ICCW RBI | तुम्ही एटीएमवर गेलाय अन् डेबीट कार्ड जर विसरला असाल तर? चिंता करण्याचं कारण नाही. तुम्ही युपीआयच्या माध्यमातून आता एटीएममधून पैसे काढू शकता.
२०२२मध्ये आरबीआयने आयसीसीडब्लू नावाची सुविधा सुरु केलीय. ज्यात आपण डेबीट कार्ड न वापरता युपीआय थ्रू एटीएम मशीनमधून पैसे काढू शकतो.
यासाठी तुम्हाला फक्त एक प्रोसेस फॉलो करावी लागते. सर्वात पहिलं तुम्ही एटीएम मशीवर एटीएम कॅश विल्ड्राल या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला जी रक्कम हवी आहे ती टाका, त्यानंतर क्युआर कोड जनरेट होईल.
जनरेट झालेल्या क्युआर कोडला तुमच्या युपीआय ॲपवरुन स्कॅन करा आणि युपीआय पीन टाका. त्यानंतर ‘प्रेस हिअर फॉर कॅश’ पर्यायावर क्लिक करा. तुम्ही टाकलेली रक्कम तुम्हाला एटीएम मशीनमधून मिळेल.
ही सुविधा वापरण्यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाही. युपीआयचा वापर करुन तुम्ही दोन वेळा दिवसांत असे पैसे काढू शकता. तसेच प्रत्येक ट्रान्जेक्शनला तुम्ही जास्तीत जास्त ५ हजार रुपये काढू शकता.
Mansoon Alert : उकाड्याने हैराण झालेल्या कोकणवासीयांसाठी तसेच पेरणीसाठी पावसाची चातकाप्रमाणे वाट पहाणार्या शेतकर्यांसाठी कोकणवासियांसाठी एक आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्रात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अशात चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे मान्सूनचा मार्ग मोकळा झाली आहे. यामुळे राज्यात पुढच्या ३ दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या मुंबई आणि नागपूर केंद्राने यासंबंधी माहिती दिली आहे. तर भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंबंधी ट्वीट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी लिहलं की, ‘२३ जूनपासून कोकणातील काही भागांत, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर २४-२५ जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. दरम्यान, मराठवाडामधील काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
21 Jun: @RMC_Mumbai & @imdnagpur ने 23 जूनपासून कोकणातील काही भागात, मध्य महाराष्ट्र व विदर्भात ; 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे. मराठवाडा मधील काही भागात मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता. IMD GFS guidance for 23 -25 June indicates same. pic.twitter.com/ZzbS3WRNjI
Mumbai Goa Vande Bharat |कोकण रेल्वे मार्गावर दिनांक 27 जून पासून वंदे भारत एक्सप्रेस चालू होत आहे. अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान वापरून आणि अनेक सुविधा असलेली ही गाडी नेमकी कशी असेल याची उत्सुकता सर्व कोकणवासीयांना आणि गोवेकरांना लागून राहिली आहे. खरे सांगायचे तर अगदी विमानात मिळणाऱ्या सुविधा या रेल्वेत देण्यात आल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेसमध्ये असलेल्या सुविधांचा घेतलेला हा विशेष आढावा..
काय आहेत सुविधा
या ट्रेनमध्ये प्रत्येक सीटसाठी स्वतंत्र मोबाईल चार्जिंगची सुविधा
जेवण किंवा नाश्ता करण्यासाठी फोल्डेबल कॉम्पॅक्ट टेबल
कोकणातील निसर्गरम्य दृश्य पाहण्यासाठी रोटेट चेअरही आहे
मोबाईल किंवा कॅमेरात विहंगम दृश्य टिपण्याचा आनंद
अगदी विमानात प्रवास करावा अशा पद्धतीच्या अद्ययावत सुविधा
पारंपारिक डब्यांपेक्षा सामान ठेवण्यासाठी जास्त जागा उपलब्ध
प्रत्येक डब्यात प्रवाशांना आवश्यक ती माहिती देण्यासाठी संपर्क यंत्रणा (GPS आधारित ऑडिओ-व्हिज्युअल पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम) लावण्यात आलेली असून त्यामध्ये 32 इंची एलसीडी टीव्हीसुद्धा समाविष्ट आहे.
