देव वेतोबा, तू माझा सांगाती

श्री देव वेतोबा म्हणजे आरुलकरासाठी (आरवलीचे रहिवाशी) काय आहे, हे शब्दांत सांगणे कठीण आहे. संत तुकारामांसाठी विठ्ठल हा जसा मायबाप, तसा आम्हा समस्त आरवली ग्रामस्थांसाठी श्री देव वेतोबा. 

ग्रामदैवत असे म्हटले तरी देव वेतोबा हा  आरवलीकरांसाठी कुटुंबप्रमुख, पिता, पालनहार या भूमिकेत दिसून येतो. कोणतीही समस्या, संकट असो “देवा वेतोबा तू पाव” एवढी हांक पुरेशी असते. अतिशय जागृत देव अशी याची ख्याती आहे. दररोज रात्री देव वेतोबा गांवाच्या रक्षणासाठी फिरतो अशी समस्त ग्रामस्थांची श्रद्धा आहे. या संदर्भांतला एक किस्सा मला आठवतो.


आमच्या घराभोवती खूप जमीन आहे. गांवी याला बाग असे संबोधले जाते.  या बागांत तोरिंजन(पपनस), आंबा, फणस, माड, पोफळी, साग, तिरफळ, केळी, जाम अशी अनेक झाडे आहेत. शिवाय दसवंती (जास्वंद), गुलाब, सहस्रमोगरा, अनंत, नागचाफा अशी विविध फुलांची झाडे तसेच भोपळ्याचा वेल, चवळी, लाल माठ, पडवळाचा/दोडक्याचा  वेल अशी भाज्यांची रोपेसुद्धा आहेत. कांही वेळां कुंपण ओलांडून, गडगा (दगड आणि चिऱ्याने बांधलेली कंपाउंडची भिंत) पार करून बाहेरची वशाडी जनावरे आमच्या बागांत घुसून या झाडांची नासधूस करत. म्हणून हे नुकसान थांबवण्यासाठी माझ्या चुलत्यांनी या गडग्याला उंच दार करून त्याला कुलूप लावले. रात्री त्यांना स्वप्नांत दिसले की देव वेतोबा त्यांना विचारतो आहे “ माझ्या फेरीच्या मार्गावर कुलूप लावतोस ? चल उघड ते …” आणि खाडकन ते कुलूप उघडून खाली पडले. माझे काका दचकून जागे झाले. टॉर्च घेऊन ते बाहेर आले…तसेच त्या गडग्याच्या दाराकडे गेले. बघतात तर काय ?? ते कुलूप जमिनीवर पडले होते. प्रत्यक्ष वेतोबा आपल्याशी बोलला, या आनंदात माझ्या काकांचे भान हरपले होते. त्यानंतर कुलूप सोडा… तो दरवाजाही कधी बंद झाला नाही. देव वेतोबाच्या रात्रीच्या फेरीचा मार्ग आमच्या आवारातून जातो, ही बातमी त्यांनी जो जो भेटेल त्याला ऐकवली.

ग्रामस्थांच्या घरांत कोणतंही मंगल कार्य असेल तर सर्वप्रथम  वेतोबाला प्रसाद लावून कौल घ्यायची प्रथा आमच्या गांवी आहे. देवळाचे गुरव  विशिष्ट पाने देवाच्या उत्तरांगावर लावतात. आणि देवाला कौल देण्यासाठी गाऱ्हाणे घातले जाते. देवाचा कौल मिळेपर्यंत कौल मागणारे देवासमोर बसून रहातात. माझ्या लहानपणी भाऊ गुरव हे देवाची पूजा-अर्चा व इतर दैनंदिन धार्मिक विधी बघायचे. कोणाच्याही बागेत केळ्यांचा घड पिकला की तो देव वेतोबासमोर ठेवण्याची प्रथा आहे. मग त्यातली कांही केळी गुरव त्या माणसाला प्रसाद म्हणून देतात व बाकीची केळी देवळांत उपस्थित असणाऱ्या भक्तगणांमध्ये वाटतात. तसंच धोतरजोडी व चपला देवाला भेट देण्याचीही पद्धत आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण देवळांत अशा दिलेल्या नव्या कोऱ्या चपलांचे, कालांतराने तळ झिजलेल्या अवस्थेतल्या चपलाही जपून ठेवलेल्या आहेत. भाविक यांचेही दर्शन आवर्जून घेतात. देव वेतोबा आहे आणि त्यामुळेच हा गांव सुरक्षित, सुखी व समृद्ध आहे हा अवघ्या आरवलीकरांचा दृढ विश्वास आहे.

सुरवातीला देव वेतोबाची भव्य मूर्ती फणसाच्या लाकडापासून बनवली जायची. त्यामुळे आमच्या गांवांत फणसाच्या लाकडापासून कोणतीही वस्तू …उदाहरणार्थ खुर्ची, टेबल, बसायचा पाट वगैरे , बनवली जात नाही …. वापरली जात नाही. आता मात्र देवाची मूर्ती पंचधातूची आहे.

