Author Archives: Kokanai Digital

मालवण पुतळा दुर्घटना: महाराजांचा पुतळा कोसळण्याची कारणे कोणती?

   Follow us on        

सिंधुदुर्ग: मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा २८ फुटी पुतळा कोसळण्याची घटना काल घडली आणि संपूर्ण महाराष्ट्रातून याबाबत संताप व्यक्त केला गेला. पुतळा उभारणीत हलगर्जीपणा झाला असून हा पुतळा कोसळण्याच्या कारणांचा शोध घेण्यासाठी नौदलाने एक पथक नेमले आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला झालेल्या नुकसानीबाबत नौदलाने सांगितले की, “राज्य सरकार आणि तज्ञांसह, नौदलाने या अपघाताच्या कारणाचा शोध घेण्यासाठी एक पथक नियुक्त केले आहे.” लवकरच हे पथक या घटने मागची कारणे शोधून आपला अहवाल सादर करेल. मात्र त्याआधी पुतळा कोसळण्यामागची कोणते कारणे असू शकतात, कोणते आरोप होत आहेत ते पाहू.

निकृष्ट दर्जाचे काम?
राज्य सरकारने योग्य ती काळजी न घेतल्याने ही पडझड होण्यास राज्य सरकार जबाबदार आहे. सरकारने कामाच्या दर्जाकडे फारसे लक्ष दिले नाही. केवळ कार्यक्रम आयोजित करण्यावर भर दिला. अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे  शिवसेनेचे (यूबीटी) आमदार वैभव नाईक यांनीही कामाच्या निकृष्ट दर्जाबाबत राज्य सरकारवर टीका केली आहे.

लोखंडी अँगल अर्धवट?
पुतळ्याच्या चौथऱ्यासाठी १५ फूट खोलीचे लोखंडी अँगल टाकून पक्के बांधकाम करण्यात आले होते. त्यावर पुतळ्याचे पार्ट जोडण्यात आले. जमिनीतून उभारण्यात आलेले अँगल पुतळ्याच्या छातीपर्यंत उभारले असते तर पुतळा कोसळून पडला नसता, असे मत स्थानिक बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त होत आहे.

पुतळा निर्मितीसाठी खूप कमी कालावधी?
उद्घाटन करण्यासाठी घाई केल्यानेच पुतळा कोसळला, अशी टीका माजी खासदार संभाजीराजे यांनी केली आहे. या पुतळ्याचे अनावरण झाल्यानंतर या पुतळ्याच्या निर्मितीस खूपच कमी कालावधी भेटला असे या पुतळ्याचे शिल्पकार जयदीप आपटे हे म्हणाले होते. अशा प्रकारच्या भव्य पुतळ्याच्या निर्मितीसाठी किमान ३ वर्षे लागतात मात्र आपण हा पुतळा अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण केला असल्याचे ते म्हणाले होते.

अपूर्ण अभ्यास?
या घटनेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले मागील २ दिवस ताशी ४५ किमी वेगाचा वारा होता. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे पुतळ्याचं नुकसान झालं होते . तर पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांनी येथील खाऱ्या हवेमुळे पुतळ्याच्या नट बोल्ड्सना गंज पकडली असे विधान केले आहे. कोणतेही बांधकाम करताना तेथील भौगोलिक परिस्थितीचा पूर्ण अभ्यास करून त्याप्रमाणे बांधकामात बदल करणे अपेक्षित आहे. मात्र हा पुतळा उभारताना हा अभ्यास झाला नसल्याचे दिसून आले आहे.

सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्टला नौदलाला पाठविले होते पत्र

महाराजांच्या पुतळ्याचे जॉईंट करण्यासाठी ज्या नट-बोल्टचा वापर केला होता ते आता पाऊस आणि खारे वारे यामुळे गंजले असल्याने पुतळा विद्रूप दिसत आहे. तेव्हा संबंधित शिल्पकारांना सांगून कायमस्वरुपी उपाययोजना तत्काळ कराव्यात, असे पत्र मालवणमधील सार्वजनिक बांधकाम उपविभागाने २० ऑगस्ट रोजी नौदलाचे विभागीय सुरक्षा अधिकारी कमांडर अभिषेक कारभारी यांना पत्र पाठवून पुतळ्याबाबत तत्काळ उपाययोजना करण्यास कळविले होते. मात्र या पत्राची दखल का घेतली नाही याबाबत नौदलाकडून काही उत्तर आले नाही आहे.

