Category Archives: देशभरातील बातम्या

वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक; दोन डब्यांच्या काचा फुटल्या

   Follow us on        

कोची : तिरुवनंतपुरम–मंगळुरू वंदे भारत एक्सप्रेसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. अंगमलीजवळ हा प्रकार घडल्याचे समोर आले असून, या घटनेत दोन डब्यांच्या काचांना तडे गेले आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही.

रेल्वे संरक्षण दल (RPF) अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही गाडी अलुवा स्थानक सोडल्यानंतर सुमारे संध्याकाळी ७.५० वाजता मंगळुरूकडे जात असताना दगडफेक झाली असावी. या घटनेत कोच क्रमांक १ आणि १८ मधील खिडक्यांच्या काचांना तडे गेले.

गाडी मंगळुरूला पोहोचल्यानंतर नुकसान लक्षात आले. त्यानंतर गाडीत बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या आधारे तपास सुरू करण्यात आला. प्राथमिक तपासात ही घटना अंगमली परिसरात घडल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.

अलुवा आरपीएफने मंगळुरू येथील अधिकाऱ्यांकडून सीसीटीव्ही फुटेज मागवले असून पुढील तपास सुरू आहे. वंदे भारत गाड्यांमध्ये प्रत्येक डब्यात तसेच बाहेर देखील देखरेखीसाठी कॅमेरे बसवलेले आहेत.

रेल्वे प्रशासनाने या प्रकाराचा निषेध करत दोषींना लवकरच शोधून कारवाई करण्यात येईल, असे सांगितले आहे

तिकीट दलालांवर IRCTC चा सर्जिकल स्ट्राईक; ३ कोटींहून अधिक बोगस खाती बंद, तर ४.८६ कोटी युजर आयडींवर ‘वॉच’!

[BLOCK ID=”GOOGLE-NEWS”]

नवी दिल्ली: भारतीय रेल्वेने तिकीट आरक्षणातील पारदर्शकता वाढवण्यासाठी आणि सामान्य प्रवाशांना सहज तिकीट उपलब्ध करून देण्यासाठी आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. २०२५ सालात रेल्वेने तंत्रज्ञानाचा वापर करून तब्बल ३.०३ कोटी संशयास्पद युजर आयडी (User IDs) निष्क्रिय केले आहेत. दलालांची साखळी मोडून काढण्यासाठी प्रशासनाने आता ‘आधार व्हेरिफिकेशन’ (Aadhaar-linked rules) अनिवार्य करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.

बोगस खात्यांचा सुळसुळाट थांबवला

रेल्वेने केवळ ३.०३ कोटी खाती बंदच केली नाहीत, तर आणखी ४.८६ कोटी युजर आयडी पुन्हा तपासणीसाठी (Re-validation) ठेवले आहेत. सायबर सुरक्षेचा भाग म्हणून १२,८१९ संशयास्पद ईमेल डोमेन ब्लॉक करण्यात आले असून, ३.९९ लाख संशयास्पद PNR नॅशनल सायबर क्राईम पोर्टलवर नोंदवण्यात आले आहेत. यामुळे अनधिकृतपणे तिकीट पळवणाऱ्या टोळ्यांना मोठा दणका बसला आहे.

तांत्रिक बदल आणि ‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान

दलाल अनेकदा ऑटोमॅटिक बॉट्सचा वापर करून सेकंदात तिकीट बुक करतात. हे रोखण्यासाठी IRCTC ने ‘अँटी-बॉट’ तंत्रज्ञान आणि ‘कंटेंट डिलिव्हरी नेटवर्क’ (CDN) प्रणाली कार्यान्वित केली आहे. यामुळे तिकीट बुकिंगची गती वाढेल आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय होणारी बोगस बुकिंग थांबेल.

वेबसाईट आणि ‘रेल कनेक्ट’ अ‍ॅपमध्ये मोठे बदल

प्रवाशांचा अनुभव सुलभ करण्यासाठी रेल्वेने खालील सुधारणा केल्या आहेत:

  • लॉगिन कॅप्चा (Captcha) हटवला: आता प्रवाशांना अधिक वेगाने लॉगिन करता येईल.

