



मुंबई, दि.४ सप्टें राज्यातील गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. राज्य सरकारने यावर्षी गणेश भक्तांना टोल माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या 5 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या कालावधीत राज्य सरकारच्या वतीने सर्व गणेश भक्तांना टोल माफ असणार आहे. मुंबई-गोवा महामार्ग, मुंबई-बँगलोर महामार्ग, इतर सर्व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या तसेच महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या टोल नाक्यावर गणेश भक्तांना टोल माफी दिली जाणार आहे.
आज राज्य सरकाराच्या वतीने यासंबधी अधिसूचना काढून टोल प्रशासनाला आदेश देण्यात आले आहेत. गणेश उत्सवासाठी गावी निघालेल्या गणेश भक्तांच्या सर्व गाड्या आणि राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या बसेसना टोल नाक्यावर मोफत सोडले जाणार आहे. तसेच फ्री पाससाठी संबंधित वाहतूक विभागाकडे संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या टोलमाफी सवलतीसाठी ‘गणेशोत्सव २०२४, कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरुपाचे पथकर माफी पास, त्यावर वाहन क्रमांक, चालकाचे नाव असा मजकूर लिहून ते स्टीकर्स आवश्यक त्या संख्येनुसार परिवहन विभाग, वाहतूक पोलीस/पोलीस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग (आर.टी.ओ.) यांनी समन्वय साधून पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या व आर.टी.ओ. कार्यालयांमध्ये उपलब्ध करुन द्यावेत, असे आदेश देण्यात आले आहेत. हाच पास परतीच्या प्रवासाकरीता देखील ग्राह्य धरण्यात येईल.तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसना ही टोल माफी लागू असणार आहे. गणेशोत्सवासाठी ज्या जिल्ह्यातून बसेस येथील त्या ठिकाणच्या पोलीस किंवा आरटीओ यांच्याकडून हे पास एसटी महामंडळाला उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
पोलीस आणि परिवहन विभागाने गणेशोत्सवाच्या काळात पास सुविधा आणि त्यांच्या उपलब्धतेबाबतची माहिती नागरिकांना देण्याच्या देखील सूचना आहेत.
कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची मागणी.
Follow us on



सिंधुदुर्ग: काल रेल्वे बोर्डाने ०११०३/०११०४ मुंबई – कुडाळ – मुंबई अनारक्षित गणपती विशेष गाडी सोडण्याचा निर्णय घेतला, वास्तविक बघता गणेशोत्सव हा पूर्ण कोकणचा मोठा उत्सव असल्याकारणाने संपूर्ण कोकणात मुंबईकर चाकरमानी हे लाखोच्या संख्येने येत असतात, असे असताना रेल्वे प्रशासनाने आधीच गुजरात वरून सुटणाऱ्या गाड्या ह्या कुडाळ पर्यंत चालवण्याचा निर्णय घेतला, एकीकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सावंतवाडी, सावंतवाडी येथील अपूर्ण असणारे रेल्वे चे टर्मिनस मार्गी लावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत असताना रेल्वे प्रशासन मात्र गाड्या ह्या कुडाळ पर्यंत सोडून सावंतवाडी तालुका, शिरोडा – तुळस पंचक्रोशी, आणि दोडामार्ग तालुका वासियांना वाऱ्यावर सोडत असल्याचे चित्र आहे.
सदर ची गाडी ही मुंबईहून येताना पहाटे ३.३० वाजता कुडाळ ला पोचेल आणि लगेच ४.३० वाजता तिथून मुंबई करिता रवाना होणार आहे.
असे असताना फक्त २० मिनिटे अंतर असणाऱ्या सावंतवाडी स्थानकावर ही गाडी आणल्यास या गाडीचा फायदा सावंतवाडीवासियांना देखील मिळेल आणि लोकांची ऐन रात्रीच्या वेळी परवड देखील होणार नाही.
त्यामुळे ही अनारक्षित गाडी सावंतवाडी पर्यंत सोडावी ही मागणी जोर धरू लागली आहे.
🚂सिएसएमटी – कुडाळ अनारक्षित विशेष गाडी सावंतवाडी किंवा मडुरेपर्यंत विस्तारित करण्याची मागणी – Kokanai
✴️कोकण रेल्वे प्रवासी संघटना, सावंतवाडीची मागणी.
सविस्तर वृत्त- https://t.co/cIpohPauPB…@KonkanRailway@Central_Railway pic.twitter.com/01aTxiGzEF
— को – बातम्या मराठीत (@kokanai21) September 4, 2024




