Author Archives: Kokanai Digital

गुंगीचे औषध देऊन रत्नागिरी रेल्वे स्थानकावर एका प्रवाशाला लुटले

रत्नागिरी – कोकण रेल्वेमार्गावर प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाला शितपेयातून गुंगीचे औषध देऊन त्याची लूट करण्याचा प्रकार रत्नागिरी स्थानकावर घडला आहे. याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
ही घटना शुक्रवारी दिनांक ०७ एप्रिल रोजी घडली होती. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्री ही गाडी रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे थांबली असता दोन अनोळखी प्रवाशांनी ओळख वाढवून  या प्रवाशाला शितपेय पिण्यास दिले. या शीतपेयांमध्ये गुंगीचे औषध मिसळले होते. त्यामुळे त्या प्रवाशालागुंगी आली. याचा फायदा घेऊन चोरट्यांनी त्यांच्या पाकिटातील रोख रक्कम व गळ्यातील सोन्याची चेन पळवली. याप्रकरणी प्रवाशाने ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. अधिक तपास ग्रामीण पोलिस अंमलदार करत आहेत. ग्रामीण पोलिसांनी संशयित आरोपींविरोधात भादवि कलम ३२८,३६९ आणि ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील वेत्ये येथे खाजगी बसला अपघात; चालकासह क्लिनर जखमी

सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर वेत्ये येथे काळ शुक्रवारी एक च्या सुमारास  एका खाजगी बस ला अपघात झाला. बस चालकाचा गाडीवरील ताबा सुटून गाडी रस्ता सोडून रस्त्यालगत असलेल्या खाईत कोसळल्यामुळे झालेल्या अपघातातझालेल्या अपघातात चालकासह क्लिनर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांच्यासह स्थानिक  ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी अपघातग्रस्तांना मदतकार्य केले. संबंधित बस गोवा ते मुंबई असा प्रवास करीत होती. अपघातात जखमी झालेल्या चालक व क्लीनरला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथील कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात गाडी थेट रस्त्याच्या बाजूला असलेल्या खाईत घसरल्यामुळे बसचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

सोन्याच्या शुद्धतेबद्दल साशंक? बीआयएसच्या ‘या’ मोबाईल ऍप्लिकेशनवर शुद्धता तपासा

Gold Purity Test – आपण विकत घेतलेल्या सोन्याच्या शुद्धतेबाबत कायमच आपल्या मनामध्ये एक शंका असते. यावर उपाय म्हणून ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्ड म्हणजेच बीआयएस ने एक स्मार्टफोन ऍप्लिकेशन डेव्हलप केलेले आहे.

या ॲपचं नाव बीआयएस केअर ॲप असे असून त्या ॲपद्वारे हॉलमार्क सर्टिफाइड गोल्ड आणि सिल्वर ज्वेलरी च्या शुद्धतेबाबत खात्री पटवता येते.बीआयएस ही भारतातील स्टॅंडर्ड बनवणारी एक राष्ट्रीय संस्था आहे.

बीआयएस केअर ॲप कसे डाउनलोड करावे?

अँड्रॉइड फोनचा वापर करणाऱ्यांनी प्ले स्टोअर मध्ये जाऊन बीआयएस केअर ॲप असे सर्च करावे आणि ते ॲप इन्स्टॉल करावे

ॲप इन्स्टॉल केल्यानंतर त्यामध्ये आपले नाव फोन नंबर आणि ईमेल आयडी एंटर करावा.

ओटीपीचा वापर करून आपला फोन नंबर आणि ईमेल आयडी कन्फर्म करावा.या ॲपचा वापर करून तुम्ही सोन्याच्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत चाचणी करू शकता. या ॲपमध्ये व्हेरिफाय HUID नावाचे फीचर आहे. तुम्ही विकत घेतलेले सोन्याचे दागिने जर हॉलमार्क सहित असतील तर तुम्ही व्हेरिफाय HUID वापर करू शकता. 

HUID नंबर म्हणजे काय? 

एक जुलै 2021 रोजी भारत सरकारने सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंगचे सिम्बॉल बदलले. या नियमानुसार सोन्याच्या दागिन्यांवर तीन सिम्बॉल असतील.

1. ब्युरो ऑफ इंडियन स्टॅंडर्डचा हॉलमार्क

2. सोन्याची प्युरीटी ग्रेड

3. सहा आकडी अल्फा न्यूमेरिक HUID नंबर

HUID नंबर हा इंग्रजी अक्षरे आणि अंक यांच्यापासून बनलेला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे हॉलमार्किंग करताना दागिन्याच्या प्रत्येक तुकड्याला HUID नंबर दिला जातो. हा नंबर युनिक असतो. ज्वेलरीवर हा नंबर स्टॅम्प केलेला असतो.