 


देव वेतोबाच्या कृपेचा आणखी एक प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरत नाही. अर्थांत हा मी माझ्या घरातील वडीलधाऱ्या मंडळींकडून ऐकलेला आहे. माझे पणजोबा श्री वासुदेवराव रेगे हे ग्वाल्हेरच्या महाराजांकडे नोकरीला होते. त्याकाळी सुट्टीत घरी येताना प्रवासाचे वहान म्हणजे घोडा. तर ते घराजवळ आले, पण त्यांना घर कुठे आहे तेच कळेना. आतापर्यंत शहाण्यासारखा दौड करणारा घोडा बिथरल्यासारखा चालत होता. तोंडाने फुरर्र…फुर्र असे आवाज काढत होता. बराच वेळ झाला, पण घराचा रस्ता कांही उमगेना. माझ्या पणजोबांनी वेतोबाचा धांवा सुरू केला. “देवा वेतोबा, माका मार्ग दाखय…तुज्या दाराकडे आयलसय…पण वाट गावणासा नाय…चकवो लागलोसा असा दिसता … देवा कृपा कर …” तेवढ्यांत शेजारच्या पांन्नीतून (अरुंद पायवाट) एक माणूस, डोक्याला मुंडासं..खांद्यावर कांबळ आणि हातात काठी अशा जाम्यानिम्यात आला. माझ्या पणजोबांनी त्याला आवाज दिला. तो माणूस  थांबला.
“काय झाला धनयानो… दोंपारच्या ऊनांत हंयसर खंय फिरतसात ??” त्या माणसाने विचारले. पणजोबांनी त्याला सर्व हकीगत सांगितली. आपलं घर कुठे आहे, तेही सांगितलं आणि वाट चुकल्यामुळे गेले तासभर इथेच फिरतो आहे हे सांगितलं.

“माज्या पाठी..पाठी या. मी दाखयतंय तुमका वाट. आणि पुढच्या दहा मिनिटांत तो सज्जन गृहस्थ माझ्या पणजोबांना आमच्या घरापर्यंत घेऊन आला. पणजोबा पायउतार झाले. “जरा थांबा. तुमचेसाठी गूळपाणी आणूक सांगतय.”

“नको….नको.. मी शेतार जातसंय. आगपेटी असली तर जरा द्या.” तो गृहस्थ बहुतेक घाईत असावा. पणजोबा आगपेटी आणायला घरांत गेले. दोन मिनिटांत बाहेर आले…बघतात तर बाहेर कोणी नाही. धांवत धांवत ते आखांड्यापर्यंत (कंपाऊंडचे फाटक) आले. कोणीच दिसत नव्हते. दुसऱ्या दिवशी वेतोबाच्या देवळांत त्यांनी कौल लावला. ‘संकटांत तू मला हांक मारलीस…मी तुझ्यासाठी आलो होतो.’ हा कौल मिळाला. आता हा सर्व श्रद्धेचा भाग आहे.

माझ्या चुलत्यांचा तर वेतोबावर एवढा विश्वास होता की ताप वगैरे आला तर मला सांगायचे “जा देवळांत जावन तीर्थ आणि आंगारो घेवन ये”. मी एका बाटलीत तीर्थ व पुडीत अंगारा घेऊन यायचो. आणि माझे चुलते ते तीर्थ अक्षरश: औषधाच्या डोसाप्रमाणे घ्यायचे आणि त्यांना बरेही वाटायचे.

आमच्या वेतोबाचे देऊळ कधीच बंद होत नसे. संध्याकाळी गांवातील ज्येष्ठ मंडळी दर्शनासाठी येत…बाहेरच्या सिमेंटच्या सोप्यावर बसून सुखदु:खाच्या गप्पा मारत…वेतोबाच्या अस्तित्वाने पुनीत झालेल्या वास्तूत स्वत:चा आनंद शोधत. मुलाबाळांच्या कल्याणासाठी प्रार्थना करत.

वैशाख शुद्ध पंचमी हा आमच्या देव वेतोबाचा वाढदिवस. “आमच्या” हा शब्द संवयीने आला. “आमच्या” म्हणजे आरवलीचे ग्रामदैवत श्री देव वेतोबा.

आता बरीच वर्षे झाली गांवाला जाऊन. पण नजरेसमोर देऊळ जसेच्या तसे आहे. देवाच्या गाभाऱ्यातील देव वेतोबाची भव्य मूर्ती तशीच डोळ्यासमोर येते. मी हात जोडून उभा रहातो. त्यावेळी मी देवळातच असतो. “ओम नम: पराय शिवात्मने, वेतालाय नम:”चा गजर आपोआप मनांत सुरु होतो. “तो” माझ्या जवळच आहे…त्याची कृपादृष्टी सदैव लाभणार आहे.. तोच आमचा रक्षणकर्ता…मायबाप आहे हे माझे मन मला सांगत असते. बस्स !! याशिवाय काय हवं दुसरं ??

