Konkan Railway: कोकण रेल्वेमध्ये मान्यताप्राप्त कर्मचारी संघटनेसाठी झालेल्या निवडणुकीत नॅशनल रेल्वे मजदुर युनियनने NRMU पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. ३४२ मतांनी त्यांचा विजय झाला. नॅशनल रेल्वे मजदुर युनियन व कोकण रेल्वे कॉर्पोरेशन एम्प्लॉईज युनियन अशा २ प्रमुख संघटनांमध्ये ही निवडणूक गुप्त मतदान पध्दतीने बुधवारी झाली होती. याची मतमोजणी मडगाव येथे गुरुवारी झाली. कॉम्रेड नेते संघटनेचे महामंत्री कॉ.वेणू पी नायर यांच्या नेतृत्वाखाली एनआरएमयुने ही निवडणूक लढवली होती. विजयानंतर लाल सलाम च्या घोषणांनी कोकण रेल्वेच्या सर्व स्थानंकावर जल्लोष सुरु होता.
लाल बावटा प्रणीत नॅशनल रेल्वे मजदूर युनियनने आपला लाल झेंडा फडकवत केआरसी तसेच संलग्न अन्य संघटनांचा पराभव केला.कोकण रेल्वे ज्या राज्यातून जाते त्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा येथील कोकण रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी या निवडणुकीत मतदान केले. या निवडणुकीत ५ हजार २४९ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार ७९६ कर्मचाऱ्यांनी मतदान केले. त्यापैकी एनआरएमयूला २ हजार ५५३ मते मिळाली तर केआरसी एम्पा्लॉईज युनियनने २ हजार २११ मते मिळवता आली. यामुळे ३४२ मतांनी एनआरएमयुने विजय मिळवला आहे.या विजयाचा जल्लोष सर्वच रेल्वे स्थानकांवर एनआरएमयुच्या वतीने कर्मचारी करत होते.
पालघर: राज्यात मोठ्याप्रमाणावर नेमबाज तयार करण्याच्या ध्येय्याने प्रेरीत झालेल्या अनेक मातब्बर नेमबाजांसह प्रेसीहोल कंपनीने ऑलंपिक धर्तीवर आयोजीत राज्य स्तरीय बेंचरेस्ट रायफल शुटींग स्पर्धा पालघर येथे संपन्न झाली. या स्पर्धेत मोनल कारदानी यांनी प्रथम तर राल्सन सिइल्हो द्वितीय तर विनय पाणीग्रही यांनी तृतीय क्रमांकाचे यश संपादन केले. तर रत्नागिरीच्या पुष्कराज इंगवले रायफल शुटींग स्पोर्टस अकॅडमीच्या किमया जाधवला यंगेस्ट शुटर ॲवॉर्ड देवून गौरविण्यात आले.
पालघर येथील समीर पाटील रायफल शुटींग अकॅडमीच्या भव्य आधुनिक मैदानात आयोजित या स्पर्धेत संपूर्ण राज्यभरातून सुमारे ४०० हून अधिक खेळाडू उपस्थित होते. त्यामुळे मैदानाला मिनी ऑलंपिकचे स्वरूप प्राप्त झालेले दिसत होते.
जगभरात तब्बल ६७ पेक्षा अधिक देशांमध्ये बेंचरेस्ट रायफल शुटींग खेळले जाते. तसेच आगामी काही वर्षात ऑलंपिकमध्ये या खेळाची वर्णी लागण्याची शक्यता जेष्ठ नेमबाज व टायरो कंपनीचे राजीव ठाकूर यांनी व्यक्त केली .यावेळी प्रेसीहोल कंपनीचे मालक डॉ .श्री. वाय पी. तथा योगेंद्र शिरसाट व अंजूम काझी यांनी उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन करताना नियम पाळा ,खेळा आणि जिंका असा सल्ला दिला. दरम्यान बॉलीवुडचे जेष्ठ विनोदवीर टिकू तलसानिया यांनी देखील स्पर्धक म्हणून हजेरी लावल्याने उपस्थितांना आणखी प्रेरणा मिळाली. राज्यसरकारने याकडे लक्ष पुरविल्यास महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करेल अस उद्गार त्यांनी यावेळी काढले. सदर स्पर्धेत वयाने सर्वात कमी असलेल्या यंगेस्ट शुटर ठरलेल्या किमयाचे प्रेसीहोल्सच्या अंजूम काझी व जेष्ठ अभिनेते टिकू तलसानिया यांनी विशेष अभिनंदन केले. यावेळी जेष्ठ राष्ट्रीय नेमबाज पुष्कराज इंगवले , एज्युकेशन ॲण्ड स्पोर्टस प्रमोशन फाऊंडेशनचे रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष व स्काऊट मास्टर ॲड . प्रशांत जाधव , ठाणेचे प्रथितयश नेमबाज मनिष कर्णिक , एसपीएसएसए पालघर चे सर्वेसर्वा समीर पाटील आदि मान्यवर उपस्थित होते.
