Author Archives: Kokanai Digital

ओंकार हत्ती वेत्येत दाखल; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

   Follow us on        

सावंतवाडी:

‘ओंकार’ नावाच्या हत्तीचे पुन्हा एकदा वेत्ये गावात आगमन झाल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे. रविवारी रात्री या हत्तीने वेत्ये येथे दर्शन दिल्यानंतर ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. यामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, वनविभागाकडून यावर ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओंकार हत्तीच्या सततच्या वावरामुळे वेत्ये आणि आसपासच्या परिसरातील शेतकरी, मजूर तसेच रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणारे नागरिक स्वतःला असुरक्षित समजत आहेत. हत्तीच्या या पुनरागमनामुळे ग्रामस्थांची चिंता अधिकच वाढली आहे.

सरपंचांचा वनविभागावर संताप:

याच पार्श्वभूमीवर वेत्ये गावचे सरपंच गुणाजी गावडे यांनी वनविभागाच्या कारभारावर संतप्त शब्दांत तीव्र टीका केली आहे. ओंकार हत्तीच्या हालचालींची पूर्ण माहिती असूनही वनविभाग नेमके काय करत आहे? ग्रामस्थांच्या जीविताचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत? असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘हत्तीचा धुमाकूळ आणि प्रशासनाचा मौनकल्लोळ’ अशी चर्चा आता गावोगावी रंगू लागली आहे. त्यामुळे वनविभागाने तातडीने प्रभावी पावले उचलून हत्तीच्या हालचालींवर नियंत्रण मिळवावे आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात असून संपूर्ण परिसराचे लक्ष आता वनविभागाच्या भूमिकेकडे लागले आहे.

रेल्वे रूळांवरील अपघातांना ब्रेक लावण्यासाठी अनोखा प्रयोग! भिवंडीत बनणार देशातील पहिला ‘जलरोधक’ सबवे’

   Follow us on        

मुंबई: मुंबई उपनगरीय रेल्वे रुळांवरील वाढते अपघात आणि प्रवाशांचे मृत्यू रोखण्यासाठी मुंबई रेल्वे विकास महामंडळाने (एमआरव्हीसी) आता एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पादचारी पुलांच्या (FOB) पर्यायाला मर्यादा आल्यानंतर महामंडळाने आता भुयारी मार्गांवर (सबवे) आपले लक्ष केंद्रित केले आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदाच संपूर्णपणे ‘जलरोधक’ (वाटरप्रूफ) सबवे भिवंडीत उभारण्यात येत आहे. महामुंबईतील पनवेल-वसई मार्गावरील भिवंडी स्थानकात हा ‘ऑल वेदर सबवे’ साकारत असून, त्याची लांबी ६८ मीटर आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास मुंबईतील सर्वाधिक अपघात होणाऱ्या संवेदनशील ठिकाणीही अशाच प्रकारच्या भुयारी मार्गांची उभारणी केली जाईल, अशी माहिती ‘एमआरव्हीसी’चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विलास वाडेकर यांनी दिली.

​पादचारी पुलांकडे प्रवाशांचे दुर्लक्ष

रेल्वे रुळांवरील मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून ‘एमआरव्हीसी’ला मोठा अर्थपुरवठा केला जातो. महामंडळाने महामुंबईत सर्वाधिक अपघात होणाऱ्या ३६ ठिकाणी पादचारी पुलांची उभारणी केली आहे. मात्र, या पुलांची उंची साधारण ११ ते १२ मीटर इतकी जास्त असल्याने अनेक प्रवासी पुलाचा वापर न करता, जीव धोक्यात घालून थेट रुळ ओलांडण्याला प्राधान्य देतात. याउलट, भुयारी मार्ग हे जमिनीपासून अवघ्या चार ते पाच मीटर खाली बांधणे सहज शक्य असल्याने प्रवाशांसाठी ते अधिक सोयीचे ठरणार आहेत. आकडेवारीनुसार, सन २०२२ ते २०२५ दरम्यान मध्य रेल्वेवर एकूण ६,२२५ आणि पश्चिम रेल्वेवर ३,६२७ प्रवाशांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे. या समस्येवर मात करण्यासाठी ‘एमयुटीपी ३’ अंतर्गत उपाययोजना पूर्ण झाल्या असून, नवीन संवेदनशील ठिकाणांचा समावेश ‘एमयुटीपी ४’ मध्ये केला जाणार आहे.

