Category Archives: अपघात

कशेडी घाटात टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात; ८ प्रवासी जखमी

रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड हद्दीमधील कशेडी घाटात आज सकाळी ११:५० वाजता टँकर आणि एसटी बस मध्ये अपघात झाला.  या अपघातात ८ प्रवासी जखमी झाले असून त्यांना कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार कशेडी महामार्ग पोलीस मदत केंद्रापासून सुमारे ३ किलोमीटर अंतरावर कशेडी घाटात ठाणे ते चिपळूण जाणारी एसटी बसक्र. MH-14-BT-2635 वरील चालक योगेश दादाजी देवरे वय ३५ वर्षे हे कशेडी घाट उतरत असताना समोरुन वाकवली तालुका दापोली ते मुंबई जाणारा टँकर क्रमांक UP-70-HT-7551 वरील चालक दिनानाथ हिरालाल यादव वय ५५ वर्षे राहणार घाटकोपर, मुंबई यांना डोळआ लागल्याने गाडी चुकीच्या साईडला जाऊन समोरून येणाऱ्या एसटी बसला धडकली. या अपघातामध्ये सहाय्यक फौजदार यशवंत बोडकर आणि पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत महामार्गावरील वाहतूक सुरळीत करत अपघात ग्रस्तांना मदत केली.
अपघातामधील एसटी बसमध्ये एकूण २५ प्रवासी होते. त्यापैकी ८ प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या जखमींपैकी अनंत दत्तात्रेय विंचू यांना जास्त प्रमाणात दुखापत झाल्याने खेड कळंबणी उपजिल्हा रुग्णालय इथे प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालय रत्नागिरी इथे पाठविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या अपघाताची नोंद खेड पोलीस ठाण्यात करण्याची कार्यवाही संध्याकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

Loading

हातखंबा येथे डंपर आणि ट्रक मध्ये अपघात; १ जण जखमी

रत्नागिरी: हातखंबा येथे डंपरने ट्रकला धडक दिल्याने एक जण जखमी झाला आहे .हातखंबा येथील ईश्वर धाब्यासमोर शुक्रवारी दिनांक ४ रोजी सकाळी ११ च्या सुमारास मागून येणाऱ्या डंपरने पुढे असणाऱ्या ट्रकला धडक देत अपघात केला. यात एकजण जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले.

निवळीहुन हातखंब्याच्या दिशेने दोन्ही वाहने मार्गक्रमण करीत असताना ईश्वर धांब्यासमोर ट्रक (गाडी क्रमांक MH 14 BJ 4731) आला असता मागून येणारा डंपरने (क्रमांक-MH10CR-8970) धडक दिली. या अपघातात धडक देणाऱ्या डंपर चालक गणेश दिलीप मयेकर (वय 36 राहणार- पोमेंडी रत्नागिरी) हा स्वतः जखमी झाला. डंपरमधील जखमी चालकाला उपचारांसाठी रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Loading

मुंबई गोवा महामार्गावरील भोस्ते घाटामध्ये दोन वाहनांचा भीषण अपघात; २ ठार

Mumbai Goa Highway Accident :मुंबई गोवा महामार्गावर भोस्ते घाटामध्ये महामार्गाच्या बाजूला असलेल्या खड्ड्यात काल गुरुवारी  सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास दोन ट्रक कोसळून भीषण अपघात झाला.

महामार्गाच्या डाव्या बाजूला सुमारे पस्तीस फूट खोल हे दोन्ही ट्रक कोसळले होते. त्यातील एका ट्रकमध्ये तीन लोक अडकले होते. या घटनेत दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. तसेच एक जण गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, माशांचे जाळे घेऊन जाणारा एक आयशर ट्रक आणि कंटेनर यांच्यात हा अपघात झाला आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ट्रकने मागून धडक दिल्याने ही दोन्ही वाहने दरीत कोसळली. या घटनेचे वृत्त कळताच पोलीस ग्रामस्थ आणि खेड येथील मदत ग्रुपचे जवान घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा हे रेस्क्यू ऑपरेशन संपले. येथील एका जखमीला खेड येथील कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाची नोंद रात्री उशिरापर्यंत खेड पोलीस ठाण्यात करण्याचे काम सुरू होते. खेडचे पोलीस निरीक्षक भोयर आणि सहाय्यक निरीक्षक चव्हाण हे अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.

Loading

समृद्धी महामार्गाच्या कामावेळी मोठी दुर्घटना; क्रेन कोसळल्याने १७ जणांचा मृत्यू.

ठाणे : गर्डर मशिन कोसळल्याने समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे.यामध्ये १७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार ते पाच जण जखमी आहेत.