31 मार्च 2023 नंतर  सहा आकडी हॉलमार्क युनिक आयडेंटिफिकेशन नंबर म्हणजेच HUID शिवाय कुठल्याही प्रकारचे सोन्याचे दागिने विकण्यास बीआयएसने मनाई केली आहे.

जर तुम्हाला आपण खरेदी केलेल्या दागिन्यांच्या शुद्धतेबाबत, हॉलमार्कबाबत काही तक्रार असेल तर ती तुम्ही या ॲपचा वापर करून दाखल करू शकता.

 

कोंकण रेल्वे मार्गावर रविवारी धावणार एकमार्गी विशेष गाडी

Konkan Railway News: दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी कोंकण रेल्वे मार्गावर कासरगोड ते निजामुद्दीन दरम्यान एक एकमार्गी स्पेशल One Way गाडी चालविण्यात येणार आहे. .

 कसारगोड  निजामुद्दीन स्पेशल (06007) ही वनवे  गाडी दिनांक 23 एप्रिल रोजी सायंकाळी 17:05 वाजता सुटेल आणि दिल्लीला हजरत निजामुद्दीन स्थानकावर ती तिसऱ्या दिवशी सायंकाळी 18:00 वाजता पोहोचेल.

या गाडीचे मडगाव स्थानकापासून थांबे
मडगाव करमाळी थिवी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, संगमेश्वर,सावर्डे, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा,पनवेल, कल्याण नाशिक मार्गे इटारसी, मथुरा

डब्यांची संरचना

एसएलआर – 02  + सेकंड सीटिंग – 10 + स्लीपर – 10 + थ्री टायर एसी – 01 असे मिळून एकूण 23 डबे

केरळमध्ये रेल्वेचा ब्लॉक; कोकण रेल्वेच्या ‘या’ गाड्यांवर परिणाम

संग्रहित फोटो

Konkan Railway News | दक्षिणेकडील केरळ राज्यातील करुकुट्टी – चालाकुडी या रेल्वेस्थानकां दरम्यान  दिनांक २७ एप्रिल रोजी  एक दिवसीय ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉक चा परिणाम कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या गाड्यांवर होणार आहे.

कोकण रेल्वेने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धिपत्रकानुसार खालील गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत.

12202 – कोचुवेली – एलटीटी एक्सप्रेस ही गाडी दिनांक २७/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.
12201 – एलटीटी – कोचुवेली एक्सप्रेस ही गाडी दिनांक २८/०४/२०२३ रोजी पूर्ण रद्द करण्यात आली आहे.

तर गाडी क्रमांक 20923 तिरुनवेल्ली गांधीधाम एक्सप्रेस दिनांक २७/०४/२०२४ रोजी पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असून तिच्या दक्षिणेकडील राज्यातील स्थानकांच्या थांब्यामध्ये बदल करण्यात आला आहे, कोकणातील स्थानकांच्या थांब्यामध्ये काही बदल केला गेला नाही आहे.

प्रवाशांनी याची नोंद घेऊन आपल्या प्रवासाच्या योजनेत बदल करावा असे आवाहन रेल्वे प्रशासनतर्फे करण्यात आले आहे.

Block "ad1" not found

मुंबई-गोवा महामार्गावरील सोनवी पुलावर सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात

रत्नागिरी – मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्गावरील संगमेश्वर येथील सोनवी पुलावर काल गुरुवारी  सुझुकी आणि क्रेटा गाडीमध्ये अपघात होऊन गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातामुळे दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी  निर्माण झालेली होती. हा अपघात गुरुवार सकाळी 10:50 च्या दरम्यान घडला आहे.पुलावर अपघात घडल्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने गाड्या बाजूला करून वाहतूक हळूहळू सुरू झालेली आहे. 
सोनवी पूल हा अरुंद असल्याने अनेक वेळा या ठिकाणी वाहतूक कोंडी कों होते. काही दिवसापूर्वी
या पुलाचे काम सुरू करण्यासाठी रस्ता करण्यात आला मात्र त्यानंतर या पुलाचे काम रखडले आहे. गुरुवारी सकाळच्या दरम्याने मुंबईहून वांद्री च्या दिशेने जाणारे क्रेटा गाडी आणि रत्नागिरी हुन डेरवणला च्या दिशेने जाणारी गाडी या गाड्यांमध्ये अपघात होऊन गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाळू आणि खनिज वाहतूकीवर वेळेची मर्यादा.