हे जे कांही लिहिले गेले, तेसुद्धा त्याच्याच इच्छेने…त्याच्याच आदेशाने आणि आशिर्वादाने.

अनिल रेगे.
मोबाईल : 9969610585.

Loading

Facebook Comments Box

असा होता जगातील सर्वात लांब बस मार्ग

भारतातून लंडनला बसने जाता येत होते…!

 

१९५७ ला अल्बर्ट ट्रॅव्हल्सने ही बस सेवा चालू केली होती.त्यांची पहिली बस लंडन येथून १५ एप्रिल १९५७ रोजी सुटली ती भारतात कलकत्ता येथे ५ जून रोजी पोहचली होती.कलकत्ता ते  लंडन ७९०० किलोमीटरचा रुट अस्तित्वात होता. जगातील सर्वात लांबचा असा हा बसचा मार्ग होता.

 

हा मार्ग बस कलकत्ता येथून निघून दिल्ली, अमृतसर, वाघा बॉर्डर, लाहोर (पाकिस्तान), काबूल, हैराण (अफगाणिस्तान), तेहरान ( इराण), इस्तांबुल ( तुर्कस्थान ), बुल्गारिया, युगास्लाव्हिया, ऑस्ट्रीया, जर्मनी, बेल्जियम मार्गे थेट लंडन असा जात होता.

 

ह्या बस चा प्रवास एखाद्या सहली सारखा असायचा. मार्गात भेटणारी काही निवडक प्रेक्षणीय स्थळांना भेट देता येत होते. त्यात ताजमहाल, बनारस ईत्यादी ठिकाणांचा समावेश असायचा. त्याचप्रमाणे शॉपिंग साठी पण बस काही प्रसिद्ध बाजारपेठेत थांबायची त्यात प्रवासी दिल्ली, तेहरान, काबुल, इस्तंबुल, साल्जबर्ग, विएन्ना येथे शॉपिंग करू शकत होते. साहजिकच ह्या सर्वांसाठी काही दिवस राखीव ठेवण्यात आले होते.

 

या बस प्रवासात सर्व प्रकारची सोय करण्यात आली होती. लक्झरीस बसमध्ये वाचन, वैयक्तिक झोपेचे बंक, पार्टीसाठी रेडिओ/टेप संगीताचा आनंद घेऊ शकत होते. फॅन, हीटरची सुविधा उपलब्ध होती. झोपण्यासाठी सीट स्लीपर मोड मध्ये करायची सुविधा उपलब्ध होती.

 

तेव्हा बसभाडे होते ८५ पौंड.( आत्ताचे साधारण ८०१९रु.)

 

ही बस काही काळासाठी ऑस्ट्रेलिया च्या सिडनी पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. सिडनी-कलकत्ता-लंडन असा तो मार्ग होता. हा मार्ग कापण्यासाठी ह्या बसला तब्बल १३०/१३५  दिवस लागायचे.

 

पुढे भारत-पाक यांच्यातील सीमावादामुळे ही बस बंद करावी लागली.

 

 

 

Loading

Facebook Comments Box

‘या’ तारखेला कोकणात दाखल होणार मान्सून!

नियोजित वेळेपेक्षा सहा दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात मान्सून केरळमध्ये तर ५ जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु आहे. मान्सूनच्या अगोदरच केरळमध्ये पाऊस दाखल झाला आहे. केरळमध्ये अनेक ठिकाणी पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे.

राज्यातील खरीप हंगामापूर्वी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीमध्ये भारतीय हवामान विभागाचे के. एस. होसाळीकर यांनी ही माहिती दिली आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्याची आतुरतेनं वाट पाहात आहे, त्या मान्सूनचं महाराष्ट्रात नेमकं कधी आगमन होणार आहे, याविषयी देखील होसाळीकर यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

या बैठकीमध्ये राज्यातील खरीप हंगामाचा आढावा घेण्यात आला. या हंगामासाठी आवश्यक असणारा पाऊस यंदा होईल की नाही, याविषयी होसाळीकर यांच्याकडे विचारणा केली असता संपूर्ण महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होईल, असा अंदाज होसाळीकर यांनी या बैठकीत व्यक्त केला आहे.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1527322484252348417?t=nEvK1W5REYX6t75HKW3oSw&s=19
 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

कोकणातील रस्त्यांच्या विकासासाठी १२५ कोटी ६० लाखांचा निधी मंजूर

कोकण विभागातील रस्त्यांची डागडुजी आणि विकास करण्यासाठी सुमारे  १२५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये १२५६ किलोमीटरपर्यंत रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे.  राज्यातील अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा एकच्या धर्तीवर योजनेचा दुसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे.जिल्हा नियोजन समितीला प्रतिवर्षी उपलब्ध होणाऱ्या निधीच्या दहा टक्के निधी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या कामाला अधिक गती मिळणार आहे.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा दोनसाठी खालील प्रमाणे जिल्हावार खर्च अपेक्षित ठरविण्यात आला आहे

ठाणे जिल्हा – १३० किलोमीटरसाठी ९७ कोटी ५० लाख.

