Author Archives: Kokanai Digital

मुंबई मेट्रो: आजपासून रेड लाईन 7 आणि येलो लाईन 2A स्वतंत्र धावणार

   Follow us on        

मुंबई, ८ एप्रिल २०२६ : मुंबई मेट्रोच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज पासून ८ एप्रिल २०२६ पासून रेड लाईन ७ आणि येलो लाईन २A स्वतंत्र कॉरिडॉर म्हणून धावणार आहेत.

दहिसर स्टेशनला पूर्णपणे अपग्रेड करण्यात आले असून, प्रवासी आता पेड एरियाबाहेर न येता दोन्ही लाईन्समध्ये सहज बदल करू शकणार आहेत.नवीन मेट्रो लाईन ९ (दहिसर ईस्ट ते काशिगाव, ठाणे) आणि लाईन २B (हार्बर लाईन भाग) सुरू झाल्यामुळे ही बदलण्यात आली आहे.

रेड लाईन ७ आता लाईन ९ सोबत एकत्रित होऊन विस्तारित सेवा देईल. मात्र यामुळे गोंदवली-अंधेरी सारखे काही डायरेक्ट लूप आता बंद होणार आहेत. त्यामुळे पूर्व-पश्चिम प्रवास करणाऱ्या प्रवाशांना काही ठिकाणी अतिरिक्त बदल करावा लागू शकतो. तरीही दहिसर स्टेशनवर उपलब्ध असलेल्या सीमलेस इंटरचेंजमुळे एकूण प्रवास सुकर राहील.

मेट्रो प्रशासनाने सर्व प्रवाशांना नवीन वेळापत्रक, प्लॅटफॉर्म बदल आणि रुट्सची माहिती अधिकृत अॅप किंवा वेबसाइटवरून तपासण्याचे आवाहन केले आहे. ही नवी व्यवस्था मुंबईच्या मेट्रो नेटवर्कला अधिक सुव्यवस्थित आणि विस्तारित स्वरूप देईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

राज्यसभेत उमटला मराठी बाणा! डॉ. ज्योती वाघमारेंचा नथ अन् नऊवारीतील ठसकेबाज शपथविधी

   Follow us on        

नवी दिल्ली:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदार डॉ. ज्योती वाघमारे यांनी आज राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. यावेळी त्यांनी परिधान केलेल्या अस्सल मराठमोळ्या पेहरावाची सर्वत्र चर्चा रंगली होती. नाकात नथ, डोक्यावर पदर आणि काठपदराची निळी साडी अशा पारंपरिक वेशभूषेत त्या सभागृहात उपस्थित झाल्या होत्या. विशेष म्हणजे, शपथ घेण्यासाठी उभ्या राहिल्या असताना त्यांच्या हातात भारताच्या संविधानाची प्रत होती, ज्यातून त्यांनी लोकशाहीच्या सर्वोच्च ग्रंथाप्रती आपला आदर व्यक्त केला.

​शपथविधी दरम्यान एक नाट्यमयी प्रसंगही पाहायला मिळाला. डॉ. वाघमारे यांनी आपल्या शपथेची सुरुवात करताना छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कुलदैवत जांबमुनी महाराज तसेच जिजाऊ, सावित्री, रमाई आणि माता अहिल्या यांना मानाचा मुजरा केला. पुढे त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांना वंदन करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने शपथ घेण्यास सुरुवात केली. मात्र, विहित नमुन्यापेक्षा अधिक नावांचा उल्लेख केल्याने राज्यसभेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मध्येच थांबवले.

​संसदेच्या नियमानुसार शपथ केवळ निर्धारित मजकुराप्रमाणेच घेणे बंधनकारक असल्याने, अधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा एकदा शपथ वाचण्यास सांगितले. यानंतर डॉ. वाघमारे यांनी संसदेने ठरवून दिलेली अधिकृत शपथ पुन्हा वाचली आणि आपला पदभार स्वीकारला. महापुरुषांचे स्मरण आणि हातात संविधान घेऊन घेतलेली ही शपथ सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

Konkan Railway: कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे संभाव्य अपघात टळला; रेल्वेकडून रोख पुरस्कार जाहीर

   Follow us on        

मडगाव: कोकण रेल्वेचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. संतोष कुमार झा यांनी ५ एप्रिल २०२६ रोजी मडगाव यार्डमध्ये रेल्वे ट्रॅकवरील वेल्ड फेल्युअर (वेल्डिंग बिघाड) ओळखल्याबद्दल पॉइंट्समन श्री. सुदेश साळुंके यांना रोख १०,००० रुपयांचा स्पॉट कॅश पुरस्कार जाहीर केला.