 

 

Loading

संतापजनक: मालवणात उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अवघ्या ९ महिन्यात कोसळला; शिवप्रेमी संतप्त

   Follow us on        
मालवण, दि. २६ ऑगस्ट : ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची अपमानास्पद आणि चीड आणणारी घटना आज सकाळी मालवणात घडली आहे. मालवण राजकोट किनारी उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा कोसळल्याची दुर्दैवी घटना आज, सोमवारी दुपारी घडली. छत्रपतींचा पुतळा कोसळल्यामुळे येथील शिवप्रेमी संतप्त झाले असून निकृष्ट बांधकामामुळे हा पुतळा पडला असल्याचा आरोप केला आहे.
अवघ्या ९ महिन्यांत पुतळा कोसळला 
४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाच्या निमित्ताने मोठा गाजावाजा करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.  राजकोट येथे शिवपुतळा परिसराच्या सुशोभिकरणासाठी आणि इतर व्यवस्थेसाठी कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली यांच्या कार्यालयाकडून सुमारे पाच कोटी रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली होती. राज्य शासन आणि नौदल विभागाने निश्चित केल्या नंतरच राजकोट येथील जागेवर पुतळा उभारणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सुमारे ४३ फूट उंच होता. जमिनी पासून बांधकाम १५ फूट तर त्यावर २८ फूट उंच हा पुतळा उभारण्यात आला होता.
शिवप्रेमी संतप्त
ज्या महाराजांचा त्यांनी केलेल्या मजबूत किल्ल्यांच्या बांधकामांची उदाहरणे देवून गौरव केला जातो त्यांचाच पुतळा अवघ्या काही महिन्यांत कोसळण्याची घटना अपमानास्पद आणि आणि चीड आणणारी असल्याची भावना शिवप्रेमींनी व्यक्त केली आहे. हे बांधकाम बेजबाबदारपणे करण्यात आले असून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Loading

कोकण रेल्वेभरती : नेहमीप्रमाणे कोरेने प्रकल्पग्रस्तांना दिल्या वाटाण्याच्या अक्षता- कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समिती