पालघर जिल्हा – २५१ किलोमीटरसाठी १८८ कोटी २५ लाख.

रत्नागिरी जिल्हा – ३५९ किलोमीटरसाठी २६९ कोटी २५ लाख

रायगड जिल्हा -२४३ किलोमीटरसाठी रायगडला १८२ कोटी २५ लाख

सिंधुदुर्ग जिल्हा – २४३ किलोमीटरसाठी २०४ कोटी ७५ लाख

 

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

मालवणी मुलुख – जिल्हा सिंधुदुर्ग

पूर्वीच्या रत्नागिरी जिल्ह्याचा दक्षिणेकडील भाग म्हणजेच आजचा सिंधुदुर्ग जिल्हा होय. या प्रदेशाला ‘मालवणी मुलुख’ अशी स्वतंत्र ओळख प्राप्त झाली आहे.मालवणच्या कुरटे बेटावर भर सागरात छत्रपती शिवरायांनी उभारलेल्या सिंधुदुर्ग या जलदुर्गामुळे १ मे १९८१ रोजी या दक्षिण कोकणाला ‘सिंधुदुर्ग जिल्हा’ हे स्वतंत्र बाणेदार नाव प्राप्त झाले.

भौगोलिक स्थिती

सुमारे ५२१९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळ, १२१ किलोमीटर सागर किनारा या जिल्ह्याला लाभला आहे. संपूर्ण साक्षर असलेल्या या जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे नऊ लाख आहे. देवगड, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, मालवण, वेंगुर्ले, सावंतवाडी व दोडामार्ग असे आठ तालुके असलेल्या या जिल्ह्याला समृद्ध निसर्ग संपदा लाभली आहे. जलश्री, वनश्री व शैलश्री या तिन्हींचा जणू अपूर्व संगमच येथे पहायला मिळतो.

उत्तरेला विजयदुर्गाची खाडा आणि दक्षिणेला तेरेखोलची खाडी, पश्चिमेचा अथांग सिंधुसागर तर पूर्वेला उत्तुंग सह्याद्रीचे कडे – दऱ्या आणि डोंगर. सागर सह्याद्रीच्या मधल्या भागात लालमातीचा हा मुलुख साहित्य, संगीत, नृत्य, लोककला, शिल्प या क्षेत्रात खूप आघाडीवर आहे.

लालमाती, काळीभोर कातळे, जांभा खडक, नारळ- पोफळी, आंबा, काजू, फणस यांच्या सदाहरित बागा, हिरवेगार भात फळे, पावसाळ्यात दुथडी भरुन वाहणाऱ्या नद्या, प्रत्येक गावात एकापेक्षा एक अधिक घनदाट देवराया, त्याच्यासोबत माऊली सातेरी, भूमिका, पावणाई, रवळनाथ, वेतोबा इ. देवतांची विस्तीर्ण सभामंडप असलेली भक्ती, शांती व समाधान प्राप्त करुन देणारी मंदिरे, खास प्राचीन बारा-पाचाची देवस्थान पध्दती, दशावतार ही उत्स्फूर्त नाट्याविष्कार दाखवणारी लोककला, हौशी मराठी रंगभूमीचे माहेर आणि फक्त जिल्ह्यापूरती खास ठसकेबाज, नादमधूर, चिमटे काढीत पण समोरच्याच्या हृदयाचा ठाव घेणारी ‘मालवणी’ बोली. ही या प्रदेशाची स्वतंत्र ओळख आहे.

कोकणी मेवा

तुम्हाला फणसांचे – आंब्यांचे शेकडो प्रकारचे स्वाद चाखायचे असतील, कोकम रस, सोलकढी, अप्रतिम शाकाहारी भोजन तसेच असंख्य प्रकारचे चवदार स्वाद प्राप्त झालेले ‘मत्साहारी’ भोजन हवे असेल तर ‘मालवणी मुलुखाला’ महाराष्ट्रात दुसरा पर्याय नाही. वडे – सागोती, तिखला, पापलेट, सरंगा, माशांची कडी, सांबारे, भाजी – पाव – उसळ, कांदाभजी, शेवकांडे किंवा चिरमुऱ्याचे लाडू , जत्रेतले गोड खाजे, ग्रामीण भागात मिळणारी खोबऱ्याची कापे, एवढेच काय जांभुळ, करवंदे, हसोळी, नीव, जगमे – चाफरे, ओवळधोडे, चार भाजलेल्या किंवा उकडलेल्या आठल्या (फणस बिया) चिनी, कणग्या, कारंदे हा सारा रानमेवा व त्यांचा अनोखा स्वाद घ्यायचा असेल, ओल्या काजूगरांचा गुळ – खोबरं घातलेला ‘मोवला’, काळ्या वाटाण्याची उसळ, आंबोळी, गरमागरम उकडा भात व सोबत रसदार फजाव, वालीचे झणझणीत सांबारे यांची चव हवी असेल तर या प्रदेशात वेगवेगळ्या ऋतूत यावे लागेल.

