Ganesh Chaturthi 2024: गणेशभक्तांसाठी ‘अटलसेतू’ टोलमुक्त करावा अशी मागणी होत आहे.
मुंबई – गोवा महामार्गचे काम चालू असल्यामुळे गोरी – गणपती सणास आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांचा प्रवास त्रासदायक होऊ नये म्हणून गेली काही वर्षे मुंबई – (पूणा ) बेंगलोर महामार्ग गौरी – गणपती सणात टोल मुक्त केला जातो. तसाच “अटल सेतू” टोल मुक्त करण्यासाठी प्रयत्न करावा अशी मागणी गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघाने रायगड रत्नागिरी पालकमंत्री मान. उदय सामंत यांचकडे करण्यात आली.
गौरी – गणपती सणास कोकणात आपल्या गावी जाणाऱ्या गणेशभक्त प्रवाशांच्या सोयीसाठी एस. टी. महामंडळाच्या सहकार्याने गणेशभक्त कोकणवासीय प्रवासी संघाने १२०० पेक्षा जास्त एस. टी. गाड्यांचे नियोजन केले आहे. इतर काही संस्था, राजकीय कार्यकर्ते, आणि एस. टी. महामंडळही जादा गाड्यांचे नियोजन करतात. एस. टी. महामंडळाने ३००० पेक्षा जास्त गाड्यांचे नियोजन केल्याचे समजते. तसेच छोटया गाड्यांचेही प्रमाण जास्त असते, मुंबईत अनेक ठिकाणी रस्ता, पूल, मेट्रो अशी कामे सुरु आहेत.त्याच कालावधीत श्री गणेश आगमनाच्या मिरवणूकाही निघतात. वाहतूकीची कोंडी होते, जर अटल सेतू मार्ग टोल मुक्त केल्यास मुंबईतून निघणाऱ्या एस. टी. गाड्या, व इतरही गाड्या अटलसेतू मार्गे जातील. त्यामुळे वाहतूकीची कोंडी होणार नाही, प्रवाश्यांचा वेळही वाचेल, हे मान. मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून दिले. माजी आमदार मान. तुकाराम काते यांनी मंत्री महोदयांची भेट घडवून आणली. गणेशभक्त कोकवासीय प्रवासी संघांचे अध्यक्ष रविंद्र मुकनाक, कार्याध्यक्ष -दीपक मा. चव्हाण, कोषाध्यक्ष- विश्वनाथ मांजरेकर, प्रमुख संघटक- अनिल काडगे, अशोक नाचरे, अजित दौडे, संतोष कासार, शंकर नाचरे आदी उपस्थित होते. प्रवासी संघाच्या वतीने कार्याध्यक्ष- दीपक चव्हाण यांनी आपल्या मागणीचे सविस्तर विश्लेषण केले. सकारात्मक चर्चा झाली. दिनांक १८/०८/२०२४ रोजी होणाऱ्या स्नेह संमेलास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याचे निमंत्रणही प्रवासीसंघाच्या वतीने देण्यात आले.
सावंतवाडी: सावंतवाडी स्थानकावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खुशखबर आहे. सावंतवाडी रेल्वे स्थानकावर प्रवासी तिकीट आरक्षण खिडकी आता सकाळी ८ ते संध्याकाळी ८ अशी १२ तास खुली राहणार आहे. या आधी ती सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत खुली असायची. आता ती १२ तास खुली राहणार असल्याने प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
प्रवासी संघटनेच्या प्रयत्नांना यश
खरेतर सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून आंबोली-चौकुळ, कलंबिस्त-शिरशिंगे, शिरोडा, रेडी , दोडामार्ग आणि वेंगुर्ल्यातील गावे अशा मोठ्या पट्ट्यातील प्रवासी प्रवास करतात. अर्धवेळ तिकीट आरक्षण खिडकीमुळे दुरून येणाऱ्या प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. त्यामुळे या स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ चालू करावी अशी मागणी येथील कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडी तर्फे करण्यात येत होती. दिनांक ९ ऑगस्ट रोजी सुशोभीकरणाच्या कार्यक्रमात खासदार नारायण राणे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली होती. यावेळी संघटनेच्या विविध मागण्याचे निवेदन सादर करून त्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या अशी विनंती केली गेली होती. या निवेदनात स्थानकावरील आरक्षण खिडकी पूर्णवेळ सुरु करावी या मागणीचा समावेश होता. त्यांच्या विनंतीला मान देऊन खासदार नारायण राणे यांनी रेल्वे प्रशासनाला तशा सूचना दिल्या होत्या. त्यामुळे प्रवासी संघटनेने त्यांचे आभार मानले आहेत.