   Follow us on        
रत्नागिरी: कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विविध श्रेणीच्या पदांसाठी अधिसूचना क्र. CO/P-R/01/2024 दिनांक 16/08/2024 रोजी जाहीर झालेली झाली आहे. अधिसूचनेनुसार दिनांक 16/09/2024 पासून ऑनलाईन अर्ज करायचे आहेत व अर्ज करण्याची शेवटची तारीख 06/10/2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत आहे. परंतु सदरच्या अधिसूचनेचे अवलोकन करता एकिकडे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना प्रथम प्राधान्य देऊ असे आवाहन केले जाते आणि दुसरीकडे प्रकल्पग्रस्तेतर उमेदवार याना अर्ज करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. याचाच अर्थ कोकण रेल्वे भरती अधिकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. त्यामुळे कोकण रेल्वेच्या नियुक्ती प्रक्रियेसंबंधी प्रकल्पग्रस्तांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे आणि कोकण रेल्वे प्रशासनावरचा अविश्वास दृढ झाला आहे अशी प्रतिक्रिया कृती समितीचे अध्यक्ष श्री. संतोष चव्हाण, कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम, सचीव श्री. अमोल सावंत आणि सहसचीव श्री. प्रभाकर हातणकर यांनी व्यक्त केली आहे.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या जमिनी या सन 1989-90 मध्ये कवडीमोल भावाने म्हणजेच रु. 150/- प्रति गुंठा या भावाने विकत घेतल्या गेल्या आहेत. आता त्या जमिनीची सदर किंमत प्रति गुंठा दहा लाख रुपये आहे. त्या वेळेला तेव्हाचे अर्थमंत्री माननीय मधु दंडवते साहेब व रेल्वेमंत्री जॉर्ज फर्नांडिस साहेब यांनी जेव्हा कोकण रेल्वे प्रकल्पास मंजूरी देऊन स्वतंत्र कोकण रेल्वे महामंडळ स्थापन केले तेव्हा ज्या भुमिपुत्रानी कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांना प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस विनाअट कोकण रेल्वेमध्ये नोकरीत घेतली जाईल अशी घोषणा केली होती व तसे त्यांचे स्वप्नही होते. परंतु आजतागायत तसे झालेले नाही. सदर पॉलिसी 1996 पर्यंत लागू होती. परंतु त्यानंतर आलेले व्यवस्थापकीय संचालक भानुप्रकाश तायल यांनी सदर पॉलिसी संबंधित भरती अधिकाऱ्यांनी त्यांच्या सहमतीने काढून टाकली. ह्याचाच अर्थ परप्रांतीय अधिकाऱ्यांमुळेच आजतागायत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होत आहे हे स्पष्ट होत आहे.
कोकण रेल्वेमध्ये नोकरीसाठी फक्त प्रकल्पग्रस्तांचाच विचार करणेसाठी आम्ही अनेक वर्षांपासून वेळोवेळी पत्रव्यवहार, समक्ष भेटीत कोकण रेल्वे च्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी चर्चाही केली आहे. त्याही पेक्षा दिनांक 27/02/2024 रोजी आम्ही आमच्या मागण्यांसंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा करणेसाठी संयुक्त बैठक लावणेबाबत कळविले होते. परंतु ह्यावर कोकण रेल्वेकडून कृती समितीकडे कोणताच पत्रव्यवहार वा चर्चा झालेली नाही. ही बाब दुर्देवाची आहे अशी खंत कृती समितीच्या पदाधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे.
सदर भरती प्रक्रियेसाठी कोकण रेल्वेचे अधिकृत नियुक्ती मंडळ आहे ते संपूर्णतः भ्रष्टाचाराने माखलेले आहे. तसेच जमीन घोटाळ्यामध्ये, नोकरभरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचाराच्या आरोपाने माखलेले आहे. तरी सदर भरती प्रक्रियेसाठी नेमलेले मंडळ बरखास्त करून नवीन नेमण्यात यावे आणि त्यावर कोकण भूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीचा एक सदस्य त्या मंडळावर नेमावा अशी आम्ही पूर्वीपासून मागणी करीत आलो आहोत. त्यानंतरच भरती प्रक्रिया राबवावी. सदर भरती प्रक्रिया ही भ्रष्टाचाराने झालेली आहे आणि ती पूर्वीच्या भरती मंडळाच्या आपल्या अधिकाऱ्यांनी केलेली आहे. याचे सबळ पुरावे माहितीच्या अधिकाराखाली कोकणभूमी प्रकल्पग्रस्त कृती समितीकडे आहेत. त्याचप्रमाणे हे पुरावे आपल्या मुख्य कार्यालयातील तत्कालिन मुख्य व्यवस्थापकीय संचालक श्री. संजय गुप्ता साहेब तसेच मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर यांचेसमोर सादर केले असता त्यांनी मान्यही केले होते. तसेच सदर भरती प्रक्रियेमध्ये शंभर टक्के प्रकल्पग्रस्तांना सामावून घेतले पाहिजे यासंदर्भात कोकणचे जेष्ठ नेते आणि मा. खासदार श्री नारायण राणे साहेब यांनाही कल्पना देण्यात आली आहे. तरी याबाबत त्वरीत कार्यवाही करावी अन्यथा कोकण भूमी प्रकल्पग्रस्त शेतकरी रेल्वे ट्रॅक वरती आंदोलनात उतरेल व त्याच्या परिणामाला जबाबदार म्हणून व्यवस्थापकीय संचालक या नात्याने आपण असाल. तरी असा प्रकार होऊ नये याची आपण पूर्णतः दखल