प्रेक्षणीय स्थळे

सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, रांगणा, पारगड, मनोहर मनसंतोषगड यासारखे २९ गड – किल्ले, आंबोली थंड हवेचे ठिकाण, श्रीसंत सोहिरोबा, साटम महाराज, टेंबे स्वामी, राऊळ महाराज, भालचंद्र महाराज अशा संत महंतांचे मठ, असंख्य साहित्यिक कवी, कलावंतांची घरे-गावे, कुडोपी, हिवाळे, बुधवळे परिसरातील अत्यंत प्राचीन कातळशिल्पे, नेरुर-वालावल-पेंडूरचा अनोखा निसर्ग,पेंडूरचे प्राचीन जैन मंदिर, मठगाव आणि वेतोरे येथील प्राचीन शिलालेख, वेंगुर्ले येथील ‘डचवखार’ दाभोलीचे ‘कुडाळदेशकर मठसंस्थान’, बांदा येथील बैल -रेडे घुमट, सावंतवाडीची रंगीत खेळणी, मोती तलाव, नरेंद्र डोंगर, धामापूरचा शांत – निरव तलाव, तिलारीचे मातीचे धरण, हत्तीचे वास्तव्य असलेला परिसर, पिंगुळीची ठाकर आदिवासीची लोककला, धनगरांचे ‘चपई नृत्य’, सावंतवाडीचे शिल्पग्राम, कुडाळ, कणकवली, देवगड, वैभववाडी तालुक्यातील असंख्य प्रेक्षणीय स्थळे…

 

हे सारे मालवणी मुलखाचे बाह्यरुप झाले. तुम्हाला जर कष्टात, गरिबीत पण स्वाभिमानाने, रसिकतेने प्रत्येक गोष्टीत कलात्मक पध्दतीचा आविष्कार करीत स्वत:शी खूश असणारी, जराशी ओळख झाल्यावर भरभरुन बोलणारी आपल्या अजब जीवनकथा व चटका लावणाऱ्या व्यथा विशिष्ट हातवारे, अभिनय करीत उत्कट जीवन जगणारी माणसं पाहायची आहेत ? तर तुम्हाला येथे वारंवार यावे लागेल. कुणाही रसिक निसर्गप्रेमीला पुन्हा पुन्हा यावे असा मोह वाटेल असा हा निसर्गरम्य प्रदेश आहे.

साभार – “मालवणी लोकगीते” (प्रा.डॉ. बाळकृष्ण लळीत)

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

असा साकारला कोकण महामार्गावरचा सर्वात उंच ब्रिज.

          मूळ रस्त्याचा प्लॅन बदली करून. कोकण महामार्गावरचा सर्वात उंच ब्रिज बांधल्या बद्दल माननीय नितीन गडकरी यांना धन्यवाद.

          नॅशनल हायवे चे इंजिनियर   आणि कॉन्ट्रॅक्टरला प्लॅन बदली करायला भाग पाडणाऱ्या स्थानिक कार्यकर्त्यांचा आणि माय राजापूरची टीम जगदीश ठोसर तुमचे सर्वांचे मनापासून अभिनंदन.

           राजापूर शहरानंतर उत्तरातील सर्व धोकादायक वळणे तशीच ठेवून अपघातग्रस्त. जसा आहे तसा हायवे वाढवण्याचा अधिकाऱ्यांचा आणि ठेकेदार यांचा प्लान होता. राजापूर मधील जगदीश ठोसर रिटायर्ड पीडब्ल्यूडी इंजिनियर व तेथील कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. देशाचे रस्ते विकास मंत्री माननीय नितीन गडकरी याना तो पटला म्हणूनच राजापूर मधून सरळ बाहेर जाणारा आणि ही सर्व वळणे टाळणारा अतिशय देखणा रस्ता बनला. थोडा खर्च वाढला पण अतिशय सुरक्षित आणि कोकण हायवे वरचा सर्वात मोठा ब्रिज राजापूरच्या अर्जुना नदीवर बनला.

          कोकण महामार्गावरील अनेक धोकादायक वळणे तशीच ठेवणारे धेडगुजरी कॉन्ट्रॅक्टर व डोकं बाजूला ठेवून डिझाईन करणारे नॅशनल हायवेचे  इंजीनियर्स यांची डिझाईन सर्वसामान्य माणसे बदलू शकतात हे जागरूक जगदीश ठोसर आणि टीमने सिद्ध केलं. छोट्या छोट्या मुद्द्यांवर भांडणारे आपण कोकणी विकासाच्या मुद्द्यावर असे जागरूक राहून व्यवस्थेशी संघर्ष केला तरच कोकणात चांगल्या दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण होतील.