​असे आहे अत्याधुनिक जलरोधक तंत्रज्ञान

पावसाळ्यात अनेक सबवेमध्ये पाणी साचणे किंवा ओलावा येणे अशा समस्या उद्भवतात, ज्यामुळे प्रवासी त्याचा वापर करणे टाळतात. भिवंडी सबवेमध्ये ही अडचण दूर करण्यासाठी ‘त्रिस्तरीय जलरोधक तंत्रज्ञानाचा’ वापर करण्यात आला आहे. यामध्ये ४०० मिमी जाडीचे बॉक्स वापरण्यात आले असून, ‘कप अँड कोन’ पद्धतीच्या बॉक्स प्रणालीद्वारे ही भूमिगत संरचना जोडली जात आहे. पाणी झिरपण्यास पूर्णपणे प्रतिबंध करण्यासाठी बॉक्सच्या सांध्यांमध्ये रबर गॅस्केट, विशेष जलरोधक रसायने आणि अतिरिक्त संरक्षक स्तर लावले जात आहेत. विशेष म्हणजे, हा पूर्व-पश्चिम जोडणारा भुयारी मार्ग ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’चे दोन मार्ग, दोन मेल-एक्सप्रेस आणि तीन लूप मार्गिका अशा एकूण सात रेल्वे मार्गिकांच्या खालून जाणार आहे. रेल्वे वाहतूक सुरू असतानाही रुळांची सुरक्षा अबाधित राहावी यासाठी रुळांखाली मजबूत लोखंडी गर्डर बसवून हे काम अत्यंत सुरक्षितपणे केले जात आहे

Konkan Railway: प्रवाशांच्या जिवाशी खेळ! विक्रेत्याकडून सडक्या कलिंगडाचे ‘फ्रूट सॅलड’ विकण्याचा प्रकार

   Follow us on        

सिंधुदुर्ग: सावंतवाडी ते मुंबई रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ खेळणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रेत्याकडून प्रवाशांना चक्क वास मारणारे, खराब झालेले ‘फ्रुट सॅलड’ विकण्यात आले. या सॅलडमधील कलिंगड पूर्णपणे सडलेले होते आणि त्याला दुर्गंधी येत होती. हा प्रकार लक्षात येताच रेल्वेतील प्रवासी प्रचंड आक्रमक झाले.

संबंधित विक्रेत्याकडे चौकशी केली असता, त्याच्याकडे कोणत्याही कंपनीचे किंवा ठेकेदाराचे नाव व संपर्क क्रमांक नव्हता. तसेच रेल्वेचे टी-शर्ट घालून फिरणाऱ्या या विक्रेत्यांकडे साधे ओळखपत्रही नव्हते. यावरून ग्राहक संरक्षण परिषद सिंधुदुर्गचे अशासकीय सदस्य ॲड. नकुल पार्सेकर यांनी तीव्र आक्षेप घेतला. “अशा खराब अन्नपदार्थांमुळे प्रवाशांना विषबाधा झाल्यास त्याला जबाबदार कोण?” असा संतप्त सवाल त्यांनी रेल्वे निरीक्षकांना विचारला.

​या घटनेची दखल घेत रेल्वे टीसी आणि निरीक्षकांनी संबंधित कंपनीला केवळ १,००० रुपयांचा दंड ठोठावला. मात्र, प्रवाशांनी या किरकोळ कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अशा निष्काळजी ठेकेदारांना मोठा दंड करून त्यांचे थेट कंत्राट (ठेके) रद्द करण्यात यावे, अशी मागणी प्रवाशांनी केली. कोकण रेल्वे प्रशासनाच्या या ढिसाळ कारभारामुळे ट्रेनमध्ये काही काळ मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या गंभीर प्रकाराबाबत आता काही जागरूक प्रवासी ऑनलाइन तक्रार देखील दाखल करणार आहेत.