समृद्धी महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्याच्या कामावेळी ही मोठी दुर्घटना घडली आहे. ठाण्याजवळ शहापूर तालुक्यातील सरलांबे येथे पुलाच्या कामावेळी गर्डर मशिन कोसळली.घटनेची माहिती मिळताच बचाव पथक आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. जखमींना ठाण्यातील ज्युपिटर हॉस्पिटल व शहापूर मधील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून जवळपास 10 ते 15 जण तिथं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. पाऊस आणि चिखलामुळे सध्या मदतकार्यात अडथळे येत असल्याचीही माहिती आहे.

हा अपघात इतक्या भीषण स्वरुपाचा होता की, त्याबाबतची माहिती मिळताच राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे मालेगाव येथून अपघात स्थळी पोहचले आणि त्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतला.

Loading

इर्शाळवाडी दुर्घटना | बचावकार्य थांबवले; ७८ बेपत्ता व्यक्ती मृत घोषित | दुर्घटनेचा सविस्तर अहवाल प्रसिद्ध

पोस्ट केले – दिनांक 23 जुलै – 19:30: बचावकार्य थांबवले; ७८ बेपत्ता व्यक्ती मृत घोषित | दुर्घटनेचा सविस्तर अहवाल जाहीर

इर्शाळवाडी दुर्घटनेच्या बचावकार्याचा आज चौथा आणि शेवटचा दिवस होता. आतापर्यंत एकूण २७ जणांचे मृतदेह सापडले असून अंदाजे ७८ जण अजूनही बेपत्ता आहेत. या बेपत्ता व्यक्तींना मृत घोषित करून बचाव कार्य आज थांबविण्यात आले आहे. घटनस्थळावरील दुर्गंधीमुळे बचावकार्य थांबविल्याचे समजते.  या घटनेबाबत सविस्तर अहवाल उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार या गावात एकूण ४३ कुटुंबे आणि २२९ व्यक्ती राहत होते. त्यातील २७ मयत,७८ बेपत्ता तर ११४ हयात आहेत. एकूण २२ जण जखमी झाले असून १८ जणांना उपचार करून सोडले आहे.
सविस्तर अहवाल पुढीलप्रमाणे 
Ad -

मराठी मुलांमुलींना युरोप, पोर्तुगाल,माल्टा,इटली आणि पोलंड येथे नोकरीच्या संधी....
🔸Retail Jobs 🔸Malls 🔸Corporate Staff 🔸Sales 🔸Back Office 🔸Hotels
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.

पोस्ट केले – दिनांक 22 जुलै11:30: शोध मोहिमेचा ३ रा दिवस; अजूनही १०७ जण बेपत्ता असल्याची माहिती 

रायगड : इर्शाळवाडी येथील घटनेला आज तीन दिवस झाले. ६७ नागरिकांना निवारा केंद्रात ठेवले असून, १०७ जण अजूनही बेपत्ता असल्यचं सांगण्यात येतंय. ८ जखमींवरमीं एमजीएम व शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

आजही सकाळपासून शोध मोहिमेला सुरुवात झालेली आहे. प्रशासनाकडून दिवस-रात्र घटनास्थळी काम सुरु आहे. NDRF ची टीम अजूनही ढिगाऱ्याखालील मृतदेह काढण्यात व्यस्त आहे. मुसळधार पावसामुळे यात अडथळे येत आहेत. इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत.
इर्शाळवाडीची दुर्घटना होऊन ३० तासांहून अधिक कालावधी लोटल्याने शुक्रवारी परिसरात दुर्गंधी सुटली. सध्या शोधमोहीम सुरू असल्याने हजारो जण याठिकाणी मदतकार्य करीत आहेत. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी करण्यात आली आहे.

पोस्ट केले – दिनांक 22 जुलै10:30: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुर्घटनाग्रस्त मुलांचे पालकत्व स्विकारणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपघातग्रस्त मुलांचे पालकत्व स्विकारणार असण्याचे जाहीर केले आहे. यासंबंधी त्यांनी ट्विटर पुढीलप्रमाणे माहिती दिली आहे.

ज्या इर्शाळगडाच्या कडेकपारीच्या अंगाखांद्यावर येथील मंडळी खेळली, तोच निसर्ग काळ होऊन आला. काही कळायच्या आत दरड कोसळली आणि होत्याचे नव्हते झाले. रात्री झोपेत असलेल्या अनेकांचे जीव गेले. काही अद्याप बेपत्ता आहेत. शिक्षणासाठी आश्रमशाळा किंवा अन्यत्र असलेल्या मुलांनी आपले आई-वडील गमावले. दोन वर्षांपासून १४-१५ वर्षांपर्यंतची मुले अनाथ झाली. या मुलांच्या वाट्याला आलेल्या वेदना, दुःख सांत्वनापल्याड आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर अंधार आहे. त्यांच्या आयुष्यात या कठीण आणि परीक्षेच्या काळात पाठीशी ठाम उभे राहण्याची गरज आहे. समाज म्हणून या मुलांचे पालकत्व स्वीकारून त्यांना मायेच्या पंखाखाली घेणे, विश्वासाची ऊब देणे ही आपली जबाबदारी आहे. हीच बाब लक्षात घेऊन इर्शाळवाडीतील सर्व अनाथ मुलांच्या पाठीवर आधाराचा हात ठेवण्याचे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनने ठरवले आहे. काळाने येथील मुलांवर मोठा आघात केला असला तरी त्यांचे आयुष्य सावरून जगण्याचे बळ देण्याचा निश्चय करण्यात आला आहे. या मुलांच्या शिक्षण आणि पालनपोषणाची जबाबदारी फाउंडेशनकडून घेण्यात येत आहे.