         म्हणूनच राजापूरच्या या सर्व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. भविष्यातले अनेक अपघात आणि माणसांचे बळी आपण वाचवले. अशीच जागृतता कोकण हायवे वरील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या त्या ठिकाणी दाखवणे आवश्यक आहे कारण कोकणी माणसाची सुरक्षितता ही सर्वात महत्त्वाची आहे. हायवे अनेक ठिकाणी धोकादायक आहे आणि म्हणून खूप अपघात होत आहेत त्या त्या ठिकाणी बदल आवश्यक आहेत. यासाठी संघर्ष करूया पाठपुरावा करूया.

संजय यादवराव
कोकण हायवे समन्वय समिती

Loading

Facebook Comments Box

आमच्या गावात शिमगा – कलात्मकतेचा मांड उत्सव – कोकणातील एक अनोखी परंपरा

वेंगुर्ला प्रतिनिधी – निर्जिवाला सजिव करणा-या कुळातच जन्म, त्यात कलेचा ईश्वर अशा कलेश्वराचा आशिर्वाद, त्यामुळे नेहमीच त्यांच्याकडून असे काही नाविन्यपूर्ण घडते की, ज्यामुळे त्यांचे नाव अबालवृद्धांच्या तोंडी असते. ही कथा नसून वास्तव आहे ते कुडाळ तालुक्यातील नेरुर गावातील ‘मेस्त्री‘ समाजातील कलाकारांचे. शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या तल्लख बुद्धिमत्तेच्या जोरावर नवनविन हालते देखावे साकारत लोकांनाच आपल्याकडे खेचून आणण्याचे कसब या मेस्त्री वर्गाकडे पहायला मिळत आहे.

      सध्या सर्वत्र शिमगोत्सव सुरु आहे. प्रत्येक ठिकाणच्या परंपरेनुसार हा शिमगोत्सव साजरा केला जात आहे. त्यातून ब-याच रुढीपरंपरा जपण्याचे काम या उत्सावातून होत आहे. अशीच प्रथा नेरुर गावात ‘मांड‘ या उत्सवातून जपली जात आहे. होळीच्या तिस-या दिवशी माड्याची वाडी येथील श्री गावडोबा मंदिराकडून ‘गावडे‘ समाजाचे रोंबाट तळी घेऊन ढोलताशांच्या गजरात श्री देव कलेश्वराच्या भेटीस येते. या रोंबटामध्ये मद्य, मांस नसल्याने याला ‘गोडा रोंबाट‘ असे म्हणतात. भेटीनंतर परतताना प्रत्येक वाडीत या रोंबटाला गा-हाणी घातली जातात, नवस बोलले जातात. हे रोंबाट सायचे टेंब येथे आल्यावर मांडाच्या ठिकाणी गा-हाणी वैगरे होतात आणि त्यानंतर मुख्य ‘मांड उत्सवाला‘ प्रारंभ होतो. राधा आणि शिमग्याचे खेळ या मर्यादेत असलेला हा मांड उत्सव कथांमधील विविध हलत्या देखाव्यांच्या संकल्पनेमुळे लोकप्रिय झाला आहे. कै. आना मेस्त्री, दिनू मेस्त्री, बाबा मेस्त्री व विलास मेस्त्री ही मंडळे आध्यात्मिक आणि पौराणिक कथांवर आधारीत बनविलेले ट्रिकसिनयुक्त हलते देखावे भजनाच्या साथीने सादर करतात. विशेष म्हणजे सर्व देखावे २५ ते ३० फुट उंचीपर्यंतचे असतात. एका ग्रुपमध्ये जवळपास २५च्या वर माणसे असतात. असतो. गणपती, मारुती, राक्षस, वाघ, हंस, बदक, फुलपाखरु, किडा, सिह असे पशूपक्षी कलात्मक पद्धतीने या मांडावर येऊन नृत्य करतात. यात लहान मुलांचाही सहभाग उत्स्र्फूत असतो.

      या ‘मांड‘ उत्सवाचे आणखी वैशिष्ट्य म्हणजे देखावे सादर करणारी जी चार मंडळे आहेत, ती यावर्षी कोणता देखावा सादर करणार याची पुसटशीही कल्पना एकमेकांना नसते. साधारण शिवरात्रीच्या दरम्याने श्री कलेश्वराला श्रीफळ ठेऊन देखाव्यांच्या कामाला प्रारंभ केला जातो. जो तो आपल्या देखाव्यातील वेगळेपण जपण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत असतो. त्यासाठी लाखोनी रुपये खर्च येतो. परंतु, याचा विचार न करता आपली कला असंख्य जनसमुदायासमोर आणण्यासाठी सिद्ध होतात. मांड उत्सवाला लाभलेला जनसमुदाय आणि त्यांच्याकडून टाळ्यांच्या स्वरुपात मिळणारा प्रतिसाद तसेच त्यांच्या कलाकृतीला कॅमेरात टिपणारा प्रेक्षकवर्ग हेच त्यांचे बक्षिस म्हणायाला हरकत नाही.