ठाणे : “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना कायमस्वरूपी राबविली जाणार असून या योजनेचा पहिला हप्ता दि.17 ऑगस्ट रोजी जमा होणार असून राज्यातील १ कोटीपेक्षा जास्त महिलांना यांचा लाभ मिळणार आहे, असे विधान महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने शहापूर येथे महिला संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी मंत्री आदिती तटकरे बोलत होत्या. यावेळी आमदार दौलत दरोडा, माजी खासदार आनंद परांजपे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) संजय बागूल, महिला आर्थिक व विकास महामंडळाच्या जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते, कायापालट लोकसंचलित केंद्राच्या पदाधिकारी, महिला बचतगट व अंगणवाडीच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे म्हणाल्या की, “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत जुलै व ऑगस्ट या दोन्ही महिन्यांचे पैसे दि. १७ ऑगस्ट रोजी संबंधित लाभार्थी महिलेच्या खात्यावर थेट जमा होणार आहेत. “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजना तयार करताना डोळ्यासमोर एकच हेतू होता, गरजू महिलांना हक्काचे पैसे मिळावेत. कुटुंबाच्या गरजा भागवताना महिलांच्या अनेक इच्छा अपूर्ण राहतात. त्या इच्छा “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण” योजनेतून पूर्ण होणार आहेत. या पैशावर फक्त महिलांचाच अधिकार असावा म्हणून महिलांचे स्वतंत्र बॅक खाते ही अट ठेवली आहे. ज्या महिलांनी बॅक खाते काढले नसेल त्यांनी तात्काळ बॅक खाते काढून ३१ ऑगस्टपूर्वी “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचा अर्ज भरावा.
कोविड काळात अंगणवाडी सेविकांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना आपण ग्रॅज्युएटी देणार आहोत. तसेच केंद्र शासनाकडे मानधन वाढीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. १ लाख १४ हजार महिला स्मार्टफोन देण्यात आले आहे. ४ लाखापेक्षा जास्त शालेय गणवेश शिवण्याचे काम महिला बचतगटांना देण्यात आले आहे. त्यातून प्रत्येक गणवेश शिवण्यामागे प्रत्येक महिलेला ११० रुपये मिळत आहे. यातून महिलांना रोजगार मिळत आहे. अंगणवाडी सेवकांना “मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण” योजनेचे प्राप्त अर्ज भरल्यास प्रत्येक अर्जासाठी ५० रुपये देण्यात येत आहेत, असेही यावेळी मंत्री तटकरे यांनी सांगितले.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार दौलत दरोडा यांनी कायापालट लोकसंचलित केंद्र चांगले काम करीत असून यातून अनेक महिलांना रोजगार मिळाला आहे. हे केंद्र करीत असलेल्या कामकाजासाठी शासनाकडून प्रशासकीय खर्चाची तरतूद करण्यात यावी, अशी विनंती त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी खासदार आनंद परांजपे म्हणाले की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व पात्र महिलांनी अर्ज भरून घ्या. अफवांवर विश्वास ठेवू नका. ही योजना कायमस्वरूपी सुरु राहणार आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विजया गवारी यांनी केले.
Senior citizens lower birth quota:भारतीय रेल्वे कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. भारतीय रेल्वेने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी लोअर बर्थ आणि साईड लोअर बर्थ आता राखीव ठेवणार आहे.
ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांना रेल्वे प्रवासात मधील Middle किंवा वरचा Upper बर्थ खूपच गैरसोयीचा ठरत आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी लोअर बर्थ राखीव ठेवावे याची मागणी वाढत होती. या मागणीची दखल घेऊन रेल्वे प्रशासनाने ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी सर्व सर्व शयनयान श्रेणींच्या डब्यांचे लोअर बर्थ आणि साईड लोअर बर्थ आता राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्लीपर क्लासमध्ये ६ ते ७ लोअर बर्थ, थ्री टीयर एसी कोचमध्ये ४ ते ५ लोअर बर्थ आणि टू टीयर एसी कोचमध्ये ३ ते ४ लोअर बर्थ ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि गरोदर महिलांसाठी राखीव असतील. या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच करण्यात येईल असे रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.
Mumbai Local:मुंबई, ठाणे, विरार, डहाणू, एमएमआर आणि कोकणातील मिळून आठ प्रवासी संघटना एकत्र येवून मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक संयुक्त संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. उपनगरीय रेल्वे सेवा सुधारण्यासाठी तसेच मुंबई उपनगरीय रेल्वे प्रणालीचे “ट्रान्सपोर्ट फॉर मुंबई” या स्वतंत्र, संस्थेत विलीनीकरण करण्याची मागणी करण्यात बाबत या सभेत चर्चा करण्यात आली.
शहरातील प्रवासी संघटनांनी येत्या २२ ऑगस्ट रोजी मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांची प्रचंड गर्दी, गर्दी आणि गैरसोय यांसारख्या प्रश्नांवर लक्ष वेधण्यासाठी White Wear “पांढरा पेहेराव” आंदोलनाचे नियोजन केले आहे.
मेल आणि एक्स्प्रेसऐवजी लोकल गाड्यांना प्राधान्य द्यावे, ब्रेकडाऊनची समस्या उद्भवल्यास प्रवाशांना सतर्क करणे, मार्गिका विस्ताराच्या धीम्या गतीच्या कामांना गती देणे, मुंबई उपनगरीय सेवांच्या समन्वयासाठी स्वतंत्र संयुक्त प्राधिकरण परिवहन मुंबई (ToM) तयार करणे यासह अनेक मागण्या रेल्वे प्रशासन, केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सर्वात जुन्या आणि सर्वात मोठ्या प्रवासी संघटनांपैकी एक असलेल्या मुंबई रेल प्रवासी संघाचे उपाध्यक्ष सिद्धेश देसाई यांनी दिली.
ठाणे-कल्याण मार्गावर जास्त गर्दीमुळे मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. रेल्वेने नवीन नॉन-एसी लोकल गाड्या खरेदी कराव्यात आणि ठाणे आणि कल्याणच्या पलीकडे सेवा वाढवावी. तसेच टिटवाळा आणि बदलापूरपर्यंत 15-कार डब्यांच्या लोकल चालविण्यात याव्यात, कळवा-ऐरोली रेल्वे लिंकचे काम जलद करावे आणि दिवा-वसई कॉरिडॉरवर उपनगरीय सेवा चालवाव्यात, ज्याला काही वर्षांपूर्वी उपनगरीय विभाग म्हणून वर्गीकृत करण्यात आले होते असे यावेळी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष लतादीदी अरगडे यावेळी म्हणाल्यात.
यावेळी मुंबई रेल्वे प्रवासी संघ, उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघ, कळवा पारसिक प्रवासी संघटना, डहाणू पालघर रेल्वे प्रवासी संघटना, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना, डोंबिवली ठाकुर्ली कोपर रेल्वे प्रवासी संघटना, दिवा प्रवासी प्रवासी संघटना, संघर्ष कोकण रेल्वे प्रवासी संघटना अशा आठ संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
मुंबई :रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हा सर्वांगीण विकास परिषदेची सभा काल दिनांक ११ ऑगस्ट रोजी मुंबईत पार पाडली.