सिंधुदुर्ग – जिल्‍ह्यातील व जिल्‍ह्याबाहेरील सर्व वाळू/रेती अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांमधून चालकांनी आज २१ एप्रिलपासून सकाळी ६ ते रात्री १० पर्यंतच वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करावी, असे निर्देश देतानाच नियमांचे उल्लंघन झाल्यास सक्त कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी काल के. मंजूलक्ष्मी यांनी दिले आहेत. 

जिल्‍हयातील वाळू/रेती व अन्‍य गौण खनिजाच्‍या वाहतुकीवेळी झालेल्‍या अपघातांमुळे काही ना‍गरिकांना आपला जीव गमवावा लागला. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्‍हाधिकाऱ्यांच्या अध्‍यक्षतेखाली गौण खनिजाच्‍या अवैध उत्‍खनन व वाहतुकीवर आळा घालण्‍यासाठी जिल्‍हास्‍तरीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.या बैठकीत या वाहतुकीवर काही मर्यादा घालण्यात आल्या आहेत.

पोलीस अधिक्षक सौरभ अग्रवाल, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकुमार काळे, अपर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, सदस्‍य सचिव जिल्‍हा खनिकर्म अधिकारी अजित पाटील, निवासी उपजिल्‍हाधिकारी मच्छिंद्र सुकटे आदीसह उपविभागीय अधिकारी (महसूल) सावंतवाडी व कणकवली हे अधिकारी उपस्थित होते.

बेजबाबदारपणे, अतिजलदगतीने, मद्यप्राशन करुन, अनियंत्रितपणे वाळू/रेती तसेच अन्‍य गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर व वाहन चालकांवर सक्‍त कारवाई करण्‍याच्‍या सूचना सर्व संबंधित यंत्रणांना दिल्या.

अखेर कंत्राटदाराच्या मागणीची सरकारकडून दखल; परशुराम घाट ‘या’ कालावधी दरम्यान वाहतुकीस बंद

 

रत्नागिरी | दि.२० एप्रिल २०२३ |मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटात डोंगर कटाईचे काम विना अडथळा आणि जलद गतीने करता यावे यासाठी कंत्राटदार कंपनीने हा घाट वाहतुकीस बंद ठेवण्यात यावा अशी मागणी केली होती. या मागणीची सरकारकडून दखल घेतली गेली आहे.

या घाटातील वाहतूक 25 एप्रिल ते 10 मे दरम्यान दुपारी 12 ते 5 पर्यंत वाहतुकीस राहणार बंद राहणार आहे. घाटातील अवघड काम करण्यासाठी परशुराम घाटातील वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात परशुराम घाट बंद असला तरी या मार्गावरील वाहतूक लोटे-चिरणी आंबडस मार्गे वळवण्यात येणार आहे.तसेच डोंगर कटाई करताना मोठे दगड रस्त्यावर येऊन अपधात होऊ नये या साठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.


महामार्ग चौपदरीकरणात चिपळूण टप्प्यातील परशुराम घाट अत्यंत अवघड टप्पा आहे. वाहतुक सुरू ठेवून खोदकाम करण्यास अडचणी होत्या त्यासाठी खेड हद्दीतील ठेकेदार कल्याण टोलवेजने परशुराम घाटातील १२ ते सायंकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याची मागणी केली होती. तसा अहवाल राष्ट्रीय महामार्ग विभाग पेणकडून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आला होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना अभिप्राय देण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार त्यांना तो अहवाल देण्यात आला होता. अखेर जिल्हाधिकारी यांनी घाट सादर कालावधीत घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

 

Block "ad1" not found

कोविडचे कारण पुढे करून ‘मराठी’ भाषेचा बळी – मनसेचा शासन निर्णयावर आक्षेप.

मुंबई – राज्य शासनाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी ह्या विषयाचे मूल्यांकन एकत्रित मूल्यांकनामध्ये धरू नये आणि त्यांना केवळ श्रेणी द्यावी असा निर्णय काल महाराष्ट्र शासनानं जाहीर केला. हा निर्णय चूकीचा आहे आणि शासनानं तो मागे घ्यावा. 

वास्तविक शासनानं १ जून २०२० म्हणजे सुमारे तीन वर्षांपूर्वी राज्यातील सर्व म्हणजे सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन आणि अध्ययन सक्तीचे केले होते. हे एक चांगले पाऊल होते. शासनानं तोच स्वत:चा निर्णय आता फिरवला आहे. 