मनोरंजनाच्या उद्देशाने ऑन-बोर्ड हॉटस्पॉट वाय-फाय आणि अतिशय आरामदायक आसनव्यवस्था. बाहेरील उष्णता आणि आवाज नियंत्रित ठेवण्यासाठी इन्सुलेशन.
प्रकाशयोजना संयुक्त आणि वैयक्तिक अशा दोन्ही स्वरुपात उपलब्ध. इलेक्ट्रिक बिघाड झाल्यास ट्रेनच्या प्रत्येक डब्यात चार आपत्कालीन दिव्यांची सोय.
अत्याधुनिक प्रणाली असलेल्या शौचालयांची डब्यात सुविधा.
अर्थातच यातील काही सुविधांमध्ये श्रेणीनुसार फरक असेल. उदाहरण द्यायचे झाले तर रोटेट चेअरची सुविधा फक्त एक्झिक्युटिव्ह श्रेणीच्या डब्यांत उपलब्ध असेल.
“पाणी पाहिजे असेल तर गाडयांना थांबा द्या…” वंदे भारत एक्सप्रेसला थांबा न दिल्याने ही धमकी चिपळूण येथील प्रवाशांनी दिली आहे
चिपळूण:कोकण रेल्वे प्रशासन या मार्गावर धावणार्या रेल्वेगाड्यांसाठी पाणी चिपळूण येथील वाहणार्या वाशिष्ठी नदीतून उचलते. पाण्यासाठी रेल्वेगाड्या थांबत असताना प्रवाशांसाठी थांबा का नाही, असा सवाल कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे उपस्थित केला. कोकण रेल्वेसाठी जमीन, पाणी आमचे असल्याने वंदे भारत रेल्वेला चिपळूणच्या स्टेशनवर थांबा मिळालाच पाहिजे, अन्यथा जलसंपदा विभागाकडे रेल्वेसाठी जे पाणी दिले जाते ते बंद करण्याची मागणी करण्यात येईल व रेल्वेचे पाणी आम्ही बंद करू, असे प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, कोकणात चिपळूण रेल्वेस्थानकावर २५ तर मालवाहतुकीच्या किमान १० गाड्या थांबतात. जवळपास प्रवासी व मालवाहतूक अशा एकूण ३५ गाड्या येथून जावून येवून आहेत. ४ वर्षापूर्वी वाशिष्ठी नदीचे पाणी कोकण रेल्वेच्या गाड्यांमध्ये भरण्यासाठी घेवू नये, असे ठरले असताना रेल्वे प्रशासनाने ६ बोअरवेल स्थानक परिसरात मारल्या आहेत. त्या सहाही बोअरवेलचे पाणी रेल्वे गाड्यांना भरण्यासाठी कमी पडत होते. त्यामुळे जलसंपदा विभागाकडून रेल्वे प्रशासनाने वर्षाला ७ कोटी ३० लाख लिटर पाणी नदीतून उचलण्याची परवानगी घेतली होती.या बदल्यात केवळ ८० हजार रुपये वर्षाला कोकण रेल्वे जलसंपदा विभागाला भरत आहे.
दोडामार्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात काल वाघाने म्हशीवर हल्ला केल्यामुळे येथील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की काल सोमवारी तेरवण मेढे येथील शेतकरी लक्ष्मण घाटू काळे हे आपली गुरे चरवण्यासाठी सायंकाळी मेढे येथे माळरानावर गेले होते. सुमारे 4.30 च्या सुमारास अचानक एका पट्टेरी वाघाने एका म्हशीवर हल्ला चढविला. म्हशीच्या केलेल्या मोठ्या ओरड्याने जवळपास असणारे गुराखी लक्ष्मण यांनी तेथे धाव घेतली. समोरचे चित्र पाहून त्यांची भीतीने गाळण उडाली. एक पट्टेरी वाघाने एका म्हशीची मान आपल्या जबड्यात पकडली होती आणि म्हैस जिवाच्या आकांताने सुटकेचा प्रयत्न करत होती. हा प्रकार पाहून लक्ष्मण यांनी मोठ मोठ्याने ओरडा केल्याने वाघाने म्हशीला सोडून धूम ठोकली.