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 


पोस्ट केले – दिनांक 21 जुलै – 18:15: मृतांची संख्या 22 वर पोहोचली 

ईर्शाळवाडी दरड दुर्घटनेतील मृतांची संख्या 22 वर पोहोचली आहे. कालपर्यंत 16 जणांचा मृत्यू झाला होता.

आज सकाळपासून पुन्हा बचावकार्य सुरू केलं.आतापर्यंत सहा मृतदेह बाहेर काढले. त्यात तीन महिला व तीन पुरुषांचा समावेश आहे.

पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 11:15:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घटनास्थळी भेट; दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना मदत जाहीर 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटे या गावाला भेट देऊन तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच या दुर्घटनेत सुदैवाने बचावलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना धीर दिला. सरकार तुमच्या पाठिशी असून तुम्हाला लागेल ते सर्व सहकार्य केले जाईल असे सांगून आश्वस्त केले. तसेच दुर्घटनेतल्या मृतांच्या वारसांना त्यांनी पाच लाख रुपयांची मदत केली जाहीर.

यावेळी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपक्रम ) मंत्री दादा भुसे, आमदार महेश थोरवे, आमदार महेश बालदी, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, विभागीय आयुक्त महेश कल्याणकर उपस्थित होते .

पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 10:45: आतापर्यंत 75 जणांचे रेस्क्यू

या ठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर चालू असून अनेक रेस्क्यू टीम या ठिकाणी कार्यरत आहेत. पाऊस असल्याने बचावकार्यात प्रचंड अडथळे. शिवदुर्ग, निसर्ग मित्र, वेध सह्याद्री या टीम्स पोलीस प्रशासनाच्या मदतीने मदतकार्यात सक्रिय आहेत. आतापर्यंत 75 जणांना रेस्क्यू करण्यात आलं असून पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

पोस्ट केले – दिनांक 20 जुलै – 08:00 : दरड कोसळून मोठी दुर्घटना 

रायगड परिसरातील मोरबे डॅमच्या वरील बाजूस असलेल्या इर्शाळवाडीवर काल रात्री उशिरा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीखाली 30 ते 40 घरं दबल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.हा आदिवासी पाडा असून यथे साधारण 250 लोकं राहात असल्याची माहिती मिळत आहे.

Loading

समृद्धी महामार्गावर खासगी बसला भीषण अपघात; २५ प्रवासी ठार.

Bus Accident :समृद्धी महामार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी मध्यरात्री बुलढाण्याजवळ समृद्धी महामार्गावर खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातानंतर बसने पेट घेतल्याने 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सची लक्झरी बस नागपूर येथून पुण्याच्या दिशेने निघाली होती. या बसमधून अंदाजे 33 प्रवाशी प्रवास करीत होते. मध्यरात्रीच्या सुमारास बुलढाण्याजवळीच सिंदखेडराजा परिसरात बसचे टायर फुटले.टायर फुटल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि ही अनियंत्रित बस थेट डिव्हायरला धडकली. अपघातानंतर बसने क्षणात पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही. बसमध्ये अडकून पडल्याने 25 प्रवाशांचा कोळसा झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचा समावेस आहे. सध्या मृत प्रवाशांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. मृतदेह पूर्ण जळले असल्याने त्यांची ओळख पटविण्यात अडचणी येत आहेत. या भीषण अपघातामध्ये चालकासह 8 जणांचा जीव वाचला आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेनंतर दुःख व्यक्त केले असून मृत प्रवाशांचा नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर केली आहे. तसेच जखमीं प्रवाशांच्या उपचाराचा खर्च राज्य सरकार उचलणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

Loading

ओडिसात रेल्वेचा भीषण अपघात; ५० प्रवाशांचा मृत्यू.. १५० हून अधिक जण जखमी

Odisha Train Accident : ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसली. या भीषण रेल्वे अपघातात तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

कोरोमंडल एक्सप्रेसची मालगाडीला धडक बसल्यानंतर रेल्वेचे अनेक डब्बे रुळावरून घसरले. हा अपघात संध्याकाळच्या सुमारास झाल्याचं सांगण्यात येत आहे. या अपघातानंतर या मार्गावरील सर्व रेल्वे गाड्या थांबवण्यात आल्या आहेत.