त्यांच्या सतर्क निरीक्षणामुळे संभाव्य मोठा अपघात टाळला गेला आणि ट्रेनांच्या सुरक्षित संचालनाला मदत झाली. कोकण रेल्वे मार्गाच्या कठीण डोंगराळ आणि जंगलयुक्त भौगोलिक रचनेत ट्रॅकची अखंडता राखणे हे अत्यंत महत्त्वाचे असते. अशा छोट्या बिघाडामुळे मोठ्या दुर्घटनेची शक्यता असल्याने पॉइंट्समन साळुंके यांच्या या त्वरित कृतीला विशेष महत्त्व आहे.

सादरसेवा उपक्रमांतर्गत कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षा आणि सजगतेची संस्कृती बळकट करण्यासाठी असे पुरस्कार नियमितपणे दिले जातात. नियंत्रण कक्षात पुरस्कार वितरण करताना श्री. झा यांनी कर्मचाऱ्यांच्या या योगदानाचे कौतुक केले.

कोकण रेल्वे महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधून जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज अनेक प्रवासी आणि मालवाहतूक गाड्या येथून धावतात. कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेला बळ मिळते. कोकण रेल्वे प्रशासनाने यापुढेही अशा सकारात्मक कृतींना प्रोत्साहन देण्याचे धोरण कायम ठेवले आहे.

 

 

रेल नीर घोटाळा: RTI माहिती नाकारल्यामुळे सिआसीने आयआरसीटीसीच्याला फटकारले

नवी दिल्ली (प्रतिनिधी) – रेल्वे केटरिंग संस्था IRCTC ने RTI अंतर्गत मागितलेली माहिती नाकारल्याबद्दल केंद्रीय माहिती आयोगाने (CIC) कडक शब्दांत तंबी दिली आहे. रेल्वे टेंडरमध्ये सहभागी होणाऱ्या कंपन्यांनी ‘रेल नीर’ घोटाळा आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या (CBI, ED) प्रकरणांबाबत माहिती दिली होती का, यासंदर्भात माहिती मागवण्यात आली होती.

RTI अर्जात विशेषतः विचारण्यात आले होते की, बोली लावणाऱ्या कंपन्यांनी 2015 मधील प्रसिद्ध ‘रेल नीर’ घोटाळ्यात आरोपी असल्याचे आणि CBI ने त्यांच्या विरोधात FIR (RC-DAI-2015-A-0032) दाखल केल्याचे जाहीर केले होते का. तसेच, ED ने IPC कलम 120B व 420 तसेच भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दाखल केलेल्या प्रकरणांची माहिती टेंडरमध्ये नमूद केली होती का, याचीही चौकशी करण्यात आली होती.

2015 मधील ‘रेल नीर’ घोटाळ्यात खासगी केटरिंग कंपन्यांनी राजधनी व शताब्दी सारख्या प्रीमियम गाड्यांमध्ये अधिकृत ‘रेल नीर’ ऐवजी स्वस्त पाण्याच्या बाटल्या पुरवल्याचा आरोप होता. यामुळे भारतीय रेल्वेला सुमारे ₹19.5 कोटींचा तोटा झाल्याचे तपासात उघड झाले होते.

मात्र, IRCTC ने ही माहिती देण्यास नकार देत RTI कायद्याच्या कलम 8(1)(d) अंतर्गत ती ‘व्यावसायिक गोपनीयता’ असल्याचे कारण दिले. यावर अर्जदाराने “सार्वजनिक हितासाठी माहिती आवश्यक आहे” असे सांगत आक्षेप घेतला.

CIC ने IRCTC च्या उत्तरावर नाराजी व्यक्त करत म्हटले की, केवळ कायद्याचा उल्लेख करून माहिती नाकारणे योग्य नाही. “माहिती नाकारताना ठोस कारणे देणे आवश्यक आहे,” असे आयोगाने स्पष्ट केले. तसेच, संबंधित कलम लागू का होते, याचे स्पष्टीकरण देणे ही सार्वजनिक प्राधिकरणाची जबाबदारी असल्याचेही नमूद केले.