या सभेला कार्यसम्राट आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकर यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले व सर्वतोपरी मदत करण्याचे त्यांनी वचनच दिले. भाषणात त्यांनी कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत त्वरित विलीनीकरण होणे आवश्यक आहे, गोवा महामार्ग त्वरित पूर्ण झालाच पाहिजे, कोकणच्या पर्यटनाच्या विकासाच्या दृष्टीने बोट वाहतूक पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे तसेच कोकणातील सर्वच बंदरांचा मांडवा बंदरा प्रमाणे विकास होणे आवश्यक आहे व तेथे सर्वसोई सुविधा उपलब्ध होणे आवश्यक आहे त्यामुळे भारतातील व परदेशीय पर्यटक मोठ्या प्रमाणात पर्यटनासाठी कोकणात येतील, त्यामुळे अनेक प्रकारचे रोजगार निर्माण होतील.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी म्हणाल्या प्रमाणे भारतातील प्रत्येक जिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज निर्माण करून त्यामध्ये मातृभाषेतून शिक्षण दिलेगेले पाहिजे त्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सुधारणा होतील तळागाळातील समाजातील हुशार मुले डॉक्टर होतील त्याची सुरुवात सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातून या वर्षापासुन सुरू होईल असे ते यावेळी म्हणाले.
संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष माननीय श्री श्रीकांत सावंत यांनी कोकण रेल्वेचे विलीनीकरण व सावंतवाडी टर्मिनस होणे का जरूरी आहे याचा आपल्या भाषणात प्राधान्याने तसेच प्रभावीपणे उल्लेख केला तसेच यासाठी सर्व कोकणवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले. यासोबत इतर मान्यवरांनी तसेच उपस्थित असलेल्या सदस्यांनी आपले विषय तसेच मते मांडली.
सभेला विलास राणे वडाळा विधानसभा क्षेत्र प्रमुख,माजी नगरसेवक सुनील मोरे,मुकुंद पडियाल,नामदेव मठकर निवृत्त सुप्रिटेंड जिल्हा व सत्र न्यायालय सिंधुदुर्ग जिल्हा,ऍड योगिता सावंत,पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते प्रकाश कदम,कोकणातील अनेक संस्थांचे कार्यकर्ते उपस्थित होते,सभेचा समारोप करताना संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत सावंत यांनी सर्वांचे उपस्थित राहिल्या बद्दल धन्यवाद दिले व आभार मानले व पुढील काळात सर्वच कोकनवासीयांनी आपले राजकीय मतभेद विसरून एकत्रित येऊन कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी कार्य करूया असे आवाहन केले
Special train for Independence day: येत्या स्वातंत्र्यदिनी कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्यांचे आरक्षण फुल झाल्याने मध्य रेल्वेने या मार्गावर एक विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. एलटीटी ते मडगाव दरम्यान ही गाडी चालविण्यात येणार असून या गाडीच्या दोन्ही बाजूने एकूण चार फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
०११४९/०११५० एलटीटी – मडगाव – एलटीटी विशेष (एकूण ४ फेर्या)
गाडी क्रमांक ०११४९ विशेष ही गाडी एलटीटी येथून गुरुवार दिनांक १५ ऑगस्ट रोजी आणि शनिवार दिनांक १७ ऑगस्ट रोजी रात्री २१.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०.०० वाजता मडगाव येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११५० विशेष मडगाव येथून शुक्रवार दिनांक १६ ऑगस्ट रोजी आणि रविवार दिनांक १८ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजता सुटेल ती रात्री ००.४० वाजता एलटीटी येथे पोहोचेल.
Follow us on Mumbai Goa Highway:कोकणातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. रेल्वेचे आरक्षण आधीच फुल झाल्याने मोठ्या उत्साहाने कोकणात गावी जाणाऱ्या कित्येक गणेश भाविकांकडे रस्ते वाहतुकीचा पर्याय राहिला आहे. साहजिक दरवर्षीप्रमाणे मुंबई गोवा महामार्गावर मोठ्याप्रमाणात गणेश चतुर्थी दरम्यान वाहतूक होणार आहे. मात्र सध्याची महामार्गाची परिस्थिती पाहता गणेशोत्सवात प्रवास करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. महामार्गाच्या या परिस्थितीकडे कोंकण विकास समिती व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीने राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी महामार्गाच्या दुर्दशेच्या फोटो पुराव्यासहित पत्रव्यवहार केला आहे.