​कोकणातील एसटी स्थानकांचा कायापालट! कणकवलीसह प्रमुख ठिकाणी ‘बस पोर्ट’ उभारले जाणार

   Follow us on        

कणकवली: कोकणातील एसटी प्रवाशांना आधुनिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. कणकवली, विभागीय कार्यालय तसेच सावंतवाडी येथे पीपीपी (PPP) तत्त्वावर विमानतळाच्या धर्तीवरील अत्याधुनिक ‘बस पोर्ट’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. कणकवली बसस्थानकाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान त्यांनी ही माहिती दिली. यावेळी त्यांनी स्थानक परिसराची पाहणी करून माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी नगराध्यक्ष संदेश पारकर, माजी आमदार राजन तेली, शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्यासह एसटी महामंडळाचे अनेक वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

​एसटी महामंडळाच्या ७८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधत परिवहन मंत्र्यांनी राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी मोफत करण्याची घोषणा केली असून, या स्थानकांची दर चार तासांनी स्वच्छता केली जाईल, असे स्पष्ट केले. याशिवाय, बसगाड्या यांत्रिक पद्धतीने स्वच्छ करूनच मार्गावर सोडल्या जातील. प्रवाशांसाठी थंड पिण्याच्या पाण्याची सुविधा, तर चालक व वाहकांसाठी गरम पाण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

​सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आणखी एक मोठी घोषणा करताना त्यांनी सांगितले की, राज्यभरात ८ हजार नवीन बसेस खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यापैकी ६५ नवीन बसेस पुढील तीन महिन्यांत सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळणार आहेत. तसेच, पर्यावरणपूरक वाहतुकीस चालना देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटीच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात असलेल्या सुमारे ९०० रिक्त पदांच्या पार्श्वभूमीवर, १५ ऑगस्टपर्यंत कंत्राटी तत्त्वावर चालक, वाहक व कार्यशाळा कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, तर १८ हजार कायमस्वरूपी पदांच्या भरतीसाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी बसस्थानक परिसरातील अतिरिक्त मोकळी जागा नगरपंचायतीला भाडेतत्त्वावर देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली, ज्यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे

महाराष्ट्रात बनत आहे अटल सेतूपेक्षाही मोठा, देशातील सर्वात लांब सागरी महामार्ग; सद्यस्थिती काय?

   Follow us on        

मुंबई::मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) वाहतूक व्यवस्था अधिक वेगवान करण्यासाठी राज्य सरकारने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलले आहे. भाईंदर ते विरार दरम्यान सुमारे ३० किलोमीटर लांबीच्या सागरी सेतूची (सी-लिंक) उभारणी करण्यात येणार असून, प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा देशातील सर्वांत लांब सागरी पूल ठरणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

सध्या २२ किलोमीटर लांबीचा ‘अटल सेतू’ हा देशातील सर्वात लांब सागरी पूल आहे. मात्र, भाईंदर-विरार सागरी सेतू या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यावर अटल सेतूचा हा विक्रम मोडीत निघणार आहे.

कसा असेल हा प्रकल्प?

मुंबईतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सध्या वांद्रे-वर्सोवा आणि वर्सोवा-भाईंदर कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हाच मार्ग पुढे थेट विरारला जोडण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) ‘उत्तन-विरार सागरी सेतू’ उभारला जाणार आहे.

मुख्य सागरी सेतूची लांबी: २४.३५ किलोमीटर

इंटरचेंज मार्ग (अंतरबदल मार्ग):३०.७७ किलोमीटर (एकूण ३ मार्ग)

उत्तन इंटरचेंज: ९.३२ किमी

वसई इंटरचेंज: २.५ किमी

विरार इंटरचेंज:१८.९५ किमी

अपेक्षित खर्च: सुमारे ५५ हजार कोटी रुपये

कामाची सद्यस्थिती आणि नियोजन

या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या पर्यावरणीय मान्यतेच्या प्रस्तावाला केंद्र सरकारकडून १३ मार्च रोजी मंजुरी मिळाली आहे. सध्या वन विभागाच्या ‘ना हरकत प्रमाणपत्रा’ची (NOC) प्रतीक्षा असून, हे प्रमाणपत्र मिळताच पुढील निविदा प्रक्रिया सुरू केली जाईल.

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२६ अखेरपर्यंत या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे, तर २०२७ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते वसई-विरार दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान, सुखकर होईल आणि वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळेल.

 

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपकडून १० उमेदवारांची यादी जाहीर

   Follow us on        

नवी दिल्ली, ३१ मे २०२६: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवड समितीने महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकी व नागपूर येथील उपनिवडणुकीसाठी स्थानिक प्राधिकरण निर्वाचन क्षेत्रातून ११ उमेदवारांच्या नावांना मंजुरी दिली आहे.