  • सुलभ इंटरफेस: मेनू नेव्हिगेशन आणि फॉर्म भरण्याची प्रक्रिया सोपी करण्यात आली आहे.

  • ट्रेन लिस्ट सॉर्टिंग: आता प्रवाशांना गाड्यांची यादी सुटण्याच्या वेळेनुसार (Departure Time) लावता येईल.

  • फास्टर लोडिंग: तांत्रिक सुधारणांमुळे आता वेबसाईट आणि अ‍ॅप कमी वेळात लोड होतील.

आधार व्हेरिफिकेशन आता अनिवार्य

सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे, ज्या दिवशी बुकिंग सुरू होते (ARP) आणि ‘तात्काळ’ बुकिंगच्या वेळेत आता केवळ ‘आधार-व्हेरिफाईड’ युजर्सच तिकीट बुक करू शकतील. या नियमामुळे दलालांकडून होणारी तिकीटांची काळाबाजारी पूर्णपणे थांबण्यास मदत होईल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

संतापजनक! छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या छायाचित्रांचा अपमानजनक वापर

   Follow us on        

हरियाणा: तमाम भारतीयांचे आदर स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा नको त्या ठिकाणी लावून अपमान झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सिकरी (हरियाणा) येथील मिलन बॅन्केट हॉलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी पद्मिनी यांच्या प्रतिमांचा शौचालयाच्या दरवाज्यांवर लिंग-सूचक चिन्हांसोबत (HE/SHE) वापर केल्याने मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे.

या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, लाखो लोकांनी याला ऐतिहासिक व्यक्तींचा आणि हिंदू आस्थेचा अपमान ठरवले आहे.व्हिडीओमध्ये दिसते की, पुरुष शौचालयाच्या दरवाज्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची आणि महिला शौचालयावर महाराणी पद्मिनी यांची छायाचित्रे लावण्यात आली आहेत. शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि मुघलांविरुद्ध लढणारे महान योद्धा म्हणून पूजले जातात, तर महाराणी पद्मिनी (पद्मावती) या चित्तोडच्या राजपूत राणी आणि धैर्य व बलिदानाच्या प्रतीक मानल्या जातात.

सोशल मीडियावर अनेकांनी याला “निष्काळजीपणा नव्हे, तर जाणीवपूर्वक अपमान” असे म्हटले आहे. काहींनी बॅन्केट हॉल व्यवस्थापनाकडून तात्काळ प्रतिमा काढून टाकणे, सार्वजनिकरीत्या माफी मागणे आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.”हा केवळ चूक नाही, तर संपूर्ण हिंदू समाजाच्या भावनांवर प्रहार आहे,” असे एका युजर्सने म्हटले आहे.

अद्यापपर्यंत बॅन्केट हॉलच्या व्यवस्थापनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.ही घटना फतेहपूर सिकरी किंवा जवळच्या परिसरात असल्याचे काही पोस्टमध्ये नमूद केले जात असले तरी मुख्यतः हरियाणातील सिकरी येथे असल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणामुळे ऐतिहासिक व्यक्तींचा सार्वजनिक ठिकाणी योग्य आदराने वापर व्हावा, यावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.

 

 

 

 

Railway Updates: ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमांत बदल होण्याची शक्यता

   Follow us on        

नवी दिल्ली: रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सुविधेसाठी रेल्वे बोर्डाने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रवासाचे मुख्य स्टेशन म्हणजेच ‘बोर्डिंग पॉईंट’ बदलण्याच्या नियमात मोठी सवलत देण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मांडला आहे.

सध्याच्या नियमानुसार, प्रवाशांना केवळ पहिल्या आरक्षण चार्टची (First Reservation Chart) तयारी होईपर्यंतच आपले बोर्डिंग स्टेशन बदलण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र, आता हा बदल दुसऱ्या आरक्षण चार्टची (Second Reservation Chart) तयारी होईपर्यंत करण्याची परवानगी देण्याबाबत रेल्वे बोर्डाने ‘सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टम’ (CRIS) कडे तांत्रिक व्यवहार्यतेची विचारणा केली आहे.