“आपण मुंबई गोवा हायवे दुर्दशेबाबत स्वतःहून लक्ष घालून सहयाद्री अतिथी गृह येथे बैठक घेऊन नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया तसेच राष्ट्रीय महामार्ग (सा.बा.) चे अधिकारी यांना खड्डे बुजविने तसेच खड्डे बुजविणेसाठी कोणत्या प्रतीचे मटेरियल वापरावे याबाबत स्पष्ट आदेश देवूनही पूर्तता होत नसलेने एकंदरीत मुंबई गोवा हायवे संबंधात आपणाकडून स्पष्ट आदेश होऊनही पूर्तता होत नसलेने कोंकणात लवकरच साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सव उत्सवाचे महत्त्व लक्षात घेऊन आपण मुंबई गोवा हायवे पाहणी दौरा करावा अशी नम्र विनंती आहे. कोंकण विकास समितीचे सदस्य व मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समितीचे सह सचिव श्री चैतन्य उषा लक्ष्मण पाटील यांनी स्वखर्चाने तसेच कोंकण विकास समितीचे सदस्य श्री अक्षय मधुकर महापदी तसेच श्री सुधीर सापळे यांनी दिनांक २८.०७.२०२४ ते ०७.०८.२०२४ रोजी केलेले पाहणीत तसेच सोबत जोडलेले पीडीएफ मधील फोटो वरून दिसत आहे. या पाहणीत कासू ते माणगाव मार्गावर ४७ तर कासू ते पळस्पे मार्गावर ६९ ठिकाणी गंभीर स्वरूपाचे खड्डे आढळले” अशा आशयाचे पत्र ई-मेल द्वारे संबधीत लोकप्रतिनिधींना पाठविण्यात आले आहे.
Vande Bharat Express: वंदे भारत ट्रेनचे कोचही वाढण्यास सुरुवात केली असून काल ९ ऑगस्ट रोजी देशात पहिल्यांदाच २० डबे असलेली वंदे भारत ट्रेन धावली. अहमदाबाद येथून आज सकाळी ७ वाजता या ट्रेनची चाचणी घेण्यात आली. अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या पहिल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल रन सुरू झाली आहे.
२० कोच असलेली पहिली वंदे भारत ट्रेन ताशी १३० किलोमीटर वेगाने चालवली जात आहेआत्तापर्यंत देशातील मोठ्या शहरांमध्ये १६ कोच आणि लहान शहरांमध्ये ८ कोच असलेली धावते. आतापर्यंत अहमदाबाद ते मुंबई दरम्यान प्रत्येकी १६ कोचच्या दोन वंदे भारत ट्रेन धावत होत्या. मात्र, आजपासून अहमदाबाद ते मुंबई दरम्यान २० कोच असलेल्या वंदे भारत ट्रेनची ट्रायल सुरू झाली आहे. वंदे भारत ट्रेनच्या या चाचण्या यशस्वी झाल्या तर कालांतराने लोकांना २० कोच असलेल्या ट्रेनमध्ये प्रवास करण्याचा लाभ मिळणार आहे. सध्याच्या १६ कोचच्या ट्रेनमध्ये ११२८ प्रवासी असतात, ज्यामध्ये प्रत्येकी ५२ सीट आहेत. नवीन २० कोचच्या ट्रेनची क्षमता सुमारे २५ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे अधिक प्रवासी एकत्र प्रवास करू शकतील.याशिवाय वंदे भारत ट्रेनचा वेग वाढवणे हा देखील या चाचणीचा उद्देश होता , सध्या वंदे भारत ट्रेनचा वेग ताशी १२०-१३० किमी आहे, तो ताशी १६० किमीपर्यंत वाढवण्याचे रेल्वेचे उद्दिष्ट आहे.