म्हशीच्या मानेत वाघाचे दात घुसल्याने रक्तस्त्राव झाला होता. मात्र आता उपचार केल्याने तिच्या जिवावरचा धोका टळला आहे. या प्रकारामुळे येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Odisha Train Accident : बालासोर रेल्वे अपघात चौकशी प्रकरणी एक मोठी बातमी आहे. या प्रकरणात याआधी चौकशी करण्यात आलेला रेल्वेचा जुनियर इंजिनीअर आमीर खान अचानक कुटुंबासहित गायब झाला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की आमीर खान याची याआधी अपघात प्रकरणी सीबीआयने चौकशी केली होती. मात्र त्यानंतर तो कामावर रुजू झाला नाही होता. संशय आल्याने सीबीआयने चौकशीसाठी पुन्हा तो ज्या भाड्याच्या घरात राहत होता ते घर गाठले असता तो फरार असल्याचे दिसून आले. त्याचा घराला कुलूप लावले होते. शेजाऱ्यांकडे चौकशी केली असता तो आणि त्याचे कुटुंब अचानक गायब झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
सीबीआयने तो राहत असलेले घर सील करून त्यावर पाळत ठेवली आहे. सीबीआय फरार इंजिनीअर आमीर खान आणि त्याच्या कुटुंबाचा शोध घेत आहेत.
बालासोर येथील भीषण रेल्वे अपघातात 292 प्रवाशांनी आपला जीव गमावला होता तसेच बरेच प्रवासी जखमी झाले होते. हा अपघात की घातपात याची चौकशी करण्यासाठी सीबीआयला पाचारण करण्यात आले होते.
सिंधुदुर्ग : तळकोकणातील सातुळी तिठा येथे काल उशिरा वाहतूक शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करून बेकायदा गोवा बनावटीची दारु वाहतूक केल्याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून दारू सह ११ लाख २ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
याबाबत अधिक माहिती अशी की, यातील संशयित दोघे आपल्या ताब्यातील महेंद्रा बोलेरो पिकअप घेवून सावंतवाडीहून कोल्हापुरच्या दिशेने चालले होते. यावेळी त्या ठिकाणी ड्यूटी बजावत असलेल्या वाहतूक पोलिस प्रविण सापळे यांना त्यांची हालचाल संशयास्पद दिसली. यावेळी त्यांनी त्या दोघांना थांबवून गाडीची तपासणी केली असता गाडीत मोठ्या प्रमाणात दारू आढळून आली. या प्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समाधान आनंद व्हनमाने (२१), बिरुदेव उर्फ बिरुजानू खरात (२४, दोघेही रा.सांगोला) अशी त्यांची नावे आहेत .
Konkan Railway News : पुढील दोन दिवसांत कोकण रेल्वे मार्गाने प्रवास करणार्या प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. रत्नागिरी ते वैभववाडी दरम्यान मालमत्तेच्या देखभालीच्या कामासाठी कोकण रेल्वे मार्गावर बुधवारी दिनांक 21/06/2023 रोजी सकाळी ७.३० ते १०.३० या कालावधीत तीन तासांचा मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
या गाड्या खालीलप्रमाणे
1) गाडी क्र. 11003 दादर – सावंतवाडी रोड तुतारी एक्स्प्रेसचा 21/06/2023 रोजी सुरू होणारा प्रवास रोहा – रत्नागिरी विभागादरम्यान 02:30 तासांसाठी नियंत्रित केला जाईल.
2) दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 16346 तिरुवनंतपुरम सेंट्रल – लोकमान्य टिळक (टी) “नेत्रावती” एक्सप्रेस उडुपी – कणकवली विभागादरम्यान 03:00 तासांसाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल.
3) दि. 20 जून रोजी सुटणारी गाडी क्र. 10106 सावंतवाडी रोड – दिवा एक्सप्रेस सावंतवाडी – कणकवली विभागादरम्यान अर्ध्या तासासाठी नियंत्रित वेगाने चालवली जाईल
Mumbai -Goa Vande Bharat Express | बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा सेमी-हाय-स्पीड वंदे भारत ट्रेनचे उद्धाटन दिनांक २७ जून रोजी होणार आहे.