आयोगाने IRCTC ला हा अर्ज पुन्हा तपासून ‘स्पष्ट आणि कारणांसहित’ नवीन उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत

कोकण रेल्वेचा यशस्वी वर्षाचा प्रवास; प्रवासी संख्या वाढली, सुरक्षा व सेवांमध्ये मोठी सुधारणा

   Follow us on        

नवी मुंबई: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) ने मागील आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी करत प्रवासी वाहतूक, सेवा आणि सुरक्षिततेच्या क्षेत्रात विक्रमी यश नोंदवले आहे. कोकण भागातील रेल्वे संपर्क अधिक सक्षम करताना, संस्थेने तिकीट तपासणीमधून तब्बल 27.59 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले असून प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे.

नवीन गाड्या आणि विशेष सेवा सुरू

या कालावधीत KRCL ने ‘देव दर्शन स्पेशल ट्रेन’सह अनेक नवीन सेवा सुरू केल्या. रांजणगाव, अयोध्या आणि रामेश्वरम यांना जोडणाऱ्या सहा विशेष गाड्यांचा समावेश आहे. याशिवाय गणपती, उन्हाळा आणि हिवाळा हंगामात 1,400 हून अधिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, ज्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला.

पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानातील सुधारणा

पायाभूत सुविधांच्या दृष्टीनेही मोठी प्रगती करण्यात आली आहे. पूल, बोगदे आणि सिग्नल प्रणालींचे आधुनिकीकरण करून सुरक्षितता आणि कार्यक्षमता वाढवण्यात आली. ड्रोनच्या मदतीने ट्रॅक मॉनिटरिंगसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात आले. मडगाव स्थानकावर सुधारणा करून ऑपरेशनल कार्यक्षमता वाढवण्यात आली आहे.

प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आणि सोयी

प्रवाशांच्या सोयीसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. दिव्यांगांसाठी रॅम्प, ब्रेल साइनज, सुधारित सूचना फलक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. रत्नागिरी, सावंतवाडी रोडसारख्या स्थानकांवर एसी लाउंज, रेल आर्केड, डिजी लॉकर सुविधा सुरू करण्यात आल्या. काही स्थानकांवर उंच प्लॅटफॉर्म, फूटओव्हर ब्रिज आणि शेड सुधारणा देखील पूर्ण करण्यात आल्या.

सुरक्षा उपाय आणि सौरऊर्जेवर भर

सुरक्षा आणि पर्यावरणपूरक उपक्रमांवरही भर देण्यात आला आहे. KRCL ने 3.67 लाख kWh सौरऊर्जा निर्मिती करून सुमारे 45.94 लाख रुपयांची बचत केली. याशिवाय 2,700 मीटर कुंपण, सीसीटीव्ही कॅमेरे आणि चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या. तसेच 90 हरवलेल्या मुलांना वाचवण्यातही यश आले आहे.

सामाजिक बांधिलकी आणि सांस्कृतिक उपक्रम

गणपती उत्सवाच्या काळात प्रवाशांसाठी विशेष सुविधा, मोफत पाणी, आरोग्य सेवा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या सर्व उपक्रमांमुळे कोकण रेल्वेने प्रवासी-केंद्रित सेवा, सुरक्षितता आणि विकास यामध्ये महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून भविष्यातही अशाच प्रकारे प्रगती सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

रत्नागिरी-दादर पॅसेंजर पूर्ववत करण्यासाठी कोकणातील संघटना आक्रमक; खासदार अनिल देसाई यांची भेट

   Follow us on        

मुंबई:रत्नागिरी-दादर पॅसेंजर रेल्वे गाडी पुन्हा सुरू करण्याच्या मागणीसाठी कोकणातील विविध संघटनांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी आज शनिवार, ४ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता कोकण विकास समिती, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समिती (महाराष्ट्र) आणि जल फाउंडेशन कोकण विभाग यांच्या वतीने दक्षिण मध्य मुंबईचे खासदार अनिल देसाई यांची शिवसेना भवन येथे भेट घेण्यात आली. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या धोरणाबाबत चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान शिष्टमंडळाने आक्रमकपणे आपली बाजू मांडताना सांगितले की, रेल्वे प्रशासनाने रत्नागिरी-दादर गाडी पूर्ववत न करणे हा प्रश्न प्रतिष्ठेचा केला आहे, त्यामुळे आता त्याला त्याच भाषेत प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे. हा प्रश्न केवळ एका गाडीपुरता मर्यादित नसून, मध्य रेल्वेने महाराष्ट्रातील सुमारे २८ गाड्या बंद केल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला. परराज्यात जाणाऱ्या गाड्या दिवा किंवा पनवेल येथून सोडाव्यात आणि महाराष्ट्रातील सर्व गाड्यांना दादर किंवा सीएसएमटी स्थानकावरूनच प्राधान्य मिळावे, अशी आग्रही मागणी खासदार महोदयांकडे करण्यात आली.