या यादीत अरुण लखानी (वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली), अविनाश ब्राह्मणकर (भंडारा-गोंदिया), प्रवीण पोते पाटील (अमरावती), धैर्यशील कदम (सांगली-सातारा), राजेंद्र राऊत (सोलापूर), प्राजक्त तनपुरे (अहिल्यानगर), सुहास शिरसाट (छत्रपती संभाजीनगर-जालना), अमर राजुरकर (नांदेड), बसवराज पाटील (धाराशिव-लातूर-बीड) आणि नंदकिशोर महाजन (जळगाव) यांचा समावेश आहे. तर नागपूर उपनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोटदार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

ही निवडणूक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींमार्फत होणार असून, भाजपने आपल्या मजबूत कार्यकर्त्यांना संधी देऊन महायुतीचे पारंपरिक वर्चस्व कायम राखण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. उमेदवारांची ही यादी पक्षाच्या रणनीतीचा भाग असून, आगामी निवडणुकीत भाजपची तयारी दर्शवते.

 

 

मान्सून अद्याप दूर; शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

   Follow us on        

मुंबई:राज्यातील हवामानात सध्या मोठे बदल होण्यास सुरुवात झाली असून, १ जूनपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेशात दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन काही ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच कोकण भागातही काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे. या बदलांमुळे मे महिन्याच्या तुलनेत राज्यातील कमाल तापमानात घट होणार असली, तरी पूर्व विदर्भासह विदर्भातील काही भागांत तापमान ४० अंश सेल्सिअसच्या वरच राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, आगामी काळात होणाऱ्या या वादळी पावसाचा मान्सूनशी कोणताही संबंध नाही. मान्सून अद्याप केरळमध्ये दाखल झालेला नसल्यामुळे, सद्यस्थितीनुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागांत किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता वर्तवण्यात आलेली नाही.

​या पार्श्वभूमीवर, कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत योग्य त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या संभाव्य वादळी पावसावर अवलंबून राहून शेतकऱ्यांनी मान्सूनच्या आगमनापूर्वी कोणत्याही परिस्थितीमध्ये पेरणीची घाई करू नये, असा स्पष्ट सल्ला प्रशासनाने दिला आहे.

तसेच, विजेच्या कडकडाटासह पाऊस होत असताना नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या व आपल्या पाळीव जनावरांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी. वीज पडण्याच्या घटना टाळण्यासाठी अशा वेळी कोणीही झाडाखाली, टिनशेडखाली, विद्युत ट्रान्सफॉर्मर, विजेचे खांब किंवा विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

अधिक मासात तीर्थाटन झाले सोपे! ४० जणांचा ग्रुप बनवा आणि बुक करा स्वतःची स्वतंत्र एसटी!

   Follow us on        

विशेष प्रतिनिधी, मुंबई: हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘एसटी संगे तीर्थाटन’ योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) भाविकांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि आनंददायी निर्णय घेतला आहे. पवित्र मानल्या जाणाऱ्या अधिक मासाचे औचित्य साधून तीर्थक्षेत्रांना भेटी देऊ इच्छिणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर, सुरक्षित आणि सुखकर व्हावा यासाठी महामंडळातर्फे आता थेट स्वतंत्र एसटी बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. ‘एसटी संगे तीर्थयात्रा आता अधिक सुखकर’ या ब्रीदवाक्यासह सुरू असलेल्या या योजनेमुळे भाविकांना त्यांच्या पसंतीच्या तीर्थक्षेत्रांना भेट देणे अत्यंत सोपे होणार आहे.

​या विशेष योजनेच्या नियमांनुसार, जर भाविकांचा किंवा प्रवाशांचा किमान ४० जणांचा गट एकत्र आला, तर त्यांना महामंडळाकडून पूर्णपणे स्वतंत्र बसची सुविधा दिली जाईल. यामध्ये महिला मंडळे, भजनी मंडळे, बचत गट, ज्येष्ठ नागरिकांचे गट किंवा कोणत्याही ४० नागरिकांचा समूह एकत्र येऊन या योजनेअंतर्गत थेट एसटी बस बुक करू शकतो. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, भाविकांच्या मागणीनुसार त्यांना हव्या त्या तीर्थक्षेत्रासाठी ही स्वतंत्र बस उपलब्ध करून दिली जाणार आहे, ज्यामुळे प्रवाशांना कोणत्याही त्रासाशिवाय एकत्र आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता येईल.