मुंबई-गोवा वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून सुरु होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकृत सुत्रांनी दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 जून रोजी एकाच वेळी गोवा-मुंबईसह पाच वंदे भारत एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखवतील.
वंदे भारतचे उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते विडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे होणार आहे. मुंबई-गोवा वंदे भारत एक्सप्रेस सोबत बेंगळुरू-हुबळी-धारवाड, पाटणा-रांची, भोपाळ-इंदूर, भोपाळ-जबलपूर या पाच वंदे भारत ट्रेन 27 जूनपासून धावणार आहेत.
वेळापत्रक
मुंबईहून सकाळी ५.२५ वाजता सुटेल ती मडगाव स्थानकावर दुपारी १.१५ वा. पोहोचेल.
मडगावहून दुपारी २.३५ वाजता सुटेल ती मुंबईत ‘सीएसटी’वर रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.
वंदे भारत ट्रेन आठवड्यातून 6 दिवस धावेल, तिची सेवा शुक्रवारी बंद असेल प्रमुख थांबे : दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली, थिवी.
Prime Minister Modi to flag off five new Vande Bharat trains on June 27
Konkan Railway Track Doubling | कोकण रेल्वे यंदा आपले रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करत आहे. ०१ मे १९९८ रोजी तत्कालीन प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी यांनी कोकण रेल्वे राष्ट्राला समर्पित केली होती. या २५ वर्षात मुंबई ते आपले गाव या प्रवासासाठी कोकणवासीयांची नेहमीच कोकण रेल्वेला नेहमीच पहिली पसंती राहिली आहे. कोकणरेल्वेने सुद्धा आपल्या सेवेत खूप चांगल्या सुधारणा केल्या आहेत.
सुरवातीच्या काळात प्रत्येक दिवशी सरासरी १७ गाड्या या मार्गावर धावत होत्या. आता प्रवाशांची संख्या वाढली त्यामुळे गाड्यांची संख्याही वाढली त्यामुळे ही सरासरी वाढून प्रत्येक दिवशी ५० एवढी झाली आहे. त्याबरोबर १७ मालगाड्या रोज धावतात. स्थानकांची संख्याही वाढून ४९ ची ६८ एवढी झाली आहे.
एवढ्या गाड्या वाढवूनसुद्धा अजून गाड्यांची मागणी होत आहे. कारण या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांना तुफान गर्दी होत आहे. हंगामाच तर सोडाच तर पावसाचे एक दोन महिने सोडले बाकीच्या दिवशी आरक्षित तिकीट मिळविण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त या मुळे आरक्षणात संधीसाधू दलालांचा सुळसुळाट आहे. मजबुरी असल्याने या दलालांकडून दुप्पट भावात तिकीटे खरेदी करावी लागतात.
जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे दुःख तर विचारूच नका. या कोच मधून प्रवास करणे म्हणजे एक दिव्यच म्हणावे लागेल. सीट भेटली ते नशीबवान म्हंटले तरीही खचाखच भरलेल्या डब्यातून टॉयलेट ला जाणे पण अशक्य होते. त्यात जागेसाठी आणि इतर कारणांसाठी होणारी भांडणे पण सहन करावी लागतात. अशा परिस्थितीत ८/१० तास प्रवास करताना जीव नकोसा होतो. हंगामात तर आरक्षित डब्यांची स्थिती अशीच जनरल डब्यांसारखी होते.
या कारणांनी या मार्गावर नवीन गाड्या सोडण्यासाठी नेहमीच मागणी होत आहे. मात्र नेहमीच या मागणीला लाल कंदील दाखवला गेला आहे. कारण त्यांच्यामते कोकण रेल्वे पूर्ण क्षमतेने धावत असून या मार्गावर आता कोणतीही नवीन गाडी सुरू करता येणे शक्य नाही.