घ्याल अशी आम्हाला अपेक्षा आहे. असे कृती समितीच्या वतीने कोकण रेल्वे व्यवस्थापनाला लवकरच कळविण्यात येत आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे गाड्या भारताच्या उत्तरेच्या टोकाकडून दक्षिणेकडे धावत आहेत आणि हजारो किलोमिटरचे अंतर कमी झाल्याने अनेक भारतीयांचा वेळ आणि पैसा वाचतो आहे. हे श्रेय नक्कीच कोकण रेल्वेचे उद्गाते कै. मा. मधु दंडवते साहेब आणि जॉर्ज फर्नांडिस साहेबांना द्यायला हवे. ह्या महान द्वयींचे एक मोठे स्वप्न होते की कोकण रेल्वेसाठी संपादित करण्यात येणाऱ्या जमीनीच्या मालकांना कोकण रेल्वेमध्ये नोकरी देण्याचे. काही अंशी कोकण रेल्वेने ते पाळले मात्र आज आमचे तिन्ही जिल्ह्यातील अनेक प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये आपल्याला नोकरी मिळेल ह्या आशेवर जगत आहेत. ही वाट पहाता पहाता त्यांची वयेही उलटून गेली आहेत.
आजवर अनेक प्रकल्पगग्रस्त शिक्षित, उच्चशिक्षित, तांत्रिक परीक्षा उत्तीर्ण झालेले असतानाही बऱ्याच जणांना काही ना काही क्षुल्लक कारणाने डावलून अन्य आसामींना नोकरीत सामावून घेतले आहे. ह्याबाबाबत आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी अनेक बाबी पुराव्यानिशी स्पष्ट केलेल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेण्याबाबत, त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना ग्रुप ‘डी’ व तत्सम पदांसाठी परीक्षा न घेता प्रकल्पग्रस्त उमेदवाराची शैक्षणिक पात्रता आणि शारिरिक चाचणी यांचेवर आधारित प्रतिक्षा यादी तयार करून त्याप्रमाणे नोकरीत सामावून घेण्याबाबत आम्ही वारंवार अर्ज विनंत्या तसेच मा. मुख्य कार्मिक अधिकारी यांचेशी समक्ष चर्चाही केल्या आहेत.
कोकणातील जनसामान्यांमध्ये तसेच प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबामध्ये कोकण रेल्वे भरती प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
• ज्या भुमिपुत्रांनी कवडीमोल भावाने कोकण रेल्वेसाठी जमीनी दिल्या त्या भुमिपुत्रांना, गोरगरीब प्रकल्पग्रस्तांना कोकण रेल्वे मध्ये नोकरी का देऊ शकत नाही. फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच अधिसूचना काढण्यात येत नाही? प्रकल्पग्रस्तांमध्ये पात्र मुले असताना देखील त्यांना क्षुल्लक कारणांनी डावलले जात आहे. प्रकल्पग्रस्त मुलांची पात्र यादी कोकण रेल्वेला देऊन देखील पदभरती किंवा कंत्राटी भरती यात प्रथम प्राधान्य एक ते दोन टक्के आहे.
• कोकण रेल्वे मध्ये निघालेल्या भरती मध्ये प्रथम प्राधान्य हे प्रकल्पग्रस्त उमेदवारांना देणार असे म्हटले असले तरी प्रत्यक्ष तसे होताना दिसत नाही. ही प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवली जात नाहीये. त्रयस्थ कंपनीला नोकरभरतीचे कंत्राट देऊन ही प्रक्रिया राबवली जाते. पण प्रत्यकक्षात भरतीमध्ये प्रकल्पग्रस्त दिसत नाहीत.
• याही पुढे जाऊन जे कंत्राटदार कोकण रेल्वेने नियुक्त केले आहेत.ते देखील प्रकल्पग्रस्त मुलांना डावलून पर जिल्हयातील मुले भरत आहेत.
कोकण रेल्वेच्या जमीनी कवडीमोलाने अधिग्रहित करुन आज सुमारे 36 वर्षे झाली तरी आज कोकण रेल्वेच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरीत सामावून घेतलेले नाही ही शोकांतिका आहे. आम्ही कोकण रेल्वेचे प्रकल्पग्रस्त कोकण रेल्वेमध्ये नोकरीत सामावून न घेतल्याने वैफल्यग्रस्त झालो आहोत. कोकण रेल्वेमुळे आज सुमारे 4500 प्रकल्पग्रस्तेतर कर्मचारी व त्यांची कुटुंबे जगतायत परंतु आमचेवर मात्र अन्याय होतोच अशी आम्हा प्रकल्पग्रस्तांची मानसिकता झाली आहे. त्याचप्रमाणे प्रकल्पग्रस्तांसमोर नोकऱ्यात सामावून न घेतल्यामुळे असूयेपोटी अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. अशी प्रतिक्रिया कोकण रेल्वेच्या अनेक भुमिपुत्रांकडून होत आहे. त्याचप्रमाणे आम्हा प्रकल्पग्रस्तांनी कोकण रेल्वेला जमिनी दिल्या परंतु आज आमची घरे जमीनदोस्त होऊन बेघर झालो आहोत. बेरोजगारीमुळे त्रस्त झालो आहोत. आम्हा प्रकल्पग्रस्तांना काही क्षुल्लक कारणाने डावलल्याने नियुक्तीअभावी वय वाढत चालले आहे. त्यामुळे नोकरी आवेदनासाठी वयाची मर्यादा 45 वर्षे करणेसाठी आम्ही वारंवार कोकण रेल्वेकडे विनंती करीत आलो आहोत. मात्र कोकण रेल्वे  ह्यासाठी रेल्वे बोर्डाची मंजूरी आवश्यक असल्याचे कारण सांगून हेतुपुरस्सर नाकारत आहे. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. अशाही प्रतिक्रिया को. रे. प्रकल्पगग्रस्तांमधून व्यक्त करण्यात येत आहेत.