महाराष्ट्रातील सर्वपक्षीय नेत्यांनी आणि विशेषतः कोकणातील खासदार-आमदारांनी या विषयावर एकत्र येऊन केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे दाद मागणे गरजेचे असल्याचे संघटनांनी नमूद केले. तसेच, गरज पडल्यास मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. खासदार अनिल देसाई यांनीही परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अशा व्यापक संघर्षाची आवश्यकता असल्याचे मान्य केले. या प्रसंगी कोकण विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष जयवंत दरेकर, अक्षय महापदी, दिलीप कदम, संतोष भोसले, अखंड कोकण रेल्वे प्रवासी सेवा समितीचे अध्यक्ष शांताराम नाईक, जल फाउंडेशनचे नितीन जाधव आणि प्रमोद बागवे आदि मान्यवर उपस्थित होते.

 

मोठ्या गाजावाजात सुरू झालेली मुंबई विजयदुर्ग रो रो बोट सेवा बंद; कारण काय?

   Follow us on        

विजयदुर्ग: पालकमंत्री नितेश राणे यांनी होळीच्या कालावधीत मोठ्या गाजावाजात सुरू केलेली रो-रो बोट सेवा गुढीपाडव्याच्या दिवशीच बंद पडली आहे. या बोट सेवेचे तिकीट सर्वसामान्य प्रवाशांना परवडणारे नसल्याने आणि बोटीत मिळणारे खाद्यपदार्थही महाग असल्याने प्रवाशांवर आर्थिक ताण वाढला. परिणामी, अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने ही सेवा बंद करावी लागली. यावर माजी आमदार परशुराम उपरकर यांनी टीका करत, सुरू केलेले प्रकल्प अल्पावधीत बंद पडणे ही चिंतेची बाब असल्याचे म्हटले.

उपरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ही सेवा १९ रोजी गुढीपाडव्याच्या दिवशी थांबवण्यात आली. बोटीचे तिकीट महाग असल्यामुळे सर्वसामान्य प्रवासी या सेवेपासून दूर राहिले. तसेच, बोट मुंबईहून सुटत असताना विजयदुर्ग येथे पोहोचल्यानंतर पुढील प्रवासासाठी योग्य व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला. बोटीत शौचालय आणि विश्रांतीसाठी आवश्यक सुविधा नसल्याचीही तक्रार करण्यात आली.

याशिवाय, बोटीत खाद्यपदार्थांच्या किंमतीही जास्त असल्याचे समोर आले. उदाहरणार्थ, पोहे १५० रुपये तर पाण्याची बाटली ९० रुपयांना विकली जात होती, ज्यामुळे प्रवाशांमध्ये नाराजी निर्माण झाली. त्यामुळेच या सेवेचा वापर कमी झाला आणि एका दिवशी ५० पेक्षा जास्त प्रवासीही मिळाले नाहीत, असे उपरकर यांनी नमूद केले

मुंबई महानगर क्षेत्रात बनणार देशातील दुसरे १ लाख प्रेक्षक क्षमता असलेले भव्य क्रिकेट स्टेडियम

   Follow us on        

मुंबई: मुंबई महानगर प्रदेशात (MMR) देशातील दुसरे १ लाख प्रेक्षक क्षमता असलेले भव्य क्रिकेट स्टेडियम उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमनंतर असे मोठे स्टेडियम उभारण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, महाराष्ट्राच्या क्रीडा पायाभूत सुविधांना जागतिक स्तरावर नेण्याचा यामागील उद्देश आहे.

या प्रकल्पासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पुढाकार घेतला जात असून, सिडको (CIDCO) आणि मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) यांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या संदर्भात एमसीएचे अध्यक्ष अजिंक्य नाईक आणि सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.