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज झालेल्या मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपले. या अवकाळी पावसाने आणि पावसाच्या सुसाट वाऱ्याने रत्नागिरी रेल्वे स्थानकालाही झोडपले. धक्कादायक गोष्ट म्हणजे पावसामुळे स्थानकावरील सुशोभीकरणाच्या काही भागातील पीव्हीसी शीट निघून लोबकळण्याचा प्रकार घडला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकाचे देखील कोटयावधी रुपये खर्चून सुशोभीकरण करण्यात येत आहे. मात्र आज झालेल्या घटनेमुळे या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोकण रेल्वेच्या सुशोभणीकरणाचे काम सर्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने करण्यात येत आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री रविन्द्र चव्हाण यांनी या कामी पुढाकार घेतला असून यामुळे या रेल्वे स्थानकांना कार्पोरेट लूक येणार आहे. मात्र हे करताना कोकणातील पाऊस आणि वादळाचा विचार केले असल्याचे दिसत नाही कारण उद्घाटना आधीच या सुशोभीकरणाचा बोऱ्या वाजला आहे. आजच्या पावसात या स्थानकावरील छताला लावलेले पीव्हीसी शीट खाली निघाल्या, काही शीट लोम्बकळण्याच्या अवस्थेत दिसत होत्या.
रत्नागिरी शहरात परतीचा पाऊस झाला प्रचंड विजांच्या कडकडाट सह वादळी वारे सुटले असून त्याचा फटका कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाला बसला आहे मात्र हा प्रकार घडला त्यावेळी त्या ठिकाणी प्रवासी उभे नसल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही यामुळे कोकण रेल्वेच्या सुशोभीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Konkan Railway: कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड (KRCL) चे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याबाबत विचार सुरू असून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर याबाबत निर्णय घेतला जाईल, असे रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना गुरुवारी हुबळी येथील रेल सौधा येथे आढावा बैठकीच्या अध्यक्षतेनंतर पत्रकारांशी बोलताना म्हणालेत .
यापूर्वी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनचे भारतीय रेल्वेमध्ये विलीनीकरण करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यानंतर महाराष्ट्रात या प्रस्तावाला विरोध झाला होता. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर या प्रस्तावावर पुन्हा चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
कोकण रेल्वे कार्पोरेशन ही स्वतंत्र संस्था असल्याने तिला मिळणार्या नफ्यातच विकासकामे करावी लागतात त्यामुळे त्यावर मर्यादा येतात. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात कोकण रेल्वेसाठी कोणतीही तरतूद केली जात नाही आहे. त्याचप्रमाणे केंद्र सरकारच्या अनेक लाभांपासून कोकण रेल्वेमार्ग वंचित राहिला आहे. अनेक समस्यांनी घेरलेल्या आणि कर्जबाजारी असलेल्या कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेत विलीनीकरण व्हावे अशी मागणी आता महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधी आणि प्रवासी संघटनांनी करण्यास सुरवात केली आहे. अलीकडेच कोकण रेल्वेच्या विलिनीकरणा संदर्भात मुंबई मध्ये अखंड कोकण रेल्वे सेवा समितीची पत्रकार परिषदे संपन्न झाली होती. या परिषदेत कोकण रेल्वेच्या विलिनीकरणाच्या मागणीवर जोर देण्यात आला होता.
रेल्वेतील विविध रिक्त पदांसाठी अर्ज करण्याच्या मुदतीत वाढ करण्यात आली आहे. दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी अर्ज स्वीकारण्याची मुदत संपत होती तिला १५ दिवसांची मुदत वाढ देण्यात आली असून दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत अर्ज स्वीकृती करण्यात येईल अशी माहिती कोकणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज दिली.
