम ठरणार आहे..

श्रीलंकेतील पिन्नावाला अभयारण्याच्या धर्तीवर महाराष्ट्राच्या कोकणी मातीत आणि सह्याद्रीच्या कुशीत जंगली हत्तीना हक्काचं घर देण्याचं काम राज्य सरकारच्या माध्यमातून होणार आहे. या अभयारण्या मूळे एक नाही तर दोन फायदे होणार आहेत. शेतकर्‍यांना हत्तींच्या उपद्रवापासून मुक्ती मिळणार आहे. दुसरे म्हणजे या अभयारण्यामूळे कोकणातील पर्यटनास हातभार लागणार आहे. 

श्रीलंकेतील पिन्नावाला हत्ती अभयारण्य

श्रीलंकेत १९७५ साली Department of Wildlife Conservation अंतर्गत ‘The Pinnawala Elephant Orphanage’ ची स्थापना झाली. हत्तींना नीट खाद्य मिळावं, त्यांची काळजी घेतली जावी यासाठी हा हत्तींचा अनाथाश्रम उभारला गेला. त्यासाठी नदीकाठी २५ एकर जमीन राखीव ठेवण्यात आली. जवळपास १०० हून अधिक हत्ती तिथे राहतात. तिथे हत्तींचे प्रजनन (breeding) देखील केले जाते. अभयारण्याच्या स्थापनेपासून २०१५ पर्यंत ७० नव्या हत्तींचा जन्म झाला. काहींना जंगलात सोडलं तर काहींना खासगी मालकांकडे. परंतु त्यांची नीट काळजी घेतली जाते की नाही याचं tracking एकदम काटेकोरपणे ते करतात. म्हणजेच काय तर असलेले हत्ती वाचवले, जगवले, वाढवले आणि एक ‘रोल मॉडेल’ तयार झाले! जगातील सर्वात जास्त हत्ती एका ठिकाणी असलेलं हे पिन्नावाला गाव. असं क्वचितच होतं की पर्यटक श्रीलंकेला जातात आणि तिथे जात नाही. पर्यटक हमखास तिथे भेट देतातच. आणि तेही तिकिट काढून भेट देतात. आपल्याला हत्तींना अंघोळ घालता येते. त्यांना जेवण देता येतं. त्यावर मनसोक्त फिरता येतं. आणि या सगळ्यासाठी थोडे बहुत पैसे घेतले जातात. त्या पैशातून तेथील देखभाल केली जाते. पर्यावरण जपत, प्राण्यांची काळजी घेत एक अगळं वेगळं पर्यटन ‘रोल मॉडेल’ श्रीलंकेने उभं केलंय.

बारसू रिफायनरी पाठोपाठ आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातही येणार एक मोठा प्रकल्प

संग्रहित छायाचित्र

सिंधुदुर्ग – बारसू रिफायनरी विरोधात स्थानिक लोक रस्त्यावर उतरले आहेत. रिफायनरी मुळे कोकणाचा विकास नाही तर विनाश होणार आहे असे त्यांचे म्हणणे आहे. सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात न घेता कोकणात नको असलेले प्रकल्प त्यांच्यावर लादले जात आहेत अशी सरकारवर टीका होत आहे.

बारसू रिफायनरीचा वाद चालू असताना रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर एका नव्या प्रकल्पाला सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी १२,५०० एकर भूसंपादन करणे आवश्यक आहे. उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे. त्यासाठी मेरिटाईम बोर्ड, एमआयडीसी आणि कंपनी प्रतिनिधी यांची स्वतंत्र बैठक घेऊन जमीन, शिल्लक जमीन आणि भूसंपादन प्रक्रिया ठरवण्यात येणार आहे. 

अर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील इंडिया लि. ही स्टील निर्मितीमधील प्रमुख आंतरराष्ट्रीय कंपनी असून कंपनीची महाराष्ट्रात हजारो कोटींची गुंतवणूक आहे. स्टील निर्मिती आणि प्रक्रिया, पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी कंपनी आणखी 80 हजार कोटी रूपयांची गुंतवणूक करण्यास इच्छुक आहे. यासाठी पाच हजार एकर जमीन बंदराजवळ, रस्ते, रेल्वेचे जाळे तयार असलेल्या ठिकाणी हवी असल्याची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली होती. त्यासाठी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सीमा परिसरात सुमारे एक हजार एकर जमीन प्राथमिक टप्प्यात देण्यास तत्वत: मान्यता दिली आहे.

 

   

 

Block "ad1" not found

मडगाव-हापा-मडगाव एक्सप्रेसला तात्पुरत्या स्वरूपात अतिरिक्त कोच

संग्रहित फोटो

Konkan Railway News – सुट्टीच्या हंगामात कोकण रेल्वे मार्गावरील गर्दी वाढल्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या  हापा – मडगाव एक्सप्रेस गाडीला तात्पुरत्या स्वरूपात डबा वाढवण्यात आला आहे. 

हापा ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या 22908 Hapa – Madgaon Express या गाडीला दि. 26 एप्रिल रोजीच्या फेरीसाठी तर परतीच्या फेरीसाठी 22907 Madgaon Jn. – Hapa Express या गाडीला दिनांक 28 एप्रिल 2023 रोजी स्लीपर श्रेणीचा एक डबा अतिरिक्त जोडण्यात येणार आहे.

 

मुंबई गोवा महामार्गावर कर्नाळा खिंडीत शिवशाही बसला अपघात; १ ठार, २२ जखमी.

Mumbai Goa Highway News :महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील पनवेल आगारातून महाडला जात असलेली MH 09 EM 9282 या क्रमांकाची एसी शिवशाही बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटली. हा अपघात आज दुपारी कर्नाळा खिंडीत झाला. अपघातात 1 प्रवासी ठार तर 22 प्रवासी जखमी झाले आहेत. अपघातावेळी बसमध्ये 30 ते 35 प्रवासी होते.

या अपघाताची माहिती मिळताच वाहतुक पोलीस आणि पनवेल तालुका पोलिस घटनास्थळी दाखल झाले. अपघातात जखमी झालेल्या 22 जणांना जवळच्या पनवेल उपजिल्हा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. अपघातात ठार झालेल्या प्रवाशाची ओळख अजून पटली नाही आहे. 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search