​या योजनेमध्ये महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सोयीची विशेष काळजी घेण्यात आली आहे. महिलांसाठी सुरक्षित प्रवास आणि आध्यात्मिक अनुभवासोबतच नियमांनुसार तिकिटात विशेष सवलत दिली जाणार आहे. ‘अर्ध्या तिकिटात सोयीस्कर तीर्थयात्रा’ आणि ‘सुरक्षित व आरामदायी प्रवास’ या वैशिष्ट्यांमुळे या योजनेला भाविकांकडून मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरून या योजनेची माहिती प्रसिद्ध केली असून, इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आणि बस बुकिंगसाठी आपल्या जवळच्या एसटी आगाराशी (डेपो) संपर्क साधावा, असे आवाहन महामंडळातर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत ८२ इमारती ‘अतिधोकादायक’ घोषित; यादी ईथे वाचा

   Follow us on        

मुंबई: पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने दक्षिण मुंबईतील इमारतींचे सर्वेक्षण पूर्ण केले असून, ८२ उपकरप्राप्त इमारती अतिधोकादायक असल्याची यादी प्रसिद्ध केली आहे. या यादीतील ४३ इमारती मागील वर्षीच्या यादीतही समाविष्ट होत्या. पावसाळ्यात दुर्घटना टाळण्यासाठी म्हाडाने या इमारतींमधील रहिवाशांना सुरक्षित स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.

​२१०२ रहिवाशांचे स्थलांतर करण्याचे आव्हान

​या अतिधोकादायक इमारतींमध्ये एकूण २,७३६ रहिवासी (२,२५६ निवासी आणि ४८० अनिवासी) राहत आहेत. यापैकी:

​१७६ रहिवाशांना यापूर्वीच घरे रिकामी करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या होत्या.

​२९ रहिवाशांचे म्हाडाच्या संक्रमण शिबिरात (Transit Camp) यशस्वीरित्या स्थलांतर करण्यात आले आहे.

​३६ रहिवाशांनी स्वतःची पर्यायी व्यवस्था केली आहे.

​उर्वरित २,१०२ रहिवाशांचे पावसाळ्यापूर्वी सुरक्षित ठिकाणी तात्पुरते स्थलांतर करण्याचे मोठे आव्हान आता दुरुस्ती मंडळासमोर उभे ठाकले आहे.

​अपुऱ्या गाळ्यांमुळे मिळणार घरभाडे

​म्हाडाकडे सध्या केवळ ५०० संक्रमण शिबिराचे गाळे उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्या रहिवाशांना गाळे देणे शक्य नाही, त्यांना पर्यायी व्यवस्था म्हणून दरमहा २०,००० रुपये घरभाडे दिले जाणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात अशा जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारती कोसळून मोठी जीवितहानी होण्याची भीती असते. त्यामुळे म्हाडाकडून ही खबरदारीची पावले उचलली जात आहेत.म्हाडाच्या मुंबई इमारत दुरूस्ती आणि पुनर्रचना मंडळाने घोषित केलेल्या सर्व ८२ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संपूर्ण यादी खालीलप्रमाणे आहे:

​काळबादेवी, बोरा बाजार, सॅम्युअल स्ट्रीट आणि परिसर

​१. ३० सी-३० डी, बोमनजी लेन

२. १२०, बोरा बाजार स्ट्रीट

३. १५, तांडेल क्रॉस लेन

४. १००-१०२, कांबेकर स्ट्रीट

५. ७१-७७, सॅम्युअल स्ट्रीट

६. इमारत क्रमांक २३-२७, बनियन स्ट्रीट

७. इमारत क्रमांक ४०, बापू कोर्ट स्ट्रीट

८. इमारत क्रमांक ४०४-४१६, ४१६ ए, शेख मेमन स्ट्रीट, २-१८, के एम शर्मा मार्ग, सी २०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५