रेल्वे रूळ दुहेरीकरण – एक काळाची गरज
कोकण रेल्वे वर गेल्या २५ वर्षात गाड्या वाढल्यात, स्थानके वाढली आणि प्रवासी संख्या पण वाढली. मात्र रेल्वे रूळ दुहेरीकरणाचा प्रश्नावर रेल्वे प्रशासनाने प्राधान्य दिले नसल्याचे दिसत आहे. मुंबई ते रोहा या मार्गावर आधीच रेल्वे रूळ दुहेरीकरण झाले आहे. मात्र हा मार्ग मध्य रेल्वेच्या अखत्यारीत येतो. तर रोहा या स्थानकापासून पुढे कोकण रेल्वेमार्ग चालू होतो. गेल्या २५ वर्षात फक्त ४९ किलोमीटर कोकण रेल्वेमार्गावर दुहेरीकरण झाले आहे. रोहा ते वीर या स्थानकांदरम्यान हे दुहेरीकरण ऑगस्ट २०२१ रोजी पूर्ण करण्यात आले आहे. या प्रकल्पाला एकूण ५५० कोटी एवढा खर्च आला होता. मात्र त्यापुढील रेल्वे रुळाच्या दुहेरीकरणाबाबत अजूनही काही वाच्यता रेल्वे प्रशासनाकडून केली जात नाही आहे.
दिवा सावंतवाडी या गाडीप्रमाणे वसई – सावंतवाडी अशी गाडी चालू करावी अशी मागणी होत आहे. ही मागणी रास्त आहे. कारण सध्या या मार्गावर चालणाऱ्या गाड्यांच्या जनरल डब्यांत तुफान गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी जनरल गाडीची गरज आहे. अनेक स्थानके अशीही आहेत जेथे प्रवाशांचा प्रतिसाद मिळत असूनही तेथे महत्वाच्या गाडयांना थांबे दिले नाही आहेत. दुहेरीकरण झाल्यास नवीन गाड्या सोडून अशा स्थानकांना प्राधान्य देता येईल.
पर्यटनवृद्धी साठी
कोकणाला लाभलेल्या निसर्गसंपन्नतेमुळे कोकण भाग पर्यटनासाठी ओळखला जातो. सिंधुदुर्ग जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून या अगोदरच मान्यता मिळाली आहे. विस्टाडोम कोच सारख्या सुविधा देऊन रेल्वे प्रशासन आपल्या परीने प्रयत्न करत आहे यावर वाद नाही. मात्र येथे पर्यटनासाठी येण्यासाठी रेल्वेची तिकिटे भेटणे मुश्किल होत असल्याने त्याचा पर्यटनावर परिणाम होत आहे.
पुण्यातील कोंकणासीयांसाठी
कोकण रेल्वेचा फायदा पुण्यातील कोंकणवासीयांना पाहिजे तसा झाला नाही आहे. सध्या काही मोजक्याच लांब पल्ल्याच्या गाड्या पुण्यावरून कोकण रेल्वे मार्गावरून धावतात. या गाड्या कोकणातील मोजकेच थांबे घेत असल्याने आणि या गाडयांना होणाऱ्या गर्दीमुळे या गाड्या पुणेकरांसाठी असूनही नसल्यासारख्या आहेत. पुण्यावरून सावंतवाडी पर्यंत एका गाडीची प्रतीक्षा पुणेकरांना आहे. मागेच हुजूर साहिब नांदेड पनवेल एक्सप्रेसचा विस्तार रत्नागिरी पर्यंत करण्याची मागणी प्रवाशांकडून झाली होती. रेल्वे रूळ दुहेरीकरणामुळेच अशा मागण्या पूर्ण करणे शक्य होणार आहे.
वरील सर्व मुद्द्यांचा विचार करता कोकणरेल्वे पूर्ण क्षमतेने कार्यरत करायची असेल तर रेल्वे रुळांचे दुहेरीकरण करणे ही काळाची गरज असल्याचे सिद्ध होत आहे. हे काम सोपे नसून मोठ्या प्रमाणात निधी मिळवणे आवश्यक आहे, प्रबळ राजकीय इच्छाशक्तीची गरजही आहे. रेल्वे प्रशासन आणि राज्य सरकारने त्यात रस दाखविला गेला पाहिजे. कोकणातील जनतेने सुद्धा सरकारवर यासाठी दबाव टाकणे आवश्यक आहे.