एकंदीत कोकण रेल्वे भरती प्रक्रिया अधिकाऱ्यांकडून कोकण रेल्वेच्या भुमिपुत्रांना दुजाभाव देऊन निव्वळ आपल्याच अधिकारातील उमेदवारांना प्राधान्य देण्याच्या दृष्टिने आटोकाट प्रयत्न करण्यात येत आहेत हे स्पष्ट होत आहे. त्यामुळे कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने कृती समितीमार्फत सदरहू अधिसूचना रद्द करुन ती फक्त प्रकल्पग्रस्तांसाठीच असावी ह्याबाबत कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांच्या वतीने खालीलप्रमाणे मागण्या करण्यात येणार आहेत :
1. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची कोणतीही परीक्षा न घेता ग्रुप डी व ग्रुप सी साठी योग्य असे  प्रशिक्षण (ट्रेनिंग) देऊन  त्यांना कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त म्हणून या पदांवरती नियुक्ती करावी.
2. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांनी ह्यापूर्वी परीक्षा दिल्या होत्या परंतु अनेक उमेदवारांना कागदपत्रांच्या छाननीमध्ये व इतर किरकोळ कारणाने डावलण्यात आलेले आहे, कागदपत्रे मुदतीत सादर करुनही नोकरीत सामावून घेण्यात आलेले नव्हते व अनेक उमेदवारांच्या फिजिकल, मेडिकल उत्तीर्ण झालेले आहेत परंतु प्रतिक्षायादीत समाविष्ट आहेत अशा उमेदवारांची नियुक्ती त्वरित करावी. तसेच अधिसूचना 5/2018 डी ग्रुपसाठी परीक्षा दिलेल्या उमेदवारांना तीस ते पन्नास सेकंदासाठी अनुत्तीर्ण केलेल्यांना त्वरित घ्यावे. (ह्या संदर्भात कोकण रेल्वे मुख्य कार्यालयात अनेक वेळा चर्चा केलेली आहे).
3. कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांची वयोमर्यादा वय वर्ष 45 एवढी करण्यात यावी. (अनेक प्रकल्पग्रस्त उमेदवारांनी ह्यापूर्वी ग्रुप-डी व ग्रुप-सी परीक्षा उत्तीर्ण झाले होते. परंतु कागदपत्र पूर्ततेमध्ये क्षुल्लक कारणावरून सदरहू उमेदवारांना डावलण्यात आले होते. गेल्या पाच वर्षात अशा पदांची भरती न झाल्याने ह्या उमेदवारांची निर्धारित वयोमर्यादा ओलांडण्याची शक्यता आहे. ह्याचा विचार करुन फक्त प्रकल्पग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेचा निकष ठेवून तो 45 वर्षे ठेवावा).
4. प्रकल्पग्रस्तांच्या कागदपत्रांच्या छाननी करताना 12/2 च्या नोटीसीमागे एक उमेदवार अशी नियुक्ती करण्यात यावी.
5. यापूर्वी कोकण रेल्वे विरुध्द कोर्टामध्ये अनेक उमेदवारांनी केसेस दाखल केल्या होत्या आणि त्या केस निकाली लागून त्यांना भरती करण्याचे आदेश कोर्टाकडून देण्यात आलेले आहेत. परंतु त्या उमेदवारांना अद्याप कोकण रेल्वेमध्ये सामावून घेतलेले नाही व बरीच वर्षे केसेस चालू राहिल्यामुळे तसेच अधिसूचना न आल्यामुळे त्यांचे वय वाढले आहे. अशा उमेदवारांना नियुक्ती देण्यासंदर्भात समितीसमवेत आपली चर्चा व्हावी ही विनंती.
दिनांक 9 मे 2018 रोजी झालेल्या बैठकीत आणि डिसेंबर 2018 मधील कोकण रेल्वे च्या अधिकाऱ्यांच्या संपन्न झालेल1या बैठकीत क्षुल्लक कारणावरून डावलेल्या कृती समीतीच्या नोंदीत उमेदवारांचा आम्ही पुनश्च विचार करू आणि पुढील भरतीत सामावून घेऊ असे तत्कालिन सीएमडी मा. गुप्ता साहेब आणि मुख्य कार्मिक अधिकारी श्री. के. के. ठाकूर साहेब यांनी आश्वासन दिले होते. सदर प्रकरणावर अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदरबाबत आम्ही लेखी पुरावेही सादर केलेले होते व त्यास त्यांनी मान्यताही दिली होती.  अशा उमेदवारांची व प्रतिक्षायादीत असलेल्या उमेदवारांचे प्रशिक्षण घेऊन नेमणुक होणेबाबत कृती समितीची आग्रहाची मागणी आहे.
ह्याबाबत रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोकणातील जनतेची व्यथा जाणून घेणारे एकमेव जेष्ठ नेते आणि खासदार मा. ना. नारायण राणे साहेब यांना ह्यामध्ये योग्य तो मार्ग काढून प्रकगल्पग्रस्तांना वरील मागण्या मान्य करणेसाठी मे. कोकण रेल्वे व्यवस्थापनाकडे चर्चा करणेसाठी आग्रहाची विनंती करण्यात येणार आहे. याबाबत कृती समितीचे पदाधिकारी गोरगरीब कोकण रेल्वेचे भुमिपुत्र ह्यावेळी आवर्जुन उपस्थित राहून आपल्या व्यथा कथन करणार असल्याचे कृती समितीचे कार्याध्यक्ष श्री. विनय मुकादम यांनी सांगितले आहे.
त्याचप्रमाणे कोकण रेल्वे प्रकल्प्रस्तांच्या व्यथां मांडताना कृती समितीचे वतीने, सन 2027 पर्यंत सुमारे 2500 पदे रिक्त होणार असल्यामुळे कोकण रेल्वे आधी भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण न करता ही पदे प्रकल्पग्रस्तांच्या कुटुंबातूनच भरावीत जेणेकरुन ही भरती म्हणजे कोकण रेल्वेचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण करणाऱ्या कै. मा. मधु दंडवते व मा. जॉर्ज फर्नांडिस साहेब यांना आदरांजली ठरेल असे वक्तव्य कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त आणि कृती समितीच्या वतीने करण्यात येत आहे