९. इमारत क्र. ४०४-डी, काळबादेवी रोड

१०. इमारत क्र. १५७/३, कावेल क्रॉस लेन क्र. ५

११. इमारत क्र. ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट

​गिरगाव, व्ही. पी. रोड आणि जे. एस. एस. रोड परिसर

​१२. इमारत क्र. ३७७-अ, जे. एस. एस. रोड

१३. इमारत क्र. ७-९, रोपा लेन

१४. इमारत क्र. २५, नवरोजी स्ट्रीट

१५. इमारत क्र. २२-३४, व्ही. पी. रोड

१६. इमारत क्र. ५१, फर्स्ट कारपेंटर स्ट्रीट

१७. ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगाव

१८. १६-२२ ए, खत्तर अली लेन, गिरगांव

१९. ११-१३, एम. के. रोड, गिरगांव

२०. ३१६- एबी, ११., व्ही.पी. रोड, गिरगांव

२१. २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव

२२. १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव

२३. ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव

२४. ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव

२५. १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव

२६. १२, (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव

२७. २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव

२८. इमारत क्र. ३१४-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव

२९. इमारत क्र. ५-जे. दुभाष लेन, गिरगाव

३०. इमारत क्र. ६६-६६ए ६८-६८ए, तात्या घारपुरे पथ, गिरगाव

​खेतवाडी, माझगाव, बेलासिस रोड आणि परिसर

​३१. २२ मातृवंदना, खेतवाडी ६ वी लेन

३२. २-८, पाववाला स्ट्रिट

३३. १, खेतवाडी १२ वी लेन, वाघेला कुपर

३४. ४२७- ई. एम. एस. अली. रोड

३५. ३४६-३४८ ए, बेलासिस रोड

३६. ३, राघवजी रोड

३७. २५, ससेक्स रोड, माझगाव

३८. ८६ बी, मापलावाडी मोतीशा लेन, माझगाव

३९. ७-९ ए व १-९, हाथीबाग रोड

४०. १० हाथी बाग रोड

४१. २२, नारळवाडी रोड, माझगाव

४२. ५-१३, उनवाला बिल्डिंग, डी. एन सिंग रोड, हाथी बाग रोड

४३. २६, ससेक्स रोड माझगाव

४४. ७६ टॅंक बंदर रोड

४५. १४५-१५९ दिग्विजय मिल चाळ, काळाचौकी रोड

​मौलाना आझाद रोड, जे. जे. रोड, नागपाडा आणि कामाठीपुरा

​४६. २-१८, बाबुला टॅंक रोड

४७. जगुली बिल्डिंग, इमारत क्र. ३१-३३, शेख हाफिजुद्दीन मार्ग / सांकली स्ट्रीट

४८. गुजरिया बिल्डिंग, इमारत क्र. २४१-२४३, मौलाना आझाद रोड

४९. इमारत क्र. ४४०-४४२, सर जे. जे. रोड

५०. इमारत क्र. ८५-९७, सोफिया झुबेर रोड व १-१५, १ ली पीरखान स्ट्रीट

५१. इमारत क्र. ६७-८१, सोफिया झुबेर रोड

५२. इमारत क्र. ९-११ बी, ८९-१०३, ९५-११५, १०३ए, मौलाना आझाद रोड

५३. इमारत क्र. ५०-६४, मौलाना आझाद रोड

५४. इमारत क्र. ४-६-८, मौलाना आझाद रोड

५५. इमारत क्र. १८०-१९६, डिमटीमकर रोड, १११-१२१, न्यू नागपाडा रोड, मरियम मंझिल

५६. इमारत क्र. १०, मौलाना आझाद रोड

५७. इमारत क्र. १२-२०, मौलाना आझाद रोड

५८. इमारत क्र. ३५, कामाठीपुरा १० वी लेन

५९. इमारत क्र. ६५-११, कामाठीपुरा ११ वी लेन

६०. नूर मंझिल, इमारत क्र. ६४२-६४४, फॉकलंड रोड

६१. लक्ष्मी बिल्डिंग, इमारत क्र. ८८-९०, ९०-९२, क्लेअर रोड

६२. इमारत क्र. १४-ABCD, रिटेबल स्ट्रीट

​एलफिस्टन रोड, सातरस्ता, लोअर परळ आणि ना. म. जोशी मार्ग

​६३. इ.क्र. १०० डी न्यू स्टार मेन्शन, के.के. रोड

६४. कोळी चाळ नं. ३-३ ए, गणपतराव कदम मार्ग

६५. ३८-४०-४० ए, लक्ष्मी बिल्डिंग, भाउसाहेब तोडणकर मार्ग, एलफिस्टन रोड

६६. १०० ई, मेहर लॉज, के. के. रोड, सातरस्ता

६७. ३७३ ए साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग

६८. १४ फितवाला बिल्डिंग, एलफिस्टन रोड

६९. ९८ हाजी कासम चाळ, शाहीर अमर शेख मार्ग

७०. १४-१४ ए, १६-१६ ई, खरास बिल्डिंग, ना म जोशी मार्ग

७१. ४८, विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड

७२. ४६ दया विरा बिल्डिंग, जगन्नाथ भातणकर रोड

​दादर (पूर्व आणि पश्चिम) व माहीम परिसर

​७३. ८-८ सी, २६- २६ एफ, कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड नं. ५, दादर (पश्चिम)