कोकण रेल्वेने विविध १९० पदांसाठी भरती जाहीर केली होती. ही भरती लोटे एमआयडीसी येथील रोलिंग स्टॉक कंपनी साठी आहे असा गैरसमज काही अर्जदारांमध्ये आहे. मात्र ही भरती रोलिंग स्टॉक कंपनीसाठी नसून कोकण रेल्वेसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Konkan Railway is pleased to announce the extension of last date of submission of application to 21/10/2024 for the 190 vacancies across various posts in KRCL. Shri Santosh Kumar Jha, CMD/KRCL advises candidates to remain vigilant & avoid fraudulent schemes. @RailMinIndiapic.twitter.com/IxxLzFnepc
कोकण रेल्वेने KRCL विविध स्तरावरील पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कोकण रेल्वे प्रशासनाने विविध पदांसाठी आणि एकूण १९० जागांसाठी नोकर भरतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीत या पदांसाठी स्थानिकांना प्रथम प्राधान्य देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. जाहीर केलेल्या पदांसाठी दिनांक १६ सप्टेंबर २०२४ ते ०६ ओक्टोम्बर २०२४ अशी अर्ज करण्याची मुदत असणार आहे.
लेवल १ ते ७ पदांसाठी ही भरती असणार असून वेतन श्रेणी १८००० ते ४४९०० प्रति महिना असणार आहे. तर वयोमर्यादा १८ ते ३६ अशी आहे. विविध प्रवर्गातील उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या असून वयाच्या अटी नियमाप्रमाणे शिथिल केल्या आहेत.
कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी तसेच स्थानिकांसाठी प्राधान्य
या भरतीत प्राधान्यक्रम ठरवून दिला आहे. पहिले प्राधान्य महाराष्ट्र,गोवा आणि कर्नाटक या राज्यातील कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्तांसाठी देण्यात येईल. त्यानंतर कोकण रेल्वे मार्ग या तिन्ही राज्यातून ज्या भागातून गेला त्या त्या जिल्ह्यातील उमेदवारांना देण्यात येईल. तिसरे प्राधान्य महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तिन्ही राज्यातील उमेदवारांना तर त्यानंतर सध्या कोकण रेल्वेच्या सेवेत असलेल्या उमेदवारांना देण्यात येणार आहे
मुंबई : मध्य रेल्वे प्रशासनाच्या नवीन वेळापत्रकाप्रमाणे 5 ऑक्टोबर 2024 पासून चार गाडयांना थांबा देण्यात येणार आहे. दिवा शिवसेना उपशहरप्रमुख आणि दिवा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष आदेश भगत यांनी याबाबत मध्य रेल्वे प्रशासनाकडे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी केली होती.
कळवा आणि मुंब्रा येथून लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. या प्रवाशांच्या सोयीच्या दृष्टीने प्रामुख्याने आता सकाळी आणि सायंकाळी या गर्दीच्या वेळेत 4 जलद गाडयांना थांबा देण्यात आला आहे. यामुळे कळवा आणि मुंब्रा येथील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
या गाडयांना थांबा –
– अंबरनाथहुन-मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकात सकाळी 8.56 वाजता थांबेल.
– आसनगावहुन-मुंबईच्या दिशेने जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात सकाळी 9.23 वाजता थांबेल.
– मुंबईहून बदलापूरच्या दिशेने जाणारी जलद लोकल कळवा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.29 वाजता थांबेल.
मुंबईहून टिटवाळ्याच्या दिशेने जाणारी जलद लोकल मुंब्रा रेल्वे स्थानकात सायंकाळी 7.47 वाजता थांबेल.
नवी दिल्ली: संपूर्ण मराठी भाषा प्रेमींना अभिमान वाटावा अशी बातमी नुकतीच समोर आली आहे. केंद्र सरकारने मराठी भाषेला ‘अभिजात दर्जा’ देण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुकीच्या आधी केंद्र सरकारने गेल्या अनेक दशकांपासूनची मराठी जनतेची ही मागणी पूर्ण केली आहे.
देशात आतापर्यंत सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. तमिळ भाषेला सर्वात आधी २००४ ,संस्कृत (२००५), कन्नड (२००८), तेलुगु (२००८), मल्याळम (२०१३) आणि ओडिया (२०१४) या भाषांना अभिजात दर्जा बहाल केला गेला. हा दर्जा मिळणे म्हणजे भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटते.