Loading

फक्त २००० रुपयांत, तासाभरात कोकणात, पुणेकर चाकरमान्यांना अखेर मिळाला प्रवासाचा जलद पर्याय

   Follow us on        

सिंधुदुर्ग: पुणेकर चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी नवीन जलद पर्याय उपलब्ध झाला आहे. सिंधुदुर्ग जिल्हय़ातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती फ्लाय-९१ विमान कंपनीने माहिती आपल्या संकेतस्थळावरून प्रवाशांसाठी दिली आहे.

येत्या ३१ ऑगस्टपासून दर शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. या पूर्वी सिंधुदुर्ग – हैदराबाद – पुणे अशी एक थांबा असलेली विमानसेवा उपलब्ध होती. ती प्रवाशांसाठी सोयीची नसल्याने चिपी विमानतळावरून पुण्यासाठी थेट विमानसेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून होत होती ती आता पूर्ण झाली आहे.सिंधुदुर्गवासी मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. या विमानसेवेमुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन गणेशोत्सवात ही सेवा सुरू होत असल्याने गणेश चतुर्थीसाठी पुणेकरांची सिंधुदुर्गात येण्याची चांगलीच सोय झाली आहे.

पुणे येथून दर शनिवारी व रविवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणारे विमान नऊ वाजून दहा मिनिटांनी चिपीला पोहचेल.परतीच्या प्रवासाला सकाळी साडे नऊला सुटून पुणे येथे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोचेल. तिकीट दर १९९० रूपये आहे. फ्लाय ९१ विमानसेवेच्या तिसऱ्या यशस्वी मोहिमेनंतर आता चिपी-मुंबई अशी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.

Loading

Konkan Railway: ‘मोदी एक्सप्रेस’ यंदाही धावणार

   Follow us on        
कणकवली: दरवर्षीप्रमाणे भाजप पक्षातर्फे चालविण्यात येणारी मोदी एक्सप्रेस यावर्षीही चालविण्यात येणार असल्याची माहिती कणकवली विधानसभा आमदार नितेश राणे यांनी आज दिली. दिनाक ०४ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता मुंबईवरून ही गाडी कोकणसाठी रवाना होणार आहे. या गाडीच्या तिकीट बुकिंगसाठी दिनांक २८, २९ आणि ३० ऑगस्ट भारतीय जनता पक्षाच्या देवगड, कणकवली आणि वैभववाडी मंडळ अध्यक्षांशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी चाकरमान्यांना केले आहे.
भाजपतर्फे तळकोकणतील जनतेचा विचार नाही?
भाजपतर्फे सोडण्यात येणारी ‘भाजप एक्सप्रेस’ कुडाळपर्यंत चालविण्यात येते. तर ‘मोदी  एक्सप्रेस’ फक्त कणकवली मतदारसंघातील चाकरमान्यांसाठी मर्यादित असते. या दोन्ही गाड्या तळकोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ले, दोडामार्ग या तालुक्यातील प्रवाशांसाठी नसल्याने त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे.

Loading

रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ मध्ये समाविष्ट

   Follow us on        
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. याबाबत कुणाच्या हरकती असल्यास ६० दिवसांत हरकती सादर कराव्यात, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.
केंद्र शासनाच्या पर्यावरण , वने व वातावरण बदल यांनी पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वर या पाच तालुक्यांतील ३११ गावांचे क्षेत्र पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित केली आहे. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवासी यांची यासाठी हरकत आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालय, इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली- ११०००३ यांच्याकडे हरकत नोंदविणे आवश्यक आहे.महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ नागपूरचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडील केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्रासह प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच तहसीलदार चिपळूण, खेड, लांजा, राजापूर व संगमेश्वर यांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी कळविले आहे.
कोणत्या तालुक्यात किती गावे?
या ३११ गावांमध्ये चिपळूण तालुक्यातील ४४ गावांचा, खेड तालुक्यातील ८५ गावांचा, राजापूर तालुक्यातील ५१ गावांचा, संगमेश्वर तालुक्यातील ८ गावांचा समावेश आहे.