कुडाळ, दि. ४ सप्टें: कुडाळ रेल्वे स्थानक परिसर सुशोभीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आज बुधवार दिनांक ४ रोजी दुपारी १२ वाजता खासदार नारायण राणे व सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन स्थानकांचे सुशोभीकरण केले आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली या तिन्ही स्थानकांचे रूपडे पूर्णतः बदलून या स्थानकांना विमानतळाचे स्वरुप दिले गेले आहे. यासाठी जिल्हय़ाचे पालकमंत्री रविन्द्र चव्हाण यांच्या कल्पकतेचे कौतुक होत आहे. यापूर्वी कणकवली आणि सावंतवाडी या स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करून गेल्याच महिन्यात त्यांचे लोकार्पण करण्यात आले होते. मात्र कुडाळ रेल्वे स्थानकाचे काही काम अपूर्ण राहिले असल्याकारणाने त्याचे लोकार्पण पुढे ढकलण्यात आले होते.
कुडाळ स्थानकाच्या आजच्या या सोहोळ्यासाठी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख निलेश राणे, विधानसभा परिषद सदस्य निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार नितेश राणे, भाजपा जिल्ह्या अध्यक्ष प्रभाकर सावंत आणि अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. तरी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते तसेच लोकप्रतिनिधी यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कुडाळ भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, दादा साईल यांनी केले आहे.




Konkan Railway Updates: यावर्षी गणेशोत्सवासाठी कोकणात जाणार्या गणेश भक्तांसाठी एक खुशखबर आहे. गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने कोकण रेल्वे मार्गावर एक अनारक्षित विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्या चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी आरक्षित तिकिटे भेटली नाहीत त्यांना एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. या गाडीची माहिती खालीलप्रमाणे
०११०३/०११०४ सिएसएमटी – कुडाळ – सिएसएमटी विशेष
गाडी क्रमांक ०११०३ विशेष गाडी दिनांक ०४ सप्टेंबर आणि ०६ सप्टेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई या स्थानकावरून दुपारी ०३.१५ वाजता सुटेल आणि दुसर्या दिवशी पहाटे ३.३० वाजता कुडाळ येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक ०११०४ विशेष गाडी दिनांक ०५ सप्टेंबर आणि ०७ सप्टेंबर रोजी कुडाळ या स्थानकावरून पहाटे ०४.३० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी १६.४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई येथे पोहोचेल.
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, कामथे, सावर्डा आरवली रोड, संगमेश्वर , रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, नांदगाव, कणकवली आणि सिंधुदुर्ग
डब्यांची संरचना: जनरल – १४, स्लीपर (अनारक्षित) – ०४, एसएलआर – ०२ एकूण २० डबे




Kokan Railway Updates: गणेश चतुर्थीला गावी जाण्यासाठी रेल्वे प्रशासन कोकण रेल्वे मार्गावर विशेष गाड्या चालवत आहेत. मात्र प्रवाशांची वाढती गर्दी पाहता याही गाड्या अपुर्या पडताना दिसत आहेत. यामुळे रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्यांच्या डब्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे या गाडीच्या प्रतीक्षा यादीतील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
खालील गाड्यांना यापुर्वी जाहीर केलेल्या डब्यांव्यतिरिक्त प्रत्येकी २ सेकंड स्लीपर डबे जोडण्यात येणार आहेत.
दिनांक ०३ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४१२ अहमदाबाद – कुडाळ विशेष
दिनांक ०४ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४११ कुडाळ – अहमदाबाद विशेष
दिनांक ०६ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२४ अहमदाबाद – मंगळुरु जं. विशेष
दिनांक ०७ सप्टेंबर रोजी प्रवास सुरु करणारी गाडी क्रमांक ०९४२३ मंगळुरु जं. – अहमदाबाद विशेष