७४. ४३- ४५, गोरेगावकर वाडी, पोतुगीज चर्च रोड, दादर (पश्चिम)

७५. हेदवकर वाडी क्र.२, द. स. बाबरेकर मार्ग, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम)

७६. ३६, कुबल निवास, गोखले रोड, दादर (पश्चिम)

७७. इमारत क्र. ३९-३९ अ व ४१-४१ ए, इलम महल, एस. के. बोले. रोड, दादर (पश्चिम)

७८. इमारत क्र. २० जमाल हाऊस, दर्गा स्ट्रिट, माहिम

७९. इमारत क्र. ७ अअ, आनंद भुवन (जुनी) शिवाजी पार्क, रोड क्र. ४, दादर (पश्चिम)

८०. इमारत क्र. २७४-२७४ ए, मिनर्वा बिल्डींग, माधवदास पास्ता रोड, दादर (पूर्व)

८१. इमारत क्र. १८४-१८४ एफ, मिनर्वा मेन्शन, डॉ. बी. ए. रोड, दादर (पूर्व)

​(टीप: मूळ माहितीत अनुक्रमांक २० वगळला गेला असल्यामुळे एकूण अधिकृत ८१ नोंदणीकृत इमारतींची नावे यादीत स्पष्ट आहेत, मात्र म्हाडाच्या एकूण आकडेवारीनुसार ८२ इमारती घोषित करण्यात आल्या आहेत.)

Breaking:११ वी प्रवेशासाठी मूळ मार्कशीट, एलसीची अट शिथिल; शिक्षण विभागाचे आदेश

   Follow us on        

पुणे: महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून, २९ मे २०२६ पासून नियमित फेरी-०१ अंतर्गत प्रवेश निश्चितीची प्रक्रिया अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. या फेरीत प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी देखील याच दिवशी जाहीर करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी शिक्षण संचालनालयाने एक महत्त्वाचा दिलासा दिला आहे.

​कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश निश्चित करताना इयत्ता १० वी उत्तीर्ण मूळ गुणपत्रक (Marksheet) आणि शाळा सोडल्याचा दाखला (Leaving Certificate) सादर करणे सध्या अनिवार्य असणार नाही, असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भातील परिपत्रक शिक्षण संचालनालयाने (माध्यमिक व उच्च माध्यमिक) प्रसिद्ध केले असून, त्यावर शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांची डिजिटल स्वाक्षरी आहे.

​राज्य मंडळाचा इयत्ता १० वीचा निकाल जाहीर झाला असला, तरी कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रवेश फेऱ्या सुरू होईपर्यंत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मूळ गुणपत्रकांचे वाटप करण्यात आलेले नाही. दस्तऐवज हातात नसल्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याचा प्रवेश प्रक्रियेत अडथळा येऊ नये, म्हणून शिक्षण विभागाने हा मध्यवर्ती मार्ग काढला आहे. पहिल्या फेरीत मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी मूळ कागदपत्रांऐवजी तात्पुरती सवलत देण्यात आली आहे.

​या सुविधेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात एक लेखी हमीपत्र सादर करणे आवश्यक आहे. यामध्ये ‘बोर्डाकडून मूळ गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला प्राप्त झाल्यानंतर तो महाविद्यालयात वेळेत सादर केला जाईल’ असे नमूद करावे लागेल. मात्र, दिलेल्या मुदतीत ही कागदपत्रे सादर न केल्यास संबंधित विद्यार्थ्याचा कनिष्ठ महाविद्यालयातील प्रवेश रद्द केला जाईल, याची स्पष्ट जाणीव कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना करून द्यावी, अशा सूचना राज्यातील सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक आणि प्राचार्यांना देण्यात आल्या आहेत.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search