कोरोमंडल एक्सप्रेस ही रेल्वे कोलकाता येथील हावडा स्थानकावरून चेन्नईला जात असताना ओडिशामधील बालासोर जिल्ह्यात एका मालगाडीला धडकली. त्यानंतर कोरोमंडल एक्सप्रेसचे तब्बल 18 डब्बे रुळावरुन घसरले. यामध्ये तबब्ल 179 जण जखमी झाले असून यामध्ये 50 प्रवाशांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

 

 

 

Loading

रिक्षेत क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी; खेड येथील अपघातात महिलेचा मृत्यू, ६ जण जखमी

Road Accident News – राज्यातील खेड्यापाड्यात वाहतुकीची सार्वजनिक वाहतुकीची अपुरी सोय, खिशाला न परवडणारे खाजगी वाहतुकीचे पर्याय यामुळे तेथे सर्रास नियम मोडून क्षमते पेक्षा अधिक प्रवासी भरून वाहने चालवण्यात येतात, त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते. अशाच एका प्रकारामुळे रत्नागिरी येथील खेड येथे एका महिलेला अपघातात जीव गमवावा लागला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की रत्नागिरी जिल्ह्यातल्या काल मंगळवारी 9 मे रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खेड शिवतर मार्गावर मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी नातेवाईकांच्या लग्नाला जात असताना एक रिक्षा नातवडी धरणाच्या कॅनलमध्ये कोसळली.यात एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याचे कळते तर सहा जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळाली आहे.अपघात मुरडे शिंदेवाडी येथून जाणाऱ्या कॅनॉलमध्ये घडला.माहितीनुसार खेडमधील एकाच कुटुंबातील काही लोक ऑटो रिक्षा मधून मुरडे शिंदेवाडी या ठिकाणी आपल्या नातेवाईकांच्या लग्नाला जात होते. नातूवाडी धरणाच्या कॅनॉलच्या ठिकाणी असलेल्या मोठ्या चढावर रिक्षा चढली नाही व रिक्षा चालकाचा ताबा सुटून रिक्षा उलटी खाली येऊन थेट आठ ते दहा फूट खोल असणाऱ्या कॅनॉलमध्ये पडली. या रिक्षात 7 ते 8 प्रवासी बसले होते.

Loading

मुंबई – गोवा महामार्गावर एसटी बस आणि डंपरचा भीषण अपघात; २३ प्रवासी जखमी, १ गंभीर

Mumba Goa Highway Accident – मुंबई – गोवा महामार्गावर डंपर आणि एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. महाडजवळ एसटी बस आणि कोळशाची वाहतुक करणाऱ्या डंपरमध्ये  भीषण अपघात झाला आहे. अपघातामध्ये एसटी बस मधील २३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी एकाची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. 
हा अपघात आज मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास झाला आहे. मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाड नातेखिंडजवळ हा भीषण अपघात झाला आहे. मुंबई महाबळेश्वर बस आणि डंपर यांची समोरासमोर धडक होऊन हा अपघात झाला आहे. एसटी बस मुंबई दिशेकडून महाडकडे येत असताना आणि डंपर महाड दिशेकडून जात असताना दोघांची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातामध्ये एसटी बसमधील २३ प्रवासी जखमी झाले असून डंपर चालक देखील जखमी झाल्याचे समोर आले आहे. सर्व जखमींवर महाडच्या ट्रॉमा केअर युनिटमध्ये उपचार सुरु आहेत.या अपघतामध्ये ST बसचे फार मोठ्या प्रमाणत नुकसान झालं आहे. घटनास्थळी महाड शहर पोलीस दाखल झाले असून पंचनामा प्रक्रिया सुरू आहे.

Loading

केरळ मध्ये हाऊसबोट बुडाली; २१ प्रवाशांचा मृत्यू

केरळ : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला, यात अधिक लहान मुले आहेत. मृतांची संख्या 21 वर पोहोचली असून 7 जणांची प्रकृती गंभीर आहे. अपघात होताच सुरूवातीला 9 आणि नंतर काही वेळाने 15 जणांचा मृत्यू झाला. रविवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला.

रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. रात्री उशीरापर्यंत बचावकार्य आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची प्रक्रिया सुरू होती.

अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, बोटीमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक होते. यासोबतच बोटीवर संरक्षण उपकरणे नसल्याच्याही बोलले जात आहेत. ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण समुद्रापासून काही अंतरावर आहे.

तनूर जिल्ह्याजवळील ओटीपुरम येथे वाहत्या नदीत बोट किनाऱ्यापासून 300 मीटर अंतरावर असताना हा अपघात झा ला.

Loading

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search