      आजपर्यंत पिढ्यान्पिढे हा मेस्त्री समाज ही परंपरा जपत आहे. कालानुरुप त्यात बदलही करत आहेत. त्यांच्या युवा पिढीकडून नेहमी वास्तव मांडण्याचा यशस्वी प्रयत्न केला जात आहे. गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमी या उत्सवासाठी मर्यादा होती. त्यामुळे यावर्षी गर्दीने तर उच्चांक गाठला. ‘मांड उत्सव‘ व्यवस्थित पहाता यावा यासाठी आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून गॅलरीची सोय करण्यात आली होती. तरीही अफाट गर्दीमुळे काहींनी झाडावर तर काहींनी टाचा वर करुन या उत्सवाची मजा लुटली. यावर्षी आना मेस्त्री ग्रुपने रावण-इंद्र युद्ध, विलास मेस्त्री ग्रुपने नंदीवरील शंकर, दिनेश मेस्त्री ग्रुपने महाकाली अवतार विस्तार आणि ज्योतिर्लिग दर्शन व बाबा मेस्त्री ग्रुपने विश्वाचा मुलाधार अवतार ओंकार दर्शन असे देखावे सादर केले. शिमगोत्सवातील या ‘मांडा‘मुळे नेरुर गावाची एक वेगळी ओळख सर्वत्र होत आहे.

 

विशेष आभार
श्री. प्रथमेश गुरव, वेंगुर्ला
लेखक आणि संकलक
संपर्क – ९०२१०७०६२४

           

  तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

https://kokanai.in/2022/03/16/shimga/

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा

.

टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरारूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

 

 

Loading

Facebook Comments Box

आमच्या गावात शिमगा – डोंगरावरील देव – कोकणातील एक अनोखी परंपरा

              डोंगर आणि देवाचा संबंध आपण नेहमीच पाहतो. हिंदूंची अनेक तीर्थस्थळे, मंदिरे उंच डोंगरावर, शिखरावर दिसून येतात. श्री देव शिव शंकर पण हिमालयात वास्त्यव करतो. कोकणात पण अनेक देवस्थाने डोंगरावर आढळून येतात. आज आपण माहिती घेणार आहोत अशाच एका गावातील अनोख्या होळी उत्सवाची जेथे होळी गावात किंवा सपाट भागावर न उभारता एका उंच डोंगर शिखरावर उभारली जाते.

           

              सावंतवाडी तालुक्यातील मळगाव ह्या गावी ही प्रथा खूप पूर्वीपासून जपली जाते. सावंतवाडी आणि मळगांवच्या सरहद्दीवर असलेल्या नरेंद्र डोंगराचा एक उंच कडा असलेल्या सुवारड्याच्या कड्यावर एका प्रशस्त खडकावर ही होळी उभारली जाते. गावचे मानकरी आणि ग्रामस्थ ह्या ठिकाणी डोंगर चढून दाखल होतात. गाऱ्हाणे घालून गतवर्षीच्या होळी उतरून नवीन होळी उभारली जाते.  ह्या होळीचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे गावातील इतर होळीप्रमाणे शिमगोत्सव संपल्यावर चैत्र पौर्णिमेला होळी न तोडता पूर्ण वर्षभर ही होळी उभी ठेवली जाते. वर्षानुवर्षे मळगावची ही परंपरा भक्तिभावाने सुरु आहे. 

प्रतिनिधी – कोकणाई 

विशेष सहाय्य –  श्री. प्रज्वल नेवार

              तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

https://kokanai.in/2022/03/16/shimga/

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरारूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

Loading

Facebook Comments Box

आमच्या गावात शिमगा – फणसाचा देव – कोकणातील एक अनोखी परंपरा

 

तळकोकणातील सांगेली गावात शिमगा जरा वेगळया परंपरेने साजरा केला जातो. काय आहे हे वेगळेपण हे पुढील मुद्दे वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल.


१. येथे शिमगा सणाची सुरवात आदल्या रात्री पासून सुरू होते. ह्या सणाला गिरोबा उत्सव असे पण म्हंटले जाते. गावातील एक मोठे आणि सरळ फणसाचे झाड देवासाठी निवडून त्याला तोडून उंच देव महादेवाच्या पिंडीचा आकार देऊन त्याची प्राणप्रतिष्ठा मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्य ग्रामदेवता म्हणून केली जाते.


. खरेतर महाशिवरात्रीला देवासाठी फणसाचे झाड निवडले जाते. महाशिवरात्रीला येथे गाव आणि मानकरी जमा होतात आणि देव कोठे काढायचा हे प्रथेप्रमाणे ठरवितात.


३. ज्या वाडीतील झाड निवडायचे आहे त्याठिकाणी पाच मानकरी त्या झाडाला हात लावतात व त्यांनतर हर हर महादेव असा जयघोष करतात. या दिवसापासून गिरोबा उत्सवापर्यंत झाडाची पूजाअर्चा करण्याची प्रथा आहे.