अभिजात दर्जा मिळाल्याने कोणते फायदे मिळणार?
अभिजात दर्जा असलेल्या भाषा अधिक समृद्ध होण्यासाठी केंद्र सरकारकडून दरवर्षी सुमारे २५०-३०० कोटी रुपयांचे अनुदान दिले जाते. भाषा भवन उभारणे, त्या भाषेतील ग्रंथ व साहित्याचा प्रसार करणे, ग्रंथालये उभारणे, देशभरातील विद्यापीठे किंवा अन्य संस्थांमार्फत भाषेचा प्रसार यासह इतर प्रकल्पांसाठी आर्थिक पाठबळ दिलं जातं. सर्वात महत्त्वाचे म्हणजे भारतातील सर्व ४५० विद्यापिठांमध्ये मराठी भाषा शिकवण्याची सुविधा उपलब्ध केली जाऊ शकते. अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यास त्या भाषेतील विद्वानांसाठी दरवर्षी दोन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर केले जातात. सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर स्टडिजची स्थापना केली जाते. प्रत्येक विद्यापीठात त्या त्या भाषेचा अभ्यास करण्यासाठी विशेष केंद्र उभारलं जातं.
भाषेला ‘अभिजात दर्जा’ मिळण्याचे निकष काय?
संबंधित भाषा प्राचीन असावी आणि त्यातील साहित्य श्रेष्ठ असावे
– भाषेचे वय दीड ते अडीच हजार वर्षांचे असावे लागते
– त्या भाषेला स्वत:चे स्वयंभूपण असावेत
– प्राचीन भाषा आणि तिचे अधुनिक रुप यांचा गाभा कायम असावा
अभिजात दर्जा मिळवण्यासाठीचे सर्व निकष मराठी भाषेने पूर्ण केले आहेत.
मुंबई : राज्य सरकारने राज्यातील महिलांच्या मदतीसाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताना काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याचं समोर आलं आहे. नांदेडमधील हदगाव तालुक्यातील मनाठा येथे सीएससी केंद्र चालकानं घोटाळा केल्याचं समोर आलं आहे. महिलांची नावं आणि पुरुषांचे आधार क्रमांक नोंदवून लाडकी बहीण योजनेचे अर्ज दाखल करण्यात आले होते. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी संबंधितांची बँक खाती सील करणार असल्याचं म्हटलं होतं. त्यानुसार एकूण 18 खाती गोठवण्यात आली आहेत.
18 खाती गोठवली, अदिती तटकरेंची माहिती
महाराष्ट्रातील माता भगिनींच्या कल्याणासाठी महायुती सरकारने प्रामाणिक हेतूने राबवलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करून चुकीच्या मार्गाने लाभ मिळवणाऱ्या 16 पुरुषांचे तसेच या गैरप्रकारात तांत्रिक सहाय्य करणाऱ्या व्यक्तीचे वैयक्तिक तसेच व्यावसायिक बँक खाते गोठवण्यात आले आहे. यापुढेही महाराष्ट्रातील माता भगिनींच्या हिताला बाधा आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर कडक कारवाई करण्यात येणार आहे, असं अदिती तटकरे म्हणाल्या.
नांदेड जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेत नांदेड जिल्हयातील हदगाव तालुक्यातील मनाठा येथील सीएससी केंद्रचालकाने घोटाळा केल्याचं उघडं झालं होतं. सचिन मल्टीसर्विसेस नावाने गावातील सचिन थोरात हा युवक सुविधा केंद्र चालवतो. त्यानं रोजगार हमी योजनेसाठी कागदपत्र घेऊन लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरले. संबंधितांच्या खात्यात रक्कम आल्यानंतर ते पैसे आपले असल्याचं काढून घेतल्याचं समोर आलं होतं.
मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे लवकरच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची सुत्रांची माहिती आहे. नारायण राणे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आज वर्षा बंगल्यावर भेट झाली. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांची मोर्चेबांधणी सुरू आहे. विधानसभेचा थेट मुकाबला महायुती व महाविकास आघाडीमध्येच होणार आहे. दोन्ही आघाड्यांच्या घटक पक्षांमध्ये झालेल्या चर्चेनुसार ज्यांचा ज्या मतदारसंघात आमदार ती जागा त्याच पक्षाला सोडली जाणार आहे. त्यानुसार कुडाळ मतदारसंघ महायुतीत शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. येथून निलेश राणे इच्छुक आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीत कुडाळ विधानसभा मतदारसंघावर राणे कुटुंबीयांनी दावा केल्याचे सांगितले जात आहे. महायुतीतील जागावाटपात कुडाळ विधानसभा मतदारसंघ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला जाण्याची शक्यता असल्याने निलेश राणे शिवसेनेत प्रवेश करु शकतात.
तळकोकणातील कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघावरून महायुतीमध्ये चर्चा सुरू आहे. माजी खासदार निलेश राणे कुडाळमधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते भाजपाच्या की शिवसेना शिंदे पक्षाच्या चिन्हावर ही निव़डणूक लढवणार याबाबत लवकरच निर्णय होणार आहे. ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास ते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
मुंबई: मुंबई महानगर प्रदेश (एमएमआर) चे जागतिक आर्थिक केंद्रात रूपांतर करण्याच्या आपल्या महत्त्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने पहिले पाऊल उचलले आहे. हे सुरुवातीला MMR समाविष्ट असलेल्या मोठ्या ६,३५५ चौरस किलोमीटरमधील १,२५० चौरस किमीच्या क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) ला विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) म्हणून नियुक्त केले आहे.
या योजनेनुसार पालघर, वसई, पनवेल, खालापूर, पेण आणि अलिबाग या तालुक्यांतील ४४६ गावांवर एमएमआरडीए लक्ष केंद्रित करणार आहे. या क्षेत्रात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांसह मेट्रो कनेक्टिव्हिटी, चांगले रस्ते आणि पूल, नवीन सीवरेज आणि ड्रेनेज लाईन आणि रिअल इस्टेट विकासावरील नियमांसह सर्वसमावेशक पद्धतीने हे काम हाती घेतले जाणार आहे.
हा मेगा-प्लॅन महाराष्ट्र सरकारने एमएमआरला जागतिक आर्थिक केंद्रात रुपांतरित करण्यासाठी तयार केला आहे ज्यात फिनटेक, रोबोटिक्स, एआय, आरोग्य, शिक्षण, जागतिक विमान वाहतूक सेवा आणि मनोरंजन यासारख्या सेवांवर लक्ष केंद्रित केले आहे. या आणि इतर क्षेत्रांमध्ये गुंतवणूक आकर्षित करण्याचे आणि पुढील सात वर्षांत या प्रदेशासाठी तीनशे डॉलर अब्ज GDP चे राज्याचे उद्दिष्ट साध्य करण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.
MMR योजना आधीच सुरू असलेल्या आणि MMR सोबत संलग्न असलेल्या इतर मेगा-प्रोजेक्ट्ससह, वाढवण बंदर, पालघर येथील बुलेट ट्रेन स्टेशन, पनवेल-कर्जत सेक्शनवरील नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर, विरार-अलिबाग मल्टीमॉडल कॉरिडॉर, यासह इतर मेगा-प्रोजेक्ट्सचा समावेश करेल.
“आम्हाला अलीकडेच एक आदेश प्राप्त झाला आहे ज्यामध्ये MMRDA ला MMR मध्ये १,२५० चौरस किलोमीटरसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) बनवण्यात आले आहे. रायगड आणि पालघर जिल्ह्यांतील या क्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावांसाठी आम्ही एक समग्र योजना तयार करू,” असे एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
या ४४६ गावांपैकी २२३ गावे पालघर जिल्ह्यातील वसई आणि पालघर या तालुक्यांमध्ये येतील आणि रायगड जिल्ह्यातील अलिबाग, पेण, पनवेल आणि खालापूर या तालुक्यांमध्ये तेवढीच गावे येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
एमएमआरडीएची सीमा रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात आणि पूर्वेकडील पाताळगंगा नदीच्या दक्षिण भागात येईल. दक्षिणेला खालापूर, पेण, अलिबागपर्यंत हद्द वाढवण्यात आली आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील अनेक गावेही जोडली गेली आहेत. एमएमआरडीएच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, जुलैमध्ये राज्य सरकारने एमएमआरचा आकार ४,३५५ चौरस किमीवरून ६,३५५ चौरस किमीपर्यंत वाढवला आहे.