​रेल्वे बोर्डाचे संचालक संजय मनोचा यांनी १९ फेब्रुवारी २०२६ रोजी जारी केलेल्या पत्रात नमूद केले आहे की, प्रवाशांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी हा प्रस्ताव विचाराधीन आहे. जर या प्रस्तावाची अंमलबजावणी झाली, तर प्रवाशांना ट्रेन सुटण्याच्या साधारण ३० मिनिटे आधीपर्यंत (दुसरा चार्ट तयार होईपर्यंत) आपले बोर्डिंग स्टेशन बदलता येईल. वंदे भारत सारख्या वेगवान गाड्यांच्या बाबतीत ही वेळ मर्यादा १५ मिनिटे असू शकते. सध्या पहिला चार्ट गाडी सुटण्याच्या १० ते २० तास आधी तयार केला जात असल्याने प्रवाशांना ऐनवेळी स्टेशन बदलण्यात अडचणी येतात. नवीन बदल लागू झाल्यास ऐनवेळी प्रवास नियोजन बदलणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राज्यसभेच्या ३७ जागांसाठी १६ मार्च रोजी निवडणूक; महाराष्ट्रातील ७ खासदारांचा कार्यकाळ संपणार

   Follow us on        

नवी दिल्ली: भारतीय निवडणूक आयोगाने एप्रिल २०२६ मध्ये निवृत्त होणाऱ्या १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ जागांसाठीनि वडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या प्रक्रियेची अधिसूचना २६ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार असून, १६ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत मतदान पार पडेल. मतदानानंतर त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, मतपत्रिकेवर पसंतीक्रम नोंदवण्यासाठी केवळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी पुरवलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करणे अनिवार्य असेल.

​या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून डॉ. भगवत किशनराव कराड, डॉ. (श्रीमती) फौजिया तहसीन अहमद खान, प्रियांका विक्रम चतुर्वेदी, शरदचंद्र गोविंदराव पवार, धैर्यशील मोहन पाटील, रजनी अशोकराव पाटील आणि रामदास बंधू आठवले हे सदस्य निवृत्त होत आहेत. याशिवाय, ओडिशा राज्यातून ममता मोहंता, मुजीबुल्ला खान, सुजीत कुमार आणि निरंजन बिशी हे ४ सदस्य, तर तामिळनाडूमधून एन.आर. इलांगो, पी. सेल्वारासू, एम. थंबीदुराई, तिरुची शिवा, डॉ. कनिमोझी एनव्हीएन सोमू आणि जी.के. वासन हे ६ सदस्य निवृत्त होत आहेत.

​पश्चिम बंगालमधील साकेत गोखले, ऋतब्रत बॅनर्जी, विकास रंजन भट्टाचार्य, सुब्रत बक्षी आणि ५ जानेवारी २०२६ पासून रिक्त झालेली मौसम नूर यांची जागा अशा एकूण ५ जागांसाठी निवडणूक होईल. बिहारमधून अमरेंद्र धारी सिंग, प्रेमचंद गुप्ता, रामनाथ ठाकूर, उपेंद्र कुशवाहा आणि हरिवंश नारायण सिंग हे ५ सदस्य निवृत्त होत आहेत. आसाममधील रामेश्वर तेली, भुवनेश्वर कलिता आणि अजित कुमार भुयान यांच्या ३ जागांसाठी मतदान होईल. तसेच छत्तीसगडमधून कवी तेजपाल सिंग तुलसी व फुलोदेवी नेताम, हरियाणातून किरण चौधरी व राम चंदर जांगडा आणि तेलंगणातून डॉ. अभिषेक मनू सिंघवी व के.आर. सुरेश रेड्डी या प्रत्येकी दोन सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. हिमाचल प्रदेशमधून इंदू बाला गोस्वामी या एकमेव सदस्या निवृत्त होत आहेत. या सर्व ३७ जागांसाठी २० मार्च २०२६ पर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Holi Special Trains: होळी सणासाठी रेल्वेकडून १,४१० विशेष गाड्यांचे नियोजन

   Follow us on        

नवी दिल्ली: होळी सणाच्या काळात प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने यंदा विक्रमी संख्येने होळी विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी, सुरक्षित आणि सुरळीत व्हावा यासाठी देशभरात १,४१० हून अधिक होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून ही संख्या वाढवून तब्बल १,५०० पर्यंत नेण्यात येणार आहे. या सर्व विशेष गाड्या मार्च महिन्यात धावणार आहेत.

रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, सणासुदीच्या काळात प्रमुख मार्गांवरील प्रवासी गर्दीचा ताण कमी करण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील वर्षी होळी २०२५ दरम्यान एकूण १,१४४ विशेष गाड्यांचे संचालन करण्यात आले होते. यंदा त्या तुलनेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

विभागनिहाय गाड्यांचे नियोजन

मध्य रेल्वे (CR) कडून २०९ होळी विशेष गाड्या चालवण्यात येणार असून पश्चिम रेल्वे (WR) २३१ विशेष गाड्या चालवणार आहे. सर्वाधिक २८५ विशेष गाड्या पूर्व मध्य रेल्वे (ECR) कडून धावणार आहेत. त्यापाठोपाठ दक्षिण मध्य रेल्वे (SCR) १६०, उत्तर रेल्वे (NR) १०८ तर उत्तर पश्चिम रेल्वे (NWR) ७१ विशेष गाड्या चालवणार आहे.

याशिवाय उत्तर मध्य रेल्वे (NCR) ६६, उत्तर पूर्व रेल्वे (NER) आणि पूर्व किनारा रेल्वे (ECOR) प्रत्येकी ६२ गाड्या चालवणार आहेत. दक्षिण पश्चिम रेल्वे (SWR) ४७, पश्चिम मध्य रेल्वे (WCR) ४३, दक्षिण रेल्वे (SR) ३९ आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) १५ विशेष गाड्या चालवणार आहे. कोकण रेल्वेकडून ९ तर ईशान्य सीमांत रेल्वे (NFR) कडून २ विशेष गाड्यांचे संचालन होणार आहे.

प्रवाशांच्या सोयीसाठी, सुरक्षितता आणि कार्यक्षम सेवा देण्याच्या दृष्टीने भारतीय रेल्वे कटिबद्ध असल्याचे रेल्वे मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. सणासुदीच्या काळात प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे.

धक्कादायक: ऑनलाईन गेमच्या नादात तीन अल्पवयीन सख्ख्या बहिणींची नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या

   Follow us on        

गाझियाबाद (उत्तर प्रदेश) येथे बुधवारी पहाटे एक हृदयद्रावक घटना घडली. भारत सिटी या निवासी संकुलात राहणाऱ्या तीन अल्पवयीन बहिणींनी नवव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पाखी (१२), प्राची (१४) आणि विशिका (१६) अशी त्यांची नावे असून त्या चेतन कुमार यांच्या मुली आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, या तिन्ही बहिणी कोविड काळात ऑनलाइन गेम्समध्ये गुंतल्या होत्या आणि एका कोरियन टास्क-बेस्ड गेममध्ये व्यसनाधीन झाल्या होत्या. त्यांनी स्वतःला कोरियन नावे दिली होती आणि शाळेत जाणे त्यांनी कमी केले होते. घटनेच्या वेळी मुलींनी खोली आतून बंद करून एकामागोमाग खिडकीतून उडी मारली. आवाज ऐकून सुरक्षा रक्षक व शेजाऱ्यांना धक्का बसला. कुटुंबीयांनी दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत मुली खाली पडल्या होत्या. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेपूर्वी मुलींनी आठ पानांचे आत्महत्येचे पत्र लिहिले होते, ज्यात त्यांनी पालकांची माफी मागितली आणि डायरी वाचण्याची विनंती केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त अतुल कुमार सिंह यांनी सांगितले की, तिन्ही मुलींचा मृत्यू झाल्याचे तपासात स्पष्ट झाले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. ही घटना ऑनलाइन गेम्सच्या व्यसनामुळे होणाऱ्या मानसिक परिणामांचा गंभीर इशारा मानली जात आहे.

Content Protected! Please Share it instead.  

Home
Kokan Blog
Downloads
Search