Loading

गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

   Follow us on        

मुंबई: गणेशोत्सवादरम्यान मुंबई गोवा महामार्गावर वाहतुक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाचा एक मोठा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवासाठी गणेशमूर्तीचे आगमन, गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवास आदींसाठी सार्वजनिक हितास्तव मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनांपेक्षा जास्त वाहनांना मोटार वाहन अधिनियम 1988 च्या कलम 155 मधील मुंबई ते सावंतवाडी दरम्यान जड वाहनांना बंदी असणार आहे.

ही बंदी तीन टप्प्यांत असणार आहे. 

गणेशोत्सवाच्या पूर्व तयारीचा प्रवास म्हणून 5 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 12 वाजेपासून ते 8 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी असणार आहे.

5 व 7 दिवसांच्या गणेशमूर्तीचे विसर्जन, गौरी गणपती विसर्जन, परतीचा प्रवासासाठी 11 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेपासून ते 13 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे.

अनंत चतुर्दशी 11 दिवसांचे गणेशमूर्तीचे विसर्जन, परतीच्या प्रवासाकरिता 17 सप्टेंबर रोजी सकाळी 8 वाजेपासून ते 18 सप्टेंबर 2024 रोजी रात्री 8 वाजेपर्यंत या कालावधीत बंदी राहील.

सर्व वाहनांना 18 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजेनंतर नियमित वाहतुकीस परवानगी राहील.

हे निर्बंध दूध, पेट्रोल किंवा डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलिंडर, लिक्विड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला व नाशवंत माल आदी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.

मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 च्या रस्ता रूंदीकरण, रस्ता दुरूस्ती कामकाज आणि साहित्य, माल ने – आण करणाऱ्या वाहनांना बंदी लागू राहणार नाही. यासंदर्भात वाहतूकदारांना संबंधित वाहतूक विभाग, महामार्ग पोलीस यांनी प्रवेशपत्र देण्याची कार्यवाही करावी.

Loading

Konkan Railway: वांद्रे – मडगाव एक्सप्रेसचा मुहुर्त ठरला; या दिवशी दाखवला जाणार हिरवा कंदील

   Follow us on        

मुंबई: उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या प्रयत्नातून नव्याने चालू करण्यात येणाऱ्या वांद्रे – मडगाव या गाडीचे उद्घाटन दिनांक २९ ऑगस्ट २०२४ रोजी होणार असून त्यादिवसापासून ही गाडी प्रवाशांच्या सेवेत येणार आहे अशी माहिती बोरिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील राणे यांनी दिली आहे.

या पूर्वी ही गाडी दिनांक २४ ऑगस्टपासून प्रवाशांच्या सेवेत येणार असल्याचे पक्ष कार्यालयाकडून जाहीर करण्यात आले होते. या गाडीचा प्रस्ताव रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या इतर विभागांना मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे. यात वेळ लागत असल्याने या गाडीचा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. दिनांक २९ ऑगस्ट रोजी दुपारी ठीक दीड वाजता ही गाडी बोरिवली येथून मडगावसाठी मार्गस्थ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.

त्यानंतर ही २० डब्यांची गाडी वांद्रे – मडगाव दरम्यान आठवड्यातुन दोन दिवस चालविण्यात येणार आहे. आठवड्यात दोन दिवस म्हणजे मंगळवारी आणि गुरुवारी सकाळी ७.४० वाजता मडगाव येथून सुटणार असून वांद्रे येथे रात्री २३.४० वाजता पोहोचणार आहे. तर वांद्रे येथून दर बुधवारी आणि शुक्रवारी ही गाडी पहाटे ६.५० वाजता सुटून मडगाव येथे रात्री २२.०० वाजता पोहोचणार आहे. या गाडीच्या उद्घाटन सोहोळ्यास उत्तर मतदारसंघातील कोकणकरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन पक्षाच्या वतीने सुनील राणे यांनी केले आहे.

 

Loading

Breaking: अणुस्कुरा घाटात दरड कोसळली; मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

   Follow us on        

राजापूर, दि. २४ ऑगस्ट: अणुस्कुरा घाटात आज शनिवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास दरड कोसळल्याने घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने घाटातील दरड हटवण्याचे काम सुरू आहे. दरड कोसळल्याने वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.

पहाटे ५ वाजताच्या सुमारास मातीचा भला मोठा भराव रस्तावर आल्याने हा मार्ग पूर्ण बंद झाला आहे. सुदैवाने पहाटेचा सुमार असल्याने, वाहनांची जास्त वर्दळ नसल्याने जिवितहानी झाली नाही. मात्र या घाट मार्गावर वारंवार कोसळणार्‍या दरडीमुळे येथील हा मार्ग वाहतुकीसाठी धोकादायक बनला आहे. यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्याचा प्रकार घडला आहे.