हा निर्णय फिरवताना शासन म्हणतंय की हा निर्णय कोविडच्या महामारीच्या काळात आला असल्याने शाळा नियमीत चालू नव्हत्या. म्हणून मराठी भाषा शिकण्यासाठी अडचणी आल्या. पण प्रश्न असा पडतो की, शाळा सुरू नव्हत्या तर मराठीच कशाला इतरही शिक्षण अडचणीचं झालं होतं. मग मराठीचाच का वेगळा विचार? 

हे खरं आहे की मराठी विषय काही शाळांमध्ये नवीन होता परंतु त्याची अंमलबजावणी करण्यासाठी त्या त्या शाळांना तीन वर्ष होती. मग ह्या तीन वर्षात त्या शाळांना मराठी शिकवण्याची व्यवस्था का उभी करता आली नाही? तीन वर्ष काही कमी नाहीत, मग तरीही मराठी शिकवण्याबाबत ह्या शाळांचा निरूत्साह का? असेल तर ह्या निरूत्साहावर शासन काय करत आहे?

शासन निर्णयात असं म्हटलं आहे की “मराठी विषयाच्या अध्ययनामध्ये आणि पर्यायाने संपादणूकीमध्ये विद्यार्थ्यांना अडचणी आलेल्या आहेत असे दिसून येते”. शासन हे कशाच्या आधारावर म्हणत आहे? त्याचा काही अहवाल आहे का? 

आज एप्रिल महिना आहे. शाळा सुरू व्हायला अजून अडीच महिने आहेत. मराठी शिकवण्याच्या दृष्टीनं विशेष प्रयत्न करायला आणि व्यवस्था सिध्द करायला पुरेसा वेळ आहे. शासनानं हा निर्णय मागे घ्यावा आणि शाळांना पुढील अडीच महिन्यात तयारी करायला सांगावी. 

राज्यात इतर परीक्षा मंडळाच्या शाळांत मराठीविषयी एक प्रकारची अनास्था आहे. म्हणून त्यांच्याकडून शासनावर दबाव येत असणार. कदाचित पालकांचीही मराठी बाबत अनास्था असणार. परंतु ह्यावर मात करून महाराष्ट्रातील शाळांमध्ये मराठी शिकवली जावीच ह्यासाठी शासन ठाम असावं. महाराष्ट्रात रहातात त्यांनी मराठी शिकावं, स्थानिक भाषा आणि संस्कृतीचा आदर राखावा ह्या आग्रहात काहीच गैर नाही. 

मराठी भाषेचा सन्मान राखणे, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे आणि मराठीचा प्रसार करणे ह्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबध्द असलं पाहिजे. किंबहुना जेंव्हा भाषावार प्रांतरचना झाली तेंव्हा महाराष्ट्र सरकारवर आलेली, राज्यघटनेनं दिलेली ही एक महत्वाची जबाबदारी आहे. 

महाराष्ट्र शासनानं स्वतः:ची ही जबाबदारी पार पाडावी आणि नवा मराठीविरोधी आदेश त्वरित मागे घ्यावा. 

अनिल शिदोरे

नेते आणि प्रवक्ते – महाराष्ट्र नवनिर्माण सेना 

 

मुंबई-गोवा महामार्गावर राजापुर येथे आराम बस आणि कार समोरासमोर धडकली; सहा प्रवासी गंभीर जखमी…

रत्नागिरी – काल बुधवारी सायंकाळी 6.30 च्या दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर कोदवली येथे कोदवली उपकेंद्र नजीक खाजगी आराम बस आणि कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन एक भीषण अपघात घडला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत.

गोव्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या खासगी आराम बसला मुंबईकडून गोवा दिशेकडे जाणारा खाजगी कारचालक समोरून जोरदार धडकला त्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात कारमधील सहा जण गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर राजापूर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून अधिक उपचारासाठी त्यांना रत्नागिरी पाठवण्यात आले आहे.

या अपघातात जखमी झालेल्यांमध्ये योगेश ज्ञानदेव मुंडे, साहिल स्वप्नील मुंडे, स्वप्निल राजू मुंडे , साक्षी योगेश मुंडे, अर्चना स्वप्नील मुंडे, कृष्णा गणेश दराडे रा. जालना यांचा समावेश आहे. या अपघाताचे वृत्त कळतात अनेक स्थानिकानी अपघात स्थळी धाव घेतली व जखमीना तातडीने राजापूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. या रुग्णांवर राजापूर ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहित मीना डॉ. लक्ष्मण शर्मा डॉ. मोनिका व उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीने उपचार केले. 

या सर्व रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना अधिक उपचारासाठी रत्नागिरी हलविण्यात आले आहे या अपघाताचे वृत्त कळतात पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे

 

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search