या नव्या स्टेडियममुळे राज्यातील क्रीडा पायाभूत सुविधा अधिक मजबूत होण्यास मदत होईल. तसेच, मोठ्या आंतरराष्ट्रीय सामन्यांचे आयोजन करण्यासाठी महाराष्ट्र एक महत्त्वाचे केंद्र म्हणून उदयास येईल. यामुळे देश-विदेशातील क्रिकेटप्रेमींना आकर्षित करून पर्यटनालाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

एकूणच, हा प्रकल्प केवळ क्रिकेटसाठीच नव्हे तर राज्याच्या आर्थिक आणि पर्यटन विकासासाठीही महत्त्वाचा ठरणार असून, महाराष्ट्राला जागतिक क्रीडा नकाशावर अधिक ठळकपणे स्थान मिळवून देण्याची क्षमता यात आहे.

ठाण्यातील पाहिल्या ‘प्लॅनेटेरियम’चे ५ एप्रिलला उद्घाटन

   Follow us on        

ठाणे: ठाणे जिल्ह्यातील पहिले प्लॅनेटेरियम ५ एप्रिल रोजी सुरू होणार आहे. शाहापूर येथील साकदभाव परिसरात उभारण्यात आलेले हे ‘स्पेस अ‍ॅस्ट्रोटेनमेंट अँड प्लॅनेटेरियम ऑब्झर्व्हेटरी (SAPO)’ नावाचे प्रकल्प खाजगी स्वरूपात उभारण्यात आले आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन खगोलशास्त्रज्ञ डॉ. के. सोमन आणि आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते सायंकाळी ५ वाजता होणार आहे.

निलेश ठाकूर आणि त्यांचे बंधू गिरीश ठाकूर यांनी हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प साकारला असून, लोकांमध्ये खगोलशास्त्राविषयी आवड निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. सुमारे ३.५ एकर उंच ठिकाणी उभारण्यात आलेल्या या केंद्रामध्ये आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

या प्रकल्पात अत्याधुनिक प्लॅनेटेरियमसह चार मोठ्या दुर्बिणी असलेले वेधशाळा केंद्र उभारण्यात आले आहे. येथे ५६ आसनांची व्यवस्था असून मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये अर्धा ते एक तासांचे खगोलशास्त्रीय शो दाखवले जाणार आहेत.

या केंद्रामध्ये पर्यटकांना शनीचे वलय, गुरू ग्रहाचे पट्टे व त्याचे उपग्रह, तसेच आकाशगंगेचे सुंदर दृश्य स्पष्टपणे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) सर्वोत्तम स्टारगेझिंग अनुभव देणारे हे ठिकाण ठरणार आहे.

याशिवाय येथे प्रदर्शन हॉल, सेल्फी पॉइंट्स, मार्गदर्शनासाठी स्वयंसेवक आणि खाद्यपदार्थांसाठी कॅन्टीनचीही सुविधा उपलब्ध आहे. खगोलशास्त्रप्रेमींसाठी हे ठिकाण मोठे आकर्षण ठरणार असून, भेट देण्यापूर्वी पूर्वनोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगण्यात आले आहे.

छोटीशी चूक जिवावर बेतली! इमर्शन रॉडमुळे तरुणीचा दुर्दैवी मृत्यू

   Follow us on        

कर्नाटक: धारवाड जिल्ह्यातील देवरहुब्बळी गावात एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडली. २५ वर्षीय निवेदिता या तरुणीने आंघोळीसाठी पाणी गरम करण्यासाठी इमर्शन रॉडचा वापर केला होता. पाणी गरम झाल्यानंतर तिने रॉड काढण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या वेळी विजेचा स्विच बंद केला नव्हता. यामुळे तिला तीव्र विजेचा धक्का बसला आणि ती जागीच कोसळली.

घटनेनंतर कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण देवरहुब्बळी गावात शोककळा पसरली असून, एवढ्या तरुण वयात झालेल्या मृत्यूने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच धारवाड ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात इमर्शन रॉड काढताना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.

तज्ज्ञांच्या मते, इमर्शन रॉडसारख्या विद्युत उपकरणांचा वापर करताना विशेष काळजी घेणे अत्यावश्यक आहे. पाणी गरम करताना आणि रॉड काढण्यापूर्वी नेहमी विजेचा स्विच बंद करावा. तसेच घरामध्ये आरसीसीबी (RCCB) सारखी सुरक्षा उपकरणे बसवणेही गरजेचे आहे.

ही घटना घरगुती विद्युत सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित करते. छोट्या चुका मोठ्या अपघातांना कारणीभूत ठरू शकतात, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहून विद्युत उपकरणांचा वापर करताना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search