Loading

कोकण रेल्वे बेळगावला जोडण्यासाठी प्रयत्न सुरू; बेळगाव,चंदगड,आंबोलीसह एकूण 9 स्थानकांची निश्चिती

   Follow us on        
कोल्हापूर: मागील कित्येक वर्षांपासून रेंगाळलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वेमार्गाचे काम लवकरात लवकर चालू करण्यात यावे यासाठी संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी अलीकडेच कोल्हापूरचे खासदार शाहू महाराज यांची भेट घेतली होती. त्यांना शाहू महाराज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून लगोलग त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघाचे खासदार नारायण राणे यांना मोबाईलद्वारे संपर्क साधून या प्रकल्पासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगितले. खासदार नारायण राणे यांनीही या प्रकल्पासाठी आपले पूर्ण सहकार्य राहील असे आश्वासन दिले आहे. तसेच आपण संयुक्तपणे रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा करू असेही सांगितले. त्यामुळे हा रेल्वे मार्ग लवकरच अस्तित्त्वात येण्याची आशा निर्माण झाली आहे.
११४ किलोमीटर अंतर असलेल्या बेळगाव-चंदगड-सावंतवाडी या रेल्वे मार्गाचा पहिला सर्वे १९७० रोजी झाला होता. त्यानंतर २०१८ रोजी साऊथ वेस्टर्न रेल्वेच्या अधिकार्‍यांनी या मार्गाचा पुनः सर्वे करून आपला अहवाल रेल्वे मंत्रालयाकडे सुपूर्त केला होता.  मात्र त्या नंतर योग्य पाठपुरावा झाला नसल्याने हा रेल्वे मार्ग प्रस्ताव रेंगाळला. अशी माहिती संघर्ष समितीचे अध्यक्ष सुरेश दळवी यांनी दिली. बेळगाव, कुद्रेमनी, माडवळे, हलकर्णी, नागनवाडी, चंदगड, कानूर, आंबोलीमार्गे सावंतवाडी असा हा लोहमार्ग आहे.बेळगाव-सावंतवाडी मार्गाने दक्षिण रेल्वे आणि कोकण रेल्वे जोडली जाणार आहे. बेळगाव भागातील भाजीपाला कोकण-गोव्यात तर कोकणातील मासे दक्षिण कर्नाटकासह पश्चिम महाराष्ट्रात पोहोचण्यास मदत होणार आहे.
या मार्गात बेळगाव, चंदगड, आंबोलीसह एकूण 9 स्टेशन्स निश्चित केली आहेत. या लोहमार्गाचा अपेक्षित खर्च 1805.09 कोटी ऊपये असून निश्चितच तो भारतीय रेल्वेला परवडणारा आहे. या लोहमार्गामुळे होणारा आणखी एक प्रमुख लाभ म्हणजे जेव्हा कधी कोकण रेल्वेच्या मार्गात दरडी कोसळून मार्ग बंद पडतो, त्यावेळी कोकण रेल्वेची वाहतूक बेळगावमार्गे वळविता येणे शक्य होणार आहे. शिवाय सध्याचे बेळगावहून खानापूर, लोंढा, कॅसलरॉक, मडगाव, करमळी, पेडणेमार्गे सावंतवाडी हे अंतर 279 कि.मी. आहे. बेळगाव-सावंतवाडी लोहमार्ग झाल्यास हे अंतर 114.60 कि.मी. होऊन 165 कि.मी. सध्यापेक्षा रेल्वेमार्गाने बेळगावला सावंतवाडी जवळ होणार आहे, असा सकारात्मक अहवाल बेंगळूरचे मुख्य इंजिनिअर राम गोपाल यांनी रेल्वे मंत्रालयास पाठवला आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विजयी होणाऱ्या खासदाराने बेळगाव आणि सिंधुदुर्गच्या खासदारांच्या मदतीने स्वत: कॅप्टनशीप करून बेळगाव-सावंतवाडी लोहमार्गाचा प्रश्न सोडवला पाहिजे. त्यामुळे चंदगड, आजरा आणि गडहिंग्लज तालुक्यातील तसेच कोकणातील चौकुळ आणि आंबोली भागातील लोक रेल्वेच्या कक्षेत येतील. या भागातील प्रवासी पंढरपूर, मुंबईला रेल्वेने जाऊ शकतील. त्यामुळे या भागाच्या विकासाचे नवे पर्व सुरू होईल. स्वातंत्र्यानंतरही रेल्वेच्या प्रतीक्षेत दिवस कंठणाऱ्या वंचित भागाच्या विकासाची परिमाणे बदलू शकतील
खासदार शाहू महाराज यांनी आताच झालेल्या लोकसभा निवडणुकीत या रेल्वे मार्गासाठी पाठपुरावा करून तो पूर्ण करून घेवू असे आश्वासन दिले होते

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search