.  होळीच्या आदल्या दिवशी झाडाला तोडून गावातील आणि आजूबाजूच्या गावातील सुतार ह्या झाडाला सुंदर आकार देतात. त्यानंतर गावातील तरुण स्वयंपूर्तीने खांदा लावून देव देवळात भव्य मिरवणुकीने नेतात. एकूण १४ फुटी असलेला देव जमिनीखाली ७ फूट आणि वर ७ फूट उभारला जातो. ह्या सोहळ्याला जिल्ह्यातीलच नाही तर आसपासच्या जिल्ह्यातील, तसेच गोवा आणि कर्नाटकातून भक्त उपस्थिती दर्शवितात.

 

. प्राणप्रतिष्ठा केलेल्या देवाची ग्रामदेवता म्हणुन वर्षभर पूजा अर्चा केली जाते. अशाप्रकारे झाडापासून बनवलेले ग्रामदैवत असलेले हे देशातील एकमेव मंदिर आहे. त्याचप्रमाणे फणसाच्या झाडापासून लाकडी पिंडी बनवून पुजणारे हे एकमेव गाव आहे.

 



. प्रत्येक शिमगा सणाला नवीन देवांची(पिंडीची) प्राणप्रतिष्ठा करून जुने देव मंदिराच्या आवारात एका जागेत ठेवले जातात जागेत ठेवले जातात, त्या जागेस खुट्याचा चाळा असे म्हणतात. असे बोलतात की दैवी चमत्काराने ह्या जुन्या देवांची संख्या त्यामध्ये दरवर्षी नवीन देवाची भर घातली तरी २१ च राहते.


. अजून एक वैशिष्टय म्हणजे हे गिरोबा फणसाचे झाड देवळात पाषाण म्हणून पुजण्यात येते त्यापासून पाळेमुळे खड्डयात मिळतात ती औषधी असतात असे जाणकार सांगतात.

. या गावात फणसाच्या झाडाला देवाचे स्थान आहे. येथील ग्रामस्थ फणसाच्या झाडासमोर नतमस्तक होतात. आपल्या परसातील फणसाचे झाड देवासाठी वापरले गेले तर त्याला ते पुण्य मानतात. त्यासाठी ते फणसाच्या झाडाची लागवड आणि जतन करताना दिसतात.

 

टीप : आमच्या लेखात मांडलेल्या आख्यायिका,चालीरीती आणि माहिती यात अनेक मते आणि मतांतरे असू शकतात. कोकणातील परंपरा, रूढी आणि चालीरीती यांची माहिती देणे हाच आमचा एकमेव उद्देश आहे.

 

तुम्हालासुद्धा तुमच्या गावातील शिमगा साजरा करण्याच्या अनोख्या परंपरा आमच्या संकेतस्थळावर आपल्या नावासहित प्रकाशित करता येतील. अधिक माहिती साठी कृपया खालील लिंक वर क्लिक करा.

https://kokanai.in/2022/03/16/shimga/

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Facebook Comments Box

आमच्या गावात शिमगा

          गणेश चतुर्थी प्रमाणे शिमगा (होळी) हा सण कोकणात खूप उत्साहात आणि जल्लोषात साजरा केला जातो. गणेशचतुर्थी झाली की मोठ्या कालावधी नंतर चाकरमानी कोकणात येतात आणि ह्या सणात सहभागी होतात. 

          होळी पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण प्रत्येक गावी-तालुक्यात वेगवेगळ्या पद्धतीने आणि पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती प्रमाणे साजरा केला जातो. ह्या चालीरीती अनेकदा लोकांचे कुतूहल वाढवत असतात.

          आपल्या गावातील ह्या शिमगा साजरा करण्याच्या पारंपरिक चालीरीती आणि पद्धती ईतर भागातील वाचकां पर्यंत पोहोचवण्यासाठी कोकणाई ”आमच्या गावात शिमगा” हे एक लेख सदर घेऊन येत आहे. तुमच्या गावात शिमगा कशा पद्धतीने साजरा केला जातो ते वर्णनात्मक लिखाण आम्हाला पाठवा. आपला लेख आमच्या संकेत स्थळावर, fb page आणि आमच्या सर्व whatsapp group वर आपल्या नावासह प्रकाशित केला जाईल.

नियम व अटी.
१) लेख कमीत कमी 300 शब्दात असावे.
२) स्थानिक शब्दांना पर्यायी मराठी शब्द कंसात लिहावा.
३) शक्य असल्यास फोटो जोडण्यात यावेत.
४) लेखातील भाषा कोणत्याही समजाला किंवा गटास दुखावणारे नसावी.
५) लेख प्रकाशीत करणे किंवा न करणे हा निर्णय
कोकणाई टीम चा राहील.
६)लेख स्विकारण्याची अंतिम दिनांक २७.०३.२०२२ राहील.

लेख पाठवण्यासाठी whatsapp नंबर ९३५६९६८४६२
९०२८६०२९१६

कोकणाई

pics cedit – https://tourdefarm.i

 

कोकणाई ब्लॉग च्या नियमित whatsapp अपडेट्स साठी खालील लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुप मध्ये सामील व्हा.

Loading

Facebook Comments Box

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search