Konkan Railway News: कोकण रेल्वे मार्गावर नव्याने सुरु करण्यात आलेली वांद्रे (टी) – मडगाव जं- वांद्रे (टी) द्वि-साप्ताहिक एक्सप्रेसची नियमित फेरी आजपासून सुरु झाली असून आज सकाळी गाडी क्रमांक 10116 मडगाव जं.-वांद्रे(टी) द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस मोठ्या उत्साहाने मडगाववरुन मुंबईच्या दिशेने रवाना करण्यात आली आहे.
गोवा सरकारचे कायदा आणि न्यायव्यवस्था, पर्यावरण, बंदरे आणि विधिमंडळ कामकाजाचे कॅप्टन श्री.अलेक्सो ए. सिक्वेरा यांच्या तर्फे या गाडीला हिरवा बावटा दाखविणायत आला. यावेळी मडगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिगंबर कामत, नवलीम विधानसभा मतदार संघाचे आमदार उल्हास तुयेकरआदी मान्यवर उपस्थित होते.




सावंतवाडी: आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी बस कर्मचार्यांनी संप पुकारून ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर नागरिकांना वेठीस धरले आहे. सावंतवाडी आगार आज पूर्ण बंद असून तिथून एकही बस सुटली नसल्याने शाळेत जाणार्या विद्यार्थ्यांचे, नागरिकांचे आणि गावाकडे येणार्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होत आहे.
सावंतवाडी रेल्वे स्थानक आणि शहर यातील अंतर जास्त असल्याने एसटी बस चा सोयीचा पर्याय बंद असल्याने आज येथे येणार्या चाकरमान्यांना घरी पोहोचण्यासाठी मोठा आर्थिक फटका बसत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी बसेस नसल्याने आज शाळेत पोहोचू शकले नाहीत. अवघ्या चार दिवसांवर आलेल्या गणेश चतुर्थी सणाच्या खरेदीसाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होणार आहे. राज्य शासनाने हा संप लवकरात लवकर मिटवून एसटी बसेस चालू कराव्यात अशी मागणी होत आहे




मुंबई: यावर्षी गणेशोत्सवाच्या तोंडावर महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ अर्थात एसटी कर्मचाऱ्यांनी संपाची हाक दिल्याने कोकणात गावी जाणार्या चाकरमान्यांची कोंडी होण्याची शक्यता आहे.
काय आहेत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच 4849 कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी सरसकट 5000 रुपये हजार मिळावेत अशा मागण्या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात आल्या आहेत.
गणपतीच्या काळात कोकणात जाण्यासाठी प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे या काळात कोकणात विशेष एसटी बसेस सोडल्या जातात. मात्र, एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे त्यावर परिणाम होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन एसटी प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तसेच कर्मचाऱ्यांना आंदोलनामध्ये भाग न घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे आता किती एसटी कर्मचारी आणि कोणत्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार? हे पाहावे लागेल.
याशिवाय, एसटी स्थानकांवर आवश्यक तो पोलिस बंदोबस्त लावण्यात यावा, यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. आंदोलनावेळी बसस्थानकात कोणताही अनुसूचित प्रकार घडू नये, यादृष्टीने दक्षता घेतली जात आहे. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे कुठल्याही डेपोत एसटी बसच्या फेऱ्या रद्द झाल्यास त्याच्या सूचना मध्यवर्ती कार्यालयात दिल्या जातील. जेणेकरून एसटी प्रशासनाकडून प्रवाशांसाठी पर्याची बसेसची सोय केली जाईल.